Monday, 27 May 2024

बुद्धजयंती आणि तिचे राजकीय महत्त्व

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_बुद्धजयंती आणि तिचे राजकीय महत्त्व_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/05/blog-post_27.html

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                     _हिंदुस्थानातील लोक उत्सवप्रिय आहेत हे काही कोणास सांगावयास नको. वर्षांतून अर्धे अधिक त्यांचे दिवस उत्सवात आणि सणात जातात. त्यातल्या त्यात देशातील महान व्यक्तींच्या जन्म-मरणाच्या उत्सवांना तर ते फारच महत्त्व देतात. कृष्णजन्माष्टी, रामनवमी, हनुमानजयंति हे उत्सव त्यांच्या या मनोभावनेची साक्ष देतात. असे असताना *हिंदुस्थानातील हिंदू लोक बुद्धाची जयंती साजरी करीत नाहीत याचे कोणाही परकीय माणसास आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही. ज्या विभूती हिंदुस्थानात निर्माण झाल्या त्यांत बुद्धाचे स्थान फार उच्च प्रतीचे आहे. जगाला प्रकाशित करणारा तेजस्वी सूर्य अशी महती गाणारे बुद्धाचे काही भक्तगण आहेत. ख्रिस्ती लोक, ज्यांना बुद्धाबद्दल हेवा वाटतो, ते देखील एशिया खंड प्रकाशित करणारा सूर्य अशी त्यास उपमा देतात. हिंदू लोकही त्याला विष्णूचा अवतार मानीत असत. अशा या विख्यात पुरुषाची या देशातील लोकांना आठवण देखील राहिली नाही.* बाजीरावाने ठेवलेली रांड मस्तानी हिचे नांव ज्यांना माहित आहे, असे सामान्य लोक आज पुष्कळ सापडतील. पण बुद्धाच्या नावाचा परिचय असलेले सामान्य लोक यांच्यापेक्षा फारच कमी सापडतील अशी मला शंका वाटते. एवढ्या मोठ्या विभूतीची एव्हढी मोठी विस्मृती व्हावी, ही मोठी सखेदाश्चर्याची गोष्ट आहे. अशा परिस्थितीत आनंदाची ही गोष्ट की, *बंगाल व इतर प्रांतांत बुद्धजयंतीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. आमच्या मते या उत्सवाला फारच मोठे राजकीय महत्त्व आहे. ते पटवून देण्याकरिता गौतमबुद्धाचे चरित्र व त्याचे कार्य याचा जनतेला परिचय करून देण्याचे आज आम्ही योजिले आहे.*_

                    _अडीच हजार वर्षापूर्वी शुद्धोधन नावाचा साक्य वंशातील एक राजा कपिलवस्तु येथे राज्य करीत होता. शुद्धोधन राजाच्या कुळाचे नाव गौतम असे होते. *कपिलवस्तु हे ठिकाण आजच्या हिंदुस्थानातील संयुक्त प्रांत म्हणतात त्या प्रांतात होते. ते वस्ती व अयोध्या यांच्या मधोमध असून फैजाबादपासून पूर्वेकडे ५० मैलावर होते.* शुद्धोधन राजाच्या दोन पत्नी होत्या. एकीचे नाव मायादेवी व दूसरीचे नाव प्रजापति असे होते. शुद्धोधन व मायादेवी यांचे लग्न झाल्यावर काही दिवसानी मायादेवी गरोदर राहिली. गरोदर राहिल्यानंतर पहिले बाळंतपण माहेरघरी व्हावे, अशी पूर्वापार चाल असल्या कारणाने मायादेवीचा बाप सुबुद्ध याने मुलीस बाळंतपणास आपल्या गावी पाठवावी म्हणून त्यांचा जावाई शुद्धोधन यास निरोप पाठविला. त्याप्रमाणे मायादेवी व तिची बहीण प्रजापति लवाजम्यानिशी आपल्या माहेरी जावयास निघाल्या. वाटेत त्यांनी लुंबीणी वन लागले. व त्या ठिकाणी मायादेवी हीस प्रसूतिवेदना सुरू झाल्या व त्या वनात ती बाळंत होऊन पुत्ररत्न प्रसवली. प्रसूत झाल्या बरोबर मायादेवी चरण पावली. व त्या मुलाचे संगोपन तिची बहिण प्रजापति हिने केले. त्याचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. हाच पुढे गौतमबुद्ध म्हणून प्रसिद्धीस आला._

                  _क्षत्रिय कुळात व राजघराण्यात जन्माला आल्यामुळे त्याच्या परिस्थितीला साजेल असे शिक्षण सिद्धार्थाला देण्यात आले होते. *क्षत्रियाचे लष्करी शिक्षणच देण्यात आले होते असे नव्हे तर त्याचा वेदाभ्यासही चांगलाच झाला होता.* परंतु सिद्धार्थाचा एकंदरीत मनाचा कल एकांताकडे होता. राजवैभव उपभोगण्याकडे त्याचा विशेष कल नव्हता. आपला पुत्र कदाचित संन्यास घेऊन भलत्याच मार्गाला लागेल या भीतीने शुद्धोधनाने आपल्या मुलाचे लग्न करून त्यास संसारात डांबून टाकण्याचा निश्चय केला. व त्याप्रमाणे *दंडपाणी याची मुलगी, जिचे माहेरचे नाव गोपी व सासरचे नाव यशोधरा, हिच्याबरोबर लग्न लावून दिले.* व या लग्नापासून सिद्धार्थ गौतमास राहूल या नावाचा एक मुलगा झाला. शुद्धोधनाने आपल्या मुलाला ऐषआरामात राहाता यावे म्हणून तीन मोठमोठे राजवाडे बांधून दिलेले होते. त्याच्या ऐषआरामात कोणत्याही प्रकारची न्यूनता राहू नये, अशा प्रकारची व्यवस्था केली होती._

                    _*एके दिवशी गौतमाने गावातून हिंडून येण्याचा व एकंदरीत सामाजिक परिस्थिती पाहून येण्याचे ठरविले व त्याप्रमाणे रथ जुंपून तो राजवाड्यातून बाहेर पडला. शहरात शिरल्यानंतर चार गोष्टी त्याच्या नजरेस पडल्या. प्रथम एक अत्यंत वृद्ध, जराग्रस्त, गलितगात्र, दंतभग्न, चेहऱ्यावर सुरकत्या पडलेल्या, केस सगळे पांढरे झालेले, पाठीची कमान झालेली, हातात काठी धरून मुंगीच्या मंदगतीने तोंडातून काहीतरी अस्पष्ट बोलत व सर्व शरीर कंपायमान होत असलेला त्याच्या नजरेस पडला. पुढे गेल्यावर त्याला दुसरे दृश्य दिसले. एक माणूस भंयकर तापाने ग्रस्त झालेला, अत्यंत अशक्त व बेशुद्ध, निराश्रीत असा वाटेवरती पडलेला दिसला. आणखी पुढे गेल्यावर एका माणसाचे प्रेत तिरडीवर घालून त्याचे नातेवाईक व त्याचे मित्रगण वाहून नेत होते. त्याच्यापुढे एक संन्यासी प्रफुल्ल मनाने व शांत चित्ताने हातात भिक्षापात्र घेऊन चालला होता है चौथे दृश्य पाहिले. ही चार दृश्ये पाहून गौतमाच्या मनावरती मोठाच परिणाम झाला. या चार दृश्यांवरून त्याने बोध घेतला (तो हा) की जगात दुःख आहे. मनुष्य जीवीत हे अशाश्वत आहे. असे जर नसते तर उपजलेला मनुष्य रोगग्रस्त न होता । वृद्ध न होता !! आणि मरण न पावता !!! एकंदरीत चौथे दृश्य म्हणजे संन्यासवृत्ती हेच खरे ध्येय होय असे त्यास वाटले. आणि म्हणून ज्या जगात दुःख आहे, जरा आहे, आणि मरण आहे अशा संसारात काहीच अर्थ नाही, असे त्यास वाटू लागले. अशा विचारांच्या जाळ्यात सापडून तो परत घरी आला परत येताच त्याची पत्नी यशोधरा प्रसूत होऊन तिला एक मुलगा झाल्याचे वृत्त त्याला कळविण्यात आले. ही एक जादा बेडी आपल्या पायांत पडली असे त्यास वाटले. तथापि संन्यास घेण्याचा त्याचा निश्चय कायम झाला होता. व त्याप्रमाणे त्याने आपला निश्चय त्याचा बाप शुद्धोधन यास जाऊन कळविला. अर्थात गौतमाने असे काही करू नये म्हणून राजवाड्यामध्ये नाना तन्हेचे करमणुकीचे, मनोरंजनाचे प्रयोग करून या निश्चयापासून गौतमास परावृत करण्याचा प्रयत्न केला. परंतु गौतमाचा निश्चय (पक्का) झालेला होता. तथापि राजाला कळविल्याखेरीज पळून जाणे योग्य नाही, म्हणून आपला मनोदय अमलात आणण्याचा आपण निर्धार केला आहे. हे सांगण्याकरिता तो राजवाड्यांत गेला आणि बापास म्हणाला की, "मला तुम्ही अडथळा करू नका. तुमचे राज्य, तुमचे प्रजाजन, तुमची संपत्ति तुम्ही घ्या. मला काही नको." दुसऱ्या दिवशी शुद्धोधनाने आपल्या सरदारांची बैठक बसविली व त्यात गौतमाने केलेल्या निश्चयाची बातमी त्यांस दिली. हे कळल्याबरोबर सरदार म्हणाले, "आम्ही त्याच्यावरती पहारा ठेवू. तो आपल्या हातांतून कसा जाईल? हे आम्ही पाहू." अर्थात अशा कडेकोट बंदोबस्तात निघून जाणेच शक्य नव्हते म्हणून त्याने तो दिवस तसाच जाऊ दिला. मध्य रात्री तो जागा झाला व त्याचा घोडेवाला चंडक यास झोपेतून उठवले व त्यास, "मला जावयाचे आहे. माझ्या घोड्यास घेऊन ये" असे सांगितले. चंडक, त्यास प्रथमतः कबूल होईना व गौतमास जाऊ नको म्हणून गळ घालू लागला. परंतु गौतमाचा निश्चय अढळ आहे असे दिसल्यावर त्याचा घोडा कंथक यास तो घेऊन आला. गौतमाने त्याची बायको व मूल ज्या खोलीत झोपली होती त्याचे दार हळूच उघडून त्यांच्यावर शेवटची नजर टाकून कंथकावर स्वार होऊन त्या रात्री तो कपिलवस्तु सोडून गेला.*_

                   _गृहत्याग केल्यानंतर गौतमाने दोघा गुरूंचे शिष्यत्व पत्करून जगात दुःख का? या प्रश्नाचे उत्तर मिळते का हे पाहण्याचा प्रयत्न केला. पहिल्या प्रथम आलार कलाम व त्यानंतर उद्रक रामपुत्र यांचे शिष्यत्व त्याने पत्करले, अशी पूरी सात वर्षे त्याच्या सानिध्यात त्याने घालविली. परंतु त्यांच्या उपदेशांपासून त्याचे समाधान झाले नाही. म्हणून त्यांना सोडून तो मगध देशात उरूवेल (ज्याला हल्ली बुद्धगया असे म्हणतात) त्या ठिकाणी येऊन राहिला. त्या ठिक्काणी त्याच्यासारखेच संसाराला सोडून आलेले पांच संन्यासी अरण्यवास पत्करून बसले होते. त्यांच्याबरोबर गौतमाने देहदंडन व खडतर तपश्चर्या करण्यास सुरवात केली. सहा वर्षांच्या देहदंडनाने त्याचे शरीर अत्यत कृश झाले व त्याला चालण्याची शक्तीदेखील राहिली नाही. एके दिवशी जवळून वाहत असलेल्या फाल्गू नदीतून स्नान करून परत आपल्या आश्रमात येत असताना तो वाटेत घेरी येऊन पडला. जवळच एक धनगर रहात होता. त्याची वडील मुलगी सुजाता हिने गौतमास त्या स्थितीत पाहिले व त्याला घरून दूधमात आणून दिला. शुद्धीवर आल्यानंतर त्याला वाटू लागले की, देहदंडनापासून, जगात दुःख कां याचे ज्ञात होणे शक्य नाही. गौतमाने अन्न सेवन केले यामुळे तो योगभ्रष्ट झाला अशी कल्पना करून घेऊन त्याचे पांच सोबती त्यास सोडून गेले व त्या बुद्धगयेत बुद्ध एकटा राहिला._

                    _*एके रात्री एका वृक्षाच्याखाली गौतम बसला असताना या जगात दुःख का व ते दुःख नाहिसे करण्याचा मार्ग कोणता. या प्रश्नाचा त्याला उलगडा झाला. त्याला दिसले की, मानवी जीवनक्रमाचे दोन प्रचलित मार्गाने लोक चालले आहेत. एक चैन करून कालक्रमणा करणे हा, दुसरा देहदंडन करून मरण्याची अपेक्षा करीत राहणे हा. हे दोन्ही मार्ग चुकीचे आहेत, या दोन्ही मार्गानी संसारातील मानवाचे दुःख हरण होणे शक्य नाही, अशी दिव्य दृष्टी त्या रात्री त्या वृक्षाखाली बसला असताना गौतमाला झाली. या दिव्य दृष्टीने गौतम ज्ञानी झाला म्हणून लोक त्याला बुद्ध (ज्ञानी) म्हणू लागले आणि ज्या वृक्षाखाली त्याला ज्ञान झाले त्या वृक्षाला बोधीवृक्ष असे जगप्रसिद्ध नाव प्राप्त झाले.*_

                     _*या नवीन दिव्य दृष्टीचा असा परिणाम झाला की, बुद्धाने देहदंडन सोडून दिले. तो संसारात पुन्हा पडला नाही. पण तो पुन्हा समाजात आला व समाजाच्या उद्धारार्थ त्याने धर्मसंस्थापनेचे कार्य आरंभिले. सर्व हिंदुस्थान पायाखाली घालून आबालवृद्धास, स्त्रीपुरुषांस आपला धर्म त्याने स्वमुखाने सांगितला. हे कार्य त्याने तब्बल चाळीस वर्षे केले.* अखेर धर्मप्रचाराकरिता फिरत असताना बुद्ध पावा येथे मुक्कामास राहिला. त्या गावी चुंद नावाचा एक लोहार रहात असे. त्याने बुद्धास आपल्या घरी जेवण्याकरिता येण्याचा आग्रह केला. चुंद यांच्या घरचे ते अन्न त्याला जाचले व तो आजारी झाला. तशाच आजारीस्थितीत बुद्ध नेपाळच्या पूर्व भागी असलेल्या कुशीनारा गांवी गेला व त्या ठिकाणी त्याचा अंत झाला._

             _*बुद्ध येशू ख्रिस्ताच्या पूर्वी ५६३ व्या वर्षी राजपुत्र म्हणून जन्मास आला व ख्रि पू. ४८३ व्या वर्षी धर्मसंस्थापक म्हणून मरण पावला.*_

*_बुद्धाचे कार्य_*

                      _बुद्धाच्या धर्माची मूल तत्त्वे काय ? त्याने कोणते कार्य साधले याचे आकलन झाल्याखेरीज बुद्धाचे महत्त्व कळून येणार नाही. या प्रश्नांचा सविस्तर खुलासा स्थळ संकोचामुळे या ठिकाणी करता येणे शक्य नाही; परंतु थोडक्यात बुद्धाच्या कार्याची कल्पना करून देता येणार नाही, असे मात्र म्हणता येणार नाही. *बुद्धकालीन ब्राह्मणी धर्माचे तीन आधारस्तंभ होते. वेदप्रामाण्य हा पहिला आधारस्तंभ, यज्ञ बलिदान हा दुसरा आणि वर्णाश्रम हा तिसरा. वेदांत असेल ते सारे खरे, सत्य बुद्धीला पटो अगर न पटो. वेदांत असेल ते सारे खरे, हा जो ब्राह्मणी धर्माला आधारस्तंभ वाटत असे, त्याला बुद्ध मनुष्याच्या ज्ञान मार्गातला पहिला धोंडा असे मानीत होते. वेदांत असेल ते खरे, या ब्राह्मणी धर्माच्या तत्त्वाच्याविरूद्ध ज्ञानाला पटेल तेच खरे असे, बुद्धाचे तत्व होते. ब्राह्मणी धर्मात परमेश्वरप्राप्ती हाच धर्माचा हेतू असे मानले जात असे. परमेश्वराला बलिदान दिल्याखेरीज त्याची प्राप्ती होऊ शकत नाही, म्हणून यज्ञ करणे व त्यात बळी देणे हाच खरा धर्म मानला जात असें. अगदी पूर्वी ब्राह्मणी धर्मात मुनष्याचा बळी यज्ञात देत असत व त्या नरबळीचे मांस यजमानास खावे लागत असे. नरबळीची चाल जरी बुद्धाच्याकाळी बंद पडली होती तरी यज्ञांत पशूचा बळी देण्याची चाल जारी होती. त्याकाळचे वाङमय ज्यांनी वाचले असेल त्यांना आजच्या ब्राह्मणांचे पूर्वज असंख्य गाईंचा यज्ञाकरिता कसा संहार करीत असत हे माहीत असेलच. हे वाङमय वाचून जेवढ्या गाई ब्राह्मणांनी यज्ञात कापल्या असतील त्याच्या शतांशांने मुसलमानांनी कापल्या असतील काय, याबद्दल संशय उत्पन्न होतो. जसा वेदप्रामाण्यावर बुद्धाने हल्ला चढविला, तसा त्याने यज्ञावरती हल्ला चढविला. बुद्धाची या बाबतीतील भूमिका अत्यंत क्रांतीकारक होती, असेच म्हटले पाहिजे. असा बुद्धाचा पक्ष होता. धर्माचा आणि परमेश्वर प्राप्तीचा कांही संबंध नाही, मनुष्याने मनुष्याशी कसे वागावे ह्याचे योग्य प्रकारचे बंधन घालून देणे हे धर्माचे क्षेत्र आहे. ही बुद्धाची भूमिका होती. परमेश्वर प्राप्ती हे धर्माचे क्षेत्र आहे. ही भूमिका बुद्धाला कबूल नव्हती. एका बाजूने परमेश्वर प्राप्तीसाठी यज्ञ करावयाचा, आणि दुसऱ्या बाजूने आपल्या शेजाऱ्याला छळावयाचे, त्याला उपद्रव होईल असे वर्तन करावयाचे, ही धर्माची विटंबना आहे असे बुद्धाचे म्हणणे होते. ब्राह्मणी धर्माचा तिसरा आधारस्तंभ जो वर्णाश्रम धर्म त्याच्यावर तर बुद्धाने फारच मोठा मारा केला. ब्राह्मणी धर्माची सारी मख्खी या वर्णाश्रम धर्माच्या कल्पनेत सामावलेली आहे. जातीभेदाच्या जन्मजात उच्चनीच कल्पनांचा फैलाव होण्यास वर्णाश्रम धर्मच कारणीभूत ठरला आहे. या ब्राह्मणी धर्मात स्त्रिया व शुद्रांना मानाचे स्थान नाही, उपजीविकेचे मार्ग मोकळे नाहीत, कशावर स्वामित्व नाही, म्हणून या दोन वर्गांना स्वातंत्र्य नाही. ही त्यांची जिवंतपणीची अवदशा. ही अवदशा मेल्यानंतरही त्यांच्या पाठी आहेच । ब्राह्मणी धर्मात स्त्रियांना व शूद्रांना मेल्यावर मोक्ष नाही. कारण ब्राह्मणी धर्माच्या तत्त्वाप्रमाणे ज्याला संन्यास घेता येतो त्यालाच मोक्ष प्राप्त होऊ शकतो आणि शूद्रांना व स्त्रियांना संन्यास देण्याची ब्राह्मणी धर्माने मनाई केलेली होती. बुद्धाला उच्चनीच भाव मान्य नव्हता. 'ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ, हे अघोरी तत्व मुळापासून खणून काढण्याचा बुद्धाने निकराचा प्रयत्न केला. सामाजिक समतेचा बुद्धाइतका मोठा पुरस्कर्ता जगात दुसरा झाला नाही असे म्हटले तरी त्यात अतिशयोक्ती झाली, असे कोणालाही म्हणता यावयाचे नाही. ब्राह्मणी धर्मात स्त्रियांना मोक्ष नव्हता. पण बुद्धाने स्त्रियांना भिक्षुकिणी केल्या. ब्राह्मण धर्मात शूद्रांना मोक्ष नव्हता. बुद्धाने शूद्रांना भिक्षु केले. यावरून बुद्ध समतेच्या तत्त्वाचा नुसता पुरस्कार अमलांत आणण्याचा त्याने प्रयत्न केला. करून स्वस्थ बसला असे नाही, समता नुसत्या स्त्रियांना व शूद्रांना भिक्षू केले इतकेच नव्हे तर अंत्यजानासुद्धां भिक्षूच्या उच्च पदावर चढविले.*_

                  _वरील विवरण अगदी त्रोटक असले तरी बुद्धाने या देशात किती महत्त्वाची कामगिरी केली याची कल्पना वाचकांस येऊ शकेल असे आम्हांस वाटते. *बौद्ध धर्माची तत्त्वे जितकी ओजस्वी व कल्याणकारी होती तितकाच बौद्ध धर्माचा प्रसार अचाड प्रमाणात झाला. दक्षिणेकडे सिलोन व पॅसिफिक महासागरांतील असंख्य लहानसहान बेटांतून बुद्धाच्या धर्माने आपले अधिष्ठान बसविले आहे. पश्चिमेस ब्रह्मदेश, आसाम, सयाम, चीन, जपान येथवर बुद्ध धर्माचा प्रसार झाला. उत्तरेस तिबेट, नेपाळ, तुर्कस्तान येथवर त्याने मजल मारली. इतकेच नव्हे तर अफगाण लोकांना बौद्ध धर्मीय केले. इतका प्रसार कोणत्याही धर्माचा झाला नाही. बुद्धाच्या धर्माचा आणखी एक विशेष सांगण्यासारखा आहे. सर्वच धर्म आपल्या गुणांच्या आश्रयाने प्रसार पावलेले नाहीत. मुसलमानी धर्म तलवारीच्या जोरावर वाढला. ख्रिस्ती धर्म कायद्याच्या जोरावर वाढला. फक्त एकट्या बुद्धाच्या धर्माचा प्रसार गुणांमुळे झाला. त्याला तलवारीच्या धारेची अगर कायद्याच्या दंडनाची जरूरी लागली नाही. लोकांना धरून आणून बुद्धाच्या धर्माची दीक्षा देण्याचे कारण पडले नाही. लोकांनी आपण होऊन त्यात उडी घेतली.*_

                     _*असे असताना बुद्धाच्या नावाची विस्मृति लोकांना कशी झाली असा प्रश्न उपस्थित होतो. हिंदुस्थानाबाहेर बौद्ध धर्म अजून जिवंत आहे. त्याची संख्या काही कमी नाही. हिंदुस्थानातून त्याचे उच्चाटन झाले. त्याची कारणे आज येथे स्थलसंकोचामुळे देता येत नाहीत. परंतु त्याचे थोडक्यात दिग्दर्शन करणे अवश्य आहे. बुद्धाच्या नावाची विस्मृति कालाला शक्य नाही. बुद्ध अजरामर, अमर आणि अकाल आहे. त्याच्या नावाचा लोप काल कसा करू शकेल ? बुद्धाची विस्मृति चीनमध्ये झाली नाही, जपानमध्ये झाली नाही. ब्रह्मदेशात झाली नाही. फक्त हिंदुस्थानातच झाली. याला काल कारण नसून बुद्धाचे शत्रू कारणीभूत आहे हे उघड आहे. ब्राह्मण हे एकजात बुद्धाचे शत्रू, ब्राह्मणांचे भांडण काही बुद्धांशीच होते असे नाही. त्यांचे जैन धर्माचा संस्थापक महावीर यांच्याशीही भांडण होते. बुद्धाप्रमाणे महावीर हाही यज्ञाच्या विरूद्ध होता. पण ब्राह्मणांनी जसा बुद्धांवर निष्ठूरपणाचा व निकराचा हल्ला केला तसा महावीरावर केला नाही. याचे कारण बुद्ध जसा चातुर्वर्ण्यच्या विरुद्ध होता तसा महावीर नव्हता. बुद्धाच्या वेदनिंदेबद्दल ब्राह्मणांना जरी विषाद वाटत असे तरी त्यांना त्याची विशेष चीड नसे. वेदाचे प्रामाण्य गेले तरी त्यात ब्राह्मणांचे मोठेसे नुकसान नाही. तसेच काहीसे यज्ञसंबंधाने त्यांना वाटे, यज्ञ राहिला तरी ठीक, गेला तर त्यात काही मोठी आपत्ती ओढवणार नाही, असे त्यांना वाटे. पण चातुर्वर्ण्यसंबंधी मात्र त्यांची मनोदिशा निराळ्या प्रकारची होती. चातुर्वर्ण्य गेले तर ब्राह्मण गेले, हे त्यांनी ओळखले होते. अर्थात चातुर्वर्णाला ते आपला प्राण समजत. बुद्धाची चातुर्वर्ण्य विध्वंसनाची मोहीम म्हणजे ब्राह्मणांना मुले कुठारः असे वाटणे साहजिक आहे. ती त्या काळची ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळ होती असे म्हणावयास काहीच हरकत नाही व त्या चळवळीचा अधिष्ठाता जो बुद्ध, त्याला ते मांग अथवा कालपुरुष लेखीत असत. त्यांचा नायनाट करण्यासाठी त्यांनी होते नव्हते तितके सर्व उपाय केले. आपले वैदिक देव ब्रह्मा, विष्णु, महेश यांना बाजूस सारून क्षत्रिय राजांना देव करून बुद्धाची चळवळ त्यांनी मारली. क्षत्रिय रामाला, ब्राह्मण आज जसे जेध्यांना भजतात तसे भजू लागले. एकट्या रामाला हाताशी धरून कार्य होत नाही असे दिसताच दुसऱ्या एका क्षत्रिय राजाला-कृष्णाला पुढे करून ब्राह्मणांनी त्याला देव बनविला ब्राह्मण आपल्याच राजांना भजू लागले. आता ब्राह्मणांच्या विरूद्ध मोहीम चालू ठेवण्यास कारण नाही अशी वृत्ति ब्राह्मणेतरांत उत्पन्न करून, बुद्धाने आरंभिलेल्या ब्राह्मणेतर चळवळीची धार ब्राह्मणांनी काढून टाकली व तिला बोथट केली. बुद्ध तुमचा खरा, पण आम्ही देखील त्याला आमच्या विष्णुचा दहावा अवतार मानतो, असे ब्राह्मण म्हणू लागले. जनता खूष झाली. आमच्या बुद्धाला ब्राह्मणांनी दहावा अवतार मानला. झाले । आता ब्राह्मणांशी भांडावयाचे कारण काय ? एकीकडून ब्राह्मणेतर जनतेशी सामदाम केला. दुसरीकडून बुद्धाचे अनुकरण करून आणि ब्राह्मण धर्म व बुद्ध धर्म एकच अशी लोकांची दिशाभूल करण्यास ब्राह्मणांनी सुरवात केली. बुद्धाने विहारे बांधली. विहारे ही बुद्ध धर्माची लोकांच्या दृष्टीने जागती ज्योत खूण. बुद्धाच्या विहारांच्या शेजारीच ब्राह्मणांनी आपली विहारे बांधण्यास सुरवात केली. या बाह्यत्कारी साम्यांमुळे लोकांच्या मनातून बौद्ध धर्म व ब्राह्मणी धर्म या दोहोमधील फरक दिसेनासा होऊन धर्माच्या बाबतीत पृथकपणा जाऊन सबगोलंकार झाला. शेवटी मुसलमानांच्या स्वाऱ्यांनी बुद्ध विहारांचा विध्वंस केल्यानंतर जेव्हा बुद्ध भिक्षू देश सोडून गेले तेव्हा त्यांच्या गैरहजेरीत ब्राह्मणांनी बुद्धाच्या नावाचा समूळ लोप करण्याच्या उद्देशाने बुद्ध विहारांना पांडव लेणी म्हणू लागले व बुद्धाच्या मूर्ति फोडून त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करू लागले.*_

                  _*ब्राह्मणांनी बुद्धाचे नाव या देशातून धुवून काढण्याचा प्रयत्न करावा हे समजण्यासारखे आहे. तो त्यांचा बोलूनचालून शत्रूच होता. त्याची जयंती करावी असा विचार त्यांना कसा रुचेल ? परंतु ज्या ब्राह्मणेतरांच्या हिताकरिता त्यांना अंधश्रद्धेच्या तावडीतून सोडविण्याकरिता, जंतर मंतरच्या खोट्या धर्माच्या कचाट्यातून मोकळे करून खऱ्या मानवी धर्माच्या मार्गावर आणण्याकरिता, त्यांची माणुसकी प्रस्थापित करण्याकरिता, त्यांचा स्वाभिमानदीप प्रज्वलित ठेवण्याकरिता जो झटला, ज्याने ब्राह्मणेतर जनतेच्या हिताकरिता राज्यवैभवाचा त्याग केला. ज्याने आपल्या कीर्तीने देशाचा लौकिक वाढविला अशा महापुरुषाला ब्राह्मणेतरांनी समूळ विसरून जावे, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांनी तरी बुद्धाची स्मृति जिवंत ठेवणे अवश्य होते.*_

                  _*बुद्ध जयंती साजरी करा असे हिंदुमात्रास सांगावयास आम्हाला हे एकच कारण आहे असे कोणी समजू नये. आमचे मुख्य कारण यापेक्षा भिन्न असून सबळ आहे असे आम्हास वाटते. हिंदूतील सुशिक्षित लोकांना राजकारणात हिंदु संस्कृतीच्या पायावर व हिंदूकरता लोकशाही प्रस्थापित करण्याची इच्छा उत्पन्न झाली आहे व त्या प्रीत्यर्थ त्यांचे सारे प्रयत्न चालू आहेत. असल्या हिंदु लोकांच्या बुद्धीची आम्हांस कीवच येते. या देशात लोकशाही प्रस्थापित करू असे म्हणणारे लोक एक तर मूर्ख तरी असले पाहिजेत किंवा लबाड तरी असले पाहिजेत. परंतु ही लबाडी व हा मूर्खपणा फार दिवस चालणार नाही. अनुभवाची गाठ पडल्यानंतर असे दिसून येईल की, ब्राह्मणी धर्म आणि लोकशाही ह्या परस्पराविरोधी, एकमेकांस विरोधी गोष्टी आहेत. लोकशाही हवी असेल तर चातुर्वर्ण्य नाहीसे झाले पाहिजे. हे चातुर्वर्ण्यचे जंतु काढून टाकण्याकरिता बुद्धाच्या तत्त्वज्ञाना- सारखे मारक रसायन नाही, असे आम्हांस वाटते. म्हणून आम्ही म्हणतो की, राजकारणाची रक्तशुद्धी करण्याकरिता बुद्धजयंती सर्व हिंदूंनी साजरी करणे हितावह व आवश्यक आहे.*_

                     _*हिंदुस्थान देश आज राजकीय दृष्ट्या रोगी माणसासारखा आहे. हिंदुस्थानची आठवण झाली म्हणजे पोट वाढलेले, हातापायांच्या काट्याकुट्या झालेल्या, चेहरा फिकट झालेला, डोळे आत गेलेले, हाडांचा सांगाडा झालेल्या पुरुषाचे चित्र नजरेसमोर उभे रहाते. याला लोकशाहीचा गाडा चालविण्याची ताकद नाही, पण लोकशाहीचा गाडा घेऊन चालविण्याची मोठी हौस. हौस पुरवायची तर त्याला ताकद आवश्यक आहे. ती औषध घेतल्याशिवाय प्राप्त होणे शक्य नाही, पण औषध घेऊन काय उपयोग? घेण्यापूर्वी कोठा साफ करावा लागतो. सर्वांना माहित आहे की, कोणतेही औषध त्यातील मळ काढावा लागतो. त्याशिवाय औषधाचा गुण येत नाही. आमच्या हिंदुमात्राचा कोठा शुद्ध नाही. त्यात ब्राह्मणी धर्माचा कैक दिवसांचा मळ घर करून बसला आहे. जो वैदु हा मळ धुवून काढील तोच या देशाला लोकशाहीच्या प्रस्थापनेत मदत करू शकेल. तो वैद्य म्हणजे गौतम बुद्ध हाच एक आहे. हिंदूंची रक्तशुद्धी रामाची जयंति करून होणार नाही, कृष्णाची जयंति करून होणार नाही किंवा गांधीची जयंति करून होणार नाही. राम, कृष्ण, गांधी हे ब्राह्मणी धर्माचे उपासक आहेत. लोकशाहीच्या प्राणप्रतिष्ठेला त्यांचा काही उपयोग नाही. उपयोग झाला तर एका बुद्धाचाच होऊ शकेल त्याची आठवण घेणे आणि त्याचीच मात्रा घेणे हाच एक हिंदुमात्राच्या राजकीय व सामाजिक रक्तशुद्धीचा उपाय आहे, असे आम्हास निःसंशय वाटते,* म्हणजे_

*_बुद्धं सरणं गच्छामि ।_*

*_धम्मं सरणं गच्छामि ।।_*

*_सङ्घ सरणं गच्छामि ।।।_*

_हा महामंत्र त्यांनी जपावा असे आमचे सांगणे आहे. "_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!!ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २८/०५/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड २०, पान नं ३२७ - ३३५*__

*_२) जनता, ता. १७ मे १९४१_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Sunday, 26 May 2024

माणसा-माणसातील संबंध प्रेम, करुणा या तत्त्वानुसार जोडणाऱ्या बौद्ध धर्माचा मध्यवर्ती सिद्धांत समता आहे

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_माणसा-माणसातील संबंध प्रेम, करुणा या तत्त्वानुसार जोडणाऱ्या बौद्ध धर्माचा मध्यवर्ती सिद्धांत समता आहे_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/05/blog-post_26.html

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

              _*"दिनांक २५ नोव्हेंबर १९५६ ला सायंकाळी सारनाथ येथील मूलगन्ध कुटी विहाराच्या मैदानात महाबोधी सभेद्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वागताप्रित्यर्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.*_

                  _सुरवातीला मंगलाचरण झाल्यानंतर लद्दाखचे लामा लोबजङ् यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'खदा' (वस्त्रे विशेष) भेट केली. त्यानंतर वाराणसीच्या १८ संस्थांनी त्यांना हार प्रदान केले. सेवासंगम ट्रस्टच्या वतीने डॉ. एन. एन. शर्मा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दोन सुंदर सुवर्ण स्मृतिचिन्ह भेट केले. डॉ. बाबासाहेबांचे भाषण ऐकण्याकरिता सारनाथच्या जवळपास असलेल्या जिल्ह्यातील जनसमुदाय प्रचंड प्रमाणात उपस्थित होता. "_

               _*सदरहू कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे "ही सभा महाबोधीच्या बुद्ध मंदिराच्या आवारात, धम्मेक स्तुपाच्या सावलीत होती. बुद्धाने ज्या ठिकाणी पंचवग्गीय भिख्खूंना आपला पहिला उपदेश करून धम्मचक्रप्रवर्तन केले त्या जागी अशोकाने एक स्तूप उभारला. त्या स्तुपास धम्मेक स्तूप असे नाव आहे. तेथेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दलित जनतेला उद्देशून शेवटचे भाषण व्हावे हा हृदयंगम व क्रांतिकारक योगायोग होय.*_

                  _*बाबासाहेबांसंबंधी चार शब्द सांगताना भिख्खु धर्मरक्षित म्हणाले, "बौद्ध देशात अशी एक श्रद्धामय समजूत प्रचलित आहे की, बुद्धाच्या महापरिनिर्वाणापासून अडीच हजार वर्षांनी भारतात बौद्ध धर्माचे पुनरूत्थान घडणार आहे. ते कार्य जो बोधिसत्त्व तडीस नेईल, तो आज बाबासाहेबांच्या रूपाने आमच्यामध्ये उपस्थित आहे, अशी माझी श्रद्धा आहे. याच सारनाथात, पंचवीस शतकामागे, पाच भिख्खुसमोर आजच्या सारख्याच एका रविवारी, या समोरच्या धम्मेक स्तुपाच्या जागी भगवंतांनी धर्मचक्राचे परिवर्तन केले. त्याच धर्मचक्राला नागपूर येथे गति देऊन, पाच लाख लोकांच्या हृदयात धम्माचा पवित्र संदेश ज्याने नेऊन पोचविला, त्याच महापुरूषाचे आज आम्ही स्वागत करीत आहोत."*_

                    _सारनाथचे प्रशांत व पवित्र स्मृतीने भारलेले वातावरण, सभोवार भक्तिभावाने बसलेली दलित जनता आणि लंका, तिबेट, ब्रह्मदेश, जपान या देशातील काही लामा, भिख्खु व उपासक मंडळी, या सर्व घटनांमुळे की काय बाबासाहेबांचे मन भरून आले. कंठ किंचित् सद्गदित झाला._

_*पाणावल्या डोळ्यांनी आणि भरल्या कंठाने केलेले ते कारूणिक भाषण होते. बाबांचा तो अंतिम संदेश ठरला.* स्वागताला उत्तर देताना केलेल्या आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले,_

                   _"दीर्घ प्रवासाच्या दगदगीने मला शीण आला आहे. मी येथे केवळ तुमच्या स्वागताच्या फुलमाळेसाठी आलो होतो. परंतु माझ्या भेटीसाठी तुम्ही जी उत्सुकता व आस्था दाखविलीत तिची परतफेड म्हणून तुम्हाला चार शब्द सांगणे मी माझे कर्तव्य समजतो. *तुम्हांपैकी पुष्कळसे लोक अस्पृश्य गणले जातात, भगवान बुद्धाच्या काळी अस्पृश्यता नव्हती. सांस्कृतिकदृष्ट्या कमी प्रतीच्या जमाती त्यावेळी होत्या परंतु त्यांना अस्पृश्य मानीत नसत. अस्पृश्यतेचा शाप गेल्या दीड हजार वर्षांचा आहे आणि त्याला जबाबदार हिंदू धर्म आहे. अस्पृश्यता हा आमचा कलंक नसून तो उच्च हिंदू जातींच्या हृदयाचा कलंक आहे. आज इतकी वर्षे झाली परंतु तो कलंक धुवून काढण्याची हिंदुंना कधीही प्रामाणिक इच्छा झाली नाही. आमच्या राहाणी व करणीवरून काही ते आम्हाला अस्पृश्य मानीत नाहीत. आम्ही स्वच्छता राखली, स्वच्छ कपडे घातले, उच्च व्यवसाय केले, मन निष्पाप व चारित्र्य निष्कंलक ठेवले आणि निर्भयतेने वागू लागलो तरीही हे हिंदू आम्हाला अस्पृश्य मानतात. तेव्हा हा हिंदू धर्म आम्हाला सोडलाच पाहिजे व जो बौद्ध धर्म भारतात उदयाला आला आणि ज्याने माणसामाणसात भेद करण्याचे नाकारले, ज्या धर्माचा मध्यवर्ती सिद्धांत समतेवर आधारलेला आहे, तो आता आम्ही स्वीकारला पाहिजे. भगवंतानी आपला धर्म जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी स्थापिला. इतर धर्म, देव व मनुष्य यांच्यामधील संबंध जोडणारे आहेत. माणसामाणसातील संबंध प्रेम, करुणा या तत्त्वानुसार जोडणारा धर्म बौद्ध धर्म हा एकमेव आहे. बुद्धाने आपल्या धर्माचरणाचा आदर्श संघाच्या रूपाने जगासमोर मांडला. त्या समाजात जातपात नाही. समुद्रात नदी मिळाल्यावर ती जशी समुद्राशी एकरूप होते त्याप्रमाणे बुद्धाच्या समाजात जातपात नाहिशी होऊन सर्व एकरूप होतात.*_

