*_प्रश्न_३२-अंगात आलेली व्यक्ती दहा जणांना आवरत नाही. उंच झाडाच्या शेंड्यावर सरासरा चढून जाते हे मी स्वत: पाहिलेले आहे. हे कसे घडते?_*
*उत्तर 👉* एकाच कल्पनेने झपाटलेल्या व्यक्तीच्या बाबतीत उन्मादा वस्थेत वर उल्लेख केलेल्या गोष्टी शक्य आहेत, *केंद्रित मनःसामर्थ्याचा तो आविष्कार आहे* . केंद्रित मनःसामर्थ्याचे ज्ञात उदाहरण प्रसिद्ध आहे. मोटारीखाली एक मुलाचा पाळीव कुत्रा सापडतो. सर्व ताकद एकवटून तो मुलगा मोटर उचलतो व कुत्र्याला बाहेर निघणे शक्य होते. रायगडाचे दरवाजे बंद झाल्यावर हिरकणी अवघड डोंगर रात्रीच्या वेळी उतरून बाळाच्या ओढीने घरी आली रायगडासारखा अवघड किल्ला अंधारात ती कशी उतरली? बाळाच्या ओढीने *मन:शक्ती एकवटली त्यामुळेच ते शक्य झाले.झपाटलेल्या आत्म्याने दिलेल्या कौशल्यामुळे नव्हे.*
शरीराच्या क्षमतेत जे करता येणे शक्य आहे तेच केंद्रित मनःसामर्थ्याने साधता येईल.
त्यामुळे दहाजणांना न आवरणे अगर उंच झाडाच्या शेंड्यावर चढणे हे अंगात आलेल्या व्यक्तीस अशक्य नाही, यासाठी आत्म्याच्या मदतीची गरज नाही.
दुसराही भाग असू शकतो. अंगात आलेल्या व्यक्तीने सारासार विवेक गमावलेला असतो. झाडावर चढण्यात सराईत असलेली व्यक्तीही झाडाच्या शेंड्यावर जात नाही.कारण त्या ठिकाणी चढल्यास पडण्याची भीती आहे हा विवेक तिच्याकडे असतो. हा विवेक गमवला असल्याने अंगात आलेली व्यक्ती झाडाच्या शेंड्यावर चढत जाते. जर देव असेल व खरोखरच व्यक्तीच्या अंगात येत असेल, तर *उंच झाडावर चढणारी व्यक्ती हवेत उडत का नाही* ? देवाला हे शक्य व्हावयास हवे. पण अशी व्यक्ती हवेत कधीही उडू शकत नाही.एवढेच नव्हे, तर *ज्यासाठी प्रशिक्षित कौशल्याची गरज आहे, अशा गोष्टी अंगात आलेल्या व्यक्ती करू शकत नाही.* उदा. अंगात आलेल्या व्यक्तीने पूर्वी सायकल चालविली नसेल, तर अंगात आल्यावर तिने सायकल चालवावी, हे घडत नाही, कारण सायकल चालविण्यासाठी किमान प्रशिक्षणाची जरुरी असते.अंगात आलेली व्यक्ती बराच वेळ वेगाने घुमली व नाचली तर अंगातील गेल्यावर ती बराच वेळ निश्चल पडून राहते, कारण शरीर सामर्थ्याच्या थोड्या वेळात केलेल्या अतिरिक्त वापराने ती दमून जाते. देव अंगात येत असता तर असे थकण्याचे कारणच नव्हते.
*डॉ.
नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*
*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
https://mikamblemahesh.blogspot.com/
No comments:
Post a Comment