Thursday, 16 November 2023

इतिपि सो भगवा लोकविदू

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_इतिपि सो भगवा लोकविदू_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_- ते भगवान लोकविदू (सर्व लोकांना जाणणारे) आहेत._ 

_*लोकं विदती जानातीति लोकविदू-*_

_ज्याला लोक माहित आहेत, जो लोकांना जाणतो, तो लोकविदू. किती आहेत हे लोक ?_

_*चार अधोगतीचे लोक-* निरय, असुर, प्रेत, तिर्यक (पशु-पक्षी)_ 

*_एक मनुष्य लोक._*

_*सहा देवलोक* चातुर्महाराजिक, त्रायस्त्रिंश, याम, तुषित, निर्माणरति, परनिर्मित वशवर्ती._

_*सोळा रूप ब्रह्मलोक-*-ब्रह्मपारिषद, ब्रह्मपुरोहित, महाब्रह्मा, परित्ताभ, अप्रमाणाभ, आभास्वर, परित्रशुभ, अप्रमाण शुभ, शुभकृत्स्न, बृहत्फल, अविहा, अतप्य, सुदर्श, सुदर्शी, असंज्ञसत्ता, अकनिष्ठक._

_*चार अरूप ब्रह्मलोक-* आकाशानन्त्यायतन, विज्ञानानन्त्यायतन, आकिञ्चन्यायतन, नैवसंज्ञानासंज्ञायतन._

_*अशाप्रकारे एकतीस लोक होतात-ह्यापैकी पहिले अकरा कामभोगाचे लोक आहेत. ब्रह्मलोक ब्रह्मचरणाचे लोक आहेत. तेथे कामभोग नसतात. रूप ब्रह्मलोकात रूप (शरीर) आणि नाम (मन) ह्या दोघांचे आस्तित्व असते, परंतु अरूप ब्रह्मलोकात रूप नसते, फक्त नाम असते. आज रूप शब्द सौंदर्य किंवा आकृती ह्या अर्थात प्रचलित आहे. परंतु त्या काळांतील भाषेत रूप भौतिक पदार्थांना देखील म्हणत होते. आज नामचा अर्थ केवळ नामकरण असा राहिला. याचा उपयोग एखाद्यास हाक मारणे, ओळखणे यासाठीच केला जातो. परंतु त्या काळातील भाषेत नाम चित्तालासुध्दा म्हणत होते. मनुष्य आणि पशूलोकात भरीव, ठोस भौतिक शरीर असते, पण अधोगतीच्या कांही लोकात आणि देव व ब्रह्मलोकातील प्राण्यांचे शरीर भरीव नसते, ते वायवीय असते, परंतु असते भौतिकच. केवळ अरूप ब्रह्मलोकातील प्राणी भौतिक शरीरधारी नसतात. त्यांचे शरीर सूक्ष्म वायवीय सुध्दा नसते. ते केवळ नाममय म्हणजे चित्तमय प्राणी असतात. अशाच प्रकारे असंज्ञसत्ता ब्रह्मलोकात फक्त रूपमय प्राणी असतात.*_

_*अन्य एका गणतीत एक कामलोक, दुसरा रूप ब्रह्मलोक, आणि तिसरा अरूप ब्रह्मलोक हे तीनच लोक गणले जातात.*_

_*दुस-या एका गणतीत सर्व विश्व ज्या शून्य आकाशांत स्थित आहे त्याला आकासलोक, कारण की त्यात प्राणी अस्तित्वात आहेत म्हणून ते सत्त् (सत्व) लोक आणि त्यात संस्कारांची तरंगे सामावलेली आहेत म्हणून संखारलोक हे तीन लोक म्हटले जातात.*_

_*साधारणपणे मनुष्यलोकास इहलोक म्हणतात आणि दुस-या सर्व लोकांना परलोक म्हणतात. साधना क्षेत्रात नाम आणि रूपाच्या सर्व -क्षेत्राला लोक म्हटले आहे. ह्यात सर्व एकतीस लोकांचा समावेश आहे.*_

