Thursday, 26 September 2024

कल्याणमित्र

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_कल्याणमित्र_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/09/blog-post_26.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_कल्याणमित्रतेच्या विषयात भगवान बुद्धांनी अनेक उपदेश दिले. *अङ्गुत्तरनिकायमध्ये एककनिपातच्या कल्याणमित्तादिवर्गामध्ये* भगवान म्हणतात –_ 

*_‘नाहं, भिक्खवे, अञ्ञं एकधम्मम्पि समनुपस्सामि येन अनुप्पन्ना वा कुसला धम्मा उप्पज्‍जन्ति उप्पन्ना वा अकुसला धम्मा परिहायन्ति यथयिदं, भिक्खवे, कल्याणमित्तता। कल्याणमित्तस्स, भिक्खवे, अनुप्पन्ना चेव कुसला धम्मा उप्पज्‍जन्ति उप्पन्ना च अकुसला धम्मा परिहायन्ती’’ति।_*

_मी असा एकही धर्म पाहत नाही जो अनुत्पन्न कुशल धर्माचा उत्पाद करेल, उत्पन्न अकुशल धर्मांचा प्रहाण करेल जसे की भिक्षूूंनो– कल्याणमित्रता. कल्याणमित्रच अनुत्पन्न कुशल धर्माला उत्पन्न करतात आणि उत्पन्न अकुशल धर्माचे प्रहाण._ 

_*अङ्गुत्तरनिकायच्या सत्तकनिपातमधील दुतियमित्तसुत्तात भगवान कल्याणमित्राच्या सात धर्माांमधील दक्षतेचा परिचय करवून देतात –*_

*_“सत्तहि, भिक्खवे, धम्मेहि समन्नागतो भिक्खु मित्तो सेवितब्बो भजितब्बो पयिरुपासितब्बो अपि पनुज्‍जमानेनपि। कतमेहि सत्तहि? पियो च होति मनापो च गरु च भावनीयो च वत्ता च वचनक्खमो च गम्भीरञ्‍च कथं कत्ता होति, नो च अट्ठाने नियोजेति । इमेहि खो, भिक्खवे, सत्तहि धम्मेहि समन्नागतो भिक्खु मित्तो सेवितब्बो भजितब्बो पयिरुपासितब्बो अपि पनुज्‍जमानेनपी’’ति।_*

_सात धर्माांना प्राप्त असलेला भिक्षू (कल्याण) मित्र आहे, सेवेच्या योग्य आहे, पूजनाच्या योग्य आहे, त्याने आपल्याजवळ बोलावले नाही तरी त्याच्याजवळ राहण्यायोग्य आहे. कोणते सात धर्म?_

१. _(लोक) प्रिय असतो (पियो), सुखद असतो (मनापो),_

२. _गुरु असतो (गरु),_

३. _आचरणाने युक्त असतो (भावनीयो),_ 

४. _वक्ता असतो (वत्ता),_ 

५. _मधुर वाणी बोलणारा असतो (वचनक्खमो),_ 

६. _गंभीर विषयांवर संभाषण करणारा असतो (गंभीरञ्च कथंकत्ता),_

७. _जो कुशलतेकडे जाण्यासाठी प्रेरित करणारा असतो (नो च अट्ठाने नियोजेति)._

_असा सात धर्माांना प्राप्त असणारा भिक्षू कल्याणमित्र आहे, सेवेच्या योग्य आहे, पूजनाच्या योग्य आहे, त्याने आपल्याजवळ बोलावले नाही तरी त्याच्याजवळ राहण्यायोग्य आहे._


*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_लेखक :- महेश कांबळे_*

*_संदर्भ -_*

१) अङ्गुत्तरनिकाय एककनिपात कल्याणमित्तादिवर्ग

२) अङ्गुत्तरनिकाय सत्तकनिपात दुतियमित्तसुत्त

*_दिनांक :- २६/०९/२०२४_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Wednesday, 25 September 2024

सम्यक संबोधि

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_सम्यक संबोधि_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/09/blog-post_25.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_वैशाख पौर्णिमेच्या दिवशी नेपाळच्या लुंबिनी वन-प्रदेशात राजकुमार सिद्धार्थ गौतमचा जन्म झाला. ३५ वर्षाांनंतर याच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी विरक्त राजकुमाराने गया (बोधगया) मध्ये बोधिवृक्षाखाली सम्यक संबोधि प्राप्त केली. *काय होती ती सम्यक संबोधि, जिला प्राप्त करून राजकुमार सिद्धार्थ भगवान बुद्ध बनले? कसले होते ते बुद्ध-ज्ञान, ज्याने मानवी अध्यात्म-दर्शनाला नवीन उंची प्रदान केली?*_

_बोधि प्राप्त करताना भगवंतांनी पाहिले ती..._

१. _अविद्या आहे, “मी” “माझा” चा मिथ्या आत्मवादी अहंभावच अज्ञान आहे._

२. _याच्यामुळेच संस्कार बनतात आणि जिथे संस्कार आहेत तिथे चैतन्य आहे._

३. _हे चैतन्यच आहे ज्याच्यामुळे चित्त आणि कायेच्या संयोगाद्वारे जीवनाची एक अजस्र धारा प्रवाहित होते._

४-५. _जिथे काया आणि चित्ताचा संयोग आहे तिथे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन ही सहा इंद्रिये आणि त्यांचे सहा विषय आहेत– रूप, शब्द, गंध, रस, स्प्रष्टव्य पदार्थ आणि मनोविकार._

६. _ज्याक्षणी इंद्रियांचा आपल्या विषयांशी स्पर्श होतो त्याक्षणी काहीतरी अनुभूती होते._

७-८. _याच अनुभूतीमुळे विषयांच्या प्रति आसक्ती उत्पन्न होते. हीच तृष्णा आहे. (द्वेष या नाण्याची दुसरी बाजू आहे.)_

९-१०-११. _ही तृष्णाच वाढून तीव्र लालसेचे रूप धारण करते आणि त्या लालसा-पूर्तीसाठीच वेगवेगळी मानसिक, कायिक आणि वाचिक कर्मे होतात, जी स्वानुकूल कर्म-भवाच कारण बनतात._ 

१२. _याच कर्म-भवापासून जन्म होतो. आणि जन्म होतो तेव्हा जरा, व्याधि आणि मृत्यु अटळ आहे._ 

*_अशा प्रकारे अविद्या आणि तृष्णेमुळे दु:खाचा अपार समूह निर्माण होतो._*

_*भगवंतांनी पाहिले– हे दु:ख आहे आणि या दु:खाच्या उत्पन्न होण्याचे कारण आहे. परंतु निराशेची काही बाब नाही. या दु:खाचा निरोधही आहे. निरोधाचा एक उपाय आहे, एक मार्ग आहे. हाच आहे आर्य अष्टांगिक मार्ग! कसा आहे हा आर्य अष्टांगिक मार्ग? या आठ अंगवाल्या मार्गाला आपण तीन खंडांमध्ये विभक्त करु शकतो.*_ 

१. *पहिला शील-खंड आहे.* याच्या अंतर्गत सम्मावाचा, सम्माकम्मन्तो आणि सम्माआजीवो हे येतात. शीलाचा अर्थ आहे सदाचारमय जीवन. काया आणि वाणीने कोणत्याही प्रकारचे दुराचरण न करणे हेच शील आहे. 

२. *दुसरा समाधी-खंड आहे.* याच्या अंतर्गत सम्मावायामो, सम्मासति आणि सम्मासमाधि येतात. म्हणजे, सतत अभ्यासाद्वारे चंचल चित्ताला कोणत्या एका आलंबनावर केेंद्रीत करून स्थिर-शांत करणे; एकाग्र-चित्त होणे हीच समाधी आहे. 

३. *तिसरा प्रज्ञा-खंड आहे.* याच्या अंतर्गत सम्मासङ्कप्पो आणि सम्मादिट्ठि येतात. हा ज्ञान-खंड आहे. शुभ संकल्पाद्वारे विपश्यना साधनेच्या अभ्यासाने प्रज्ञा जागृत होते, अंतर्चक्षु उघडतात. साधक सचेत राहून अध्यात्म-साक्षात्कार करतो. सत्याचे सूक्ष्म निरीक्षण विश्लेषण करतो. काया आणि चित्ताचे निरीक्षण-विश्लेषण, आंतरिक अनुभूतींचे आणि प्रकृतीच्या सत्य स्वभावाचे निरीक्षण-विश्लेषण. याच विपश्यनेद्वारे आपोआपच स्पष्ट अनुभव होऊ लागतो की इंद्रिय जगताचे सारे विषय प्रतिक्षण परिवर्तनशील आहेत, त्यामुळे अनित्य आहेत आणि वरवर सुखदायी प्रतीत होऊनही ते स्वभावत: दु:खमयी आहेत. ते निस्सार आहेत. “मी” आणि “माझे” म्हणण्या योग्य नाहीत म्हणूनच अनात्म आहेत. 

_*अशा प्रकारे साडे तीन हाताच्या शरीरामध्ये इंद्रिय जगताच्या अनुभूतींचे दिग्दर्शन करत करत चित्त वितृष्ण आणि अनासक्त होते, अविद्येच्या कड्या तुटून पडतात आणि परिणामी इंद्रियातीत अवस्था प्राप्त होते. हेच निर्वाण आहे, नित्य आहे, शाश्वत आहे आणि परम सुख आहे. याचा साक्षात्कारच दुख-निरोध आहे, साधनेची सिद्धी आहे. हाच मार्ग आहे. हेच मार्गाचे फळ आहे.*_

_स्पष्ट आहे की सतृष्ण चित्तच दु:खाचे जनक आहे आणि वितृष्ण चित्तच दुख-निरोध आहे. तेव्हा दु:ख-मुक्त व्हायचे असेल तर चित्ताला वितृष्ण करून निर्मळ बनवावेच लागेल कारण मन हेच प्रधान आहे. मन हेच प्रमुख आहे. दु:ख-प्रजनन आणि दु:ख-भंजनाच्या मुळात मनाचेच विशिष्ट महत्व आहे. जेव्हा दु:खरूपी रोगाचे निदान झाले आहे तेव्हा रोगाच्या बाह्य उपचारांना महत्व देणे व्यर्थ आहे._

_*सरळ रोगाच्या मुळावरच प्रहार करावा लागेल. मनाला पकडावे लागेल, त्यालाच बदलावे लागेल, त्यालाच सुधारावे लागेल. हे काम बाहेरील कर्मकांडांनी कदापि होऊ शकणार नाही. ना तर कोणा देव-ब्रह्माच्या कृपादृष्टीने अथवा वरदान-प्रसादाने होऊ शकेल. यासाठी तर स्वत: सतत अभ्यास केला पाहिजे. असा विधि अंगीकारावा लागेल जो सरळ मनाशी संबंध ठेवत असेल. आणि हाच तो विपश्यना विधि आहे. हाच धर्म-सिद्धांताचा व्यावहारिक पक्ष आहे. तेव्हा भगवानांनी यावरच अधिक जोर दिला. हा व्यावहारिक पक्षच आहे की जो सद्धर्माला “सांदृष्टिक” म्हणजे, स्वत: प्रत्यक्ष पाहण्यायोग्य बनवतो. हाच याला “अकालिक”, म्हणजे, तत्काळ फळदायी बनवतो. साधक स्वत: इथेच, याच जन्मात, याच कायेच्या आतमध्ये विमुक्ति-रसाचे आस्वादन करतो– आपल्याच सत्प्रयत्नांद्वारे, कोणत्या बाह्य शक्तीच्या भरवशावर नाही.*_

_*आपल्या उत्थानाचे आणि पतनाचे कारण आपण स्वत: आहोत, बंधन आणि मोक्षाचे कारणही आपण स्वत: आहोत. या क्षणी आपण जे काही आहोत ते आपल्याच कर्मांचे परिणाम-पुंज आहोत. भविष्यात जे काही बनू ते आपल्यामुळेच बनू. वर्तमान कर्मांवर आणि भावी गतीवर आपल्या स्वत:चा अधिकार आहे. आपण स्वत: ज्या गुंतागुंती निर्माण केल्या आहेत त्या आपल्या स्वत:लाच सोडवाव्या लागतील. हे काम कोणा बाह्य शक्तीच्या भरवशावर होणारे नाही. पस्तीस वर्षांच्या अवस्थेत सम्यक संबोधि प्राप्त करून पुढील पंचेचाळीस वर्षांपर्यंत भगवान याच “सांदृष्टिक” आणि “अकालिक” धर्माच्या शिकवणीत निरत राहिले. लाखो-करोडो मनुष्यांच्या मिथ्या-दृष्टी दूर केल्या, पोकळ रुढींचा आणि परंपरांचा पर्दाफाश केला, निस्सार मान्यतांचे उच्छेदन केले आणि मनुष्याच्या आतमध्ये सामावलेल्या त्या असीम सामर्थ्याला जागृत केले, ज्यामुळे तो आपल्या पायांवर स्वत: उभा राहू शकेल आणि अज्ञानाने लावलेल्या कुबड्या तोडून फेकू शकेल. तीर्थ-स्नान, व्रत-उपवास, वेश-भूषा, पूजा-पाठ, प्रशंसा, अनुनय-विनय इत्यादी बाह्य कर्मकांडांनाच मुक्तीचे साधन मानून बरसणाऱ्या बहिर्मुखी मनुष्याला त्यांनी अंतर्मुखी बनवले. चित्ताला विरज-विमल बनवून सरळ योग्य मार्गावर चालू शकण्याची अशी सहज-सरळ पद्धत सांगितली की ज्यामुळे मनुष्य आपले अनुशासन स्वत: करु शकेल, आपला मुक्तीदाता स्वत: बनू शकेल. अशा प्रकारे कोणत्याही बाह्य शक्तीवर आश्रित न राहता मनुष्याला स्वत: आपल्या महानतेच्या पथावर अग्रेसर होऊ शकण्याचे बळ प्रदान केले, आत्म-निर्भरता आणि आत्म-विश्वास प्रदान केला, आत्मशरण आणि धर्मशरणाची अनन्यता प्रदान केली.*_

_मानवजगताला हीच अमूल्य देणगी प्रदान करत जीवनाची ८० वर्षे पूर्ण करून वैशाख पौर्णिमेच्याच दिवशी भगवान बुद्ध महापरिनिवृत्त झाले. त्यामुळे वैशाख पौर्णिमेचा पावन दिवस त्रिधा (तीन प्रकारांनी) धन्य झाला._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_लेखक :- कल्याणमित्र, सत्यनारायण गोयंका_*

*_संकलन - महेश कांबळे_*

*_संदर्भ - वर्ष २५, बुद्धवर्ष २५४०, वैशाख पौर्णिमा, दि. ०३-०५-१९९६, अंक ११ मधून साभार_*

