Thursday, 1 July 2021

ऐतिहासिक बौद्धांची महामंगल पर्यटन स्थळे

ऐतिहासिक बौद्धांची महामंगल पर्यटन स्थळे

 

महापरिनिर्वाण सुत्रामध्ये तथागत बुद्ध आनंदास म्हणतात की, "आनंद श्रद्धाळू , शिलसंपन्न पुरुष  व महिलांसाठी चार स्थाने दर्शनीय व वैराग्यपद आहे.

1) जेथे बोधिसत्व जन्माला आले.

2) जेथे तथागताने सम्यक संबोधिस प्राप्त केले. 

3) जेथे तथागताने धम्मचक्र प्रवर्तन केले.

4) जेथे तथागताचे महापरिनिर्वाण झाले.

 

१)      कपीलवस्तु :- हे स्थळ उत्तरप्रदेशात असून गोरखपूर पासून ९० किमी अंतरावर आहे आणि सिद्धार्थनगर पासून १२ किमी अंतरावर आहे. तसेच सोनौली बॉर्डर पासून ६५ किमी अंतरावर आहे. सध्या या ठिकाणाला पिपरवाहा या नावाने तेथील स्थानीक लोक संबोधतात. कपीलवस्तु ही प्राचीन शाक्यवंशाची राजधानी होती. सिद्धार्थ गौतम बुद्धांचे वडील शृद्धोधन शाक्य येथील राजे होते. सिद्धार्थ गौतम यांच्या बालपणीच्या आठवणीचे  स्थान कपीलवस्तु आहे. हे स्थान भारत नेपाळ सीमेवर लुंबीनी पासुन 24 किलोमीटर दूर दक्षिण- पश्चिमेस आहे. येथे आपणास बुद्धकालीन ऐतिहासिक वास्तूंचे भग्न अवशेष पाहायला मिळतात. या भग्न अवशेषांमुळे आपल्याला सिद्धार्थ गौतमाच्या प्राथमिक बाल जीवनाची माहिती मिळते.

 

२)      लुंबीनी :- लुंबीनी हे भगवान बुद्धाचे जन्मस्थळ नेपाळच्या तराईमध्ये आहे. सोनौली बॉर्डर पासून २२ किमी अंतरावर नेपाळ देशाच्या हद्दीत आहे. येथे जाण्याचा मार्ग उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील नैनिताल रेल्वे स्टेशनपासून आहे. याचे वर्तमान नाव 'रुम्मीनदेई' आहे. इ.स. १९९७ साली लुंबिनीला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान ह्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले. राणी महामाया गर्भवती असताना पालखीमधे बसुन देवदह जाण्यासाठी निघाली होती तेव्हा देवदह जाण्यासाठी लुंबीनी वनातुन जावे लागत होते. त्यावेळी लुंबीनी वनामधे शाल वृक्षाचे उद्यानवन होते. माता महामायेचे शालवृक्षाच्या उद्यानवनामधे आगमन झाले तेव्हा फळं आणि फुलांनी बहरलेल्या वृक्षांना पाहुन राणी महामाया प्रसन्न झाली, त्या मनमोहक वातावरणाने राणी महामाया अत्यंत प्रभावित झाली. पालखीतुन उतरुन राणी महामाया एका शाल वृक्षाजवळ गेली व एका फांदीला पकडले, तेव्हा अचानक राणी महामायेस प्रसव वेदना व्हायला सुरुवात झाली, व ५६३ इ. पुर्व वैशाखी पोर्णीमेला अतिशय प्रसन्न व निसर्गरम्य वातावरणात सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. याठिकाणी तथागत बुद्धांच्या स्मरणार्थ सम्राट अशोक यांनी 'अशोक स्तंभ' निर्माण केला होता. यावर सम्राट अशोकाचा अभिलेख 'इथे बुद्धाचा जन्म झाला...' लिहलेला आहे. याठिकाणी उत्खननात सापडलेल्या विटांचे प्राचीन स्तुप असुन बाजुला आधुनिक ‘रुम्मीनदेई विहार' आहे. याच ठिकाणी विहाराच्या दक्षिणेस प्राचीन तलाव आहे जेथे एके काळी बोधिसत्वाचा जन्म झाल्यावर माता महामायाने स्नान केले होते. 

 

३)      बुद्धगया :- बुद्धगया हे स्थळ बिहार राज्यामध्ये आहे. गया रेल्वे स्टेशनपासून हे स्थळ १८ किमी अंतरावर आहे. फागुन नदीच्या किनार्यावर हे बौद्ध जगतातील बुद्धांचे सर्वाधिक श्रद्धास्थान वसलेले आहे. ज्या वज्रासनावर बसून बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने सम्यक समाधी लावली ते वज्रासन येथे आहे. ज्या पिंपळाच्या झाडाखाली सिद्धार्थाने वज्रासनावर बसून सम्यक संबोधि प्राप्त केली, तो बोधिवृक्ष येथे आहे. बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर सात आठवडे भगवान बुद्ध वेगवेगळ्या जागी बसून त्यांना प्राप्त झालेल्या ज्ञानाचा अनुभव घेत राहिले, त्याचीही स्मारके या ठिकाणी आहेत. येथे १६० फुट उंचीचे महाबोधी विहार आहे. या विहारातील भगवान बुद्धांची मूर्ती भूमिस्पर्ष मुद्रेतील आहे. महाबोधी विहाराच्या पाठीमागे चंक्रमण चैत्य, अभिलोष लोचन, रतनगड, अज्रपाल, निग्रोध वृक्ष, राजायतन व मुचलिंद तलाव हि सात प्रमुख ठिकाणे आहेत. बुद्धगयेत तिबेट, ब्रह्मदेश, शियाचीन, व्हिएतनाम, बांगलादेश, जपान, थायलंड, चीन, सिलोन इत्यादी देशांची बुद्ध विहारे आहेत. बिहार ची राजधानी पटनाच्या दक्षिण- पुर्वेस १०१ किमी. अंतरावर स्थित आहे. बोधगया जिल्ह्यातील छोटे शहर आहे. बुद्धागया जवळील फाल्गु नदीच्या सहाय्यक उपनदीस 'निरंजना नदी' म्हणतात. याच नदीच्या काठावर भगवान बुद्धानी कठोर तप केले होते. या नदीचा उगम हजारीबाग जिल्ह्यात सिमेरीया जवळ आहे. प्राचीन भारतातील मुलनिवासी नागवंशिय लोक या नदीकाठी वसलेले होते. याच नदीकाठी सुजाताने बोधिसत्वाला पिण्यासाठी वाटीभर दुध व खीर दीली होती. या ठिकाणी एके काळी सुजाता स्तुप होता. येथे उत्खननात काही अवशेष मिळाले आहेत त्यावर 'देवपालराजस्स सुजातागृह' असा लेख आहे, याचाच अर्थ सुजाताच्या स्मरणार्थ बनविलेला स्तुप हा राजा देवपाल यांच्या शासन काळातील असावा. सुजाता कुटी पासुन काही अंतरावर नदी किनारी छोटा बुद्ध विहार आहे या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाने वाटी नदीमध्ये प्रवाहित करून भावी बुद्धत्वाची परीक्षा घेतली होती. उरूवेला येथुन निरंजना नदीच्या काठावर आल्यावर सिद्धार्थ गौतम पिंपळाच्या झाडाखाली पद्मासन लाऊन बसले. याच दरम्यान शरीर व चित्ताच्या ध्यानाची भावना केल्याने सिद्धार्थ  गौतमास जन्म व मृत्यूच्या पलीकडील सत्याचा साक्षात्कार झाला. सिद्धार्थ गौतमाने जाणुन घेतले की समस्त संसार दुःखी का आहे. आज्ञानाचे कारण काय आहे. लोभ, तृष्णा व अंहकारामुळे काय नुकसान होत आहे. दुःखाच निवारण कसं करायचं. या सर्वांना तथागताने 'चार आर्यसत्य' असे नाव दिले. सम्यक संबोधि प्राप्त केल्यानंतर भगवान बुद्धांनी संपुर्ण पहिला आठवडा बोधिवृक्षाखाली समाधी अवस्थेत व्यतीत केला. हा बोधिवृक्ष बोधगया महाविहाराच्या पश्चिमेस आहे. या बोधिवृक्षाची एक शाखा श्रीलंकेच्या 'अनुराधापुर' मधे आहे. बोधिवृक्ष व महाविहार यांच्या मधे भगवान बुद्धाचे साधना स्थळ 'वज्रासन' आहे. चीनी बौद्ध यात्री '#युवान_शुवांग' म्हणतात की भगवान बुद्धाचे साधना स्थळ 'वज्रासन' समस्त विश्वाच्या मध्यम भागात स्थित आहे. दुसरा आठवडा भगवान बुद्धांनी समाधी अवस्थेत व्यतीत केला. याच ठिकाणी 'अनिमेष लोचन स्तुप' बनवला गेला आहे. कारण याच आठवड्यात भगवान बुद्ध  बोधिवृक्षा विषयी परोपकारी भावना व्यक्त करत बोधिवृक्षाला एकटक बघत राहिले होते. तथागताने तिसरा आठवडा चंक्रमण करत व्यतीत केला. महाविहाराजवळ या घटनेच्या स्मरणार्थ 'चंक्रमण स्थळाचा चबुतरा' बनवण्यात आला आहे. हा चंक्रमण चबुतरा 53 फुट लांब, 3 फुट 6 इंच रूंद व 3 फुट उंच आहे. भगवान बुद्धाच्या पाऊलांचे ठसे प्रदर्शित करण्यासाठी त्यावर कमळाचे फुल बनवले गेले आहेत. चौथा आठवडा भगवान बुद्धांनी 'रतनगृह' येथे ध्यानमग्न अवस्थेत व्यतीत केला. पाचवा आठवडा भगवान बुद्धांनी 'आजपाल निग्रोध' झाडाखाली समाधी अवस्थेत व्यतीत केला. सहावा आठवडा भगवान बुद्धांनी 'मुचिलींद' तळ्याजवळ मुचिलींद वृक्षाच्या सावलीत व्यतीत केला. सातवा व अंतिम आठवडा भगवान बुद्धांनी 'राजायतन' वृक्षाखाली समाधीस्त अवस्थेत व्यतीत केला. आज आपण जो वृक्ष बघतो, तो 60 वर्षापुर्वी 'बरमा' येथुन आणलेला वृक्ष आहे. याच ठिकाणी उत्कल म्हणजेच उडीसा येथील व्यापारी बंधू तपस्सु व भल्लीक यांना भगवान बुद्धानी बुद्ध व धम्माची शरण दिली होती. तपस्सु व भल्लीक दोघेही व्यापारी बंधू तथागताचे पहिले उपासक शिष्य बनले होते.

 

४)      सारनाथ :- हे स्थळ उत्तर प्रदेशामध्ये असून ते वाराणसीपासून ८ किमी अंतरावर आहे. सारनाथ या पवित्र स्थळी, सध्या सारनाथ रेल्वे स्टेशन आहे. बुद्धत्व प्राप्तीनंतर भगवान बुद्धानी प्रथम उपदेश सारनाथ येथील मृगदाय वनामधे पंचवर्गीय भिक्षुंना दिला. यामध्ये चार आर्य सत्य, मध्यम मार्ग व जीवनातील कोणत्याही अतीरेकापासुन दुर राहणे व दुःखाला जाणून घेण्याचा उपदेश दिला. या प्रथम उपदेशास 'धम्मचक्र प्रवर्तन' असे म्हणतात. यानंतर तथागत बुद्धानी 'मृगदाय' वनामधील मुलगंध कुटीमधे निवास केला. मुलगंध कुटीच्या पश्चिमेस सम्राट अशोक कालीन अशोक स्तंभ आहे, यावर तीन अभिलेख कोरलेले आहेत. सारनाथ मधे धम्म चक्र प्रवर्तन केल्यानंतर वाराणसी मधील अनेक लोक संघामधे दिक्षीत झाले. वाराणसी मधील काश्यप बंधुनी बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. वाराणसी मधे ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी उपदेश दिले त्या सर्व ठिकाणी बौद्ध स्मारक बनविले गेले होते. 

 

५)      राजगृह :- हे स्थळ बिहार राज्यात असून नालंदा जिल्ह्यात आहे. बुद्धगयेपासून हे ठिकाण ९० किमी अंतरावर आहे. पटनापासुन जवळ जवळ 100 किलोमीटर दूर असलेल्या बौद्ध तीर्थक्षेत्रास राजगीर म्हणतात. राजगृह म्हणजे राजाचे घर. प्राचीन काळातील 16 भारतीय जनपदापैकी राजगीर एक होते, त्यास त्यावेळी 'राजगृह' म्हटले जायचे. या ठिकाणी मगध वंशाचे शक्तिशाली राजे बिंबीसार यांचे शासन होते. राजा बिंबीसार यांनी आपले आवडते उद्यान  'वेळुवन विहार' भगवान बुद्धास दान दिले होते. याच ठिकाणी भंते दब्बमलपुत्त अरहंत झाले होते, महाराणी खेमा भिक्षुनी झाली होती. भगवान बुद्धाचा चुलत भाऊ देवदत्त याने भगवान बुद्धावर केलेल्या प्राणघातक हल्ल्याचे स्थान देखील राजगीर  हेच आहे. ग्रुध्दकुट पर्वतावरुन मोठा दगड देवदत्ताने भगवान बुद्धांच्या अंगावर ढकलून दिला होता पण तो दगड  तथागताच्या पायाच्या बोटाला किरकोळ नुकसान करुन दुर जाउन पडला होता. देवदत्ताने चुगली करून आजातशत्रुच्या मनात भगवान बुद्ध व वडील बिंबीसार यांविषयी द्वेष निर्माण केला. राजा बिंबीसार यांचा मुलगा आजातशत्रु यांने  पीता बिंबीसार यांची  हत्या केली. त्यानंतर आजातशत्रुचा मुलगा उदयने आजातशत्रुची हत्या केली, यानंतर उदयचा मुलगा महामुंडने उदयची हत्या केली. पितृहत्येचे पापं याच जन्मात सर्वांना भोगले. लिच्छवींनी जेव्हा दुष्काळ निवारणासाठी तथागतास वैशाली मधे बोलवले तेव्हा भगवान बुद्धांना त्रास होऊ नये म्हणून राजगृह ते गंगातट पर्यंत रस्ता राजा बिंबीसार यांनी बनवला होता, आज या मार्गास 'राजा बिंबीसार मार्ग' म्हणतात. येथेच ते कारागृह आहे ज्यामधे राजा बिंबीसार यांना आजातशत्रुने कैद केले होते. भगवान बुद्धाचे चुलत भाऊ देवदत्त यांस भिक्षु बनताना बुद्धासारखी प्रतिष्ठा मिळवण्याची खुप लालसा होती. आपल्या महत्वाकांक्षामधे असफल झाल्यावर त्याच्या मनामध्ये घृणा व तिरस्काराने जन्म घेतला. त्यामुळे देवदत्त भगवान बुद्धाच्या विरोधात क्रूर कारवाया करत राहिला. राजगीर मधील नवीन स्थानास 'नवीन राजगीर' म्हणतात. चीनी बौद्ध यात्री '#फा_हियान' यांच्या नुसार नवीन राजगीरची निर्मिती राजा आजातशत्रु यांनी केली होती. वर्तमान काळात याचे भग्न अवशेष पाहावयास मिळतात. सरस्वती नदीच्या पलीकडे सम्राट अशोक यांनी पश्चिमेस स्तुप बनविला होता. पश्चिमेस 3 मीटर खोदकाम केल्यानंतर येथे मौर्य शैलीच्या वीटा व लघुस्तुप सापडले आहेत. वैभार पहाडीच्या पुर्वेस उतारावर जी गुहा आहे तीला '#पिपलगुहा' म्हणतात. भगवान बुद्धाचे प्रमुख शिष्य भंते 'महाकाश्यप' येथेच निवास करत होते, जे प्रथम बौद्ध संगितीचे  अध्यक्ष होते. या ठिकाणी  '#सप्तकर्णी' गुहेमधे 'प्रथम धम्म संगिती' झाली होती. ग्रुध्दकुट पर्वताजवळील छटागीरी पर्वतासमीप '#जीवक_आम्रवन_विहार' आपणास बघावयास मिळतो. हे आम्रवन राजवैद्य जीवक यांनी तथागत बुद्धास दान दिले होते. भगवान बुद्ध यांच्या प्रती आपली असीम श्रद्धा  व्यक्त करण्यासाठी राजगीरच्या पहाडीवर जपानद्वारा निर्मित भव्य '#शांती_स्तुप' आहे. वैभार पर्वताच्या दक्षिणेतील गुहांना 'सोनभंडार गुहा' म्हणतात, या ठिकाणी मगध राज्याचा स्वर्ण व राजकोश सुरक्षित ठेवला जात होता. मुख्य मार्गांपासून दक्षिणेस 1 किमी दुर विटांचे प्राचीन भवन आहे यास '#मणीहार_मठ' असे म्हणतात. मणीहार मठ हे बुद्ध कालीन भिक्षु निवास स्थान होते. ही जागा नागवंशिय लोकांसाठी पूजनीय होती. याच  ठिकाणी उत्खनन होऊन अनेक शिल्प व नागप्रतिमा मिळाल्या आहेत.

 

६)      श्रावस्ती :- हे स्थळ उत्तर प्रदेशात असून गोरखपूर पासून २०० किमी अंतरावर आहे. तसेच गौंडा स्टेशनपासून २५ किमी अंतरावर आहे. प्राचीन भारतातील श्रावस्ती नगरास आज 'सहेत महेत' म्हटले जाते.  हे उत्तर परदेशातील गुडा व बेहराईक या जिल्ह्यांच्या मध्यभागी स्थित आहे. सहेत मधे प्रसिद्ध प्राचीन 'जेतवन बौद्ध विहार' आहे. जेतवन विहार अनाथपिंडक श्रेष्ठी यांनी  भगवान बुद्धास भेट दिला होता. जेतवन विहाराची जागा अनाथपिंडक श्रेष्ठी यांनी 'राजकुमार जेत' यांचे कडुन असंख्य स्वर्ण मुद्रा देऊन विकत घेतली होती. जेतवन विहाराच्या आंगणात एक स्तुप व विहीर आहे. प्राचीन काळातील भिक्षुसंघासाठी २१ कक्ष आहेत. या ठिकाणी भगवान बुद्ध व भावी बुद्ध 'मैत्रेय' यांची रेखीव प्रतीमा आहे. जेतवन विहाराच्या उत्तरेस प्राचीन काळात निर्मित ८ स्तुपांचे अवशेष पहावयास मिळतात. येथे मिगार माता विशाखाने बांधलेला व भिक्खू संघाला दान दिलेला पुर्वाराम विहार आहे. येहते मुलगंध कुटी विहार आहे. तसेच अंगुलीमालाची गुंफा आहे. येथे जपान सरकारच्या मदतीने, भारत सरकार उत्खनन करीत आहे. येथे थायलंड, चीन व ब्रह्मदेशाची बुद्ध विहारे असून त्यांच्या धर्मशाळा मुक्कामाच्या दृष्टीने सोयीस्कर आहेत.

 

७)      संकिस्सा :- उत्तर परदेशातील फरुखाबाद जिल्ह्यातील छोटेसे गाव हे 'संकिस्सा' नावाने ओळखले जाते.  बुद्ध काळात या गावास 'सांकस्य' म्हणत असत. सम्राट अशोक यांनी भगवान बुद्धाच्या स्मरणार्थ या ठिकाणी स्मारक बनविले होते. याच ठिकाणी चीनी बौद्ध यात्री '#फा_हियान' यांनी अनेक बौद्ध स्तुप व विहार पाहिले होते. संकिस्सा  येथे उत्खननात सापडलेल्या अनेक शिल्प साहित्य वस्तू लखनऊ व कलकत्ता येथील राज्य संग्रहात सुरक्षित ठेवल्या गेल्या आहे.

 

८)      कौशांबी :- भगवान बुद्धाच्या जीवन काळात महत्वपूर्ण नगरांपैकी कौशांबी एक नगरी होती. कौशांबी वत्स राज्याची राजधानी सुद्धा होती. कौशांबी मधे भगवान बुद्धाचे अनेक वेळा आगमन झाले. याच ठिकाणी कुकुटाराम व पावारीकाराम आदी प्रसिद्ध विहार होते. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांनी कौशांबी या ठिकाणी शिलालेख व अभिलेख कोरलेले आहेत. 

 

९)      वैशाली :- हे स्थळ बिहार राज्यात असून मुजफ्फरपूर जिल्ह्यात आहे. सध्या या ठिकाणाला बसाठ नावाने ओळखतात. हे ठिकाण पाटना पासुन्ब ६० किमी अंतरावर आहे. वैशाली या नगरीत बुद्ध धम्माशी संबंधित अनेक ऐतिहासिक स्तुपांचे भग्न अवशेष वर्तमान बसाढ नामक ठिकाणाजवळ अस्तित्वात आहे, जे स्थान मुजफ्फरपुर पासुन 20 मधील दुर दक्षिण-पश्चिमेस आहे. वैशाली सिद्धार्थ गौतम बुद्ध कालीन लिच्छवी गणराज्याची राजधानी होती. वैशाली आठ जनपदांचे अर्थात अट्ठकुल चे संयुक्त वज्जीगण संघाची राजधानी होती. वैशाली नगरीस जगातील प्रथम लोकशाही  असलेली राजधानी असल्याचा सन्मान व गौरव मिळाला आहे. वैशालीच्या कुटागार शाळेत भगवान बुद्धांनी अनेक महत्त्वाचे उपदेश दिले आहेत. भगवान बुद्ध वैशाली मधील बहुपुत्रचैत्य, चापालचैत्य व महावन कुटागार शाळेत नेहमी राहत असतं. वैशाली मधे दुष्काळ पडला असताना भगवान गौतम बुद्धांनी रतन सुत्राचे पठन करून भिषण परिस्थिती मधे सुधारणा घडवून आणली होती. वैशाली मधेच बौद्ध भिक्षुनी संघाची स्थापना झाली होती. वैशाली मधे 8 फुट उंच व जवळ जवळ दीड किलोमीटर क्षेत्रातील परिसरामधील टेकडीस 'राजा विशाल गढ' यांची टेकडी म्हणतात. याच ठिकाणी वज्जीगण राज्य संघाचे सभागृह होते. याठिकाणी 770 सभासद एकत्र येऊन राज्य प्रशासन संदर्भात चर्चा करत असत. टेकडीपासुन जवळजवळ  3.5, किमी दुरवर उत्तर-पश्चिमेस देवांना प्रिय असलेला प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांनी बनविलेला अशोक स्तंभ आहे. या स्तंभावर एकमुखी सिंहाची प्रतिमा विराजमान आहे. अशोक स्तंभाच्या दक्षिणेस प्राचीन तलाव आहे, जो आजकाल रामकुंड नावाने प्रसिद्ध आहे. या तलावाच्या काठी राजा सम्राट अशोक यांनी बुद्धधम्मावर प्रभावित होऊन बौद्ध स्तुप व स्तंभ बनविला आहे. राजा विशाल गढ या टेकडी पासुन हा स्तुप 2.5 किमी च्या अंतरावर आहे. या स्तुपांचा व्यास त्यावेळी 25 फुट होता, या स्तुपास प्राचीन काळी '#लिच्छवी_स्तुप' असे म्हटले जात होते. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या 100 वर्षानंतर भदंत सब्बकामी यांच्या अध्यक्षतेखाली वैशाली मधेच इसवी सन पुर्व 383 मधे द्वितीय धम्म संगिती झाली होती. प्रसिद्ध नर्तकी आम्रपालीचे निवासस्थान देखील वैशाली नगरीच हीती. आम्रपालीने तथागतास व भिक्षुसंघास 35 व्या वर्षावासादरम्यान भोजन दानासाठी आमंत्रित केले होते. वैशालीमधील अरहंत थेरी विमला ही दुषित जीवनाचा त्याग करून बुद्ध धम्म व संघास शरण आली होती. वैशाली मधील महावन कुटागार शाळेत भगवान बुद्धांनी घोषणा केली होती की आजपासून ठीक तीन महिन्यांनी बुद्ध महापरिनिर्वाणास प्राप्त होतील.

 

१० कुशीनगर :- हे स्थळ उत्तरप्रदेशात असून गोरखपूर रेल्वे स्टेशनपासून ५० किमी अंतरावर आहे. उत्तर प्रदेश मधील देवरीया जिल्ह्यातील कसीया नामक छोट्या गावापासून जवळपास 3× 5 किमी. दुरवर कुशीनगर आहे. याच ठिकाणी भगवान बुद्धाचे महापरिनिर्वाण झाले होते. भगवान बुद्ध हिरण्यवती नदीच्या पलीकडील तीरावर कुशीनाराच्या मल्लांच्या शालवनात यमक शाल वृक्षांच्या मधे ठेवलेल्या मंचकावर उत्तरेकडे डोके ठेवून, उजव्या कुशीवर पायावर पाय ठेवून, स्मृती संप्रजन्य राहुन, सिंहशय्या करुन झोपले होते. यानंतर भगवान बुद्धानी प्रथम ते चतुर्थ ध्यानाला प्राप्त करून आकाशन्यायतन, विज्ञानन्यायतन, अकिंचन्यायतन, व नैवसंज्ञायतन निरोध समाधीस प्राप्त करून तथागत बुद्ध महापरिनिर्वाणास प्राप्त झाले. भगवान बुद्धाच्या अस्तीधातु व भस्म यांना 8 हिस्स्यांमधे विभाजित करण्यात आले. मगधचा राजा आजातशत्रु, अल्लकप्पाचे वज्जी, राजगृह राज्याचे शाक्य, वैशाली राज्याचे लिच्छवीकपीलवस्तु येथील शाक्य, रामग्रामचे कोलीय, वेठ- द्वीपचे ब्राह्मण, पावानगरीचे व कुशीनाराचे मल्ल यांनी भगवान बुद्धाच्या अस्तीं व भस्म यांवर स्तुप व विहार बांधले. कुशीनगर मधे 'महापरिनिर्वाण स्मारक स्तुप' बनविला गेला जो आजही बघावयास मिळतो. यामध्ये भगवान बुद्धाची महापरिनिर्वाण अवस्थेत सिंहशय्या करुन झोपलेली ६ × मीटरची मुर्ती आहे. दक्षिणेस सातव्या शतकात निर्मित छोटे छोटे स्तुप आहेत. महापरिनिर्वाण स्तुप पासुन दक्षिणेस थोड्या अंतरावर भगवान बुद्धाची विशाल मुर्ती असलेले 'माथाकुवर' स्मारक आहे. माथाकुवरचा शोध अलेक्झांडर कनिंगहम यांनी लावला होता, त्यावेळी स्थानिक लोक यास माथाकुवर असे म्हणत असत. जनरल कनिंगहम यांच्या मते माथाकुवरचा अर्थ मृत किंवा मयत राजकुमार असा होतो. माथाकुवर स्मारकापासुन १.५ किमी. अंतरावर टेकडीप्रमाणे प्राचीन स्तुप आहे. या स्तुपाचा व्यास 37 मीटर आहे. याच ठिकाणी भगवान बुद्धाचा चंदनाच्या चितेवर अंत्यविधी करण्यात आला होता, या स्तुपास '#रामाभार_स्तुप' असे म्हणतात. याच ठिकाणी भगवान बुद्धाच्या काळात 'मुकुट बंधन विहार' होता. 

 

१  औरंगाबाद:-* या राज्यात औरंगाबद येथील अजिंठा लेणीवर विश्वविख्यात तीस प्राचीन बौद्ध गुंफाचा समूह आहे, अजिंठा बरोबरच एलोरा (वेरूळ) स्थळ युनेस्कोद्वारा मान्यताप्राप्त आहे, एलोरा (वेरूळ) येथे १३ बौद्ध कालीन गुंफा आहेत, याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाच्या प्रचारासाठी दिनांक १९ जून १९५० रोजी.. स्थापन केलेले मिलिंद महाविद्यालय आणि नागसेन वन प्रसिद्ध आहे.

 

१२ कार्ला:-* पुणे जिल्ह्यातील या लेणीमध्ये बौद्ध गुंफा असून भारतातील सर्वात मोठे चैत्यगृह आहे. कार्ले लेणी हा १६ बौद्ध लेण्यांचा गट असून त्यातील एक चैत्यगृह व इतर विहार आहेत. ही लेणी प्राचीन काळी वलुरकनावाने ओळखली जात असे. बुद्धांच्या जीवनावर आधारलेल्या या दगडी गुंफा पुणे जिल्ह्यात मळवलीपासून (लोणावळा) ४-५ कि.मी. अंतरावर आहे. ६ किलोमीटर अंतरावर लोणावळ्यानजीक आहेत. येथील चैत्यगृहाचे स्थापत्य शिल्पे सुंदर आहेत. कार्ले गुंफा ह्या बोरघाटात स्थित आहेत. बोरघाट सातवाहन कालीन प्राचीन बंदरे कल्याण आणि सोपारा या ठिकाणांहून तेर या प्राचीन ठिकाणास जाण्याच्या मार्गावर आहे. इ.स.पू. १ ले शतक ते इ.स. ५ वे शतक या काळात ही लेणी खोदली गेलेली आहे. भारत सरकारने या लेणीला दिनांक २६ मेइ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१] कार्ला गुंफांमध्ये कदाचित सर्वात जास्त मोठ्या संख्येने चैत्य सभागृह आहेत.

 

१३ नागपूर:-* हे ऐतिहासिक शहर असून महाराष्ट्राची उपराजधानी आहे, येथील दीक्षा भूमीवर डॉ: बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टो १९५६ रोजी अशोकाविजया दशमीच्या दिनी, महास्थविर भन्ते चंद्रमणी यांचेकडून प्रथम स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि नंतर आपल्या लाखो अनुयायांना दीक्षा दिली, येथील भव्य दीक्षाभूमी दर्सनीय आहे, नागपूर हे शहर दीक्षाभूमी म्हणून ओळखले जाते.

 

१४  राजगृह (मुंबई) :-* हे ठिकाण महाराष्ट्रातील मुंबई शहरात आहे. दादर पूर्व रेल्वे स्टेशनपासून १ किमी अंतरावर हिंदू कॉलनीमध्ये आहे. राजगृहात बाबासाहेबांचे भव्य ग्रंथालय आहे. येथेच माता रमाई यांचे दि. २७/०५/१९३५ तसेच भय्यासाहेबांचे १९/०९/१९७७ रोजी याच राजगृहात दुःखद निधन झाले. सध्या या राजगृहात बाबासाहेबांचे वंशज राहत आहेत.

 

१५  आंबेडकर भवन :- हे ठिकाण महाराष्ट्रातील मुंबई शहरात आहे. दादर पूर्व रेल्वे स्टेशनपासून अर्ध्या किमी अंतरावर आहे. बाबासाहेबांनी स्वतःच्या पैशांनी गोकुळदास पास्ता रोडवर जमीन विकत घेतली, तेथे भारत भूषण प्रिंटींग प्रेस सुरु केली. बाजूला त्यांनीच स्थापन केलेल्या शेड्युल्ड कास्ट इंप्रूव्ह्मेंट ट्रस्टच्या माध्यमातून भव्य इमारत बांधण्यात आली. त्या इमारतीला डॉ आंबेडकर भवन असे म्हणतात. बाबासाहेबांच्या अनेक बैठका इथे झाल्या. भय्यासाहेबांनी याच प्रेसमधून बाबासाहेबांचे अनेक ग्रंथ प्रकाशित केले. बाबासाहेबांनीच या प्रेसचे नामांतर “बुद्ध भूषण प्रिंटींग प्रेस” असे केले. याच प्रेसमधून जनता व प्रबुद्ध भारत या पाक्षिकांचे प्रकाशन होत असे. डॉ आंबेडकर भवनमध्येभारतीय बौद्ध महासभा, भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेना व समतां सैनिक दलाचे कार्यालय असून इथे सतत धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय चळवळीचे कार्यक्रम राबविले जातात. डॉ आंबडेकर भवन हे आंबेडकरी चळवळीचे केंद्र आहे म्हणून देशातला आंबेडकरी चळवळीचा प्रत्येक कार्यकर्ता येथे आवर्जून भेट देतो.

 

१  सिद्धार्थ कॉलेज : - हे ठिकाण मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून अर्धा किमी अंतरावर, हुतात्मा चौकात, फोर्ट येथे आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना बाबासाहेबांनी केली. या शिक्षण संस्थेच्या वतीने त्यांनी फोर्ट भागातील आंनद भवन हि इमारत विकत घेतली त्या इमारतीत कला, वाणिज्य, विज्ञान, कायदा इत्यादी विविध अभ्यास क्रमांसाठी सिद्धार्थ कॉलेज सुरु केले. पाठीमागे दुसरी इमारत घेऊन तिचे नाव बुद्धभवन ठेवले. वडाळ्याला विस्तीर्ण जागा घेऊन भव्य असे डॉ आंबडेकर कॉलेज काढले. तिथे विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह काढले. हि सर्व कॉलेजेस आजही विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कुशल कर्म करीत आहेत.

 

१७ नालासोपारा : - हे ठिकाण महाराष्ट्रतील ठाणे जिल्ह्यात येते. या ठिकाणी जाण्यासाठी चर्चगेट ते विरार लोकल ट्रेनने जावे लागते. विरारच्या आधीचे स्टेशन नालासोपारा आहे. येथील प्राचीन बुद्ध विहार, भग्न अवस्थेत आहे. भगवान बुद्धांच्या काळात या नगरीला सुप्पारक नगरी असे म्हणत असत. हि नगरी बुद्धकालीन जंबूद्विपातील भव्य व्यापारी बंदर होते.

