*_अनाथपिंडकाचा पुत्र काळ_*
एक मोठा दानी होता होता. त्याचे नाव होते, 'अनाथपिंडक.' तो अनाथांचा मोठा आधार होता. लोकांना तो मनापासून आधार देत होता. त्याला काळ नावाचा पुत्र होता. अनाथपिंडक सदैव भगवान बुद्धांचा उपदेश ऐकण्याकरिता जात असे. परंतु काळ केव्हाच बुद्धांचा उपदेश ऐकण्यास गेला नाही.
*_'काळ' शब्द देखील सुंदर आहे. 'अनाथपिंडक' याचा अर्थ होतो. देणारा, दान देणारा, अनाथांना सनाथ करणारा. आणि 'काळ' याचा अर्थ होतो 'वेळ' किंवा 'मृत्यू'. ना 'वेळ' बुद्धांचा उपदेश ऐकायला जात होता ना 'मृत्यू'. कारण दोघे ही बुद्धांना घाबरतात. वेळ क्षणभंगुर आहे. शाश्वता जवळ जाण्यास घाबरणारच. मृत्यू तर जीवनासमोर टिकूच शकत नाही. तुम्ही तर मृत्यूला सामोरे जाऊच शकत नाही. बुद्ध पुरुषांसमोर जाण्यास मृत्यू घाबरतो. ही बुद्धांची महानता आहे._*
बापाला वाटत होते मुलाने बुद्ध प्रवचन ऐकावे परंतु मुलगा जुमानत नव्हता. एकदा अनाथपिंडक म्हणाला, 'जर तू बुद्ध प्रवचन ऐकावयास गेलास तर मी तुला शंभर सुवर्ण मुद्रा देईन. 'पैशाच्या लालसेने तो गेला. त्याने बुद्ध प्रवचन ऐकले, परत आला. आल्या बरोबर म्हणाला 'कोठे आहेत शंभर सुवर्ण मुद्रा ? प्रथम त्या द्या ! नंतरच भोजन करेन. कारण माझा कोणावरही विश्वास नाही. सुवर्णमुद्रा मोजल्यावरच तो जेवला. तो तर त्याच्याकरिता गेला होता. त्याला बुद्धांशी काही देणे - घेणे नव्हते. जेव्हा तो बुद्धांचे प्रवचन ऐकत होता तेव्हा तो मनात सुवर्णमुद्रा मोजत होता. विचार करत होता वडील देतील की नाही की बुद्धांकडे जाण्यासाठी काही चालबाजी तर केली नाही ना ? बुद्धांजवळ पाठविण्याचा बहाणा तर केला नाही ना ?
दुसऱ्या दिवशी अनाथपिंडक आपल्या मुलाला म्हणाला, 'आज हजार सुवर्णमुद्रा देईन परंतु एक अट आहे की बुद्ध प्रवचन केवळ ऐकायचेच नव्हे तर ते सर्वच्या सर्व मला जसेच्या तसे पुन्हा सांगायचे.
हजार सुवर्णमुद्रा डोळ्यासमोर नाचू लागल्या. बेटा गेला खरा, परंतु फसला ! जसेच्या तसे लक्षात ठेवण्याने गडबड केली. ध्यान देऊन एकाग्रतेने ऐकावे लागले. लक्षात ठेवायचे होते. शब्द न शब्द आठवावा लागला की चूक होऊ नये. कारण बाप पक्का बाप होता. काही चूक झाल्यास एक हजार सुवर्णमुद्रातून तो काही मुद्रा वजा करेल. त्यामुळे तो मन लावून ऐकत होता. शब्द नी शब्द तो मनात साठवत होता. क्षणात तो हजार सुवर्णमुद्रा विसरला. आणि इथेच फसला. घोटाळा झाला. तो खोल बुडाला.
घरी गेलाच नाही. रात्र झाली अनाथपिंडक धावत आला. भानगड काय झाली ?
काळ तर डोळे बंद करून बसला होता. वडील म्हणाले, 'घरी चल.'
काळ म्हणाला, 'ऐकलं, आता कोठे येणे, आणि कोठे जाणे.'
अनाथपिंडक म्हणाला, 'एक हजार सुवर्णमुद्रा तुझी वाट पाहत आहेत.'
काळ म्हणाला. 'तुम्हीच आता त्या संभाळून ठेवा. ह्या कालच्या शंभर मुद्रा ज्या तुम्ही दिल्या होत्या त्या देखील परत घेऊन जा.'
अनाथपिंडक आश्चर्यचकित झाला. कारण तो ही बुद्धांना सतत ऐकत आला होता. बुद्धांचे प्रवचन ऐकून दान देखील देत होता. परंतु त्याने असे कधी ही ऐकले नव्हते जसे आज त्याच्या पुत्राने ऐकले.
अनाथपिंडक म्हणाला, 'हे फारच झाले, मला वाटले तू प्रवचन ऐकशील, परत येशील, थोडा समजूतदार बनशील, धार्मिक होशील, प्रतिष्ठा वाढेल. परंतु हे फारच झाले. सांग, काय इरादा आहे, तुझे काय मत आहे ?
काळ म्हणाला, कसला इरादा, कसले मत ! सगळं संपलं आहे. मी भगवान बुद्धांचा झालो आहे. बुद्ध माझ्या अंतरंगात उतरले आहेत.
अनाथपिंडक बुद्धांना म्हणाला, 'ही काय भानगड आहे ? मी अनेक वर्षांपासून तुमचा उपदेश ऐकतोय. या माझ्या मुलाने तुम्हाला फक्त दोनच वेळा ऐकले. ते देखील पैशाच्या लालसेने.
*_तथागत म्हणाले, 'हा तुझा पुत्र तुझा राहिला नाही. तो माझा पुत्र झाला आहे. ज्यांनी मला खऱ्या अर्थाने ऐकले ते माझे झाले आहेत. आता हा माझा पुत्र आहे. तो तुझा आहे हा दावा तू करू शकत नाहीस. तू1 त्याला चक्रवर्ती राजाची संपत्ती दिलीस तरी तो परत घरी येऊ शकणार नाही._*
अनाथपिंडक म्हणाला, 'याला काय झाले आहे ?'
*_बुद्ध म्हणाले, 'तो सोतापन्न झाला आहे. तो ध्यानाच्या सरितेत उतरला आहे._*
या प्रसंगी तथागतांनी ही गाथा कथन केली...
*_पठव्या एकरज्जेन सग्गस्स गमनेन वा ।_*
*_सब्ब लोकधिपच्चेत सोतापत्तिफलं वरं ।।_*
*'पृथ्वीचा एकटा राजा होण्यापेक्षा, स्वर्गात प्रवेश करण्यापेक्षा किंवा सर्व लोकांचे अधिपती होण्यापेक्षा हे सोतापत्ति - फल सर्व श्रेष्ठ आहे.'*
एस धम्मो सनंतनो
प्रवचन 67
PRI
No comments:
Post a Comment