Sunday, 29 November 2020

मानमोडी’ लेणी (खोरे वस्ती)

_*‘मानमोडी’ लेणी (खोरे वस्ती)*_ _कार्तिक पौर्णिमा साजरी करण्यासाठी दिनांक २९/११/२०२० रोजी जुन्नरपासून काही अंतरावर असलेल्या मानमुकडा लेण्यांना ब्राह्मी (धम्म) लिपी कार्यशाळेच्या निमित्तीने भेट देण्याचा योग आला आणि प्राप्त झाली दगडांची भाषा जाणण्याची कला..! सुमारे २२०० ते २३०० वर्षापूर्वीच्या इतिहासाचा पट आपल्या नजरेसमोरुन झरझर ओसरुन जातो.. इतिहास कीतीही गाडला, मोडला, तोडला, फोडला तरी तो पुनुरुज्जीवीत होत असतो. जुन्नर येथील मानमोडी लेणी येथे MBCPR यांनी आयोजित केलेल्या अभ्यास दौर्यागत सहभागी झालो ज्यात आम्हाला आदरणीय अतुल भोसेकर सर यांनी अप्रतीमरित्या लेण्यांची माहिती दिली व लेण्यांचा अभ्यास कसा करावा, लेणी कशी पहावी याची ही माहिती दिली. सर्व आयोजकांचे आणि सरांचे मनःपूर्वक आभार आणि लेण्यांची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे :-_ _जुन्नर शहराच्या जवळच १.५ कि.मी अंतरावर उत्तरेस असलेल्या डोंगर रांगामध्ये १.५ कि.मी अंतर विस्तार असलेल्या या लेण्या तिन समुहात पहावयास मिळतात. जाण्याचा मार्ग खोरे वस्ती मधुन जो मार्ग दक्षिणेस जातो त्याच मार्गाने पुढे १ कि.मी अंतरावर गेल्यावर उजवीकडे जी डोंगररांग दिसते तेथेच या लेण्या तीन समुहात विखुरलेल्या दिसतात. *लेणी पाहायला फारसे कुणी येत नसल्याने गवत वाढल्याने वा सागाच्या पानगळीने ही वाट बुजून गेलेली असते. जंगल-झाडीतला हा अनुभव घेत अर्धा-एक तासात आपण अंबा-अंबिका लेणीगटापुढे पोचतो.* एक मोठे पटांगण पुढय़ात असलेला कातळावरचा देखावा अचानक समोर येतो. विहार, चैत्यगृह, पाण्याची कुंडे अशी ही ३३ खोदकामे आहेत. बरीचशी जमिनीलगत ओळीने, तर काही कातळावरच्या भागात आहेत. *‘भीमाशंकर’च्या सतरा लेण्यांनंतर इथे १८ ते ३४ असे क्रमांक लेण्यांना दिले आहेत.* पूर्वेकडून क्रमाने सुरुवातीची दालने साध्या खोल्या आहेत. त्यांच्यासमोर पाण्याची काही कुंडे खोदली आहेत. यातील काही जमिनीखाली दोन टप्प्यांत आहेत. २१ क्रमांकाच्या लेण्यात पाच खोल्या आहेत. आतले खोदकाम खडक ठिसूळ लागल्याने सोडून दिले आहे. लेणे अपूर्ण राहिले, पण बाहेर प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस एक खंडित शिलालेख या लेण्यामागील कुणा भावांच्या दानधर्माची माहिती मिळते. यानंतर पुन्हा काही खोल्या वजा लेणी आणि पाण्याची कुंडे लागतात. त्याच्या डोक्यावरही एक मजला खोदला आहे. तिथे जाण्यासाठी बाहेरच्या बाजूने एक जिना आहे. *पुरातत्व विभागाने जतन-संवर्धन कामांतर्गत हा जिना दुरुस्त केला. पण हे करताना सौंदर्यदृष्टी न ठेवल्याने लेण्यांच्या प्राचीन देखाव्यात नवे बांधकाम नजरेत खुपते.*_ *फार वर्षांपूर्वी या खांबांच्या जतन-संवर्धन प्रक्रियेत त्यांना सिमेंटचा गिलावा चढवला गेला आणि त्यात हे लेख बुजले. नशीब, की हे कृत्य घडण्यापूर्वी ज्येष्ठ पुरातत्त्व अभ्यासक व ब्राह्मी (धम्म) लिपीच्या तज्ज्ञ डॉ. शोभना गोखले यांनी या लेखांचे वाचन नोंदवून ठेवले होते. इतिहासाच्या अभ्यासात अशा नोंदी किती महत्त्वाच्या ठरतात, याचे हे उदाहरण!