➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*
_आळसाच्या रोगावर रामबाण उपाय !_*
*_(कोसियजातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_एका जन्मी बोधिसत्त्व ब्राह्मण कुळांत जन्मला. वयांत आल्यावर चार वेद आणि सर्व शास्त्रें यांत पारंगत होऊन वाराणसी नगरींत पुष्कळ शिष्यांना तो शिकवीत असे. त्याचा एक ग्रामवासी शिष्य अध्ययन पुरें झाल्यावर काशींतील एका मुलीशीं विवाह करून तेथेंच घरदार बांधून रहात असे. पण या तरुण ब्राह्मणाची बायको अत्यंत दुष्ट होती. तिच्या बाह्यरूपाविरुद्ध तिचे गुण होते. बिचारा तरुण तिच्या रूपाला भुलून ती जें म्हणेल तें करण्यास तत्पर असे. सकाळीं उठून पोटांत दुखण्याचें निमित्त करून ती बाई अंथरुणावर पडून राही, व नवर्यास म्हणे कीं, माझ्यानें काहीं करवत नाहीं. तुम्ही चांगलें जेवण करून घातल्याशिवाय माझी पोटदुखी बरी व्हावयाची नाहीं बिचार्या नवर्यानें घरांतील सगळीं कामें करावीं. एवढेंच नव्हे तर, ती जें म्हणेल तें तिला द्यावें व कधींकधीं आपण अर्ध्याच पोटीं रहावें, असा क्रम चालविला. अर्थात् त्या बाईचा रोग उत्तरोत्तर वाढतच गेला. तिचे शरीर पुष्ट होत होतें! परंतु पोटदुखीला कांहीं गुण पडेन! गरीब बिचारा तरुण तिच्या रोगानें अतिशय कंटाळून गेला. एके दिवशीं बोधिसत्त्वाच्या दर्शनाला गेला असतां बोधिसत्त्व त्याला म्हणाला, ''कायरे आजकाल तूं कोठें दिसत नाहींस. तुझा चेहरा देखील अगदीं फिक्कट दिसतो. तुझें सर्व कांहीं ठीक चाललें आहेना?'_'
_तो म्हणाला, ''गुरुजी, मी निरोगी आहे पण माझ्या तरुण बायकोच्या रोगानें मला भंडावून सोडलें आहे! दिवसें दिवस तिचा रोग वाढत जात आहे, व त्यामुळें माझ्या जिवाला चैन पडत नाहीं.'' बोधिसत्त्व म्हणाला, ''असा तिला रोग तरी कोणता आहे ? काय ताप येतो, किंवा अन्न रुचत नाहीं, कीं होतें तरी काय?_
_तरुण ब्राह्मण म्हणाला, ''तिला ताप तर मुळींच नाहीं, अन्न चांगलें खपतें. एवढेंच नव्हें तर रोज नवीन नवीन पक्वान्नें तिला फार आवडतात! तिचा रोग म्हटला म्हणजे तिचें पोट दुखतें. मी घरांत असेपर्यंत कोणतेंहि काम तिच्यानें करवत नाहीं. मी बाहेर जातों तेव्हां ती इकडून तिकडे फिरत असते असें माझ्या ऐकण्यांत आलें आहे. कदाचित बिछान्यांत पडून कंटाळा आल्यामुळें ती तसें करीत असेल! कांही असो तिच्या या पोटदुखीनें माझे हाल होत आहेत एवढें खरें.''_
_बोधिसत्त्वानें बाईला कोणता रोग झाला असावा हें तेव्हांच ताडलें! व तो त्याला म्हणाला, ''मी एक या रोगावर उत्तम औषध तयार करून देतों, पण तुझी बायको तें खुषीनें घेईल असें वाटत नाहीं. तिच्यावर जबरदस्ती करावी लागेल. प्रसंग आला तर तिच्यावर चाबकाचे चार तडाखे ओढण्याची तुझी तयारी आहे काय?'' तो म्हणाला, ''गुरुजी, आपण हें काय विचारितां? आपली आज्ञा मला सर्वथैव वंद्य आहे. तिचा रोग बरा होत असला तर चार सोडून दहा फटके मारले तर त्यांत दोष कोणता?''_
_बोधिसत्त्वानें गोमुत्रांतून चिराईत वगैरे कडू औषधें उकळून त्यांचा काढा बनविला, व कांहीं वेळपर्यंत तो तांब्यांच्या नव्या भांड्यांत ओतून ठेविला. दुसर्या दिवशीं त्या तरुण ब्राह्मणाला बोलावून आणून बोधिसत्त्व म्हणाला, ''हा काढा घेऊन जा व तुझ्या बायकोला पाज. बरोबर एक चाबूक घेऊन जाण्यास विसरूं नकोस.''_
_त्यानें तो काढा आपल्या बायकोला नेऊन दिला. तेव्हां ती त्यावर फार संतापली, व म्हणाली, ''मला हें तुमचें भिकारडें औषध पाहिजे कशाला? तुपालोण्यानें जर माझा रोग बरा होत आहे, व मला गुण पडत आहे तर मग विनाकारण काढयांत पैसे कां घालवा?''_
_तो म्हणाला, ''पण आजपर्यंत तुपालोण्यावर पुष्कळ पैसे खर्चण्यांत आले. परंतु त्यापासून तुझा रोग साफ बरा झाला नाहीं. आज चांगलें पक्वान्न खावें आणि दुसर्या दिवशीं पुनः पोटदुखीला सुरवात व्हावी. आतां आमच्या गुरूनें तयार करून दिलेला काढा घेतल्यांवाचून तुझा रोग बरा होण्याचा संभवच नाहीं.''_
_त्या खाष्ट बाईनें निरनिराळ्या मार्गानें नवर्याची समजूत घालण्याचा बराच प्रयत्न केला. पण त्यानें साफ सांगितलें कीं, ''काढा घेतला नाहीं तर चाबकाचा प्रयोक करून तो घेणें भाग पडावें लागेल.'' निकरावर गोष्ट आली, तेव्हां निरूपायानें तिनें त्या काढ्याचा एक घुटका घेतला. पण त्यायोगें तिचें तोंड वाकडें तिकडें होऊन तिला घेरी आली. थोड्या वेळानें सावध झाल्यावर ती नवर्याला म्हणाली, ''मला हा काढा घ्यावयास लावूं नका. आजच्या दिवसाची मुदत द्याल, तर माझा रोग आपोआप बरा होईल असें वाटतें.''_
_तो म्हणाला, ''हा काढा असाच ठेऊन देतों व तुझा रोग एक दोन दिवसांत साफ बरा झाला नाहीं तर त्याचा तुझ्यावर पुनः प्रयोग करण्यांत येईल.''_
_बाईचा रोग तात्काळ बरा झाला! आपल्या नवर्याच्या गुरूसमोर आपले डावपेंच चालावयाचे नाहींत असें जाणून पूर्वीचा सर्व खोडसाळपणा तिनें टाकून दिला; व आपल्या नवर्याची ती अनन्यभावें सेवा करूं लागली._
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*०२/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment