🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन_*
*_डॉ. नरेंद्र दाभोलकर_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_27.html
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_भाग ५_*
*_कुपोषणाचे महत्त्वाचे कारण उपवास_*
_मात्र हे उपासतापास करताना नेमकं काय घडतंय, याचा कार्यकारणभाव आपण कधीच विसरलेला असतो. म्हणजे मला आठवतं की, एकदा माझ्या दवाखान्याचा जिना चढून एक बाई वर आली. ती घामाने डबडबलेली होती. तिला धाप लागलेली होती. तिला बराच मोठा आजार झाला असावा, असं तिच्या घरच्यांना वाटत होतं. माझ्या पत्नीने तिला टेबलवर झोपवलं; तपासलं आणि माझ्या पत्नीच्या लक्षात आलं की, तिला कुठलाच आजार झाला नव्हता, तर तिच्या खाण्यापिण्याची दीर्घ काळ आबाळ झालेली होती. तिच्या अंगातलं रक्त खूप कमी झालेलं होतं आणि तिला होणार त्रास त्या अशक्तपणामुळे, रक्त कमी झाल्यामुळे होत होता. अशा रुग्णाला अर्थातच औषधं लिहून देण्याच्या आधी योग्य प्रकारचा आहार देण्याची गरज असते. *त्याच्यामुळे तो आहार जर द्यायचा असेल, तर स्वाभाविकपणे एकतर त्या बाईच्या सासूला सांगावं लागतं; नाहीतर तिच्या 'ह्यांना' सांगावं लागतं. कारण सासुरवाशिण स्वतःच्या हातांनी घरात चांगल्याचुंगल्या गोष्टी करून खाऊ शकेल, असं वास्तव आजही नाही.* त्याच्यामुळे मी तिच्या 'ह्यांना' बोलवलं आणि त्यांना सांगितलं की, "हे बघा, एक गोष्ट चांगली आहे की, तुमच्या पत्नीला कुठलाही आजार झालेला नाही; मात्र तिच्या खाण्यापिण्याची दीर्घ काळ आबाळ झालेली आहे. त्यामुळे यापुढे तीन महिने तरी तिला रोज घट्ट डाळीचं वरण द्यायचं. म्हणजे तिला प्रथिनं मिळतील; मोड आलेली कडधान्यं द्यायची. म्हणजे तिला अमायनो अॅसिड्स मिळतील. तिला सकाळ- संध्याकाळ एकेक कप दूध द्यायचं. म्हणजे तिला कॅल्शिअम मिळेल; सकाळ- संध्याकाळ एकेक अंड द्यायचं. म्हणजे फर्स्ट क्लास प्रोटिन्स मिळतील. आठवड्यातनं दोनदा तरी तिला मांसाहार द्यायचा. आणि हे तुम्हांला परवडत नसलं, तरी तीन महिने तुमच्या पत्नीसाठी हा खर्च तुम्ही केला पाहिजे". आता अनुभव असा की, असं काही सांगितलं की, रुग्णाचे नातेवाईक ऐकतात आणि मान डोलावतात. कारण ते डॉक्टरांचं ऐकायलाच डॉक्टरकडे आलेले असतात. इथं मात्र विपरीत अनुभव आला._
_*तो नवरा उसळून म्हणाला, "डॉक्टर, परवडण्याचा प्रश्नच नाही. आमच्याकडे मोप दूधदुभतं आहे. आमच्याकडे अंडी-कोंबड्या आहेत. आम्ही हिला रोज मांसाहार देऊ शकतो; पैसाअडक्याची काहीही अडचण नाही. पण हिचा सोमवारचा उपवास असणार; मंगळवारचा असणार; गुरुवारचा असणार; शुक्रवारचा असणार. हिचे आत्ता सोळा श्रावणी सोमवार संपले. त्याच्यानंतर मग नवरात्राचे नऊ उपवास झाले. आता हिचे सूर्यनारायणाचे उपवास येणार. हिचे उपवास संपणार कवा, ही जेवणार कवा आणि हिची तब्येत सुधारणार कवा!" म्हणजे, खायला मिळत नाही म्हणून अशक्तपणा आहे, हे वाईटच आहे, पण खायला मिळण्याची शक्यता असूनदेखील कुठल्या ना कुठल्या चुकीच्या कल्पनेमुळे, अंधश्रद्धेपोटी, सातत्याने चालू असलेल्या उपवासांमुळे स्वतःच्या तब्येतीची बरबादी होणं, हे मानसिक गुलामगिरीचं लक्षण आहे. या प्रश्नामागचं हे व्यापकत्व आपण समजून घेतलं पाहिजे.*_
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :-२७/०३/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन - लेखक डॉ नरेंद्र दाभोळकर*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment