Wednesday, 14 April 2021

संसदीय लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी आवश्यक गोष्ठी

 

संसदीय लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी आवश्यक गोष्ठी

“लोकशाहीची व्याख्या तरी काय?”लोकशाहीची व्याख्या राज्यशास्त्रवेत्ते, लेखक, समाजशास्त्र आणि इतर लोकांनी आपापल्या परीने केलेली आहे. आशा व्याख्यांपैकी व्याख्या आपण घेऊ –वॉल्टर बेगहोट यांनी इंग्लिश संविधानावर एक सुप्रसिद्ध ग्रंथ लिहिला आहे, त्यात लोकशाहीचे सुस्पष्ट चित्रा रेखाटण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या ग्रंथात त्यांनी लोकशाहीची व्याख्या , “चर्चेवर आधारलेली शासनव्यसंस्था” (Government on Discussion)अशी केली आहे. अब्राहम लिंकंनने केलेली व्याख्या “लोकांचे सरकार, लोकांनी नियुक्त केलेले सरकार आणि लोकांकरिता राबणारे सरकार”. (A Government of the people, by the people & for the People) अशी केली आहे डॉ बाबासाहेबांनी केलेली लोकशाहीची व्याख्या पुढील प्रमाणे “लोकांच्या आर्थिक व सामाजिक जीवनात क्रांतिकारक बदल रक्तविहीन मार्गांनी घडवून आणणारी शासनपद्धती म्हणजे लोकशाही होय.” ज्या शासनपद्धतीमुळे सत्तारूढ मंढळीला सामाजिक व आर्थिक क्षेत्रांत मूलभूत बदल करता येतात आणि असे बदल ग्रहण करताना जनता रक्तलांच्छित मार्गाचा अवलंब करीत नाही तेथे लोकशाही नांदते. हीच लोकशाहीची खरी कसोटी आहे. तीच उच्चतम कसोटी आहे.

ही लोकशाही यशस्वी कशी होणार? लोकशाहीच्या यशस्वी अंमलबाजवणीसाठी आवश्यक असलेल्या बाबी कोणत्या, याबद्दल लोकशाही या विषयीची मांडणी करणार्‍या कोणत्याही लेखकाने स्पष्टपणे काही मूलभूत अधिष्ठाने सांगून ठेवलेली नाहीत. म्हणून लोकशाहीचे प्रयोग ज्या ज्या देशात झाले. त्या त्या देशाचे इतिहासाचे परिशीलन करून लोकशाहीच्या अपयशाची कारणे शोधावी लागतात व योग्य ती अनुमाने आपणासच काढावी लागतात.

