Wednesday, 5 May 2021

रतन सुत्त

 

_*रतन सुत्तं_*

           _एकदा वैशाली नगर भीषण दुष्काळाच्या कचाट्यात सापडले असता तेथील गरीब माणसे रोगपीडित होऊन पटापट मरू लागली. नगरीत इतस्ततः सडणारी मृतशरीरे पसरलेली असल्यामुळे क्षुद्र जीवजंतूंचे थवे नगरीत घोंगाऊ लागले आणि त्यामुळे प्राणघातक रोग / महामारी पसरू लागले. भीषण दुष्काळ, महामारी व प्राणघातक जीवजंतूंच्या/प्रेतांच्या उपस्थितीतींमुळे भयभीत झालेल्या नगरजनांनी, त्या समयी राजगृहात निवास करणाऱ्या भगवान बुद्धांची मदत मागितली. भगवान बुद्ध आपल्या उपस्थायक आनंद आणि पुष्कळशा भिक्षुंसह वैशालीस गेले. भगवान बुद्धांचे वैशालीस आगमन झाल्याबरोबर तेथे जोराचा पाऊस पडू लागला आणि त्यामुळे नगरीत सडणारी प्रेते वाहून गेली. नगरातील वातावरण शुद्ध झाले व नगर पुन्हा स्वच्छ झाले._

 

                     _तद्नंतर भगवान बुद्धांनी आनंदास *'रत्न सूत्रा'* चा उपदेश केला आणि वैशालीतील नगरजनांचे रक्षण करण्याचे उपयुक्त साधन म्हणून रतनसुत्राचा उपदेश करीत, आदरणीय आनंदाने कशा प्रकारे लिच्छवी प्रजाजनांसह वैशाली नगरीत भ्रमण करावे, त्या संबंधी त्यांना सूचना दिल्या. तद्नंतर त्या सूचनांचे पालन करीत आदरणीय आनंद यांनी भगवान बुद्धांच्या भिक्षापात्रातील पवित्र पाण्याचा वैशाली नगरीत शिडकावा केला. त्यामुळे तेथे जमा झालेले पाणी, अरिष्ट नगरातून पळुन गेले आणि साथीची रोगराई निर्मूल झाली. तद्नंतर आदरणीय आनंद वैशालीच्या नागरिकांसह, भगवान बुद्ध आपल्या भिक्षुंसह ज्या नगरगृहात / सभागृहात त्यांची वाट पाहत जमले होते तेथे परतले. तेव्हा, भगवान बुद्धांनी तेथे जमलेल्या जनसमूहाला त्या *'रतसुत्ताचा'* (रत्न सूत्राचा) उपदेश केला._

 

*कोटीसतसहस्सेसु चक्कवाळेसु देवता,*

*यस्साणं पटिगण्हन्ति, यञ्च वेसालियं पुरे ।*

*रोगामनुस्सदुब्भिक्खसम्भूतं तिविधं भयं,*

*खिप्पमेन्तरधापेसि परित्तं तं भणामहे ।।*

 

          _ज्यांच्या आज्ञाचे पालन एक लाख करोड देवता करीत असून ज्यांनी वैशाली नगराला रोग, अमानुष, भय व दुष्काळ या तीनही प्रकारच्या उत्पन्न झालेल्या भयापासून अगदी लवकरच ज्या परित्राणांमुळे मुक्त केले, तोच भयनाशक परित्राण आम्ही म्हणत आहोत -_

 

*यानीध भुतानी समागतानि*

*भूम्मानि वा यानिव अन्तलिक्खे ।*

*सब्बे'व भूता सुमना भवन्तु,*

*अथो'पि सक्कच्च सुणन्तु भासितं ।।१।।*

 

          _या पृथ्वीवर किंवा अंतरिक्षात जन्म पावलेले जे काही प्राणी या ठिकाणी जमले आहेत, त्या सर्वांची मने आनंदित होवोत आणि ते प्राणी ही सुवचने आदरपूर्वक ऐकोत._

 

*तस्मा हि भूता निसामेथ सब्बे,*

*मेत्तं करोथ मानुसिया पजाय।*

*दिवाच रत्तोच हरन्ति बलिं,*

*तस्मा हि ने रक्खथ अप्पमत्ता ।।२।।*

 

