Wednesday, 3 August 2022

सम्यक् संकल्प : स्थितप्रज्ञता

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

 *_सम्यक् संकल्प : स्थितप्रज्ञता_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

           *_भगवान बुद्ध कोशल देशाची राजधानी श्रावस्ती मधील जेवतनातील विहारात वर्षावास करीत होते. तेव्हाची घटना._*

          _कोशल नरेश प्रसेनजित विपश्यी साधक होता. सांसारिक जीवनांतील जबाबदाऱ्या पार पाडीत होता. *वेळोवेळी अंतर्मुख होऊन आंतरिक सत्याचे निरीक्षण करीत असे. अशाच एका आत्मनिरीक्षणाच्या वेळी त्याला असं आढळून आलं की जगांत सर्वात प्रिय 'अहंभाव', 'मी' पणा आहे. या आत्मनिरीक्षणात त्याला हे ही कळून चुकले की हा 'अहंभाव' सर्वांनाच प्रिय आहे. जगांत सर्वजणच आपल्या या 'अहंभावा' वर प्रेम करीत आहेत.  हे प्रेम आंधळं असल्यामुळे आपली तृष्णा, इच्छा, अस्मिता, भविष्यकालीन सुखस्वप्ने यांच्यावर माणूस अपरंपार प्रेम करतो. लोकांचे परस्परांशी संबंधदेखील याच मतलबी प्रेमावर आधारलेले असतात. जे कोणी माझ्या स्वप्नांवर प्रेम करतात, ती साकार करायला मदत करतात तेच प्रिय वाटू लागतात. दुसरे कोणी आवडत नाही. जीवनातील हे प्रमुख सत्य ध्यानाच्या एका अवस्थेत त्याला जाणवले.*_

          _*अंतर्मुख होऊन यथाभूत वास्तविकता पाहणारा अभ्यासू साधक हळुहळु सत्याच्या सखोल अवस्थांजवळ पोहोचू लागतो तसतसा आत्मदर्शनाच्या या साधनेत तो बराच वेळ तल्लिन होऊन जातो. हीच साधनेची एकरूपता आहे. प्रतिसंल्लिनता आहे. ह्या प्रतिसंल्लिन ध्यानाचे वेळी मधून मधून चिंतन-मनन होत असतेच. संकल्प-विकल्पही होतात. या संकल्प-विकल्पांचा आधार सम्यक् दर्शन आहे. म्हणजेच स्वानुभूतीजन्य सत्यदर्शन आहे. म्हणून हे संकल्प-विकल्प देखील स्वतःच सम्यक् असतात. धर्ममय असतात. परिणामतः मंगलदायक व कल्याणकारी असतात.*_

        _कोसल नरेश राजा प्रसेनजित एक दिवस याच प्रतिसंल्लीन विपश्यना अवस्थेत सम्यक संकल्पाचा अनुभव करतो. सम्यक् चिंतन-मननाद्वारे विचार करतो आणि उमजतो._

         *_सर्वांचे आपल्या आपणावरच नितांत प्रेम असणे सहाजिकच आहे. पण खरच का आपण समजदारीने आपल्या स्वतःवर प्रेम करीत असतो? स्वतःवर कोण खऱ्या अर्थाने प्रेम करीत नसतो ?_*

          _सत्यान्मुखी ध्यानाच्या पृष्ठभूमीवर जेव्हा संकल्प-विकल्प उभारतात तेव्हा ते मंगलमय कल्याणप्रदच असतात. हळूहळू स्थूल सत्य दर्शनांतून साधक त्याहूनही पलिकडील सूक्ष्म स्तराकडे पोहोचतो व नंतर जेव्हा अतिसूक्ष्म सत्याच्या गहनस्तराचे निरीक्षण करू लागतो तेव्हा परिणाम स्वरूप अनेक गुंते सुटायला लागतात. धर्माचे अनेक बारकावे लक्षात येऊ लागतात._

          _तेव्हा सम्यक् मननाच्या स्तरावर हा प्रश्न निर्माण होतो की जो 'मी' माझे म्हणून माझ्यावर प्रेम करतो ते प्रेम योग्य अर्थाने 'प्रेम' आहे का ? आपल्या या 'मी' [ममत्व भावनेला ] सुरक्षित ठेवण्यासाठी, याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी या स्वप्नपूर्तीच्या अंधपणाच्या रस्त्याने जात असता विरोध करणाऱ्या प्रत्येक प्राण्याला दुःख देऊन, त्याचे नुकसान करून पुढची वाटचाल करती. अडथळा आणणाऱ्या बाधकाला दूर करण्याचा प्रयत्न करतांना त्याला दुःखी करतो त्यावेळी खरोखर मी माझे कल्याण साधतो का? आपला स्वार्थ साधतो का ? स्वप्नपूर्तीच्या आवेशात अन्य निष्पाप लोकांचे दडपशाहीने शोषण करतो, त्यांच्या जिवंत राहण्याच्या हक्कांवर गदा आणतो, तो अधिकार जबरदस्तीने हिरावून घेतो, त्यांच्या हिताचे, सुखमय जीवनाचे हनन करतो तेव्हा खऱ्या अर्थाने मी माझे मंगल-हित साधतो का ?_

      _साधकाचा सम्यक् संकल्प, सम्यक दर्शनाच्या आधाराने प्रगती पथावर जात असतो, म्हणून त्याला स्पष्ट जाणीव होते; *विपश्यना साधनेमुळे वारंवार हीच अनुभूती येते की जेव्हा जेव्हा तो या 'मी' वर आसक्त होऊन 'माझ्या स्वप्नांवर आसक्त होऊन, मनाने, वाचेने आणि शरीराने जे जे कर्म करतो ते मोहजन्यच असते. लोभ आणि द्वेष भावयुक्त असते. म्हणून ते दुराचरण होत असते. आणि ज्याक्षणी दुराचरण घडते त्याचक्षणी चित्तधारेवर कटुतेची बीजे पेरतो जी ह्याक्षणी दुःखदायी असतात व त्याची भविष्यकालीन फळेही परिणामी दुःखदायकच होतात. असं होत असेल तर आपलं भलं कसं होणार? आपलं अहितच करतो ना आपण? स्व-अर्थ- स्वार्थ साधण्याऐवजी स्व-अनर्थ, स्वतःचे अकल्याणच करून घेत असतो ना ?*_

        _अशी व्यक्ती जी काया, वाचा आणि मनाने दुराचरण करते ती व्यक्ती हजार वेळा म्हणू देत की 'मी माझ्यावर प्रेम करतोय' अथवा माझ्यातील 'मी' [अहं] मला प्रिय आहे. पण खरं सांगायचं तर तो स्वतः स्वतःवर कधीच प्रेम करीत नसतो. त्याचा 'मी' त्याला केव्हाही प्रिय नाही. शत्रूने शत्रूशी जसे शत्रूत्व करावे तसेच वर्तन तो स्वतःच स्वतःशी करत असतो. शत्रू जेवढा शत्रूची करत नाही त्याहून अधिक हानी तो स्वतःच स्वतःची करत असतो._

            _खरंच का त्याला स्वतःचा मी प्रिय आहे? मुळीच नाही. यत्किंचितसुद्ध नाही. तो एक भ्रम असतो, तो स्वतःच स्वतःचा मोठ्यात मोठा वैरी असतो मोठ्यात मोठा दुश्मन असतो._

           _*अंतर्मुख होऊन सत्याचा शोध करीत असताना ऋत, निसर्गाचा नियम विश्वाचे विधान चांगल्या प्रकारे ध्यानांत येऊ लागते तेव्हाच तो साधक खा अर्थाने आपल्या स्वतःवर प्रेम करू लागतो. आपल्या चित्त धारेला निर्मल ठेऊ लागतो व असे करून आपली सुरक्षितता जतन करू लागतो. तो आपले वर्तमान सुधारतो तसे भविष्यही सुधारतो. आपला इहलोक सुधारतो आणि परलोकही!*_

       _*खऱ्या अर्थाने स्वतःचे कल्याण करून घेतो. स्वार्थ साधतो, अनर्थापासून त्याचे रक्षणच होते. तो लाख म्हणो की मी माझ्यावर प्रेम करत नाही, मी स्वार्थी नाही परंतु त्याचेच त्याच्यावर खरे प्रेम असते व योग्य अर्थाने तो स्वार्थीच असतो.*_

           _एक मित्र आपल्या मित्राशी जसे आचरण करतो तसचं त्याचं स्वतःशी वर्तन असतं. एक मित्र आपल्या मित्राचे जेवढे भले करील त्यापेक्षाही जास्त तो आपले स्वतःचे भले साधत असतो. अशी व्यक्ती खरोखर आपले स्वहित म्हणजेच स्वार्थ साधते. यथायोग्य आत्ममंगलातच परमंगल आणि सर्वमंगल सामावलेले असते. परममंगल समाविष्ट असते._

          *_विपश्यना साधनेच्या काळात म्हणजे सम्यक दर्शन आणि सम्यक संकल्पाच्या या काळात हे जे सत्यदर्शन महाराज प्रसेनजितास झाले ते त्याने भगवान बुद्धांना भेटून थोडक्यात सांगितले तेव्हा त्याला पुष्टी देतांना भगवान म्हणाले, 'खरचं आहे ते प्रसेनजित! अगदी बरोबर आहे. जो काया, वाचा, मनाने दुराचरण करतो तो खऱ्या अर्थाने स्वतःवर प्रेम करत नसतो. जो काया. वाचा, मनाने सदाचरण करतो त्याचेच खऱ्या अर्थाने स्वतःवर प्रेम असते.'_*

_या प्रसंगी भगवान बुद्धांनी हे धर्मवचन सांगितले :_

*_अत्तानं चे पियं जञ्ञा न नं पापेन संयुजे ।_* 

*_न हितं सुलभं होति, सुखं दुक्कटकारिना ।।_*

         *_ज्याला आपले आपलेपण [ममत्व] प्रिय आहे त्याने स्वतःला पापाचरणांत गुंतविता कामा नये. दुष्कर्मीला सुख सुलभ नाही._*

*_अन्तकेनाधिपन्नस, जहतो मानुसं भवं ।_*

*_किं हि तस्स सकं होति, किञ्च आदाय गच्छति ।_*

*_किञ्चस्स अनुगं होति, छाया व अनपायिनी ॥_*

        *_मनुष्यभव सोडतेवेळी, मृत्यूच्या आधीन होते वेळी मृत्यूच्या आधीन होणाऱ्याचे त्याचे स्वतःचे असे काय आहे? तो काय बरे सोबत नेणार आहे ? साथ न सोडणाऱ्या सावलीसमान काही तरी त्याच्या मागे मागे जाते का ?_*


*_उभो पुञ्ञञ्च पापञ्च यं मच्चो कुरुते इघ ।_*

*_तं हि तस्स सकं होति, तं व आदाय गच्छति ।_* 

*_तं वस्स अनुगं होति, छाया व अनपायिनी।_*

             *_जे पाप आणि पुण्य मनुष्य येथे करतो तेच पाप-पुण्य त्याचे असते. ते पापपुण्यच तो आपल्या समवेत घेऊन जातो. साथ न सोडणाऱ्या छायेप्रमाणे ती [पापपुण्ये] त्याच्या मागोमाग जात असतात._*

*_तस्मा करेय्य कल्याणं, निचयं सम्परायिकं ।_*

*_पुञ्ञानि परलोकस्मिं, पतिट्ठा होन्ति पाणिनं ति ॥_*

           *_यासाठी आपला परलोकवास स्वस्थ सुखी होण्यासाठी कल्याणकारी कर्मेच करावीत. मंगल कर्मेच करावीत. परलोकात पुण्यकर्माचाच प्राण्याला मोठा आधार असतो._*

          _सत्कर्माने इहलोकीचे जीवन सुखमय तर होतेच पण परलोकीही ते सुखावह होत असते. दुराचरणाने या इहलोकीचे जीवन दुःखमय होते तसेच ते परलोकीही दुःखदायक होते. स्वतःवर खऱ्या अर्थाने प्रेम करणाऱ्या व्यक्तीने, आपलं कल्याण साधू इच्छिणाऱ्यांनी दुष्कर्मापासून दूर राहिले पाहिजे. सत्कर्मरत राहिले पाहिजे. सदाचरणाची कास धरली पाहिजे. हा लोक आणि परलोक दोन्ही सुधारण्याचा हा मार्ग आहे. त्यात खरा स्वार्थ साधला जातो. प्रबुद्ध स्वार्थ यातच समाविष्ट झाला आहे._

        _यासाठी साधकांनो, या अर्थाने स्वार्थी बना, खरा खुरा स्वार्थ साधा. अंधस्वार्थी होऊन अनर्थ करू नका. प्रबुद्ध स्वार्थी बनून आपला योग्य स्वार्थ साधा मंगल साधा. आपले कल्याण करून घ्या._

*_!! धन्य होवो ! मंगल होवो ! कल्याण होवो !!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०४/०८/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/08/blog-post_3.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

नवसुत्तं

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 "नवसुत्तं" https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_20.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 _...