लोकशाहीच्या यशस्वी सिद्धीसाठी आवश्यक असणार्‍या गोष्टी :-

१)      लोकशाही यशस्वी व्हावयास लागणारी प्रथम आवश्यक बाब ही की, समाजव्यवस्थेत विषमता नसली पाहिजे. पीडित दडपलेला वर्ग समाजात असता कामा नये. सर्व हक्क व सत्तेचे केंद्रीकरण ज्यांच्या ठायी झाले आहे असा वर्ग एका बाजूला व सर्व प्रकारचे भार वाहण्याचे काम करणारा वर्ग दुसर्‍या बाजूला अशी विभागणी असू नये. अशी विषमता, अशी अन्यायकारक विभागणी व त्यावर आधारलेली समाजरचना यामध्ये हिंसात्मक क्रांतीची बीजे असतात आणि मग त्याचे परिमार्जन करणे लोकशाहीला अशक्य होते. लिंकन आपल्या भाषणात म्हणाले होते, स्वतच्या विरुद्ध विभागलेले घर तग धरू शकत नाही. या त्यांच्या उच्चाराचा अर्थ लोकांना पुर्णपणे आकलन झाला नाही. या त्यांच्या वाक्यात खोल व महत्वपूर्ण अर्थ भरलेला आहे, वर्गावर्गातील जे महदअंतर आहे, वर्गसंघर्ष आहेत ते लोकशाहीच्या यशसिद्धिच्या मार्गावरील सर्वात मोठे अडसर बनतात हाच तो अर्थ आहे. लोकशाहीमध्ये पीडित, दलित, ज्यांचे हक्क छिंनून घेतलेले असतात असे, जे भारवाहक बनलेले असतात ते लोक आणि ज्यांनी सर्व हक्कांचा समुच्चय स्वत:पाशीकेलेला असतो असे लोक या दोघोंनाही मतदानाचा समान हक्क प्राप्त होतो. मातब्बर वर्ग हा बहुधा, पीडित वर्गापेक्षा संख्येने कमी असतो: आणि निर्णय घेण्याच्या कामी आपण बहुमताचे  तत्त्व मान्य करीत असल्याने, जर ह्या सुरक्षित मातब्बर वर्गाने सुखासुखी व स्वेच्छेने आपले विशेष अधिकार सोडले नाही, तर मग त्यांच्या व खालच्या वर्गामधील अंतर दुणावेल, ते अंतर लोकशाहीच्या नाशास व भलत्याच काही राजपद्धतीला जन्म देण्यास कारणीभूत होईल. आणि त्यामुळेच जगातील निरनिराळ्या भागातील लोकशाहीच्या इतिहासाचा अभ्यास केल्यास, लोकशाहीच्या अपयशाचे कारण सामाजिक विषमता, वर्गावर्गात उभी असलेली असमतेची दरी हेच आहे असे दिसून येईल.

 

२)      लोकशाहीच्या यशसिद्धीसाठी आवश्यक असलेली दुसरी गोष्ट म्हणजे विरोधी पक्षाचे अस्तित्व. जे लोक पक्ष पद्धती विरुद्ध आहेत आणि अनुषंघानेच ज्यांना विरोधी पक्षाची आवश्यकता वाटत नाही, त्यांना लोकशाही या चिजेचे संपूर्ण आकलन झालेले नसावे. वंशपरंपरांगत सत्तासरंजामदारशाही (सनातनशाही) यांचा नेमका उलट अर्थाचा शब्द म्हणजे लोकशाही. लोकशाहीचा अर्थ हा की, सत्तारूढ मंडळीच्या अमर्याद सत्तेला कोठे तरी केलेले नियंत्रण. राजाच्या सत्तेवर कोणाचेही नियंत्रण नसते. परंतु लोकशाहीत सत्तारूढ असलेल्या मंडळीला दर पाच वर्षानी लोकांपुढे जावे लागते: आणि ते सत्तास्थानी राहावयास लायक आहेत की नाही, लोकांचा सांभाळ व संरक्षण करण्यास समर्थ आहेत की नाही या प्रश्नांवर त्यांना लोकांचा कौल घ्यावा लागतो यालाच सत्तेवरी नियंत्रण VETO म्हणतात. लोकशाहीमध्ये राजसत्तेवर लोकमताचे नियंत्रण नुसतेच हवे असे नाही, तर ते तात्काळ व सतत असावयास हवे. लोकसभेमध्ये सरकारला तेथल्या तेथे अडविणारे व आव्हान देणारे लोक असावे लागतात. लोकशाहीमध्ये कोणालाही अविरतपणे सत्ता गाजविण्याचा अधिकार नाही, परंतु शासनसंस्था / सरकार ही लोकमातानुवर्ति असावयास हवी आणि तिला अडविणारे आव्हान देणारे लोक खुद्द सभागृहात / कायदेमंडळातच असले पाहिजेत. दुर्दैवाने आपल्या देशातील बहुतेक वर्तमानपत्रे, सरकारी जाहिरातीच्या उत्पन्नासाठी म्हणा किंवा अन्य कारणासाठी म्हणा, सरकारी पक्षाला जास्त उचलून धरतात, विरोधी पक्षाला प्रसिद्धी देत नाहीत. विरोधी पक्षाकडुन त्यांना काय मिळणार? सरकारकडून त्यांना जाहिरातीचा पैसा मिळतो आणि मग काय, सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या भाषणांची प्रतीवृत्ते रकानेच्या रकाने भरून ही वृत्तपत्रे प्रसिद्ध करतात. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेली भाषणे अगदी त्रोटकपणे शेवटच्या पानावर कोठेतरी कोपर्‍यात छापली जातात आणि म्हणूनच लोकशाही यशस्वी होण्यासाठी विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. इंग्लंडमध्ये विरोधी पक्षाला नुसती मान्यताच दिली जाते, एवढेच नव्हे तर विरोधी पक्षनेत्याला त्याच्या पक्षाचे कामकाज चालविता यावे म्हणून पगार दिला जातो. कॅनडामध्ये देखील प्रधानमंत्र्यासारखाच विरोधी नेत्याला पगार दिला जातो. कारण उघड आहे ह्या दोन्ही देशात सरकार चुकीच्या मार्गाने जात आहे की काय हे सांगणार्‍यांची आवश्यकता त्या लोकांना भासते. हे काम अविरतपणे व सातत्याने व्हावयास पाहिजे याची त्यांना निकड भासते आणि म्हणूनच ते विरोधी पक्षासाठी खर्च करावयास तत्पर असतात.

