🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_बुद्ध व त्याच्या धम्माचे भवितव्य_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/05/blog-post_22.html
*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_*१९५० च्या वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटी ने त्यांच्या 'महाबोधी' ह्या मासिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा " Buddha and the future of his Religion " शीर्षकाखाली लेख प्रकाशित केला होता. त्या लेखाचा मराठीत केलेला हा मुक्त अनुवाद.*_
_*"पृथ्वीतलावर जेवढे म्हणून धर्म संस्थापक होऊन गेले आहेत, त्या सर्वांमध्ये केवळ चौघांनीच भूतकाळ गाजविलेला आहे; एवढेच नव्हे तर वर्तमानकाळ सुद्धा खडबडून जागा केलेला आहे: आणि आपल्या धर्ममतांचा पगडा जनमानसावर कायमचा बसविलेला आहे. बुद्ध, ख्रिस्त, महंमद व कृष्ण हेच ते चार धर्मप्रमुख व धर्मप्रसारक होत. ह्या चौघांच्या व्यक्तिमत्वांची व धर्मप्रसारपद्धतींची तुलनात्मक छानणी केली तर परस्परांत मात्र बराच विरोध आढळून येतो.*_
_*आत्मस्तुती व अहंभाव यांच्यापासूनची अलिप्तता हे खास वैशिष्ट्य चौघांमध्ये फक्त तथागत बुद्धाच्याच बाबतीत प्रकर्षाने उठून दिसते.* बायबलचे वाचन केले तर त्यात सर्वत्र येशू ख्रिस्ताने स्वतःला परमेश्वराचा खास पुत्र म्हणवून घेतल्याचे व जो कोणी त्याला मानणार नाही अशा व्यक्तीस आकाशातील देवांच्या राज्यात प्रवेश करता येणार नाही असे सांगितल्याचे आढळून येते._
_महंमद पैगंबराने खिस्तापेक्षा एक पाऊल पुढे टांकले आहे. त्याने स्वतःला अल्लांचा (परमेश्वराचा) प्रेषित किंवा दूत म्हणवून घेतले आहे; आणि तो सुद्धा शेवटचाच. त्याच्यानंतर कोणीही ईश्वराचा प्रेषित असणार नाही किंवा होणार नाही. आणि म्हणून ज्या कोणाला संसारापासून मुक्ती हवी असेल व जन्नत (स्वर्ग) पाहिजे असेल त्याने कोणतीच आशंका न बाळगता महंमद पैगंबरालाच मानले पाहिजे असे त्याने निक्षून सांगितले आहे._
_श्रीकृष्णाने तर येशू खिस्त व महंमद पैगंबर ह्या दोघांवरही ताण केली आहे. ईश्वराचा पुत्र किंवा शेवटचा दूत वगैरे असे काही एक न म्हणवून घेता किंवा मी देव आहे असेही न म्हणवून घेता श्रीकृष्णाने स्वतःलाच परमेश्वर म्हणजेच देवाधिदेव (देवांचा देव) म्हणवून घेतले आहे. यास्तव सर्वांनी केवळ त्याचीच पूजा करावयास पाहिजे; त्यालाच भजावयास पाहिजे. म्हणजे सगळ्यांना मुक्ती प्राप्त होऊन स्वर्गलाभ होईल असे त्याने सांगितले आहे._
_*परंतु तथागत बुद्धाने ह्या असल्या कोणत्याच गोष्टीचे प्रतिपादन केलेले नाही ख्रिस्त, पैगंबर किंवा कृष्ण यांच्या सारखा अंहभाव बुद्धाने मुळीच बाळगलेला नाही किंवा आत्मप्रौढीही गाइलेली नाही. बुद्धाने केवळ आपण एक मानवपुत्र असल्याचे सांगून सर्व साधारण माणूस म्हणूनच त्याने आपल्या धर्ममतांचा व तत्वज्ञानाचा प्रसार केलेला आहे. इतरांसारखे त्याने स्वतःचे मुळीच दैवीकरण केलेले नाही किंवा आपण अलौकिक चमत्कार केलेले आहेत असे लोकांना सांगून त्यांना भुरळ पाडण्याचा किंवा त्यांची वंचना करण्याचा अल्पसाही प्रयत्न केलेला नाही. तथागत बुद्धाने 'मार्गदाता' व 'मोक्षदाता' यांत अगदी स्पष्ट असा फरक केलेला आहे. आम्ही सांगितल्याप्रमाणे वागाल तरच तुम्हाला मुक्ती मिळेल, स्वर्ग मिळेल, अशी भूमिका ख्रिस्त, पैगंबर व कृष्ण ह्यांनी घेतलेली आहे. उलट मी केवळ एक मार्गदर्शक आहे, त्याप्रमाणे वागणे न वागणे हे तुम्हीच ठरवायचे आहे. माझी तुमच्यावर कोणतीच बळजोरी नाही, अशी भूमिका तथागत बुद्धाची आहे. बुद्धाने आपले म्हणणे लोकांनी मानावे म्हणून ख्रिस्त, पैगंबर किंवा कृष्ण यांच्यासारखी मोक्षाची, स्वर्गाची किंवा मुक्तीची लालूच दाखविलेली नाही. जीवनातील दुःख नष्ट करून सुखप्राप्ती प्रत्येक मनुष्याला करून घेता येते. यावरच तथागत बुद्धाने भर दिलेला आहे.*_
_अजून एक महत्त्वाचा फरक या चौघांत आढळून येतो. ख्रिस्त व पैगंबर हे स्वतःला अनुक्रमे परमेश्वराचा एकुलता एक पुत्र व खास दूत म्हणवून घेत असल्याने त्यांनी सांगितलेले प्रत्येक वचन देवाच्या मुखातील आहे; प्रत्यक्ष देवाने त्यांना सांगितलेले आहे, असा ते दावा करतात. यास्तव ते वचन कधीही खोटे असू शकत नाही आणि म्हणून खिस्ताने किंवा पैगंबराने सांगितलेल्या वचनांवर जगातील कोणत्याही व्यक्तीने अविश्वास दाखवू नये किंवा आशंका बाळगू नये असा आग्रह ते दोघेही करतात. कृष्णाच्या बाबतीत सारेच काही निराळे आहे. कृष्ण हा स्वतःलाच परमेश्वर म्हणवून घेत असल्याने त्याने सांगितलेले प्रत्येक वचन अंतीम सत्य होय आणि म्हणून ते शंकातित आहे, अचूक आहे, असा तो आदेश देतो. परंतु तथागत बुद्धाने असा कोणताच दावा केलेला नाही._
_*'महापरिनिर्वाण सुत्ता' मध्ये तथागत बुद्धाने आनंदाला सांगितले आहे की, माझा धम्म बुद्धिवादावर व अनुभवावर आधारित आहे आणि म्हंणून माझ्या अनुयायांनी मी सांगतो म्हणून सत्य आहे असे समजून अंधानुकरण करू नये, बुद्धिप्रामाण्य व अनुभव हा माझ्या धम्माचा मूलभूत पाया असल्याने कालमानानुरूप व परिस्थितीनुसार त्याच्यात त्यांना बदल करता येतो. एवढेच नव्हे तर माझी जी मते काळाशी अनुरूप व परिस्थितीशी सुसंगत वाटत नसतील ती मते त्यांना टाकूनही देता येतात. याच कारणामुळे तथागत बुद्धाने बौद्ध धर्म शुष्क, काष्ठ न समजता तो सदाहरित व चिरतरुण मानला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यासाठी त्याने आपल्या अनुयायांना नितांत गरज भासेल तेव्हा बौद्धमते परिवर्तनशील करण्यास पूर्णपणे स्वातंत्र्य प्रदान केलेले आहे. असे स्वातंत्र्य दुसऱ्या कोणत्याच धर्मगुरूने आपल्या अनुयायांना दिलेले नाही, किंवा तसे स्वातंत्र्य देण्याचे धाडसही दाखविलेले नाही. कारण त्यांना भीती वाटली असावी की, अशा मुक्त स्वातंत्र्याने त्यांनी प्रस्थापित केलेल्या धर्ममतांचा डोलाराच नेस्तनाबूत होईल व त्यांचे नामनिशाण सुद्धा राहणार नाही. परंतु, अशी भीती बुद्धाला कधीही वाटली नाही. त्यांच्या धर्ममतांची इमारतच मुळात भक्कम अशा पायावर आधारलेली होती. जगातील कोणताच वैचारिक झंजावात आपल्या धम्माला जमीनदोस्त करू शकणार नाही. ह्याची बालंबाल खात्री बुद्धाला होती. हेच तथागत बुद्धाच्या अद्वितीय व्यक्तिमत्वाचे निदर्शक होय.*_
_बुद्धाचे असाधारण व्यतिमत्व समजून घेतल्यावर बुद्धाच्या धम्माची विचारसरणी काय होती, बुद्ध तत्त्वज्ञान कसे होते आणि आजच्या प्रस्थापित धर्माच्या तुलनेत बौद्ध धर्माचे काय स्थान आहे हे समजावून घेणे अत्यावश्यक आहे._
_भारताच्या संबंधात विचार करताना बौद्धधर्म व हिंदुधर्म यांच्या तुलनेत मोजक्या व प्रमुख बाबींमध्ये फक्त दोनच मुद्यांचा परामर्श घेणे उचित ठरेल. हे दोन मुद्दे म्हणजे धर्मविषयक कर्मकांड व चातुर्वर्ण्यव्यवस्था हे होत._
_हिंदू धर्माचा अभ्यास केल्यावर जी बाब प्रकर्षाने जाणवते ती ही की. नीतिमत्ता हिंदू धर्माची आधारशिला नाही. जी काही थोडीफार नीतिमत्ता हिंदू धर्माशी निगडित असलेली आढळते, ती हिंदू धर्माचा अविभाज्य असा घटक नाही. 'धर्म' ह्या प्रचलित शब्दाच्या अर्थामध्येच मूलतः नीतिमत्तेला स्थान नाही. नीतिमत्तेचा संबंध समाज स्वास्थ्याशी निश्चितच लावलेला आहे; परंतु, हिंदू धर्माशी लावला गेलेला नाही. ही अत्यंत आश्चर्यकारक बाब आहे. उलट *बौद्ध धर्म हा मूलतःच नीतिमान् धर्म मानला गेला आहे. नीतिमत्ता ही बौद्धधर्माची सर्वप्रथम व प्रमुख अशी आधारशिला मानली गेली आहे.* इतर धर्म ईश्वराला धर्माचे प्रमुख व मूलभूत अंग मानतात. परंतु, *बौद्ध धर्मात ईश्वराला मुळी स्थानच नाही.* ईश्वराचे स्थान बौद्ध धर्मात नीतिमत्तेने पटकावलेले आहे. जे प्राधान्य इतर साऱ्या धर्मानी ईश्वराला दिले आहे त्याहून काकणभर जास्त प्राधान्य बौद्ध धर्माने नीतिमत्तेला व नीतितत्त्वांना दिलेले आहे._
_*'धम्म' या शब्दात बुद्धाने जो क्रांतिप्रवण असा विचार अंतभूर्त केलेला आहे तोच मुळी इतर धर्माकडून डावलला गेला आहे, दृष्टिआड केला गेला आहे. वैदिकांनी योजलेला 'धर्म' हा शब्द सर्वार्थाने बुद्धाच्या 'धम्म' ह्या शब्दापासून भिन्न आहे. नैतिक मूल्यांशी निगडित असलेला अर्थ वैदिकांच्या 'धर्म' या शब्दाशी केव्हाही सूत्रबद्ध नाही. ईश्वराशी संबंधित धर्मकांड करणे किंवा रोमन पुरोहितांच्या जपजाप्याशी निगडित असलेल्या पारिभाषिक अर्थाने विधी करणे म्हणजे धर्म होय असे ब्राह्मणांनी व पूर्वमीमांसाकार जैमिनी ह्याने धर्माचा अर्थ केलेला आहे. ब्राह्मणांच्या धर्म ह्या कल्पनेनुसार ईश्वरास संतुष्ट करण्यासाठी यज्ञयाग करून बलिप्रदान करणे व जपजाप्यादी पूजाअर्चा करणे, हे सर्व धर्मकांड धर्माशी बद्ध असल्याने ब्राह्मणी धर्माचा किंवा वैदिक धर्माचा नीतिमत्तेशी सुतराम संबंध येत नाही.*_
_*यांच्या अगदी उलट बुद्धाने धम्माचा अर्थ केलेला आहे. पूजाअर्चा, जपजाप्य, यज्ञयाग इत्यादीं ईश्वर विषयक कर्मकांडाशी बुद्धाने सांगितलेल्या धम्माचा काडीचाही संबंध येत नाही, ईश्वरविषयक सारे कर्मकांड करणे म्हणजेच धर्म होय हे बुद्धाने सपसेल नाकारले आहे. ईश्वर विषयक कर्मकांडाऐवजीं तथागताने आचारशीलेची प्रतिष्ठापना धर्माचा गाभा म्हणून केलेली आहे. ब्राह्मण आचार्य व तथागत बुद्ध ह्या दोघांनी जरी धर्म हा एकच शब्द वापरला असला तरी दोघांच्याही मूलभूत अर्थामध्ये मात्र वर निर्देशिल्याप्रमाणे फरक आहे. तथागत बुद्ध हाच असा एक धर्मवेत्ता होऊन गेलेला आहे की ज्याने नीतितत्त्वांना धर्माचा एक आधारभूत पाया मानलेला आहे.*_
