Wednesday, 16 June 2021

वर्षावास - उपोसथ

 *वर्षावास म्हणजे काय व उपोसथ म्हणजे काय,उपोसथा मध्ये उपासकांनी काळात नेमकं काय केले पाहिजे.*


२५०० वर्षांपूर्वी सिद्धार्थ गौतमाने परिव्रज्या घेतली होती त्यावेळी देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजली होती, त्यावेळी ब्राम्हण तत्वज्ञानांखेरीज निरनिराळे बासष्ट पंथ अस्तित्वात होते त्यापैकी निदान सहा पंथ लक्षात घेण्यासारखे होते,  बुद्धत्व प्राप्तीनंतर बुद्धाने इ.स.पूर्व ५२८ ला सारनाथ येथे प्रथम धम्मोपदेश दिला व त्यांचा पहिला वर्षावास तिथेच संपन्न झाला.

त्यानंतर पुढील चार महिन्यात जवळपास साठ जणांचा भिक्षुसंघ तयार झाला होता त्या भिक्षुसंघास बुद्धाने आदेश दिला होता
        
*"चरथ भिक्खवे चारिकं, बहुजन हिताय, बहुजन सुखाय, लोकानुकंपाय, अत्थाय, हिताय सुखाय देवमनुस्सानं ।*
*देसेथ भिक्खवे,धम्मं आदिकल्याणं मज्झेकल्याणं। परियोसान कल्याणं , सात्थ सब्यञजनं ,केवल परीपुण्णं परिसुद्धं, ब्रम्हचरियं पकासेथ ॥ "*
*(मराठी अर्थ : भिक्खूहो, बहुजनांच्या हितासाठी, सुखासाठी, लोकांवर अनुकंपा करण्यासाठी, मानवांना कल्याणकारी, धम्मपदेश करण्यात तुम्ही प्रवृत्त व्हा. प्रारंभी कल्याणपद , मध्यंतरी कल्याणपद आणि शेवटीही कल्याणपद अशा या धम्ममार्गाचा लोकांना उपदेश करा.)*

लोकांच्या हितासाठी, सुखासाठी,त्यांच्यावर अनुकंपा करण्यासाठी, देवलोकांच्या ज्ञानाजर्नसाठी सतत एका ठिकाणी न राहता न थांबता प्रवास करीत राहा,प्रवास करताना दोघांनी किंवा समूहाने प्रवास करू नये,एकट्यानेच प्रवास करावा.


            बुद्धांच्या आदेशानंतर सर्व भिक्षूंनी काटेकोरपणे नियमांचे पालन करीत पुढील सात ते आठ महिने चारही दिशांना वर्षाच्या बाराही महिने पायी चारिका करीत गावोगावी धम्मोपदेश करीत होते.  चारिका करीत असताना पावसाळ्यात अनेक भिक्षूंना लोक दोष देऊ लागले ह्या लोक समस्येचा त्रास होऊ लागल्यामुळे त्या समस्या त्यांनी तथागत बुध्दांना येऊन सांगितल्या....

            समस्या अश्या होत्या की, त्याकाळी जे विविध पंथ किंवा वेगळ्या मताचे पंथ होते ते वर्षावास काळात एकाच ठिकाणी स्थायिक होऊन धर्मप्रचार करित असे,परंतु बौद्धभिक्षू हा पावसाळ्यात देखिल गावोगावी चारिका करित असे,म्हणून लोक त्यांना दोष देऊ लागले "ह्या श्रमनांना काही कळतं कि नाही, हे नव्यानेच उत्पन्न झालेल्या तृणावर(गवतावर) चालून निसर्गाचे अतोनात नुकसान करित आहेत,त्याचप्रमाणे अनेक पावसाळी जीवजंतू ह्या भिक्षूंच्या पायाखाली येऊन नष्ट होत आहेत."!  ह्या दोषामुळे अनेक लोक भिक्षूंचा सन्मान करीत नव्हते व त्यांना महत्वही देत नव्हते...

            दुसरे कारण असे आहे की,अनेक भिक्षूंकडे एकच चिवर असायचे व चारिका करीत असतांना ते पूर्णपणे भिजून जात असे,अनेक भिक्षु आजारी पडत असत,त्यांना नानाप्रकारच्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागे,अनेकांची उपासमार होत असत.

            तथागतांनी भिक्षूंकडून ह्या समस्या ऐकून घेऊन याचा उपाय म्हणून पावसाळ्यात (आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा) एका ठिकाणी तीन महिने वास्तव्य करण्याचा नियम भिक्षूसंघास घालून दिला.त्याला *वर्षावास* असे म्हणतात. तेव्हा (इ.स.पूर्व ५२७) पासून  आतापर्यंत बौद्धधम्मात वर्षावास नियमित केला जातो..