 

१८ कान्हेरी गुंफा :- हे ठिकाण महाराष्ट्रातील मुंबई शहरात आहे. येथे जाण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार किंवा बोरीवली लोकलने बोरिवलीला उतरावे लागते. तेथे ९ किमी अंतरावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जवळ कान्हेरी गुंफा आहेत. त्या फार प्राचीन काळाच्या बौद्ध गुंफा, स्तूप असून सध्या ते शिल्प, मुर्त्या, लेणी झिजण्यात येत आहेत. हि ऐतिहासिक वास्तुशिल्पांचे जतन करण्यासाठी सर्व बौद्धांनी वेळोवेळी पर्यटन काढून येथे भेट दिली पाहिजे.

 

१९ चवदार तळे-महाड :- हे ठिकाण महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे. मुंबई पासून हे ठिकाण १५० किमी अंतरावा आहे. या ठिकाणी चवदार तळे आहे. भव्य क्रांतीस्तंभ उभारलेला आहे. येथे शासनाने भव्य असे ‘आंबडेकर भवन’ निर्माण केले आहे. येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दि, २० मार्च १९२७ रोजी येथील चवदार ताळ्यावर सत्याग्रह केला, तेंव्हापासून या ठिकाणाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेले आहे, याच ठिकाणी बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन केले.

 

२० नाशिक:-* येथे सातवाहन राजाच्या काळातील त्रिरेशमी बुद्धलेणी प्रसिद्ध आहेत, या शिवाय जिल्ह्यातील त्रिंगलवाडी येथेही बुद्धलेणी आहेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथे १९३० साली काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केलेला आहे.

 

२१   पुणे:-* या जिल्ह्यातील देहूरोड या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि. २५ डिसेंबर १९५४ रोजी भारतात पहिल्या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना केली व महाबोधी विहाराचे उदघाटन करून त्यांनी येथूनच धम्मक्रांतीला सुरवात केली, पुणे शहरात सिम्बॉयसिस महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक असून येथे डॉ.माईसाहेब आंबेडकरांनी त्यांच्या दैनंदिन वापरातील बऱ्याचशा चिजवस्तूंचे जतन करून ठेवले आहे, हा अनमोल ठेवा सर्वाना बघण्यासाठी प्रदर्शित करून ठेवण्यात आलेला आहे, तळेगाव दाभाडे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवास्थान ( बंगला ) आहे.

 

२२ भिमा-कोरेगांव:-* हे ठिकाण महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहे. पुणे येथे पेशव्यांच्या सैन्याला नमवून विजयश्री प्राप्त करणाऱ्या १११ च्या *महार बटालियन* मधील शूर वीरांच्या स्मरणार्थ येथे भव्य क्रांतिस्तंभ उभारण्यात आलेला आहे, युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिवर्षी १ जानेवारी रोजी या विजयी क्रांतिस्तंभाला मांवनदना देण्यासाठी येथे येत असत, आणि चिंतन करून प्रेरणा घेत असत, म्हणूनच या ठिकाणी दरवर्षी १ जानेवारीस भिमा-कोरेगाव येथील क्रांतिस्तंभास मानवंदना देण्यासाठी धम्मबांधव मोठ्या संख्येने येत असतात.

 

२३ येवला:-* येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी धर्मांतराची घोषणा केली, तेंव्हापासून हे ठिकाण मुक्तीभूमी म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात आहे मुक्तीभूमी हे स्थळ येवला स्टेशनपासून अर्धा किमी अंतरावर आहे. तसेच हे ठिकाण नाशिक रोड स्टेशनपासून २७ किमी अंतरावर आहे. येथे भव्य क्रांतीस्तंभ उभारला असून दरवर्षी १३ ऑक्टोबरला भीम अनुयायी मानवंदना देण्यासाठी येत असतात.

 

२४ सेवाग्राम:-* वर्धा जिल्ह्यातील या ठिकाणी विश्वशांती स्तूप आहे.

 

२५   तक्षशीला :-* प्राचीन भारतातील एक प्रसिद्ध विद्यापीठ. तक्षशिला ही नगरी प्राचीन गांधार देशाची राजधानी होती. पूर्वी भारतात असलेले  हे ठिकाण सध्या पाकिस्तानात रावळपिंडीपासून वायव्येस सु. ३५ किमी. अंतरावर आधुनिक सराईकल या रेल्वे स्थानकाजवळ आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाचे  प्रमुख संचालक सर जॉन मार्शल यांनी या भागात उत्खनन केले, परंतु प्राचीन विद्यापीठाचे असे फारसे अवशेष तेथे सापडले नाहीत. तक्षशिला नगरी व विद्यापीठ यांचे उल्लेख रामायण, महाभारत  आणि जातकांत आढळतात. काही ग्रीक व चिनी परदेशी प्रवाशांनीही आपल्या प्रवासवृत्तांतात या विद्यापीठाचा उल्लेख केला आहे. कैकेयीपुत्र भरताने तक्षशिला नगर वसविले व त्याला तक्ष या आपल्या मुलाचे नाव दिले, असे मानले जाते. इ. स. पू. आठव्या शतकापासून इ. स. चौथ्या शतकापर्यंत सु. १,२०० वर्षे हे विद्यापीठ अस्तित्वात होते. या कालखंडात त्या प्रदेशावर ग्रीक, इराणी, मौर्य, इंडोबॅक्ट्रियन, सिथियन, कुशाण वगैरे अनेक राज्यकर्त्यांच्या राजकारणाचा, संस्कृतींचा आणि भाषांचा प्रभाव पडला व त्याचा परिणाम विद्यापीठातील भाषा आणि अभ्यासक्रम यांवरही झाला. इ. स. पाचव्या शतकात हूणांनी तक्षशिलेचा पूर्ण विध्वंस केला व तेव्हापासून हे विद्यापीठ बंद पडले. तक्षशिला विद्यापीठाची रचना ही आधुनिक विद्यापीठांप्रमाणे नव्हती. तेथे अनेक विद्यार्थी उच्च अध्ययनाकरिता भारतातील कोनाकोपऱ्यांतून व आशियायूरोपमधील देशांतूनही येत. प्रत्येक शिक्षक म्हणजे एक स्वतंत्र संस्थाच असे. त्याला त्याचे प्रौढ विद्यार्थी मदत करीत. एका शिक्षकाच्या हाताखाली सु. ५०० विद्यार्थी असत, असा उल्लेख जातकांत आहे. विद्यार्थ्यांच्या भोजननिवासाची सोय विद्यापीठाच्या वसतिगृहात असे. सधन वर्गातील विद्यार्थी संपूर्ण शिक्षणाकरिता सामान्यतः एक हजार सुवर्णनाणी शुल्क म्हणून देत. निर्धन विद्यार्थी गुरूगृही राहून नेमलेली कामे दिवसा करीत आणि रात्री अध्ययन करीत. काही विद्यार्थी अध्ययन पूर्ण झाल्यानंतर पैसे मिळवून गुरुदक्षिणा देत. प्रवेशपरीक्षेनंतर १६१७ वर्षे वयाचे विद्यार्थी घेतले जात. शिक्षणाचा कालावधी सामान्यपणे ७८ वर्षांचा असे. इ. स. पू. सहाव्या शतकात या ठिकाणी बनारस, राजगृह, मिथीला, उज्जयिनी इ. नगरांतून व कुरू, कोसल इ. राज्यांतून विद्यार्थी येत. कोसलचा प्रसेनजीत राजा व जीवक राजपुत्र (बिंबीसारचा अनौरस पुत्र) यांनी येथेच शिक्षण घेतले. पाणिनी व कौटिल्य यांनीही येथेच विद्यार्जन केले, असे मानले जाते. अध्यापकांच्या श्रेणीत धौम्य ऋषी, आयुर्वेदाचार्य जीवक इत्यादींचे उल्लेख येतात. तक्षशिलेत फक्त उच्च शिक्षणाची व्यवस्था होती. सखोल अभ्यासावर भर दिला जाई. वैद्यक, धनुर्विद्या, वेदत्रयी, व्याकरण, तत्त्वज्ञान, वास्तुशास्त्र इ. प्रमुख विषय शिकविले जात. याशिवाय शल्यक्रिया, युद्धतंत्र, ज्योतिष, कृषिविज्ञान, फलज्योतिष, वाणिज्य, सांख्यिकी, विज्ञान, लेखाशास्त्र, संगीत, नृत्य, चित्रकला असे विषयही शिकविले जात. विद्यापीठात विद्यार्थ्यांना धर्मजातिकुलनिरपेक्ष प्रवेश असे. हजारबाराशे वर्षांच्या कालखंडात ज्या ज्या राजवटींनी तक्षशिलेवर आधिराज्य केले, त्यांचा तेथील अभ्यासक्रमावर व भाषेवरही कमीअधिक परिणाम झाला. इराणी व ग्रीक संस्कृतींचे अनेक इतर विषय व संकल्पना शिक्षणक्रमात समाविष्ट झाल्या. ब्राम्ही लिपीऐवजी खरोष्ठी लिपीचा वापर अधिक होऊ लागला. ग्रीक तत्त्वज्ञान व भाषा याचाही अभ्यासक्रमात समावेश झाला असावा, असे अ‍ॅपोलोनिअसच्या वृत्तांतावरून दिसते. हजारबाराशे वर्षे अव्याहत शिक्षणकार्य करीत असलेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एकमेव प्राचीन विद्यापीठ होते. तथापि इ. स. पाचव्या शतकात भारतात आलेला चिनी प्रवासी फाहियान याला तेथे शैक्षणिक दृष्ट्या काहीच महत्त्वाचे दिसले नाही, असे त्याच्या प्रवासवृत्तांतावरून दिसते.

