Saturday, 18 February 2023

बाण मारणाऱ्याची जात काय?

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणि पद्मे हूँ !!_*

*_बाण मारणाऱ्याची जात काय?*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

             _*मालुंक्यपुत्त नावाचा एक बुद्धांचा भिक्षू शिष्य* एकदा बुद्धापाशी आला आणि बुद्धाला प्रणाम करून एका बाजूला बसून त्याने *बुद्धांला विचारले, “भगवन्, एकांतात बसलो असता माझ्या मनात असा विचार आला की, "हे जग शाश्वत आहे काय? किंवा अशाश्वत आहे? शरीर व आत्मा एक आहेत की भिन्न? मरणानंतर तथागतांचा जन्म होतो किंवा नाही? या प्रश्नांचा भगवंतानी खुलासा केलेला नाही. म्हणून मला वाटते की आपण है प्रश्न भगवंतांना विचारावेत आणि जर भगवंतांनी त्यांची समाधानकारक उत्तरे दिली तर भगवंतांच्या संघात राहावे, नाही तर निघून जावे. "*_

_त्यावर बुद्ध त्याला म्हणाले "हे मालुंक्यपुत्ता, तू माझा शिष्य झालास तेव्हा मी तुझ्या या प्रश्नांची उत्तरे देईन, असे मी तुला कधी म्हणालो होतो काय?"_

_मालुंक्यपुत्त उत्तरला "नाही, भन्ते!"_

_बुद्ध पुढे म्हणाले. "तर मग तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत तर माझा शिष्य राहणार नाहीस या तुझ्या म्हणण्याला काही अर्थ आहे काय?"_

_मालुंक्यपुत्त उत्तरला "नाही, भन्ते!"_

            _*त्यावर बुद्ध म्हणाले "मालुंक्यपुत्ता, असे समज की एखाद्या माणसाला जंगलात विषारी बाण लागून तो घायाळ झाला आहे. त्याच्या आप्तमित्रांनी त्याला वैद्याकडे नेऊन त्याचा बाण काढून त्यावर उपचार करण्यास सांगितले. आणि जर तो माणूस वैद्याला  म्हणाला की, "हा बाण काढण्यापूर्वी मला कळले पाहिजे की, तो कोणी मारला आहे? बाण मारणारा ब्राह्मण होता की क्षत्रिय? वैश्य होता की शूद्र? काळा होता की गोरा होता? त्याचे धनुष्य कोणत्या प्रकारचे होते? धनुष्याची दोरी कशाची होती? बाणाला लावलेली पिसे कोणत्या पक्षाची होती? बाणाला लावलेले विष कोणते होते? मला हे कळल्याशिवाय बाण काढू नका" असा जर तो माणूस हट्ट धरून बसला तर त्याच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळण्यापूर्वीच तो हकनाक मरून जाईल,*_

         _*त्याच प्रमाणे, हे मालुंक्यपुत्त, जो कोणी जग हे शाश्वत आहे, अशास्वत आहे, वगैरे प्रकारचा हट्ट धरील आणि त्याशिवाय दुःखमुक्तीसाठी ब्रह्मचर्य मार्गाचे पालन करणार नाही, तो सुद्धा त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावाचून दुःखातच मरून जाईल.*_

         *_"हे मालुंक्यपुत्त, जग शाश्वत आहे किंवा अशाश्वत, शरीर आणि आत्मा एक आहे की भिन्न, मृत्यूनंतर तथागत असतात की नाही, इत्यादी गोष्टींवर विश्वास ठेवला किंवा न ठेवला तरी त्यामुळे धम्ममार्गाचे पालन करण्यास मदत होईल असे नाही. अशा कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवला तरी जन्म, जरा, मरण, शोक, दौर्मनस्य यातून सुटका होत नाही. म्हणून मालुंक्यपुत्ता, मी या गोष्टींचा शोध घेण्याच्या भरीस पडलो नाही. कारण या वादविवादाने ब्रह्मचर्याच्या पालनास साहाय्य होत नाही. वैराग्यलाभ होत नाही, पापाचा निरोध होत नाही: शांती, प्रज्ञा, निर्वाण प्राप्त होत नाही."_*

       *_"हे मालुंक्यपुत्त, हे दुःख आहे, हे दुःखाचे कारण आहे. हा दुःखाचा निरोध आणि हा दुःख निरोधाचा मार्ग आहे, हे मी स्पष्ट करून सांगितले आहे. कारण ही चार महान सत्ये ब्रह्मचर्याला स्थैर्य आणणारी आहेत, वैराग्य निर्माण करणारी आहेत, पापांचा निरोध करणारी आहेत, शांती, प्रज्ञा, आणि निर्वाणाचा लाभ करून देणारी आहेत. म्हणून मी ज्या गोष्टींची चर्चा केलेली नाही, त्याची चर्चा करू नकोस मी ज्याचे स्पष्टीकरण केले आहे. ते लक्षात घे. ते योग्य आहे असे समज."_*                         

            _*अशा प्रकारे आपल्या धम्म शिकवणीचा उद्देश केवळ मानवाचे दुःख नाहीसे करणे हाच आहे, हे तथागतांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितले आहे. म्हणून बुद्धाचा धम्म इतर कोणत्याही धर्माच्या विरोधी नाही. इतर धर्ममार्ग मानवाच्या दुःखाचा अंत करण्यास पुरेसे नाहीत, किंवा ते त्यांचे मुख्य ध्येय नाही, हेच बुद्धाचे सांगणे आहे.*_

*_।। सर्व प्राणी सुखी होवोत, सर्वांचे कल्याण होवो, सर्वांना हिताचा मार्ग सापडो, कोणालाही दुःख न होवो....।।_*

                 *_!! ओम मणि पद्मे हूँ !!_*

*_संकलन :- महेश कांबळे

*_संदर्भ :- मज्झिम निकाय सुत्त नं. ६३_*

*_दिनांक :- १८/०२/२०२३

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/02/blog-post_18.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...