_भगवद्गीतेचा अभ्यास केला म्हणजे असे दिसून पडते की, कृष्णसुद्धा स्वतःला पारंपारिक धार्मिक विधी व जपजाप्य इत्यादी कर्मकांडापासून अलिप्त ठेवू शकला नाही. उलट त्याने भगवद्गीतेत उपदेशिल्याप्रमाणे निष्काम कर्माची किंवा अनासक्ती योगाची लोकांच्या मनावर भुरळ पाडून कर्मकांडाचाच उदोउदो केलेला आहे. बालवीर (स्काउट) जसा कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता परोपकार करतो, तशा अर्थाचे निष्काम कर्म ह्या शब्दाची व्याख्या आहे असे म्हटले जाते. परंतु निष्काम कर्माचा हा अर्थ, तो शब्द मुळात ज्या अर्थाने वापरला गेला. त्या अर्थापासून दिशाभूल करणारा आहे. निष्काम कर्म ह्या शब्दयोजनेतील 'कर्म, हा शब्द उदात्त भावनेने वापरल्या जाणाऱ्या परोपकार कृत्य ह्या अर्थाने मुळीच वापरला गेला नाही. तर तो शब्द ब्राह्मणांनी किंवा जैमिनीने योजलेल्या ईश्वरविषयक आचार ह्या अर्थाने वापरला गेला आहे. धार्मिक विधींच्या दृष्टिकोनातून पूर्वमीमांसाकार जैमिनी व भगवद्गीताकार कृष्ण ह्या दोघांनी फक्त एकाच बाबीत मतभेद व्यक्त केलेला आहे._
_धार्मिक जपजाप्याच्या व पूजाअर्चेच्या विधीमध्ये ब्राह्मणांनी दोन विभाग केलेले आहेत. एक नित्य कर्म व दुसरे नैमित्तिक कर्म. दररोज व नियमित स्वरूपात केल्या जाणाऱ्या विधी नित्य कर्मात मोडल्या गेल्या, त्यांची सांगड कोणत्याच फलाशी घातली गेली नाही. ह्याच कारणास्तव त्यांना निष्काम कर्म म्हटले गेले. उलट ज्या विधी कोणत्या तरी खास निमित्ताने केल्या जात त्यांना नैमित्तिक कर्म म्हटले गेले. मनामध्ये जेव्हा कोणत्या तरी फलाची अपेक्षा धरली जात असे किंवा इच्छा केली जात असे तेव्हाच ही नैमित्तिक कर्मे केली जात. म्हणूनच त्यांना 'कामायकर्म' असेही म्हटले गेले. भगवद्गीतेत कृष्णाने ज्या कर्माचा धिक्कार केलेला आहे तेच हे कामायकर्म होय. फलाच्या अपेक्षेने न केल्या जाणाऱ्या जपजाप्यादी नित्य कर्माचा म्हणजेच निष्काम कर्माचा कृष्णाने कधीही निषेध केलेला नाही. उलट त्याने त्यांचे गुणगानच गाइले आहे. निष्काम कर्माच्या संबंधात कृष्णाची विचारसरणी लक्षात घेता असाच निष्कर्ष काढावा लागतो की, पूजाअर्चा, जपपाप्य ही नित्यकर्मे करण्यासाठी कृष्णाने नैतिक आचारावर कदापि भर दिलेला नाही. कृष्णाच्या दृष्टिकोनातून धर्म ही नैतिक बाब नसून नुसते कर्मकांडच आहे; आणि तेही कर्मकांड असे की, ज्याचा निष्काम कर्माशी काडीचाही संबंध नाही अशा प्रकारचा जपजाप्य किंवा यज्ञयाग होय._
_*दुसरा एक महत्त्वाचा फरक बौद्धधर्म व हिंदुधर्म यात आहे. हिंदुधर्म हा असमानतेचा पुरस्कार करणारा आहे. हिंदू धर्माने मान्य केलेली चातुर्वर्ण्य समाजपद्धती हीच असमानतेची मूलभूत आधारशिला आहे. चातुर्वर्ण्य समाजपद्धतीमुळेच जातीभेद निर्माण होऊन उच्चनीचतेची भावना लोकात दृढ झाली. अगदी ह्या उलट समतेचा पुरस्कार करण्यासाठी बुद्ध उभा ठाकला. त्याने चातुर्वर्ण्यविरूद्ध केवळ आवाजच उठविला नाही, तर त्याने एक महान असा लढाही पुकारला व चातुर्वर्त्यांची पाळेमुळे खणून काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला.*_
_*हिंदु धर्मशास्त्रानुसार शूद्रांना व स्त्रियांना विद्या देण्याचे नाकारले गेले आहे. एवढेच नव्हे तर संन्यास घेण्याचा अधिकार सुद्धा त्यांना नाकारला गेला आहे. परंतु बुद्धाने असे कोणतेच बंधन घातलेले नाही, किंवा कुणाला मज्जावही केलेला नाही. त्याने आपल्या भिक्खुसंघात इतरांबरोबर शूद्रांना सुद्धा सामील करून घेतले. त्याने चातुर्वर्थ्यांचा कोणताच पंक्तिप्रपंच केला नाही. एवढेच नव्हे तर त्याने स्त्रियांचा सुद्धा भिक्खुणी संघ स्थापना केला व त्यांनाही पुरुषांबरोबर समानतेचा अधिकार दिला. अशाप्रकारे असमानतेवर आधारलेल्या चातुर्वर्ण्यांचा बिमोड करून व समानतेचा पुरस्कार करून बुद्ध जेव्हा आपल्या धर्ममतांचा प्रभाव लोकांवर पाडू लागला तेव्हा साहजिकच हिंदू धर्माला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी फार आटापिटा करावा लागला. त्यासाठी हिंदू धर्माला हिंसेचा त्याग करून बुद्धाने पुरस्कारलेली अहिंसा आत्मसात करावी व मांस भक्षणाचा त्याग करावा लागला. एवढेच नव्हे तर वेदप्रामाण्यालाही झुगारून देण्यास हिंदू धर्माने सिद्धता दर्शविली. परंतु चातुर्वर्ण्यवरील पकड मात्र सोडावयास हिंदू धर्म तयार होऊ शकला नाही. बुद्धाला चातुर्वर्ण्यपद्धती मान्य नसल्याने तो सतत प्रतिकार करीत राहिला. ह्याच कारणास्तव जैन धर्मापेक्षा बौद्ध धर्माचा व बुद्धाचा हिंदू धर्मियांनी सदोदित द्वेष केला व वैरभाव बाळगला. चातुर्वर्णांविरुद्ध बुद्धाने उठविलेला आवाज दाबून टाकण्यासाठी हिंदू धर्माने तार्किक दृष्टिकोनातून नव्हे तर तात्त्विक दृष्टिकोनातून चातुर्वर्णांचे समर्थन करण्यास सुरवात केली. ह्या नाविण्यपूर्ण समर्थनाची उभारणी सर्वप्रथम भगवद्गीतेत करण्यात आली.*_
_भगवद्गीता निश्चित कशाचा उपदेश करते हे कोणालाच नीट सांगता येत नाही. परंतु हे मात्र निश्चित आहे की, भगवद्गीता चातुर्वर्थ्यांचे पुरेपूर समर्थन करते. वस्तुतः भगवद्गीता लिहिण्यामागे चातुर्वण्यांचा पुरस्कार करण्याचा प्रमुख हेतू आहे. भगवदगीतेने चातुर्वर्थ्यांचे समर्थन अशा कोणत्या नाविन्यपूर्ण पद्धतीने केलेले आहे ?_
_कृष्ण म्हणतो, "मी स्वतः परमेश्वर असल्याने ह्या चातुर्वर्णांची उभारणी मीच केलेली आहे. ती गुणकर्माच्या तत्त्वप्रणालीवर आधारित आहे." याचाच अर्थ असा की, प्रत्येक मनुष्याचे समाजातील स्थान व त्याचा व्यवसाय त्या त्या मनुष्याच्या अंगीभूत गुणावर ठरविण्यात आलेला आहे. यावरून दोन गोष्टी उघडकीस येतात._
_पहिली गोष्ट अशी की, गुणकर्मशः आधारित चातुर्वर्ण्यपद्धती ही नवीन तत्त्वप्रणाली म्हणून मांडली गेली आहे. पुरातन तत्त्व प्रणालीनुसार चातुर्वर्ण्य वेदप्रामाण्यावर आधारलेले आहे. वेद हे ईश्वरप्रणीत व अपरिवर्तनीय मानले गेले आहेत. त्यामुळे वेदातून सांगितलेले चातुर्वर्ण्यसुद्धा ईश्वरप्रणीत व अपरिवर्तनीय मानले गेले आहे. *बुद्धाने वेदाच्या अपौरुषेयत्त्वावर व अपरिवर्तनशीलतेवर प्रहार केल्यामुळे पर्यायाने चातुर्वर्णांवर सुद्धा प्रत्याघात करून त्याचा पुरातन पायाच उखडून टाकलेला आहे.* याच कारणास्तव अविभाज्य वाटणाऱ्या चातुर्वर्ष्याला टिकविण्यासाठी हिंदू धर्माला भगवद्गीतेने पुरस्कारलेल्या तत्त्वप्रणालीचा नवीन व भक्कम आधार घेणे क्रमप्राप्त झाले. परंतु कृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेल्या ह्या नव्या तत्त्वाप्रणालीचे समर्थन कितपत योग्य आहे ? बऱ्याच हिंदू धर्मियांना ही तत्त्वप्रणाली अत्यंत समर्थनीय व निरुत्तर करणारी वाटते. एवढेच नव्हे तर अहिंदूंना सुद्धा ती सत्य व विलोभनीय वाटते. चातुर्वर्ण्य हे केवळ वेदप्रामाण्यावर अवलंबून ठेवले गेले असते तर ते कधीचेच पूर्णपणे रसातळाला गेले असते. अशी माझी पक्की खात्री आहे. भगवद्गीतेने केलेले शाश्वत जीवनाचा सत्याभास निर्माण करणारे चातुर्वण्याचे नवे समर्थन अत्यंत दिशाभूल करणारे व चुकीचे आहे. कारण हा नव्या समर्थनानेच जातीसंस्थेला जन्म दिलेला आहे._
_चातुर्वर्ण्यचा हा नवीन सिद्धांत मुळातून सांख्य दर्शनापासून घेतलेला आहे. श्रीकृष्णाने तो काही मूलभूत असा सांगितलेला नाही. चातुर्वर्ण्याला पाठबळ देण्यासाठी त्याने सांख्य तत्त्वज्ञानापासून उसणवारी केलेली आहे. परंतु ही उसणवार करताना मात्र त्यात त्याने आपल्या कल्पनेनुसार अनेक युक्तिवाद घुसडलेले आहेत. *सांख्य तत्त्वज्ञानाचा उद्घोषक कपिल ह्याने ईश्वराचे अस्तित्व नाकारले होते.* वस्तू जर अजड मानली गेली तर ईश्वराचे अस्तित्व मान्य करण्याचे काहीच कारण पडत नाही. वस्तू जड नाही; ती अजड आहे: अस्थिर आहे. वस्तू ही रज, तम व सत्व ह्या तीन गुणांनी परिपूर्ण असते. प्रकृती ही ह्या तीन गुणांच्या संतुलनामुळे जड भासत असते. तीन गुणांपैकी एक गुण जरी इतर दोन गुणांपेक्षा प्रबळ झाला तरी प्रकृतीतील समतोलपणा बिघडून तिच्यात क्रियाशीलता निर्माण होते. हेच सांख्य तत्त्वज्ञानाचे सार होय. या सिद्धान्ताबाबत कोणताच वाद असू शकत नाही. हा सिद्धांत बहुतेक खराही आहे. व्यक्तिगत प्रत्येकजन प्रकृतीचाच घटक असल्याने सत्व, रज व तम ह्या त्रिगुणांनी परिपूर्ण असतो. एवढेच नव्हे तर या तीन गुणांत परस्परांवर प्रभुत्व मिळविण्याची अहमहमिका लागत असावी हे सुद्धा मान्य केले जाऊ शकते. परंतु एखाद्या व्यक्तीतील विशिष्ट गुण जन्माच्या वेळी इतर दुसऱ्या गुणांवर प्रभुत्व मिळवून सर्वकाळच नव्हे तर मरणाच्या अंतिम क्षणापर्यंत सातत्याने वास करीत राहील, हे कसे मान्य केले जाऊ शकते ? या अनुमानाला सांख्य तत्त्वज्ञानात किंवा प्रत्यक्ष अनुभवात कुठलाच आधार नाही. ज्या वेळेस कृष्णाने गुणकर्मशः चातुर्वर्ण्यची कल्पना ग्राह्य मानली त्यावेळेस जर हिटलर किंवा मुसलोनी जन्माला आले असते तर एक रंगाऱ्याचा पोर व दुसरा गवंड्याचा पोर जगाला नमविणारे हुकूमशहा कसे झाले याचे कोडे उलगडण्यास श्रीकृष्णाला सुद्धा कठीण गेले असते._
_वस्तूशी निगडित असणारी अशी एक बाब आहे. ती ही की, व्यक्तिमात्रागणिक प्रकृती सतत बदलत असते. कारण गुणांची सापेक्ष स्थितीसुद्धा परिवर्तनशील आहे. प्रभुत्व मिळविण्याच्या सापेक्ष स्थितीत गुण जर सदोदित बदलत असतील तर मनुष्याची वर्णामध्ये विभागणी करण्याची चिरकालीन व स्थायी स्वरुपाची चातुर्वर्ण्य पद्धती किंवा व्यवसाय पद्धती मान्यच होऊ शकत नाही. त्यामुळे भगवद्गीतेची विचारसरणी संपूर्णतः कोलमडून पडते. परंतु ह्या अगोदर मी म्हटल्याप्रमाणे हिंदू धर्मियांना तिच्या सत्याभासामुळे व दर्शनीय चांगलेपणामुळे भुरळ पडलेली आहे, ते तिचे गुलाम झालेले आहेत. परिणामी हिंदू धर्माने चातुर्वर्ण्य पद्धतीचा सतत उदोउदो केलेला आहे आणि असमानतेवर आधारलेल्या जातिसंस्थेला कवटाळून धरलेले आहे. हिंदू धर्माच्या या दोन दुर्गुणांपासून बौद्धधर्म पूर्णतः अलिप्त राहिलेला आहे._
_बौद्ध तत्त्वज्ञानच हिंदूंना तारू शकते असे अनेक लोकांना वाटते. परंतु ते काहीसे उदासीन झालेले आहेत. भारतात पुन्हा बौद्ध धर्म मूळ धरू शकणार नाही किंवा त्याचे पुनरुज्जीवन होऊ शकणार नाही असे त्यांना वाटते. परंतु त्यांचा हा निराशावाद मला मान्य नाही._