 

२६    वलभी विद्यापीठ :-  गुजरात राज्याच्या भावनगर जिल्ह्यातील वलभी येथील एक प्राचीन विद्यापीठ. हे विद्यापीठ इ.स. सातव्या शतकात स्थापन झाले. विद्यापीठाची स्थापना व संवर्धन यांचे श्रेय मैत्रक राजांना (४६५-७७५) दिले जाते. विद्येचे माहेरघर व आंतरराष्ट्रीय व्यापारबंदरअसा वलभीचा नावलौकिक असल्याचा उल्लेख काश्मीरी पंडित सोमदेव याच्या कथासरित्सागरात व मैत्रककालीन ताम्रपटांत आढळतो. वलभी विद्यापीठात बौद्ध, जैन इ. धर्मांचे अध्यापन होत असे. पूर्व भारतातील नालंदा विद्यापीठाशी याचे साम्य असून त्या काळी त्याची कीर्ती दूरवर पसरली होती. जैन व बौद्ध आचार्यांनी येथे धर्मप्रसारार्थ विहार बांधले. त्या काळी जैन धर्मग्रंथ लिपिबद्ध नव्हते. जैन आचार्यांनी धर्मप्रसारार्थ त्यांचे सिद्धांत लिपिबद्ध केले. वलमी येथील जैन धर्मपरिषदेत (सु. ४५४) त्यांस मान्यताही लाभली (सु. ८४ ग्रंथ). ग्रामीण उत्पन्नातून अर्थसाहाय्य व विद्यापीठास लाभलेला राजाश्रय यांमुळे जैन धर्माचे शिक्षण उपलब्ध होऊ लागले. वलभी विद्यापीठात पाठनिर्देश व व्यावसायिक शिक्षण ह्यांना अध्यापन पद्धतीत विशेष महत्त्व होते. यांपैकी पहिल्याचा प्राथमिक शिक्षणासाठी, तर दुसऱ्याचा उच्च शिक्षणासाठी उपयोग केला जाई. विविध विषयांचे प्रात्यक्षिकही करून दाखविण्यात येत असे. कला, अध्यात्मविद्या, तर्कशास्त्र, वैद्यक इ. विषयांना अध्यापनात स्थान असे. धर्मशास्त्राव्यतिरिक्त वेदांगे, इतिहास, तत्त्वज्ञान, ज्योतिर्विद्या, भूगोल, अंकगणित, धातुविज्ञान, नीतिशास्त्र, व्रत, चिकित्साशास्त्र इत्यादींचे अध्यापन केले जाई. प्राकृत व संस्कृत हे अध्यापनाचे माध्यम असे. हे शिक्षण मोफत दिले जाई. ह्यूएन्त्संग ह्या चिनी प्रवाशाने आपल्या प्रवासवृत्तात नमूद केल्यानुसार वलभी विद्यापीठाशी संलग्न  असलेल्या १०० बौद्ध धर्मीय विहारांत सु. ६,००० अनुयायी अध्ययन करीत होते. येथील कलासंस्था व विहारस्थाने ही अध्यापनाची प्रसिद्ध केंद्रे होती. कलासंस्थांत प्रा थमिक, माध्यमिक शिक्षणासोबत उपयुक्त कला, सैनिक प्रशिक्षण बौद्धिक व शास्त्रीय अध्यापन केले जात असे. विहारांत विद्वान भिक्षू निवास करून ज्ञानदान करीत. नालंदा विद्यापीठात अध्ययन केलेले स्थिरमती व गुणमती हे वसुबंधूचे शिष्य तसेच मयूरशर्मा (३४० - ७०) हा कदंब घराण्याचा संस्थापक येथे अध्यापनार्थ येऊन त्यांनी विहारांत निवास केल्याचा उल्लेख आहे. विहारांत श्रीमंत वा गरीब अशी तफावत केली जात नसे. समान संधीचा सर्वांना लाभ होई. विहारांतील विद्यार्थ्यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी असून शांतता, शिस्त इ. सर्वसाधारण आचारनियम त्यांना पाळावे लागत. ग्रंथालयाचीही विहारांत सोय होती. ग्रंथखरेदी पहिला गुहसेन ह्या राजाने दिलेल्या अनुदानाच्या रकमेतून केली जाई. विहारांत अध्ययन पूर्ण केल्यावर विद्यार्थी राज दरबारी वर्णी लावून धर्मसिद्धांत, तत्त्वज्ञान यांवरील चर्चेद्वारे आपली योग्यता सिद्ध करीत व नंतर राजदरबारातील अधिकाऱ्याच्या नोकरीसाठी प्रयत्‍न करीत, असे इत्सिंग ह्या चिनी प्रवाशाने आपल्या प्रवासवृत्तात नमूद केलेले आढळते.

 

२७    विक्रमशिला विद्यापीठ :- बिहार राज्यातील एक प्राचीन बौद्ध विद्यापीठ. तिबेटी परंपरेनुसार मगधचा पालवंशी राजा धर्मपाल (कार. ७८०−८१५) याचा बौद्ध धर्माला राजाश्रय होता आणि त्याने विक्रमशिला विहाराची स्थापना केली. या विहाराला विक्रम नावाच्या यक्षाचे नाव देण्यात आले. या विहाराची पुढे प्रसिद्धी विक्रमशिला विद्यापीठात परिणती झाली. धर्मपालाचे दुसरे नाव विक्रमशील असल्यामुळे या विद्यापीठाचे नाव विक्रमशीला ठेवण्यात आले. या विद्यापीठाच्या निश्चित स्थानाविषयी विद्वानांत मतभेद संभवतात. तथापि ते प्राचीन मगध देशात गंगेच्या काठी एका टेकडीवर, प्रामुख्याने भालपुरजवळ, पाथरघाट टेकडीवर, वसले होते, असे आता निश्चित झाले आहे. फणींद्रणाथ बोस यांच्या मते ते भागलपूर परगाण्यात एका टेकडीवर असावे. नंदलाल डे आणि प्राच्याविद्यापंडित अ. स. अळतेकर, अंग राज्याची राजधानी असलेल्या चंपनगराच्या पूर्वेला ३८ किमी. दूर असलेले पाथरघाटनामक स्थान म्हणजेच विक्रमशिला असावे, या मताचे आहेत. या ठिकाणाला १८९१ साली बुचानन याने प्रथम भेट दिली. सतीशचंद्र विद्याभूषण यांनी मात्र सुलतानगंज (मागलपूर जिल्हा) हे स्थान म्हणजेच विक्रमशीला हे निश्चित केले आहे. पाटणा विद्यापीठाच्या प्राचीन इतिहास व संस्कृती या विभागाने १९६० ते ६९ मध्ये बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील अँटिकच येथे उत्खनन केले. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्यानेही १९७२-७३ पासून येथे मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून विक्रमशीला विद्यापीठाचे अवशेष शोधून काढले. तेथील भव्य मठ, पाषाणाच्या बुद्धप्रतिमा, मोहोरा, स्तूप आणि भव्य जलाशये त्या काळाची ग्वाही देतात. धर्मपाल राजाने महाविहार बांधून बौद्ध धर्मांच्या ४ प्रमुख पंथांचे प्रत्येकी २७ असे एकशेआठ अध्यापक चार विभागांत नेमले आणि महाविहारास देणग्या दिल्या. नंतरच्या पाल राजांनीही विद्यापीठास उदारपणाने आर्थिक साहाय्य केले. इतर धनिकांनीही त्यास देणग्या दिल्या. महाविहारासभोवती तटबंदी असून चार दिशांना महाद्वारे होती. प्रत्येक प्रवेशद्वारावर एक प्रवेशपरिक्षागृह होते. राजा देवपाल याने (कार. ८१५−८५५) आणखी दोन प्रवेशपरिक्षागृहे बांधली. या प्रत्येक द्वारावर विद्वान पंडिताची नेमणूक केलेली होती. रत्नाकरशांती, वागीश्वरकीर्ती, भट्टारक नरोत्पल, प्रज्ञाकरमती, रत्नवज्र, ज्ञानश्रीमित्र हे यांपैकी काही विद्वान पंडित होते. हे सहा विहारांचे प्रमुख आचार्य होते. या आचार्यांपैकी काही विख्यात नैयायिक होते. विहाराच्या मध्यभागी महाबोधीची कलाकृती असलेले देवालय व अन्य १०८ देवालये होती. केंद्रस्थानी असलेल्या विहारास विज्ञानगृहम्हणत. यांशिवाय येथे एक विशाल सभाभवन होते. त्यात एका वेळी आठ हजार व्यक्तींची बसण्याची सोय होती. प्रवेशद्वारात उजव्या बाजूस नालंदा विद्यापीठाचे प्रमुख आचार्य नागार्जुनाचे चित्र होते, तर डाव्या बाजूस याच विद्यापीठाचे प्रमुख अतीश दीपंकराचे चित्र होते. विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार बंद झाल्यावर येणाऱ्यांसाठी या प्रवेशद्वाराबाहेर एक धर्मशाळा होती. विद्यार्थ्यांची येथे विनामुल्य निवासभोजनाची व्यवस्था असे. विद्यापीठात परदेशांतून तसेच भारतातील विविध भागांतून अध्ययनासाठी विद्यार्थी येत. द्वारस्थ आचार्यांकडून परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरच त्यांना प्रवेश मिळे. तिबेटी भिक्षू येथे अध्ययन करून संस्कृत ग्रंथांचा तिबेटी भाषेत अनुवाद करीत. विद्यापीठीय परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांस पंडीत, महापंडित इ. पदव्या राजदरबारात देण्यात येत व अशा पंडितांना 'राजपंडित' हे बिरूद मिळे. अशा प्रख्यात राजपंडितांमध्ये आचार्य रत्नकीर्ती, जेतारी, ज्ञानश्रीमित्र, अतीश दीपंकर, रत्नवज्र, वागीश्वरकीर्ती इत्यादींचा अंतर्भाव होता. येथील ग्रंथालय समृद्ध होते. बौद्ध धर्मातील विविध संप्रदाय, वेद, अध्यात्मविद्या, व्याकरण, न्यायशास्त्र इ. विषयांचे येथे अध्यापन होई. तंत्रमार्गाच्या अध्यापनावर, विशेषतः वज्रयान व सहजयान यांवर, येथे विशेषभर होता. कारण इ. स. दहाव्या-अकराव्या शतकांत तंत्रमार्ग आणि तांत्रिक साधना हे बौद्ध धर्माचे प्रमुख अंग बनले होते. शिवाय न्यायशास्त्रातही ते प्रावीण होते. विद्यापीठाचे प्रशासन महाधिपतींकडे असून त्यांच्या मदतीला सहा आचार्यांचे मंडळ असे. काही काळ नालंदा विद्यापीठाचा कारभारही या मंडळाच्या नियंत्रणाखाली होता. तेथील प्रशासन उत्कृष्ट होते. ह्यूएनत्संग (सु. ६०२-६६४) व इत्सिंग (सू. ६३४−७१३) ह्या चिनी प्रवाशांच्या वृत्तांतून या विद्यापीठाचे कार्य व प्रगती यांबाबत माहिती मिळते. खल्जी घराण्यातील महम्मद बिन बख्तियार याने बाराव्या शतकाच्या अखेरीस बिहारवर स्वाऱ्या केल्या, पाल राजा गोविंद याचा पराभव करून त्याची राजधानी ओदंतपुरी ही जिंकून घेतली. विक्रमशिला विहाराभोवतालच्या भिंती बख्तियारला किल्ल्याचा तट वाटल्यामुळे त्यांवर हल्ला करून त्याने संपूर्ण ग्रंथालय जाळले व तेथील ब्राह्मणांना व भिक्षूंना कंठस्नान घातले (११९२). तसेच त्याने विक्रमशिला आणि नालंदा या विद्यापीठांचा विध्वंस केला.

 

२८    रत्नागिरी:-* या जिल्ह्यातील तालुका मंडणगड मध्ये आलेले *"आंबवडे"* गाव हे मंडणगडपासून १८ किमी अंतरावर आहे.  डॉ.बाबासाहेबांचे मूळ गाव आहे. रामजी मालोजी सकपाळ यांच्या या मुळगावी त्यांच्या अस्थीवर स्मारक बांधण्यात आले आहे. बाबांसाहेबांचे मुळगाव “स्फुर्तीभूमी’ म्हणून सर्वजण ओळखतात.

 

२९    वणंद :- हे ठिकाण महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात असून दापोली तालुक्यात आहे. दापोली पासून ६ किमी अंतरावर आहे. या गावी भिकू धोत्रे आणि रुक्मिणीबाई धोत्रे या उभयंताच्या पोटी माता रमाईचा जन्म झाला.  *"वनंद"* येथे त्यागमुर्ती-रमाई यांचे भव्य स्मारक बांधण्यात आले आहे. ज्या बंदरावर रमाईचे आई-वडील तिच्या बालपणी काम करीत असत ते हरणे बंदर वणंद गावापासून ८ किमी अंतरावर आहे.

 

३०    महू ( इंदोर ):-* हे नाव इंग्रजी आद्याक्षरे MHOW यांच्यावरून पडले. या आद्याक्षरांचा फुल फॉर्म “मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वारीयर्स” म्हणजे युद्ध करणाऱ्या सैनिकांचे मुख्यालय’ असा अर्थ आहे. हे महुगाव मध्यप्रदेशातील इंदौर पासून २० किमी अंतरावर आहे. डॉ बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे इंग्रजांच्या सैन्यामध्ये सुभेदार या पदावर होते. त्यांची कंपनी १८९१ साली महू येथील मिलिटरी छावणीमध्ये वास्तव्यास होती. याच ठिकाणी माता भिमाईच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी *विश्वपीता- डॉ.बाबासाहेब आंबेडकर* यांचा जन्म झाला, म्हणून हे स्थळ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपुर्ण व पवित्र आहे. या ठिकाणाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी असे जगभर म्हणतात. येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक बांधण्यात आले आहे. १४ एप्रिल रोजी दरवर्षी लाखो भीम अनुयायी या ठिकाणी आदरांजली अर्पण करण्यासाठी येतात. म्हणून या शहराचे व महू रेल्वे स्टेशनचे नामकरण सरकारच्या वतीने “डॉ आंबेडकर नगर” करण्यात आले आहे हे ठिकाण गंभीरा नदीच्या तीरावर आहे.

 

३१    मारहुत:-* सतना जिल्ह्यातील हे एक ऐतिहासिक ठिकाण असून येथे प्राचीन बौद्ध विहारांचे अवशेष आहेत.

 

३२    सांची :- हे ठिकाण मध्यप्रदेशातील भोपाळपासून ६० किमी अंतरावर आहे. येथे सांची रेल्वे स्टेशन आहे. सांची हे ठिकाण जिल्हा विदिशा या शहरापासून २२ किमी अंतरावर आहे. येथील भव्य स्तूप व अशोकस्तंभ प्रसिद्ध दर्शनीय आहेत, बौद्ध कालीन स्थापत्य कलेचे अनेक नमुने येथे पहावयास मिळतात, येथील एका स्तूपाचा व्यास १०० फुटाचा असून त्याच्या चारही बाजूला चार भव्य कमानी आहेत, या कामानींवर भगवान बुद्धांच्या जीवनातील अनेक प्रसंग कोरून ठेवलेले आहेत, याशिवाय येथे संघसेनापती सारीपुत्र आणि महामोगल्लायन यांच्या अस्थींवर चैत्यस्तुप बांधलेले आहेत, तसेच येथे अनेक लहानमोठे स्तूप आहेत.