                 _आज दीड हजार वर्षे हिंदू समाजाची सुधारणा होईल आणि त्यात समता येईल, शहाणपणा येईल याची गाव शिवेवर बसून आम्ही वाट पाहात आलो. परंतु कोणालाही सुधारणा सुचली नाही आणि कोणीही आम्हाला आत बोलाविले नाही. उलट धर्माच्या नावाखाली आमची शतकानुशतके अधिकच विटंबना आणि गळचेपी होऊ लागली. कोणी म्हणतात, समता ही भारताला अज्ञात होती. गेल्या शतकातच समतेची कुजबूज येथे सुरू झाली आहे. तेव्हा हळूहळू हिंदू धर्मही सुधारेल आणि समतेचा अंगीकार करील ! हिंदू धर्म सुधारला जाईल हा एक भ्रम आहे. *इतिहास ग्वाही देत आहे की सामाजिक समतेचा संदेश भगवान बुद्धाने अडीच हजार वर्षांमागे या भारताला दिला.* परंतु हा संदेश दडपून टाकण्याचा या देशात बुद्धिपुरःसर नीच असा प्रयत्न झाला आणि अगदी त्याच्या विरूद्ध विषमतेवर आधारलेला आणि काही विशिष्ट वर्गाच्याच हिताची पर्वा करणारा हिंदू धर्म प्रभावशाली करण्यात आला. जोपर्यंत हिंदू धर्म पाळला जात आहे तोपर्यंत या देशातून सामाजिक विषमतेचे उच्चाटन होणार नाही. हिंदू धर्माने बौद्धिक पातळीवर कितीही उदात्त तत्त्वांचा उद्घोष केला तरी त्यांचा आचार हां वर्ण, जातपात, स्पृश्यास्पृश्यता असल्या विषमतेचा असतो. चातुर्वर्ण्य हा त्याचा पृष्ठकणा आहे. तेव्हा हिंदू धर्म सोडल्याशिवाय तुम्हाला तरणोपाय नाही. *तुम्ही बौद्ध झालात तर तुम्हाला बांधव म्हणून मानणारे या जगात काही लोक लाभतील. आज आमच्या देशात जो अन्याय होत आहे त्याने आम्ही विव्हळत आहोत, परंतु त्याला सहानुभूतीची साथ कोठे तरी मिळत आहे काय? नाही. कारण अन्याय करणारे सर्व हिंदू आहेत व त्यांच्या शब्दाप्रमाणे येथील राज्यतंत्र हालत आहे. तुम्ही बौद्ध झालात तर परदेशस्थ बौद्धधर्मीय तुम्हाला बंधु मानतील व तुमच्या दुःखाच्या हाकेला ते ओ दिल्याशिवाय राहाणार नाहीत."*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!!ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २७/०५/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८ भाग ३, पान नं ५७८ - ५८०*__

_*२) धर्मदूत : सारनाथ, डिसेंबर १९५६, पृ. २४६-२४७*_

*_३) प्रबुद्ध भारत : ३१ ऑगस्ट १९५७_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Saturday, 25 May 2024

बुद्ध धर्म हिंदू धर्माची एक शाखा आहे हा खोडसाळ प्रचार होय

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_बुद्ध धर्म हिंदू धर्माची एक शाखा आहे हा खोडसाळ प्रचार होय_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/05/blog-post_25.html

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_*"दिनांक २५ नोव्हेंबर १९५६ रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काशी विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचे उ‌द्घाटन केले.* "उद्घाटनपर भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,."_

               _*बौद्ध धर्माच्या उत्पत्तिसंबंधी पुष्कळच अज्ञान दृष्टीस पडते. प्राचीन भारताचा त्रयस्थपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला बुद्धपूर्व काळात दोन संघर्ष आढळतात. पहिला संघर्ष आर्य व नाग लोकातील व दुसरा ब्राह्मण व क्षत्रियातील.*_

               _*सध्या हिंदू म्हणून समजले जाणारे पुष्कळसे लोक नागवंशीय आहेत. ज्या नाग लोकांनी आर्यापूर्वी भारतात वस्ती केली होती ते आर्यांपेक्षा अधिक सुसंस्कृत होते. त्यांना आर्यांनी जिंकले, एवढ्यावरून आर्यांची संस्कृती त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ ठरत नाही. आर्यांच्या विजयाचे कारण म्हणजे त्यांचे वाहन. आर्य घोड्यावर स्वार होऊन लढत तर नाग पायदळी लढत. आर्य-नागांमधील लढा प्राणपणाने लढला गेला. महाभारतातील खांडववन व सर्पसत्र या कथांवरील कल्पनेचे परिवेष्ठन दूर केले तर या आर्य-नाग युद्धाचे भयानक स्वरूप आपल्या दृष्टीस पडते. आर्यांनी खांडववन दहनासारखी म्हणजे Scorched earth policy ची कृत्ये करून नागांची ससेहोलपट चालविली. या विध्वंसातून अगस्तीने एका नागाला वाचविले, अशी एक कथा आहे. कथेत अतिशयोक्ती असली तरी नागांच्या वसाहती संपूर्ण नष्ट करण्यासाठी आर्य कसे झगडत होते हे त्यावरून दिसून येते. पराभवामुळे नागांच्या मनात आर्यांविषयी द्वेष वसत होता. परिक्षिताचा प्राण घेणारा तक्षक हा कोणी सर्प नसून एक नागवंशी पुढारी होता. आर्य लोकांच्या मनात नागांसंबंधी वसत असलेल्या द्वेषाचे उदाहरण म्हणून, कर्ण व अनंत यांच्या कर्णार्जुन युद्धापूर्वी झालेल्या संभाषणाचा उल्लेख करता येईल. कर्णार्जुन युद्धापूर्वी अनंत हा नागवंशीय योद्धा कर्णाला भेटला आणि आपण अर्जुनाविरूद्ध साह्य करू असे आश्वासन देऊ लागला. कर्णाने ते देऊ केलेले साह्य नाकारले. कारण, कर्ण आर्य होता आणि अनंत हा नाग होता. आर्यांनी आपापसातील युद्धासाठी नागांचे साह्य घेणे निषिद्ध होते.*_

                _*बौद्धपूर्व काळातील दुसरा संघर्ष म्हणजे ब्राह्मण-क्षत्रियांमधला.* या लढ्याची वर्णने पुढे पुराणातून आली आहेत. त्याप्रमाणेच मनुने आपल्या स्मृतीत, क्षत्रियांनी ब्राह्मणांना आदराने का वागविले पाहिजे त्याची कारणे देताना, पूर्वकालीन ब्राह्मण-क्षत्रियांच्या संग्रामाचा उल्लेख केला आहे._

                 _*आर्य व नाग, ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यामधील झगडे चालू असता ब्राह्मणांनी ऋग्वेदात पुरुषसुक्तांचा अंतर्भाव केला असावा. पुरुषसुक्तापूर्वी चातुर्वर्णातील चारही वर्ण एकाच समान पातळीवर होते. पुरूषसुक्ताने उच्चनीचतेचे तत्त्व समाजात आणले.* या सुमारास भगवान बुद्धाने भारतीय जीवनात प्रवेश केला. *ज्या शाक्य कुळात गौतमाचा जन्म झाला त्या शाक्यांचे गणराज्य लोकशाहीप्रधान होते. या लोकशाहीच्या परंपरेत वाढलेल्या गौतमास चातुर्वर्ण्य अमान्य होते. सध्याच्या स्वरूपातील बौद्ध धर्म हा एक नानाविध सिद्धांतांचा महासागरच झाला आहे. परंतु बौद्ध धर्माचा मध्यवर्ती सिद्धांत अथवा बुद्धमत हे समतेवरच आधारलेले आहे. बौद्ध धर्माचा स्वीकार करणारे लोक बव्हंशी नागवंशीय आणि चातुर्वर्ण्यत हीन समजल्या जाणाऱ्या वर्णांपैकी होते. नागांची युद्धप्रीती मुचलिंद नागाच्या कथेवरून सिद्ध होते. मुचलिंदाचे अग्निहोत्री कश्यपाशी वैर होते. परंतु कश्यपाकडे आतिथ्यासाठी आलेल्या बुद्धाचा तो सेवक बनला. बौद्ध धर्माच्या अभिवृद्धीचे कारण शुद्रादिशुद्रांनी त्याचा बहुसंख्येने केलेला स्वीकार. बौद्ध वाङ्मय व विशेषतः थेर व थेरीगाथा यांच्या आधारे हे सिद्ध करता येईल.*_

                    _*बौद्ध धर्म ही हिंदू धर्माचीच एक शाखा आहे, अशा मताचा प्रचार अलिकडे फारच बोकाळला आहे. वस्तुतः बौद्धप्रणीत धर्म समकालीन होता. तो वैदिक अथवा ब्राह्मणी धर्माहून अतिशय भिन्न होता. वैदिक वेदग्रंथांना प्रमाणे मानीत तर बुद्धाचा त्यांना विरोध होता. कलामसुक्तांमध्ये बुद्धाने माणसाला विचार स्वातंत्र्य असले पाहिजे आणि वेदांनी माणसासाठी सदासर्वकाळ टिकणारा विचार करुन ठेवला नाही असे प्रतिपादिले आहे. बुद्धाच्या वेदप्रामाण्यावरील आघाताचा पुढील काळात हिंदुंच्या भगवद्गीतेसारख्या ग्रंथावरही परिणाम झाला आहे. वेदपाठकांची गीतेने एके ठिकाणी बेडूक म्हणून संभावना केली आहे. बुद्धाने वेदांना वाळवंट म्हटले आहे. वेदामध्ये प्राधान्याने इंद्रादी देवतांना उमदे घोडे, तेजस्वी शस्त्रास्त्रे, शत्रुवर विजय इत्यादी ऐहिक सुखोपभोगासाठी केलेल्या प्रार्थना आहेत. त्यात उदात्त नीतितत्त्वांची शिकवण नाही. म्हणून बुद्धाने त्याचा धिक्कार केला.*_

                   _*बुद्धाचा समकालीन धर्मावरील दुसरा आघात म्हणजे यज्ञसंस्थेवरील होय. गाई-बैलांचे बळी देऊन तुम्हाला कोणते उच्चश्रेय लाभणार आहे, असा त्यांचा याज्ञिकांना प्रश्न असे. यज्ञसंस्थेवरील बुद्धाच्या टिकेमुळे हिंदुना इंद्रवरुणादि आद्य देवतांचा त्याग करावा लागला.* थोडेसे विषयांतर करून मी तुम्हाला विचारतो. हिंदू धर्मात ईश्वराची (God) कल्पना खरी आहे काय ? काशीतील तुमचा पूजनीय महादेव देव मानावा तर त्याचे लग्नही होते व तो आपल्या बायकोबरोबर नाचतोही. ब्रह्मा, विष्णूचीही तीच कथा. यांना काय देव म्हणायचे ? सामान्य माणसालासुद्धा आज लाज वाटेल अशी दृष्कृत्ये त्यांच्या हातून घडल्याचे तुमची पुराणेच सांगतात. असा एक तरी देव दाखवा की ज्याचे निष्कलंक चारित्र्य आजच्या माणसाला आदर्शवत् व अनुकरणीय वाटेल ? हिंदुंचे देव म्हणजे राजांची कुलदैवते, त्यांचे पराक्रम म्हणजे राजांचे पौरोहित्य मिळविण्यासाठी ब्राह्मणांनी रचलेली त्यांच्या दैवतांच्या खुशामतीची पुराणे. इंद्र, कृष्ण काय हे देव ? ऋग्वेदाच्या शेवटच्या भागात इंद्रपत्नीने इंद्रास मोजलेल्या शिव्या वाचून पहा । दुर्योधन संपूर्ण वज्रदेही होऊ नये व गदायुद्धात भीमास यश मिळावे म्हणून कृष्णाने योजलेले कपट नाटक पहा. तुमचा शेजारी असे वागू लागता तर तुम्ही त्याला काय म्हणाल ! असो ! *बुद्धाने पशुहत्त्येची निर्भत्सना केली आणि यज्ञाचे वैफल्य जनतेस पटवून दिले, म्हणूनच ब्राह्मणांना आपले प्राचीन याज्ञिक आचार सोडावे लागले.*_

                   _*आश्रम व्यवस्थेसंबंधीही बुद्धाचे मत प्रचलित वैदिक धर्मापेक्षा वेगळे होते. ब्राह्मणांच्या मते ब्रह्मचर्य आश्रमानंतर गृहस्थाश्रम स्वीकारणे आवश्यक होते. बुद्धाच्या मते ब्रह्मचर्यानंतर परिव्रज्या स्वीकारण्यास प्रत्यवाय नव्हता. ब्रह्मचर्याचा मूळचा अर्थ ज्ञानार्जनाची अवस्था, अविवाहित अवस्था हा त्यास नंतर चिकटविलेला अर्थ आहे. ब्राह्मणांनी गृहस्थाश्रमाचा काळ वाढविण्यासाठी त्याला वानप्रस्थाश्रम जोडला. ब्रह्मचर्यानंतर संन्यास (परिव्रज्या) स्वीकारण्यास ब्राह्मणांची हरकत होती. अकराशे वर्षांनी कुमारिल भट्टाने बुद्धावर घेतलेल्या आक्षेपात बुद्धाच्या परिव्रज्येच्या स्वातंत्र्यावरच भर दिलेला आहे.*_

                       _*बुद्धाचा वैदिक धर्माशी चवथा विरोध चातुर्वर्ण्याबाबत होता. त्याचे शिष्य उच्च कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या सर्व जातीतील होते. आपल्या शिष्यांत उच्चनीचतेच्या भावनेला जागा राहू नये, याबाबतीत तो अत्यंत दक्षता पाळीत असे. आपल्या चुलत भावांना आपल्या क्षत्रियत्त्वाचा अभिमान वाटू नये म्हणून त्याने त्यांच्या समवेत आलेल्या 'उपाली' स प्रथम दीक्षा दिली. ज्याची दीक्षा अगोदरची तो नंतर दीक्षा घेणारास वंद्य समजला जाई. म्हणून क्षत्रिय शाक्यांना उपाली या त्यांच्या पूर्वाश्रमीच्या नापित सेवकास अभिवादन करावे लागे. आपल्या जीवनाच्या शेवटल्या दिवसात चुन्द या हीनजातीय समजल्या जाणाऱ्या लोहाराच्या घरचे अन्न ते प्रकृतीस अनिष्ट आहे, असे समजूनही त्याने ग्रहण केले आणि सामाजिक समतेसाठी प्राणाचे मोल दिले. असे चातुर्वर्ण्य विरोधी प्रसंग बुद्धाच्या जीवनात अनेक दाखविता येतील. तो आपल्या संघाला सागराची उपमा देई. ज्याप्रमाणे सागरास मिळाल्यावर नदीची पृथगात्मता राहात नाही आणि सर्व जल एकरूप होते त्याप्रमाणेच संघात येणाऱ्या भिन्न वर्णीय भिख्खूंचे वर्णवैशिष्ट्य नष्ट होते. जैन मतालाही चातुर्वर्ण्य निषिद्ध होते. परंतु त्या मुद्यावर भांडण करायला ते सिद्ध नव्हते. बुद्ध मात्र आपल्या मुद्यांबाबत गुळमुळीत मौन धारण करीत नसे. आपल्या धर्माचे आपण वीर आहोत आणि त्याच्या स्थापनेसाठी आपणाला अज्ञानाशी झगडावे हे लागणारच असे त्याचे मत होते. बुद्धाची ही चातुर्वर्ण्यविरोधाची तीव्रता ब्राह्मणांच्या मनात सदैव डाचत राहिली. म्हणूनच चातुर्वर्णाविषयी मूक असलेल्या निरिश्वरवादी सांख्याचार्य कपिलमुनीस त्यांनी आपले म्हटले परंतु बुद्धाशी सदैव वैर मानले.*_

                     _*बुद्धाचा वैदिक धर्माला पाचवा विरोध देव आणि आत्मा यांच्या अस्तित्वाबाबतचा होता. बुद्धाच्या मते सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, सर्वव्यापी, न्यायी आणि प्रेममय अशा देवाचे अस्तित्व ज्ञानाची साधने जी पंचेंद्रिये आणि तर्क यांच्या साह्याने सिद्ध करता येत नाही. शिवाय धम्माचा उद्देश दुःख परिहार आहे. देव मानल्याने दुःख कमी होत नाही. माणसाने दुसऱ्या माणसाशी कसे वागावे म्हणजे सर्व माणसे सुखी होतील हे शिकवणे हे धर्माचे मुख्य कार्य आहे. म्हणून धम्माचा देवाशी संबंध येत नाही. देवाचे अस्तित्व केवळ पोकळ तर्कावर (Speculation) आधारलेले आहे आणि या अस्तित्वाच्या श्रद्धेतून पूजा, प्रार्थना, पुरोहित इत्यादी अष्टांग मार्गातील समादिड्डीला घातक अशा खुळ्या समजुतीचे (Superstition) पेव फुटते. माणसाचे परस्पर संबंध प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री यांनी नियंत्रित होण्याऐवजी पावित्र्य, उच्चनीचता अशासारख्या भ्रामक समजुतींनी नियंत्रित होतात. देवाचे अस्तित्वावरील बुद्धाचे आक्षेप केवळ व्यावहारिक दृष्टीचेच होते असे नाही. प्रतिच्च समुत्पाद या त्यांच्या सिद्धांतात देवाच्या अस्तित्वावर सर्वसामान्य तार्किक स्वरूपाचे आक्षेप घेतलेले आहेत. या सिद्धांताप्रमाणे देव आहे किंवा नाही हा मुख्य प्रश्न नाही. त्याप्रमाणे विश्व देवानी निर्मिले की नाही हाही मुख्य प्रश्न नाही. मुख्य प्रश्न असा की, देवाने जग कसे निर्माण केले ? देवाच्या अस्तित्वाचे मंडण अथवा खंडण या प्रश्नाच्या उत्तराने होईल. यादृष्टीने महत्त्वाचा प्रश्न असा "देवाने हे जग अभावातून निर्मिले की, पूर्वी अस्तित्वात असलेल्या कशातून तरी निर्मिले ?" काहीच नव्हते त्यातून काहीतरी निर्मिले या गोष्टींवर माणसाच्या बुद्धीला विश्वास ठेवता येत नाही. जर या तथाकथित देवाने हे जग पूर्वी काहीतरी होते त्यातून निर्मिले असेल तर जे नवे काहीतरी त्याने निर्मिले ते आपल्या निर्मितीपूर्वीही अस्तित्वात होते असे मानावे लागते. मग जे पूर्वी होते त्याच्या निर्मितीचा कर्ता देव ठरू शकत नाही. देवाने काहीतरी निर्मिण्यापूर्वी कोणीतरी काहीतरी निर्मिलेले असेल तर देवाला आद्यनिर्माता किंवा आदिकारण म्हणता येणार नाही. एकूण कारण अस्तित्वासंबंधीची विचारसरणी तर्कदुष्ट असल्यामुळे देवावरील श्रद्धा बुद्धाच्या समदिष्ठ्ठीप्रधान धम्माला अमान्य आहे.*_

                  _*वेदांतातील मोक्ष सिद्धांत म्हणजे आत्म्याने ब्रह्मात विलीन होणे यालाही तर्कदुष्ट ठरवून आणि मानवी जीवन सुखी करण्याच्या दृष्टीने निरूपयोगी म्हणून बुद्धाने विरोध केला आहे. ब्रह्मविषयक बुद्धाची विचारसरणी त्याच्या वसिष्ठ व भारद्वाज या दोन ब्राह्मणांशी झालेल्या संवादात व्यक्त झाली आहे. बुद्धाचे आत्म्याच्या अस्तित्वावरील व्यावहारिक दृष्टीचे आक्षेप त्याच्या देवकल्पनेवरील आक्षेपासारखे आहेत. शिवाय तो आत्म्याचे म्हणून समजले जाणारे व्यापार नामरुप या सिद्धांताच्या आधारे स्पष्ट करून दाखवितो. कायेच्या उत्पत्तीबरोबरच जाणिवेचा (Consciousness) प्रारंभ होतो. इच्छात्मक, भावनात्मक आणि विचारात्मक कार्य ही जाणिवेचीच आहेत. तेव्हा आत्मा हे वेगळे तत्त्व गृहीत धरण्याची आवश्यकताच उरत नाही.*_

                    _*अशारितीने वैदिक धर्माशी विरोध असणाऱ्या बौद्ध धर्माचा पाडाव करण्यासाठी ब्राह्मणांनी भल्याबुऱ्या सर्व प्रकारच्या साधनांचा उपयोग केला. बौद्ध धम्म ज्या गोष्टींमुळे लोकप्रिय झाला त्या गोष्टी आपल्या पूर्वापार धर्मास सम्मत नसल्या तरी त्यांचा त्यांनी उपयोग केला. या प्रचार पद्धतीस अनुसरूनच वेरूळच्या बौद्ध लेण्याजवळ त्यांनी आपली ब्राह्मणी लेणी कोरली. वस्तुतः ब्राह्मण हा गृहस्थाश्रमी. अग्निहोत्र हे त्यांचे नित्यव्रत. त्याला परिमार्जित भिख्खुसारखे गुहेत राहाण्याचे कारण नव्हते. भिख्खूंना पावसाळ्याच्या तीन महिन्यात कुठेतरी निवाऱ्याच्या जागी वास करण्याचा बुद्धाचा आदेश होता. त्यामुळे त्यांना लेण्याची आवश्यकता होती. गृहस्थाश्रमी ब्राह्मणाला ती तशी नव्हती. परंतु बौद्ध लेण्यांकडे उपासकांचा मोठा मेळावा आकृष्ट होतो म्हणूनच केवळ त्यांच्या लेण्याच्या बाजूला आपली लेणी कोरून आपल्या धर्माकडे उपासक ओढून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बौद्ध धर्माच्या -हासाचे मुख्य कारण म्हणजे, हिंदू पंडित सांगतात त्याप्रमाणे, कुमारिल, शंकराचार्य इत्यादींनी बुद्धमताचा वाग्युद्धात केलेला पराभव हे नव्हे. कारण दोघांनीही बुद्धाच्या शिकवणुकीचे मध्यवर्ती सिद्धांत जे सामाजिक समता, जगातील दुःख परिहारासाठी प्रत्येक व्यक्तिचे मनःपरिवर्तन, नीति तत्त्वांची सामाजिक जीवनातील प्रतिष्ठापना, बुद्धिवाद इत्यादी, त्यावर या पंडितांनी मुळीच आघात केलेला नाही. या दोघाही पंडितांनंतर बौद्ध धर्म भारतात कित्येक वर्षे समृद्धावस्थेत होता. बौद्ध धर्माच्या -हासाचे मुख्य कारण म्हणजे ज्या भिन्न संस्कृतीच्या व भिन्न सांस्कृतिक पातळीच्या लोकांमध्ये त्याचा प्रचार झाला, त्यांच्या आचारांची व समजुतीची बौद्ध धर्मावर झालेली अनुचित प्रतिक्रीया. भारतातील बौद्ध धर्मावर झालेला सर्वात मोठा आघात म्हणजे इस्लामी आक्रमणाचा. भारताकडे वळताना मुसलमान आक्रमकांना जे परधर्मी लोक भेटले ते बौद्धधर्मीयच होते. त्यांच्या भाषेत मूर्तिला " बुत् " असे म्हणत, बुत्शिकन म्हणजे मूर्तिभंजक होणे हे त्यांच्या मते गाझीपणाचे लक्षण होते. हिंदूंपेक्षा बौद्धांवर चढविलेले त्यांचे हल्ले अधिक हिंस्त्र व विध्वंसक स्वरूपाचे होते. त्यांनी केलेल्या बौद्ध भिख्खूंच्या कत्तलीने ११ पासून १३ व्या शतकापर्यंतची इतिहासाची पाने रक्ताने रंगलेली आहेत. नालंदा सारख्या जगविख्यात बौद्ध विद्यापिठाचा त्यांनी पूर्ण नाश केला. हिंदुंप्रमाणे बौद्धांमध्ये धर्मप्रचाराचे पिढिजात काम करणारा ब्राह्मणासारखा वर्ग नसल्याने, भिख्खूंच्या कत्तलीनंतर बौद्ध धर्माचा झपाट्याने हास सुरू झाला. सत्याचाही कधी कधी पराभव होतो हे ह्याचे हे एक उदाहरण आहे. परंतु आज त्यानंतर सहाशे वर्षांनी भारताला बुद्धाची आठवण होत आहे आणि आज जर त्याने बुद्धाच्या विचारसरणीचा स्वीकार केला नाही तर त्याचे भवितव्य ठीक नाही.*_

                _भाषणानंतर विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाने विचारलेल्या सर्व प्रश्नांची बाबासाहेबांनी उत्तरे दिली. ती प्रश्नोत्तरे एका स्वतंत्र वृत्ताचा विषय होतील. विषय ऐतिहासिक असूनही व्याख्यानाच्या अभिनव दृष्टिकोनाने प्रतिगामी मानलेल्या काशी विद्यापिठाच्या विद्यार्थी व आचार्य गणांस चांगलेच खडबडविले._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!!ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २६/०५/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८ भाग ३, पान नं ५७२ - ५७७*__

_*२) धर्मदूत : मासिक, डिसेंबर १९५६ पृ. २४५*_

*_३) प्रबुद्ध भारत : २४ ऑगस्ट १९५७_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Wednesday, 22 May 2024

बुद्ध व त्याच्या धम्माचे भवितव्य

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_बुद्ध व त्याच्या धम्माचे भवितव्य_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/05/blog-post_22.html

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                _*१९५० च्या वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटी ने त्यांच्या 'महाबोधी' ह्या मासिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा " Buddha and the future of his Religion " शीर्षकाखाली लेख प्रकाशित केला होता. त्या लेखाचा मराठीत केलेला हा मुक्त अनुवाद.*_

                     _*"पृथ्वीतलावर जेवढे म्हणून धर्म संस्थापक होऊन गेले आहेत, त्या सर्वांमध्ये केवळ चौघांनीच भूतकाळ गाजविलेला आहे; एवढेच नव्हे तर वर्तमानकाळ सुद्धा खडबडून जागा केलेला आहे: आणि आपल्या धर्ममतांचा पगडा जनमानसावर कायमचा बसविलेला आहे. बुद्ध, ख्रिस्त, महंमद व कृष्ण हेच ते चार धर्मप्रमुख व धर्मप्रसारक होत. ह्या चौघांच्या व्यक्तिमत्वांची व धर्मप्रसारपद्धतींची तुलनात्मक छानणी केली तर परस्परांत मात्र बराच विरोध आढळून येतो.*_

                    _*आत्मस्तुती व अहंभाव यांच्यापासूनची अलिप्तता हे खास वैशिष्ट्य चौघांमध्ये फक्त तथागत बुद्धाच्याच बाबतीत प्रकर्षाने उठून दिसते.* बायबलचे वाचन केले तर त्यात सर्वत्र येशू ख्रिस्ताने स्वतःला परमेश्वराचा खास पुत्र म्हणवून घेतल्याचे व जो कोणी त्याला मानणार नाही अशा व्यक्तीस आकाशातील देवांच्या राज्यात प्रवेश करता येणार नाही असे सांगितल्याचे आढळून येते._

                    _महंमद पैगंबराने खिस्तापेक्षा एक पाऊल पुढे टांकले आहे. त्याने स्वतःला अल्लांचा (परमेश्वराचा) प्रेषित किंवा दूत म्हणवून घेतले आहे; आणि तो सुद्धा शेवटचाच. त्याच्यानंतर कोणीही ईश्वराचा प्रेषित असणार नाही किंवा होणार नाही. आणि म्हणून ज्या कोणाला संसारापासून मुक्ती हवी असेल व जन्नत (स्वर्ग) पाहिजे असेल त्याने कोणतीच आशंका न बाळगता महंमद पैगंबरालाच मानले पाहिजे असे त्याने निक्षून सांगितले आहे._

                _श्रीकृष्णाने तर येशू खिस्त व महंमद पैगंबर ह्या दोघांवरही ताण केली आहे. ईश्वराचा पुत्र किंवा शेवटचा दूत वगैरे असे काही एक न म्हणवून घेता किंवा मी देव आहे असेही न म्हणवून घेता श्रीकृष्णाने स्वतःलाच परमेश्वर म्हणजेच देवाधिदेव (देवांचा देव) म्हणवून घेतले आहे. यास्तव सर्वांनी केवळ त्याचीच पूजा करावयास पाहिजे; त्यालाच भजावयास पाहिजे. म्हणजे सगळ्यांना मुक्ती प्राप्त होऊन स्वर्गलाभ होईल असे त्याने सांगितले आहे._

              _*परंतु तथागत बुद्धाने ह्या असल्या कोणत्याच गोष्टीचे प्रतिपादन केलेले नाही ख्रिस्त, पैगंबर किंवा कृष्ण यांच्या सारखा अंहभाव बुद्धाने मुळीच बाळगलेला नाही किंवा आत्मप्रौढीही गाइलेली नाही. बुद्धाने केवळ आपण एक मानवपुत्र असल्याचे सांगून सर्व साधारण माणूस म्हणूनच त्याने आपल्या धर्ममतांचा व तत्वज्ञानाचा प्रसार केलेला आहे. इतरांसारखे त्याने स्वतःचे मुळीच दैवीकरण केलेले नाही किंवा आपण अलौकिक चमत्कार केलेले आहेत असे लोकांना सांगून त्यांना भुरळ पाडण्याचा किंवा त्यांची वंचना करण्याचा अल्पसाही प्रयत्न केलेला नाही. तथागत बुद्धाने 'मार्गदाता' व 'मोक्षदाता' यांत अगदी स्पष्ट असा फरक केलेला आहे. आम्ही सांगितल्याप्रमाणे वागाल तरच तुम्हाला मुक्ती मिळेल, स्वर्ग मिळेल, अशी भूमिका ख्रिस्त, पैगंबर व कृष्ण ह्यांनी घेतलेली आहे. उलट मी केवळ एक मार्गदर्शक आहे, त्याप्रमाणे वागणे न वागणे हे तुम्हीच ठरवायचे आहे. माझी तुमच्यावर कोणतीच बळजोरी नाही, अशी भूमिका तथागत बुद्धाची आहे. बुद्धाने आपले म्हणणे लोकांनी मानावे म्हणून ख्रिस्त, पैगंबर किंवा कृष्ण यांच्यासारखी मोक्षाची, स्वर्गाची किंवा मुक्तीची लालूच दाखविलेली नाही. जीवनातील दुःख नष्ट करून सुखप्राप्ती प्रत्येक मनुष्याला करून घेता येते. यावरच तथागत बुद्धाने भर दिलेला आहे.*_

                 _अजून एक महत्त्वाचा फरक या चौघांत आढळून येतो. ख्रिस्त व पैगंबर हे स्वतःला अनुक्रमे परमेश्वराचा एकुलता एक पुत्र व खास दूत म्हणवून घेत असल्याने त्यांनी सांगितलेले प्रत्येक वचन देवाच्या मुखातील आहे; प्रत्यक्ष देवाने त्यांना सांगितलेले आहे, असा ते दावा करतात. यास्तव ते वचन कधीही खोटे असू शकत नाही आणि म्हणून खिस्ताने किंवा पैगंबराने सांगितलेल्या वचनांवर जगातील कोणत्याही व्यक्तीने अविश्वास दाखवू नये किंवा आशंका बाळगू नये असा आग्रह ते दोघेही करतात. कृष्णाच्या बाबतीत सारेच काही निराळे आहे. कृष्ण हा स्वतःलाच परमेश्वर म्हणवून घेत असल्याने त्याने सांगितलेले प्रत्येक वचन अंतीम सत्य होय आणि म्हणून ते शंकातित आहे, अचूक आहे, असा तो आदेश देतो. परंतु तथागत बुद्धाने असा कोणताच दावा केलेला नाही._

               _*'महापरिनिर्वाण सुत्ता' मध्ये तथागत बुद्धाने आनंदाला सांगितले आहे की, माझा धम्म बुद्धिवादावर व अनुभवावर आधारित आहे आणि म्हंणून माझ्या अनुयायांनी मी सांगतो म्हणून सत्य आहे असे समजून अंधानुकरण करू नये, बुद्धिप्रामाण्य व अनुभव हा माझ्या धम्माचा मूलभूत पाया असल्याने कालमानानुरूप व परिस्थितीनुसार त्याच्यात त्यांना बदल करता येतो. एवढेच नव्हे तर माझी जी मते काळाशी अनुरूप व परिस्थितीशी सुसंगत वाटत नसतील ती मते त्यांना टाकूनही देता येतात. याच कारणामुळे तथागत बुद्धाने बौद्ध धर्म शुष्क, काष्ठ न समजता तो सदाहरित व चिरतरुण मानला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यासाठी त्याने आपल्या अनुयायांना नितांत गरज भासेल तेव्हा बौद्धमते परिवर्तनशील करण्यास पूर्णपणे स्वातंत्र्य प्रदान केलेले आहे. असे स्वातंत्र्य दुसऱ्या कोणत्याच धर्मगुरूने आपल्या अनुयायांना दिलेले नाही, किंवा तसे स्वातंत्र्य देण्याचे धाडसही दाखविलेले नाही. कारण त्यांना भीती वाटली असावी की, अशा मुक्त स्वातंत्र्याने त्यांनी प्रस्थापित केलेल्या धर्ममतांचा डोलाराच नेस्तनाबूत होईल व त्यांचे नामनिशाण सुद्धा राहणार नाही. परंतु, अशी भीती बुद्धाला कधीही वाटली नाही. त्यांच्या धर्ममतांची इमारतच मुळात भक्कम अशा पायावर आधारलेली होती. जगातील कोणताच वैचारिक झंजावात आपल्या धम्माला जमीनदोस्त करू शकणार नाही. ह्याची बालंबाल खात्री बुद्धाला होती. हेच तथागत बुद्धाच्या अद्वितीय व्यक्तिमत्वाचे निदर्शक होय.*_

                _बुद्धाचे असाधारण व्यतिमत्व समजून घेतल्यावर बुद्धाच्या धम्माची विचारसरणी काय होती, बुद्ध तत्त्वज्ञान कसे होते आणि आजच्या प्रस्थापित धर्माच्या तुलनेत बौद्ध धर्माचे काय स्थान आहे हे समजावून घेणे अत्यावश्यक आहे._

                    _भारताच्या संबंधात विचार करताना बौद्धधर्म व हिंदुधर्म यांच्या तुलनेत मोजक्या व प्रमुख बाबींमध्ये फक्त दोनच मुद्यांचा परामर्श घेणे उचित ठरेल. हे दोन मुद्दे म्हणजे धर्मविषयक कर्मकांड व चातुर्वर्ण्यव्यवस्था हे होत._

                    _हिंदू धर्माचा अभ्यास केल्यावर जी बाब प्रकर्षाने जाणवते ती ही की. नीतिमत्ता हिंदू धर्माची आधारशिला नाही. जी काही थोडीफार नीतिमत्ता हिंदू धर्माशी निगडित असलेली आढळते, ती हिंदू धर्माचा अविभाज्य असा घटक नाही. 'धर्म' ह्या प्रचलित शब्दाच्या अर्थामध्येच मूलतः नीतिमत्तेला स्थान नाही. नीतिमत्तेचा संबंध समाज स्वास्थ्याशी निश्चितच लावलेला आहे; परंतु, हिंदू धर्माशी लावला गेलेला नाही. ही अत्यंत आश्चर्यकारक बाब आहे. उलट *बौद्ध धर्म हा मूलतःच नीतिमान् धर्म मानला गेला आहे. नीतिमत्ता ही बौद्धधर्माची सर्वप्रथम व प्रमुख अशी आधारशिला मानली गेली आहे.* इतर धर्म ईश्वराला धर्माचे प्रमुख व मूलभूत अंग मानतात. परंतु, *बौद्ध धर्मात ईश्वराला मुळी स्थानच नाही.* ईश्वराचे स्थान बौद्ध धर्मात नीतिमत्तेने पटकावलेले आहे. जे प्राधान्य इतर साऱ्या धर्मानी ईश्वराला दिले आहे त्याहून काकणभर जास्त प्राधान्य बौद्ध धर्माने नीतिमत्तेला व नीतितत्त्वांना दिलेले आहे._

                 _*'धम्म' या शब्दात बुद्धाने जो क्रांतिप्रवण असा विचार अंतभूर्त केलेला आहे तोच मुळी इतर धर्माकडून डावलला गेला आहे, दृष्टिआड केला गेला आहे. वैदिकांनी योजलेला 'धर्म' हा शब्द सर्वार्थाने बुद्धाच्या 'धम्म' ह्या शब्दापासून भिन्न आहे. नैतिक मूल्यांशी निगडित असलेला अर्थ वैदिकांच्या 'धर्म' या शब्दाशी केव्हाही सूत्रबद्ध नाही. ईश्वराशी संबंधित धर्मकांड करणे किंवा रोमन पुरोहितांच्या जपजाप्याशी निगडित असलेल्या पारिभाषिक अर्थाने विधी करणे म्हणजे धर्म होय असे ब्राह्मणांनी व पूर्वमीमांसाकार जैमिनी ह्याने धर्माचा अर्थ केलेला आहे. ब्राह्मणांच्या धर्म ह्या कल्पनेनुसार ईश्वरास संतुष्ट करण्यासाठी यज्ञयाग करून बलिप्रदान करणे व जपजाप्यादी पूजाअर्चा करणे, हे सर्व धर्मकांड धर्माशी बद्ध असल्याने ब्राह्मणी धर्माचा किंवा वैदिक धर्माचा नीतिमत्तेशी सुतराम संबंध येत नाही.*_

                  _*यांच्या अगदी उलट बुद्धाने धम्माचा अर्थ केलेला आहे. पूजाअर्चा, जपजाप्य, यज्ञयाग इत्यादीं ईश्वर विषयक कर्मकांडाशी बुद्धाने सांगितलेल्या धम्माचा काडीचाही संबंध येत नाही, ईश्वरविषयक सारे कर्मकांड करणे म्हणजेच धर्म होय हे बुद्धाने सपसेल नाकारले आहे. ईश्वर विषयक कर्मकांडाऐवजीं तथागताने आचारशीलेची प्रतिष्ठापना धर्माचा गाभा म्हणून केलेली आहे. ब्राह्मण आचार्य व तथागत बुद्ध ह्या दोघांनी जरी धर्म हा एकच शब्द वापरला असला तरी दोघांच्याही मूलभूत अर्थामध्ये मात्र वर निर्देशिल्याप्रमाणे फरक आहे. तथागत बुद्ध हाच असा एक धर्मवेत्ता होऊन गेलेला आहे की ज्याने नीतितत्त्वांना धर्माचा एक आधारभूत पाया मानलेला आहे.*_

                  _भगवद्‌गीतेचा अभ्यास केला म्हणजे असे दिसून पडते की, कृष्णसुद्धा स्वतःला पारंपारिक धार्मिक विधी व जपजाप्य इत्यादी कर्मकांडापासून अलिप्त ठेवू शकला नाही. उलट त्याने भगवद्गीतेत उपदेशिल्याप्रमाणे निष्काम कर्माची किंवा अनासक्ती योगाची लोकांच्या मनावर भुरळ पाडून कर्मकांडाचाच उदोउदो केलेला आहे. बालवीर (स्काउट) जसा कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता परोपकार करतो, तशा अर्थाचे निष्काम कर्म ह्या शब्दाची व्याख्या आहे असे म्हटले जाते. परंतु निष्काम कर्माचा हा अर्थ, तो शब्द मुळात ज्या अर्थाने वापरला गेला. त्या अर्थापासून दिशाभूल करणारा आहे. निष्काम कर्म ह्या शब्दयोजनेतील 'कर्म, हा शब्द उदात्त भावनेने वापरल्या जाणाऱ्या परोपकार कृत्य ह्या अर्थाने मुळीच वापरला गेला नाही. तर तो शब्द ब्राह्मणांनी किंवा जैमिनीने योजलेल्या ईश्वरविषयक आचार ह्या अर्थाने वापरला गेला आहे. धार्मिक विधींच्या दृष्टिकोनातून पूर्वमीमांसाकार जैमिनी व भगवद्‌गीताकार कृष्ण ह्या दोघांनी फक्त एकाच बाबीत मतभेद व्यक्त केलेला आहे._

            _धार्मिक जपजाप्याच्या व पूजाअर्चेच्या विधीमध्ये ब्राह्मणांनी दोन विभाग केलेले आहेत. एक नित्य कर्म व दुसरे नैमित्तिक कर्म. दररोज व नियमित स्वरूपात केल्या जाणाऱ्या विधी नित्य कर्मात मोडल्या गेल्या, त्यांची सांगड कोणत्याच फलाशी घातली गेली नाही. ह्याच कारणास्तव त्यांना निष्काम कर्म म्हटले गेले. उलट ज्या विधी कोणत्या तरी खास निमित्ताने केल्या जात त्यांना नैमित्तिक कर्म म्हटले गेले. मनामध्ये जेव्हा कोणत्या तरी फलाची अपेक्षा धरली जात असे किंवा इच्छा केली जात असे तेव्हाच ही नैमित्तिक कर्मे केली जात. म्हणूनच त्यांना 'कामायकर्म' असेही म्हटले गेले. भगवद्गीतेत कृष्णाने ज्या कर्माचा धिक्कार केलेला आहे तेच हे कामायकर्म होय. फलाच्या अपेक्षेने न केल्या जाणाऱ्या जपजाप्यादी नित्य कर्माचा म्हणजेच निष्काम कर्माचा कृष्णाने कधीही निषेध केलेला नाही. उलट त्याने त्यांचे गुणगानच गाइले आहे. निष्काम कर्माच्या संबंधात कृष्णाची विचारसरणी लक्षात घेता असाच निष्कर्ष काढावा लागतो की, पूजाअर्चा, जपपाप्य ही नित्यकर्मे करण्यासाठी कृष्णाने नैतिक आचारावर कदापि भर दिलेला नाही. कृष्णाच्या दृष्टिकोनातून धर्म ही नैतिक बाब नसून नुसते कर्मकांडच आहे; आणि तेही कर्मकांड असे की, ज्याचा निष्काम कर्माशी काडीचाही संबंध नाही अशा प्रकारचा जपजाप्य किंवा यज्ञयाग होय._

              _*दुसरा एक महत्त्वाचा फरक बौद्धधर्म व हिंदुधर्म यात आहे. हिंदुधर्म हा असमानतेचा पुरस्कार करणारा आहे. हिंदू धर्माने मान्य केलेली चातुर्वर्ण्य समाजपद्धती हीच असमानतेची मूलभूत आधारशिला आहे. चातुर्वर्ण्य समाजपद्धतीमुळेच जातीभेद निर्माण होऊन उच्चनीचतेची भावना लोकात दृढ झाली. अगदी ह्या उलट समतेचा पुरस्कार करण्यासाठी बुद्ध उभा ठाकला. त्याने चातुर्वर्ण्यविरूद्ध केवळ आवाजच उठविला नाही, तर त्याने एक महान असा लढाही पुकारला व चातुर्वर्त्यांची पाळेमुळे खणून काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला.*_

                     _*हिंदु धर्मशास्त्रानुसार शूद्रांना व स्त्रियांना विद्या देण्याचे नाकारले गेले आहे. एवढेच नव्हे तर संन्यास घेण्याचा अधिकार सुद्धा त्यांना नाकारला गेला आहे. परंतु बुद्धाने असे कोणतेच बंधन घातलेले नाही, किंवा कुणाला मज्जावही केलेला नाही. त्याने आपल्या भिक्खुसंघात इतरांबरोबर शूद्रांना सुद्धा सामील करून घेतले. त्याने चातुर्वर्थ्यांचा कोणताच पंक्तिप्रपंच केला नाही. एवढेच नव्हे तर त्याने स्त्रियांचा सुद्धा भिक्खुणी संघ स्थापना केला व त्यांनाही पुरुषांबरोबर समानतेचा अधिकार दिला. अशाप्रकारे असमानतेवर आधारलेल्या चातुर्वर्ण्यांचा बिमोड करून व समानतेचा पुरस्कार करून बुद्ध जेव्हा आपल्या धर्ममतांचा प्रभाव लोकांवर पाडू लागला तेव्हा साहजिकच हिंदू धर्माला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी फार आटापिटा करावा लागला. त्यासाठी हिंदू धर्माला हिंसेचा त्याग करून बुद्धाने पुरस्कारलेली अहिंसा आत्मसात करावी व मांस भक्षणाचा त्याग करावा लागला. एवढेच नव्हे तर वेदप्रामाण्यालाही झुगारून देण्यास हिंदू धर्माने सिद्धता दर्शविली. परंतु चातुर्वर्ण्यवरील पकड मात्र सोडावयास हिंदू धर्म तयार होऊ शकला नाही. बुद्धाला चातुर्वर्ण्यपद्धती मान्य नसल्याने तो सतत प्रतिकार करीत राहिला. ह्याच कारणास्तव जैन धर्मापेक्षा बौद्ध धर्माचा व बुद्धाचा हिंदू धर्मियांनी सदोदित द्वेष केला व वैरभाव बाळगला. चातुर्वर्णांविरुद्ध बुद्धाने उठविलेला आवाज दाबून टाकण्यासाठी हिंदू धर्माने तार्किक दृष्टिकोनातून नव्हे तर तात्त्विक दृष्टिकोनातून चातुर्वर्णांचे समर्थन करण्यास सुरवात केली. ह्या नाविण्यपूर्ण समर्थनाची उभारणी सर्वप्रथम भगवद्‌गीतेत करण्यात आली.*_

                    _भगवद्‌गीता निश्चित कशाचा उपदेश करते हे कोणालाच नीट सांगता येत नाही. परंतु हे मात्र निश्चित आहे की, भगवद्‌गीता चातुर्वर्थ्यांचे पुरेपूर समर्थन करते. वस्तुतः भगवद्गीता लिहिण्यामागे चातुर्वण्यांचा पुरस्कार करण्याचा प्रमुख हेतू आहे. भगवदगीतेने चातुर्वर्थ्यांचे समर्थन अशा कोणत्या नाविन्यपूर्ण पद्धतीने केलेले आहे ?_

                  _कृष्ण म्हणतो, "मी स्वतः परमेश्वर असल्याने ह्या चातुर्वर्णांची उभारणी मीच केलेली आहे. ती गुणकर्माच्या तत्त्वप्रणालीवर आधारित आहे." याचाच अर्थ असा की, प्रत्येक मनुष्याचे समाजातील स्थान व त्याचा व्यवसाय त्या त्या मनुष्याच्या अंगीभूत गुणावर ठरविण्यात आलेला आहे. यावरून दोन गोष्टी उघडकीस येतात._

                _पहिली गोष्ट अशी की, गुणकर्मशः आधारित चातुर्वर्ण्यपद्धती ही नवीन तत्त्वप्रणाली म्हणून मांडली गेली आहे. पुरातन तत्त्व प्रणालीनुसार चातुर्वर्ण्य वेदप्रामाण्यावर आधारलेले आहे. वेद हे ईश्वरप्रणीत व अपरिवर्तनीय मानले गेले आहेत. त्यामुळे वेदातून सांगितलेले चातुर्वर्ण्यसुद्धा ईश्वरप्रणीत व अपरिवर्तनीय मानले गेले आहे. *बुद्धाने वेदाच्या अपौरुषेयत्त्वावर व अपरिवर्तनशीलतेवर प्रहार केल्यामुळे पर्यायाने चातुर्वर्णांवर सुद्धा प्रत्याघात करून त्याचा पुरातन पायाच उखडून टाकलेला आहे.* याच कारणास्तव अविभाज्य वाटणाऱ्या चातुर्वर्ष्याला टिकविण्यासाठी हिंदू धर्माला भगवद्‌गीतेने पुरस्कारलेल्या तत्त्वप्रणालीचा नवीन व भक्कम आधार घेणे क्रमप्राप्त झाले. परंतु कृष्णाने भगवद्‌गीतेत सांगितलेल्या ह्या नव्या तत्त्वाप्रणालीचे समर्थन कितपत योग्य आहे ? बऱ्याच हिंदू धर्मियांना ही तत्त्वप्रणाली अत्यंत समर्थनीय व निरुत्तर करणारी वाटते. एवढेच नव्हे तर अहिंदूंना सुद्धा ती सत्य व विलोभनीय वाटते. चातुर्वर्ण्य हे केवळ वेदप्रामाण्यावर अवलंबून ठेवले गेले असते तर ते कधीचेच पूर्णपणे रसातळाला गेले असते. अशी माझी पक्की खात्री आहे. भगवद्गीतेने केलेले शाश्वत जीवनाचा सत्याभास निर्माण करणारे चातुर्वण्याचे नवे समर्थन अत्यंत दिशाभूल करणारे व चुकीचे आहे. कारण हा नव्या समर्थनानेच जातीसंस्थेला जन्म दिलेला आहे._

                _चातुर्वर्ण्यचा हा नवीन सिद्धांत मुळातून सांख्य दर्शनापासून घेतलेला आहे. श्रीकृष्णाने तो काही मूलभूत असा सांगितलेला नाही. चातुर्वर्ण्याला पाठबळ देण्यासाठी त्याने सांख्य तत्त्वज्ञानापासून उसणवारी केलेली आहे. परंतु ही उसणवार करताना मात्र त्यात त्याने आपल्या कल्पनेनुसार अनेक युक्तिवाद घुसडलेले आहेत. *सांख्य तत्त्वज्ञानाचा उ‌द्घोषक कपिल ह्याने ईश्वराचे अस्तित्व नाकारले होते.* वस्तू जर अजड मानली गेली तर ईश्वराचे अस्तित्व मान्य करण्याचे काहीच कारण पडत नाही. वस्तू जड नाही; ती अजड आहे: अस्थिर आहे. वस्तू ही रज, तम व सत्व ह्या तीन गुणांनी परिपूर्ण असते. प्रकृती ही ह्या तीन गुणांच्या संतुलनामुळे जड भासत असते. तीन गुणांपैकी एक गुण जरी इतर दोन गुणांपेक्षा प्रबळ झाला तरी प्रकृतीतील समतोलपणा बिघडून तिच्यात क्रियाशीलता निर्माण होते. हेच सांख्य तत्त्वज्ञानाचे सार होय. या सिद्धान्ताबाबत कोणताच वाद असू शकत नाही. हा सिद्धांत बहुतेक खराही आहे. व्यक्तिगत प्रत्येकजन प्रकृतीचाच घटक असल्याने सत्व, रज व तम ह्या त्रिगुणांनी परिपूर्ण असतो. एवढेच नव्हे तर या तीन गुणांत परस्परांवर प्रभुत्व मिळविण्याची अहमहमिका लागत असावी हे सुद्धा मान्य केले जाऊ शकते. परंतु एखाद्या व्यक्तीतील विशिष्ट गुण जन्माच्या वेळी इतर दुसऱ्या गुणांवर प्रभुत्व मिळवून सर्वकाळच नव्हे तर मरणाच्या अंतिम क्षणापर्यंत सातत्याने वास करीत राहील, हे कसे मान्य केले जाऊ शकते ? या अनुमानाला सांख्य तत्त्वज्ञानात किंवा प्रत्यक्ष अनुभवात कुठलाच आधार नाही. ज्या वेळेस कृष्णाने गुणकर्मशः चातुर्वर्ण्यची कल्पना ग्राह्य मानली त्यावेळेस जर हिटलर किंवा मुसलोनी जन्माला आले असते तर एक रंगाऱ्याचा पोर व दुसरा गवंड्याचा पोर जगाला नमविणारे हुकूमशहा कसे झाले याचे कोडे उलगडण्यास श्रीकृष्णाला सुद्धा कठीण गेले असते._

                _वस्तूशी निगडित असणारी अशी एक बाब आहे. ती ही की, व्यक्तिमात्रागणिक प्रकृती सतत बदलत असते. कारण गुणांची सापेक्ष स्थितीसुद्धा परिवर्तनशील आहे. प्रभुत्व मिळविण्याच्या सापेक्ष स्थितीत गुण जर सदोदित बदलत असतील तर मनुष्याची वर्णामध्ये विभागणी करण्याची चिरकालीन व स्थायी स्वरुपाची चातुर्वर्ण्य पद्धती किंवा व्यवसाय पद्धती मान्यच होऊ शकत नाही. त्यामुळे भगवद्‌गीतेची विचारसरणी संपूर्णतः कोलमडून पडते. परंतु ह्या अगोदर मी म्हटल्याप्रमाणे हिंदू धर्मियांना तिच्या सत्याभासामुळे व दर्शनीय चांगलेपणामुळे भुरळ पडलेली आहे, ते तिचे गुलाम झालेले आहेत. परिणामी हिंदू धर्माने चातुर्वर्ण्य पद्धतीचा सतत उदोउदो केलेला आहे आणि असमानतेवर आधारलेल्या जातिसंस्थेला कवटाळून धरलेले आहे. हिंदू धर्माच्या या दोन दुर्गुणांपासून बौद्धधर्म पूर्णतः अलिप्त राहिलेला आहे._

                 _बौद्ध तत्त्वज्ञानच हिंदूंना तारू शकते असे अनेक लोकांना वाटते. परंतु ते काहीसे उदासीन झालेले आहेत. भारतात पुन्हा बौद्ध धर्म मूळ धरू शकणार नाही किंवा त्याचे पुनरुज्जीवन होऊ शकणार नाही असे त्यांना वाटते. परंतु त्यांचा हा निराशावाद मला मान्य नाही._

                   _हिंदुधर्म मानणाऱ्यांत दोन विचारसरणीचे लोक आहेत. पहिल्या विचारसरणीचे लोक सर्व धर्म खरे आहेत, एवढेच नव्हे तर सारखेच आहेत असा विश्वास बाळगणारे आहेत. ह्या विचारसरणीला पाठिंबा देणारे इतर धर्मीय सुद्धा भरपूर आहेत. परंतु सर्व धर्म खरे आहेत किंवा सारखे आहेत असे म्हणण्याइतका मिथ्यावाद दुसरा तरी कोणताच नसेल. दुसऱ्या विचारसरणीचे जे हिंदू आहेत, त्यांना असे वाटते की, हिंदू धर्मात अनेक भोंगळपणाच्या व मिथ्या गोष्टी आहेत. परंतु हे लोक उघडपणे असल्या गोष्टी मान्य करण्यास किंवा उच्चारण्यास धजत नाहीत. हे असे का व्हावे हे मात्र कळत नाही !_

               _*धर्म हा समाजजीवनातील वारसाचा एक भाग असतो. त्याच्याशी मनुष्याचे जीवन, त्याची प्रतिष्ठा, त्याचा स्वाभिमान इत्यादी गोष्टी निगडित असतात. याचमुळे एखाद्याला स्वतःच्या धर्माचा त्याग करणे सहजासहजी शक्य होत नसते. बरोबर असो वा चूक असो माझा देश म्हणण्यात जो एकप्रकारचा स्वाभिमान अंतर्यामी वसत असतो त्याचप्रमाणे बरोबर असो किंवा चूक असो माझा धर्म' म्हणण्यात सुद्धा एक प्रकारचा ज्वलंत स्वाभिमान अंतःकरणात दडलेला असतो. ह्याच कारणास्तव धर्मातील अनिष्ट व अहितकारक बाबींची जाणीव असूनही अनेक हिंदू धर्मीय स्वतःच्या धर्माचा त्याग करण्याचे धारिष्ट्य न दाखविता त्यालाच कवटाळून राहण्यासाठी दुसरे अनेक मार्ग धुंडाळीत असतात. काही लोक स्वतःचे सांत्वन अशा विचाराने करतात की, सर्वच धर्म सदोष आहेत. त्यामुळे हा धर्म वाईट की तो धर्म वाईट असा विचारच मुळी करू नये. काहींना स्वदेश प्रेमाच्या भोंगळ अभिमानाने बौद्धधर्म अत्युत्तम म्हणवून सुद्धा उघड रीतीने स्वीकारण्यास लाज वाटते. या सगळ्या प्रवृत्तींचा एकच परिणाम होणार आहे. कालांतराने धर्म लय पावणार आहे; जीवनधारणेस अयोग्य बनणार आहे. हिंदू धर्मात अशी काही पोकळी निर्माण होणार आहे की, जिच्या परिणामामुळे हिंदू धर्माचे शतशः तुकडे होणार आहेत. ही स्थिती आल्यावरच हिंदूचे डोळे खाडकन उघडतील व इतःपर काहीतरी विधायक व सुयोग्य पाऊल उचलले पाहिजे असे त्यांना वाटू लागेल. मला खात्री आहे की त्यावेळेस त्यांचे पाऊल निश्चितपणे बौद्ध धर्माकडे वाटचाल करू लागेल. ठेवण्यास मार्गदर्शक ठरेल. प्रफुल्लित करणारा आहे. बौद्ध तत्त्वज्ञानच त्यावेळेस त्यांची जीवनधारणा शाबूत ठेवण्यास मार्गदर्शक ठरेल. हाच एक आशेचा एकमेव किरण हिंदूंचे जीवन प्रफुल्लित करणारा आहे. एवढेच नव्हे तर अनेकविध मार्गांनी त्यांचे जीवन सुफलित करण्यास बौद्ध धर्मच कारणीभूत ठरणार आहे.*_

                 _आज प्रत्येक धर्माला एका प्रश्नाचे उत्तर देणे भाग आहे. पीडित व पददलित जनतेचा मानसिक व नैतिक अभ्युदय घडवून आणण्याचे सामर्थ्य कोणत्या धर्मात आहे ? आज हयात असणाऱ्या धर्मात अशाप्रकारचे सामर्थ्य नसेल तर तो धर्म कुचकामी होय._

                  _लाखो दलित व अस्पृश्य गणल्या गेलेल्या लोकांची मानसिक व नैतिक स्थिती हिंदुधर्म म्हणविणारा धर्म सुधारू शकतो काय ? दुर्दैवाने याचे उत्तर' नाही' असेच म्हणावे लागते. मग ह्या लाखो दलित व अस्पृश्य लोकांनी हिंदू धर्मातच खितपत पडून राहावे अशी अपेक्षा हिंदूंनी करावी काय ? ही अपेक्षा सर्वथा अयोग्य होईल. खरे पाहता हिंदू धर्म आज ज्वालामुखीच्या तोंडाशी रेंगाळत आहे. आज जरी हिंदू धर्माचे अस्तित्व दिसत असले तरी कधी ज्वालामुखीचा उद्रेक होऊन तो रसातळास पोहचेल याची शाश्वती नाही. कारण लाखो पददलित लोकांची अस्मिता जेव्हां जागृत होईल व आपल्या अधोगतीस हिंदू धर्मच कारणीभूत झाला हे कटु सत्य त्यांच्या नजरेस पडेल तेव्हा अनावर विद्रोहाची लाट हिंदू धर्माला नेस्तनाबूत करून टाकील. या संबंधात इतिहासाचा मागोवा घेतला तर रोम साम्राज्यात मूर्तीपूजा मानणाऱ्या व गुलामगिरीचा कडाडून पुरस्कार करणाऱ्या सनातनी धर्माचा पाडाव ख्रिस्ती धर्माने कसा केला ह्याचे स्मरण झाल्यावाचून राहत नाही. *अनुचित रूढीप्रिय सनातनी धर्म जेव्हा सर्वसामान्य जनतेला मानसिक व नैतिक स्वातंत्र्य बहाल करू शकत नाही, हे पाहिल्यावरच रोम साम्राज्यातील लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला.* रोम साम्राज्यात जे घडले त्याच इतिहासाची पुनरावृत्ती भारतात देखील निश्चितपणे होणार आहे. *भारतातील सर्वसामान्य जनतेला सत्याची ओळख पटेल तेव्हा ती जनता आपोआपच बौद्ध धर्माचा मार्ग चोखाळणार आहे.*_

               _हिंदुधर्म च बौद्ध धर्म ह्यांच्यात तौलनिक विचार केल्यानंतर इतर धर्माच्या विचारसरणीत बौद्ध विचारधारा काय आहे, हे आता आपण संक्षेपाने बघू या._

                 _*कोणतीही समाजव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी त्या समाजव्यवस्थेस एकतर कायद्याचा किंवा नीतिमत्तेचा आधार घ्यावा लागतो. कायदा आणि नीतिमत्ता ह्या दोहोंपैकी एखादी गोष्ट जरी नसेल तर समाजस्वास्थ अबाधित राहत नाही. कोणत्याही समाजात कायद्यांना फार थोडा वाव दिलेला असतो कारण थोड्या लोकांना सामाजिक शिस्तीत बद्ध करण्यासाठीच कायद्यांची योजना केलेली असते. त्या कायद्यांच्या जोरावर त्यांना योग्यप्रकारे वागायला भाग पाडून समाजस्वास्थ्य टिकवून ठेवता येते. उलट बहुसंख्य लोकांना नीतिमत्तेच्या धाकाने समाजजीवन सुस्थिर ठेवण्यास प्रवृत्त करता येते. ही बाब लक्षात घेतली म्हणजे नीतिमत्तेवर आधारित धर्म समाजजीवन सुस्थिर करण्याचे व समाजस्वास्थ टिकवून ठेवण्याचे प्रमुख तत्त्व आहे हे मानावे लागते.*_

                 _*दुसरी गोष्ट, धर्म हा विज्ञानाशी विसंवादी असून चालत नाही. तो जर विज्ञानाशी विसंगत असेल तर तो लोकादरास पात्र ठरत नाही. तो हास्यास्पद ठरून जीवनविषयक तत्त्वज्ञान रुजविण्यास असमर्थ ठरतो. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास असे म्हणता येईल की, धर्माला जर कार्यप्रवण व्हावयाचे असेल तर त्याचा संबंध कार्यकारणाशी म्हणजेच विज्ञानाशी दृढतर असावयास पाहिजे.*_

                 _*तिसरी गोष्ट, सामाजिक नीतिमत्ता ह्या दृष्टीने धर्माला एका विशिष्ट चाचणी परीक्षेत उतरावे लागते. धर्म हा केवळ नीतिबद्ध असून चालत नाही तर त्याला स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या त्रयींच्या चाचणीत उतरावे लागते. ह्या त्रयींशिवाय कोणताही धर्म समाजधारणेस निरर्थकच ठरत असतो.*_

