🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_सम्यक संबोधि_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/09/blog-post_25.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_वैशाख पौर्णिमेच्या दिवशी नेपाळच्या लुंबिनी वन-प्रदेशात राजकुमार सिद्धार्थ गौतमचा जन्म झाला. ३५ वर्षाांनंतर याच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी विरक्त राजकुमाराने गया (बोधगया) मध्ये बोधिवृक्षाखाली सम्यक संबोधि प्राप्त केली. *काय होती ती सम्यक संबोधि, जिला प्राप्त करून राजकुमार सिद्धार्थ भगवान बुद्ध बनले? कसले होते ते बुद्ध-ज्ञान, ज्याने मानवी अध्यात्म-दर्शनाला नवीन उंची प्रदान केली?*_
_बोधि प्राप्त करताना भगवंतांनी पाहिले ती..._
१. _अविद्या आहे, “मी” “माझा” चा मिथ्या आत्मवादी अहंभावच अज्ञान आहे._
२. _याच्यामुळेच संस्कार बनतात आणि जिथे संस्कार आहेत तिथे चैतन्य आहे._
३. _हे चैतन्यच आहे ज्याच्यामुळे चित्त आणि कायेच्या संयोगाद्वारे जीवनाची एक अजस्र धारा प्रवाहित होते._
४-५. _जिथे काया आणि चित्ताचा संयोग आहे तिथे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन ही सहा इंद्रिये आणि त्यांचे सहा विषय आहेत– रूप, शब्द, गंध, रस, स्प्रष्टव्य पदार्थ आणि मनोविकार._
६. _ज्याक्षणी इंद्रियांचा आपल्या विषयांशी स्पर्श होतो त्याक्षणी काहीतरी अनुभूती होते._
७-८. _याच अनुभूतीमुळे विषयांच्या प्रति आसक्ती उत्पन्न होते. हीच तृष्णा आहे. (द्वेष या नाण्याची दुसरी बाजू आहे.)_
९-१०-११. _ही तृष्णाच वाढून तीव्र लालसेचे रूप धारण करते आणि त्या लालसा-पूर्तीसाठीच वेगवेगळी मानसिक, कायिक आणि वाचिक कर्मे होतात, जी स्वानुकूल कर्म-भवाच कारण बनतात._
१२. _याच कर्म-भवापासून जन्म होतो. आणि जन्म होतो तेव्हा जरा, व्याधि आणि मृत्यु अटळ आहे._
*_अशा प्रकारे अविद्या आणि तृष्णेमुळे दु:खाचा अपार समूह निर्माण होतो._*
_*भगवंतांनी पाहिले– हे दु:ख आहे आणि या दु:खाच्या उत्पन्न होण्याचे कारण आहे. परंतु निराशेची काही बाब नाही. या दु:खाचा निरोधही आहे. निरोधाचा एक उपाय आहे, एक मार्ग आहे. हाच आहे आर्य अष्टांगिक मार्ग! कसा आहे हा आर्य अष्टांगिक मार्ग? या आठ अंगवाल्या मार्गाला आपण तीन खंडांमध्ये विभक्त करु शकतो.*_
१. *पहिला शील-खंड आहे.* याच्या अंतर्गत सम्मावाचा, सम्माकम्मन्तो आणि सम्माआजीवो हे येतात. शीलाचा अर्थ आहे सदाचारमय जीवन. काया आणि वाणीने कोणत्याही प्रकारचे दुराचरण न करणे हेच शील आहे.
२. *दुसरा समाधी-खंड आहे.* याच्या अंतर्गत सम्मावायामो, सम्मासति आणि सम्मासमाधि येतात. म्हणजे, सतत अभ्यासाद्वारे चंचल चित्ताला कोणत्या एका आलंबनावर केेंद्रीत करून स्थिर-शांत करणे; एकाग्र-चित्त होणे हीच समाधी आहे.
३. *तिसरा प्रज्ञा-खंड आहे.* याच्या अंतर्गत सम्मासङ्कप्पो आणि सम्मादिट्ठि येतात. हा ज्ञान-खंड आहे. शुभ संकल्पाद्वारे विपश्यना साधनेच्या अभ्यासाने प्रज्ञा जागृत होते, अंतर्चक्षु उघडतात. साधक सचेत राहून अध्यात्म-साक्षात्कार करतो. सत्याचे सूक्ष्म निरीक्षण विश्लेषण करतो. काया आणि चित्ताचे निरीक्षण-विश्लेषण, आंतरिक अनुभूतींचे आणि प्रकृतीच्या सत्य स्वभावाचे निरीक्षण-विश्लेषण. याच विपश्यनेद्वारे आपोआपच स्पष्ट अनुभव होऊ लागतो की इंद्रिय जगताचे सारे विषय प्रतिक्षण परिवर्तनशील आहेत, त्यामुळे अनित्य आहेत आणि वरवर सुखदायी प्रतीत होऊनही ते स्वभावत: दु:खमयी आहेत. ते निस्सार आहेत. “मी” आणि “माझे” म्हणण्या योग्य नाहीत म्हणूनच अनात्म आहेत.
_*अशा प्रकारे साडे तीन हाताच्या शरीरामध्ये इंद्रिय जगताच्या अनुभूतींचे दिग्दर्शन करत करत चित्त वितृष्ण आणि अनासक्त होते, अविद्येच्या कड्या तुटून पडतात आणि परिणामी इंद्रियातीत अवस्था प्राप्त होते. हेच निर्वाण आहे, नित्य आहे, शाश्वत आहे आणि परम सुख आहे. याचा साक्षात्कारच दुख-निरोध आहे, साधनेची सिद्धी आहे. हाच मार्ग आहे. हेच मार्गाचे फळ आहे.*_
_स्पष्ट आहे की सतृष्ण चित्तच दु:खाचे जनक आहे आणि वितृष्ण चित्तच दुख-निरोध आहे. तेव्हा दु:ख-मुक्त व्हायचे असेल तर चित्ताला वितृष्ण करून निर्मळ बनवावेच लागेल कारण मन हेच प्रधान आहे. मन हेच प्रमुख आहे. दु:ख-प्रजनन आणि दु:ख-भंजनाच्या मुळात मनाचेच विशिष्ट महत्व आहे. जेव्हा दु:खरूपी रोगाचे निदान झाले आहे तेव्हा रोगाच्या बाह्य उपचारांना महत्व देणे व्यर्थ आहे._
_*सरळ रोगाच्या मुळावरच प्रहार करावा लागेल. मनाला पकडावे लागेल, त्यालाच बदलावे लागेल, त्यालाच सुधारावे लागेल. हे काम बाहेरील कर्मकांडांनी कदापि होऊ शकणार नाही. ना तर कोणा देव-ब्रह्माच्या कृपादृष्टीने अथवा वरदान-प्रसादाने होऊ शकेल. यासाठी तर स्वत: सतत अभ्यास केला पाहिजे. असा विधि अंगीकारावा लागेल जो सरळ मनाशी संबंध ठेवत असेल. आणि हाच तो विपश्यना विधि आहे. हाच धर्म-सिद्धांताचा व्यावहारिक पक्ष आहे. तेव्हा भगवानांनी यावरच अधिक जोर दिला. हा व्यावहारिक पक्षच आहे की जो सद्धर्माला “सांदृष्टिक” म्हणजे, स्वत: प्रत्यक्ष पाहण्यायोग्य बनवतो. हाच याला “अकालिक”, म्हणजे, तत्काळ फळदायी बनवतो. साधक स्वत: इथेच, याच जन्मात, याच कायेच्या आतमध्ये विमुक्ति-रसाचे आस्वादन करतो– आपल्याच सत्प्रयत्नांद्वारे, कोणत्या बाह्य शक्तीच्या भरवशावर नाही.*_
_*आपल्या उत्थानाचे आणि पतनाचे कारण आपण स्वत: आहोत, बंधन आणि मोक्षाचे कारणही आपण स्वत: आहोत. या क्षणी आपण जे काही आहोत ते आपल्याच कर्मांचे परिणाम-पुंज आहोत. भविष्यात जे काही बनू ते आपल्यामुळेच बनू. वर्तमान कर्मांवर आणि भावी गतीवर आपल्या स्वत:चा अधिकार आहे. आपण स्वत: ज्या गुंतागुंती निर्माण केल्या आहेत त्या आपल्या स्वत:लाच सोडवाव्या लागतील. हे काम कोणा बाह्य शक्तीच्या भरवशावर होणारे नाही. पस्तीस वर्षांच्या अवस्थेत सम्यक संबोधि प्राप्त करून पुढील पंचेचाळीस वर्षांपर्यंत भगवान याच “सांदृष्टिक” आणि “अकालिक” धर्माच्या शिकवणीत निरत राहिले. लाखो-करोडो मनुष्यांच्या मिथ्या-दृष्टी दूर केल्या, पोकळ रुढींचा आणि परंपरांचा पर्दाफाश केला, निस्सार मान्यतांचे उच्छेदन केले आणि मनुष्याच्या आतमध्ये सामावलेल्या त्या असीम सामर्थ्याला जागृत केले, ज्यामुळे तो आपल्या पायांवर स्वत: उभा राहू शकेल आणि अज्ञानाने लावलेल्या कुबड्या तोडून फेकू शकेल. तीर्थ-स्नान, व्रत-उपवास, वेश-भूषा, पूजा-पाठ, प्रशंसा, अनुनय-विनय इत्यादी बाह्य कर्मकांडांनाच मुक्तीचे साधन मानून बरसणाऱ्या बहिर्मुखी मनुष्याला त्यांनी अंतर्मुखी बनवले. चित्ताला विरज-विमल बनवून सरळ योग्य मार्गावर चालू शकण्याची अशी सहज-सरळ पद्धत सांगितली की ज्यामुळे मनुष्य आपले अनुशासन स्वत: करु शकेल, आपला मुक्तीदाता स्वत: बनू शकेल. अशा प्रकारे कोणत्याही बाह्य शक्तीवर आश्रित न राहता मनुष्याला स्वत: आपल्या महानतेच्या पथावर अग्रेसर होऊ शकण्याचे बळ प्रदान केले, आत्म-निर्भरता आणि आत्म-विश्वास प्रदान केला, आत्मशरण आणि धर्मशरणाची अनन्यता प्रदान केली.*_
_मानवजगताला हीच अमूल्य देणगी प्रदान करत जीवनाची ८० वर्षे पूर्ण करून वैशाख पौर्णिमेच्याच दिवशी भगवान बुद्ध महापरिनिवृत्त झाले. त्यामुळे वैशाख पौर्णिमेचा पावन दिवस त्रिधा (तीन प्रकारांनी) धन्य झाला._
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_लेखक :- कल्याणमित्र, सत्यनारायण गोयंका_*
*_संकलन - महेश कांबळे_*
*_संदर्भ - वर्ष २५, बुद्धवर्ष २५४०, वैशाख पौर्णिमा, दि. ०३-०५-१९९६, अंक ११ मधून साभार_*
*_दिनांक :- २६/०९/२०२४_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment