Saturday, 5 December 2020

एकाच्या पापाचें फळ सर्व जातभाईंनां भोगावें लागतें.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 *_एकाच्या पापाचें फळ सर्व जातभाईंनां भोगावें लागतें._* 
 *_(काक जातककथा)_* 
 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 

 
                                         _एकदां बोधिसत्त्व कावळ्याच्या योनींत जन्मला होता व मोठ्या समुदायासह तो वाराणसीच्या जवळपास रहात होता. एके दिवशीं वाराणसी राजाचा पुरोहित नदीवरून स्नान करून येत होता. वाटेंत नगरद्वाराजवळ तोरणावर दोन कावळे बसले होते. त्यांतील एकजण दुसर्यासला म्हणाला, ''हा पहा, दुष्ट ब्राह्मण उघड्या बोडक्यानीं येत आहे. मला वाटतें कीं, तो या तोरणाच्या खालीं आल्याबरोबर त्याच्या डोक्यावर देहधर्म करावा !''¬¬¬¬_ 

                             _दुसरा म्हणाला, ''बाबारे, असली भलतीच कुकल्पना करूं नकोस. हा ब्राह्मण सामान्य मनुष्य नसून राजाचा पुरोहित आहे. याचाशीं वैर संपादन करणें म्हणजे आपल्या हातानेंच आपला गळा कापून घेण्यासारखें आहे.''_ 

                     _पहिला कावळा म्हणाला, ''तुझे हे नुसते कुतर्क आहेत. राजाचा पुरोहित झाला काय किंवा त्याचा बाप झाला काय, आमच्यासारखा उडत्या पाखराचें तो काय करणार? तुला जर भीति वाटत असेल तर तूं येथून खुशाल पळून जा! पण मी याच्या गुळगुळीत डोळ्यावर देहधर्म केल्यावांचून येथून निघून जाणार नाहीं.''_ 

                     _त्या दुसर्यार कावळ्यानें आपल्या मित्रास उपदेश करण्यांत तथ्य नाहीं असें जाणून तेथून पलायन केले; परंतु शिल्लक राहिलेल्यानें ब्राह्मण तोरणाखालीं आल्याबरोबर त्याच्या डोक्यावर देहधर्म केला! डोक्यावर एकदम काय पडलें हें पाहण्यासाठीं ब्राह्मणानें वर मान केली. तों का का शब्द करीत वेडें वाकडें तोंड करून जणूं काय याची थट्टाच करीत आहे असा एक कावळा तोरणावर बसलेला याच्या पहाण्यांत आला. आपला अपमान कसाबसा गिळून डोकें धुवून तो आपल्या घरीं आला; परंतु कावळ्याविषयी त्याच्या मनांत अत्यंत द्वेषबुद्धि उद्भवली, व सर्व कावळ्यांचा सूड उगविण्याचा त्यानें निश्चय केला._ 

                         _एके दिवशीं राजाची एक दासी तांदूळ सडण्याच्या कामांत गुंतली असतां थकून जाऊन तेथेंच झोपीं गेली. इतक्यांत एक एडका येऊन तांदुळ खाऊं लागला. जागी होऊन तिनें त्या एडक्याला घालवून दिलें; परंतु तो तांदुळाला इतका लंपट झाला होता कीं, तिची नजर चुकवून त्यानें तांदूळ खाण्याचा आपला क्रम सोडला नाहीं. दासीला त्याचा अत्यंत संताप आला. तिनें स्वयंपाकघरांतून एक जळकें कोलीत आणून एडक्याला न दिसेल अशा ठिकाणीं दडवून ठेविलें, व तो तांदुळ खाण्यास आल्याबरोबर त्याच्यावर प्रहार केला, जळके निखारे अंगावर पडून एडक्याच्या लोकरीनें पेट घेतला, आणि तो इतस्ततः धावूं लागला. जवळच एक राजाच्या हत्तींची पागा होती. व तेथें एक मोठी गवताची गंजी होती. एडका आगीच्या त्रासानें त्या गंजीत शिरला; आणि त्यामुळें ती गंजी देखील पेटली. गंजीची आग पागेवर पडून पागेनें पेट घेतला. हत्तीच्या माहुतांनीं हत्तीचीं बंधनें तोडून त्यांना मोकळें केलें; तथापि कांहीं हत्तींना कातडी भाजल्यामुळें जखमा झाल्या. हें वर्तमान राजाला समजल्यावर राजानें जळलेल्या हत्तीस काय उपाय करावा असा आपल्या पुरोहितास प्रश्न विचारला. तेव्हां तो म्हणाला, ''महाराज, कावळ्याची वसा मिळाली असतां हत्तीच्या जखमा लवकर बर्या होतील.''_ 

                     _राजानें कावळ्यांला मारूनच रबी गोंळा करावी असा हुकूम दिला. जो तो धनुष्यबाण घेऊन कावळ्यांच्या मागें लागला, व हजारों कावळे प्राणास मुकले ! तेव्हां शिल्लक राहिलेल्या कावळ्यांना मोठें भय उत्पन्न झालें, व ते सर्वजण बोधिसत्त्वाला शरण गेले. बोधिसत्त्व म्हणाला, ''आमच्या एका जातभाईच्या दुराचरणाचें हें फळ आम्हीं भोगीत आहोंत ! राजाच्या पुरोहिताचा जर त्यानें अपमान केला नसता तर आज सर्व कावळ्यांवर हा प्रसंग गुदरला नसता. आतां मी माझा जीव धोक्यांत घालून देखील या संकटाचें निरसन होईल तर पहातों.''_

                 _असें बोलून तो तेथून उडाला आणि एका खिडकींतून राजसभेंत शिरून राजाच्या सिंहासनाखालीं जाऊन बसला. त्याला पकडण्यासाठीं राजाचे दूत धांवले. पण त्यांना राजा म्हणाला, ''माझ्या सिंहासनाचा ज्यानें आश्रय केला त्याच्यावर हल्ला करूं नका. मीं त्याला अभय दिलें आहे.''_ 

                 _हे राजाचे शब्द कानीं पडतांच बोधिसत्त्व सिंहासनाखालून बाहेर आला. आणि राजाला नमस्कार करून म्हणाला, ''महाराज, मला एकट्याला आपण अभय दिलें आहे. परंतु माझ्या हजारों ज्ञातिबांधवांची आपल्या आज्ञेनें हानि होत आहे. पुष्कळजण मृत्युमुखीं पडले आहेत, व आम्ही जिवंत असलेले त्यांच्या शोकानें कष्टी झालों आहोंत.''_ 

                 _राजा म्हणाला, ''आमच्या पुरोहितानें कावळ्याच्या वसेनें हत्ती बरे होतील असें सांगितल्यामुळें मी हा हुकूम सोडला.'' बोधिसत्त्व म्हणाला, ''महाराज, आपल्या पुरोहितानें सूड उगविण्याच्या बुद्धीनें ही गोष्ट आपणास सांगितली. कावळ्याच्या पोटांत वसा कोठून असणार ? राजा म्हणाला, ''सर्व प्राण्यांच्या मांसांत वसा सांपडते. तर मग कावळ्याच्या मांसात ती कां नसावी ?''_

                         _बोधिसत्त्व म्हणाला, ''महाराज, आमची कावळ्याची जात मोठी भित्री आहे. सर्व लोकांविषयीं ते साशंक असतात, व त्यामुळें त्यांच्या मांसांत वसा वाढूं शकत नाहीं.'' हें बोधिसत्त्वाचें भाषण ऐकून राजा प्रसन्न झाला, व म्हणाला, ''मीं आजपासून सर्व कावळ्यांना अभयदान देतों.''_ 

                     _एवढ्यानें बोधिसत्त्वाची तृप्ति झाली नाहीं. त्यानें सर्व प्राण्यांला राजापासून अभयदान मागून घेतलें व तो म्हणाला, *''महाराज छंदानें, द्वेषानें, भयानें किंवा मोहानें कोणतेंही कृत्य करीत जाऊं नका. कोणत्याहि कृत्याला आरंभ करण्यापूर्वी नीट विचार करा; कांकीं तुमच्या हातून चूक घडली तर पुष्कळांचें अकल्याण होणार आहे.''* तेव्हांपासून राजा मोठा धार्मिक झाला, व कावळ्याला रोजचा पुष्कळ भात खावयास द्यावा असा त्यानें हुकूम केला._ 
 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 
 *संदर्भ : - जातक कथा संग्रह* 
*संकलन :- महेश कांबळे* 
*०६/१२/२०२०* 
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...