                   _*चवथी गोष्ट, धर्माने दारिद्र्याचे गोडवे गाऊन त्याचे उदात्तीकरण केलेले केव्हाही बरे नसते. धर्माच्या नावाखाली श्रीमंतांच्या संन्यास वृत्तीचे स्तोम माजविले गेले तर ते एकदाचे मान्य केले जाऊ शकते. परंतु गरिबी ही पूर्वजन्माचे फळ आहे असे म्हणून दारिद्र्याचे स्तोम माजविले गेले तर धर्माचा विपर्यास करणे होते; अनैतिकता व गुन्हेगारी ह्यांना चिरस्थायी स्वरूप प्राप्त करून देणे होते; एवढेच नव्हे तर नरकाच्या कल्पनेप्रमाणे एका यातनायुक्त जीवनाला मान्यता देणे होते.*_

                   _वरील या सगळ्या कसोट्यांवर कोणता धर्म पुरेपूर उतरू शकतो ? ह्या प्रश्नाचा विचार करताना एक गोष्ट स्मरणात ठेवणे आवश्यक आहे. *आजच्या काळात ' महात्मा' अवतरण्याचे दिवस राहिले नाहीत. त्यामुळे एखादा नवीन धर्म उदयास येण्याची तिळमात्र शक्यता राहिलेली नाही.* जे धर्म आज पृथ्वीच्या पाठीवर अस्तित्वात आहेत त्या मधूनच योग्य तो धर्म निवडणे व त्याचे अनुयायीत्व पत्करणे भाग आहे._

                    _*उपरिनिर्दिष्ट कसोट्यांपैकी केवळ एकाच कसोटीला किंवा दोन कसोट्यांना उतरणारा अस्तित्वात असणाऱ्या धर्मांमधून एखाद दुसरा धर्म आढळतो. परंतु प्रश्न असा आहे की, साऱ्याच कसोट्यांना उतरणारा असा कोणता धर्म आहे ? माझ्या माहीती प्रमाणे केवळ बौद्ध धर्मच वरील साऱ्या कसोट्यांना पूर्णपणे उतरू शकतो. बौद्ध धर्म हाच एक असा धर्म आहे की त्याची कास धरणे जगाला आज भाग आहे. आजचे आधुनिक जग प्राचीन जगाच्या मानाने फारच वेगळे आहे. त्यालाच आज धर्माची खरी निकड आहे. आणि ती निकड भागविण्यासाठी त्याला बुद्धाच्या धर्माचीच निवड करावी लागणार आहे.*_


            _*माझे हे प्रतिपादन लोकांना पटणार नाही. कारण बहुतेक लोकांनी तथागत बुद्धावर लिहिताना बुद्धाने केवळ अहिंसेचेच प्रतिपादन केलेले आहे त्याशिवाय दुसरे कोणतेच उच्च विचार त्याने प्रदर्शित केलेले नाहीत असे सांगितल्याचे आढळते. त्यामुळे बौद्धधर्म आजच्या जगाची निकड भागवू शकणार नाही असे त्यांना वाटण्याचा संभव आहे. परंतु हा विचार दिशाभूल करणारा आहे. बुद्धाने अहिंसा तत्त्वाचे प्रतिपादन केलेले आहे हे सत्य आहे. परंतु त्याचे महत्त्व मी मुळीच कमी लेखीत नाही. कारण अहिंसेचे तत्त्व हे महान तत्त्व आहे. त्याचा अंगिकार केल्याशिवाय जगाचे विध्वंसनापासून तारण करता येणार नाही. बुद्धाने अहिंसेव्यतिरिक्त दुसऱ्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत, हे मला प्रामुख्याने म्हणावयाचे आहे. धम्माचा भाग म्हणून बुद्धाने सामाजिक, वैयक्तिक, आर्थिक व राजकीय स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला आहे. त्याने समानता केवळ पुरुषांपुरतीच मर्यादित ठेवली नाही तर ती समानता स्त्री-पुरुषांमध्येसुद्धा पुरस्कारली आहे. बुद्धाने लोकसमाज जीवनातील नानाविध अंगप्रत्यंगाचा सखोलतेने अभ्यास केलेला आहे. त्याचे तत्त्वज्ञान अत्याधुनिक असून त्याच्या धम्माचा प्रमुख हेतू ऐहिक जीवनात मनुष्याला सुख समाधान प्राप्त करून द्यायचा आहे. परंतु हे समाधान मरणानंतर स्वर्ग नावाच्या न पाहिलेल्या ठिकाणी नव्हे तर ह्याच जगी ह्याच डोळा मिळवून द्यावयाचा आहे. बुद्धाशी तुलना करता येईल असा जगात कोणताच धर्मगुरू मिळणार नाही. बुद्धाचे हे खास वैशिष्ट्य आहे.*_

                 _*बौद्ध धर्माच्या श्रेष्ठत्वाच्या या साऱ्या बाबींचा विचार केल्यावर साहजिकच असा प्रश्न उभा राहतो की, बौद्धधर्म प्रसाराचे स्वप्न कसे साकार करता येईल ? बौद्धधर्म प्रसार साऱ्या विश्वात करून घ्यावयाचा असेल तर पुढील तीन गोष्टींचा गंभीरतेने विचार होणे जरूरीचे आहे.*_

               _*पहिली गोष्ट ही की, बौद्धधर्माचा बायबल सदृश प्रमाणभूत असा एकमात्र ग्रंथ तयार करणे, दुसरी- गोष्ट बौद्ध भिक्खू संघाच्या संघटनेत, ध्येयधोरणात व कार्यप्रणालीत आमूलाग्र बदल घडवून आणणे आणि तिसरी गोष्ट ही की. आंतरराष्ट्रीय बौद्धसेवा संघ स्थापन करणे.*_

                 _*बौद्धधर्म प्रसाराच्या दृष्टीकोनातून बौद्धधर्माचा बायबल सारखा एकमेव प्रमाणभूत ग्रंथ निर्माण करणे ही सर्वप्रथम गरज आहे. बौद्ध वाङ्मय अत्यंत अफाट आहे. बौद्ध वाङ्मयाच्या अथांग महासागरात एखाद्याने बौद्ध धर्माचे सार समजून घेण्यासाठी कितीही बुड्या मारल्या तरी हे हस्तगत करता येणार नाही. बौद्धधर्माच्या तुलनेत इतर धर्मात मात्र एक मोठी सोय आहे. ती ही की, त्या त्या धर्माचा सारभूत एकमात्र धर्मग्रंथ काखेत घेऊन कुठेही नेता येणारा व कुठेही वाचन करता येऊ शकणारा हाताळण्याजोगा कैलेला आहे. परंतु बौद्धधर्मात असा एकमेव ग्रंथ नसल्यामुळे सर्व साधारण बौद्ध अनुयायांची अत्यंत कुचंबना होते. बौद्ध ग्रंथसंभारातील धम्मपद' हा ग्रंथ ही उणीव काहीशी भरून काढू शकतो. परंतु भारतातील हिंदी भाषेत तयार केलेला धम्मपद हा ग्रंथ ही अपेक्षा पूर्ण करण्यास मात्र थिटा ठरलेला आहे. प्रत्येक धर्म कोणत्या ना कोणत्या श्रद्धेवर आधारित आहे. परंतु ही श्रद्धा पारंपारिक संप्रदायाच्या स्वरुपात आत्मसात केली जाऊ शकत नाही. ह्या श्रद्धेला पुराण, महाकाव्य ह्यासारख्या किंवा साहित्यातील कल्पनाविलासाने सजलेल्या कथावस्तू सारख्या गोष्टींची आवश्यकता असते. भारतीय धम्मपद अशा प्रासादिक भाषेत गुंफले गेलेले नसल्याने ते केवळ शुष्क तत्त्वज्ञानाचीच चर्चा करून श्रद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न करते.*_

                    _*यास्तव नियोजित बौद्ध धर्माच्या एकमेव ग्रंथात संक्षेपाने बुद्धाचा जीवनपट, चिनी धम्मपद, काही महत्त्वाचे बुद्धाचे संवाद, बौद्ध धर्मीय लोकांच्या जन्म, मृत्यू, लग्न इत्यादी सामाजिक विधींची माहीती ह्यांचा समावेश होणे आवश्यक आहे. परंतु अशाप्रकारचा एकमेव धर्मग्रंथ तयार करताना भाषेच्या बाबींकडे दुर्लक्ष केले जाता कामा नये. तो ग्रंथ अशाच जिवंत भाषेत लिहिला जावा की त्या भाषेने माणसाचे हृदय हेलावले जावे व त्याचे मन मंत्रमुग्ध व्हावे. ती भाषा रटाळ, कंटाळवाणी किंवा नुसतीच गंभीर किंवा उगीचच भारदस्त असू नये. ग्रंथाच्या भाषाशैलीत लालित्य असावे, माधुर्य असावे, ती भाषा प्रासादिक, मनमोहक व ओजस्वी असावी. तरच ती लोकाच्या मनावर बिंबू शकेल, ठसू शकेल.*_

                 _*हिंदू संन्यासी व बौद्ध भिक्खू ह्या दोहोंत जमीनअस्मानचा फरक आहे. हिंदू संन्यासाला जनाशी, समाजाशी काही कर्तव्य नसते. तो जगापासून पराङ्‌मुख झालेला असतो, समाज जीवनापासून दूर पळालेला असतो. त्यामुळे तो जगाच्या दृष्टिकोनातून मृतवत असतो, परंतु बौद्ध भिक्खूचे तसे नाही. त्याचा जगाशी व समाजजीवनाशी घनिष्ट संबंध असतो. तो समाजाशी कर्तव्यबद्ध असतो. भिक्खूला संन्याशासारखा एकटा दुकटा न ठेवता तो संघटनेने राहावा, त्यांचा संघ असावा ह्याचा हेतू तरी काय ?*_

                  _*बौद्ध धमात सागितलेल्या आदर्श तत्त्वप्रणालीप्रमाणे समाज व्यवस्था निर्माण करणे, समाजातील प्रत्येक घटकाला नीतितत्त्वांनी वागण्यास कार्यप्रवृत्त करणे व प्रापंचिक लोकांपुढे स्वतःच्या आदर्श वागणुकीचा एक उत्तम नमुना ठेवणे हे प्रमुख हेतू बौद्ध भिक्खू निर्माण करण्यामागे होते. सर्व सामान्य माणसाला बौद्ध तत्त्वज्ञान सहजासहजी आकलन होणारे नाही; याची कल्पना बुद्धाला होती. तथापि ते त्यांनी थोडे फार समजावून घ्यावे व त्यासाठी त्यांच्या नजरेसमोर बौद्ध विचारप्रणालीशी बद्ध असलेला सुसंघटित बौद्ध भिक्खूंचा आदर्श संच असावा, हे भिक्खू संघाच्या निर्मितीचे कारण होय. याच कारणास्तव विनय नावाच्या आदर्श नियमांनी भिक्खू संघाला बद्ध केले गेले. तथापि बौद्ध भिक्खू संघ स्थापनेच्या वेळी बुद्धाच्या मनात दुसरे अनेक हेतू होते. सर्वसाधारण लोकांना सत्य आणि निरपेक्ष मार्गदर्शन देणाऱ्या बुद्धिवादी लोकांचे संघटन करणे आवश्यक आहे असे बुद्धाला वाटत होते. भिक्खू संघाने निरपेक्षपणे जनसेवा करावी हा प्रमुख उद्देश लक्षात घेऊन भिक्खूने स्वतःची मालमत्ता बाळगू नये असा बुद्धाने नियम केला होता. मालमत्तेची धारकवृत्ती मनुष्याच्या स्वतंत्र विचार प्रेरणेला व विचार प्रवृत्तीला बाधा आणत असते व मोठ्यात मोठा अडथळा निर्माण करीत असते. मालमत्तेची धारकवृत्ती जशी घातक असते तसेच भिक्खूने विवाह करून निरपेक्ष जनसेवा करणे कदापि शक्य नसते. यास्तव सामाजिक बंधनात गुरफटून न राहता जनसेवेस तनमनधनाने मुक्त राहण्यासाठी भिक्खूने विवाह करू नये असा निर्बंध बुद्धाने घातला होता.*_

                     _*या सर्व आदर्शाप्रमाणे आजचा भिक्खूसंघ राहतो काय ? ह्या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर नकारार्थी आहे. भिक्खुसंघ लोकांना मार्गदर्शन तर करीत नाहीच, परंतु जनसेवाही करीत नाही. सद्यपरिस्थितीतील भिक्खुसंघ बौद्ध धर्म प्रसारासाठी निरुपयोगी आहे. आज जगभर भिक्खूंची संख्या अफाट आहे. त्यात केवळ साधू व संन्यासवृत्तीने राहणाऱ्या भिक्खूंचाच भरणा जास्त आहे. ते सगळे आपला वेळ नुसत्या ध्यानात किंवा आळसात घालवितात. लोकांना ज्ञान द्यावे किंवा त्यांची सेवा करावी ही वृत्तीच भिक्खूंत राहिलेली नाही. सेवावृत्तीच्या संदर्भात विचार करता कोणाच्याही मनात सर्वप्रथम रामकृष्ण मिशन उभी राहते. पण भिक्खूंचे खरे कर्तव्य सेवावृत्ती असूनसुद्धा कोणालाही भिक्खूसंघाची आठवण होत नाही. मग अशा स्थितीत कोणाची सेवावृत्ती आदरणीय मानावी ? भिक्खूसंघाची की रामकृष्ण मिशनची ? आज भिक्खूसंघ नुसत्या आळशी लोकांचे एक मोठे सैन्य झाले आहे. आज भिक्खू थोडे जरी असले तरी चालतील, परंतु ते सुशिक्षित व कार्यप्रवण पाहिजेत. ते ऐतखाऊ व ऐदी नसावेत. ह्या बाबतीत भिक्खुसंघाने जेसुइट ख्रिस्ती पाद्रयांपासून प्रेरणा घेण्यास कसलीच हरकत नसावी. त्यांनी ख्रिस्ती धर्माचा प्रसार आशियाभर शैक्षणिक व वैद्यकीय सेवेने केला. त्यांनी केवळ ख्रिस्ती धर्माचे गुणगानच गाइले नाही. त्यांनी त्याबरोबर कला व विज्ञान ह्यांची सुंदर सांगड घालून त्यांचाही त्यांनी प्रसार केला. पुरातन काळातील बौद्ध भिक्खूंचा सुद्धा हाच आदर्श होता. जगभर गाजलेली नालंदा व तक्षशिला ही विद्यापीठे भिक्खूंनी स्वतः चालविलेली होती. तिथेच ते भिक्खू राहत व ज्ञानपठन करीत. साहजिकच ते सुशिक्षित व बुद्धिमान असत. स्वधर्ममतांच्या प्रसारासाठी समाजाची सेवा करणे अत्यावश्यक आहे ह्याची त्यांना जाणीव होती.. सध्याच्या भिक्खूंनी त्याच जुन्या आदर्श विचारांची कास धरावयास पाहिजे.*_

                   _*भिक्खुसंघाची आजची जडणघडण पाहता बौद्ध भिक्खूसंघ सर्वसामान्य लोकांची सेवा करू शकेल असे म्हणवत नाही. त्यामुळे बौद्ध भिक्खूसंघ स्वतःकडे लोकांना आकर्षित करू शकत नाही. भारतात आज तरी मिशनरी पद्धतीशिवाय बौद्धधर्म वृद्धिंगत होणे कठीण आहे. शिक्षणप्रसाराबरोबर आज धर्मप्रसारसुद्धा होणे आवश्यक आहे. धर्मप्रसार मनुष्यबळाशिवाय व द्रव्यबळाशिवाय होऊ शकणार नाही. हेही तेवढेच खरे आहे; परंतु हे बळ कोण पुरवू शकेल ? अर्थात ज्या देशात आज बौद्धधर्म प्रचलित आहे ते देशच ही गोष्ट करू शकतात. ह्या बौद्धधर्मी देशांनी सुरुवातीस काही प्रमाणात मनुष्यबळ व द्रव्यबळ पुरविल्यास बराच कार्यभाग साधला जाऊ शकतो. परंतु ही गोष्ट ते करू शकतील काय ? सद्यपरिस्थिती लक्षात घेता बौद्धधर्म प्रसाराच्या बाबतीत ते देश उत्साही असल्याचे दिसत नाहीत. उलट ते काहीसे उदासीन असल्याचे दिसतात.*_

                  _*वस्तुतः सध्याचा काळ बौद्ध धर्म प्रसार होण्यास खूपच अनुकूल असल्याचा दिसून येतो. पूर्वी एक काळ असा होता की, धर्म हा मनुष्याचा वारसा हक्कांचा एक भाग होता. मुलगा किंवा मुलगी आपल्या आईवडिलांच्या संपत्तीबरोबर त्यांचा धर्मही वारसातील एक भाग म्हणून स्वीकारीत असे. धर्माचा हा वारसाहक्क घेताना त्या धर्मात उचित अनुचित काय आहे, ह्याची सुद्धा चिकित्सा केली जात असे. इस्टेटीच्या बाबतीत ती घेण्याजोगी आहे किंवा नाही असा प्रश्न कधी कोणी विचारी. परंतु धर्माच्या बाबतीत तो धर्म स्वीकारण्याजोगा आहे किंवा नाही असा चुकूनही प्रश्न केला जात नसे. परंतु आज काळ फारच बदलला आहे. साऱ्या जगभर बऱ्याच लोकांनी त्यांच्या धर्माच्या वारसाहक्काच्या बाबतीत असामान्य असे धैर्य दाखविलेले आहे. वाडवडिलांचा धर्म म्हणून स्वीकारलाच पाहिजे, ह्या बंधनाला त्यांनी झुगारून दिलेले आहे. काहींनी तर फारच क्रांतिकारक विचार दर्शविले आहेत काही लोक वैज्ञात्तिक ज्ञानाते भारावून जाऊन धर्म कुचकामी आहे, धर्मात काही तथ्यांश नसतो, तो टाकून फेकून दिला पाहिजे ह्या निर्णयापर्यंत पोहचले आहेत. काही लोक मार्क्सवादी विचारसरणीमुळे धर्म ही श्रीमंतांच्या प्रभुत्वाला शरण जाण्यास गरिबांना प्रभावित करणारी अफूची गोळी आहे म्हणून धर्म झुगारून द्यावा असे म्हणू लागले आहेत. कोणतेही कारण का असेना मात्र हे सत्य आहे की, लोकांनी आज धर्माच्या बाबतीत चिकित्सक बुद्धीची वाढ केलेली आहे. जे लोंक वैचारिक पातळीवर ऊहापोह करण्याचे धाडस दाखवितात त्यांच्या मनांत प्रामुख्याने हेच प्रश्न उद्भतात की धर्म ही खरोखर आवश्यक बाब आहे काय ? आणि आवश्यक असेल तर कोणता धर्म योग्य आहे ?*_

                    _*ही वैचारिक भूमिका लक्षात घेऊन असेच म्हणावे लागते की, वेळ येऊन ठेपलेली आहे. प्रश्न फक्त इच्छेचा आहे. आज बौद्ध धर्मी देशांनी मनावर घेतले व लोकांची मनोभूमिका जाणून घेतली तर बौद्धधर्म जगभर पसरण्यास व त्याची वाढ होण्यास मुळीच कठीण जाणार नाही. केवळ स्वतः आदर्श बौद्ध बनून कर्तव्यच्यूत राहणे हे खऱ्या बौद्धाचे लक्षण नव्हे. बौद्धधर्म प्रसारासाठी अहोरात्र झटणे हे खऱ्या व आदर्श बौद्धाचे कर्तव्य होय. बौद्धधर्माचा प्रचार व प्रसार करणे म्हणजेच मानवजातीची सेवा करणे होय. ही बाब बौद्ध राष्ट्रांनी ध्यानात घेतली तर मला विश्वास वाटतो की बौद्धधर्म वृद्धीची लाट कधीही थोपविली जाऊ शकणार नाही.*_


*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!!ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २३/०५/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड २०, पान नं ३७३ - ३८७*__

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Monday, 20 May 2024

बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/05/blog-post_20.html

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                   _*" सोमवार दिनांक १५ ऑक्टोबर १९५६ रोजी सकाळी १० ते १२ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्ध धर्माचा स्वीकार यासंबंधी उद्बोधक, स्फूर्तिदायक आणि अत्यंत तळमळीचे, माहितीपूर्ण भाषण दीक्षामंडपात झाले. लाखो लोक. ते भाषण उन्हात उभे राहून व जागा मिळेल तसे बसून एकाग्रतेने ऐकत होते."* ते आपल्या भाषणात म्हणाले,  सर्व बौद्धजनहो आणि उपस्थित पाहुणे मंडळी,_