* या शिलालेखांतून हा डोंगर, इथली लेणी व इथे राहणाऱ्या भिक्षूंच्या संघाविषयी बरीच माहिती मिळते. *या डोंगराचे मूळ नाव ‘मानमुकुड’ (संस्कृत- ‘मानमुकुट’) या लेखावरूनच कळते. आज दोन हजार वर्षांनंतरही हे नाव ‘मानमोडी’ या अपभ्रंश रूपात वापरात आहे. या लेण्यास किंवा इथे निवास करणाऱ्या संघास ‘गिध विहार’ असेही म्हटले जाई, त्याचाही उल्लेख येतो.* _*मौर्यानंतर इ.स.पुर्व.१८४ नंतर ते इ.स २५० पर्यंत नर्मदेच्या खालचा संपूर्ण प्रदेश सातवाहनांनी समृद्ध व भरभराटीला आणला होता. देशविदेशात व्यापार समृध्द केला तो याच सातवाहनांनी. म्हणूनच सातवाहनांची नाणी क्विंटलच्या प्रमाणात मिळतात. जेव्हा मौर्यांचे प्रांताधिकारी होते तेव्हा पासूनच सातवाहन जुन्नरला राहत होते. मौर्यानंतर त्यांनी आपले स्वातंत्र्य घोषित केले. महाराष्ट्रात ३० सातवाहन राजे होऊन गेले. व यांनीच जवळपास सर्वच लेण्या कोरल्या आहेत. सादवाह, सातवाहन व सप्तकर्णी ही त्यांचीच नावे होय. त्यांची दानपत्रे,नाणी,ग्रंथ व शिलालेख त्यांनी ब्राम्ही (धम्म) लिपि, पाली प्राकृत लिपीत लिहिले आहे.*_ *_येथील खास भुतलेणी (खोरेवस्ती) वैशिष्ट्य म्हणजे लेणीच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात दोन स्तुपाच्या मधोमध दोन व्यक्ती कोरलेल्या आपणास दिसून येतात. त्यातील एक व्यक्ती गरूड वंशीय तर एक नागवंशिय आहे. गरूडाचे आणि नागाचे वैरभाव किती प्रसिद्ध आहे हे आपणास ठाऊक आहे. परंतु या काळात हे दोन्ही वैरभाव असलेल्या व्यक्ती एकमेकांना किती आदराने जवळ होत्या की तेव्हा वैरत्वाला विसर पाडणारे तत्वज्ञान शिकविले जात होते असा सांस्कृतिक वारसा जपुन ठेवणार जुन्नर हे ऐतिहासिक शहर होत._* _दारातील भारदस्त खांब इथे पाऊल ठेवल्यापासून खुणावत राहतात. बेडसे लेण्याची आठवण करून देणारे हे खांब! दोन पूर्ण, तर बाजूचे दोन अर्धव्यक्त! तब्बल पावणेसात मीटर उंचीचे! एका चौथऱ्यावर घट, त्यातून बाहेर आलेले हे अष्टकोनी खांब, त्यावर पुन्हा उपडा कलश! जणू या लेण्याचे सौष्ठवच या स्तंभांतून डोकावते. या खांबांच्या आत ओसरी, त्यानंतर चैत्यगवाक्षाची भिंत आणि त्यापुढे प्रत्यक्ष चैत्यगृह!_ _पण आतील स्तूप कोरत असताना तो खडक ठिसूळ असल्याचे कलाकारांच्या लक्षात आले आणि त्यांनी काम थांबवले. या चैत्यगृहात शिरण्यापूर्वी डाव्या हाताला एक छोटेसे लेणे दिसते. आत एक सुंदर स्तूप कोरलेला आहे. चैत्यगृहाच्या शेजारी हा स्तूप का बरे खोदला असावा, असा प्रश्न आत शिरताना पडतो. चैत्यगृहातील अर्धवट काम पाहिले की मग त्यामागचे उत्तर कळते. आतील ही उणीव भरून काढण्यासाठी बाहेर हा स्तूप कोरला असावा._ *_वरच्या मजल्यावरील या सलग पाच खोल्यांच्या लेण्यास ३० क्रमांक दिला आहे. या खोल्यांसमोर पूर्वी गच्ची असावी. आज मात्र तिचा बराचसा भाग तुटला आहे. पहिल्या खोलीच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूस मूळ खोदकामात कोनाडे करत मागाहून दोन शिल्पे कोरली आहेत. डावीकडे जैनांचा क्षेत्रपाल, तर उजवीकडे जैन देवी चक्रेश्वरी! चौथ्या खोलीतही जैन शिल्पकाम दिसते. जैनांचे प्रथम र्तीथकर, बावीसावे र्तीथकर नेमिनाथ आणि जैन देवता अंबिकेची मूर्ती इथे आहे. यातील अंबिका आंब्याच्या झाडाखाली बसलेली दाखवली आहे. या देवीवरूनच या गटाला अंबा-अंबिका असे नाव मिळाले. मूळ लेणे बौद्धकालीन. दोन हजार वर्षांपूर्वी खोदलेले! त्यात आठव्या-नवव्या शतकात ही जैन कला अवतरली आणि त्याहीनंतर केव्हातरी या देवांना हिंदूंनीही आपलेसे केले. कुठल्याही स्थापत्याविष्काराच्या भल्यामोठय़ा कालखंडात असे बदल स्वाभाविक असतात. हा सारा इतिहास आहे._* _दुसरीकडे स्तूपाविना रिकाम्या चैत्यगृहाचाही इथे आगळा-वेगळा उपयोग करून घेतला आहे. त्याची दर्शनी भिंत, गवाक्ष कमान, खांब या साऱ्यांवर दहा मोठे ब्राह्मी/धम्म लिपीतील लेख कोरले आहेत. त्यांतून ही लेणी, त्यात निवास करणारा संघ, त्याला झालेला दानधर्म आदींची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. या सर्व लेखांचे वाचन झालेले आहे. पण आज मात्र यातले आठच लेख दिसतात. नष्ट झालेले लेख चैत्यगृहातील खांबांवर होते. यातील काही लेखांतून जमिनीच्या दानधर्माचे उल्लेख आहेत. ही जमीन मोजण्यासाठी त्याकाळी ‘निवर्तन’ हे परिमाण वापरले जात असे. आता निवर्तन म्हणजे किती क्षेत्र, हे समजत नाही. या जमिनीवर काही वृक्षलागवडीचे उल्लेखही लेखांत आले आहेत._ *_‘गामे वलाहकेसुकर जभति उदेसेण निवतणानि बारस।। गामसे उरकेसु निवनणानि’_* _हे शिलालेख करंज, आंबा, जांभूळ आदी वृक्षांच्या लागवडीबद्दल सांगतात. या वृक्षलागवडीमागेही काही उद्देश असल्याचा अभ्यासकांचा कयास आहे. करंज हा औषधी गुणधर्म असलेला वृक्ष! त्याच्या तेलाचा उपयोग तेव्हा ‘अॅकन्टिसेप्टिक’ म्हणून केला जाई. आंबा-जांभळाच्या लागवडीमागे व्यापारी उद्देश ठेवून इथे राहणारा संघ स्वयंपूर्ण होण्याच्या प्रयत्नात असावा. या जमिनीचे भाग, दिशा, गावांची नोंदही लेखात आहे. जमिनींशिवाय काही पैशांच्या स्वरूपातील देणग्याही यात नोंदवल्या आहेत. त्यांना ‘कार्षांपण’ असे म्हटले जाई. या देणग्या देणाऱ्यांमध्ये बांबूकार म्हणजे बुरूड, कास्यकार म्हणजे तांबट आणि सुवर्णकार म्हणजे सोनार असे विविध थरातील लोक आहेत. यातून या लेणीनिर्माणाला असलेला सामान्य जनतेचा पाठिंबाही दिसतो. *तत्कालीन महाराष्ट्रात ही अन्यधर्मीय वास्तुकला कोरली, रुजली व बहरली त्यामागे या सहभागाची मोठी भूमिका आहे. सहिष्णू आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या या खऱ्याखुऱ्या पाऊलखुणा आहेत.*_ *चैत्यगृहातील या ब्राह्मी (धम्म) शिलालेखांच्या मांदियाळीत एक फारसी लेखही आहे. महम्मद अली नावाच्या कुणा व्यक्तीने हिजरी ९८८ (इ. स. १५८०) या दिवशी या स्थळाला भेट दिल्याचा उल्लेख आहे. *आपण एखाद्या स्थळी जाऊन आलो, हे स्वत:चे नाव तिथे लिहून ठेवण्याचे जे ‘फॅड’ हल्ली प्रचलित आहे, ते असे बरेच जुने आहे तर!* _या चैत्यगृहानंतर ओळीने २७, २८ आणि २९ क्रमांकाच्या लेण्या (विहार) येतात. प्रत्येकी दोन खोल्यांचे हे विहार. पुढय़ात ओसरी. पण कालौघात तिचे खांब नष्ट झालेले. नाही म्हणायला तिसऱ्याच्या ओसरीतील या सालंकृत खांबांचे कलावशेष आणि भिंतीत एक भंगलेला स्मारक-स्तूप कसाबसा आपले अस्तित्व टिकवून आहे. पण या खोदकामापेक्षाही इथे लक्ष जाते ते त्यांच्या भिंतीवरील शिलालेखांकडे! त्यातही लेणे क्रमांक २७ वरचा लेख तर पाहण्यासारखाच! दोन्ही खोल्यांच्या मधोमध भिंतीवर एक घासून सपाट जागा केलेली आहे. या आडव्या पट्टीतच कुणा अज्ञात सुलेखनकाराने सुंदर अक्षरांत हा लेख कोरला आहे. सुरुवातीस