_हिंदुधर्म मानणाऱ्यांत दोन विचारसरणीचे लोक आहेत. पहिल्या विचारसरणीचे लोक सर्व धर्म खरे आहेत, एवढेच नव्हे तर सारखेच आहेत असा विश्वास बाळगणारे आहेत. ह्या विचारसरणीला पाठिंबा देणारे इतर धर्मीय सुद्धा भरपूर आहेत. परंतु सर्व धर्म खरे आहेत किंवा सारखे आहेत असे म्हणण्याइतका मिथ्यावाद दुसरा तरी कोणताच नसेल. दुसऱ्या विचारसरणीचे जे हिंदू आहेत, त्यांना असे वाटते की, हिंदू धर्मात अनेक भोंगळपणाच्या व मिथ्या गोष्टी आहेत. परंतु हे लोक उघडपणे असल्या गोष्टी मान्य करण्यास किंवा उच्चारण्यास धजत नाहीत. हे असे का व्हावे हे मात्र कळत नाही !_
_*धर्म हा समाजजीवनातील वारसाचा एक भाग असतो. त्याच्याशी मनुष्याचे जीवन, त्याची प्रतिष्ठा, त्याचा स्वाभिमान इत्यादी गोष्टी निगडित असतात. याचमुळे एखाद्याला स्वतःच्या धर्माचा त्याग करणे सहजासहजी शक्य होत नसते. बरोबर असो वा चूक असो माझा देश म्हणण्यात जो एकप्रकारचा स्वाभिमान अंतर्यामी वसत असतो त्याचप्रमाणे बरोबर असो किंवा चूक असो माझा धर्म' म्हणण्यात सुद्धा एक प्रकारचा ज्वलंत स्वाभिमान अंतःकरणात दडलेला असतो. ह्याच कारणास्तव धर्मातील अनिष्ट व अहितकारक बाबींची जाणीव असूनही अनेक हिंदू धर्मीय स्वतःच्या धर्माचा त्याग करण्याचे धारिष्ट्य न दाखविता त्यालाच कवटाळून राहण्यासाठी दुसरे अनेक मार्ग धुंडाळीत असतात. काही लोक स्वतःचे सांत्वन अशा विचाराने करतात की, सर्वच धर्म सदोष आहेत. त्यामुळे हा धर्म वाईट की तो धर्म वाईट असा विचारच मुळी करू नये. काहींना स्वदेश प्रेमाच्या भोंगळ अभिमानाने बौद्धधर्म अत्युत्तम म्हणवून सुद्धा उघड रीतीने स्वीकारण्यास लाज वाटते. या सगळ्या प्रवृत्तींचा एकच परिणाम होणार आहे. कालांतराने धर्म लय पावणार आहे; जीवनधारणेस अयोग्य बनणार आहे. हिंदू धर्मात अशी काही पोकळी निर्माण होणार आहे की, जिच्या परिणामामुळे हिंदू धर्माचे शतशः तुकडे होणार आहेत. ही स्थिती आल्यावरच हिंदूचे डोळे खाडकन उघडतील व इतःपर काहीतरी विधायक व सुयोग्य पाऊल उचलले पाहिजे असे त्यांना वाटू लागेल. मला खात्री आहे की त्यावेळेस त्यांचे पाऊल निश्चितपणे बौद्ध धर्माकडे वाटचाल करू लागेल. ठेवण्यास मार्गदर्शक ठरेल. प्रफुल्लित करणारा आहे. बौद्ध तत्त्वज्ञानच त्यावेळेस त्यांची जीवनधारणा शाबूत ठेवण्यास मार्गदर्शक ठरेल. हाच एक आशेचा एकमेव किरण हिंदूंचे जीवन प्रफुल्लित करणारा आहे. एवढेच नव्हे तर अनेकविध मार्गांनी त्यांचे जीवन सुफलित करण्यास बौद्ध धर्मच कारणीभूत ठरणार आहे.*_
_आज प्रत्येक धर्माला एका प्रश्नाचे उत्तर देणे भाग आहे. पीडित व पददलित जनतेचा मानसिक व नैतिक अभ्युदय घडवून आणण्याचे सामर्थ्य कोणत्या धर्मात आहे ? आज हयात असणाऱ्या धर्मात अशाप्रकारचे सामर्थ्य नसेल तर तो धर्म कुचकामी होय._
_लाखो दलित व अस्पृश्य गणल्या गेलेल्या लोकांची मानसिक व नैतिक स्थिती हिंदुधर्म म्हणविणारा धर्म सुधारू शकतो काय ? दुर्दैवाने याचे उत्तर' नाही' असेच म्हणावे लागते. मग ह्या लाखो दलित व अस्पृश्य लोकांनी हिंदू धर्मातच खितपत पडून राहावे अशी अपेक्षा हिंदूंनी करावी काय ? ही अपेक्षा सर्वथा अयोग्य होईल. खरे पाहता हिंदू धर्म आज ज्वालामुखीच्या तोंडाशी रेंगाळत आहे. आज जरी हिंदू धर्माचे अस्तित्व दिसत असले तरी कधी ज्वालामुखीचा उद्रेक होऊन तो रसातळास पोहचेल याची शाश्वती नाही. कारण लाखो पददलित लोकांची अस्मिता जेव्हां जागृत होईल व आपल्या अधोगतीस हिंदू धर्मच कारणीभूत झाला हे कटु सत्य त्यांच्या नजरेस पडेल तेव्हा अनावर विद्रोहाची लाट हिंदू धर्माला नेस्तनाबूत करून टाकील. या संबंधात इतिहासाचा मागोवा घेतला तर रोम साम्राज्यात मूर्तीपूजा मानणाऱ्या व गुलामगिरीचा कडाडून पुरस्कार करणाऱ्या सनातनी धर्माचा पाडाव ख्रिस्ती धर्माने कसा केला ह्याचे स्मरण झाल्यावाचून राहत नाही. *अनुचित रूढीप्रिय सनातनी धर्म जेव्हा सर्वसामान्य जनतेला मानसिक व नैतिक स्वातंत्र्य बहाल करू शकत नाही, हे पाहिल्यावरच रोम साम्राज्यातील लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला.* रोम साम्राज्यात जे घडले त्याच इतिहासाची पुनरावृत्ती भारतात देखील निश्चितपणे होणार आहे. *भारतातील सर्वसामान्य जनतेला सत्याची ओळख पटेल तेव्हा ती जनता आपोआपच बौद्ध धर्माचा मार्ग चोखाळणार आहे.*_
_हिंदुधर्म च बौद्ध धर्म ह्यांच्यात तौलनिक विचार केल्यानंतर इतर धर्माच्या विचारसरणीत बौद्ध विचारधारा काय आहे, हे आता आपण संक्षेपाने बघू या._
_*कोणतीही समाजव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी त्या समाजव्यवस्थेस एकतर कायद्याचा किंवा नीतिमत्तेचा आधार घ्यावा लागतो. कायदा आणि नीतिमत्ता ह्या दोहोंपैकी एखादी गोष्ट जरी नसेल तर समाजस्वास्थ अबाधित राहत नाही. कोणत्याही समाजात कायद्यांना फार थोडा वाव दिलेला असतो कारण थोड्या लोकांना सामाजिक शिस्तीत बद्ध करण्यासाठीच कायद्यांची योजना केलेली असते. त्या कायद्यांच्या जोरावर त्यांना योग्यप्रकारे वागायला भाग पाडून समाजस्वास्थ्य टिकवून ठेवता येते. उलट बहुसंख्य लोकांना नीतिमत्तेच्या धाकाने समाजजीवन सुस्थिर ठेवण्यास प्रवृत्त करता येते. ही बाब लक्षात घेतली म्हणजे नीतिमत्तेवर आधारित धर्म समाजजीवन सुस्थिर करण्याचे व समाजस्वास्थ टिकवून ठेवण्याचे प्रमुख तत्त्व आहे हे मानावे लागते.*_