                  _काल आणि आज सकाळी जो बौद्ध दीक्षा घेण्याचा व देण्याचा विधी समारंभ या ठिकाणी घडून आला त्याचे स्थान, विचारवंत लोकांना कदाचित अवघड वाटत असेल. त्यांच्या व माझ्याही मताने कालचा समारंभ आज व आजचा समारंभ काल व्हावयास पाहिजे होता. आपण हे कार्य अंगावर का घेतले, त्याची जरूरी काय व त्याने काय होईल, याची छाननी करून घेणे आवश्यक आहे. ते समजावून घेण्यानेच आपल्या कार्याचा पाया मजबूत होईल. हे समजावून घेण्याचे कार्य आधी व्हावयास हवे होते. परंतु काही गोष्टी अशा अनिश्चित असतात की त्या आपोआपच घडत असतात. आता या विधीबाबत व्हावयाचे तसे घडले आहे खरे, तथापि अशी दिवसांची अदलाबदल झाली तरी मोठेसे काही बिघडले नाही._

                  _पुष्कळसे लोक मला असा प्रश्न करतात की या कार्याकरिता तुम्ही नागपूर हेच शहर का ठरविले ? अन्य ठिकाणी हे कार्य का केले नाही ? काही लोक असे म्हणतात की आर. एस. एस. ची-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची-मोठी पलटण नागपूर येथे असल्यामुळे त्यांच्या उरावरती म्हणून आम्ही ही सभा या शहरात घेतली आहे. हे मुळीच खरे नाही. त्यासाठी नागपूर येथे हे कार्य घेतलेले नाही. आमचे कार्य इतके मोठे आहे की आयुष्यातील एक एक मिनिट देखील कमी पडतो. आपले नाक खाजवून दुसऱ्याला अपशकून करण्यासाठी मजजवळ वेळ नाही._

             _*हे ठिकाण निवडण्याचे कारण निराळे आहे. ज्यांनी बौद्ध इतिहासाचे वाचन केले असेल त्यांना हे कळून येईल की भारतात बौद्ध प्रसार जर कोणी केला असेल तर तो नाग लोकांनी केला. नाग लोक आर्याचे भयंकर शत्रु होते. आर्य व अनार्य यांच्यामध्ये लढाया व तुंबळ युद्धे झाली. आर्य लोकांनी नागांना जाळून टाकल्याचे दाखले पुराणात सापडतात. अगस्ती मुनीने त्यातून फक्त एक नाग मनुष्य वाचविला. त्याचेच आपण वंशज आहोत. ज्या नाग लोकांना एवढा छळ सोसावा लागला त्यांना वर येण्यास कोणीतरी महापुरुष हवा होता; त्यांना तो महापुरुष गौतम बुद्ध भेटला. भगवान बुद्धाचा उपदेश नाग लोकांनी सर्व भारतामध्ये पसरविला. असे आपण नाग लोक आहोत. नाग लोकांची मुख्य वस्ती नागपूर येथे व आसपास होती असे दिसते. म्हणून या शहरास' नाग-पूर' म्हणजे नागांचे गाव असे म्हणतात. येथून सुमारे २७ मैलावर नागार्जुनाची टेकडी आहे. नजिकच वाहणारी जी नदी आहे ती नाग नदी आहे. अर्थातच या नदीचे नाव येथे राहाणाऱ्या लोकांवरून पडले आहे. नागांच्या वस्तीमध्ये वाहणारी जी नदी ती नाग नदी आहे. हे स्थळ निवडण्याचे हे मुख्य कारण आहे.* नागपूर यामुळे निवडले आहे. यामध्ये कोणालाही खिजविण्याचा कोठेच प्रश्न नाही. तशी भावनाही नाही. आर. एस. एस. चे कारण माझ्या मनाला शिवलेही नाही. तसा कोणी त्याचा अर्थ करून घेऊ नये._

                  _इतर कारणावरून कदाचित् विरोध वाटू शकेल. हे ठिकाण विरोधासाठी पसंत केलेले नाही हे आता मी सांगितलेच आहे. मी हे जे कार्य आरंभले आहे त्यासाठी माझ्यावर अनेक लोकांनी व वृत्तपत्रांनी टीका केलेली आहे. काहींची टीका कडक आहे. त्यांच्या मते मी माझ्या गरीब बिचाऱ्या अस्पृश्य लोकांना भलतीकडेच नेत आहे. आज जे अस्पृश्य आहेत ते तसेच अस्पृश्य राहातील व जे हक्क अस्पृश्यांना मिळाले आहेत ते मात्र नष्ट होतील, असे सांगून आमच्यातील काही लोकांना ते बहकवीत आहेत. आमच्यातील अज्ञ लोकांना पगदंडीने जा असे ते म्हणतात. आमच्यातील काही तरूण व वयोवृद्ध लोकांवर कदाचित त्याचा परिणाम होत असेल. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण झाले असतील तर त्या संशयाची निवृत्ती करणे हे आपले कर्तव्य आहे आणि अशा संशयाची निवृत्ती करणे म्हणजे आपल्या या चळवळीचा पाया मजबूत करणे आहे._

                    _मागे आपण लोकांनी मांस खाऊ नये म्हणून चळवळ केली होती. त्यामुळे स्पृश्य लोकांवर मोठी गदा आल्याप्रमाणे त्यांना वाटत होते. त्यांनी जिवंत म्हशीचे दूध प्यावयाचे आणि ती म्हैस मेल्यानंतर मात्र आम्ही मृत म्हशीला खांद्यावर घेऊन जावयाचे, हा प्रकार विचित्र नव्हे काय ? आम्ही त्यांना म्हणतो की तुमची म्हातारी मेली तर तिला आम्हाला का नेऊ देत नाही ? त्यांनी मेलेली म्हैस द्यावी तशी म्हातारीही द्यावी. त्यावेळी कोणीतरी मनुष्य 'केसरी' मधून पत्रव्यवहार करून, अमुक अमुक गावी दर वर्षाला ५० ढोरे मरतात, त्यांच्या कातड्यांची, शिंगांची, हाडांची, मांसाची, शेपटीची, खुरांची मिळून ५०० रुपया इतकी किंमत होईल; व मृत मांस सोडल्यामुळे एवढ्या प्राप्तीला हे लोक मुकतील, असा प्रचार त्यावेळी केसरी मधून होत असे. त्याच्या प्रचाराला उत्तर द्यावयाची आवश्यकता खरे म्हणजे काय होती ? पण आमच्या लोकांना असे वाटे, या गोष्टीला आमचा साहेब उत्तर देत नाही, तर साहेब करतो तरी काय ?_

            _एकदा मी संगमनेरला सभेला गेलो होतो. सभा झाल्यानंतर संध्याकाळी जेवणाची व्यवस्था केली होती. त्यावेळी मजकडे एक चिट्ठी केसरीच्या त्या बातमीदाराने पाठविली व मला विचारले, "अहो, तुम्ही तर तुमच्या लोकांना मेलेली ढोरे ओढू नका म्हणून सांगता. त्यांची हलाखी किती आहे ? त्यांच्या बायकांना लुगडे चोळी नाही, त्यांना अन्न नाही, त्यांना शेतीवाडी नाही, अशी त्यांची अत्यंत बिकट परिस्थिती असता, दरवर्षी त्यांना मिळणारे कातड्यांचे, शिंगांचे, मांसांचे ५०० रुपयांचे उत्पन्न फेकून द्या म्हणून सांगता, यात तुमच्या लोकांचा तोटाच नाही काय ? "_

                _मी म्हणालो, तुम्हाला याचे उत्तर कोठे देऊ? ते येथे पडवीत देऊ की सभेत देऊ ? लोकांच्या 'समोरच सवालपट्टी झालेली बरी. मी त्या गृहस्थांना विचारले तुमचे म्हणणे एवढेच की आणखी काही आहे ? ते गृहस्थ म्हणाले, " एवढेच म्हणणे आहे व एवढ्याचेच उत्तर द्या." मी त्या गृहस्थास विचारले, तुम्हास मुले, माणसे किती आहेत ? त्यांनी सांगितले मला पाच मुलगे आहेत, भावालाही ५/७ मुले आहेत. मी म्हणालो तर तुमचे कुटुंब मोठे आहे. तेव्हा तुम्ही व तुमच्या नातेवाईकांनी त्या गावची मेलेली सर्व ढोरे ओढावीत; आणि ५०० रुपयांचे उत्पन्न घ्यावे. हा फायदा तुम्ही अवश्य घ्यावा. शिवाय दरवर्षी मी स्वतः तुम्हाला ५०० रुपये वर देण्याची व्यवस्था करतो, माझ्या लोकांचे काय होईल, त्यांना अन्न, वस्त्र मिळेल की नाही ते माझे मी पाहीन, मग एवढी फायद्याची गोष्ट तुम्ही का सोडून देता ? तुम्ही का हे करीत नाही ? आम्ही हे काम केले म्हणजे फायदा होतो, आणि तुम्ही केले म्हणजे फायदा नाही ? ओढा ना तुम्ही मेलेली ढोरे !_

               _काल एक ब्राह्मणाचा मुलगा मजकडे येऊन म्हणाला," पार्लमेंट, असेब्ल्यांमध्ये तुमच्या लोकांना राखीव जागा दिल्या आहेत, त्या तुम्ही का सोडता ? " मी त्यास म्हणालो, तुम्ही महार व्हा व त्या जागा पार्लमेंट, असेंब्ल्यामध्ये भरा. नोकरी खाली असली की त्या जागा भरतात. त्यासाठी कोणा ब्राह्मणांचे, कोणा इतराचे किती अर्ज येतात ! मग नोकऱ्यांच्या जागा भरतात तशा या राखीव जागा तुम्ही ब्राह्मण लोक महार बनून का भरत नाही ?_

                  _आमचे नुकसान झाले तर तुम्ही का रडता, असा माझा त्यांना सवाल आहे. *खरे म्हणजे मनुष्यमात्राला इज्जत प्यारी असते, लाभ प्यारा नसतो. सद्‌गुणी व सदाचारी बाईला व्यभिचारामध्ये किती फायदा असतो हे माहीत असते; आमच्या मुंबईत, व्यभिचारी बायांची एक वस्ती आहे. त्या बाया सकाळी ८ ला उठल्या की न्याहारीसाठी शेजारच्या हॉटेलात वर्दी देतात आणि म्हणतात (डॉक्टरसाहेबांनी यावेळी आवाजात फरक करून नक्कल करून सांगितले) " सुलेमान, अरे खिम्याची प्लेट व पावरोटी घेऊन ये." तो सुलेमान ते घेऊन येतो, शिवाय चहा, पाव केक वगैरेही आणतो. पण माझ्या दलितवर्गीय भगिनींना साधी चटणीभाकरी देखील मिळत नाही; मात्र त्या इज्जतीने राहातात. त्या सदाचारानेच राहातात.*_

                     _*आम्ही झगडतो आहोत ते इज्जतीकरिता ! मनुष्यमात्राला पूर्णावस्थेस नेण्याकरिता आम्ही तयारी करीत आहोत, त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आमची तयारी आहे.* हे वृत्तपत्राचे लोक (त्यांच्याकडे वळून) माझ्या मागे गेली ४० वर्षे हात धुवून लागले आहेत. माझ्यावर केवढी टीका त्यांनी आजवर केली ! मी त्यांना म्हणतो, अजून तरी विचार करा, आतातरी पोरकटपणाची भाषा सोडून काही प्रौढ भाषा वापरा._

                    _*आम्ही बौद्ध धर्मीय झालो तरी राजकीय हक्क मी मिळवीन याची मला बालंबाल खात्री आहे. (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष व प्रचंड टाळ्या) मी मेल्यावर काय होईल हे सांगता येणार नाही. या चळवळीसाठी फार मोठे काम करावे लागेल. आम्ही बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे काय होईल, अडचणी आल्याच तर त्या कशा टाळता येतील, त्यासाठी काय युक्तिवाद व खटाटोप करावा लागेल, याचा मी पूर्ण विचार केला आहे. माझ्या पोतडीत सर्व काही भरलेले आहे. ते काय प्रकाराने भरले आहे ते मला पूर्ण माहीत आहे. हे जे हक्क मिळविले ते मीच माझ्या लोकांच्यासाठी मिळविले. ज्याने हे हक्क मिळविले ते तो पुन्हा मिळवून देईलच ! हे हक्क व सवलती मिळवून देणारा मीच आहे; आणि मी पुन्हा या सवलती मिळवून देईन अशी मला खात्री आहे. म्हणून सध्या तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेऊन चालले पाहिजे. विरोधी प्रचारात काही तथ्य नाही हे मी सिद्ध करून देईन.*_

                  _*मला एका गोष्टीचे मात्र आश्चर्य वाटते. एवढा वादविवाद सर्वत्र होतो आहे. पण एकाही माणसाने' मी बौद्ध धर्मच का स्वीकारला' हा प्रश्न मला विचारला नाही. कोणताही दुसरा धर्म न स्वीकारता हाच धर्म का स्वीकारला. हा कोणत्याही धर्मांतराच्या चळवळीतील मुख्य आणि महत्त्वाचा प्रश्न असतो. धर्मांतर करताना धर्म कोणता व का घ्यावयाचा हे तावून सुलाखून पाहिले पाहिजे. आम्ही हिंदू धर्मत्यागाची चळवळ १९३५ पासून येवले येथे एक ठराव करून हाती घेतली. " मी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही" अशी प्रतिज्ञा मी मागेच केली होती आणि काल मी ती खरी करून दाखविली. मला इतका आनंद झाला आहे, हर्षवायुच झाला आहे. नरकातून सुटलो असे मला वाटते. मला कोणी अंधभक्त नको आहेत. ज्यांना बौद्ध धर्मात यावयाचे आहे त्यांनी जाणिवेने आले पाहिजे. त्यांना तो धर्म पटला पाहिजे.*_

                      _*मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला धर्म ही अत्यंत आवश्यक वस्तू आहे. मला माहीत आहे की कार्ल मार्क्सच्या वाचनामुळे एक पंथ निघाला आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे धर्म म्हणजे काहीच नाही. त्यांना धर्माचे महत्त्व नाही. त्यांना सकाळी ब्रेकफास्ट (न्याहारी) मिळाली, त्यात पाव, मलई, लोणी, कोंबडीची टांग वगैरे असले, पोटभर जेवण मिळाले, निवांत झोप मिळाली, सिनेमा पाहावयास मिळाला की सगळं संपल. हे त्यांचं तत्त्वज्ञान ! मी त्या मताचा नाही. माझे वडील गरीब होते; म्हणून मला या प्रकारचे सुख काही मिळालेले नाही. माझ्याइतके कष्टमय जीवन कोणीही आयुष्यात काढलेले नाही. म्हणून माणसाचे जीवन सुखसमाधानाच्या अभावी कसे कष्टमय होते याची मला जाणीव आहे. आर्थिक उन्नतीची चळवळ आवश्यक आहे असे मी मानतो. त्या चळवळीविरूद्ध मी नाही. माणसाची आर्थिक उन्नती व्हावयास पाहिजेच.*_

                      _*पण मी याबाबत एक महत्त्वाचा फरक करतो. रेडा, बैल व माणूस यामध्ये फरक आहे. रेडा व बैल यांना रोज वैरण लागते. माणसासही अन्न लागते. मात्र दोहोत फरक हा आहे की रेडा व बैल यांना मन नाही; मनुष्याला शरीराबरोबर मनही आहे. म्हणून दोन्हीचाही विचार करावयास हवा. मनाचा विकास झाला पाहिजे. मन सुसंस्कृत झाले पाहिजे. ते सुसंस्कृत बनविले पाहिजे. ज्या देशातील लोक अन्नाशिवाय माणसाचा सुसंस्कृत मनाशी संबंध नाही असे म्हणतात त्या देशाशी अगर लोकांशी संबंध ठेवण्याचे मला काहीच प्रयोजन नाही. जनतेशी संबंध ठेवताना माणसाचे शरीर जसे निरोगी पाहिजे तसे शरीर सुदृढ होण्याबरोबर मनही सुसंस्कृत झाले पाहिजे. एरवी मानव जातीचा उत्कर्ष झाला असे म्हणता येणार नाही.*_

                      _*मनुष्याचे शरीर अथवा मन हे रोगी का असते ? त्याची कारणे ही की त्यास एकतर शारीरिक पीडा असते किंवा मनाला उत्साह नसतो. मनात उत्साह नसेल तर अभ्युदयही नाही. हा उत्साह का राहात नाही? त्याचे पहिले कारण हे की मनुष्यास अशा रीतीने ठेवण्यात आले आहे की त्याला वर येण्याची संधी मिळत नाही; अगर आशा राहात नाही. त्यावेळी त्यास उत्साह कोठून असणार ? तो रोगीच असतो. ज्या माणसाला आपल्या कृतीचे फळ मिळू शकते, त्यास उत्साह प्राप्त होतो.* नाही तर शाळेत शिक्षक असे म्हणू लागला, की कोण रे हा ? हा तर महार ! आणि हा महारडा पहिल्या वर्गात पास होणार ? याला प्रथम श्रेणी कशाला पाहिजे ? तू आपला तृतीय श्रेणीतच राहा-पहिल्या वर्गात येणे हे ब्राह्मणाचे काम ! अशा व्यवस्थेत त्या मुलाला काय उत्साह मिळणार ? त्याची उन्नती ती काय होणार ? उत्साह निर्माण करण्याचे मूळ मनात आहे, ज्याचं शरीर व मनही धडधाकट असेल, जो हिम्मतबाज असेल, मी कोणत्याही परिस्थितीतून झगडून बाहेर पडेल असा ज्यास विश्वास वाटतो, त्यांच्यामध्येच उत्साह निर्माण होतो व त्याचाच उत्कर्ष होतो. हिंदू धर्मात अशी काही विलक्षण तत्त्वप्रणाली ग्रंथित केलेली आहे की त्यापासून उत्साहच वाटत नाही. माणसाला निरूत्साही करून टाकणारी परिस्थिती हजारो वर्षे टिकली तर जास्तीत जास्त कारकुनी करून पोटे भरणारे लोक होतील. या पलिकडे दुसरे काय होणार ? या कारकुनांचे रक्षण करावयास मोठा कारकून पाहिजे._

                   _*मनुष्याच्या उत्साहाला काही कारण असेल तर मन !* तुम्हाला मिलचे मालक माहीत आहेत. ते गिरण्यावर मॅनेजर नेमतात व त्यांच्याकरवी मिलमधील काम करवून घेतात. हे मिलचे मालक कसल्या ना कसल्या व्यसनात असतात, त्यांच्या मनाचा सुसंस्कृत असा विकास झालेला नसतो. *आपल्या मनाला उत्साह वाटावा म्हणून आपण चळवळ केली, तेव्हा कोठे शिक्षण सुरू झाले.* मी लंगोटी घालून शिक्षणाला सुरूवात केली. शाळेमध्ये मला प्यावयास पाणी सुद्धा मिळाले नाही. पाण्याशिवाय शाळेत मी किती तरी दिवस काढले ! मुंबईसारख्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये देखील अशीच परिस्थिती होती. अशी परिस्थिती असेल तर दुसरी काय अवस्था निर्माण होणार ? कारकुनीच निर्माण होईल !_

               _मी दिल्लीच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये असताना लॉर्ड लिन्लिथगो व्हाईसरॉय होते. मी त्यांना म्हणालो, तुम्ही सर्वसामान्य खर्च तर करताच, पण मुसलमानांकरता अलिगड युनिव्हर्सिटीस तीन लाख रुपये शिक्षणाकरता खर्च करता. त्याचप्रमाणे बनारसच्या हिंदू विद्यापीठासही तुम्ही तीन लाख रुपये देता. मात्र आम्ही हिंदू नाही की मुसलमान नाही. आमच्यासाठी काही करावयाचे म्हटले तर त्यांच्या हजारो पटीने जास्त करावयास हवे. निदान आमच्यासाठी मुसलमानाइतके तरी करा. तेव्हा लिन्लिथगोने सांगितले, तुम्हाला याबाबत काय लिहून आणावयाचे ते आणा! त्याप्रमाणे मी एक मेमोरँडम लिहिले. ते चोपडे अजून मजजवळ आहे. युरोपियन लोक मोठे सहानुभूतीचे होते. त्यांनी माझे म्हणणे मान्य केले. पण घोडे जे पेंड खाऊ लागले ते हे पैसे कोणत्या गोष्टीवर खर्च करावयाचे त्यावर ! त्यांना वाटत होते. आमच्यातील मुली शिकलेल्या नाहीत, त्यांना शिक्षण द्यावे, त्यांची बोर्डिंग काढावीत व त्यावर, ते पैसे खर्च करावेत. आमच्यातील मुलींना शिकविले व सुशिक्षित केले तरी त्यांना वेगवेगळ्या पक्वान्नांचे पदार्थ करावयास घरी सामान कोठे आहे ? त्यांच्या शिक्षणाचा शेवटी परिणाम काय ? इतर गोष्टीवरील रक्कम सरकारने खर्च केली व शिक्षणावरील अडवून ठेवली._

