Monday, 10 February 2025

मनाला वश कसे करावे?

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_मनाला वश कसे करावे?_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/02/blog-post_10.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

(पूज्य गुरुदेव श्री सत्यनारायण गोयन्काजीद्वारा पश्चिम महाराष्ट्राच्या प्रसिद्ध नाशिक शहरातील 'रमाबाई आंबेडकर गर्ल्स हायस्कूलच्या प्रांगणात सन १९९८ मध्ये दिलेल्या तीन दिवसांच्या प्रवचन मालिकेतील दुसऱ्या प्रवचनाचा दुसरा भाग.)

_खूप पद्धती असतात मनाला वश करण्याच्या. भारत तर आध्यात्माचा इतका जुना देश आहे, किती प्रकारच्या विद्या या देशात जन्मल्या, वाढल्या, विकृत्त झाल्या, नष्ट झाल्या. एक खूप सरळ व बहुप्रचलित प्रकार आहे एखाद्या शब्दाला पुन्हापुन्हा म्हणणे. हे घड्याळ बांधले आहे तर वारंवार घड्याळ-घड्याळ, घड्याळ-घड्याळ, घड्याळ-घड्याळ असे म्हणत जा, मन एकाग्र होत जाईल. जसे आई बाळाला अंगाईगीत ऐकवते राजा बाळा झोप रे, राज बाळा झोप रे आणि हे ऐकत ऐकत तो खरोखर झोपतो. त्याचे मन झोपी गेले, तसेच आपल्या मनाचे होते. *पण कोणी घड्याळ-घड्याळ कसे म्हणेल, त्यात काय रस आहे ? तेव्हा आमच्या येथील संत म्हणाले, बरे भाऊ! ज्या देवीत. इष्टदेवात, ईश्वरात, परमात्म्यात, संत पुरुषात वा गुरुत, ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे त्याचे नाव पुन्हापुन्हा घ्या. त्यासोबतच हेही सांगितले की याचे नाव वारंवार घ्याल तर मुक्त व्हाल.*_

_कोणत्याही शब्दाला वारंवार म्हणाल तर मन एकाग्र होणे सुरु होईल. एकाग्र होईल तर त्याला सुधारण्याचे पुढचे पाऊल उचलाल. ही एक पद्धत आहे जी जुन्या काळापासून चालत आहे, आजही चालते. मनाला एकाग्र करण्याची अजून एक पद्धत आहे एखाद्या वस्तूला पाहावे, मग डोळे बंद करावेत. पुन्हा पाहावे, पुन्हा डोळे बंद करावेत. काही दिवसानंतर असे होऊ लागते की बंद डोळ्यांसमोर ती वस्तू प्रकट होऊ लागते. तर *समजवणाऱ्यांनी समजावले की ज्या देवी, देवता. ईश्वरामध्ये... तुमची खूप श्रद्धा आहे त्याची मूर्ती समोर ठेवा व पाहात जा, मग डोळे बंद करा, असे करत करत ती मूर्ती बंद डोळ्यासमोर येऊ लागेल. बस, ध्यान करण्याचा मार्ग मिळाला.* अजून एक पद्धत होती जोरात एखादी मोठी घंटा वाजवा, त्याचा आवाज येईल. आवाजाला ऐकत राहा, ऐकत राहा. आवाज बंद झाल्यावर पुन्हा घंटा वाजवा, पुन्हा ऐकत राहा. अरे, या प्रकारची पुष्कळ आलंबन असतात ज्यांच्या आधारे मनाला एकाग्र केले जाऊ शकते._

_परंतु भारताची जुनी विद्या विपश्यना या आलंबनांचा स्वीकार करत नाही. कारण चित्ताला एकाग्र करणे व याला निर्विचार करणेच हिचे अंतिम लक्ष नाही. *हिचे अंतिम लक्ष आहे चित्ताला निर्विकार करणे.* निर्विचार होणे चांगले आहे, आम्हाला खूप लाभकारक होईल, परंतु अंतिम लक्ष निर्विकार होणे आहे, ज्यामुळे विकारांपासून चित्त पूर्णपणे निर्मळ होईल तिथे पोहोचण्यासाठी आम्हाला असे आलंबन पाहिजे जे आम्हाला त्या अवस्थांपर्यंत पोहोचवेल, जिथे विकार उत्पन्न होतात. त्यांच्या मुळांपर्यंत पोहोचवेल. ज्यामुळे विकारांपासून सहजपणे आमची सुटका होईल. त्यामुळे या विद्येत जे आलंबन दिले गेले ते आपल्या सहज स्वाभाविक श्वासाचे._

_*श्वासाची कसरत नाही, बस जसा येत आहे, जात आहे, तटस्थभावाने त्याला जाणावयाचे आहे. जोरात असेल तर त्याला हळू करावयाचे नाही, खोल असेल तर उथळ करायचा नाही, उथळ असेल तर खोल करायचा नाही. त्याच्यात कुठलाही हस्तक्षेप करायचा नाही. जसा असेल तसच जाणायचा.*_

_हे आलंबन चित्ताला एकाग्रही करेल व चित्ताला त्या अवस्थेपर्यंत पोहोचवेल जिथे विकारांची उत्पत्ती होते. कसे पोहोचवेल ? काम करत-करत खूप समजेल, कारण सर्व मार्ग आपल्या आत काय होत आहे, याला समजण्याचा आहे. आम्ही आपल्या मनाला एखाद्या भ्रमात ठेऊन एकाग्र करु, एखाद्या काल्पनिक आलंबनात नेऊन एकाग्र करु तर चांगले होईल, वरवरचे मन शांत होईल, परंतु आत अंतर्मनाच्या सखोलतेत जो स्वभाव बनला, behavior pattern बनला, त्याला कसे तोडायचे ? तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला असे साधन पाहिजे ज्याचा संबंध आमच्या मनाच्या सखोलतेपर्यंत असेल. त्यामुळे श्वास जसा येत असेल, तसाच त्याला जाणा. आला तर आला, गेला तर गेला. करायचे काहीच नाही. न श्वासाची कसरत करायची, न प्राणायाम, न कोणताही अन्य उपक्रम. बस जसा येतो-जातो आहे, आम्ही तटस्थभावाने पाहतो आहोत. जणू आम्ही तटावर बसलो आहोत, तटावर स्थित आहोत व नदी वाहत आहे. नदीच्या प्रवाहात आम्ही हस्तक्षेप करत नाही. आम्ही तिला न जोरात करतो. न हळू करतो, जशी आहे तशी आहे, आम्ही तटावर बसून पाहात आहोत._

_आम्ही आपल्या मनाला इथे लावले व पाहात आहोत, अनुभव करत आहोत. श्वास येत आहे, जात आहे. दीर्घ आहे, छोटा आहे... अरे, यापेक्षा सोपे काम अजून कोणते असेल? हा तर आमच्या सोबत नेहमी राहातो. जेव्हापासून जन्मलो आहोत, जेव्हापर्यंत मृत्यू येत नाही, तोपर्यंत हे आलंबन आमच्या सोबत आहे. जेव्हा इच्छा असेल तेव्हा श्वासाला जाणणे सुरु करा. खूप चांगले आहे, कोणतीही मेहनत नाही, परिश्रम नाहीत. जेव्हा कधी हिंमत करुन, निर्णय करुन १० दिवसांसाठी एखाद्या विपश्यना शिबिरात याल तेव्हा पाहाल, अरे, हे तर खूप कठीण काम आहे बाबा. केवळ श्वास येत आहे, जात आहे यालाच जाणायचे होते आणि हेही इतके कठीण, दोन श्वासही पाहू शकणार नाही की मन पळून जाईल. मग शुद्ध येईल, अरे कुठे पळाले. तुला श्वास पाहायला बसवले होते बाबा, श्वास पाहा ना, यात काय अडचण आहे तुला, अजून काहीही करायचे नाही._

_जसे कोणी तटावर बसून पाहात आहे, नदी वाहत आहे, तसेच येथे तुम्हाला श्वासाचा प्रवाह पाहावयाचा आहे. पण पाहू शकणार नाही. दोन श्वासही पाहिले नाही की पळून जाईल. पुन्हा पळेल.... तर बिचारे नवीन-नवीन साधक, नवी-नवी साधिका घाबरते. ते आपल्या मार्गदर्शकाकडे जातात काय करावे, मन टिकतच नाही. तेव्हा शिकवणारा म्हणतो - नाही, व्याकुळ व्हायचे नाही._

_आपल्या मनावरच क्रोध करु लागलात, अरे, कसे मन आहे ? श्वास पाहायचा आहे, तोही पाहू शकत नाही. कसे हे मन? अरे नाही, आपल्या मनावर क्रोध नाही करायचा, क्रोध कराल तर व्याकुळ व्हालच, मग क्रोध स्वतःवर कराल अथवा इतरांवर, या स्थितीचा स्वीकार करा. या वेळेचे सत्य हे आहे की माझे मन भटकले. बस, पुन्हा सुरु करा. पुन्हा श्वासावर आणा. पुन्हा भटकले, पुन्हा स्वीकारले.... या प्रकारे काम करता-करता पुष्कळशी रहस्य उलगडतात स्वतः बाबतची. लक्ष हेच आहे की आपल्या स्वतःला जाणा._

_बाहेरच्या सत्यांना पाहात राहाल तर आपल्या स्वतःला जाणू शकणार नाही. आपल्या स्वतःला जाणू शकणार नाही तर सर्व जीवन भ्रम, भ्रांतीत निघून जाईल. त्यामुळेच भारताचा एक संत म्हणतो-_

*_बाहर भीतर एको सच है, यह गुरु ज्ञान बताई रे।-*

_कोणी सदगुरु असेल तर तो हेच ज्ञान सांगेल की बाहेर व आत सत्य एकच आहे. निसर्गाचा जो नियम बाहेर काम करतो तोच आत काम करतो. परंतु,_

*_जनि नानक बिन आपा चीड़े, कटे न भ्रम की काई रे।_*

_नानक समजला, पुस्तक वाचून बोलत नाही, प्रवचन ऐकून वा केवळ चिंतन-मनन करून म्हणत नाही. आपल्या अनुभूतीने जाणले. तेव्हा म्हणतो *जनि नानक विन आपा चीद्धे* आपल्या स्वतःला ओळखल्याविना भ्रम संपणार नाही, भ्रांती संपणार नाही. सर्व जीवन भ्रांतीत निघून जाईल._

_*आपल्या स्वतःला यासाठी जाणणे आवश्यक आहे की आत विकारांची उत्पत्ती कशी होते व संवर्धन होत होत कसे हे विकार आमच्या डोक्यावर चढतात. हे सारे काही का होते, कसे होते व याच्या बाहेर कसे निघता येईल? या सर्वांना पाहाण्यासाठी अंतर्मुखी होत आहोत.*_

_श्वास पाहाता पाहाता सत्य प्रकट होऊ लागेल. मन पळाले तर कोठे पळाले ? अरे, जितक्या बाबीत, जितक्या विषयात पळेल त्याचा हिशोब कुठपर्यंत ठेवाल? परंतु खूप ध्यानपूर्वक पाहाल तर दोन क्षेत्र खूप स्पष्ट दिसून येतील. त्याच्याजवळ पळण्यासाठी तिसरे क्षेत्र नाही. दोनच क्षेत्र आहेत एक तर भूतकाळात पळेल असे झाले होते, असे झाले होते वा भविष्यकाळात असे होईल, असे होईल, असे करीन, असे करणार नाही, याच बाबीत घुटमळत राहील._

_हे भूतकाळात रमण करते अथवा भविष्यकाळात. आता आपल्या मनाच्या स्वभावाला समजू लागलात. आम्हाला आपल्या मनाबाबत, आपल्या शरीराबाबत, मनात जागणाऱ्या साऱ्या विकारांबाबत पूर्ण माहिती प्राप्त करायची आहे. तेव्हा सुटका होईल, अन्यथा कशी सुटका होईल ?_

_प्रथम बाब तर ही लक्षात येईल की हे वर्तमानात जगणे जाणत नाही आणि जगावे लागते वर्तमानात. भूतकाळात कसे जगू? जो क्षण गेला, तो नेहमीसाठी गेला, जगातली सारी संपत्ती देऊनही मी तो क्षण जगू शकेन हे असंभव आहे. तसेच भविष्य जेव्हा वर्तमान बनेल तेव्हाच त्यात जगता येईल. त्यामुळे जगायचे तर आहे वर्तमानात._

_*या मनाचा स्वभाव पाहा, जेव्हा पाहाल तेव्हा भूतकाळात रमण करते किंवा भविष्य काळात रमण करते. त्यामुळे त्याला हे शिकवीत आहोत की वर्तमानात जगणे शिक!* वर्तमान सत्य हे आहे की श्वास येत आहे, कल्पना नाही, सत्य आहे. अनुभूतीवर उतरत आहे ही बाब. श्वास येत आहे, श्वास जात आहे. या सत्यावर राहणे शीक. ते मानत नाही, पुन्हा पळते. कधी भूतकाळात कधी भविष्यकाळात._

_त्यानंतर साधक खूप लक्षपूर्वक पाहातो की हे भूतकाळात वा भविष्यकाळात जाते तेव्हा कोणत्या प्रकारचे चिंतन चालते, कोणत्या प्रकारचे विचार चालतात ? अरे न जाणे किती विचार चालतात. कुठपर्यंत त्याचा हिशोब ठेवाल, पण दोन गोष्टी खूप चांगल्या प्रकारे समजतात. भूतकाळात असो वा भविष्यकाळात, जो विचार चालला तो खूप प्रिय वाटला भूतकाळात एखादी घटना अशी घडली जी खूप चांगली वाटली, त्याचेच चिंतन होत राहाते तर खूप प्रिय वाटते. अथवा मग स्वप्न पाहातो भविष्यात असे व्हावे... खूप प्रिय विचार, अथवा भूतकाळ वा भविष्यकाळाचा एखादा अप्रिय विचार अरे, हे तर खूप वाईट झाले, भविष्यात कधी असे होऊ नये._

_तर जे-जे प्रिय आहे ते खूप सुखद वाटते. पाहातो आपल्या स्वतःला, तपासतो, एका वैज्ञानिकाप्रमाणे आपली analytic study करुन पाहातो. विश्लेषणात्मक अध्ययन करतो. काय होत आहे माझ्या आत. जेव्हा-जेव्हा कोणताही प्रिय विचार येतो, भूतकाळाचा असो वा भविष्यकाळाचा, खूप सुखद वाटतो. तसेच जेव्हा जेव्हा अप्रिय विचार येतो, तेव्हा तेव्हा खूप दुःखद वाटतो. सत्त्य आहे, सर्वांची हीच तऱ्हा आहे. तेव्हा पाहतो की माझ्या मनाचा एक हिस्सा प्रतिक्रिया करु लागला. सुखद विचार येताच, असे तर वारंवार होवो, हे तर कायम राहो, खूप वाढो. प्रिय आहे ना तर पाहिजे-पाहिजेची मागणी सुरु करतो. अप्रिय विचार आला, दुःखद वाटला, तर मनाचा तोच हिस्सा प्रतिक्रिया करतो अरे, नाही पाहिजे, असे पुन्हा होऊ नये. मनाचा स्वभावच आहे. अशा स्वभावाच्या पकडीत जखडले आहे._

_*ही जी पाहिजे पाहिजेची मागणी चालते, भारताच्या जुन्या भाषेत तिलाच राग म्हणायचे. इथे तर आम्हाला सांगितले गेले की मराठीत रागाचा अर्थ क्रोध होतो, परंतु भारताच्या जुन्या भाषेत राग म्हणजे आसक्ती.* त्याच्याप्रती चिपकाव होऊ लागला व जे नको त्याप्रती द्वेष होऊ लागला. प्रतिक्षण माझ्या मनात काही ना काही विचार चालतो, तो सुखद असेल तर मी आसक्ती जागवतो, दुःखद असेल तर द्वेष जागवतो. अरे, कोणत्या स्वभावाच्या पकडीत जखडलो गेलो ? *आसक्ती वा द्वेष जागवताच मन व्याकुळ झाले, म्हणजे, ते आपल्या व्याकुळतेकडे पुढे-पुढे जात आहे. आता समजले की व्याकुळतेचा उगम, विकारांचा उगम कोठे होतो !*_

_*एक दिवस जातो, दोन दिवस जातात, तीन दिवस जातात. आता अजून सत्य प्रकट होऊ लागते. तेव्हा लक्षात येते की आमच्या देशाच्या महापुरुषांनी, सद्‌गुरुंनी हा शुद्ध श्वासाचा अभ्यास करणे का शिकवले, ह्यामागे काय रहस्य आहे?* कारण विद्याच नष्ट झाली, आम्ही विसरलो. *आता समजले की पाहा मनात जसाही विकार जागला क्रोध जागला, की द्वेष जागला, की ईर्ष्या जागली, कोणताही विकार जागला, जागताच प्रथम काम हे होते की हा श्वास आपली स्वाभाविकता गमावतो. श्वास स्वाभाविक राहाणार नाही. थोडासा जोरात होईल अथवा थोडासा जड होईल आणि जसा विकार दूर झाला, पुन्हा स्वाभाविक होईल.*_

_*आमच्या श्वासाचा आमच्या मनाच्या विकारांशी इतका सखोल संबंध आहे हे कधी जाणतच नव्हतो.* आम्हाला तर आपल्या मनाच्या विकारांपर्यंत पोहोचायचे आहे, कारण त्यांना दूर करायचे आहे. लक्ष्य आमचे निर्विकार बनण्याचे आहे. लक्ष्य आमचे चित्ताला निर्मळ करायचे आहे. सध्या तर हेही जाणत नाही की विकार उत्पन्न कसे होतात तर त्यांना दूर कसे करणार? वरवर दूर करणे खूप सोपे आहे. मनाला एखाद्या बाबीत गुंतवा. एखाद्या अन्य बाबीत गुंतवा. वरवरचे चित्त ज्याला *concious mind* म्हणतात, चेतन चित्त म्हणतात, ते सुधारेल._

_चांगले आहे, तेवढे तर सुधरते, कल्याण झाले. परंतु मुळापासून स्वभाव कसा सुधारेल ? स्वभाव तर हा झाला आहे की सुखदच्या प्रती आसक्ती निर्माण करा, दुःखदच्या प्रती द्वेष निर्माण करा, दुर्भाव निर्माण करा. असा स्वभाव अंतर्मनाच्या खोलीत मुळांपर्यंत रुजला आहे. कसे बदलावे याला ? आता या श्वासाच्या साहाय्याने काम करता-करता हे सारे रहस्य उलगडत जाईल._

_*अजून पुढे जाऊ तर अनेक रहस्य उलगडत जातील. आपल्याबाबत, या प्रकृतीच्या नियमांबाबत न जाणे किती रहस्य उलगडतील. ही काही कल्पना नाही. अंधविश्वासाची बाब नाही. संपूर्ण मार्ग वैज्ञानिक, mind व matter च्या interaction ला आम्ही अनुभवाने अध्ययन करत जाणत आहोत, आपल्या अनुभवाने समजत आहोत.* मनात एखादा विकार जागला, तर एकीकडे श्वासाच्या गतीत फरक पडला व दुसरीकडे शरीरात काही ना काही उपद्रव सुरु झाला. *क्रोध जागताच पाहाल की सर्व शरीर गरम होऊ लागले, सर्व शरीर तणावाने भरले, हृदयाची धडधड वाढली. हे सर्वांना होते, हिंदू, मुसलमान, बौद्ध, भारतीय, ब्रह्मी, अमेरिकन कोणीही असो, मनुष्य मनुष्य आहे. हा प्रकृतीचा नियम आहे की जसे मनात काही विकार जागला दोन गोष्टी एकत्र होऊ लागतात, एक तर श्वासाची गती बदलेल व शरीरावर काही अशा प्रकारची संवेदना जागेल, जिचा त्या विकाराशी सखोल संबंध आहे. ही सारी विद्या आम्हाला त्या अवस्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे की जिथे विकारांचा उगम झाला व आम्हाला त्याचा संकेत (symbol) माहीत होऊ लागला.* आता त्याला दूर करण्याचा मार्ग माहीत होऊ लागेल. प्रथम तिथपर्यंत पोहचू तर._

_*ज्याला आम्ही अचेतन म्हणतो, ते अचेतन नाही, खूप चेतन आहे, परंतु या वरच्या चित्तात, ज्याला भारताच्या भाषेत परित्त चित्त म्हटले, परिमित चित्त, खूप छोटेसे चित्त आहे. यात आम्ही शांती निर्माण केली, थोड्या वेळासाठी मळही दूर केला, परंतु यात व त्याच्या खाली असणा-या मोठ्या चित्तात खूप जाड-जाड भिंत आहे. यामुळे खालच्या चित्ताला काही कळतच नाही.*_

_*या ज्या कोठे धर्माच्या बाबी ऐकता, वाचता वा चिंतन-मनन करता, त्याचा प्रभाव केवळ वरवरपर्यंत राहातो. अंतर्मनाच्या सखोलतेत पोहचू शकत नाही, कारण ही जाड भिंत तुटत नाही. त्यामुळे आमच्या देशाच्या महापुरुषांनी ती विद्या शोधून काढली ज्यामुळे ही भिंत तुटावी, ज्यामुळे सर्व चित्त सखोलतेपर्यंत, मुळापर्यंत चेतन व्हावे. तेव्हा आतील चित्ताला माहीत होईल की विकार जागला व जागताच पाहा काय होत आहे ? शरीरात कोणत्या प्रकारच्या संवेदना sensation सुरु झाल्या. शुद्ध राहात नाही, तेव्हा काय होते ? क्रोध जागला तर असे वाटले की क्रोध आम्हाला एखाद्या बाहेरच्या घटनेवर जागला, परंतु पाहाल की बाहेरची घटना तर एकदाच झाली, संपली. कोणी मला शिव्या दिल्या, माझा अपमान केला, तो निघून गेला. त्याच्या शिव्यांमुळे मी एकदा दुःखी झालो, परंतु मी तिथे दुःख संपवत नाही. तासन्तास त्या बाबीची आठवण करतो. त्याने मला शिव्या दिल्या, त्याने माझा अपमान केला व जेव्हा-जेव्हा आठवण करतो तेव्हा तेव्हा क्रोध उत्पन्न होतो, क्रोध उत्पन्न होतो, अजून व्याकुळ होतो. अरे आपल्या स्वतःला व्याकुळ बनवत आहोत. त्याने मला शिवी दिली एकदा व्याकुळ बनवण्यासाठी आणि मी म्हणतो की मी तासन्तास व्याकुळ राहीन. कधी-कधी म्हणतो की माझा असा अपमान झाला की जन्मभर विसरणार नाही, कोणावर उपकार करतोस बाबा? जन्मभर या संतापात, या व्याकुळतेत व्याकुळ राहाल, सात जन्मांपर्यंत विसरणार नाही. काय कराल सात जन्मांपर्यंत ? आपल्या स्वतःला व्याकुळच बनवत राहाल. अरे, शुद्धच नाही. कारण आपल्या आत पाहाण्याची विद्याच विसरलो.*_

_*आपल्या स्वतःला मी व्याकुळ बनवत आहे. ज्याने मला शिवी दिली, क्रोध जागवला, अरे, खूप दुःखी आहे. निसर्गाच्या नियमांना समजणारा मी त्याच्यासोबत दुःखी का बनू ? आपल्या दुःखाला तो भोगत राहो. आम्ही त्याला दुःखाबाहेर काढू शकलो तर काढू. पण आपल्या स्वतःला तर दुःखात टाकणार नाही. आम्ही बदल्यात क्रोध करणार नाही. तेव्हा काय कराल ?*_

_ही विद्या शिकवेल, अशी अवस्था येईल, तेव्हा काय कराल? दगडाच्या मूर्तीप्रमाणे बसून राहाणार नाही. एखाद्या भाजीपाल्याप्रमाणे बसले आहोत, कोणीही यावे आम्हाला कापून जावे. आम्ही तर विपश्यनावाले आहोत, आम्ही काहीही म्हणत नाही. नाही नाही-नाही! *जर कुठे कठोर व्यवहार करायचा आहे, समजलो की हा मनुष्य कोमल भाषा समजत नाही, कठोर भाषाच समजेल, तर कठोराशी कठोर व्यवहार करु, वाणीनेही, शरीरानेही. परंतु प्रथम आपल्या स्वतःला तपासू, माझ्या मनात कुठे क्रोध तर जागला नाही? माझ्या मनात कुठे द्वेष-दुर्भावना तर जागली नाही? नाही तर मी आजारी झालो. एक आजारी मनुष्य दुसऱ्या आजारी मनुष्याला कसा सुधारेल? एक लंगडा मनुष्य दुसऱ्या लंगड्या मनुष्याला कसा आधार देईल? एक आंधळा मनुष्य दुसऱ्या आंधळ्या मनुष्याला कसा रस्ता दाखवेल ? त्यामुळे प्रथम आपल्या स्वतःला सांभाळू.*_