स्वस्तिक, तर शेवटी श्रीवत्स ही शुभचिन्हे असलेला हा लेख असा- *_‘भारुकछकानं लंकुडियानं भातूणं अससमस पुताण_* _*बुधमितस बुधरखितस च बिगभं देयधंमं’*_ *अर्थ-* _भरुकच्छ म्हणजे आजच्या गुजरातमधील भडोच येथील अससमचे पुत्र बुधमित व बुधरखित या बंधूंनी या शैलगृहासाठी देणगी दिली आहे. हे दोघे लाकडाचे व्यापारी होते. भडोच हे तत्कालीन व्यापारी बंदर. तिथून निघालेले हे दोघे प्राचीन बाजारपेठ असलेल्या जुन्नरमध्ये आले आणि त्यांनी इथल्या लेण्यांसाठी हा दानधर्म केला आहे. म्हटले तर हा फक्त दानधर्माचा लेख; पण त्यातून तत्कालीन समाज, लोक, त्यांचे व्यवसाय, स्थळ, प्रवास, दळणवळण अशा कितीतरी गोष्टींची माहिती मिळते. म्हणूनच हे शिलालेख इतिहासाची साधने आहेत. एकूणात- लेणी काय किंवा कुठलीही ऐतिहासिक वास्तू काय, ते फक्त इतिहास सांगत नाहीत, तर त्यांच्या अभ्यासातून इतिहास, भूगोल, तत्कालीन समाज, लोक, भाषा, लिपी, चालीरीती, परंपरा अशा कितीतरी गोष्टी उलगडत जातात. शिलालेखांची ही परिभाषा हे न उलगडलेले जग दाखवतात._ _*या स्थळांना कुठल्याही धर्म-जाती-पंथाच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहण्यापेक्षा देशाचा वारसा म्हणून पाहिले पाहिजे. या वास्तू राष्ट्रीय संपत्ती समजून त्यांचे जतन व्हायला हवे. पण अनेकदा या वारशामागील देश-राष्ट्र ही भावना नाहीशी होऊन फक्त धर्म-पंथ तेवढे उरतात. स्थळांना देवत्व बहाल केले जाते आणि मग त्यातून खऱ्या इतिहासाला धोका निर्माण होतो. अंबा-अंबिका लेण्यातील शिल्पांनाही देवत्व बहाल झाल्याने त्यामागील राष्ट्रीय वारशाचा विसर पडून, या मूर्ती-शिल्पांवर हळद-कुंकवाचे थर जमा झाले आहेत. त्यातील अनेकांची झीज झाली आहे*_. *_काही ठळक बाबी_* *१)* _चैत्यगृहाच्या प्रवेशद्वारावर कोरलेले पिंपळपान बोधीवृक्षाची आठवण करुन देते._ *२)* _सम्राट अशोकाने आपली संपत्ती, आपली अपत्ये धम्मासाठी दान केल्यानंतर त्याच्याकडे असलेला शेवटचा आवळाही त्याने भिक्खूंना दान केला होता..तो आवळा लेण्यांच्या स्तंभांवर प्रतिकात्मक स्वरुपात कोरला गेलेला आहे. जो सगळ्याच लेण्यांवर आपल्याला पाहायला मिळेल.अष्टकोनी स्तंभ आपल्याला बुद्धाच्या अष्टांगिक मार्गाची आठवण करुन देतात._ *३)* _शिलालेखाच्या सुरुवातीला कोरलेला उलटा ओम् आणि स्वस्तिक ( भवचक्र ) ही बौद्ध धम्माची प्रतिके आहेत._ *४)* _कुठल्याही दगडाला हळदीकुंकु लावल्याने त्याचे दैवीकरण होत नसते..बुद्धरुपांना कीतीही हळदी कूंकु फासून त्याचे विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न झाला तरी शांत, ध्यानस्थ ,कुठल्याही आयुधाशिवाय निर्भय अवस्थेत कोरलेले बुद्धरुप आपल्या अस्तीत्वाची जाणीव करुन देते._ *_सूचना_* *या सर्व लेणी पाहण्यासाठी साधारणतः 3 तास लागतात.परंतु या लेण्या पाहताना शांतता बाळगणे महत्वाचे आहे. कारण येथील लेण्यामध्ये असलेल्या मधमाश्या कॅमेराच्या फ्लॅश व आपल्या आवाजाने उठतात व चावतात.* _*धम्माचा हा प्रवास अतिशय ऊर्जादायी तसेच न थकवणारा. ह्या अविरत चालणार्या.प्रवासातून आपल्याला गवसते ती शांतता, आणि ऊर भरुन यावा असा जाज्वल्य इतिहास....!!*_ *संकलन :- महेश कांबळे* *२९/११/२०२०* https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...