_*दुसरी गोष्ट, धर्म हा विज्ञानाशी विसंवादी असून चालत नाही. तो जर विज्ञानाशी विसंगत असेल तर तो लोकादरास पात्र ठरत नाही. तो हास्यास्पद ठरून जीवनविषयक तत्त्वज्ञान रुजविण्यास असमर्थ ठरतो. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास असे म्हणता येईल की, धर्माला जर कार्यप्रवण व्हावयाचे असेल तर त्याचा संबंध कार्यकारणाशी म्हणजेच विज्ञानाशी दृढतर असावयास पाहिजे.*_
_*तिसरी गोष्ट, सामाजिक नीतिमत्ता ह्या दृष्टीने धर्माला एका विशिष्ट चाचणी परीक्षेत उतरावे लागते. धर्म हा केवळ नीतिबद्ध असून चालत नाही तर त्याला स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या त्रयींच्या चाचणीत उतरावे लागते. ह्या त्रयींशिवाय कोणताही धर्म समाजधारणेस निरर्थकच ठरत असतो.*_
_*चवथी गोष्ट, धर्माने दारिद्र्याचे गोडवे गाऊन त्याचे उदात्तीकरण केलेले केव्हाही बरे नसते. धर्माच्या नावाखाली श्रीमंतांच्या संन्यास वृत्तीचे स्तोम माजविले गेले तर ते एकदाचे मान्य केले जाऊ शकते. परंतु गरिबी ही पूर्वजन्माचे फळ आहे असे म्हणून दारिद्र्याचे स्तोम माजविले गेले तर धर्माचा विपर्यास करणे होते; अनैतिकता व गुन्हेगारी ह्यांना चिरस्थायी स्वरूप प्राप्त करून देणे होते; एवढेच नव्हे तर नरकाच्या कल्पनेप्रमाणे एका यातनायुक्त जीवनाला मान्यता देणे होते.*_
_वरील या सगळ्या कसोट्यांवर कोणता धर्म पुरेपूर उतरू शकतो ? ह्या प्रश्नाचा विचार करताना एक गोष्ट स्मरणात ठेवणे आवश्यक आहे. *आजच्या काळात ' महात्मा' अवतरण्याचे दिवस राहिले नाहीत. त्यामुळे एखादा नवीन धर्म उदयास येण्याची तिळमात्र शक्यता राहिलेली नाही.* जे धर्म आज पृथ्वीच्या पाठीवर अस्तित्वात आहेत त्या मधूनच योग्य तो धर्म निवडणे व त्याचे अनुयायीत्व पत्करणे भाग आहे._
_*उपरिनिर्दिष्ट कसोट्यांपैकी केवळ एकाच कसोटीला किंवा दोन कसोट्यांना उतरणारा अस्तित्वात असणाऱ्या धर्मांमधून एखाद दुसरा धर्म आढळतो. परंतु प्रश्न असा आहे की, साऱ्याच कसोट्यांना उतरणारा असा कोणता धर्म आहे ? माझ्या माहीती प्रमाणे केवळ बौद्ध धर्मच वरील साऱ्या कसोट्यांना पूर्णपणे उतरू शकतो. बौद्ध धर्म हाच एक असा धर्म आहे की त्याची कास धरणे जगाला आज भाग आहे. आजचे आधुनिक जग प्राचीन जगाच्या मानाने फारच वेगळे आहे. त्यालाच आज धर्माची खरी निकड आहे. आणि ती निकड भागविण्यासाठी त्याला बुद्धाच्या धर्माचीच निवड करावी लागणार आहे.*_
_*माझे हे प्रतिपादन लोकांना पटणार नाही. कारण बहुतेक लोकांनी तथागत बुद्धावर लिहिताना बुद्धाने केवळ अहिंसेचेच प्रतिपादन केलेले आहे त्याशिवाय दुसरे कोणतेच उच्च विचार त्याने प्रदर्शित केलेले नाहीत असे सांगितल्याचे आढळते. त्यामुळे बौद्धधर्म आजच्या जगाची निकड भागवू शकणार नाही असे त्यांना वाटण्याचा संभव आहे. परंतु हा विचार दिशाभूल करणारा आहे. बुद्धाने अहिंसा तत्त्वाचे प्रतिपादन केलेले आहे हे सत्य आहे. परंतु त्याचे महत्त्व मी मुळीच कमी लेखीत नाही. कारण अहिंसेचे तत्त्व हे महान तत्त्व आहे. त्याचा अंगिकार केल्याशिवाय जगाचे विध्वंसनापासून तारण करता येणार नाही. बुद्धाने अहिंसेव्यतिरिक्त दुसऱ्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत, हे मला प्रामुख्याने म्हणावयाचे आहे. धम्माचा भाग म्हणून बुद्धाने सामाजिक, वैयक्तिक, आर्थिक व राजकीय स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला आहे. त्याने समानता केवळ पुरुषांपुरतीच मर्यादित ठेवली नाही तर ती समानता स्त्री-पुरुषांमध्येसुद्धा पुरस्कारली आहे. बुद्धाने लोकसमाज जीवनातील नानाविध अंगप्रत्यंगाचा सखोलतेने अभ्यास केलेला आहे. त्याचे तत्त्वज्ञान अत्याधुनिक असून त्याच्या धम्माचा प्रमुख हेतू ऐहिक जीवनात मनुष्याला सुख समाधान प्राप्त करून द्यायचा आहे. परंतु हे समाधान मरणानंतर स्वर्ग नावाच्या न पाहिलेल्या ठिकाणी नव्हे तर ह्याच जगी ह्याच डोळा मिळवून द्यावयाचा आहे. बुद्धाशी तुलना करता येईल असा जगात कोणताच धर्मगुरू मिळणार नाही. बुद्धाचे हे खास वैशिष्ट्य आहे.*_
_*बौद्ध धर्माच्या श्रेष्ठत्वाच्या या साऱ्या बाबींचा विचार केल्यावर साहजिकच असा प्रश्न उभा राहतो की, बौद्धधर्म प्रसाराचे स्वप्न कसे साकार करता येईल ? बौद्धधर्म प्रसार साऱ्या विश्वात करून घ्यावयाचा असेल तर पुढील तीन गोष्टींचा गंभीरतेने विचार होणे जरूरीचे आहे.*_
_*पहिली गोष्ट ही की, बौद्धधर्माचा बायबल सदृश प्रमाणभूत असा एकमात्र ग्रंथ तयार करणे, दुसरी- गोष्ट बौद्ध भिक्खू संघाच्या संघटनेत, ध्येयधोरणात व कार्यप्रणालीत आमूलाग्र बदल घडवून आणणे आणि तिसरी गोष्ट ही की. आंतरराष्ट्रीय बौद्धसेवा संघ स्थापन करणे.*_
_*बौद्धधर्म प्रसाराच्या दृष्टीकोनातून बौद्धधर्माचा बायबल सारखा एकमेव प्रमाणभूत ग्रंथ निर्माण करणे ही सर्वप्रथम गरज आहे. बौद्ध वाङ्मय अत्यंत अफाट आहे. बौद्ध वाङ्मयाच्या अथांग महासागरात एखाद्याने बौद्ध धर्माचे सार समजून घेण्यासाठी कितीही बुड्या मारल्या तरी हे हस्तगत करता येणार नाही. बौद्धधर्माच्या तुलनेत इतर धर्मात मात्र एक मोठी सोय आहे. ती ही की, त्या त्या धर्माचा सारभूत एकमात्र धर्मग्रंथ काखेत घेऊन कुठेही नेता येणारा व कुठेही वाचन करता येऊ शकणारा हाताळण्याजोगा कैलेला आहे. परंतु बौद्धधर्मात असा एकमेव ग्रंथ नसल्यामुळे सर्व साधारण बौद्ध अनुयायांची अत्यंत कुचंबना होते. बौद्ध ग्रंथसंभारातील धम्मपद' हा ग्रंथ ही उणीव काहीशी भरून काढू शकतो. परंतु भारतातील हिंदी भाषेत तयार केलेला धम्मपद हा ग्रंथ ही अपेक्षा पूर्ण करण्यास मात्र थिटा ठरलेला आहे. प्रत्येक धर्म कोणत्या ना कोणत्या श्रद्धेवर आधारित आहे. परंतु ही श्रद्धा पारंपारिक संप्रदायाच्या स्वरुपात आत्मसात केली जाऊ शकत नाही. ह्या श्रद्धेला पुराण, महाकाव्य ह्यासारख्या किंवा साहित्यातील कल्पनाविलासाने सजलेल्या कथावस्तू सारख्या गोष्टींची आवश्यकता असते. भारतीय धम्मपद अशा प्रासादिक भाषेत गुंफले गेलेले नसल्याने ते केवळ शुष्क तत्त्वज्ञानाचीच चर्चा करून श्रद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न करते.*_
_*यास्तव नियोजित बौद्ध धर्माच्या एकमेव ग्रंथात संक्षेपाने बुद्धाचा जीवनपट, चिनी धम्मपद, काही महत्त्वाचे बुद्धाचे संवाद, बौद्ध धर्मीय लोकांच्या जन्म, मृत्यू, लग्न इत्यादी सामाजिक विधींची माहीती ह्यांचा समावेश होणे आवश्यक आहे. परंतु अशाप्रकारचा एकमेव धर्मग्रंथ तयार करताना भाषेच्या बाबींकडे दुर्लक्ष केले जाता कामा नये. तो ग्रंथ अशाच जिवंत भाषेत लिहिला जावा की त्या भाषेने माणसाचे हृदय हेलावले जावे व त्याचे मन मंत्रमुग्ध व्हावे. ती भाषा रटाळ, कंटाळवाणी किंवा नुसतीच गंभीर किंवा उगीचच भारदस्त असू नये. ग्रंथाच्या भाषाशैलीत लालित्य असावे, माधुर्य असावे, ती भाषा प्रासादिक, मनमोहक व ओजस्वी असावी. तरच ती लोकाच्या मनावर बिंबू शकेल, ठसू शकेल.*_
_*हिंदू संन्यासी व बौद्ध भिक्खू ह्या दोहोंत जमीनअस्मानचा फरक आहे. हिंदू संन्यासाला जनाशी, समाजाशी काही कर्तव्य नसते. तो जगापासून पराङ्मुख झालेला असतो, समाज जीवनापासून दूर पळालेला असतो. त्यामुळे तो जगाच्या दृष्टिकोनातून मृतवत असतो, परंतु बौद्ध भिक्खूचे तसे नाही. त्याचा जगाशी व समाजजीवनाशी घनिष्ट संबंध असतो. तो समाजाशी कर्तव्यबद्ध असतो. भिक्खूला संन्याशासारखा एकटा दुकटा न ठेवता तो संघटनेने राहावा, त्यांचा संघ असावा ह्याचा हेतू तरी काय ?*_
_*बौद्ध धमात सागितलेल्या आदर्श तत्त्वप्रणालीप्रमाणे समाज व्यवस्था निर्माण करणे, समाजातील प्रत्येक घटकाला नीतितत्त्वांनी वागण्यास कार्यप्रवृत्त करणे व प्रापंचिक लोकांपुढे स्वतःच्या आदर्श वागणुकीचा एक उत्तम नमुना ठेवणे हे प्रमुख हेतू बौद्ध भिक्खू निर्माण करण्यामागे होते. सर्व सामान्य माणसाला बौद्ध तत्त्वज्ञान सहजासहजी आकलन होणारे नाही; याची कल्पना बुद्धाला होती. तथापि ते त्यांनी थोडे फार समजावून घ्यावे व त्यासाठी त्यांच्या नजरेसमोर बौद्ध विचारप्रणालीशी बद्ध असलेला सुसंघटित बौद्ध भिक्खूंचा आदर्श संच असावा, हे भिक्खू संघाच्या निर्मितीचे कारण होय. याच कारणास्तव विनय नावाच्या आदर्श नियमांनी भिक्खू संघाला बद्ध केले गेले. तथापि बौद्ध भिक्खू संघ स्थापनेच्या वेळी बुद्धाच्या मनात दुसरे अनेक हेतू होते. सर्वसाधारण लोकांना सत्य आणि निरपेक्ष मार्गदर्शन देणाऱ्या बुद्धिवादी लोकांचे संघटन करणे आवश्यक आहे असे बुद्धाला वाटत होते. भिक्खू संघाने निरपेक्षपणे जनसेवा करावी हा प्रमुख उद्देश लक्षात घेऊन भिक्खूने स्वतःची मालमत्ता बाळगू नये असा बुद्धाने नियम केला होता. मालमत्तेची धारकवृत्ती मनुष्याच्या स्वतंत्र विचार प्रेरणेला व विचार प्रवृत्तीला बाधा आणत असते व मोठ्यात मोठा अडथळा निर्माण करीत असते. मालमत्तेची धारकवृत्ती जशी घातक असते तसेच भिक्खूने विवाह करून निरपेक्ष जनसेवा करणे कदापि शक्य नसते. यास्तव सामाजिक बंधनात गुरफटून न राहता जनसेवेस तनमनधनाने मुक्त राहण्यासाठी भिक्खूने विवाह करू नये असा निर्बंध बुद्धाने घातला होता.*_
_*या सर्व आदर्शाप्रमाणे आजचा भिक्खूसंघ राहतो काय ? ह्या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर नकारार्थी आहे. भिक्खुसंघ लोकांना मार्गदर्शन तर करीत नाहीच, परंतु जनसेवाही करीत नाही. सद्यपरिस्थितीतील भिक्खुसंघ बौद्ध धर्म प्रसारासाठी निरुपयोगी आहे. आज जगभर भिक्खूंची संख्या अफाट आहे. त्यात केवळ साधू व संन्यासवृत्तीने राहणाऱ्या भिक्खूंचाच भरणा जास्त आहे. ते सगळे आपला वेळ नुसत्या ध्यानात किंवा आळसात घालवितात. लोकांना ज्ञान द्यावे किंवा त्यांची सेवा करावी ही वृत्तीच भिक्खूंत राहिलेली नाही. सेवावृत्तीच्या संदर्भात विचार करता कोणाच्याही मनात सर्वप्रथम रामकृष्ण मिशन उभी राहते. पण भिक्खूंचे खरे कर्तव्य सेवावृत्ती असूनसुद्धा कोणालाही भिक्खूसंघाची आठवण होत नाही. मग अशा स्थितीत कोणाची सेवावृत्ती आदरणीय मानावी ? भिक्खूसंघाची की रामकृष्ण मिशनची ? आज भिक्खूसंघ नुसत्या आळशी लोकांचे एक मोठे सैन्य झाले आहे. आज भिक्खू थोडे जरी असले तरी चालतील, परंतु ते सुशिक्षित व कार्यप्रवण पाहिजेत. ते ऐतखाऊ व ऐदी नसावेत. ह्या बाबतीत भिक्खुसंघाने जेसुइट ख्रिस्ती पाद्रयांपासून प्रेरणा घेण्यास कसलीच हरकत नसावी. त्यांनी ख्रिस्ती धर्माचा प्रसार आशियाभर शैक्षणिक व वैद्यकीय सेवेने केला. त्यांनी केवळ ख्रिस्ती धर्माचे गुणगानच गाइले नाही. त्यांनी त्याबरोबर कला व विज्ञान ह्यांची सुंदर सांगड घालून त्यांचाही त्यांनी प्रसार केला. पुरातन काळातील बौद्ध भिक्खूंचा सुद्धा हाच आदर्श होता. जगभर गाजलेली नालंदा व तक्षशिला ही विद्यापीठे भिक्खूंनी स्वतः चालविलेली होती. तिथेच ते भिक्खू राहत व ज्ञानपठन करीत. साहजिकच ते सुशिक्षित व बुद्धिमान असत. स्वधर्ममतांच्या प्रसारासाठी समाजाची सेवा करणे अत्यावश्यक आहे ह्याची त्यांना जाणीव होती.. सध्याच्या भिक्खूंनी त्याच जुन्या आदर्श विचारांची कास धरावयास पाहिजे.*_
_*भिक्खुसंघाची आजची जडणघडण पाहता बौद्ध भिक्खूसंघ सर्वसामान्य लोकांची सेवा करू शकेल असे म्हणवत नाही. त्यामुळे बौद्ध भिक्खूसंघ स्वतःकडे लोकांना आकर्षित करू शकत नाही. भारतात आज तरी मिशनरी पद्धतीशिवाय बौद्धधर्म वृद्धिंगत होणे कठीण आहे. शिक्षणप्रसाराबरोबर आज धर्मप्रसारसुद्धा होणे आवश्यक आहे. धर्मप्रसार मनुष्यबळाशिवाय व द्रव्यबळाशिवाय होऊ शकणार नाही. हेही तेवढेच खरे आहे; परंतु हे बळ कोण पुरवू शकेल ? अर्थात ज्या देशात आज बौद्धधर्म प्रचलित आहे ते देशच ही गोष्ट करू शकतात. ह्या बौद्धधर्मी देशांनी सुरुवातीस काही प्रमाणात मनुष्यबळ व द्रव्यबळ पुरविल्यास बराच कार्यभाग साधला जाऊ शकतो. परंतु ही गोष्ट ते करू शकतील काय ? सद्यपरिस्थिती लक्षात घेता बौद्धधर्म प्रसाराच्या बाबतीत ते देश उत्साही असल्याचे दिसत नाहीत. उलट ते काहीसे उदासीन असल्याचे दिसतात.*_
_*वस्तुतः सध्याचा काळ बौद्ध धर्म प्रसार होण्यास खूपच अनुकूल असल्याचा दिसून येतो. पूर्वी एक काळ असा होता की, धर्म हा मनुष्याचा वारसा हक्कांचा एक भाग होता. मुलगा किंवा मुलगी आपल्या आईवडिलांच्या संपत्तीबरोबर त्यांचा धर्मही वारसातील एक भाग म्हणून स्वीकारीत असे. धर्माचा हा वारसाहक्क घेताना त्या धर्मात उचित अनुचित काय आहे, ह्याची सुद्धा चिकित्सा केली जात असे. इस्टेटीच्या बाबतीत ती घेण्याजोगी आहे किंवा नाही असा प्रश्न कधी कोणी विचारी. परंतु धर्माच्या बाबतीत तो धर्म स्वीकारण्याजोगा आहे किंवा नाही असा चुकूनही प्रश्न केला जात नसे. परंतु आज काळ फारच बदलला आहे. साऱ्या जगभर बऱ्याच लोकांनी त्यांच्या धर्माच्या वारसाहक्काच्या बाबतीत असामान्य असे धैर्य दाखविलेले आहे. वाडवडिलांचा धर्म म्हणून स्वीकारलाच पाहिजे, ह्या बंधनाला त्यांनी झुगारून दिलेले आहे. काहींनी तर फारच क्रांतिकारक विचार दर्शविले आहेत काही लोक वैज्ञात्तिक ज्ञानाते भारावून जाऊन धर्म कुचकामी आहे, धर्मात काही तथ्यांश नसतो, तो टाकून फेकून दिला पाहिजे ह्या निर्णयापर्यंत पोहचले आहेत. काही लोक मार्क्सवादी विचारसरणीमुळे धर्म ही श्रीमंतांच्या प्रभुत्वाला शरण जाण्यास गरिबांना प्रभावित करणारी अफूची गोळी आहे म्हणून धर्म झुगारून द्यावा असे म्हणू लागले आहेत. कोणतेही कारण का असेना मात्र हे सत्य आहे की, लोकांनी आज धर्माच्या बाबतीत चिकित्सक बुद्धीची वाढ केलेली आहे. जे लोंक वैचारिक पातळीवर ऊहापोह करण्याचे धाडस दाखवितात त्यांच्या मनांत प्रामुख्याने हेच प्रश्न उद्भतात की धर्म ही खरोखर आवश्यक बाब आहे काय ? आणि आवश्यक असेल तर कोणता धर्म योग्य आहे ?*_
_*ही वैचारिक भूमिका लक्षात घेऊन असेच म्हणावे लागते की, वेळ येऊन ठेपलेली आहे. प्रश्न फक्त इच्छेचा आहे. आज बौद्ध धर्मी देशांनी मनावर घेतले व लोकांची मनोभूमिका जाणून घेतली तर बौद्धधर्म जगभर पसरण्यास व त्याची वाढ होण्यास मुळीच कठीण जाणार नाही. केवळ स्वतः आदर्श बौद्ध बनून कर्तव्यच्यूत राहणे हे खऱ्या बौद्धाचे लक्षण नव्हे. बौद्धधर्म प्रसारासाठी अहोरात्र झटणे हे खऱ्या व आदर्श बौद्धाचे कर्तव्य होय. बौद्धधर्माचा प्रचार व प्रसार करणे म्हणजेच मानवजातीची सेवा करणे होय. ही बाब बौद्ध राष्ट्रांनी ध्यानात घेतली तर मला विश्वास वाटतो की बौद्धधर्म वृद्धीची लाट कधीही थोपविली जाऊ शकणार नाही.*_
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!!ॐ मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- २३/०५/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड २०, पान नं ३७३ - ३८७*__
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment