*_हळदी परंपरा आणि लग्न_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2025/02/blog-post_66.html
भारतीय समाजात लग्न या शब्दाला पवित्र संस्कार, मंगल कार्य समजले जाते. बौद्ध परंपरेत याला मंगल परिणय कार्य म्हंटले आहे. या कार्याला मंगल का म्हंटले जाते कारण विवाह म्हणजे स्त्री - पुरुष एकत्र येणे एवढेच नाही तर यांमुळे दोन परिवार एकत्र येतो. स्त्री - पुरुषांच्या सहवासामुळे एका नव्या बीजाचा जन्म होतो. पण हेच मंगल कार्य आज विस्कळीत झाल्याचे दृश्य दिसत आहे. आजकाल बरीच विवाह हे तुटण्याच्या मार्गावर आहेत. भारतात इतर देशांच्या तुलनने घटस्फोटाचे प्रमाण जगात सर्वात कमी आहे फक्त १%. कदाचित मंगळसूत्र हे भारताच्या सांस्कृतिक मुळांमध्ये असल्याने असे असावे.
_लग्नाच्या आधी गुणकारी हळद नवोदित वधू वरांना लावण्याची परंपरा कधी सुरू झाली हे नेमके सांगणे अवघड आहे. एका शुद्ध हेतूने सुरू झालेली ही परंपरा पण आज त्याला चुकीच्या पद्धतीची जोड लागली आहे. *गुणकारी हळद लावण्याची परंपरा ही चांगली होती आणि आहेच.* भावी आयुष्याची सुरुवात करतांना एक आनंद म्हणून हळद खेळली जाते आणि त्यात सर्व परिवार (दोन्ही बाजूचा), मित्र मंडळी एक नवोदित जोडपे भावी आयुष्याची सुरुवात करतांना ते मनमुरादपणे आनंदाचा क्षण साजरा करीत असतात. आणि हा आनंद त्यांच्याकडून सध्या खेचला जात आहे अशी परिस्थिती निर्माण होत आहे, *काही स्वयंघोषित पुढारी हळदी परंपरा बंद करा असे म्हणताना दिसतात. _बौद्ध म्हणून मिरवणाऱ्यांनी कोणत्याही गोष्टींचा अतिरेकी विरोध करण्याचा आटापिटा करण्यात खरेच काहीही अर्थ नसतो. एकतर, जे बौद्ध म्हणवून घेतात, परंतु त्यांचा बौद्ध धम्माविषयी अभ्यास तर काडीचीही नसतो, अशांच लोकांमध्ये हा धार्मिक कडवेपणा दिसून येतो. पण खाली उल्लेखिलेल्या बौद्ध परंपरेबद्दल ते अवाक्षर ही काढत नाही.... काढणार तरी कसे मुळात बौद्ध परंपरा या लोकांना अजून कळलीच नाही.*_
_मंगळसूत्र हे केवळ पत्नीच्या गळ्यात घालण्याचे अलंकार नाही तर भगवान बुद्धांनी गृहस्थांना दिलेला तो एक उपदेश आहे - महामंगल सुत्त - ज्यामधील एक गाथेत भगवंत सांगतात :_
*_माता-पितु उपट्ठानं पुत्तदारस्स सङ्गहो।_*
*_अनाकुला च कम्मन्ता, एतं मङ्गलमुत्तमं।।_*
*_आईवडिलांची सेवा करणे, पत्नी आणि मुलांची काळजी घेणे आणि कुटुंबाचे नाव खराब होईल अशा गोष्टी न करणे - एतं मंगलमुत्तम - हे सर्वोत्तम मंगल आहे._*