_कांही कां असेना, कशा प्रकारेही गणती करा, या सर्व लोकांच्या बाबतीत ज्याला संपूर्ण सत्य माहित आहे, त्यालाच लोकविदू म्हणतात. याविषयी पूर्ण माहिती खऱ्या अर्थी त्यालाच होते जो ह्या एकतीस लोकांचे संशोधन पूर्ण करून त्यांना पूर्वपणे जाणून, त्या पलिकडील लोकातीत निर्वाणाचा साक्षात्कार करील म्हणजेच लोकन्तगू होईल. लोकन्तगू झाला तरच खऱ्या अर्थाने लोकविदू होतो नाही तर भ्रम-भ्रांतीतच अडकून राहातो._

*_लोकांच्या पलीकडे कसे जाणार?_*

_प्राचीन काळी रोहिताश्व नावाचा एक ऋषी होता. तो मृत्युनंतर देवलोकांत जन्मला, भगवानांच्या जीवनकाळात अनेक देव, ब्रह्मा भगवानांना भेटण्यास येत असत आणि त्यांना धर्मविषयक प्रश्न विचारत असत. एकदा भगवान अनाथपिंडिकाच्या जेतवनात विहार करीत होते तेव्हा रोहिताश्व देव रात्रीच्या वेळी सा-या जेतवनाला आपल्या प्रकाशाने प्रकाशित करीत भगवानांना भेटण्यास आला. त्याने भगवानांना प्रश्न विचारला की सर्व लोकांच्या पलिकडील त्या अवस्थेपर्यंत चालत चालत पोहोचू शकतो का, की जेथे जन्म नाही व मृत्युही नाही, जेथे पतन होत नाही व उत्पत्तीही होत नाही?_

_भगवानांनी सांगितले--नाही. चालत चालत त्या अवस्थेपर्यंत पोहोचू शकत नाही, तरीसुध्दा मुक्तिसाठी त्या अवस्थेपर्यंत पोहोचणेही अत्यंत अनिवार्य आहे._

_रोहिताश्व देव हे ऐकून प्रसन्न झाला, कारण त्याच्या मनुष्य जीवनांत त्याने योगाच्या सामर्थ्याने सिध्दी प्राप्त केल्या होत्या. त्या सिध्दींच्या आधारावर तीव्र गतीने चालत चालत लोकांच्या पलिकडील अवस्थेपर्यंत पोहोचण्याच्या निष्फल प्रयत्नात त्याने आपले सारे जीवन घालविले होते. तेव्हा भगवानांनी समजावले_

*_इमस्मियेव व्याममत्ते कळेवरे ससञ्जिम्हि समनके-_*

_*ह्या साडेतीन हात लांब असलेल्या संज्ञायुक्त शरीरात-*_

_लोकञ्च पञ्ञपेमि, लोकसमुदयञ्च, लोकनिरोधञ्च, लोकनिरोधगामिनिञ्च पटिपदन्ति ।_

_*(अ०नि० १.४.४५, रोहितस्ससुत्त)*_

_*- मी लोकांना जाणतो, लोक-समुदयाला, लोक-निरोधाला, आणि लोक-निरोध करण्याच्या मार्गालाही.*_

_भगवानांनी स्वतः लोकोत्तर अवस्था प्राप्त केली असल्यानेच ते लोकांना जाणू शकत होते. दुस-या एका प्रसंगी भगवानांनी सांगितले-_

_*भिक्षूंनो, तथागतांनी लोक जाणला आहे. तथागत लोकापासून मुक्त आहेत. भिक्षूंनो, तथागतांनी लोक-समुदय म्हणजे लोकांची उत्पत्ती जाणली आहे. तथागतांची लोकातील उत्पत्ती नष्ट झाली आहे, समाप्त झाली आहे.*_

_भिक्षूंनो, तथागतांनी लोक-निरोध जाणला आहे. तथागतांनी लोक-निरोधाचा साक्षात्कार केला आहे. तथागतांनी लोक-निरोधगामिनी प्रतिपदा (निवारण करण्याच्या मार्गालाही) जाणली आहे. म्हणजेच लोक-निवारण करण्याचा मार्ग भावित केलेला आहे. त्याचा अनुभव घेतला आहे._

_सगळ्या लोकांच्या पलिकडील अवस्था मिळविण्यासाठी सा-या लोकांचे परिपूर्ण ज्ञान म्हणजे परिज्ञान, अभिज्ञान होणे आवश्यक आहे. लौकिक क्षेत्राच्या पलिकडील अवस्था ती व्यक्ती कशी पार करू शकेल जिने समस्त लौकिक क्षेत्राचे परिपूर्ण यथाभूत ज्ञान प्राप्त केले नाही ? अनुभूतीच्या स्तरावर असे ज्ञान प्राप्त केल्यानंतरच कोणी व्यक्ती सर्व लोकापासून विमुक्त होते. तेव्हाच त्यापासून अलिप्त होते. तेव्हा म्हटले गेले-_

_*सब्बं लोकं अभिज्ञाय, सब्बं लोके यथातथं ।*_

_सर्व लोकांना अभि-ज्ञानाने जाणून, सर्व लोकांना जशेच्या तसे ( यथातथ्य) जाणून, सर्व लोकांपासून निर्बंध, सर्व लोकांपासून अलिप्त अशी जी व्यक्ती सगळा लोकप्रपंच स्वतःच्या अनुभवाने जाणून, त्यापासून विमुक्त झाली, निर्लिप्त झाली, ती व्यक्ती ख-या अर्थाने लोकविदू आहे. तीच सर्वजित आहे._

_*स वे सब्बाभिभू धीरो, सब्बगन्थप्पमोचनो।*_ 

_*फुट्ठस्स परमा सन्ति, निब्बानं अकुतोभयं ॥*_

_*(अ० नि० १.४.२३, लोकसुत्त)*_

_तो धीर पुरूष सर्वांना पराजित करतो. तो सर्व ग्रंथींपासून विमुक्त आहे. त्याने निर्वाणिक परम शांतीला स्पर्श केला आहे आणि भय मुक्त झाला आहे._

_अशा लोकविदूला लोकांबद्दल आणि लोकमुक्त होण्याविषयी काय भय आणि काय संशय राहील? जेव्हा लोकांच्या अंतिम टोकाला जाणून त्याच्या पुढे निघून जाईल, सगळ्या लौकिक क्षेत्राच्या पलिकडील लोकातील निर्वाणाचा स्वतः साक्षात्कार करून घेईल, तेव्हाच असे होईल._

_*तस्मा हवे लोकविदू सुमेधो, लोकन्तगू वुसितब्रह्मचरियो ।*_ 

*_लोकस्स अन्तं समितावि ञत्वा, नासीसती लोकमिमं परञ्चाति ॥_* 

*_(अ० नि० १.४.४५, रोहितम्ससुत्त)_*

_म्हणून जो लोकविदू आहे, सुप्रज्ञ आहे. लोकाचा अंत जाणणारा आहे, ज्याने ब्रह्माचरण पूर्ण केले आहे (तो) समतेच्या आधारावर लोकाचा अंत जाणून इहलोकात किंवा परलोकात कोठेही आसक्त होत नाही._

_खरोखर जो सर्व लोकप्रपंचाला जाणतो तो लोकांविषयी आसक्त होवू शकत नाही. कोणी व्यक्ती लोकविदू तेव्हाच होते, जेव्हा ती लोक स्वभावाला जाणते, लोकांच्या उत्पत्तीला जाणते, लोकांच्या निरोधाला जाणते, लोक निरोधाच्या उपायांना जाणते. ह्या चौघांना आपल्या शरीराच्या आतच जाणते._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- १७/११/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) विश्व विपश्यनाचार्य श्री सत्यनारायण गोयन्कांनी लिहिलेले पुस्तक "तिपिटक मे सम्यक संबुद्ध भाग-२/४ मधून साभार_*

*_२) अ०नि० १.४.४५, रोहितस्ससुत्त_*

*_३) अ० नि० १.४.२३, लोकसुत्त_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/11/blog-post_67.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...