Saturday, 8 June 2024

बालिश अंधश्रद्धा

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_बालिश अंधश्रद्धा_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/06/blog-post.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                    _एक वेळ अशी होती की, सर्व भारतवर्षात बालमृत्यूचे प्रमाण आजच्यापेक्षा अनेक पटीने जास्त होते. काळाच्या ओघात आरोग्यविज्ञान वेगाने पुढे गेले, त्याच प्रमाणात अनेक गैरसमज देखील गळून पडले व बालमृत्यूचे प्रमाण आटोक्यात आले. *एवढे सर्व असताना देखील विज्ञानाच्या वाढत्या ज्ञानाबरोबर विज्ञानाची दृष्टी आलेली दिसत नाही,* फक्त सृष्टीच नजरेत भरत राहिली त्यामुळे हजारो वर्षांपासून परंपरेने चालत आलेल्या अनेक जीवघेण्या रुढी व मुलांच्या बाबत गैरसमज आता पाहूया. त्यात आपण गरोदरपणापासून ते मूल वय वर्ष पाचपर्यंत होईपर्यंतच्या काळातील काही अंधश्रद्धांचा आढावा घेऊ._

*_अ) गर्भारपणीच्या अंधश्रद्धा_*

               _आपल्या समाजात अंधश्रद्धा तशाच राहण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्या मागील पानावरून पुढे चालू राहतात. त्यात घरातील वयस्कर, बुजुर्गवर्गाचे अज्ञान कारणीभूत असते. आपण मात्र त्यांचाच सल्ला घेत राहतो व अंधश्रद्धा तशाच जोपासत पुढे जातो. खालील बाबतीत विविध गैरसमज दिसून येतात._

_*१) लिंग :-* भारतीय समाजव्यवस्था ही पुरुषप्रधान असल्यामुळे दांपत्यास मुलगाच हवा असतो. प्रगत साधनांमुळे बाळाच्या लिंगाचे ज्ञान होणे आज सहज शक्य आहे. परंतु तरीही जेथे आरोग्यसुविधा, साधने उपलब्ध नाहीत किंवा जेथे कमालीचे दारिद्र्य आहे, वाहतुकीची सोय नाही, अशा ठिकाणी *एक हमखास अंधश्रद्धा आढळते ती म्हणजे समजा दुसऱ्या वेळी दिवस गेले की, हमखास मुलगाच होणार, या अंधश्रद्धेमुळे पहिल्या मुलाच्या पाठीवर झटपट गर्भ राहिल्यास तो पाडण्यास घराघरांतून प्रचंड विरोध असतो.* त्यामुळे मुलाच्या आशेने हा गर्भ वाढू देतात व लागोपाठ होणाऱ्या बाळंतपणामुळे आई-बाळाची व एकूणच सर्व कुटुंबांची आबाळ होते._

                 _तसेच समजा, *गर्भारपणी स्त्रीचं पोट मोठं दिसलं किंवा ती बाई सारखी झोपा काढत असेल, तर हमखास मुलगाच होणार, असे मानले जाते. त्याशिवाय जर नवव्या महिन्यात किंवा तो महिना संपल्यावर जर पोट खाली खाली वाढतंय / सरकतंय, असा भास झाल्यास मुलगीच होणार, असेही मानले जाते. खरे म्हणजे या पूर्णपणे अंधश्रद्धा आहेत.*_ 

_*२) ग्रहण व गर्भ :-* बहुसंख्य सुशिक्षित घरात देखील ग्रहण व गर्भ याबाबतीत अनेक गैरसमज दिसून येतात. *गर्भार स्त्रीने भाजी कापल्यास जन्मास येणारे अपत्य व्यंग घेऊन, गाल, ओठ वगैरे चिरलेले असे जन्मते - याला विज्ञानामध्ये काडीचाही आधार नाही. एवढेच नव्हे, तर लोक असेही म्हणतात की, ग्रहणकाळात स्त्रीने झोपू नये. ती झोपल्यास तिच्या मागे तापाची पीडा लागते. बाथरूमला गेल्यास जंतरोग होतो व अंघोळ केल्यास कुष्ठरोग होतो. भोजन केल्यास नरकप्राप्ती होईल आणि म्हणून ग्रहणकाळात स्त्रीने कोनाड्यात शांतपणे बसून राहावे. आता ग्रहणकाळातील वातावरणामुळे अशा तऱ्हेचे मानवी शरीरावर गंभीर प्रतिकूल परिणाम होतात. याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. शिवाय अशा अनुभवांची आकडेवारी कोणी छातीठोकपणे आजपर्यंत दिलेली नाही.*_

_*३. गर्भारपणी दातखिळी बसणे :-* गर्भारपणात गर्भिणी मातेच्या शारीरिक तक्रारी चालूच असतात. बऱ्याच वेळा गर्भधारणेमुळे शरीरात होणाऱ्या बदलांमुळे, तर काही वेळा मनःस्थितीनुसार किरकोळ त्रास उद्भवतात. उदा. दातखिळी बसणे. बऱ्याच वेळा घरचे घाबरे-घुबरे होऊन एकाच वेळी दोन-तीन डॉक्टरांना बोलावयास जातात. पण ९९ टक्के अगदी किरकोळ समस्या आढळतात. *मानसिक स्थितीचा परिणाम म्हणून दातखिळी बसते. बऱ्याच वेळा भांडणानंतरच दातखिळी बसलेली आढळते आणि वारंवार बसत जाते. तो वैताग डॉक्टरांना होतो, कारण त्याला प्रभावी आणि सुरक्षित औषध नाही. खरं म्हणजे दातखिळी बसणे हा आजारच नाही.* आणखी दुसरी गोष्ट अशी आहे की, डॉक्टरांना खरे कारण सांगण्याची सोय नाही आणि बोलले तरी कुणी विश्वास ठेवत नाही. *त्यामुळे ९९ टक्के या केसेसमध्ये 'बाहेरची बाधा' आहे, 'सकून' आहे वगैरे मानले जाते. त्याशिवाय गरोदर बाईला 'जळकी' (जळजळ होणे) खूप जास्त असल्यास बाळाला फार जावळ (केस) आहे, अशी एक अंधश्रद्धा दिसून येते. खरे म्हणजे ही जळजळ केवळ गर्भारपणी स्त्री शरीरात हार्मोन्सच्या 'सिक्रिशन'मुळे विविध बदल होतात, त्यामुळे असते. या सर्व समस्यांवर डॉक्टरांकडून वेळच्या वेळी तपासणी करणे, हाच उपाय होऊ शकतो.*_

_*४. गर्भ पाडण्याविषयी -* गर्भ पाडण्यासाठी शहरे व खेडी या दोन्ही ठिकाणी राहणाऱ्या *सर्व सुशिक्षित व अशिक्षित महिलांमध्ये एक गैरसमज हमखास दृष्टीस पडतो. तो म्हणजे केळे/पपई व औषधे उष्ण (गरम) असतात, त्यामुळे गर्भ सहज पडून जातो. म्हणून नको असलेला गर्भ पाडण्यासाठी केळी, पपई भरपूर खावीत किंवा गर्भारपणात गर्भाला धोका होऊ नये म्हणून केळे, पपई व औषध घेऊ नयेत. खरे म्हणजे केळे, पपई यांच्यासारखी स्वस्त व पौष्टिक फर कोणतीच नाहीत. गर्भिणीसाठी ती अधिक उपयुक्त असतात, त्याशिवाय काही ग्रामीण स्त्रिया आपल्या गरोदर सुनांना-लेकींना इंजेक्शन, औषधे घेण्यास मजाव करतात. कारण त्यामागे एक गोड गैरसमज असा असतो की, औषधे गोळ्या घेतल्यामुळे पोटातील मूल खूप जाडजूड जन्माला येते. त्यामुळे असे मूल सिझेरियन (पोट फाडूनच) काढावे लागते.*_

                  _त्याशिवाय रक्तवाढीच्या, कॅल्शियमच्या गोळ्या व धनुर्वाताचे इंजेक्शन हे अत्यंत आवश्यक असतात. परंतु वरील गैरसमजुतीमुळे गरोदर बाईला हे दिले जात नाही. त्याचा विघातक परिणाम शरीरावर होऊ शकतो._

*_ब) बाळंतपणाविषयी अंधश्रद्धा_*

_*१) गरोदर स्त्री जर अमावस्येच्या दिवशी प्रसूत झाली, तर हमखास वंशाला दिवा आणि त्याउलट पौर्णिमेला प्रसूती म्हणजे नशिबी दिवटी (मुलगी) येते. मग एवढ्या एकाच अंधश्रद्धेपायी डॉक्टर व घरातील वयोवृद्ध माणसे यांच्यात मूल कधी जन्माला घालायचे, यावर चर्चा देखील होते. कधी-कधी तर साडेतीन मुहुतपैिकी एक अशा अक्षय्य तृत्तीयेच्या मुहुर्तावर आपला 'लाल' जन्माला यावा, असे देखील कित्येक स्त्रियांना वाटते म्हणून त्या डॉक्टरांनाच गळ घालतात व त्याप्रमाणे गोळ्या किंवा इंजेक्शन घेऊन आपली प्रसूतीची तारीख 'ऍडजस्ट' देखील करतात.*_

                 _कधी-कधी तर एखाद्या स्त्रीला 'कळा' कमी प्रमाणात येत असतील, तर मुलगी होणार व जर त्या मोठ्या प्रमाणात येत असतील, तर मात्र मुलगाच होईल, असे मानले जाते. यात काहीही तथ्य नाही._

_*२) नाळ कापण्याविषयी गैरसमज -* दहापैकी नऊ प्रसूतीमध्ये नाळ ही विळी, खुरपे, चाकू किंवा घाणेरड्या ब्लेडने कापली जाते. त्यामुळे स्त्रीला व मुलाला देखील धनुर्वात होऊ शकतो. काही मागास जातीमध्ये वार-नाळ सांभाळत ठेवली जाते. तिची पूजा करण्यात येते व वाळलेली नाळ औषध म्हणून वापरण्यात येते. प्रत्यक्षात तसा काही उपयोग होत नाही._

_*३) स्तनपान व गैरसमज -* बहुतेक सर्व समाजात बाळाला आईच्या स्तनाने दुग्धप्राशन करण्याबाबत अनेक समज/गैरसमज दिसून येतात. कोठे-कोठे बालकाला प्रथम दोन दिवसांचे स्तनपान करण्यास विरोध असतो. एक तर ते चिकट असते, बुळबुळीत व ते कच्चे समजले जाते. त्यामुळे मुलाला ते पचण्यास जड जाईल, पर्यायाने बाळाला हगवण / उलटी होईल, असा समज आहे वास्तविक पाहता या चिकट दुधात हगवण व विषाणूंना विरोध करणारी प्रतिजैविक असतात. त्याशिवाय स्तन पाजण्यामुळे मुलाच्या ओठाच्या स्पर्शाने आईच्या शरीरात मेंदूला उत्तेजना मिळून दुधाचे स्त्राव वाढले जातात. ती सुप्त यंत्रणा जागृत होते व बाळाचे पुढील पोषण होण्यास मदत होते._

                 _*कित्येक सुशिक्षित स्त्रिया तर दोन/तीन महिन्यानंतर बाळाचे स्तनपान करतात. कारण त्यांचा एक गैरसमज असतो की, बाळाला जास्त काळ स्तनपान केल्यास आपल्या स्तनांवर परिणाम होऊन भविष्यात 'मॅन चेस्टर' बनू शकते. या अज्ञानापोटी कित्येक स्त्रिया बाळाला बाहेरचे, बाटलीचे दूध सुरू करतात, पर्यायाने मुलाचे पोषण होत नाही व ते किडकिडे/आजारी होते.*_

_*४) टाळू लागणे - बाळाला स्तनपान करणाऱ्या मातांमध्ये स्तनास सूज येते व दुधाचा स्त्राव आतमध्ये अडकून वेदनादायक गाठी निर्माण होतात. यास टाळू लागणे, असे म्हणतात.* बाळाची टाळू स्तनाला लागून (स्पर्श होऊन) अशा गाठी होणे अजिबात शक्य नाही. तरीसुद्धा हा गैरसमज आजही आहे. *याचे खरे कारण असे आहे की, अस्वच्छतेमुळे किंवा स्तनास जखम झाल्यास जंतूंचा शिरकाव दुग्धवाहिनीमध्ये होतो व सूज येते. अशा स्त्रीला थंडी वाजून ताप येणे, छातीत दुखणे सुरू होते. तेव्हा दवाखान्याची आठवण येते आणि मग डॉक्टरांना सांगितले जाते, 'काही नाही हो, दूध पाजताना टाळू लागली.' ही शुद्ध अंधश्रद्धा आहे. खरे म्हणजे अशा गाठीवर वेळीच औषधोपचार न केल्यास शस्त्रक्रिया करावी लागते.*_

_*५) बाळाला शेक देणे -* प्रसूतीनंतर बाळ-बाळंतिणीला अंधाऱ्या खोलीत, शेकोटीजवळ नेऊन शेक देऊन बंदिस्त करतात. खरे म्हणजे मंद प्रकाश, कमी आवाज, उबदार वातावरण, याची बाळाला संसर्गाचा धोका टाळण्यासाठी गरज असते. परंतु अगदीच अंधार कोठडीत ठेवणे व मजबूत शेकविणे, हा गैरसमज आहे._

_*६) टाळू भरणे -* बाळाची टाळू लवकर भरावी, यासाठी जवळजवळ प्रत्येक भारतीय कुटुंबात आई-दाई ते आजी यांची संयुक्त आघाडी नेहमीच प्रयत्नशील असते. मग त्यासाठी दुधाच्या सायीपासून लोणी, तेल वगैरे वगैरेपर्यंत अनेक गोष्टी सतत टाळूवर थापल्या जातात. त्याशिवाय ती लवकर भरून यावी म्हणून काही समाजात अनेक 'विधी' ही केले जातात. खरे म्हणजे 'टाळू' ही मेंदूच्या वाढीसाठी निसर्गतः असणारी कवटीच्या आतमधील मोकळी जागा. साधारणपणे वयाच्या १८ व्या महिन्यात हाडे जुळून येऊन ही फट आपोआपच भरून येते. ती निसर्गाचीच योजना असते; जेणेकरून प्रसूतीसाठी आईला जास्त त्रास देखील होऊ नये. टाळूवर सतत तेल, तूप, लोणी लावल्यामुळे मुलाच्या जीवावरदेखील बेतल्याची उदाहरणे ऐकण्यात येतात. म्हणून टाळू भरण्यासाठी तेल/लोण्याची काहीही गरज नाही. तसेच कमी टाळू असल्यास बाळ मतिमंद होते, हा गैरसमज देखील दिसून येतो._

_*७) बाळाची पाचवी - तीन दिवसापासून तिजोरा, पाच दिवसातून पाच आणि १२ दिवसातून बारसं साजरे केल्यामुळे पहिल्या बारा दिवसांतच बाळाचा चेहरा जणू आरशात पाहण्यासारखा होतो. अनेक महाराष्ट्रीयन समाजात तिजोरा / पाचवी या साजऱ्या करताना 'पाटापूजन' असतं, सोबत वरवंटा (बाळाचे प्रतीक) हे सर्व झोळीत घालून विविध अंगाईगीते गायिली जातात. त्याशिवाय बाळाच्या कानाजवळ जोरजोराने थाळी वाजविली जाते. कारण पुढे बाळ मोठे झाल्यावर त्याची भीड चेपावी, तो घाबरू नये, तो धीट व्हावा, त्याला गडबड- गोंधळाची सवय व्हावी, त्यामुळे झोपेत तो दचकूदेखील नये, शिवाय बाळ का दचकतं, तर म्हणे कधी राक्षस त्याला घाबरवतो, तर कधी सटवी त्याला झोपेत दृष्टांत देते. यावर इलाज काय? तर बाळाच्या उशाशी चाकू, सुरी, कोयता ठेवणे ! का, तर बाळाच्या संरक्षणासाठी. यातून कधी-कधी उलटा परिणाम देखील दिसण्याची शक्यताच अधिक. जसे झोपेत बाळ पुढेमागे सरकले, तर धारदार शस्त्राने त्याला दुखापत होऊ शकते. अशा घटना घडलेल्या आहेत त्याशिवाय बाळ जर हसले, तर ते म्हणे देवाशी हसतं वगैरे वगैरे.*_

                  _काही समाजात पाचवीच्या दिवशी बाळाच्या पाळण्याजवळ किंवा पाटापूजनाच्या विधीस्थळी वही व पेन देखील ठेवले जाते. कारण काय? बाळाच 'नशीब' जे लिहिलं असेल ते येते, या सर्व अंधश्रद्धा दृष्टीस पडतात. त्याशिवाय एकदा का बाळाला पाळण्यात घातलं की, रिकामा पाळणा हलवू नये. कारण काय? तर बाळाच्या पोटात दुखतं म्हणे. हे चूक होय._

_*८) तेलाची मसाज व बाळाची अंघोळ -* वास्तविक बाळाच्या मऊ मुलायम हातांना तेलाने मसाज करण्यास हरकत नाही. परंतु त्याला इतकं रगडलं जातं की, जणू काय बाळ म्हणजे पैलवानच आहे. उगीच त्याच्या हातापायांचा बाक काढण्यासाठी वेडेवाकडे पाय पिळून काढून चांगलं तेल चोपडून व छिद्र दिलेल, या ठिकाणी नाक, कान, बेंबीत तेल घालण्याची एक वाईट प्रथा दिसून येते. बाळ म्हणजे शिलाई मशीन (यंत्र) आहे का, की दिसले छिद्र की टाकले तेल ? उलटपक्षी या तेल घालण्यामुळे सूक्ष्म जंतूंचा किंवा बुरशीचा प्रादुर्भाव होऊन काही आजार जडु शकतात. असे नाकात सतत तेल घातल्यामुळे कालांतराने हे तेल फुफ्फुसात जाऊ शकते व त्यामुळे न्यूमोनिया होऊ शकतो आणि त्याशिवाय रोज डोळ्यात साबणाचे पाणी जाऊनही बाळाला खूपच त्रास होतो. तरीसुद्धा तेल चोपडून उगीच दोन-चार वेळा साबण लावून बाळाची अंघोळ घालण्याची काही गरज नाही. उलट कोमट पाण्याने साधी अंघोळ घालावी किंवा साधे स्पंजिंग करावे, त्याने बाळाला फ्रेश (ताजे) वाटते. त्यासाठी रोज 'तेलंगी मालिश' करण्याची गरज नाही._

_*९) काजळ घालणे - काजळ घातल्यामुळे डोळे चकचकीत, मोठे तेजमय होतात व निरोगी राहतात, ही सर्वांत मोठी अंधश्रद्धा आहे.* वास्तविक प्रत्येक अवयव निरोगी निसर्गतः राहण्यासाठी उपाययोजना केलेली असतेच. आपण फक्त त्याची योग्य ती काळजी घेणे तेवढे पुरेसे. खरे म्हणजे काजळ हे अस्वच्छ बोटाने घातले जाते. शिवाय त्याचा दर्जा हा कुणी तपासला आहे? ते कुठे बनविले गेलेय ? याबाबत नेहमीच शंका येते. याशिवाय डोळ्यात ओलसरपणासाठी अश्रुग्रंथींची व्यवस्था असते. कधी-कधी या अश्रुग्रंथी वाहून आणणाऱ्या नलिकेच्या मुखाजवळ काजळ जाऊन घट्ट बसते व त्यामुळे अश्रू तुंबले जातात. त्यामुळे सूक्ष्म जंतूच्या वाढीला पोषक वातावरण मिळते. त्यामुळे बाळाच्या डोळ्यातून सतत पाणी वाहू शकते व वारंवार सर्दी-पडसे, खोकला होऊ शकतो. त्यामुळे डोळ्यांत कधीही काजळ न घालणेच योग्य._

_*१०) 'आवटळा' काढणे -* जेव्हा बाळाच्या रडण्याचे प्रथमदर्शनी कोणतेही कारण दिसत नाही, तेव्हा त्याची मान लचकली असेल, असे गृहीत धरून त्याच्या मानेला 'आवटळा' काढण्याची मजेशीर, पण अघोरी पद्धत अवलंबली जाते. त्यासाठी बाळाला साडीच्या झोळीत गुंडाळून दोन्ही बाजूने दोन जण धरतात व गरगरा फिरवतात. अर्थात, नंतरही बाळ घालायचा, तो गोंधळ घालतो, कल्पना करा, झोळी फिरवताना पदर निसटला तर?_

_*११) दृष्ट काढणे -* कधी-कधी बाळ दिवसभर किरकिर करतं. दूध पाजायला बेतलं, तर पित नाही. पाळण्यात घातलं, झोपत नाही. कुठल्याही मातेला हे असह्य होतं आणि यावर उत्तम इलाज म्हणजे दृष्ट काढणे. साधारणतः बारशाच्या दिवशी बऱ्याच आया-बाया येतात. बाळाची हेळसांड होते. त्याला नवीन कपडे कधी चावत असतात. कधी कौतुकाने घातलेले दागिने त्याला टोचत असतात. येणारे-जाणारे त्याला सारखे उचलून घेतात. त्यामुळे पुरेशी झोप मिळत नाही आईदेखील गर्दीत व्यस्त असते. तिचंही फारसं लक्ष असतं, असं नाही आणि मग सगळी गर्दी कमी झाली की, बाळ फारच किरकिर करतंय म्हणून त्याची दृष्ट काढायची. मीठ, मोहरी, लाल मिरच्या सगळ्या संशयितांच्या नावाने त्यांच्यावरून ओवाळायच्या आणि गरम तव्यावर किंवा चुलीत टाकायच्या आणि मग ज्याच्या नावाची मोहरी जास्त तडतडतील त्याची दृष्ट लागली, असं गृहीत धरलं जातं. या अंधश्रद्धेमुळे जिच्यावर संशय व्यक्त केला जातो, ती व्यक्तीदेखील नाहक बदनाम होत असते व तिच्यावर तो एक प्रकारचा अन्यायच असतो. विशेषतः विधवा व वांझ स्त्रिया याच्या बळी ठरतात._

               _*कधी-कधी काय होतं, विषाणूंचा संसर्ग असला की, बाळाला थोडीफार सर्दी वगैरे असण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत बाळाला जर बाहेर फिरवून आणलं आणि त्याला थंड वारा-पाणी लागले आणि त्याची रोगप्रतिकारक शत्ती कमी असेल, तर हमखास त्याला ताप येतो. मात्र बाहेरून फिरवून आल्यानंतर जर का ताप आला, तर तो कोणाची तरी दृष्ट लागल्याने आला, असं मानलं जातं. मग ही दृष्ट कुत्र्या-मांजराची असल्याचंही गृहीत धरलं जातं. अशावेळी मग दृष्ट उतरवण्याची आणि निखाऱ्यांवर फेकायची असते, त्या तुरीला उष्णता लागल्याबरोबर ती वितळते. तिला एक वेगळाच आकार प्राप्त होतो आणि मग दृष्ट उतरवणाऱ्या व्यक्तीला तो आकार बाईचा वाटला, तर बाईची, बाप्पाचा वाटला, तरी बाप्याची, कुत्र्याची.... इत्यादी.*_

_*१२) जुलाब, उलट्या दातांमुळे येतात.* आता आपलं बाळ रांगायला लागलंय, असं गृहीत धरू, या काळात आढळणारी ढळढळीत अंधश्रद्धा म्हणजे जुलाब, उलट्या दातांमुळे होतात त्या काळात हिरड्यांची सळसळ होत असल्यामुळे मार्गात येणारी वस्तू उचलून तोंडात घालण्याची क्रिया तो करतो. अशा वेळी जंतुसंसर्ग होऊन उलट्या, जुलाब होण्याची शक्यता असते._

_*१३) लसीकरण -* बाळ जसजसं वाढत जातं, तसतशी लसीकरणाची गरज भासू लागते. ट्रिपल पोलिओचे इंजेक्शन दिले की, ताप येतो, इंजेक्शनची जागा दुखू लागते. पाय आखडतो म्हणून मग भीतीने पालक बाळाला लस देण्याचे टाळतात. उदा. गोवर, कांजण्यासारखा रोग घरची देवता कोपल्याने होतो असं मानलं जातं आणि मग सातव्या दिवशी कोपलेल्या देवीस थंड अन्नपदार्थांचा नैवेद्य देखील दाखवला जातो. ही ठाणे जिल्ह्यातील व मुंबईतील उपनगरातील पद्धत आहे._

_*१४) गालगुंड -* लहान मुलांना गालगुंड हा आजार सहसा होत असतो. गालांना सूज येते. घनपदार्थ गिळण्यास त्रास होतो. काही ठिकाणी या आजारात शेजारणींकडून अथवा नातेवाईकांकडून गळ्यात घालायची माळ आणायची. तिला 'उसणीमाळ' असे म्हणतात. ती रुग्णाच्या गळ्यात घालायची. दुसरे म्हणजे बाळाला जुलाब जास्तच होत असतील, तर वाघनखे त्याच्या गळ्यात बांधायची नांगी बांधतात. भाजल्या जागी किंवा लस टोचल्या जागी रोज पाटीचा तुकडा उगाळून लावणे. पोटदुखीचा त्रास होऊ नये म्हणून तांबड्या- लाल लोखंडी पळीने डाग देणे, आकडी येत असेल, तर कडुलिंबाचा रस पाजणे. या सर्व अज्ञानातून आलेल्या अंधश्रद्धा !_

_*१५) कावीळ -* हे एक रोगाचे लक्षण. याबाबतीत प्रचलित अंधश्रद्धा म्हणजे कावीळ पोटात उतरते, डोक्यात जाते. आणखी अंधश्रद्धा अशा अ) कावीळ झालेल्या व्यक्तीने विशिष्ट औषध लावून पाण्यात हात धुतले म्हणजे पाणी पिवळे होते व कावीळ उतरत जाते. २) रोज सकाळी सात दिवस मंतरलेली खारीक खाणे. ३) दह्यातून कडू औषधाची पुडी रोज घेणे. ४) नाकामध्ये कडू दोडक्याचा दाहक रस टाकला जाणे. या दाहक रसामुळे काहींच्या नाकांच्या नाजूक त्वचेला इजा झाल्याचे पाहण्यात आले आहे._

             _काहीजण कावीळ झाल्यावर विशिष्ट वनस्पतींच्या काड्यांची माळ मांत्रिकाकडून भारून आणतात व ती गळ्यात घातल्यावर कावीळ बरी होते, असे समजतात. शहरात लसणाची माळ घालतात. जसजशी कावीळ उतरत जाते, तसतशी माळ म्हणे लांबत जाते. खरे तर लसणाच्या पाकळ्या किंवा त्या काड्या दिवसेंदिवस सुकत जातात आणि सैल होतात व माळेची लांबी वाढते. खरं तर पुरेशी विश्रांती व डॉक्टरांकडून वरचेवर तपासणी यामुळे कावीळ बरी होते._

_*- सुशीला मुंडे, डोंबिवली*_

*_(मे १९९८)_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०९/०६/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) खंड ३, पुस्तक ४ - समग्र अंधश्रध्दा निर्मूलन, अंधश्रद्धांचा विळखा*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...