_डॉ बाबासाहेब आंबेडकर श्री व्ही एस कर्डक यांना दिनांक ०४/१२/१९५६ च्या पत्रात म्हणतात, बौद्ध विवाह सोहळा साधा असतो. येथे होम नाही आणि सप्तपदी नाही. या समारंभाचे सार म्हणजे *वधू आणि वर यांच्यामध्ये स्टूलवर नवीन बनवलेले मातीचे भांडे ठेवणे आणि ते पाण्याने भरणे. वधू आणि वराने भांड्याच्या दोन्ही बाजूंना उभे राहावे. त्यांनी पाण्याच्या भांड्यात कापसाचा दोरा ठेवावा आणि प्रत्येकाने त्यांच्या हातात धाग्याचे एक टोक धरावे. कोणीतरी महामंगल सुत्त गायले पाहिजे. वधू आणि वर दोघांनीही पांढरे कपडे घालावेत.* याठिकाणी बाबासाहेब मंगल सुत्ताला लग्न विधीचा आवश्यक भाग मानीत होते सोबत *उपासकांना सुद्धा पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्यास सांगत आहेत.*_
_भगवंतांनी गृहस्थ उपासकांसाठी अडतीस मंगल गोष्टी सांगितल्या आहेत ज्यांना महामंगल सुत्त म्हणतात. *बौद्ध काळात, लग्नाच्या वेळी प्रत्येक गृहस्थांना हे मंगळसूत्र शिकवले जात असे.*_
_हा शुभ धागा नातेसंबंधांना अतूट ठेवतो. *दीक्षा देताना किंवा इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये उपासक-उपासिकेच्या हाताच्या मनगटावर परित्त सुत्त अर्थात परित्राण सुत्त म्हणजेच रक्षा सुत्त बांधण्याची बौद्ध परंपरा आहे. हे सुत्त बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नाची उठता, बसता, झोपता आठवण राहावी म्हणुन बांधले जायचे जेणेकरुन या त्रिरत्नाच्या आठवणीने मन जागृत राहून त्याचे जास्तीत अनुसरण केल्या जावे. यालाच परित्त सुत्त म्हंटले जात असे.*_
_पण कालांतराने लोक भगवंतांनी सांगितलेले महामंगल सुत्त विसरले, ज्याचे दूषित रूप आजही गळ्यात मंगळसूत्राच्या स्वरूपात आढळते._
_लग्नविधी उरकल्यानंतर भगवान बुद्ध किंवा भिक्खू संघाकडून आशिर्वाद घेण्याचे, वधू वरांना शुभेच्छा देण्याचे प्रसंग त्रिपिटकात सापडतात. परंतु भगवान बुद्ध किंवा भिक्खू संघाकडून एकही लग्न विधी पार पाडण्याचा प्रसंग आत्तापर्यंत कुठेच दिसत नाही. यामुळे हे सिद्ध होते की, *भगवान बुद्धांच्या वेळी भिक्खू लग्नविधी पार पाडत नव्हते. कदाचित लग्नविधी पार पाडण्याचे काम हे उपासक करीत होते.*_
_भारतीय बौद्धांमध्ये लग्न होण्यापूर्वी एक परंपरा होती... ती म्हणजे लग्न घरात परित्राण पाठ आयोजित केला जात असे. त्या विधीत नियोजित वर आणि वधूला भावी आयुष्य कसे व्यतीत करायचे याबद्दल दोघांनाही आणि सोबत त्यांच्या घरातील मंडळींना त्याबद्दल शिकवण दिली जायची._
_उदा. भगवंत *सिगात सुत्तामध्ये* सिगालास पती पत्नीची कर्तव्ये समजावून सांगतात.... भगवंत म्हणतात :-_
_पतीला पाच प्रकाराने पत्नीची सेवा केली पाहिजे._
१. तिचा सन्मान करून,
२. तिला अपमानित न करून.
३. व्यभिचार न करून,
४. तिला ऐश्वर्य-प्रभुत्व प्रदान करून,
५. तिला अलंकार-आभूषणाने सजवून
_ह्या प्रकाराने पत्नी पाच प्रकाराने पतीवर अनुकंपा करते._
१. गृह-संचलनाचे कर्तव्य उत्तम प्रकाराने पूर्ण करते.
२-३. स्वजन-परिजन, नोकर-चाकरांना उत्तम प्रकारे प्रसन्न-संतुष्ट ठेवते.
४. व्यभिचारिणी होत नाही.
५. सर्व घरगुती कामात आळस न करता दक्ष राहते.
