🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_विकाल भोजन_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_एके वेळी भगवान काशिराष्ट्रात मोठ्या भिक्षुसंघासह उपदेश करीत फिरत होते. तेथे भगवान् भिक्षूंना उद्देशून म्हणाले, *“भिक्षुहो, मी रात्रीचे जेवण सोडले आहे. यायोगे माझ्या शरीरात व्याधि कमी झाली आहे, जाड कमी झाले आहे, अंगी बळ आले आहे, आणि चित्ताला स्वास्थ्य मिळत आहे. भिक्षुहो, तुम्हीही याप्रमाणे वागा. तुम्ही जर रात्रीचे जेवण सोडले, तर तुमच्या शरीरात व्याधि कमी होईल, जाड्य कमी होईल, अंगी बळ येईल आणि तुमच्या चित्ताला स्वास्थ्य येईल." "ठीक भदन्त," असे त्या भिक्षूंनी भगवंताला उत्तर दिले.*_
_त्यानंतर भगवान् प्रवास करीत करीत कीटागिरि नावाच्या शहरात आले. तेथे अस्सजि (अश्वजित्) आणि पुनव्यसुक (पुनर्वसुक) नावाचे दोन भिक्षू रहात होते. काही भिक्षू त्याजपाशी जाऊन त्यांना म्हणाले, 'भगवान् रात्री जेवीत नाही व भिक्षुसंघानेही रात्रीचे जेवण सोडले आहे. तुम्ही याप्रमाणे रात्रीचे जेवण सोडले तर तुम्हालाही बरे वाटेल.' त्यावर अस्सजि आणि पुनब्बसुक म्हणाले, "बन्धुहो, आम्ही संध्याकाळी जेवतो, सकाळी जेवतो, दुपारी जेवतो आणि दोन प्रहर उलटून गेल्यावरही जेवतो. येणेकरून आमच्या शरीरात व्याधी कमी होते, जडता कमी होते, अंगी बळ येते आणि आमच्या चित्ताला स्वास्थ्य वाटते. तर मग हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे आम्ही का लागावे?_
_ही गोष्ट भगवंताला समजली, तेव्हा त्याने त्या दोघांला बोलावून आणून चौकशी केली इत्यादि._
_*यावरून असे दिसून येते की भगवंताने आरंभी रात्रिभोजनाचा तेवढा निषेध केला असावा. आणि संघातील बहुतेक भिक्षूंना ही गोष्ट पसंत पडल्यामुळे हा नियम सर्वसंमत झाला असावा.* एकदा उदायी भगवंताला म्हणतो, "भदंत, एकान्तात असताना माझ्या मनात असा विचार आला की, भगवंताने पुष्कळशा दुःखकारक गोष्टी आम्हापासून दूर केल्या, आणि पुष्कळशा सुखकारक गोष्टी आम्हाला प्राप्त करून दिल्या .... *भदन्त, आम्ही पूर्वी संध्याकाळी, सकाळी, दुपारी आणि दुपार होऊन गेल्यावरही जेवीत होतो. अशी एक वेळ होती की भगवंताने भिक्षूला दिवसा अवेळी जेवण्याची मनाई केली. त्यावेळी मला फार वाईट वाटले. श्रद्धाळु गृहस्थ दिवसा बिकाळी आम्हाला खाण्यापिण्याचे जिन्नस देतात, त्यांचीही भगवान् मनाई करीत आहेत हे मला आवडले नाही. परंतु भगवंतावर असलेल्या प्रेमामुळे, भगवंताच्या गौरवाने, लज्जा आणि लोकापवादभय जाणून दिवसा विकाळी खाणे आम्ही सोडून दिले. पण आम्ही सकाळी व संध्याकाळी जेवीत होतो. त्यानंतर भगवंताने रात्री भलत्याच वेळी खाण्याची मनाई केली. तेव्हाही मला वाईट वाटले. या दोन जेवणात जे उत्तम जेवण तेही आम्हास भगवान् सोडावयास सांगतो हे मला आवडले नाही परंतु भगवंतावर असलेल्या प्रेमाने, भगवंताच्या गौरवाने, आणि लज्जा व लोकापवादभय जाणून आम्ही रात्री अवेळी जेवण्याचेही सोडून दिले. हा नियम करण्यापूर्वी भिखू अंधेऱ्या रात्री भिक्षाटन करीत असता गटारात किंवा घाणीच्या डबक्यांत पडत असत, काट्यात शिरत, निजलेल्या गाईवर पडत, चोरी करून येणाऱ्या किंवा चोरी करण्यास जाणाऱ्या चोरांच्या तावडीत सापडत... मीही एके वेळी असाच भिक्षाटन करण्यास गेलो होतो. तेथे एक स्त्री आपल्या घराच्या बाहेरच्या बाजूस भांडी घाशीत होती. मला पाहून 'हे भूत आहे, हे पिशाच आहे', असे ती मोठ्याने ओरडली. तेव्हा मी तिला म्हणालो, 'भगिनी, मी पिशाच नाही, मी भिक्षु आहे, व येथे भिक्षेसाठी उभा राहिलो आहे.' ती म्हणाली 'अरे भिक्षू, तुझी आत्या मरो, माता मरो, कसायाच्या तीक्ष्ण सुरीने तुझे पोट कापून काढलेले चांगले. पण अशा अंधेच्या रात्री तुला हे भिक्षाटन करणे चांगले नाही.' भदन्त, या गोष्टीची जेव्हा मला आठवण होते, तेव्हा भगवंताने पुष्कळशा दुःखकारक गोष्टी आम्हापासून दूर केल्या व पुष्कळशा सुखकारक गोष्टी आम्हाला प्राप्त करून दिल्या असे मला वाटते. "*_
_या गोष्टीवरून असे दिसून येते की, प्रथमतः भगवंताने भलत्याच वेळी खाण्याचा निषेध केला. तरी रात्रीच्या जेवणाचा निषेध केला नाही. नंतर सकाळी बारा वाजण्यापूर्वी एकदा व सायंकाळी सूर्यास्तापूर्वी एकदा अशी दोनच जेवणे जेवण्याचा नियम केला असावा. भगवान स्वतः सकाळचे एकच जेवण जेवीत होते, व भिक्षूंनाही तसे करण्यास उपदेश करीत असे, *परंतु सध्याचा प्रघात असा आहे की, अरुणोदयापासून मध्याह्नकाळापर्यंत भिक्षूने वाटेल तितक्या वेळा खावे. बारा वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी अरुणोदयापर्यंत विकाल समजला जातो. सप्तदशवर्गीय भिक्षू बारा वाजल्यानंतर खाण्याचे पदार्थ खात त्यामुळे हा नियम करावा लागला असे विनयग्रंथात सांगितले आहे.* परंतु विनयाचा आणि सुत्तपिटकांतील वर दिलेल्या उताऱ्यांचा स्पष्ट विरोध दिसून येतो. आणि विनयाच्या अशा प्रकारच्या कथा मागाहून रचल्या गेला असाव्या हे उघड होते._
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संदर्भ :-_*
*_१) मज्झिम निकाय - किटागिरी सुत्त_*
*_२) मज्झिम निकाय - लटूकिकोपम सुत्त_*
*_३) मज्झिम निकाय - ककचूपम सुत्त_*
*_४) बुद्ध धर्मावरील चार निबंध_*
*_दिनांक :- ३१/०५/२०२३_*
*_मराठी अनुवाद :- महेश कांबळे_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2023/05/blog-post_30.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment