Sunday, 24 October 2021

धम्म

               🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

   *_धम्म_*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

     *_धम्म कशाला म्हणावे?_*
*१)* जीवनाला पवित्र ठेवणे, याला धम्म म्हणावे.
              _जीवहिंसा, चोरी व मिथ्याचारापासून मनुष्य विरक्त झाला तर त्यास त्याची शारीरिक पवित्रता समजावी. तो खोटे बोलण्यापासून विरक्त झाला तर त्यास त्याच्या वाणीची पवित्रता समजावी. कामछन्द, व्यापाद / द्वेष आणि आळस यांच्यापासून विरक्त झाला तर त्यास त्याची मानसिक पवित्रता समजावी. अशा प्रकारे *जो शरीर, वाणी व मन ह्यांनी पवित्र झालेला असेल, त्यालाच लोक निष्कलंक म्हणतात.*_

*२)* जीवनात पूर्णता प्राप्त करणे, याला धम्म म्हणावे.
               _शरीराची, वाणीची आणि मनाची पूर्णता प्राप्त करणे म्हणजेच संपूर्ण जीवनात पूर्णता प्राप्त करणे होय. *चित्तमलांचा पूर्णपणे क्षय करून चित्त-विमुक्तीचा अनुभव करणे ह्यालाच मनाची पूर्णता म्हणतात.*_
                _भगवंतांनी सुभूतीला उपदेश करताना सांगितले, 'चित्ताच्या सर्व अवस्थांना लक्षात ठेवून कोणत्याही प्रकारची आसक्ती न ठेवता बोधिसत्व दान देतो, हीच बोधिसत्वाची *'दान-पारमिता'* होय. तो स्वतः दहा कुशल मार्गांचा अवलंब करीत विचरण करतो आणि दुसऱ्यांनाही तसेच करण्याची प्रेरणा देतो, हीच त्याची *'शील पारमिता'* होय. तो स्वतः क्षमाशील होऊन दुसऱ्यांनाही क्षमाशील राहण्याची प्रेरणा देतो, ती त्याची *'क्षांती पारमिता'* होय. तो सतत पाच पारमितांची पुर्ती करण्यातच मग्न असतो व दुसऱ्यांनाही तसाच उपदेश करतो, ही त्याची *'वीर्य पारमिता'* होय. तो कौशल्याने समाधीचा लाभ घेतो व पुन्हा जन्म घेत नाही, म्हणजे त्याचे मन स्थिर होते ही त्याची *'समाधी पारमिता'* होय. तो भौतिक व अभौतिक वस्तुंमध्ये न गुरफटता स्वभाव धर्माविषयी विचार करतो व दुसऱ्यांनाही तसेकंग करण्याची प्रेरणा देतो, ही त्याची *'प्रज्ञा पारमिता'* होय. ह्या सर्व पारमितांचा विकास करणे ह्यालाच धम्म म्हटलेले आहे.

*३)* निर्वाण प्राप्त करणे, याला धम्म म्हणावे.
             _भगवंतांनी म्हटले आहे की, *'निर्वाणापेक्षा अधिक सुखद काहीच नाही'.* त्यांच्या उपदेशात निर्वाणाला प्रमुख स्थान आहे. त्यांच्या पुर्वीचे लोक *'आत्म्याचा मोक्ष'* यालाच निर्वाण समजत असत. *आत्म्याला मोक्ष मिळवून द्यावयाच्या चार पद्धती होत्या :-* *१)* लौकिक (खाणे, पिणे व मौज करणे) *२)* यौगिक *३)* ब्राह्मणी *४)* औपनिषदीक. परंतु भगवान बुद्धांनी विशद केलेल्या निर्वाणाचे स्वरूप त्यांच्या पूर्वीच्या लोकांनी सांगितलेल्या स्वरूपाहुन सर्वथा भिन्न होते._
          _भगवंत म्हणतात, *'राग-द्वेष प्रज्वलित अग्नी समान असून ते मनुष्याला जाळून टाकतात. मनुष्य राग, द्वेष, मोह, लोभ यांच्यापासून मुक्त झाला तर त्याला दुःख, पीडा व मानसिक वेदना यांची अनुभूती होणार नाही. तो त्यांच्यापासून मुक्त होऊन ह्याच जीवनात निर्वाण प्राप्त करू शकतो, निर्वाण ह्याच जीवनात प्राप्य आहे; ते सर्वोत्तम व आकर्षक आहे. बुद्धिमान श्रावक ते हस्तगत करू शकतो.'*_
             _शब्दाच्या व्यत्पत्तींचे दृष्टीने 'निर्वाण' शब्दाचा अर्थ 'विझणे' असा आहे. परंतु *'रागाग्नी, मोहग्नी व द्वेषाग्नीचे' विझणे होय. निर्वाणाचा अर्थ आहे आपल्या प्रवृत्तींवर एवढा ताबा ठेवणे, जेणेकरून मनुष्य पूर्णतः धम्माच्या मार्गावर चालू शकेल. याशिवाय अधिक ह्याचा अर्थ नाही. निर्वाणाचा मार्ग म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग. निर्वाण प्राप्त करावयास आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे. निष्कलंकतेचा मार्ग म्हणजे निर्वाणाचा मार्ग. *याप्रमाणे निर्वाण व परिनिर्वाण ह्यात फार मोठा फरक आहे. परिनिर्वाण म्हणजे शरीर, मन, चेतना ह्यांची सर्व प्रकारची प्रक्रिया बंद होणे; म्हणजे पूर्णपणे विझून जाणे; अर्थात मनुष्याचा अंत होणे.*_


*४)* तृष्णेचा त्याग करणे, याला धम्म म्हणावे.
                   _*'आरोग्य सर्वांत मोठा लाभ असून संतोष सर्वांत मोठे धन आहे', असे भगवंतांनी धम्मपदात म्हटलेले आहे.* त्यांच्या म्हणण्याचा अभिप्राय हाच होता की, मनुष्याने लोभाच्या आहारी जाऊ नये. लोभाला ताब्यात ठेवले पाहिजे. लोभाच्या इच्छेतूनच तृष्णेचा जन्म होतो व लोभ वाढत जातो. तृष्णा व लोभ ह्यांच्यामुळेच पुष्कळशी वाईट कर्मे मनुष्याच्या हातून घडतात. तृष्णा कधीच नष्ट न होणारी आहे. यास्तव संतोष सर्वात मोठे धन असून 'तृष्णा' व 'लोभ' ह्यांना वशीभूत केल्याने प्राप्त होते, असे भगवान बुद्धांचे सांगणे आहे.*_

*५)* सर्व संस्कार अनित्य आहे असे मानणे, याला धम्म म्हणावे.
           _अनित्यतेच्या सिद्धांताचे तीन भाग पडतात :-_
*१)* _अनेक तत्त्वांच्या मिश्रणाने वस्तू बनलेल्या असून सर्वच वस्तू अनित्य आहेत._
*२)* _व्यक्तिशः प्राणी अनित्य आहे_
*३)* _प्रतित्यसमुत्पन्न वस्तूंचे 'आत्मतत्त्व' अनित्य आहे._
      _प्रत्येक वस्तू हेच व प्रत्ययांपासून उत्पन्न होते. कोणत्याही वस्तूला स्वतंत्र अस्तित्व नाही. हेतू-प्रत्ययांचा उच्छेद झाल्यावर वस्तूंचे अस्तित्व नष्ट होते. *पृथ्वी, जल, अग्नी व वायू या चार महाभूतांपासून प्राण्यांचे शरीर उत्पन्न होते. ह्या चार महाभूतांचे पृथक्करण झाले की प्राणी नष्ट होतो. ह्याचा सारांश असा की, मानव निरंतर परिवर्तनशील आहे, निरंतर संवर्धनशील आहे. तो आपल्या जीवनाच्या दोन भिन्न क्षणांतही एकच नसतो.* सर्व वस्तू अनित्य असून परिवर्तनशील आहेत. असे नसते तर जीवनाचा विकासच थांबला असता. मानवजातीची प्रगती सर्वथा थांबली असती. यास्तव कोणत्याही वस्तुविषयी आसक्ती ठेवू नये, हीच शिकवण मिळते. संपत्ती, नातलग, मित्रमंडळी आणि परिचित लोक ह्यांच्याविषयी अनासक्ती बाळगा. कारण सर्व वस्तू अनित्य आहेत._    


*६)* कर्माला मानव जीवनाच्या नैतिक कर्माचा आधार मानणे याला धम्म म्हणावे. 
            _विश्वाच्या नैतिक क्रमांना बनविणारा कोणी 'ईश्वर' नाही. कर्मनियमानुसार विश्वाचा नैतिक क्रम बनलेला आहे. भगवंतांच्या उपदेशानुसार विश्वाचा नैतिक क्रम चांगला असो वा वाईट असो, तो सर्वथा मनुष्यावर अवलंबून आहे. नैतिक क्रम वाईट असल्यास मनुष्य अकुशल कर्म करतो. नैतिक क्रम चांगला असल्यास मनुष्य कुशल कर्म करतो. आणि ज्याप्रमाणे रात्र दिवसाचा पाठलाग करते, त्याचप्रमाणे मनुष्याच्या कर्माचा परिणाम / कर्म- विपाक त्याचा पाठलाग करते, ह्यालाच कर्माचा नियम म्हटलेले आहे. कुशल कर्माने प्रत्येकाला लाभ होतो व अकुशल कर्माने प्रत्येकाची हानी होते. कर्म व त्याचा विपाक ह्यांच्यात काळाचे कमीअधिक अंतर होऊ शकणे शक्य आहे. यास्तव भगवान बुद्धांचा उपदेश आहे की, सदासर्वदा कुशल कर्म करावे. म्हणजे नैतिक क्रम चांगला होऊन मानवतेचा लाभ होईल._
        _ह्या दृष्टीने पहाता कर्मांचे प्रकार येणेप्रमाणे :-_
*१)* _दिट्ठधम्मवेदनीय कर्म - ह्याच जन्मात लवकरच फळ देणारे कर्म_
*२)* _उपपज्जवेदनीय कर्म - उत्पन्न झाल्यावर कालांतराने फळ देणारे कर्म_
*३)* _अपरापरियवेदनीय कर्म - अनिश्चित काळी फळ देणारे कर्म_
*४)* _अहोसी कर्म - फल न देणारे अति दुर्बल कर्म_
    
               _व्यक्ती जगात येतात आणि जातात, परंतु विश्वाचा नैतिक क्रम टिकून राहतो आणि त्याच्याबरोबर कर्म नियमसुद्धा टिकून राहतो. ह्याच कारणामुळे अन्य धर्मात ईश्वराला जे स्थान आहे, तेच भगवान बुद्धांच्या धम्मात नैतिकतेला आहे. 'विश्वाचा नैतिक क्रम' टिकून ठेवणे सर्वथा 'कर्म नियमाच्या सिद्धांतावर' अवलंबून आहे. ह्यामुळेच 'कर्माचा नियम' धम्माचे एक महत्वपूर्ण अंग आहे._

*_बोधिपक्षीय धम्म_*
     _त्यावेळी भगवंतांच्या महापरिनिर्वाणाच्या तीन महिने पूर्वी भगवान कुटागार शाळेमध्ये निवास करीत होते. त्यांनी वैशालीच्या जवळपास जेवढे भिक्खु विहार करीत होते, त्या सर्वांना एकत्रित करविले. *त्यांना आपली शेवटची अनुशासनपर देशना दिली.* भगवंतांनी भिक्खुंना संबोधित करून म्हटले *"भिक्खूनो, मी बोधिपक्षीय धम्माचा जो उपदेश दिलेला आहे तो चांगल्याप्रकारे शिकून ग्रहण करा, तशी भावना करा, चिंतन - मनन करून विकसित करा, जेणेकरून हे श्रेष्ठ जीवन मंगलमय होईल आणि ह्याने अनेकांचे कल्याण होऊन अनेकांना सुखाचा लाभ होईल."*_

         त्याचे सविस्तर विवरण करताना भगवंतांनी म्हटले -

*_"भिक्खुंनो, मी चार स्मृती उपस्थांनाचा उपदेश दिला आहे, चार सम्यक - प्रयासांचा उपदेश दिला आहे, चार ऋद्धिपादांचा, पाच इंद्रियांचा उपदेश दिला आहे, पाच बलांचा उपदेश दिला आहे, सात बोध्यांगाचा उपदेश दिला आहे आणि आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश दिला आहे."_*

          _"भिक्खुंनो, संस्कार अनित्य आहेत, तुम्ही अप्रमादी राहून आपल्या उद्देश प्राप्तिकरिता सतत प्रयत्नशील राहा. थोड्याच दिवसात तथागतांचे परिनिर्वाण होईल. आजपासून तीन महिन्यानंतरच तथागत परिनिवृत्त होतील."_

_*हे सर्व धम्म एकूण सदतीस आहेत म्हणून ह्यांना 'सदतीस बोधिपक्षीय' धम्म म्हणतात.*_

● *चार स्मृती उपस्थान*

*१)* कायानुपश्यना

*२)* वेदनानुपश्यना

*३)* चित्तानुपश्यना

*४)* धर्मानुपश्यना


● *सम्यक प्रयास चार आहेत*

*१)* अकुशल धर्माची उत्पत्ती न व्हावी म्हणून प्रयत्न करणे

*२)* उत्पन्न झालेल्या अकुशलांचा नाश करण्याकरिता प्रयत्न करणे

*३)* उत्पन्न न झालेल्या कुशल धम्माची प्राप्ती करण्याकरिता प्रयत्न करणे

*४)* उत्पन्न झालेल्या कुशल धम्माची जोपासना करण्याकरिता प्रयत्न करणे


● *चार ऋद्धिपाद*

*१)* छंद

*२)* चित्त

*३)* वीर्य

*४)* विमर्श


● *पाच इंद्रिये*

*१)* चक्षु

*२)* श्रवणेन्द्रिय

*३)* नासिका

*४)* जिव्हा

*५)* त्वचा

            _यांशिवाय येथे श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा हेही अभिप्रेत आहेत. त्यांनादेखील 'इंद्रिये' च म्हणतात._

● *पाच बल*

*१)* श्रद्धा बल

*२)* वीर्य बल

*३)* स्मृती बल

*४)* समाधी बल

*५)* प्रज्ञा बल

● *सात बोध्यंग*

                _सात बोध्यांगात स्मृती, वीर्य आणि समाधीचा समावेश केला जातो._ आणि बाकीचे चार आहेत -

*१)* धर्म

*२)* विनय

*३)* प्रीतीप्रश्रंधि

*४)* उपेक्षा

● *आर्य अष्टांगिक मार्ग*

*१)* सम्यक दृष्टी

*२)* सम्यक संकल्प

*३)* सम्यक वाचा

*४)* सम्यक कर्मान्त

*५)* सम्यक आजिविका

*६)* सम्यक व्यायाम

*७)* सम्यक स्मृती

*८)* सम्यक समाधि

             _अशारितीने जर ह्या सदतीस बोधी पक्षीय धम्माची एकूण मोजदाद केली तर त्यांची वास्तविक संख्या सदतीस न होता एकूण पंचवीस होते. ह्या बोधिपक्षीय धम्मांद्वारे बौद्ध धम्माचा सारांश विशद केलेला आहे. नाहीतर भगवंतांनी अथवा संगितिकारांनी ह्यांना इतके महत्व दिले नसते._            


*_शील, श्रद्धा, वीर्य, स्मृती आणि समाधी हे पुण्य धम्म आहेत._*

_*१) शील*_
           _सदाचरणाचा आधार शील आहे. ज्ञानी मनुष्य शिलाच्या आधाराने दृढ राहून आपल्या चित्ताला वश करून घेतात. संयमी व बुद्धिमान भिक्खू शीलाच्या आधारेच तृष्णेला नष्ट करतो. शीलाचे पालन करणे हे सर्वप्रथम कर्तव्य होय. भगवंतांचा धम्म, त्याचे मौलिक रूप प्रतित्य समुत्पादाच्या रूपाने अत्यंत क्रांतिकारी स्वरूपाचा होता. संसार, समाज, मनुष्य ह्या सर्वांना त्याने क्षणोक्षणी परिवर्तनशील असल्याचे घोषीत केले. परिवर्तनानुसार आपले व्यवहार आणि आपल्या समाजाच्या परिवर्तनासाठी नेहमीच तयार राहावयाची शिकवण तो देत असे. भगवंतांनी स्वतःचे सगळ्यात महत्वाचे असे तत्वज्ञान म्हणजेच धम्म, यासदेखील केवळ एका नावेसमान उपमा दिली आणि त्यापासून फक्त फायदा तेवढा घ्या अशी शिकवण दिली. एवढेच नव्हे तर, जोवर धम्म लोकोपयोगी राहील तोपर्यंतच त्याचा वापर करा, अशी निग्रहाची शिकवण दिली._

*_२) श्रद्धा_*
              _मनात प्रसन्नता निर्माण करणे श्रद्धेची ओळख आहे. चित्तास सर्व बाधांपासून अलिप्त, स्वच्छ, प्रसन्न आणि निर्मळ करून मनात उच्च महत्वकांक्षा निर्माण करणे श्रद्धेचे कार्य आहे. एखादा मनुष्य अप्राप्त गोष्टीला प्राप्त करण्याकरिता प्रयत्न व परिश्रम करतो. कारण त्याच्या मनात ती गोष्ट प्राप्त करण्याची महत्वकांक्षा असते. ही महत्वकांक्षा श्रद्धेमुळे निर्माण झालेली असते. भगवंतांनी *'संयुक्त निकायात'* असे म्हटले आहे. *'श्रद्धेमुळे मनुष्य नदीच्या प्रवाहाला पार करून जातो', अधिक प्रयत्नशील राहून तो पुढे सागराला पार करण्याची आकांक्षा बाळगतो, दृढ संकल्पाने दुःखाचा नाश करतो, आणि प्रज्ञेने तो दुःखमुक्त होतो.'*_