*_दिनांक :- २६/०९/२०२४_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Monday, 9 September 2024

दान, अदान आणि नादान

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_दान, अदान आणि नादान_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/09/blog-post_9.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                _*दान, अदान आणि नादान हे कायम वापरात येणारे आणि अत्यंत अर्थपूर्ण असणारे शब्द खरे तर बौद्ध जीवनमार्गाचे मर्म सांगणारे आहेत.* बौद्ध जीवनपद्धतीने होणाऱ्या व्यक्तिविकासातील मुख्य सूत्र आणि त्याविरूद्धचे आचरण यांचे होणारे परिणाम या अवघ्या तीन शब्दातून मांडले गेलेले आहेत. म्हणून त्यांचा सखोल अर्थ लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म या बाबतीत असलेल्या आजच्या अनेक प्रकारच्या गैरसमजाच्या वातावरणात हे तीन शब्द नीट समजणे तर फारच आवश्यक झाले आहे. बौद्ध जीवनपद्धतीचे आद्य तत्त्वच मुळी आज अनेकांना उमगलेले दिसत नाही. त्यामुळे धम्म-जीवनाच्या आचरणाचे पहिले पाऊलसुद्धा अजूनही नीट उचलले गेलेले दिसत नाही, ही आजची एक शोकांतिका आहे._

             _धम्माचे नावाने लोक कायम काही ना काही करीत असतातः शिबिरे भरवितात, ध्यान-साधना करतात, परिषदा भरवितात, प्रवचने देतात आणि ऐकतात, मिरवणूका काढतात, पूजा-वन्दना-सूत्रपठण करतात, भिक्खू-भिक्खूनींना दान देतात आणि सार्वजनिक धम्मकार्यासाठीसुद्धा दान म्हणून मदत करीत असतात. अशा अनेक प्रकारचे कार्य धम्माच्या नावाने गेल्या साठ वर्षांपासून चालू आहे. तरीसुद्धा *भारतात धम्माची पालेमुळे अद्यापीही रूजली गेली नाहीत आणि बौद्ध माणूस व बौद्ध समाज घडला गेला नाही, ही वस्तुस्थिती कायम आहे.* याच्या इतर काही कारणांपैकी एक मूलभूत कारण म्हणजे शुद्ध धम्म-संस्कारांचा अभाव होय. *धम्माचे नावाने कार्यक्रम होत असतात, परंतु धम्म-संस्कार रूजविण्याचे काम मात्र क्वचितच होत असते. आणि धम्म म्हणजे तर संस्कार, नुसते कार्यक्रम नव्हेत. भारतीय बौद्धांची धम्म-संस्काराशी अजूनही म्हणावी तशी नाळ जोडली गेलेली नाही, हे स्पष्ट आहे. कारण बौद्ध माणूस आणि बौद्ध समाजातून धम्म- संस्कारांची अभिव्यक्ती होताना दिसत नाही.* त्यांची जीवनपद्धती, परस्पर संबंध आणि मानसिकता जुन्याच पठडीची असून फक्त भोतिक प्रगतीच्या खुणा दर्शविणारी आहे._

_*धम्म-संस्कारातील पहिला महत्त्वाचा संस्कार म्हणजे दान होय. त्यानंतर शील होय. शीलाचरणाला बुद्धधम्मात महान पुण्यसंपदा असे म्हटले आहे. कारण शीलाचरणसुद्धा एक महान दान मानले गेले आहे.* बौद्ध समाजाचे आजचे मागासलेपण आणि द्विधावस्था दान, अदान आणि नादान या तीन शब्दांचे मर्म न समजण्यात दडलेले आहे, असे आम्हाला तरी वाटते. म्हणून आपण या शब्दांचा थोडा मतितार्थ जाणण्याचा प्रयत्न करू या._

_*सर्व प्रथम दानः खरं पाहिलं तर दान हेच धम्ममार्गावरील पहिले व्यावहारिक पाऊल आहे. माणसाच्या परिपूर्णतेचे महान असे जे दहा सद्गुण (पालीः पारमि) आहेत, त्यातील पहिला सद्गुण म्हणजे दान (पारमी) होय. म्हणजे दान हे सद्गुणांच्या म्हणजेच व्यक्तिविकासाच्या मार्गावरील पहिले पाऊल आहे. दान धम्म-जीवनाचा पाया आहे. बुद्धधम्मातील या दहा सद्गुणांना पाली भाषेत दस पारमि असे म्हणतात. 'पारमि'चा मराठीत अर्थ 'पारमिता' असा केला जातो. पारमिता म्हणजे 'परम सद्गुण' किंवा 'सर्वेश्रेष्ठ सद्गुण' होय. बुद्धत्त्व प्राप्तीच्या मार्गावर असलेल्या व्यक्तीला (म्हणजे बोधिसत्त्वाला) या दहा सद्गुणांमध्ये परिपूर्णत्त्व साधावे लागते, तेव्हा कोठे बुद्धत्त्वाची प्राप्ती होते, असे मानले जाते. बुद्धत्त्वाच्या प्राप्तीसाठी झटणाऱ्यास बोधिसत्त्व असे म्हटले जाते. बोधिसत्त्वाचा धम्म-जीवनमार्ग म्हणजे सहा किंवा दहा पारमिता होत. म्हणजेच मनुष्य म्हणून परिपूर्णत्व साधण्याचा जीवनमार्ग म्हणजे पारमिता होत. हा जीवनमार्ग फक्त बोधिसत्त्वासाठीच नसतो तर तो सर्व बौद्धांसाठी असतो. कारण की प्रत्येक बौद्ध माणसाचे अंतीम ध्येय असते निर्वाण प्राप्त करण्याचे. ते प्राप्त करायचेच असा ध्यास घेतलेला माणूस म्हणजे बोधिसत्त्व आणि तसा ध्यास न घेतलेला परंतु त्याच धम्ममार्गाने जाणारा तो उपासक बौद्ध होय. म्हणून धम्म दोघांनाही सारखाच आहे. या धम्ममार्गाची सुरूवात करण्याची पहिली पायरी म्हणजे दान पारमिता होय. धम्मजीवनमार्गावरील ते पहिले पाऊल आहे. म्हणून त्याचे अचूक आचरण करणे अत्यावश्यक आहे. दानाच्या आचरणातील कमजोरी किंवा विपर्यास माणसाच्या पुढील प्रगतीला अडथळा बनतो आणि त्याने मग ध्यानासह इतर धम्मशिकवणींचा कितीही सराव केला तरी त्याची अचूक प्रगती होत नसते.*_

_धम्ममार्गावर वाटचाल करतांना सुरूवातीपासून सात अंगांचा वापर करावयाचा असतो. ज्याप्रमाणे चालत असतांना आपण पुढील मार्ग स्पष्टपणे पाहात असतो, रस्त्यावर पाय घसरला तर स्वतःला सावरत असतो, चालतांना आधाराची गरज वाटली तर तसा आधार घेत असतो, ठेच लागली तर सहन करीत असतो, काटे- कुटे असतील तर ते टाळतो, किंवा दूर करतो किंवा उखडूनही टाकतो आणि अशा प्रकारे अडथळ्यांचे निवारण करीत करीत आपली चालण्याची गती वाढवित जातो. अगदी त्याच प्रमाणे धम्म-मार्गावरसुद्धा वाटचाल करावी लागते. त्याची अशीच सात अंगे आहेत. त्यांना अनुक्रमे_

१. दस्सन (दर्शन), 

२. संवर (सावरणे), 

३. सेवन (वापर करणे), 

४. अधिवासन (सहन करणे), 

५. परिवज्जन (परिवर्जन म्हणजे टाळणे) 

६. विनोदन (उखडून टाकणे) आणि 

७. भावना (वाढविणे) असे म्हणतात.

