*_प्रश्न ८- आमचे असाध्य आजार बुवाने हमखास बरे केले, असे सांगणारे लोक आढळतात. हे कसे शक्य होते?_*
*उत्तर 👉* मानवी शरीरातील निरनिराळ्या अवयवांचे होणारे आजार दोन प्रकारचे असू शकतात. पहिला प्रकार विशिष्ट अवयव ठीक असूनही क्रिया नीटन चालणे. यास *क्रियाविषयकविकृती* म्हणतात. दुसरा प्रकार अवयव बिघडून क्रिया बिघडणे. यास *स्वरूपविषयक विकृती* म्हणतात.
दुःखाच्या तडाख्याने माणूस एकदम मुका बनतो. मनावरील आघाताने माणूस लुळा होऊ शकतो. भीतीमुळे एकेकी डायरिया सुरु होतो. शाळेत जाण्याची इच्छा नसेल पण वडील दम देऊन शाळेत पाठवीत आहेत, अशा वेळी मुलाच्या पोटात दुखू लागते. अशा प्रकारचे आजार हे क्रियाविषयक आजार होत. अशा स्वरूपाचे आजार संमोहनाने बरे होऊ शकतात. *बुवा मंडळी संमोहन-कौशल्य वापरून असे आजार बरे करू शकतात.*
झाडाखालून अंधारातून येताना एखाद्याला भुताने झपाटले, तर अशा व्यक्तीला भीतीपोटी घाम फुटणे, दातखीळ बसने, डोळे गरागरा फिरवणे अशी आजाराची लक्षणे दिसू लागतात. अशी व्यक्ती बुवाकडे गेल्यास बुवा त्या व्यक्तीच्या अंगावरील भूत उतरवण्याची क्रिया करताना मी तुझ्या अंगावरील भूत काढले आहे अशी सूचना देतो. या सूचनेचा परिणाम म्हणून भीती जाऊ शकते व व्यक्ती बरी होऊ शकते.
*पण गंभीर मानसिक आजार बुवा बरे करू शकत नाही.* अॅपेंडिक्स, मेंदूतील ट्युमर, कॅन्सर, कोड यांसारख्या शारीरिक व्याधींवर बुवा काहीच करू शकत नाही.
जे लोक आमचा आजार बुवाने बरं केला असे सांगतात, त्यांचा आजार क्रियाविषयक असतो. स्वरूपविषयक नसतो.
सर्व प्रकारचे आजार अमुक अमुक बुवा हमखास बरे करतो, असा कोणाचा दावा असेल तर त्याची चिकित्सा करण्याची अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तयारी आहे. अशा दाव्यांची चिकित्सा कोणीही केलेली नसते, असा अनुभव आहे.
*डॉ.
नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*
*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
https://mikamblemahesh.blogspot.com/
No comments:
Post a Comment