          _म्हणून सर्व प्राणीमात्रांनो, ऐका. तुम्ही मनुष्यजातीवर प्रेम/मैत्री करा. ही जी सर्व माणसे रात्रंदिवस तुम्हाला समर्पण, दान देतात, त्यांचे तुम्ही दक्षतेने रक्षण करा._

 

*यं किञ्चि वित्तं इध वा हुरं वा,*

*सग्गेसु वा यं रतनं पणीतं।*

*न नो समं अत्थि तथागतेन,*

*इदम्पि बुद्धे रतनं पणीतं।*

*एतेन सच्चेन सुवत्थि होतु।।३।।*

 

            _या जगतात किंवा परलोकात जर काही धन/वित्त असेल, उत्तम रत्न असेल, ते आमच्या तथागत बुद्धांच्या तोडीचे असणार नाही. बुद्धांच्या ठायी असणारे हे उत्तम रत्न आहे. या सत्यवचनाने सर्वत्र कल्याण होवो!._

 

*खयं विरागं अमतं पणीतं,*

*यदज्झगा सक्यमुनी समाहितो ।*

*न तेन धम्मेन सम'त्थि किञ्चि,*

*इदम्पि धम्मे रतनं पणीतं।*

*एतेन सच्चेन सुवत्थि होतु।।४।।*

 

             _ध्यानस्थ शाक्यमुनीने तृष्णाक्षयमय, वासनाविरहीत असे जे श्रेष्ठ अमरत्व / निर्वाण प्राप्त केले, त्या निर्वाणगामी धर्मासारखा दुसरा मार्ग नाही. धर्माचे ठायी असणारे हे उत्तम रत्न आहे. या सत्यवचनाने सर्वत्र कल्याण होवो!_

 

*यं बुद्धसेट्ठो परिवण्णयी सुचिं,*

*समाधि-मानन्तरि कञ्ञमाहू।*

*समाधिना तेन समो न विज्जति,*

*इदम्पि धम्मे रतनं पणीतं।*

*एतेन सच्चेन सुवत्थि होतु।।५।।*

3

           _ज्या शुद्ध समाधीची बुद्धश्रेष्ठाने प्रशंसा केली, जिला ताबडतोब फळ देणारी म्हणतात, त्या समाधीसारखे दुसरे काहीही अस्तित्वात नाही. धर्माचे ठायी वसणारे हे उत्तम रत्न आहे. या सत्यवाचनामुळे सर्वत्र कल्याण होवो!_

 

 

*ये पुग्गला अट्ठ सतं पसत्था,*

*चत्तारि एतानि युगानि होन्ति।*

*ते दक्खिणेय्या सुगतस्स सावका,*

*एतेसु दिन्नानि महफ्फलानि।*

*इदम्पि सङ्गे रतनं पणीतं।*

*एतेन सच्चेन सुवत्थि होतु।।६।।*

 

                   _सज्जनांना प्रशंसनीय वाटणारे असे आठ प्रकारचे पुरुष, ज्यांच्या चार जोड्या होतात, ते सुगम बुद्धाचे शिष्य दक्षिणापात्र आहेत, त्यांना दिलेली दाने महाफलदायी होतात. संघाचे ठायी बसणारे हे उत्तम रत्न आहे. या सत्यवचनामुळे सर्वत्र कल्याण होवो!_

 

*ये सुप्पयुत्ता मनसा दल्हेन,*

*निक्कामिनो गोतमसासनम्हि।*

*ते पत्तिपत्ता अमतं विगय्ह,*

*लध्दा मुधा निब्बुतिं भुञ्ञमाना।*

*इदम्पि सङ्गे रतनं पणीतं।*

*एतेन सच्चेन सुवत्थि होतु।।७।।*

 

                 _जे पुरुष दृढ मनाने व निष्काम चित्ताने गौतमाच्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचा योग्य रीतीने प्रयत्न करतात व प्राप्तव्य निर्वाणाची प्राप्ती करून अमृतामध्ये अवगाहन करतात ते अनायसे मिळवलेल्या शांतीचा उपभोग करतात. संघाचे ठायी वसणारे हे उत्तम रत्न आहे. या सत्यवचनामुळे सर्वत्र कल्याण होवो!_