       _आणि या सर्व अंगांच्या पालनातून कुशल (पालीः कुसल) प्रवृत्तीचा किंवा मानसिकतेचा विकास होत असतो. हा बौद्ध जीवनमार्ग आहे. *केवळ ध्यान केले की सर्व काही झाले असे मुळीच नाही. तर ध्यानाचे ध्येय साधण्यासाठी या सर्व अंगांचे आचरण करावेच लागते. त्यामुळे आपल्या प्रगतीची गती वाढून आपण परिपूर्ण परिशुद्धेपर्यंत पोहोचत असतो.*_

        _यातील पहिली सहा अंगे नित्याच्या व्यावहारिक आचरणातून माणसाची मानसिकता कुशल करण्यास कामी पडतात आणि सातवे भावना हे अंग त्या मानसिकतेचा मनाच्या सखोल पातळीवर विकास साधण्यास कामी पडत असते. भावना करणे म्हणजे ध्यानसाधना करून वाढविणे असा या शब्दप्रयोगाचा अर्थ होतो. *भावना या पाली शब्दाचा मूळ अर्थ वाढविणे, विकास करणे असा आहे.* म्हणून पहिल्या सहा अंगांचे पालन न करता केवळ ध्यानसाधनाच केली तर त्याचा खरा लाभ होत नसतो. मनुष्य जसा आहे तसाच राहतो. फार तर त्याच्या मनाची एकाग्रता वाढते; परंतु परिशुद्धी घडत नसते. म्हणून नामस्मरण, ईश्रर-चिंतन, ट्रांस हे प्रकार फार तर एकाग्रता प्राप्त करण्याचे कामी पडतात, परंतु त्यामुळे सम्यक् समाधीपर्यंत पोहोचता येत नाही. कारण की *सम्यक् समाधीमध्ये चित्ताची परिशुद्धी साधण्याचे ध्येय असते.* मनातील वासना-विकार पद्धतशीरपणे उखडून टाकण्याचा प्रयत्न करणे समाविष्ट असते. ते फक्त कुशल मानसिकतेची जोपासना करूनच शक्य होत असते._

_कुशल मानसिकता म्हणजे सकारात्मक वृत्ती होय. इंग्लिशमध्ये त्याला पॉझिटीव्हिटी (Positivity) असे म्हणतो. ही वृत्ती गंभीर चिंतनातून (पालीः योनिसोमनसिकार) निर्माण होते. ते चिंतन असेः_

१. माझे हे कर्म माझ्या हिताचे परंतु इतरांच्या अनहिताचे आहे काय ? 

२. माझे हे कर्म इतरांच्या हिताचे परंतु माझ्या अनहिताचे आहे काय ? 

३. माझे हे कर्म माझ्या आणि इतरांच्याही अनहिताचे आहे काय ? आणि 

४. माझे हे कर्म माझ्या आणि इतरांच्याही हिताचे आहे काय ? जर

_यातील चौथ्या कसोटीत आपले कर्म बसत असेल तरच ते संपूर्ण कुशल कर्म होय. म्हणून त्या प्रमाणे सतत आचरण करायचा प्रयत्न करायचा असतो. अशा प्रकारच्या आचरणासाठी पहिली सहा अंगे मार्गदर्शक ठरतात. कुशल काय ते पाहावे किंवा जाणावे लागते. कुशलाचरणात घसरलो तर सावरावे लागते. कुशल करण्यास जे जे साहाय्यक ते घ्यावे किंवा वापरावे लागते. कुशल करण्यात काही त्रास झाला तर तो सहन करावा लागतो. अकुशल जे जे आहे ते सतत टाळावे लागते. अकुशलाची भावना निर्माण झाली तर ती मनातून उखडून टाकावी लागते आणि कुशलाची भावना सतत वाढवित राहावे लागते. असा हा धम्म-जीवनमार्ग संपूर्णपणे जगावा लागतो._

        _*आपले कर्म कुशल होण्यासाठी प्रत्येक कर्म करण्यापूर्वी त्याचे सकारात्मक किंवा नकारात्मक काय परिणाम होतील हे वरील कसोट्या लावून प्रथम जाणावे लागते, समजावे लागते, ते तटस्तपणे केलेल्या गंभीर चिंतन-मननातून घडत असते. वस्तुस्थिती जशीच्या तशी जाणता येते. याला दर्शन (पालीः दस्सन) म्हणतात. परंतु आपल्याकडे त्या शब्दाचे विडंबन होऊन दर्शन म्हणजे केवळ नम्रतेने पाहाणे असाच अर्थ केला जातो. त्याला दर्शन घेणे म्हणतात. हा वरवरचा केवळ पाहाण्यापुरता एक अर्थ आहे आणि जे पाहायचे ते जसेच्या तसे जाणायचे असते हा दुसरा अर्थ दर्शन घेणे या शब्दप्रयोगातून गायब झालेला आहे.* म्हणून दगडाच्या देवाचे दर्शन घेण्याचा प्रघात पडला, परंतु त्या दगडात खरंच काही दैवी किंवा अतिभौतिक सामर्थ्य आहे काय हे जाणण्याचे बुद्धीचे कार्य मात्र बंद पडले आणि निर्जीव वस्तूंना सर्वसामर्थ्यशाली देव-देवता मानणे सुरू झाले. अशा मानण्यातून एका भयंकर अंधश्रद्धेचा उदय झाला आणि माणूस त्यामध्ये पूर्णपणे अडकला जाऊन बौद्धिकदृष्ट्या विकलांग झाला, म्हणजेच बौद्धिक गुलाम झाला. *दर्शन (दस्सन) या शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे जसे आहे तसे पाहणे किंवा जाणणे हा कायमचा नाहीसा झाला. 'वि' म्हणजे पलीकडे किंवा त्याच्याही पुढे जाऊन, आणि 'ज्ञान' म्हणजे समज किंवा यथास्थितीचे आकलन. अशा प्रकारे विज्ञान हा शब्द बनलेला आहे.* त्या विज्ञानापासून माणूस दुरावला आणि अज्ञानाच्या अंधःकारात ढकलला गेला. दगडाच्या देवाला दगड म्हणून पाहणे बंद होऊन त्यात काही अलौकिक दैवी शक्ती असल्याचे आणि त्याच्या हाती आपले सुख- दुःख असल्याचे समजून त्याचे नम्रतेने म्हणजेच आशाळभूतपणे आणि भितीच्या भावनेने दर्शन घेण्याची रूढी निर्माण झाली आणि लोक संपूर्णपणे मानसिक गुलामगिरीत अडकले. *आज देव-दर्शन, जत्रा यात्रा यांचे जे स्तोम माजलेले दिसते त्याचे मूळ कारण दर्शन शब्दाचा झालेला विपर्यास होय.* त्यामुळे मनुष्य सत्त्यापासून तुटला, आपल्या मनः शक्तीला मुकला आणि दैववादी बनून लुळा- पांगळा झाला. *डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सार्थपणे म्हटले आहे की, 'यथार्थ भिक्खू कोणाला म्हणता येईल ? बुद्धिपूर्वक कोणते शक्य आहे? कोणते अशक्य आहे ? - ह्या ज्ञानावर ज्याने प्रभुत्त्व मिळविले आहे त्यालाच यथार्थ भिक्खू म्हणता येईल.'*_