 

३)      लोकशाहिच्या यशासाठी जरूर असलेली तिसरी बाब म्हणजे वैधानिक व कारभारविषयक क्षेत्रांत पाळावयाची समता ही होय. राज्यकारभार करताना पाळावयाची समता-दृष्टी ही चीज आज जास्त महत्वाची बनलेली आहे. आपल्यातील कित्येक लोकांना राज्यकारभारातील वशिलेबाजीची चांगलीच चुणूक अनुभवावयास वा पहावयास मिळाली असेल. एखाद्या पक्षातील सभासदावर समझा कायदेशीर खटला करणे आवश्यक झालेले आहे, सरकारी अधिकार्‍यांजवळ तसा भरपूर पुरावा उपलब्ध आहे, अशावेळी जर त्या विभागातील त्या पक्षाचा पुढारी जिल्हा अधिकार्‍याला जाऊन भेटला, तो खटला काढून टाकण्यास सांगू लागला, व म्हणाला, “हे बघा, जर तुम्ही आमचे एवढे काम केले नाही, तर मंत्र्याला सांगून तुमची दूर बदली करायला लावीन.” हे असे जर होऊ लागले तर राज्यकारभार केवढा अन्यायकारक व गोंधळाचा होईल याची कल्पनाच केलेली बरि. कारभारविषयक कामात सरकारने हस्तक्षेप करू नये. सरकारचे काम हे धोरण ठरविण्याचे आहे, हस्तक्षेप किंवा पक्षपात करण्याचे नाही. ही बाब मूलभूत स्वरूपाची असून तिच्यापासून आपण आज दूर जात आहोत, तिचा त्याग करीत आहोत.

 

 

४)      लोकशाहीचे यश हस्तगत करण्यासाठी  आवश्यक असलेली चौथी गोष्ट म्हणजे संविधानात्मक नीतीचे पालन होय. पुष्कळ लोक आपल्या घटनेबद्दल / संविधांनाबद्दल अतिउत्साही असतात. आपली घटना ही कायदेशीर तरतुदीचा व तत्वांचा नुसता सांगाडा आहे. ह्या सांगाड्याला आवश्यक असलेले रक्तमांस संविधनात्मक / घटनात्मक नीतीमत्तेच्या पालनातच मिळेल. इंग्लंडमध्ये ह्या घटनात्मक नीतीलाच घटनात्मक संकेत म्हणतात व लोक ते स्वखुशीने पाळतात. वॉशिंग्टन हे अमेरिकेचा नेते होते, हे विधान त्यांचे त्यावेळचे अमेरिकेतील समाज जीवनातील स्थान परिपूर्णपणे वर्णू शक नाही.  अमेरीकेची घटना लिहून झाल्यावर वॉशिंग्टन यांना पहिला अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. त्यांची अध्यक्षीय मुदत संपल्यावर त्यांनी दुसर्यांदा अध्यक्ष होण्यास नकार दिला. हि गोष्ठ निःसंशय आहे कि, वॉशिंग्टन दहा वेळा जरी सलगपणे अध्यक्षीय निवडणुकीस उभे राहिले असते तरी त्यांना कोणी प्रतिस्पर्धी ठरले नसते व लोकांनी त्यांना मोठ्या आनंदाने व एकमताने निवडून दिले असते. पण ते मात्र दुसर्यांदा उभा राहण्यासही तयार झाले नाही. त्यांना कारण विचारले असता ते म्हणाले, “माझ्या देशबंधुनो, हि घटना आपणा ज्या हेतूने बनविली, त्याचा तुम्हाला विसर पडलेला दिसतो. आपल्याला वंशपरत्वेचालणारी राजेशाही, वंशापार्ण्पारेने येणारा राजा किंवा हुकुमशहा नको होता म्हणूनच आपण हि घटना बनविली आहे. इंग्लिश राजाशी तुम्ही या हेतूनेच प्रेरितहोऊनच संबंध तोडले आहेत. मग माझी पूजा करून मला जर तुम्ही वर्षानुवर्षे अध्यक्ष बनवू लागलतात तर तुमच्या तत्वांचे काय होईल? इंग्लिश राजाच्या ठिकाणी माझी स्थापना करून तुम्ही असे म्हणू शकाल काय कि, इंग्लिश राजाच्या सत्तेविरुद्ध तुम्ही केलेला उठाव हा योग्य होता? तसे तुम्ही कोणत्या तोंडाने म्हणू शकाल? माझ्यावरील प्रेमामुळे व श्रद्धेमुळे तुम्ही जर मला दुसर्यांदा उभे राहण्याचा आग्रह करू लागलात तुम्ही तुमच्या या भावनाविवाशातेला बळी न पडण्याचे काम, वंशपरंपरागत सत्ताशाहीचा बिमोड करण्याच्या तत्वज्ञानाचा उद्गाता म्हणून मला कर्तव्य बुद्धीने पार पाडावेच लागणार.” तरी परंतु लोकाग्रहास्तव त्याला दुसर्यांदा अध्यक्ष व्हावे लागले. पण जेव्हा तिसर्यादाही त्यांना गळ घालण्यासाठी लोक त्यांच्याकडे गेले तेव्हा त्यांनी त्यांना कठोरपणे झिडकारले. जेथे तात्पुरत्या सत्तेच्या विलोभनास बळी पडून पक्षनेत्यांनी आपल्या विरोधकास मग ते सत्तेवर असोत किंवा विरोधीपक्ष म्हणून काम करीत असोत, कैचीत पकडण्याचे प्रसंग संविधानाची / घटनेची व लोकशाहीची हानी होऊ नये म्हणून कटाक्षाने टाळले आहेत. 

 

५)      लोकशाहीचा प्रयोग यशस्वी व्हावा म्हणून आणखी एका गोष्टीची आवश्यकता आहे आणि ती म्हणजे लोकशाहीच्या नावाखाली अल्पसंख्यांकांची / अल्पमत वाल्यांची गळचेपी बहुमतवाल्यांकडून होता कामा नये. अल्पसंख्याकांना सुरक्षितता वाटली पाहिजे. बहुसंख्य मंडळी कारभार करीत असली तरी आपल्याला इजा पोहचणार नाही, आपल्यावर अन्याय होणार नाही याची हमी अल्पसंख्यांकांना मिळाली पाहिजे. छोट्या अल्पसंख्यांक जमातीच्या ४-६ सभासदांच्या गटाने उपस्थित केलेल्या तहकुबी सूचनांना जर सरकारी पक्षांकडून सतत विरोध झाल्यास ह्या अल्पसंख्यांक लोकांना आपल्या दुःखांना वाचा फोडायला संधी मिळणार नाही. अशा परिस्थितीत ह्या अल्पसंख्यांकांत बेसनदशीर मार्ग अवलंबिण्याचे, क्रांतिकारक उठाव करण्याचे वारे मग निसर्गत:च शिरते आणि म्हणूनच लोकशाही कारभारात बहुमतवाल्यांकडून असे दडपशाही वर्तन कदापि होता कामा नये.