 

*यथिन्दखीलो पठविंसितो सिया,*

*चतुब्भि वातेभि असम्पकम्पियो।*

*तथूपमं सप्पुरिसं वदामि,*

*यो अरियसच्चानि अवेच्च पस्सति।*

*इदम्पि सङ्गे रतनं पणीतं।*

*एतेन सच्चेन सुवत्थि होतु।।८।।*

 

                     _नगरद्वारासमोर जमिनीत उभारलेला इन्द्र स्तंभ जसा चारी बाजूच्या / दिशांच्या वाऱ्यामुळे हालत नाही, त्याप्रमाणे जो मनुष्य चार आर्य सत्यांचे ज्ञान प्राप्त करून, ती सत्ये विचारपूर्वक जाणतो, त्या सत्पुरुषाला मी इन्द्र स्तंभाची उपमा देतो. संघाचे ठायी वसणारे हे उत्तम रत्न आहे. या सत्यवचनामुळे सर्वत्र कल्याण होवो!_

 

*ये अरियसच्चानि विभावयन्ति,*

*गम्भीरपञ्ञेन सुदेसितानि।*

*किञ्चापि ते होन्तिभुसप्पमीत्ता,*

*न ते भवं अट्ठमं अदियन्ति।*

*इदम्पि सङ्गे रतनं पणीतं।*

*एतेन सच्चेन सुवत्थि होतु।।९।।*

 

                        _गंभीर प्रज्ञेच्या बुद्धाने उपदेशिलेल्या चार आर्यसत्ये जे पुरुष पुर्णपणे आकलन करून घेतात, ते जरी कितीही बेसावधपणे वागले, तरी त्यांना यापुढे आठवा जन्म प्राप्त होत नाही. संघाच्या ठायी बसणारे हे उत्तम रत्न आहे. या सत्यवचनाने सर्वत्र कल्याण होवो!_

 

*सहावस्स दस्सनसमप्दाय,*

*तयस्सु धम्मा जहिता भवन्ति।*

*सक्कायदीट्ठि विचिकिच्छितञ्च,*

*सीलब्बतं वापि यदत्थि किञ्चि।*

*चतुहपायेहि च विप्पमुत्तो*

*छचाभिट्ठानानि अभब्बो कातुं।*

*इदम्पि सङ्गे रतनं पणीतं।*

*एतेन सच्चेन सुवत्थि होतु।।१०।।*

 

              _माणसाला सम्यकदृष्टी प्राप्त झाल्याबरोबर त्याची सत्कायदृष्टी, विचिकित्सा व व्रतवैकल्यावरील अंधविश्वास या तीन गोष्टींचा तो त्याग करतो. तो मनुष्य चार दुर्गतीपासून (नरकवास, पशुयोनीत जन्म, प्रेतयोनीत जन्म व असुरयोनीत जन्म) मुक्त होतो व सहा गोष्टी त्याच्या हातून घडणे असंभवनीय होते. (मातृघात, पितृघात, अरहन्तघात, तथागताला जखम करणे व बुद्धेतर गुरूचा शिष्य होणे). संघाचे ठायी वसणारे हे उत्तम रत्न आहे. या सत्यवचनामुळे सर्वत्र कल्याण होवो!_

 

*किञ्चापिसो कम्मं करोति पापकं,*

*कायेन वाचा उद चेतसा वा।*

*अभब्बो सो तस्स पटिच्छादाय,*

*अभब्बता दिट्ठपदस्स वुत्ता।*

*इदम्पि सङ्गे रतनं पणीतं।*

*एतेन सच्चेन सुवत्थि होतु।।११।।*

 

                     _जर अशा माणसाद्वारा कायेने, वाणीने अथवा मनाने काही पाप घडले तर तो मनुष्य ते पाप झाकून ठेवील हे अशक्य आहे, कारण निर्वाणपदाचा साक्षात्कार झालेल्या माणसाच्या हातून असले लपवालपवीचे कृत्य होणे शक्य नाही, असे म्हटले आहे. संघाचे ठायी वसणारे हे उत्तम रत्न आहे. या सत्यवचनामुळे सर्वत्र कल्याण होवो!_

 

*वनप्पगुम्बे यथा फुस्सितग्गे,*

*गिम्हानमासे पठमस्मिं गिम्हे।*

*तथुपमं धम्मवरं अदेसयी,*

*निब्बानगामिं परमं हिताय।*

*इदम्पि बुद्धे रतनं पणीतं।*

*एतेन सच्चेन सुवत्थि होतु।।१२।।*

 

               _उन्हाळयाच्या पहिल्या महिन्यात जसा एखाद्या घनघोर अरण्यात एखाद्या शाखाउपशाखांनी बहरलेला वृक्ष असावा, त्याप्रमाणे बुद्धाने निर्वाणगामी परमश्रेष्ठ असा धर्म लोकहितासाठी उपदेशिलेला आहे. बुद्धाचे ठायी असलेले हे उत्तम रत्न आहे. या सत्यवचनामुळे सर्वत्र कल्याण होवो!_

 

*वरो वरञ्ञू वरदो वराहरो,*

*अनुत्तरो धम्मवरं अदेसयी।*

*इदम्पि बुद्धे रतनं पणीतं।*

*एतेन सच्चेन सुवत्थि होतु।।१३।।*

 

                _श्रेष्ठ, श्रेष्ठ जाणणाऱ्या, श्रेष्ठ देणाऱ्या, अनुत्तर अशा बुद्धाने सर्वोत्तम धर्म उपदेशिला आहे. बुद्धाचे ठायी वसणारे हे उत्तम रत्न आहे. या सत्यवचनामुळे सर्वांचे कल्याण होवो!_

 

*खीणं पुराणं नवं नत्थि सम्भवं,*

*विरत्तचित्ता आयतिके भवस्मिं।*

*ते खीणबीजा अविरूल्हिच्छन्दा,*

*निब्बन्ति धीरा यथायम्पदीपो।*

*इदम्पि सङ्गे रतनं पणीतं।*

*एतेन सच्चेन सुवत्थि होतु।।१४।।*

 

                     _ज्यांचे जुने कर्म क्षीण झाले आहे व नवीन कर्म जे करीत नाहीत, जे भविष्य काळातील कर्मांविषयी निरपेक्ष आहेत ते क्षीणबीज आहेत (ज्याचे फळ प्राप्त करून देणारे कर्म निष्ठ झाले आहे.) व ज्यांना कर्माच्या फळाची इच्छा नाही ते धीरपुरुष या प्रदीपाप्रमाणे निर्वाण पावतात, संघाचे ठायी वसणारे हे उत्तम रत्न आहे. या सत्यवचनामुळे सर्वत्र कल्याण होवो!_

 

*यानीध भूतानि समागतानी*

*भुम्मानि वा यानिव अन्तलिक्खे।*

*तथागतं देवमनुस्सपूजितं,*

*बुद्धं नमस्साम, सुवत्थि होतु ।।१५।।*

 

                   _जे भूमीवर किंवा आकाशातील प्राणी येथे जमले असतील (त्यांना मी म्हणतो की,) आम्ही देवमनुष्यपूजित तथागत बुद्धाला वंदन करतो. त्यामुळे सर्वत्र कल्याण होवो!_

 

*यानीध भूतानि समागतानी*

*भुम्मानि वा यानिव अन्तलिक्खे।*

*तथागतं देवमनुस्सपूजितं,*

*धम्मं नमस्साम, सुवत्थि होतु ।।१६।।*

 

                   _जे भूमीवर किंवा आकाशातील प्राणी येथे जमले असतील (त्यांना मी म्हणतो की,) आम्ही देवमनुष्यपूजित धर्माला वंदन करतो. त्यामुळे सर्वत्र कल्याण होवो!_

 

*यानीध भूतानि समागतानी*

*भुम्मानि वा यानिव अन्तलिक्खे।*

*तथागतं देवमनुस्सपूजितं,*

*सङ्गनमस्साम, सुवत्थि होतु ।।१७।*

 

                   _जे भूमीवर किंवा आकाशातील प्राणी येथे जमले असतील (त्यांना मी म्हणतो की,) आम्ही देवमनुष्यपूजित संघाला वंदन करतो. त्यामुळे सर्वत्र कल्याण होवो!_

 

 

No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...