*_३) वीर्य_*
              _*'दृढ करणे' वीर्याची ओळख आहे.* वीर्य म्हणजे प्रयत्न. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य पडत असलेल्या घराला खांबाचा आधार देऊन घराला पडण्यापासून वाचवितो, म्हणजेच घराला दृढ करतो. त्याप्रमाणे विर्यापासून दृढ केले गेलेले सर्व धर्म ढळत नाहीत. *भगवंतांनी म्हटले आहे, 'भिक्खुंनो! विर्यवान आर्यश्रावक पाप सोडून पुण्य ग्रहण करतो, दोष सोडून दोषरहीत होण्याचा प्रयत्न करतो. तो स्वतःला शुद्ध करीत असतो'.*_

*_४) स्मृती_*
              _अगदी 'बरोबर आठवण ठेवणे' आणि 'स्वीकार करणे' ह्यालाच स्मृती म्हणतात. स्मृती आठवण करून देत असते की अमुक - अमुक कुशल आहे, हे अकुशल आहे. हे दोषयुक्त आहे, हे दोषयुक्त नाही. हे वाईट, हे चांगले. हे कृष्ण, हे शुक्ल, ही चार स्मृतीप्रस्थान आहेत, हे सारे सम्यक प्रयत्न आहेत, ह्या चार रिद्धी आहेत, ही पाच इंद्रिये आहेत, हे पाच बळ, ही सात बोध्यांगे, हा आर्य अष्टांगिक मार्ग, ही शमथ, ही विदर्शना, ही विद्या आणि ही विमुक्ती. स्मृती उत्पन्न होऊन शोध घेते की कोणते धर्म हितकर आहेत आणि कोणते अहितकर. हे धर्म फायद्याचे आणि हे धर्म नुकसानकारक, असा शोध घेऊन सांगते. त्यामुळे योगी अहितकारक धर्मांना सोडून देतो आणि हितकारक धर्मांचा स्वीकार करतो. येणेप्रमाणे स्वीकार करणे, यासच स्मृतीची ओळख म्हटलेले आहे._

*_५) समाधी_*
         _*'प्रमुख असणे'ही समाधीची ओळख आहे. जेवढे पुण्यधर्म आहेत ते सर्व समाधीच्या प्रमुख असण्यामुळे असतात. समाधिकडेच झुकतात, समाधिकडेच घेऊन जातात आणि समाधीमध्येच स्थित होतात. ज्याप्रमाणे एखादी मिनार असते तिच्या सर्वच पायऱ्या सर्वांत वरच्या माळ्याकडे प्रमुख नेणाऱ्या असतात, वरच्या माळ्याकडेच जातात, तिथेच जाऊन अंत पावतात, तिथेच शेवटास जातात. *भगवंतांनी म्हटलेच आहे, "भिक्खुंनो! समाधीचा अभ्यास करा. समाधी लागल्याने खरे ज्ञान प्राप्त होते."*_
                _कुशल चित्ताची एकाग्रता होणे, म्हणजेच सम्यक-समाधी होय. समाधी शब्दाचे अनेक अर्थ प्रचलित आहेत. जसे - श्वासोच्छ्वास रोखुन धरणे, काही दिवस किंवा तांसाकरीता जिवंतपणी स्वतःला जमिनीत गाडून घेणे, श्वासोच्छ्वास चालू असला तरी जागृतीविहिन होणे, प्राणांन्त होणे इत्यादींनाही 'समाधी' म्हणतात. परंतु अशा समाधीशी 'सम्यक समाधीचा' काहीच संबध नाही. कोणत्याही एका चांगल्या विषयावर  चित्ताला एकाग्र करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सम्यक समाधी; स्वभावात मन / चित्त चंचल आहे यास्तव त्याला एकाग्र-चित्त करणे म्हणजेच समाधी होय. जेवढे पुण्यधर्म आहेत ते सर्व समाधिकडे घेऊन जाणारे आहेत. अशा तऱ्हेने समाधी प्रमुख आहे. समाधीचा अभ्यास केल्याने व समाधी लागण्यानेच खरे ज्ञान होते._

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*संदर्भ :*

*१) मिलिंद प्रश्न*

*२) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म*

*३) बोद्ध दर्शन*

*४) बौद्धधर्म - एक बुद्धिवादी अध्ययन*

*५) बौद्धधम्म जिज्ञासा*


*संकलन : महेश कांबळे*

*२५/१०/२०२१*

https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...