*वर्षावास म्हणजे काय ?*

                *वर्षा म्हणजे पाऊस व वास म्हणजे राहणे (पावसाळा या ऋतूत किमान तीन महिने(आषाढ ते अश्विन) चारिका न करता एका ठिकाणी वास्तव्य करणे होय)* सिद्धार्थ गौतमच्या ज्ञानप्राप्तीनंतर म्हणजेच इ.स.पूर्व ५२८ ते बुद्धांच्या महापरिनिर्वाण पर्यंत इ.स.पूर्व ४८३ जवळपास ४५ वर्ष बुद्धाने धम्माचा प्रचार प्रसार केला. त्या ४५ वर्षापैकी ४४ वर्ष त्यांनी वर्षावास केले.४४ वर्षावासांपैकी २४ वर्षावास श्रावस्ती या एका ठिकाणी केले,५ वर्षावास राजगृह येथे केले, वैशालीला दोन, चालीय पर्वत (बिहार) येथे तीन,राजगृहला दोन व उरलेल्या प्रत्येक ठिकाणी ( ऋषीपतन,मंकुल पर्वत, सुंसुरमारगिरी,कोशम्बी,पारिलेयक,नालंदा, वैरंजा, आलवी)त्यांनी एक-एक वर्षावास केले आहेत, त्यापैकी सातवा वर्षावास याची नोंद मिळत नाही.परंतु इतिहासकारांचे असे मत आहे की बिहार मध्येच असलेले एक ठिकाण असेल त्याला त्रयस्त्रीश असे म्हणतात.  अशाप्रकारे वर्षावासाची सुरवात झाली.

        ज्यावेळी भिक्षुसंघ चारिका करत असे त्यावेळी वेगवेगळ्या पंथाचे श्रमण अमावस्या(चतुर्दशी),अष्टमी आणि पौर्णिमा या दिवशी धर्मचर्चा करित असे,व आलेल्या लोकांचे प्रश्न सोडवत असे त्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होत असे.... त्या विविध पंथांच्या श्रमनाचे जे विरोधक होते किंवा ज्यांना त्या श्रमणांचे तत्त्वज्ञान मान्य नव्हते,अश्या विद्वान व बुद्धिमान लोकांना काही पर्यायही नव्हते.. न मानणारे जे लोक होते त्यांना हवे त्यावेळी बौध्द भिक्षू कधीच भेटत नसे, बौद्ध भिक्षूंचा ठावठिकाणाही कोणाला माहीत नसायचा त्यामुळे विद्वान लोकांचा भ्रमनिरास होत असे, व मनाविरुद्ध शेवटी ती विद्वान मंडळी त्याच वेगवेगळ्या पंथाकडे आकर्षित होत असत व ह्या कारणांमुळे बौद्ध भिक्षूंच्या कडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोण नकारात्मक होऊ लागला... ह्या सर्व घडणाऱ्या घटना व त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी मगधराज सेनानी बिंबिसार यांच्या चांगल्याप्रकारे लक्ष्यात आल्या.. मगधराज बिंबिसाराने ह्या समस्या तथागताच्या निदर्शनास आणून दिल्या. या समस्येवर उपाय म्हणून बुद्धाने *उपोसथ* हा नियम बनविला.

*उपोसथ म्हणजे काय?*

            प्रत्येक महिन्याचे चार दिवस म्हणजे अमावस्या,प्रत्येक पक्षातील (कृष्णपक्ष व शुक्लपक्ष) अष्टमी,व पौर्णिमा या दिवशी चारिका करीत असलेल्या भिक्षूंनी एका ठिकाणी जमून आपल्या वरीष्ठ भिक्खु कडून पातीमोख्ख (प्रतिमोख्ख) करावे.म्हणजेच भिक्षूंनी धम्मचर्चा (धम्माच्या मुख्य गोष्टी प्रति चर्चा) करावी,महिन्यातील याच चार दिवसांना *उपोसथ दिन* असे संबोधण्यात येते. उपोसथ हे फक्त वर्षावास या काळातच करीत नाही तर वर्षाच्या बाराही महिने केल्या जाते, वर्षावास काळात फक्त चार दिवस न करता संपूर्ण तीन महिने म्हणजेच आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या काळात उपोसथ केल्या जाते..

वर्षावासाचे बौद्ध धम्मामध्ये अनन्य साधारण महत्व आहे.म्हणून धम्म ग्रहण करण्याचा हा काळ समजून प्रत्येक बौद्ध उपसकांनी अधिकाधिक लाभ घेतला पाहिजे...

        डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली आपणा सर्वांना बौद्धधम्माची दिक्षा दिली व त्यानंतर ५३ दिवसांत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. *बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला बौद्ध धम्म* त्यांना लोकांमध्ये प्रसारित करण्यास हवा तेव्हढा वेळ मिळाला नाही,त्यामुळेच आज बौद्धांमध्ये अनेक गोष्टींवर मतभेद आपणांस पाहण्यास मिळतो....

    बाबासाहेबांनी "बुद्ध आणि त्यांचा धम्म" हा ग्रंथ लिहून ठेवून आजच्या बौद्धावर खरंच खूप मोठे उपकार केले आहेत. १९५६ पासून आजपर्यंत बौद्धांना व्यवस्थित बौद्ध संस्कार सांगणारा मार्गदाता कोणीच भेटला नाही. बाबासाहेबांनंतर भारतीय बौद्ध महासभा या संस्थेने बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार अविरतपणे चालू ठेवल्यामुळे,बौद्धचार्य शिबिर, श्रामणेर शिबिर, केंद्रीय शिक्षक शिबिर, बालसंस्कार शिबीर, महिला शिबीर असे किमान 21 शिबिर सातत्याने राबवत असल्याने किमान बौद्ध धम्म महाराष्ट्रत घरोघरी टिकून आहे.

सध्या सर्व बौद्धांमध्ये धम्माबद्दल वेगवेगळे गट व विचार आहे, त्यामुळेच येथे वैचारिक गोंधळ खूप आहे व म्हणून वर्षावास काळात उपोसथामध्ये उपासकांनी नेमके काय करावे याबद्दल अनेक संभ्रम आहेत. यावर योग्य चिंतन होणेे गरजेचे आहे.

सध्या उपोसथ काळात अनेक उपासक भिक्षूप्रमाणे दिवसातून एकदाच जेवणे हा नियम पाळू लागले,हा नियम पाळताना उपोसथच्या ऐवजी चक्क "उपवास" पाळणे सुरू केलें, त्यातही इतका कट्टरपणा आला की बाराच्या आतच जेवण करणे, आज बारा वाजता जेवले तर सरळ दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता जेवणे, पण जर जेवण बाराच्या आत झाले नाही तर काही ठिकाणी वादविवाद होताना दिसतो, अनेकांना तर असे वाटते की जेवणाची वेळ चुकली तर खूप मोठी चूक झाली, किंवा एखादा उपवास चुकला तर फार मोठी हानी झाली अशी मानसिकता लोकांमध्ये रुजू झाली.

प्रत्येक बौद्ध उपासक आपआपल्या ज्ञानानुसार व माहितीनुसार उपोसथाचे पालन करू लागला. त्यामध्येही बुद्धाने भिक्षू व भिक्षूंनीसाठी दिलेले जे नियम आहे त्या नियमानुसार (खासकरून आहारासबंधी असलेले नियम) उपासक वागू लागले, पण ते ही आप-आपल्या सोयीनुसार... 

*उपोसथ काळात उपासकांनी उपोसथ केले पहिजे पण उपवास नव्हे, तर नेमकं काय केलं पाहिजे ?*

१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित "बुद्ध आणि त्यांचा धम्म" याचे वाचन केले पाहिजे व इतरांनाही समजावून सांगितले पाहिजे.
२) प्रत्येक उपासकाने पंचशिलाचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, जमलं तर अष्टशीलाचे पालन केले तर अतिउत्तम.
३) किमान तीन महिने(आषाढ ते अश्विन ) अरीय अष्टांगिक मार्गावर चालले पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याप्रमाणे वागण्याची हळूहळू सवय होते व आपण सन्मार्गावर आरूढ होतो.
४) या तीन महिन्याचा काळात उपासकाने धम्मश्रवण करणे,धम्मचर्चा करणे व धम्माचरण करणे आवश्यक आहे.
५) वर्षावासाच्या काळात भिक्षूंना भोजनदानास आमंत्रित करणे,सातत्याने जवळच्या विहारात जाणे आवश्यक आहे.
६) या काळात आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे, झोपेवर नियंत्रण ठेवणे व आळस नष्ट करणे आवश्यक आहे.
७) तृष्णा, कामवासना, राग,लोभ,द्वेष व मत्सर यावर नियंत्रण ठेवणे.
८) या काळात कायानुपश्यना, वेदनानुपश्यना व चेतनानुपश्यना जाणाव्यात.
९) या काळात आपल्या हातून कोणतेही अकुशल कर्म होऊ नये,याची दक्षता घेणे व जास्तीत जास्त कुशल कर्मे करावे.याची आपणांस सवय होऊन आजीवन आपल्याला त्याचा उपयोग होईल.
१०) घरातील लहान मुलामुलींना घेवून रोज सायंकाळी वंदना सुत्रपठण घ्यावे,जेणेकरून त्या बालकांवर बौद्ध संस्कृती रुजेल.

-----------------------------------------------------

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...