 

 

६)      या संदर्भात आणखी एका मुद्द्याचे विवरण करणे जरूर आहे. राज्य व्यवस्थेसाठी नीतिमान समाजव्यवस्थेची अत्यावश्यकता आहे. नीतिशास्त्र हे राजशास्त्राहून काहीतरी अलग प्रकरण आहे असे मानण्यात येते. नित्तीमत्तेशिवाय राजकारण करता येते या समजुतीने राजकारणाचा अभ्यास करणाऱ्याला नीतिशास्त्राचा गंध नसला तरी चालेल असा प्रवाद आहे. हा प्रवाद महाभयंकर व गंभीर स्वरूपाचा आहे. स्वतंत्र सरकार म्हणजे ती राज्यपद्धती कि, जिच्यामध्ये जास्तीत जास्त सामाजिक क्षेत्रात लोकांना कायद्याच्या हस्तक्षेपाशिवाय मोकळेपणाने जीवन जगात येते आणि जर कायदा करण्याची आवश्यकता वाटलीच तर तसला कायदा पाळला जाण्याइतपत सामाजिक नीती समाजामध्ये निर्माण झाली असल्याची खात्री कायदे करणार्यांना मिळाली पाहिजे. लोकशाहीच्या या अंगाबद्दल फक्त प्रोफेसर ‘लास्की’ यांनीच उल्लेख केला आहे ते म्हणतात कि, ‘लोकशाही राज्यपद्धतीमध्ये समिष्टीतील नीतिमान जीवन गृहीत धरलेले असते. सामाजिक नीतीच्या अभावी लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही, ती छिन्नविछिन्न होईल. आपल्या देशात हा अनुभव आपल्याला मिळतो आहे.

 

७)      लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी आवश्यक असलेली आणखी एक बाब म्हणजे विचारी / विवेकी लोकमत होय. प्रत्येक देशात अन्याय होत असतात याबद्दल शंका नाही; परंतु तो सर्वत्र सारख्याच प्रमाणात आहे असे मात्र नाही. समाजातील काही लोकांना अन्यायाची अगदीच थोडी झालं बसते; तर काहींना अनन्वित छळ सोसावा लागतो, ते अन्यायाच्या ओझ्याखाली दडपून गेलेले असतात. अन्याय कोणावरही होत असतो, अन्याय दिसला रे दिसला कि, जागृत होऊन उठणारी शक्ती म्हणजे समिष्टीची सद्विवेकबुद्धी. सार्वजनिक विवेक बुद्धी याचा अर्थच असा कि, जिच्या प्रादुर्भावामुळे समाजातील प्रत्येक माणूस मग तो त्या अन्यायाचा बळी असो वा नसो, अन्यायाच्या परीमार्जनार्थ पीडितांना साथ द्यायला उभा राहतो. विभक्त ठेवलेल्या अस्पृश्य जातीचा प्रश्न हाताळण्यासाठी व त्यांच्या वरील अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी क्वचितच कोणी पुढे आल्याचे दिसते. हे असे का होते? कारण उघड आहे. सामाजिक विवेकबुद्धीचा अभाव. असा प्रकार जर होऊ लागला आणि अल्पसंख्यांकावर होणाऱ्या अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी जर इतर लोक पुढे आले नाहीत तर मग पुन्हा क्रांतीचे वारे अल्पसंख्यांकाचा डोक्यात खेळू लागते. आपण आपल्या भविष्याबद्दल अत्यंत जागरूक व विचारी बनले पाहिजे.

आधुनिक लोकशाहीचे उद्दिष्ट हे अनियंत्रित राजसत्तेवर नियंत्रण घालणे हे नसून ‘लोककल्याण’ साधने हे आहे.लोकशाही सुरक्षित करण्यासाठी तिच्या मार्गातील दगड धोंडे दूर करण्याकरिता आपण काही निश्चित पावले उचलायची कि नाही याचा आपण विचार करावयास हवा.  

संकलन : महेश कांबळे

संदर्भ : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय जनतेला खुले पत्र

दिनांक : ११-०३-२०२१

 

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...