                 _म्हणून एके दिवशी मी लिन्लिथगोकडे गेलो आणि या शिक्षणावरील खर्चाबाबत म्हणालो, तुम्हाला राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारतो. *मी एकटा ५० ग्रॅज्युएटच्या समान आहे की नाही? ते त्यांना मान्य करावे लागले.* नंतर मी पुन्हा विचारले, याचे कारण काय ? ते म्हणाले, ' ते कारण आम्हास माहीत नाही.' *मी म्हणालो की माझी विद्वत्ता एवढी मोठी आहे की मी राजवाड्याच्या टोकावर जाऊन बसू शकतो. मला अशी माणसे हवी आहेत. कारण तेथून सर्वत्र टेहळणी करता येते. आमच्या लोकांचे संरक्षण करावयाचे असेल तर अशी पारध करणारी माणसे निर्माण झाली पाहिजेत. कारकून काय करणार ? त्यासरशी लिन्लिथगोस माझे म्हणणे पटले, व त्या वर्षी १६ विद्यार्थ्यांना विलायतेत उच्च शिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आले. त्या १६ जणांपैकी काही मडकी जशी कच्ची काही पक्की असतात त्याप्रमाणे काही कच्ची काही पक्की निघाली. ही गोष्ट निराळी ! पुढे राजगोपालाचारी यांनी ही उच्च शिक्षणाची योजना रद्द करून टाकली.*_

                         _या देशात आम्हाला हजारो वर्षे निरुत्साही करून ठेवील, अशी परिस्थिती आहे, ही परिस्थिती जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या उन्नतीबद्दल उत्साह उत्पन्न होणे शक्य नाही. या बाबतीत या धर्मात राहून आम्ही काहीच करू शकत नाही. *मनुस्मृतीमध्ये चातुर्वर्ण्य सांगितले आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्था ही मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला अत्यंत घातुक आहे. मनुस्मृतीत लिहिले आहे की शूद्रांनी फक्त सेवा चाकरी करावी. त्यांना शिक्षण कशाला ? ब्राह्मणाने शिक्षण घ्यावे, क्षत्रियाने शस्त्रे धारण करावीत, वैश्याने व्यापार उदीम करावा व शूद्राने चाकरी करावी. ही घडी कोण उलगडू शकेल ? ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य वर्णाच्या लोकांना काही ना काही फायदा आहे, शूद्रांचे काय ? तीन वर्ण सोडले तर इतर जातीत काही उत्साह उत्पन्न होईल काय ? चातुर्वर्ण्यची व्यवस्था काही फुकाफुकी नाही ही रूढी नाही; हा धर्म आहे.*_

                _हिंदू धर्मामध्ये समता नाही. गांधींना एकदा मी भेटावयास गेलो असता ते म्हणाले मी चातुर्वर्ण्य मानतो. मी म्हणालो, तुमच्यासारखे महात्मे चातुर्वर्ण्य मानतात ! पण हे चातुर्वर्ण्य कोणते व कसे ? (हाताच्या पंजाची बोटे एकावर एक येतील असा हात करून) हे चातुर्वर्ण्य उलट की सुलट चातुर्वर्ण्यची सुरूवात कोणीकडून व शेवट कोठे ? गांधींनी या प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि देणार तरी काय ? आमचा ज्या लोकांनी नाश केला त्यांचा देखील या धर्माने नाश होईल ! हा मी हिंदू धर्मावर उगीच आरोप करीत नाही. हिंदू धर्मामुळे कोणाचाही उद्धार होऊ शकणार नाही. तो धर्मच नष्टधर्म आहे._

                  _*आपला देश परकीयांच्या ताब्यात का गेला ? युरोपमध्ये १९४५ पर्यंत लढाया चालू होत्या. जेवढे सैन्य मरत असे तेवढे रिक्रुट भरतीमुळे पुढे येत असे. त्यावेळी कोणीही आम्ही लढाई जिंकली असे म्हणू शकले नाही. आमच्या देशाचे सगळे काही निराळे ! क्षत्रिय मेले की आम्ही खलास ! आम्हाला जर शस्त्रे धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश पारतंत्र्यात गेला नसता. मग कोणीही हा देश जिंकू शकले नसते !*_

                       _हिंदू धर्मामध्ये राहून कोणाचा काहीही उद्धार होणार नाही. हिंदू धर्म रचनेप्रमाणे वरिष्ठ वर्णांना व जातींना फायदे आहेत हे खरे आहे. पण इतरांचे काय ? *ब्राह्मण बाई बाळंतीण झाली की तिची नजर हायकोर्ट जज्जाची जागा कोठे रिकामी आहे त्याकडे असते. आमची झाडूवाली बाई बाळंतीण झाली तर तिची नजर कोठे झाडूवाल्याची जागा रिकामी आहे तिकडे असते. अशी विचित्र रचना हिंदू धर्माच्या वर्णव्यवस्थेने केलेली आहे. यातून सुधारणा ती काय होणार ? उत्कर्ष हा फक्त बौद्ध धर्मातच होऊ शकेल.*_

                   _*बौद्ध धर्मात ७५ टक्के ब्राह्मण भिक्षु होते. २५ टक्के शूद्रादी होते. परंतु भगवंतांनी सांगितले. "हे भिख्खूहो, तुम्ही निरनिराळ्या देशातून व जातीतून आला आहात. आपल्या प्रदेशातून नद्या वाहतात तेव्हा त्या पृथक पृथक असतात, मात्र त्या सागरास मिळाल्या की त्या पृथक राहात नाहीत. त्या एकजीव व समान होतात. बौद्ध संघ हा सागराप्रमाणे आहे. या संघात सर्व सारखे व समान " ! सागरात गेल्यावर हे गंगेचे पाणी किंवा हे महानदीचे पाणी असे ओळखणे अशक्य असते. त्याप्रमाणे बौद्ध संघात आले म्हणजे आपली जात जाते व सर्वजण समान असतात, अशी समता सांगणारा एकच महापुरुष आहे. आणि तो महापुरूष म्हणजे भगवान बुद्ध होय.* (प्रचंड टाळ्या)_

                   _*काही लोक असे म्हणतात, तुम्ही धर्मांतर करण्यास इतका अवधी का लावला ? इतके दिवस काय करीत होता ? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. धर्म पटवून देणे हे काम सोपे नाही. ते एका माणसाचे काम नाही. धर्माबाबत विचार करणाऱ्या कोणत्याही माणसास हे समजून येईल. माझ्यावर जेवढी जबाबदारी आहे, तेवढी जबाबदारी जगातील कोणत्याही माणसावर नाही. मला अधिक आयुष्य लाभल्यास मी योजलेले कार्य पूर्ण करीन.* (डॉ. बाबासाहेब चिरायू होवोतच्या घोषणा व निनाद.)_

                    _महार बौद्ध झाले तर काय होईल, असे काही लोक म्हणतील. असे त्यांनी म्हणू नये, असे माझे त्यांना सांगणे आहे. ते त्यांना धोकादायक होईल. वरिष्ठ व संपत्तीवान वर्गाला धर्माची आवश्यकता वाटणार नाही. त्यांच्यामधील अधिकारावर असलेल्या साहेब लोकांना राहाण्यास बंगला आहे, त्यांची सेवा करावयास चाकर नोकर आहेत, त्यांना धन संपत्ती आहे, मानमरातब आहे, अशा माणसांना धर्माबद्दल विचार अगर चिंता करण्याचे कारण नाही._

               _धर्माची आवश्यकता गरिबांना आहे. आहे. गरीब मनुष्य जगतो तो आशेवर. पीडित लोकांना धर्माची आवश्यकता Hope ! जीवनाचे मूळ आशेत आहे. आशाच नष्ट झाली तर जीवन कसे होईल ? धर्म आशादायी बनवितो, व पीडितांना, गरिबांना संदेश देतो; " काही घाबरू नकोस, होईल, जीवन आशादायी होईल " म्हणून गरीब व पीडित मनुष्यमात्र धर्माला चिकटून राहातो._

                 _जेव्हा युरोपमध्ये खिस्ती धर्म शिरला त्यावेळी रोमची व आसपासच्या देशांची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. लोकांना पोटभर जेवणही मिळत नव्हते. त्यावेळी गरीब लोकांना खिचडी वाटण्यात येत असे. त्यावेळी ख्रिस्ताचे अनुयायी कोण झाले ? गरीब पिडलेले लोकच झाले. युरोपमधील सर्व गरीब व कनिष्ठ जनता ख्रिस्ती बनली. हा ख्रिश्चन धर्म भीक मागणाऱ्यांचा आहे, असे गिबनने म्हटले होते. खिस्ती धर्म हा युरोपमध्ये सर्वांचा धर्म कसा झाला, याचे उत्तर द्यावयास गिबन आज हयात नाही; नाहीतर याचेही उत्तर त्याला द्यावे लागले असते._

                 _*काही लोक असे म्हणतील, हा बौद्ध धर्म महारड्या-मांगांचा धर्म आहे. ब्राह्मण लोक भगवंताला 'भो गौतम' म्हणजे 'अरे गौतम' असे म्हणत असत. ब्राह्मण बुद्धाला असे हिणवीत-चिडवीत असत. पण राम, कृष्ण, शंकर यांच्या मूर्ती परदेशात विकावयास ठेवल्या तर किती खपतील ते पाहावे. पण बुद्धाची मूर्ती ठेवली तर एकही मूर्ती शिल्लक राहाणार नाही. (टाळ्यांचा कडकडांट) आता घरातल्या घरात (भारतात) हे पुष्कळ झालं, बाहेर काही दाखवा : जगात नाव जाहीर आहे ते फक्त बुद्धाचेच ! तेव्हा या धर्माचा प्रसार झाल्याशिवाय कसा राहील ?*_

                  आमच्या वाटेने आम्ही जाऊ तुमच्या वाटेने तुम्ही जावे. आम्हाला नवीन वाट मिळाली आहे. हा आशेचा दिवस आहे. हा अभ्युदयाचा, उत्कर्षाचा मार्ग आहे. हा मार्ग काही नवीन नाही. हा मार्ग कोठून आणलेला नाही. हा मार्ग येथलाच आहे, भारतातीलच आहे. *या देशामध्ये २००० वर्षे बौद्ध धर्म होता. खरे म्हणजे, या पूर्वीच आम्ही बौद्ध धर्मात का गेलो नाही, याचीच आम्हाला खंत वाटते. भगवान बुद्धाने सांगितलेली तत्त्वे अजरामर आहेत. पण बुद्धाने मात्र तसा दावा केलेला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.*

                    _*बौद्ध धर्माचा नाश झाला याचे मुख्य कारण मुसलमानांच्या स्वाऱ्या हे होय. मुसलमानांनी स्वाऱ्यांमध्ये मूर्ती फोडून टाकल्या. बौद्ध धर्मावर यामुळे पहिले आक्रमण झाले. त्यांच्या स्वाऱ्यांना भिऊन बौद्ध भिख्खु नाहीसे झाले. कोणी तिबेटला गेले; कोणी चीनला गेले कोणी कोठे गेले ! धर्माचे संरक्षण करण्यासाठी उपासक लोक हवे असतात. वायव्य सरहद्द प्रांतात एक ग्रीक राजा होता. त्याचे नाव मिलिंद. हा राजा सदोदीत वादविवाद करीत असे. वादविवादाची त्यास मोठी आवड होती. तो हिंदुंना सांगे, जो कोणी वादविवादपटू असेल त्याने येऊन वादविवाद करावा. त्याने पुष्कळांना निरूत्तर केले होते.*_

                  _*एकदा त्याला बौद्ध लोकांबरोबर वादविवाद करावा असे वाटले व वादविवादपटू कोणी बौद्ध असल्यास त्यास घेऊन यावे असे त्याने सांगितले. तेव्हा बौद्ध लोकांनी नागसेनास विनंती केली की तुम्ही या वादविवादात बौद्ध जनांची बाजू मांडावी. नागसेन विद्वान होता. तो पूर्वीचा ब्राह्मण होता. नागसेनाचा व मिलिंदचा जो वादविवाद झाला तो पुस्तक रूपाने जगाला माहीत आहे. त्या पुस्तकाचे नाव' मिलिंद पन्ह' आहे. मिलिंदाने असा प्रश्न विचारला की धर्मास ग्लानी का येते ? नागसेनाने त्याचे उत्तर देऊन त्याची तीन कारणे सांगितली.*_

_*पहिले कारण हे की एखादा धर्मच कच्चा असतो. त्या धर्माच्या मूळ तत्त्वात गांभीर्य नसते. तो कालिक धर्म बनतो व काळापुरता असा धर्म टिकतो.*_

_*दुसरे कारण हे की धर्म प्रचार करणारे विद्वान लोक नसतील तर धर्मग्लानी होते. ज्ञानी माणसांनी धर्म-ज्ञान सांगितले पाहिजे. विरोधकांशी वादविवाद करण्यास धर्माचे प्रचारक सिद्ध नसतील तर धर्माला ग्लानी येते.*_

_*आणि तिसरे कारण हे की धर्म व धर्माची तत्त्वे विद्वानासाठी असतात. प्राकृत व सामान्य लोकांकरिता मंदिरे-देवळे असतात. ते तेथे जाऊन आपल्या श्रेष्ठ विभूतीचे पूजन करतात.*_

                   _*आपण बौद्ध धर्म स्वीकारताना ही कारणे लक्षात ठेवली पाहिजेत. बौद्ध धर्माची तत्त्वे कालिक, काही कालापुरती आहेत असे कोणासही म्हणता यावयाचे नाही. आज दोन हजार पाचशे वर्षानंतरही बुद्धाची सारी तत्त्वे सर्व जग मानते. अमेरिकेमध्ये बुद्धाच्या दोन हजार संस्था आहेत. इंग्लंडमध्ये तीन लाख रुपये खर्च करून बौद्ध मंदीर बांधण्यात आले आहे. जर्मनीतही तीन, चार हजार बौद्ध संस्था आहेत. बुद्धाची तत्त्वे अजरामर आहेत. तथापि बुद्धानी असा दावा केला नाही की हा धर्म ईश्वराचा आहे. बुद्धानी सांगितले माझे वडील प्राकृत होते; माझी आई प्राकृत बाई होती. हा धर्म तुम्हाला वाटेल तर घ्यावा. हा धर्म जेव्हा तुमच्या बुद्धीला पटेल तेव्हा तो तुम्ही स्वीकारा. एवढी उदारता दुसऱ्या कोणत्याही धर्मात सांगितलेली नाही.*_

                    _*बौद्ध धर्माचा मूळ पाया काय आहे ? इतर धर्मात व बौद्ध धर्मात फार फरक आहे. इतर धर्मात बदल हा घडून यावयाचा नाही, कारण मनुष्य व ईश्वर यांचा संबंध ते धर्म सांगतात. इतर धर्माचे म्हणणे असे की ईश्वराने सृष्टी निर्माण केली. ईश्वराने आकाश, वायु, चंद्र, सूर्य सर्व काही निर्माण केले. आम्हाला ईश्वराने काहीही करावयाचे शिल्लक ठेवले नाही, म्हणून ईश्वरास भजावे ! खिस्ती धर्माप्रमाणे तर मृत्यूनंतर एक निर्णयाचा दिवस Day of Judgement असतो व त्या निर्णयाप्रमाणे सर्व काही घडते. देव व आत्मा यांना बौद्ध धर्मात जागा नाही. भगवान बुद्धानी सांगितले, जगात सर्वत्र दुःख आहे: ९० टक्के माणसे दुःखाने पिडलेली आहेत. त्या दुःखातून पिडलेल्या, गरीब माणसांना मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य आहे. बुद्धापेक्षा कार्ल मार्क्सने वेगळे काय सांगितले ? भगवंतानी जे सांगितले ते वेड्या वाकड्या मार्गाने सांगितले नाही.*_

                  _*बंधुंनो, मला सांगावयाचे होते ते सांगितले. हा धर्म सर्वतोपरी परिपूर्ण आहे. त्यास लांछन कोठेच नाही. हिंदू धर्माची अशी काही तत्त्वप्रणाली आहे की त्यामधून उत्साहच निर्माण होऊ शकत नाही. हजारो वर्षांपासून परवापर्यंत आपल्या समाजामधून एकही मनुष्य ग्रॅज्युएट अगर विद्वान होऊ शकला नाही. मला सांगावयास हरकत नाही की माझ्या शाळेत झाडलोट करणारी एक बाई होती. ती मराठा होती. ती मला शिवत नसे. माझी आई मला सांगत असे की मोठ्या माणसास मामा म्हणत जा. पोस्टमनला मी मामा म्हणत असे. (प्रचंड हंशा) लहानपणी शाळेत असताना मला तहान लागली होती. मी मास्तरांना तसे सांगितले. मास्तरांनी माझ्या संरक्षणाकरिता चपराशाला दुसरीकडून बोलाविले व याला नळावर ने असे सांगितले. आम्ही नळावर गेलो. चपराशाने मग नळ सुरू केला व मी पाणी प्यालो. मला शाळेत पाणी प्यावयास मिळत नसे. पुढे मला डिस्ट्रिक्ट जज्जाची नोकरी देऊ केली होती. पण ती घोरपड मी गळ्यात बांधून घेतली नाही. माझ्या बांधवांचे कार्य मग कोण करील, असे माझ्यापुढे कोडे होते, म्हणून मी नोकरीच्या बंधनात अडकलो नाही.*_

                 _*मला वैयक्तिकरित्या या देशातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही.* (टाळ्या) *तुमच्या डोक्यावर वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण अशी जी उतरंड रचली आहे ती कशी उलटेल व मोडेल हा खरा प्रश्न आहे. म्हणून या धर्माचे ज्ञान सर्वप्रकारे तुम्हाला करून देणे हे माझे कर्तव्य आहे. मी पुस्तके लिहून तुमच्या शंका कुशंका दूर करीन व ज्ञानाच्या पूर्णावस्थेला तुम्हास नेण्याचे सर्व प्रयत्न करीन. आज तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून वागले पाहिजे.*_

                   _*मात्र तुमचीही जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मान सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. हा धर्म म्हणजे आपण एक गळ्यात मढे अडकवून घेत आहोत असे मानू नका. बौद्ध धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शून्यवत् आहे. म्हणून आपण उत्तम रीतीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. नाही तर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीस आणला असे होऊ नये म्हणून आपण दृढनिश्चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेच नव्हे तर जगाचाही उद्धार करू. कारण बौद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे. जगात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांतता राहाणार नाही.*_

                   _*हा नवा मार्ग जबाबदारीचा आहे. आपण काही संकल्प केला आहे, काही इच्छिलेले आहे, हे तरुणांनी लक्षात घ्यावे. त्यांनी केवळ पोटाचे पाईक बनू नये. आपल्या प्राप्तीचा निदान २० वा हिस्सा या कामी देईन, असा निश्चय करावा. मला सर्वांना बरोबर न्यावयाचे आहे. प्रथम तथागताने काही व्यक्तींना दीक्षा दिली व त्यांना " या धर्माचा प्रचार करा" असा आदेश दिला. त्याप्रमाणे पुढे यश व त्याच्या ४० मित्रांनी बौद्ध दीक्षा घेतली. यश हा श्रीमंत घराण्यातील होता. त्यांना भगवंताने सांगितले, हा धर्म कसा आहे ? तर " बहुजन हिताय बहुजन सुखाय, लोकानुकंपाय, धम्म आदि कल्याणं, मध्य कल्याणं, पर्यावसान कल्याणं " त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे तथागताने आपल्या धर्माच्या प्रचाराचा मार्ग तयार केला. आता आपणालाही यंत्रणा तयार करावी लागेल म्हणून समारंभानंतर दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी. दरेक बौद्ध माणसाला दीक्षा देण्याचा अधिकार आहे असे मी जाहीर करतो. ''*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!!ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २०/०५/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८ भाग ३, पान नं ५२३ - ५३५*__

_*२) डॉ. भी. रा. आंबेडकर चरित्र ले. चां. भ. खैरमोडे, खंड १२, पृ. ५७*_

_*३) प्रबुद्ध भारत-आंबेडकर बौद्ध दीक्षा विशेषांक: २७ ऑक्टोबर १९५६*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...