_या विद्येने आपल्या स्वतःला सांभाळेल. बस काही क्षण, काही seconds, जशी बाहेर घटना घडली, आपल्या आत पाहिले, अरे, क्रोध जागला, तर ही संवेदना जागली, श्वास जोरात झाला, त्याला पाहता-पाहता तो शांत झाला. आता जे करायचे ते करेल. आता जे करेल ते कल्याणकारीच होईल. आपल्या स्वतःसाठी व इतरांसाठी ही. आपल्यासाठीही मंगलकारी, इतरांसाठीही मंगलकारी, न आपली हानी केली, न इतरांची हानी केली. अरे, तर जगणे आले ना!_

_*धर्म तर जगण्याची कला आहे, कसे सुखपूर्वक जगावे. कसे शांतीपूर्वक जगावे, त्यासाठी श्वासाचा आधार घेतला. पुष्कळ आलंबन आहेत, परंतु श्वासाच्या आलंबनापासून पुढे जात-जात आम्ही त्या अवस्थांपर्यंत पोहोचू, जिथे आम्ही mind व matter च्या interaction ला खूप चांगल्या प्रकारे पाहू शकू. अनुभवाद्वारे हे जाणू शकू की मन व शरीराचा जो एक दुसऱ्याला प्रभावित करण्याचा स्वभाव आहे, त्याचे फळ काय येते ! कसे विकार जागतात, कसे त्यांचे संवर्धन होते व कसे आमच्या डोक्यावर चढतात. आम्हाला शुद्ध राहात नाही. शुद्ध आली तरच याच्या बाहेर निघू. आधीच शुद्ध आली तर ते डोक्यावर चढू शकणार नाहीत. ही विद्या आपल्या स्वतःला सुधारण्याची विद्या आहे. आपल्या स्वतःला जाणू लागलो तर दुःखाच्या बाहेर निघू लागलो.*_

*_आपा जाणे, आपो आप, रोग न व्यापे तीनों ताप ।_*

_जिथे आपल्या स्वतःला जाणू लागलो, सर्व भवरोग दूर झाले, सर्व संताप-ताप दूर झाले. तेव्हा खूप शांतीचे जीवन जगू लागला, खूप सुखाचे जीवन जगू लागला. हे काम प्रवचन ऐकण्यामुळे होत नाही, शास्त्रांना वाचण्यामुळे होत नाही, केवळ चिंतन-मनन करण्यामुळे होत नाही. यासाठी अनुभव करावा लागतो, अभ्यास करावा लागतो व त्याचेच नाव आहे 'विपश्यना' कसे आम्ही आपल्या आतील सत्यांना अनुभवाच्या स्तरांवर जाणू व कसे आपल्या मनाच्या चुकीच्या स्वभावाला उलटवून त्याला योग्य बनवू, ज्यामुळे आपलेही कल्याण होईल, इतरांचेही कल्याण होईल, आम्हीही सुखशांतीचे जीवन जगू व इतरही सुखशांतीचे जीवन जगतील. बस, हाच धर्म आहे व धर्मात पुष्ट होण्याची ही भारताची जुनी कल्याणकारी विद्या आहे. हिचा स्वीकार करुन जीवनात धारण करावयाची आहे._

_आजच्या धर्मसभेत जे-जे आले, त्यांनी याला केवळ वाणीविलास व बुद्धीविलासाचा विषय बनवू नये. ही प्रेरणा जागो की आम्हीही आपल्या आत अंतर्मुखी होऊन सत्याला पाहू व पाहून आपल्या विकारांपासून मुक्त होऊ. ज्यामुळे आमचेही मंगल होवो व इतरांचेही मंगल होवो ! खूप धर्म जागो, सर्वांचे मंगल होवो, सर्वांचे कल्याण होवो, सर्वाची स्वस्ती मुक्ती होवो, सर्वांची स्वस्ती मुक्ती होवो !_

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

_बुद्धवर्ष २५६०, जेष्पौठ र्णिमा, २० जुन, २०१६, वर्ष २३ अंक ३_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* ११/०२/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...