 

३३    आलवी गोम्पा:-* हे स्थळ लेह जिल्ह्यात असून सुंदर शिल्पकला आणि अनोखी शिल्पकला यासाठी विख्यात आहे, लेह येथे विश्वशांती स्तूप असून प्राचीन बुद्ध मठ आहे,

 

३४    कारगिल:-* येथे दगडी चट्टानावर निर्मित भगवान बुद्धाची विशाल मूर्ती आहे, तसेच लडाख येथे सर्वात मोठा प्राचीन मठ आहे. या राज्यात त्रिलोकनाथ हे बौद्ध स्थळ आहे, तसेच हे ठिकाण दलाईलामा यांचे मुख्यालय असून येथे अनेक धर्मशाळा आहेत, लालूद जिल्ह्यातील ताबो येथे स्पिती नदीकाठी *प्राचीन बौद्ध धम्म स्थळ* आहे, येथील भिंतीवर बुद्धांची अलंकृत असलेली रंगीत चित्रे आहेत, व ही चित्रे अजंठा येथील चित्रांशी मिळती जुळती आहेत.

 

३५    नागार्जुन:-* (कोंडा म्हणजे पहाड) गुंटूर जिल्ह्यातील हे ठिकाण हैद्राबाद पासून १६० कि, मि, अंतरावर आहे, मच्छेला रेल्वे स्टेशनवर उतरून येथे जाता येते, सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने आचार्य नागार्जुन यांच्यासाठी पहाडामध्ये लेणी कोरलेली आहे, या ठिकाणी एकूण ३० बौद्ध लेणी असून येथील महाचैत्य व प्राचीन वस्तूंचे संग्रहालय प्रसिद्ध आहे.

 

३६     हैद्राबाद हे शहर आंध्र प्रदेशची राजधानी असून येथील हुसनेसागर जलाशयात भगवान बुद्धांची विशाल मूर्ती बसविण्यात आली आहे.

 

३७    नालंदा :- हे स्थळ बिहार राज्यातील राजगिरपासून १६ किमी अंतरावर आहे. सध्या ते भग्न अवस्थे पहावयास मिळते. इसवी सन ४१५ ते ४५५ या काळातील राज कुमार गुप्त यांनी नालंदा विद्यापीठाची स्थापना केली होती. नालंदा विद्यापीठात ६ गगनचुंबी इमारती होत्या. या विश्वविद्यापिठाला सम्राट हर्षवर्धनाने अफाट असे धन दान केले होते. यामध्ये १५१० अध्यापक शिकवत होते आणि १०,००० विद्यार्थी शिकत होते. नालंदा जवळील बडगावमध्ये सारीपुत्राचा जन्म झाला होता. या विश्वविद्यापिठामध्ये २ लाख पुस्तके होती. या विद्यापीठात प्रमुख आचार्य शीलभद्र, शांतीशील, कमलशील, दीपंकर आणि श्रीज्ञान अशा महान विद्वान व्यक्ती विद्यार्थ्यांना शिकवत असत. या विश्वविद्यापिठातून पंडित कमलशील आणि पद्म संभवने यांनी महायान पंथांचे बौद्ध ज्ञान तिबेटपर्यंत पोहचविले. त्यामुळे तिबेटमध्ये बौद्ध धर्म हा राष्ट्रीय धर्म झाला आहे. हे विद्यापीठ बख्तियार खिलजीने जाळले. ते सतत ६ महिने जळत होते. जगातील प्राचीन अशा नालंदा बौद्ध विश्वविद्यापिठाची भग्न अवशेष बडगाव या गावाजवळ आहेत. तेथे उत्खनन सुरु आहे. सध्या नालंदा नावाचे गावं नाही, मात्र नालंदा म्हणून जिल्हा आहे. विदेशी प्रवाशांनी येथील वर्णने जगभर पसरवली आहेत.

 

३८     चिंचोली :- नागपूर पासून ११ किमी अंतरावर काटोल रोडवर चिंचोली येथे दोर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य वस्तुसंग्रहालय आहे. त्याला शांतीवन असे म्हणतात. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी वामनराव गोडबोले यांनी संग्रहित केलेल्या व जतन केलेल्या ऐतिहासिक अशा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक अनमोल वस्तू या संग्रहालयात पहावयास मिळतात. अनेक टाय, शर्त कोट, टाईपरायटर, बेल्ट, काठी इत्यादी वस्तू येथे पहावयास मिळतात. वकिलांचा “ब्यंड” गळ्यातील पांढरी टाय, असे अनेक प्रेरणादायी वस्तूंचे संग्रहालय बघून अनेक अनुयायी उर्जा घेऊन या शांतीवनातून मोठ्या संख्येने रोज जातात.

 

३९    अजिंठा – वेरूळ :- हे ठिकाण महाराष्ट्र राज्यातील ओरंगाबाद जिल्ह्यात आहे. अजिंठा हे ठिकाण ओरंगाबाद पासून १२५ किमी अंतरावर आहे आणि वेरूळ हे ठिकाण ओरंगाबाद पासून ३० किमी अंतरावर आहे. या दोन्ही ठिकाणी जगप्रसिद्ध बौद्ध लेण्या आणि गुंफा आहेत, याठिकाणी भगवान बुद्धांचे जीवन चरित्र अनेक रंगात आणि शिल्पात कोरलेले आहे. देशभरातील तसेच जगभरातील पर्यटक मोठ्या संख्येने ह्या प्राचीन शिल्पकलाद्वारे भगवान बुद्धांचे जीवन चरित्र डोळ्यात साठवून घेण्यासाठी आवर्जून येत असतात.

 

४०    ओरंगाबाद :- डॉ बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद हे ठिकाण महाराष्ट्र राज्यात असून औरंगाबाद रेल्वे स्टेशन पासून ५ किमी अंतरावर आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण प्रसाराचा एक भाग म्हणून मराठवाड्यातील या औरंगाबाद शहरात विस्तीर्ण अशा नागसेन वनांत विविध विषयांसाठी अनेक भव्य इमारती बांधून मिलिंद कॉलेज पीपल्स एज्युकेशन सोसायटी च्या वतीने सुरु केले. या महाविद्यालयातून राजा मिलिंदासारखे बुद्धिमान विद्यार्थी व नागसेन भंतेजी सारखे विद्वान विद्यार्थी घडावेत, अशी बाबासाहेबांची संकल्पना होती. त्यानुसार इथून हजारो विद्यार्थी देशाच्या कानाकोपऱ्यातून येऊन शिक्षण घेऊन जगभर पोहचले आहेत. त्यांच्या महान ज्ञानदानाचे मोल जाऊन मराठवाडा विद्यापीठाचे दोर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर करण्यात आले आहे. येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज, टेक्निकल कॉलेज असे अनेक विषयांचे विविध कॉलेज आहेत. येथे भव्य बुद्धिस्ट सेंटर आहे.   

 

४१    चैत्यभूमी :- हे ठिकाण महाराष्ट्रातील मुंबई शहरात आहे. दादर पश्चिम रेल्वे स्टेशनपासून २ किमी अंतरावर असून ते अरबी समुद्राच्या किनार्यावर आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर याचं महापरिनिर्वाण दिल्ली येथे झाले त्यांचा अंतिम संस्कार या ठिकाणी करण्यात आला. त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी जमलेल्या लाखो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात आली. त्याच जागेवर भव्य स्तुपाची निर्मिती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र भय्यासाहेब यांनी केली. या चैत्यस्तुपात बाबासाहेबांची पवित्र अस्थी ठेवण्यात आल्या आहेत.

 

४२    देहुरोड : - देहूरोड (किंवा देहू रोड) हे पुण्याच्या वायव्येला असलेले पुणे स्टेशनपासून २७ किलोमीटर अंतरावरील लष्कराचे ठाणे आहे. या ठिकाणी २५ डिसेंबर इ.स. १९५४ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर करण्यापूर्वी पहिली बौद्ध मूर्ती वसवली. म्हणून या ठिकाणाची ओळख धम्मभूमी म्हणून आहे.

 

४३    बेडसे लेणी :- ह्या महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील बेडसे गावातील आहेत. पुणे-मुंबई महामार्गावरील कामशेतहून पवना धरणाकडे जातांना हे गाव लागते. भारत सरकारने या लेणीला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. सुमारे १५० मीटर लांबीच्या दगडात लेण्यांचा गट खोदला गेला आहे. येथे एक चैत्यगृह काही विहार, खोदीव स्तूप, आणि पाण्याची कुंडे आहेत. हे आद्य कोरीव काम इसवीसन पूर्व पहिल्या शतकातील आहे असे मानले जाते. या लेण्यांना मारकूड असे नाव प्राचीनकाळी होते असे येथील शिलालेखात कोरलेले दिसते.

 


No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...