मित्रांनो,
सम्राट अशोक यांच्या काळी, संपूर्ण अफगाणिस्तान प्रदेश हा बौद्ध संस्कृतीने तळपत होता. आजही तेथील उत्खननात बौद्ध संस्कृतीचे अवशेष मिळतात. बामियान येथील जगातील सर्वात उंचीचे भ. बुद्धांच्या शिल्पाविषयी आजचा लेख
बामियानचे बुद्ध
काबुल पासून अडीचशे किमी वर असलेल्या रेशीम मार्गावरच्या बाल्ख प्रदेशाच्या रस्त्यावर आणि हिंदूकुश आणि कोह-इ-बाबा पर्वतरांगांच्या दरीमध्ये, अफगाणिस्तान मधील सर्वात प्राचीन सांस्कृतिक केंद्र वसले होते ज्याचे नाव होते "बामियान". तेथील स्थानिक "दरी" भाषेत, बामियानचा अर्थ होतो "प्रज्ञावंतांचे स्थळ". इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात, सम्राट अशोक यांनी या प्रदेशात बुद्धविचारांचा प्रसार करण्यासाठी बौद्ध आचार्य पाठविले होते. इथे अनेक विद्वान बौद्ध आचार्य आणि भिक्खू राहत असल्यामुळे हा प्रदेश "बामि-यान" म्हणून ओळखला जाऊ लागला. कालांतराने बौद्ध भिक्खू यांच्यासाठी येथील डोंगरात, विहारे कोरण्यात आली. कुशाणांच्या काळात बौद्ध धम्माची भरभराट झाली. चीन, भारत आणि रोम यांच्या दरम्यान होणार व्यापार हा रेशीम मार्गाने होत असल्याने, बामियान हे अफगाणिस्तान मधील एक महत्त्वाचे सांस्कृतिक, आर्थिक आणि धार्मिक केंद्र झाले आणि याचा पुरेपूर फायदा कुशाण राजांनी घेतला.
येथील पर्वतरांगांमध्ये जवळपास १००० बुद्ध लेणीं कोरल्या असून, अनेक स्तूप व विविध मुद्रांमधील बुद्धशिल्प येथे कोरले होते. मात्र ज्या कारणांसाठी बामियान जगप्रसिद्ध झाले ते येथील पर्वतांमध्ये कोरलेल्या दोन अतिभव्य बुद्धशिल्प जे जगातील सर्वात उंचीची शिल्प होती. ही शिल्पे अनुक्रमे १७५ आणि १२७ फूट उंचीची असून, तिन्ही बाजूने दगड कोरून, खोली सारख्या झालेल्या जागेत, कोरलेली होती. वातावरणातील बदलांमुळे या शिल्पांची झीज होऊ नये आणि ती अनंत काळ टिकावी हा त्यामागचा उद्देश होता. मोठ्या बुद्ध शिल्पाला येथील स्थानिक लोक "सूर्ख-बुत" म्हणजे “लाल बुद्ध” म्हणत कारण या बुद्धशिल्पावर लाल रंगाचा गिलावा लावला होता व चेहऱ्याच्या जागी सोन्याचा मुखवटा बसवलेला होता तर लहान बुद्धशिल्पाला "खिंग-बुत" म्हणेज “पांढरा बुद्ध” म्हणत कारण या शिल्पावर पांढऱ्या रंगाचा गिलावा लावला होता व चेहऱ्यावर तांब्याचा मुखवटा होता. पर्शियन कवींनी मोठ्या बुद्धशिल्पाला "बुत-ए-आरास्ते" म्हणजे सोने, चांदी व मौल्यवान दागिन्यांनी सजविलेले शिल्प असे वर्णन केले आहे. हुयान त्सांगने देखील या शिल्पाचे वर्णन करताना ते जडजवाहिराने नटवले असे म्हटले आहे. या दोन्ही शिल्पांच्या बाजूच्या आणि छतावरच्या भिंतींवर सुंदर नक्षीकाम तसेच उपासक-उपसिकांची चित्रे रंगविली होती. छतावर सुंदर भूमितीय बहुभुज आकृतीत अनेक रंगीत बुद्धप्रतिमा काढल्या होत्या. याव्यतिरिक्त या संपूर्ण पर्वतावर अनेक लहान मोठे विविध मुद्रांमधले बुद्धांचे शिल्प कोरले होते. चिनी बौद्ध आचार्य, फा-हियान हे चवथ्या शतकात येथे आले होते तर हुयान त्सांग हे सहाव्या शतकात येथे काही काळ राहिले होते. त्यांनी केलेल्या वर्णनानुसार, बामियान मध्ये त्याकाळी जवळपास २००० भिक्खू राहत होते. येथील बुद्धलेणींमध्ये जगातील सर्वात प्राचीन चित्रकला देखील पाहायला मिळते.
कट्टरपंथी तालिबान ज्यांचा उदय १९९० साली झाला होता, त्यांनी पुढील दहा वर्षात, ९०% अफगाणिस्तानचा ताबा घेतला आणि इस्लामच्या नावाखाली संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये हैदोस घालायला सुरुवात केली. २७ फेब्रुवारी २००१ रोजी, मुल्ला मोहमद ओमर याच्या आदेशानुसार, तालिबानने या अद्वितीय बुध्दशिल्पांना नष्ट करण्याचे जाहीर केले. संयुक्त राष्ट्रसंघ, दलाई लामा, पाकिस्तानचे तत्कालीन प्रमुख परवेझ मुशर्रफ आणि जवळपास सर्वच राष्ट्रप्रमुखांनी तालिबानला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर अरब देशातील जेष्ठ आणि प्रख्यात धर्मप्रचारक शेख फरीद वस्सेल, शेख मुहंमद अल-रवी आणि शेख युसूफ अल-कर्झवी यांनी कराची मध्ये जाऊन तालिबान प्रमुखांची भेट घेऊन त्यांना हा विध्वंस रोखण्याचे आवाहन केले. जपानने हे बुद्धशिल्प सुरक्षित राहावीत म्हणून तालिबानला हवी ती रक्कम देऊ केली होती, मात्र तालिबान नेत्यांनी ते मान्य केले नाही.
२ मार्च २००१ रोजी, तालिबानांनी मशीन गन, रणगाडे यामधून गोळ्या व तोफांचा भडीमार केला, मात्र बुद्धशिल्पांची थोडीच हानी झाली. तालिबानांनी हाजरा नागरिकांना कैदी केले होते. यांपैकी होता सव्वीस वर्षांचा मिर्झा हुसेन. यावेळेस तालिबानांनी ट्रक भरून डायनामाईट आणि रॉकेट लाँन्चर आणले होते. मिर्झा सांगतो कि सर्व बंदिवान तीन दिवस बुद्धशिल्पांच्या पायाभोवती डायनामाईट पेरत होते. जेव्हा ते उडवले तेव्हा प्रचंड धूर झाला आणि तालिबानांची इच्छा होती कि संपूर्ण पर्वत कोसळेल, मात्र बुद्धशिल्पांचे फक्त पायच नष्ट झाले. पुढील २०-२५ दिवस सर्व बंदिवान शिल्पाभोवती खड्डे करून डायनामाईट पेरत होते. एक महिन्याच्या परिश्रमानंतर व रॉकेट आणि डायनामाईट यांच्या माऱ्याने, जगाचे वैभव असलेले हे बामियान बुद्धशिल्पे नष्ट झाली. सध्या सायकलचे दुकान चालविणारा मिर्झा म्हणतो, "मला आयुष्यभर या घटनेचा पश्चाताप होत राहणार. ज्या बुद्धशिल्पांमुळे आमची रोजीरोटी चालत होती, त्यांनाच माझ्या हाताने उडविणे हे दुःखदायक होते. मात्र मी ते केले नसते तर मला त्यांनी गोळी घातली असती".
तालिबान अतिरेक्यांनी बामियानचे जगविख्यात बुद्धशिल्पांबरोबरच तेथील अनेक स्तूप, लेणीं आणि प्राचीन बांधकामे नष्ट केली. अफगाणिस्तान मधील हद्दा, बेग्राम, तील्ल्या टेपे या ठिकाणी उत्खननात सापडलेल्या हजारो शिल्प, प्राचीन वास्तू, हस्तिदंतातील कोरीव शिल्पे, शेबेरघन येथे सापडलेले कुशाणकालीन सोन्याचे दागिने हे काबुल संग्रहालयात ठेवल्या होत्या तर कुशाणांची अनेक नाणी आणि चित्रे हद्दा येथे ठेवण्यात आली होती. तालिबानने बामियान, काबुल आणि हद्दा येथील संग्रहालयावर हल्ला करून सर्व प्राचीन वस्तू लुटल्या ज्यांची नंतर पेशावर, लंडन आणि दुबई मध्ये विक्री करण्यात आली. बामियान येथील बोधिसत्वांचे शीरशिल्प हे न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझियम मध्ये पाहायला मिळते. बामियान येथील १००० बुद्धलेणीं मध्ये तालिबान आणि आयसिस अनेक वर्षे राहत होते. त्यांच्या मशालींच्या धुराने या लेणींमधली जवळपास सर्वच चित्रे नष्ट झाली आहेत. बामियान पासून जवळच असलेली सुर्ख-कोताल आणि अली खानुम या कुशाण कालीन इमारती, तालिबानांनी बुलडोझरच्या साह्याने नष्ट केल्या. यात ठेवलेल्या कुशाण राजांची अनेक प्राचीन चित्रेही नष्ट झाली.
तसे या प्राचीन बुद्धशिल्पांवर अनेकवेळा हल्ले झाले होते. १२२१ मध चंगेज खान याने या शिल्पांवरचे सर्व दागिने, सोन्याच्या माळा, जडजवाहीर लुटले होते. १५२८ यामध्ये बाबरने हे शिल्प नष्ट करण्याचे आदेश काढले होते. औरंजेबाने देखील हे शिल्प तोडण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेस त्याचे सैन्य फक्त पायांनाच इजा पोहचवू शकले. १८व्या शतकात पर्शियन राजा नादर अफशार याने देखील या शिल्पांवर तोफगोळे डागले होते. मात्र कधीकाळी महमूद गजनी याच्या सैन्याने या बुद्धशिल्पांच्या पायांशी विश्राम करीत, भारताकडे कूच केली होती. सोमनाथ लुटणाऱ्या गजनीने येथील बुद्धशिल्पे अथवा येथील अनेक शिल्पांना हात देखील लावला नाही! येथील वांशिक दंगलींच्या काळात, बामियान हे हज्ब-ए-वाहदत या संघटनेचे मुख्यालय होते. त्यांचा मोहरक्या, अब्दुल अली मझारी हा कट्टर धार्मिक होता, मात्र असे असून देखील त्याने येथील बुद्धलेणींची अथवा शिल्पांची नासधूस केली नाही, उलट त्याचे सैनिक येथे पहारा द्यायचे.
एका राजनीतितज्ञाच्या मते, बामियान मध्ये हाजरा या पंथाचे लोक राहतात ज्यांना तालिबानी पश्तून लोकांचा विरोध आहे. यातूनच वांशिक युद्ध झाले ज्यात हाजरा लोकांचे प्रमुख उत्पन्नाचे साधन असलेली ही बुद्धशिल्पे नष्ट करण्यात आली.
कोणत्याही कलाप्रेमीला तालिबानच्या या कृत्याने अस्वस्थ केले असणार. ही अस्वस्थता त्यांनी आपल्या कलेतून व्यक्त केली. जगभरातील अनेक साहित्यकारांनी विशेषतः कवींनी, बामियान बुद्धशिल्प नष्ट झाल्यानंतर आपल्या काव्यातून हळहळ व्यक्त केली आहे. यात अमेरिकेचा कर्क लुम्पकिन, पोलंडची कॅरेन कोवासिक, श्रीलंकेचा असोका वीरासिंघे, स्कॉटलंडचा चार्ल्स कॅमेरून, चीनची शिन-यु-पै, जॉन वेशीक, आयर्लंडचा दोनल डिम्पसें, कॅनडाची इवा साल्झमन, टॉम स्यावेज, जाकार्ताचा अमोल टायटस, भारताचा प्रवीण गढवी व आर.पार्थसारथी तर बामियानचा लेखक झालमे बाबाकोही यांनी दरी भाषेत लिहिलेली "खाक-ए-बुत" ही कथा या अतिशय हृदयस्पर्शी आहेत. स्विझर्लंडचा क्रिस्टिअन फ्रेई, इराणची हाना मखमलबाफ, ब्रिटनचा फिल ग्राबस्की, अफगाणिस्तानचा हुसेन अली युसुफी किंवा हेरातचे मोनीरेह हाशेमी यांनी बामियान बुद्धशिल्पांवर माहितीपट बनविले जे जगभर गाजले.
गेल्या महिन्यात, जगातील या अद्वितीय बुद्ध शिल्पाला नष्ट करण्याच्या घटनेला पंचवीस वर्षे झाली. दर वर्षी एप्रिलमध्ये बामियानचे हाजरा पंथाचे लोक या बुद्धशिल्प नष्ट झालेल्या ठिकाणी येतात आणि फुले वाहतात. ज्या बुद्धशिल्पांच्या पायाशी त्यांच्या कैक पिढ्या वसल्या, ज्या शिल्पांमुळे जगाला त्यांची ओळख झाली, त्या मोकळ्या झालेल्या जागेत, मात्र मनात कोरलेल्या "बामियानच्या बुद्धांना" ते आदरांजली वाहतात.
आश्चर्य या गोष्टींचे वाटते कि पृथ्वीवरील सौंदर्य व्यक्त करणाऱ्या कथा, काव्य, निसर्ग, प्रेम, संगीत आणि चित्रे व शिल्पे अशा सुख प्रधान करणाऱ्या गोष्टींना विरोध करणारे तालिबान, मात्र याच मरणोत्तर सुखाच्या अपेक्षेने 'जिहाद' करून, या सौंदर्यपूर्ण गोष्टी कशा नष्ट करू शकतात?
अतुल मुरलीधर भोसेकर
९५४५२७७४१०
No comments:
Post a Comment