Friday, 11 December 2020

निंबाचा रोप

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 
 *_निंबाचा रोप_* 
 *_(एकपण्ण जातककथा)_* 
 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 

             _एका काळी बोधिसत्त्व औदित्य ब्राह्मणकुलांत जन्मला होता. तरुणपणी गृहस्थाश्रमाचे काही काळ सुख उपभोगल्यावर तो प्रपंचाला कंटाळून त्याने हिमालयाची वाट धरली. काही वर्षे हिमालयावर राहिल्यानंतर खारट आणि आंबट खाण्यासाठी तो खाली गावात फिरत असताना त्याला पाहून वारणासीचा राजा अत्यंत प्रसन्न झाला आणि आपल्या सेवकांना म्हणाला, "हा तपस्वी मोठा योगी वाटतो. त्याला राजवाड्यात मोठ्या आदराने घेऊन या". राजाच्या आज्ञेप्रमाणे ते बोधिसत्त्वाजवळ जाऊन राजवाड्यात येण्याची विनंती केली. तेव्हा तो म्हणाला, "बाबांनो, मी राजकुळात जाणारा तापस नव्हे. राजाची गैरसमजूत झाली असेल म्हणून त्याने मला बोलाविले असेल. मी हिमालयात राहणारा प्रवासी तापस आहे"._ 

                 _नोकरांनी राजाला घडलेला प्रसंग सांगितला. तेव्हा राजा म्हणाला, "माझ्या घरी येणारा असा दुसरा कोणी तपस्वी नाही. ज्या तपसव्याच्या मागोमाग तुम्ही गेलात त्यांनाच मी बोलावतो आहे. मी त्यांची तपश्चर्या पाहून अत्यंत प्रसन्न झालो आहे असे त्यांना सांगा आणि त्यांना येथे घेऊन या."_ 

             _त्याप्रमाणे त्यांनी बोधिसत्त्वाला मोठ्या आग्रहाने राजवाड्यात नेले. बराच वेळ संवाद झाल्यानंतर राजा म्हणाला, "भदंत, आपण बरीच वर्षे अरण्यवास केला आहे. आता आपण हितेच राहून आपली सेवा करण्याची संधी आम्हाला द्या"._ 
             _बोधिसत्त्व म्हणाला, "पुष्कळ वर्षे अरण्यांत राहिल्याने मला एकांतवासाची आवड लागली आहे त्यामुळे मला नगरवास आवडणे शक्य नाही."_ 

             _राजा म्हणाला, "या नगराच्या आसपास माझी पुष्कळ उद्याने आहेत. त्यापैकी एखाद्या उद्यानांत तुम्ही आश्रम बांधून खुशाल राहावे. लोकांकडून तुम्हाला त्रास होणार नाही आणि तुमच्या शांततेचा भंग होणार नाही, असा मी बंदोबस्त करतो." राजाचा फारवंग आग्रह झाल्याने एका रमणीय उद्यानांत आश्रम उभारून बोधिसत्त्व तेथे धर्मचिंतनांत काळ घालवू लागला_ 

                 _वाराणसीच्या राजाला एकुलता एकच मुलगा होता. त्याचे फार लाड करण्यात आल्याने तो अत्यंत द्वाड झाला होता. वडील माणसांचा तो मुळीच आदर ठेवीत नसे. नोकरचाकरांना शिव्या दिल्यावाचून तो कधीही सरळ बोलत नसे. या त्याच्या वागणुकीने राजा फार कंटाळला. मुलगा सुधारावा म्हणून राजाने पुष्कळ उपाय करून पाहिले शेवटी उद्यानांत राहणाऱ्या बोधिसत्त्वाची त्याला आठवण झाली व त्याच्याजवळ जाऊन तो म्हणाला, "भदंत, माझा मुलगा फार वाचाळ निघाला आहे, ज्याच्या त्याच्या अंगावर पिसाळलेल्या कुत्र्यासारखे तो तुटून पडत असतो. परंतु त्याचे हे वर्तन माझ्या कुळाला अत्यंत लांच्छनास्पद आहे. आपण काही उपदेश करून माझ्या मुलास ताळ्यावर आणाल तर माझ्यावर अनंत उपकार होतील."_ 

                 _बोधिसत्त्वाच्या सांगण्याप्रमाणे राजाने आपल्या पुत्राला आश्रमात पाठविले. राजा बोधिसत्त्वासमोर डोके वाकवितो हे राजकुमाराने पाहिले होते त्यामुळे आपल्या नोकरांशी जसे वागतो तसे तो बोधिसत्त्वासमोर न वागता तो मोठ्या आदराने आश्रमात प्रवेश करून बोधिसत्त्वाला नमस्कार करून एका बाजुला बसला. बोधिसत्त्वाने राजपुत्राला काही गोष्टी सांगून पुन्हा दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. बोधिसत्त्वाच्या सांगण्याप्रमाणे राजकुमार नियमाने आश्रमांत जाऊ लागला._ 

             _एके दिवशी बोधिसत्त्व त्याला बरोबर घेऊन उद्यानांत फिरावयास गेला. तेथे एक निंबाचा रोप उगवला होता. त्याकडे बोट दाखवून बोधिसत्त्व राजकुमाराला म्हणाला, "या झाडाची तुला पारख नाही. तेव्हा याची दोन चार पाने खाऊन पहा बरे."_ 

                 _राजकुमाराने ताबडतोब त्या रोपाची पाने चावली, व तोंड कडू झाल्यामुळे संतापून त्याने तो रोप उपटून टाकला. बोधिसत्त्व म्हणाला, "हे तू काय केलेस?"._ 

             _राजकुमार म्हणाला, "भदंत, असले हे झाड वाढू देणे योग्य आहे काय? याची २-३ पाने चावल्याबरोबर माझे तोंड इतके कडू झाले की, माझ्या सर्व अंगात जणू काय कडवटपणाच शिरला! तेव्हा अश्या झाडाला लहानपणीच उपटून टाकले असता लोकांच्या वेदना कमी करण्याचे श्रेय मला मिळणार नाही काय?"_ 

                _बोधिसत्त्व म्हणाला, *"हे झाड मोठे झाले तर त्याची पाने आणि फळे लोकांनी खाल्लीच पाहिजेत असं नाही परंतु तू जर तुझ्या कडवट स्वभावासह मोठा झालास तर त्याची अत्यंत कडू फळे तुझ्या प्रजेला जबरदस्तीने भोगावी लागणार नाहीत काय? आणि त्यांनी जर तुझे आताच उन्मुलन करून टाकले तर त्यांना दोष देता येईल काय? या गोष्टीचा तू नीट विचार जर आणि आपला स्वभाव गोड करण्याचा प्रयत्न कर. जर तुझा स्वभाव असाच कडू राहिला, तर जशी तू या निंबाच्या रोपाची वाट लावलीस तशीच काशीराष्ट्रवासी लोक तुझी लावतील हे पक्के लक्षांत ठेव."*_ 

                 *_बोधिसत्त्वाचा हा उपदेश राजकुमाराच्या मनावर इतका बाणला की, त्याने सतत प्रयत्नाने आपल्या सर्व दुष्ट खोडी सोडून देऊन चांगले गुण संपादन केले._* 

 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 
 *संदर्भ : - जातक कथा संग्रह* 
 *संकलन :- महेश कांबळे* 
 *११/१२/२०२०* 
 https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1 
 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

नवसुत्तं

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 "नवसुत्तं" https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_20.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 _...