_या दृष्टीने पाहाता बुद्धांचा धम्म वैज्ञानिक आहे, असे मानले जाते. कारण विज्ञानसुद्धा जे आहे त्यांच्यां मूळाशी जाऊन त्याची असलीयत जाणण्याचा प्रयत्न करते. फक्त त्यात एकच उणीव असते आणि ती म्हणजे विज्ञानात कुशल-अकुशल आणि नैतिकता ओळखण्याची दृष्टी नसते ही होय. म्हणूनच विज्ञानाने चांगल्या बरोबर वाईटाचीही खूप निर्मिती केलेली आहे. सर्वनाशक युद्धाची वेळ आणलेली आहे. ते सर्वनाशक वाईट टाळण्यासाठी विज्ञानाला सुद्धा बुद्धाच्या कुशल दृष्टीची आणि नैतिकतेची गरज आहे. म्हणून जगाला आज युद्ध नको, तर बुद्धाची गरज आहे. आपणास असे पाहावयास मिळते की अनेक धर्मात नैतिकता असते, परंतु जसेच्या तसे पाहण्याची किंवा जाणण्याची वैज्ञानिक दृष्टी नसते. म्हणून *अनेक धर्म अवैज्ञानिक तर असतातच, परंतु वैज्ञानिक ज्ञानाच्या विरोधीसुद्धा असतात. फक्त बुद्धाचा धम्म या दोन्ही कसोट्या पूर्ण करतो.* हे सर्व पाहून *अल्बर्ट आईनस्टाईन यांनी म्हटले आहे की, The situation may be expressed by an image: science without religion is lame, religion without science is blind. (Ideas and Opinions, p-46) म्हणजे "या परिस्थितीची मांडणी एका प्रतिमेतून व्यक्त केल्या जाऊ शकतेः धर्माशिवाय विज्ञान लंगडे आहे, विज्ञानाशिवाय धर्म आंधळा आहे."*_

_या पार्श्वभूमीवर *बुद्धानेच माणसाला सर्वप्रथम सम्यक् दृष्टी शिकवून म्हणजे जसे आहे तसे पाहण्यास शिकवून त्याला वैज्ञानिक दृष्टी दिली.* पाहून, पारखून आणि अंतरांगात शिरून त्याला प्रत्येक गोष्ट जाणण्यास शिकविले. त्याला मानसिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा मार्ग दाखविला ही किती महान घटना आहे! मानव- जातीवरील बुद्धांचे हे केवढे उपकार आहेत ! म्हणून *दर्शन या शब्दाचा प्रचलित अर्थ विकृत आहे, हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. यावरून भगवान बुद्धांनी आपल्या धम्म शिकवणीत सम्यक दृष्टीला अगदी पहिले स्थान कां दिलेले आहे, याचे मर्म लक्षात येईल. सम्यक् म्हणजे परिपूर्ण आणि दृष्टि म्हणजे आंतरबाह्य पाहून जाणणे होय. दृष्टीशिवाय व्यावहारीक जीवनात चालणे जसे अशक्य तसेच सम्यक्दृष्टीशिवाय म्हणजेच यथातथ्य आकलना- शिवाय किंवा समजेशिवाय धम्म-मार्गावर वाटचाल करणे अशक्य होय.*_

_*बुद्ध धम्मातही काही अंधश्रद्धा शिरकाव करू लागल्या आहेत. हल्ली बऱ्याच ठिकाणी जत्रा, यात्रा, महोत्सव, रॅली असे देखाव्याचे आणि करमणूकीचे कार्यक्रम होतांना दिसत आहेत. त्यातून माणसाला आपण काय करतोय आणि त्यातून काय मिळवतोय हे तर कळत नाहीच नाही, तसेच त्याच्या मनात कोणत्याही धम्मतत्त्वाची शिकवण रूजत नाही किंवा कुशल कर्म कळत नाही. बुद्धांनी 'नच्च गीत वादित विसुकदस्सना वेरमणि' म्हणजे नृत्य, गीत, संगीत आणि नाटक पाहाण्यापासून अलिप्त राहण्याचे एक शील दिले आहे. त्याच्या नेमके विरूद्ध असे हे आचरण आहे. बुद्धांनी वरील शील दिले ते यासाठीच की अशा प्रकारातून धम्म जाणता येत नाही किंवा त्याचे आचरण करता येत नाही म्हणून होय. तरीही आपल्याकडे बौद्ध महोत्सव भरविण्याचे, धम्मयात्रा आणि जत्रा भरविण्याचे आणि धम्मरॅल्या काढण्याचे प्रकार वाढतच आहेत आणि त्यातून धम्मसंस्कृतीचे विडंबन होत आहे. धम्माच्या नावाने केल्या जाणाऱ्या अशा कार्यक्रमांना जे दान दिले जाते, ते सर्व धम्माच्या विडंबनाच्या कामी लागल्यामुळे ते पाप ठरते.*_

_*काही लोक अल्प काळासाठी श्रामणेर बनून धम्म-रॅलीमध्ये फक्त एका विहारापासून दुसऱ्या विहारापर्यंत फिरत राहून दान गोळा करीत राहतात. भिक्खू जीवनाचारातून धम्म शिकण्यासाठी श्रामणेर बनायचे असते आणि त्या अनुभवातून भिक्खू बनायचे किंवा नाही याचा निर्णय करायचा असतो, ही शुद्ध धम्माची सांस्कृतिक परंपरा आहे. अल्प काळासाठी श्रामणेर बनून आपण त्या परंपरेचे विडंबन करीत असतो. अशा फिरस्त्या टेंपररी श्रामणेर बनण्यातून ती परंपरा भ्रष्ट होत असते, याचेही कोणाला भान नसते. बौद्ध म्हणविणारेच अशा प्रकारे आपल्या धम्म पंरपरा भ्रष्ट करीत राहिले तर शुद्ध धम्म कसा टिकणार ? आणि अल्प काळासाठी श्रामणेर बनून धम्माच्या नावाने अशा पोरकटपणाचा अनुभव घेणाऱ्या त्या माणसात धम्मश्रद्धा तरी कशी रूजणार? अशा अनुभवातून गेलेली माणसे असे बोलतांना दिसतात की, 'अरे श्रामणेर होऊन पाहिले. काय आहे त्यात ? फक्त पिवळी वस्त्रे घाला, विहारात राहा. वन्दना म्हणा, फिरत राहा, लोकांपासून दान मिळवा, खा-प्या आणि गप्प बसा.' अशा चुकीच्या अनुभवामुळे माणसाची धम्मश्रद्धा तुटली जाऊन तो धम्मापासून दुरावतो. धम्मात काय दम आहे ? त्याचा काय फायदा आहे ? अशी त्यांची भावना होते आणि इतरांनाही ते तसेच सांगत राहतात. अशी अनेक माणसे आपल्या पाहण्यात येतात. म्हणून अशा प्रकारांना सच्च्या बौद्धांनी दान देऊन उत्तेजन देता कामा नये. ते एक शुष्क कर्मकांड बनून अंधश्रद्धा पसरविण्यास कारणीभूत होत असते. म्हणून ते दान शेवटी पाप ठरत असते.* हे लक्षात घ्यावे._

_परंतु सम्यक् दृष्टी म्हणजे केवळ सर्वांगिण विचार करणे नाही. तर सम्यक् दृष्टी लाभण्यासाठी सखोल, सर्वांगिण विचार करण्याची शक्ती वाढवावी लागते. परंतु विचार केवळ सखोल आणि सर्वांगिण असून चालत नाही, तर तो कुशल म्हणजे सकारात्मक व परिशुद्धच असावा लागतो. या कुशलासह सर्वांगिण विचार करण्याच्या प्रकाराला योनिसोमनसिकार म्हणतात. आचरणाच्या प्रत्येक प्रसंगी ते कुशल आहे किंवा नाही याचा सखोल, सर्वांगिण विचार करण्याची दक्षता घ्यावी लागते किंवा जागरूकता बाळगावी लागते. याला सम्यक् सति असे म्हटले जाते. नित्याच्या व्यवहारात माणूस सवयीनुसार वागत असतो किंवा बऱ्याच गोष्टी करीत असतो. सवयी बऱ्या-वाईट असतात. लहानपणी कोणत्याही सवयीची किंवा वागण्या-बोलण्याची तपासणी करता येत नसते. इतरांचे पाहून आपणही करीत असतो. इतर ज्याला चांगले-वाईट म्हणतात, त्यालाच आपणही चांगले-वाईट समजत असतो. इतर जे मानतात त्यालाच आपण मानीत असतो. या अशा सवयीतून माणसाची सुटका होणे कठीण असते. त्याला कुशल आणि अकुशल याचा थांगपत्ता लागणे कठीण असते. म्हणून धम्म-जीवनमार्ग स्वीकारतांना प्रथम कुशल आणि अकुशल शिकावे लागते. म्हणून धम्मप्रचाराचा पायाच मुळी माणसाला कुशलतेसह विचार करण्यास सक्षम करणे हा आहे. त्याला नुसते बुद्धाचे तत्त्वज्ञान सांगून चालत नसते आणि त्यातून धम्मप्रचार घडत नसतो. *म्हणून भिक्खूंना धम्मप्रचार कसा करायचा याचे प्रशिक्षण घ्यावे लागते. तेव्हाच तो भिक्खू योग्य प्रकारे धम्मप्रचार करू शकतो.*_

_दुसरी गोष्ट म्हणजे कुशल-अकुशल ओळखण्यास कसे शिकायचे ? आणि त्याचे सतत स्मरण कसे ठेवायचे ? त्यासाठी स्वतःला कायम असा प्रश्न विचारीत राहावयाचे असते. माझे कर्म माझ्या आणि इतरांच्याही हिताचे आहे काय ? या मानसिकेतून दान भावनेचा उदय होत असतो. जे जे मी माझ्या हितासाठी किंवा सुखासाठी करतो ते ते मी इतरांच्याही हितासाठी आणि सुखासाठी केले पाहिजे ही भावना दानवृत्तीला जन्म देते. 'जसा मी तसेच इतर प्राणी आणि जसे इतर प्राणी तसाच मी' *(यथा अहं तथा एते, यथा एते तथा अहं। सुत्तनिपात, ३.११.२७)* असे समजण्याची मानसिकता घडते आणि मग इतरांसाठी काही करण्याचा माणूस प्रयत्न करतो, तेव्हा ते दान असते. सर्वसामान्यपणे अशी भावना एकाएकी निर्माण होत नसते. कारण कोणीही एकाएकी माझे हे कर्म माझ्या आणि इतरांच्याही हिताचे आहे काय ? असा विचार करू शकत नसतो. *माणसाची बालपणा पासूनची नैसर्गिक प्रवृत्ती असते ती 'मी आणि माझे' एवढेच समजण्याची. या प्रवृत्तीला अस्तित्त्व टिकविण्याची नैसर्गिक प्रवृत्ती (Sur- vival Instinct) असे म्हणतात आणि ती सर्व प्राणीमात्रांमध्ये स्वाभाविकपणेच असते.* त्या नैसर्गिक प्रवृत्तीतून बाहेर पडायचे असते. त्यासाठी माझे हे कर्म माझ्या आणि इतरांच्याही हिताचे आहे काय ? याचे गंभीरपणे चिंतन-मनन करून तो विचार मनावर बिंबवायचा असतो. त्यातून दान भावना जागी होते. परंतु हेही सर्वांना शक्य होते असे नाही. म्हणून सोपा उपाय केला जातो. तो म्हणजे मनात नसले तरीसुद्धा मुद्दाम होऊन कोणत्या कां निमित्ताने होईना, परंतु काही ना काही दान करण्याचा प्रयत्न करणे होय. *म्हणून धम्म-शिकवणीमध्ये 'दानं ददन्तु सद्धाय म्हणजे श्रद्धेने दान द्या' असे म्हटले आहे. येथून धम्म-जीवनाची सुरूवात होते. सर्व धार्मिक जीवनाचा हा पाया आहे. दान भावनेचे असे मूलभूत महत्त्व असल्यामुळेच दान म्हणजेच धर्म-जीवन या अर्थाने दान-धर्म असा शब्द प्रयोग बौद्ध संस्कृतीत रूढ झाला आणि पुढे चालून तो भारतीय संस्कृतीतील परवलीचा शब्दप्रयोग बनला.* आजही कोणाला थोडेसे धार्मिक जीवन जगा असे सांगतांना काही तरी दानधर्म करा असे लोक सांगत असतात. कारण त्यातून दान-भावना निर्माण होते आणि मनाला सकारात्मक वळण लागते. ही सकारात्मकता म्हणजेच मैत्री-भावना होय. मैत्रीभावनेचा उदय हे धम्म-जीवन जगण्याचे सार- सर्वस्व आहे. ती मानसिकता वाढविण्याचा सतत प्रयत्न करायचा असतो._

_*परंतु दान देण्याचाही विपर्यास होत असतो. लोक वर्गणी देतात, त्याला दान म्हणतात. आपले नाव प्रसिद्ध करण्यास किंवा त्याची जाहिरात देण्यास लोक पैसे देतात त्याला ते दान म्हणतात परंतु ही असते केवळ देवाण- घेवाण म्हणजे व्यवहार. त्यामध्ये मुळीच काही सकारात्मकता नसते. म्हणून ते दान ठरत नाही. त्यातून स्वेच्छेने इतरांसाठी काही करायची भावना जागत नाही. तर एक प्रकारची अधिकाराची किंवा मोठेपणाची भावना निर्माण होते. परंतु हल्ली धम्माच्या नावाने अधिकांश लोक अशाच प्रकाराला दान म्हणत असतात. ते केवळ चुकीचे असते असे नाही, तर प्रत्यक्षात अभिमान किंवा मोठेपणाच्या नकारात्मक भावनेचे पुष्टीकरण करणे असल्यामुळे प्रत्यक्षात माणसाच्या विकासाला घातक असते, हे नीट लक्षात घेतले पाहिजे.* तसेच जेव्हा कोणी दान मागतो आणि आपण देतो, तेव्हासुद्धा ते दान न ठरता भीक ठरत असते. *धम्मकार्यात कोणत्या तरी ईर्षेने किंवा इतरांशी चढाओढ करण्याच्या भावनेने जेव्हा दान दिले जाते, तेव्हा तर ते अक्षरशः नकारात्मक असल्यामुळे पाप ठरते. म्हणून धम्मकार्यात कोठेच चढाओढीचा किंवा दुसऱ्याला नामोहरम करण्याचा भाव असता कामा नये.* तर इतरांची गरज लक्षात घेऊन जेव्हा आपण उत्स्फूर्तपणे प्रत्यक्ष त्याच्यासाठी किंवा सार्वजनिक हितासाठी काही करतो, तेव्हा ते खऱ्या अर्थाने दान ठरते. *कोणाच्या तरी कामी पडेल असे वाटून जेव्हा धार्मिक प्रसंगी आपण त्या कार्याला किंवा संघाला दान देत असतो, तेव्हासुद्धा अशी दानभावना कार्यरत झालेली असते. म्हणूनच संघदानाला बौद्ध परंपरेत फार महत्त्व लाभलेले आहे. थोडक्यात, दान देतांना ते निरिच्छ भावनेने दिले तरच ते दान ठरते. अशा निरिच्छ भावनेने दान देतांना देणाऱ्याची मानसिकता कशी असावी लागते याचेसुद्धा मार्गदर्शन आपणास पाली ग्रंथातून मिळते. प्रथम मनात दान देण्याची इच्छा निर्माण व्हावी लागते, ते घेणाऱ्याबद्दल मनात आदर असावा लागतो. चांगल्यात चांगले देण्याची भावना असावी लागते. दिल्यानंतर स्वतःला आनंद किंवा' समाधान वाटावे लागते. परंतु दिल्यानंतर परत घेण्याचा विचार येतो किंवा दिलेल्या दानाशी आपल्या काही इच्छा-आकांक्षा जुडलेल्या राहतात किंवा त्यापासून काही लाभ मिळण्याची वृत्ती राहते, तेव्हा ते आचरण दान-भावना शून्य होऊन अदानामध्ये बदलले जाते. ते पुण्यकर्म न राहता, पापकर्मात होऊन जाते.*_

_*अदानः दान न देण्याची वृत्ती म्हणजे अदान होय. 'अ' म्हणजे नाही आणि 'दान' म्हणजे काही देणे. कधी काही द्यायचे नाही, म्हणजे अदान होय. त्याच बरोबर दिलेल्या दानाची वेगळ्या प्रकारे वसूली करणे म्हणजे अदान होय. काही आशा बाळगून दान देणे म्हणजेसुद्धा अदान होय. काही दडपणाखाली दान देणे म्हणजेसुद्धा अदान होय. थोडक्यात, दानाचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे व्यवहार करणे म्हणजे अदान होय. नावाची प्रसिद्धी करण्यासाठी काही लोग दान देत असतात. आपण दानशूर आहोत असे दाखविण्यासाठी काही लोक दान देत असतात. दुसरे करतात म्हणून आपणही त्यांच्यासारखे आहोत असे दाखविण्यासाठी लोक दान देतात. लोकांनी चांगले समजावे म्हणून काही लोक दान देतात. काही जण देवाच्या भितीपोटी कर्मकांड म्हणून दान देतात. देवापासून काही मागण्यासाठी किंवा नवसासाठी कर्मकांड करून लोक दान देतात. या सर्व प्रकारचे दान हे शेवटी अदान ठरते. खोटेपणा ठरते. आणि खोटेपणा हे पाप आहे. म्हणून अशा प्रकारचे सर्व दान शेवटी पाप ठरते. म्हणून बुद्धवचन अगदी सरळ आणि सोपे आहे. 'दानं ददन्तु सद्धाय' म्हणजे श्रद्धेने दान द्यावे. म्हणून जेव्हा दानाचा काही ना काही लाभ घेण्याच्या विचारातून दान दिले जाते तेव्हा त्यात श्रद्धा मुळीच नसते. श्रद्धा केवळ निरिच्छ भावनेने काहीही हातचे राखून न ठेवता दिलेल्या दानातूनच व्यक्त होत असते आणि त्याचे पुण्य लाभत असते.*_

_*दान न देणाऱ्याला अदानशील म्हटले जाते. त्या शब्दाचाच पुढे चालून कंजूष असा अर्थ केला जाऊ लागला. कंजूष माणूस आपल्या स्वार्थाशिवाय कशाचाच विचार करीत नसतो, त्याला फक्त घेणे आणि मिळविणे माहित असते, देणे मुळीच माहित नसते. म्हणून अदानशील याचा अर्थ स्वार्थी असा केला जाऊन लागला. हे शब्दप्रयोग माणसाच्या अप्रतिष्ठेचे वाचक ठरले. ते निंदाजनक अर्थाने वापरले जाऊ लागले. तसेच ते अधार्मिक, गैरविश्वासू आणि नीच या अर्थांनीही वापरले जाऊ लागले. मूळचे अदान किंवा अदानशील हे शब्द मागे पडले.*_

_*नादान हा शब्द या अदान शब्दाचेच दुसरे रूप आहे. ना + दान म्हणजे नादान. दान न देणारा तो नादान होय. परंतु या शब्दाचा अर्थ एवढ्यापुरताच मार्यादित राहिला नाही. तर त्याचा मूळ अर्थ जवळ जवळ लोप पावला आणि व्यवहारात त्याचा अर्थ अज्ञानी, नासमझ, बालबुद्धी, बेअक्कल, अडाणी, अशा अनेक अर्थानी वापरला जाऊ लागला. अदान शब्द व्यवहारातून गायब झाला. परंतु नादान शब्दाने मात्र अर्थाच्या दृष्टीने व्यवहारात फार पुढची मजल गाठली. या शब्दार्थात उपेक्षाभाव असून तो अनेकदा तुच्छतेने किंवा झिडकारण्याच्या अर्थाने वापरला जातो. बालबुद्धी आहे म्हणजे कळण्याची किंवा समजण्याची शक्ती नाही, अशा अर्थाने उपेक्षाभाव दाखविला जातो. लोग नादान आहेत म्हणजे अडाणी, नासमझ किंवा बेअक्कल आहेत, अशा अर्थाने झिडकारण्याचा भाव दाखविला जाऊ लागले. थोडक्यात श्रेष्ठ दर्जाचे मनुष्य जीवन म्हणजेच धम्म- जीवन ज्याला कळत नाही त्याच्या बाबतीत हा शब्दप्रयोग केला जाऊ लागला. श्रेष्ठ दर्जाचे मनुष्य जीवन जगण्याची सुरूवात होत असते ती दानाचे आचरण करण्यापासून होय. म्हणून दान भावनेशी ज्याचा संबंधच मुळी पूर्णपणे तुटलेला आहे आणि तो संबंध पुन्हा जोडण्याची ज्यामध्ये मुळी काही क्षमताच उरलेली नाही, अशा माणसास नादान म्हटले जाऊ लागले.*_

_परंतु मग असे नादान लोकसुद्धा लाजेकाजेस्तव दान देण्याचे सोंग आणतात. पण दानाचे सोंग दाखवितांना त्यांनी आपला मूळचा स्वार्थी स्वभाव मुळीच सोडलेला नसतो. देवादिकांना आपल्या इच्छापूर्तीसाठी किंवा त्याच्या कोप नको या भितीपोटी किंवा आपल्या रक्षणाच्या भावनेने धार्मिक कर्मकाड म्हणून दान देतात. तसेच काही लोक दान देऊन प्रसिद्धी मिळवितात किंवा नाव कमावतात. काही दुसऱ्यांना दाखविण्यासाठी दान देतात, तर काही अंधश्रद्धेने कोणालाही दान देतात. अशा प्रकारे दान भावनेचे अवमूल्यन होते. दान शब्दाचा विपर्यास होऊन तो एक मानसिक विकृतीचे पोषण करणारा प्रकार बनतो. त्याला शेवटी अंधः श्रद्धा असेच म्हटले जाते._

_*म्हणून दान श्रद्धेनेच द्यावे लागते. त्याची प्रसिद्धी करायची नसते. त्याची मोजदाद करायची नसते. ते देण्यात कशाची अपेक्षा ठेवायची नसते. दिलेल्याबद्दल मनात पुन्हा विचारही आणायचा नसते. ते सत्पात्री द्यायचे असते. ते प्राणीमात्रांनाच द्यायचे असते. निर्जीव मूर्त्यांना द्यायचे नसते. बाईबलमध्ये म्हटल्याप्रमाणे 'उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हातालासुद्धा कळू देऊ नका,' या भावनेने द्यायचे असते. बुद्धधम्मात यालाच म्हटले आहे 'दानं ददन्तु सद्धाय' म्हणजे श्रद्धेने दान द्यावे.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_लेखक :- भदंत विमलकित्ती गुणसिरी_*

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०९/०९/२०२४_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Friday, 6 September 2024

शाल्भञ्जिका शिल्प" नेमके कोणाचे

 *_"शाल्भञ्जिका शिल्प" नेमके कोणाचे?_*


_भारतीय शिल्पकलेमध्ये अनेक उत्तमोत्तम शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. या शिल्पांचा अभ्यास जसा उत्साहपूर्ण असतो तसाच या शिल्पांचा इतिहासही रोचक असतो._


_*भारतात शिल्पकलेचा जन्म हा बौद्ध संस्कृतीतून झाला हे निर्विवाद सत्य होय.* बुद्ध लेणीं आणि त्यानंतरच्या अनेक स्थापत्यात, भ. बुद्धांचा इतिहास किंवा त्यांच्या आयुष्यातील एखाद्या घटनेचा किंवा विचारांचा प्रभाव आपल्याला अनेक शिल्पात पाहायला मिळतो._


_*"शालभंजिका" हे असेच एक शिल्प होय. हे शिल्प सर्वात पहिल्यांदा "वाड्डेल" या ब्रिटिश पुरातत्त्वशास्त्रज्ञाला १८९० साली कुमराहार, पाटणा येथील उत्खननात सापडले. कुमराहार (पूर्वीचे पाटलीपुत्र) ही मौर्य साम्राज्याची राजधानी होय. तेथील उत्खननात एका तोरण पट्टीवर हे शिल्प आढळले. हे शिल्प भारहूत आणि सांची येथील स्तूपाच्या तोरणावर पाहायला मिळते. या शिल्पात सुंदर वस्त्रांनी आणि दागिन्यांनी नटलेली स्त्रीने एका हातात साल (शाल) वृक्षाची फांदी धरली असून दुसरा हात कटीवर ठेवला आहे तर काही ठिकाणी दुसऱ्या हाताने तिने झाडाला धरले आहे. मथुरा, कौशाम्बी, औरंगाबाद, अमरावती आणि नागार्जुनकोंडा येथे आपल्याला ही शिल्पे पाहायला मिळते. कोलकाता, खंदाहार, कराची, बर्लिन आणि अलाहाबाद येथील संग्रहालयात देखील हे शिल्प ठेवलेली आहेत. हेच शिल्प भारतीय शिल्पकलेत इ.स.पूर्व २५० ते इ.स. ९व्या शतकापर्यंत आपल्याला अनेक बुद्ध लेणीं अथवा स्तूपाच्या तोरणावर पाहायला मिळतात. १२ व्या शतकात तर या शिल्पाचे ताम्रशिल्प देखील आपल्याला पाहायला मिळते.*_


_*इ.स.पहिल्या शतकात होऊन गेलेले व ज्यांनी भारतीय साहित्यात सर्वात पहिल्यांदा "काव्य प्रकार" रुजवला ते बौद्ध आचार्य अश्वघोषांनी "बुद्धचरितम्" या काव्यात हा शब्द वापरला. ५व्या सर्गात हे पद राजपुत्र सिद्धार्थ  गृहत्यागाच्या वेळी, कवी त्याच्या महालातील एका सेविकेचे वर्णन करताना लिहितो -*_ 


*_अवलम्ब्य गवाक्षपार्श्वमन्या शायिता चापविभुग्न गात्रयष्टिः  लम्बिचारुहारा रचिता तोरणशाल्भञ्जिकेव II_*


_*वरील पदात अश्वघोष लिहितात कि "....आणखीन एक स्त्री एवढी बेसावध होऊन महालाच्या खिडकीवर पहुडली आहे कि जसे एखादी शाल वृक्षाची फांदी फुले तोडण्यासाठी वाकवली जाते". अश्वघोषांनी लिहिलेला "तोरण शालभंजिका" हा शब्द वोगेल ने १९२९ साली अशा प्रकारच्या शिल्पाचे वर्णन करताना पहिल्यांदा वापरला आहे.*_


_मात्र मूळ शिल्प कोणाचे आणि त्याचा अर्थ काय?_

      

_*बुद्धांच्या काळी "सालवन क्रीडा" (शालवन क्रीडा) नावाचा एक खेळ वसंत ऋतूत खेळला जायचा, ज्यात स्त्रिया, साल वृक्षाच्या फुले एकमेकांच्या अंगावर फेकायचे व त्याचा आनंद लुटायचे. याचे वर्णन आपल्याला "अवदानशतक" या ग्रंथात देखील वाचायला मिळेल. प्रसूतीसाठी जेव्हा महाराणी महामाया कपिलवस्तू वरून देवदाहला निघाली तेव्हा वाटेत लुम्बिनी मधील साल वृक्षांच्या जंगलात तिला शालवृक्षांच्या भोवती खेळायची इच्छा झाली (पालि: सालवनाकिलम किलितुकामता) आणि आपल्या सखींबरोबर खेळताना तीने शाल वृक्षाची फांदी धरायला हात उंचावला आणि तिला प्रसववेदना सुरु झाल्या. तेथेच  सिद्धार्थाचा जन्म होतो. शालवृक्षाच्या फांदीवर जोर पडल्याने ती वाकली असावी किंवा तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. सम्राट अशोक आणि त्यानंतरच्या अनेक राजांनी बुद्ध इतिहास शिल्पात कोरताना ज्या अनेक घटनानांना शिल्पात उतरविले ते हेच दृश्य कोरले ज्याला पुढे  वाड्डेलने "शालभंजिका" शब्द वापरला. अश्वघोषांनी केलेल्या "शालभंजिका" शब्दाचा आणि या प्रसंगाचा वापर नंतरच्या अनेक कवींनी व साहित्यकारांनी केला आहे. नाट्यशास्त्रात देखील शिल्पातील या प्रसंगाला एक महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. पुढे अनेक ठिकाणी अशा प्रकारची शिल्प कोरली गेली. काहींनी या शिल्पातील स्त्रीला यक्षी किंवा यक्षिणी असेही संबोधले आहे.*_ 


_*भारतीय शिल्पकलेत आणि साहित्यात वर्णन करण्यात आलेले "शालभंजिका" हे शिल्प मात्र महाराणी महामायाच्या शालक्रिडेतील प्रसंग आहे एवढे मात्र नक्की!*_


अतुल भोसेकर

९५४५२७७४१०




कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...