_ह्या वरील पाच प्रकाराने सेवित झाल्यावर पश्चिम दिशा रूपी पत्नी पतीवर पाच प्रकाराने अनुकंपा करते व अशा प्रकारे पश्चिम दिशा त्याच्यासाठी योगक्षेमपूर्ण होते._
_भगवंतांचा हा उपदेश आपल्याला *सुत्तपिटकातील दिघनिकाय या ग्रंथातील पाथिक वग्गातील सिंगाल सुत्तातील छद्दिसापटिच्छादनकण्डामध्ये* वाचावयास मिळतो._
*_हीच ती पतीची आणि पत्नीची कर्तव्ये आहेत, जी विवाह प्रसंगी वधुवरांकडून वदवून घेतली जात असत. त्याला प्रत्यक्ष भगवंतांच्या उपदेशाचा संदर्भ आहे._*
उग्गह सूत्तामध्ये भगवंत ज्या कुमारी मुलींचा विवाह ठरला आहे अशा मुलींची कर्तव्ये सांगतात...... एकदा मेंडक याचा नातू उग्गह भगवंतांना भोजनाचे निमंत्रण द्यावयास आला आणि दुसऱ्या दिवशी भोजन संपल्यावर आपल्या मुलींना उपदेश द्यावयाची त्याने भगवंतांना विनंती केली. भगवंतांनी उपदेश केला,
१. "मुलींनो! तुम्हाला ज्या पतीला मातापिता सोपवून देतील, त्याच्या आधीच सकाळी उठत जावे, झोपायला नंतर जावे, प्रत्येक काम मन लावून कराल. सर्व वस्तूंना व्यवस्थित ठेवाल. सर्वांशी गोड बोलाल, आणि या सर्व सवयी आतापासूनच लावून घ्या."
२. "हादेखील अभ्यास करा की तुमच्या पतीचे मातापिता, सखेसोयरे व साधुसंत, जे कोणी घरी येतील, त्यांचा तुम्ही आदरसत्कार कराल, स्वागत कराल, त्यांना बसायला स्थान आणि प्यायला पाणी द्याल."
३. पतीचे जे कांही काम असेल ते दक्षतेने कराल, त्याला यशस्वितेने करावयाचे कौशल्य मिळवाल, जेणेकरून ते काम तुम्ही स्वतःच करू शकाल.
४. "जेवढे नोकरचाकर असतील त्या सर्वांच्या कामाकडे लक्ष द्या की कोणी किती काम केले आणि किती करायचे ठेवले. आजाऱ्यांची सुश्रूषा कराल आणि त्यांना योग्य असे भोजन द्याल."
५. "जे रुपये पैसे, जे धन, जे सोनेचांदी पती घरी आणतील त्याला सुरक्षित ठेवाल, त्याची हिफाजत कराल."
अशाप्रकारे भगवंत नवोदित विवाहायोग्य कुमारिकांना उपदेश करतात.
_एका सूत्तामध्ये भगवंत पती - पत्नीच्या ४ प्रकारच्या जोड्या सांगतात. या ४ जोड्यांपैकी आपली जोडी कोणती असावी आणि त्यासाठी कोणते आचरण असावे याबद्दल अश्या कार्यक्रमांमधून मार्गदर्शन करण्याची परंपरा होती._
*_चार प्रकारचे सहवास_*
_"गृहपतींनो! चार प्रकारचे सहवास असतात. कोणते चार ?_
_*१. शव शवाबरोबर सहवास करते.*_
_*२. शव देवीबरोबर सहवास करते.*_
_*३. देव शवाबरोबर सहवास करतो.*_
_*४. देव देवीबरोबर सहवास करतो.*_
*(अङ्गुत्तरनिकाय १.४.५३-५४, पटमसंवाससुत्त)*
*_अंगुत्तरनिकाय मधील चवथ्या प्रकरणांत भगवंत बहूपतित्वाच्या किंवा बहूपत्नित्वाच्या रुढीला अज्ञानपूर्ण आणि वासनोत्तेजक असे संबोधतात._*
_नवोदित विवाहितेने सासरी कसे वागावे याबद्दल *विशाखा या उपासिकेचे जीवन चरित्र अभ्यासताना* माहिती मिळते. त्यामद्ये विशाखेचे वडील आपल्या मुलीला दहा गोष्टींचे पालन करण्यास सांगतात. *ह्या अशा मार्गदर्शनामुळे विशाखा पुढे जाऊन मिगारमाता विशाखा म्हणून ओळखली जाऊ लागली.*_
_भगवंत *"पराभव सूत्तात"* गाथा क्रमांक १६, १८, २०, २२ मध्ये पराभवाचे कारण सांगताना..._
स्त्री, सुरा आणि जुगार या व्यसनात सापडून जो मिळालेली संम्पति पुनःपुनः घालवितो । ते त्याच्या पराभवाचे कारण होय ।।१६।।
स्वस्त्रीने संतुष्ट न होता जो वेश्यांशी अणि परस्त्रीयांशी संबंध ठेवतो तो (त्याच्या) पराभवाचे कारण होय ।।१८।।
वयातील पुरुष तरुण स्त्रीशी लग्न करितो व तिच्या इर्षेने निजत नाही । ते (त्याच्या) पराभवाचे कारण होय ।।२०।।
दुर्व्यसनी आणि उधळ्या स्त्रीला किंवा तशाच पुरुषाला जो अधिकार जागेवर नेमतो । ते (त्याच्या) पराभवाचे कारण होय ।।२२।।
_*नवोदित वधू आणि वर हे भावी आयुष्याची सुरुवात करण्यापूर्वी गोंधळलेले असतात, त्यांना पुढील आयुष्यात काय करायचे आहे हे नेमके माहित नसते तेंव्हा विवाहाच्या पुर्वसंध्येला जिथे हळदीच्या कार्यक्रमात जो अन्य आधुनिक कार्यक्रम म्हणजेच नशापान सारखा कार्यक्रम आयोजित करून वेळ आणि पैसा उधळला जातो तिथे बौद्धाचार्य / धम्ममार्गावर आरूढ असणारे उपासक अशा प्रकारच्या बुद्ध उपदेशांचा आधार घेवून वधु-वरांना समुपदेशन करू शकतात. तसा प्रयत्न प्रत्येक धार्मिक संघटनेने हळदी संभारंभात करायला हवा आणि नेमके तेंव्हाच बुध्दांच्या धम्ममय मार्गाने, बाबासाहेबांनी दाखविलेल्या दिशेने नवोदित वधू वर आपले आयुष्य आनंदाने सुखाने जगू शकतात. पण जसे वर उल्लेखिले आहे की, ह्या स्वयंघोषित पुढाऱ्यांना बौद्ध संस्कृती माहित नसल्याने ते फक्त हळदीला विरोध करतात... जर त्यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमांना राबविन्याची जबाबदारी घेतली तर बौद्ध संस्कृती टिकून राहण्यास मदत होईल.*_
_पण जिथे खुद्द डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कर्डकांना लिहिलेल्या पत्राला केराच्या टोपलीत टाकले गेले. भगवंतांच्या मुखातून निघालेल्या बुद्ध वचनांना म्हणजेच त्यांनी सांगितलेल्या वधू - वरांच्या कर्तव्यांना संस्कार विधितून बगल दिला जाताना दिसत आहे. तेथे हे असले समुपदेशन कसे करता येईल? परित्राण पाठाचे कार्यक्रम आयोजित केले जातील?_
_जर या देशाने भगवान बुद्धांचे महामंगल सुत्त सोबत इतर सुत्तांचा परिचय वधू वरांना विवाहापूर्वी समजावून सांगितला, बौद्ध समाज लग्नाला मंगल कार्य मानतो. वैवाहिक जीवन फक्त उपभोग घेण्यासाठी नसून दान, ध्यान, धम्म इत्यादि मंगल कार्य संपादन करण्यासाठी सुद्धा आहे. हे सर्व सांगून नवोदित वधू वरांना लग्न होण्याच्या आधी *हळदी संभारंभासोबत परित्राण पाठाचे आयोजन करून* त्यांचे व्यवस्थित समुपदेशन केले, त्या दोघांच्या मनाची तय्यारी करून घेतली तर त्या दोघांचे सोबत त्या दोघांच्या परिवाराचे पर्यायाने समाजाचे भविष्यात सदैव मङ्गलच होईल.
लेखक :- आयु महेश कांबळे
संदर्भ :-
१ सुत्तपिटकातील दिघनिकाय या ग्रंथातील पाथिक वग्गातील सिंगाल सुत्तातील छद्दिसापटिच्छादनकण्ड
२ अङ्गुत्तरनिकाय १.४.५३-५४, पटमसंवाससुत्त
३ महामङ्गल सुत्त
४ भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
५ डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित श्री व्ही एस कर्डक यांना दिनांक ०४/१२/१९५६ चे पत्र
६ मैत्री संपूर्ण धम्म आहे - राजेश चंद्रा
७ विशाखा सूत्त
८ पराभव सूत्त
८. सूत्तपिटक, अंगुत्तरनिकाय, पञ्चकनिपातपाळी, ४ सुमनवग्ग, ३ उग्गहसुत्त
No comments:
Post a Comment