खन्ति = क्षांति = धैर्यशील = क्षमाशील
एका झेन विहारात अतिशय कडक नियम होता. नवीन भिक्खुंनी पहिल्या वर्षी अरिय मौन पाळायचे, म्हणजे एकदम मौन! दुसऱ्या वर्षांपासून, तो प्रत्येक वर्षी फक्त दोन शब्द बोलू शकत असे आणि तेही आचार्यांनी विचारल्यावर!
एका नवीन भिक्खूचे पाहिले वर्ष झाल्यानंतर आचार्यांनी त्याला बोलावले आणि दोन शब्द बोलायला सांगितले.
भिक्खू म्हणाला, "बिछाना त्रासदायक"
आचार्यांनी मान डोलावली.
दुसरे वर्ष झाल्यानंतर, आचार्यांनी त्याला बोलावले आणि पुन्हा दोन शब्द बोलायला सांगितले.
भिक्खू म्हणाला, "जेवण बेचव"
आचार्यांनी मान डोलावली.
तिसऱ्या वर्षी आचार्यांनी त्याला बोलायला सांगितले.
भिक्खू म्हणाला, "मी सोडतोय"
आचार्य म्हणाले, "मला माहितेय तू असंच म्हणणार...नाहीतरी तीन वर्षांपासून नुसतीच तक्रार करतोयस"
महामङल सुत्त मध्ये बुद्ध म्हणतात -
खन्ति च सोव च साकच्छा, समणानं च दस्सनं|
कालेन धम्मसाकच्छा, एतं मंग्ङलमुत्तमं||
म्हणजे धैर्यशील असणे, क्षमाशील असणे, आचार्यांचे ऐकणे, भिक्खुंशी (किंवा ज्ञानियांशी) धम्मचर्चा करणे हे उत्तम लक्षण होय
बौद्ध धम्मामध्ये संयम (सारासार विचार केल्याशिवाय पाऊल न उचलणे), धैर्य (संकटे आली तर घाबरून न जाता), सहवेदना (इतरांची बाजू व परिस्थिती समजून घेणे) आणि क्षमा (कोणी केलेली चूक लक्षात न ठेवता त्या व्यक्तीला क्षमा करणे) यांना अतिशय महत्त्व आहे.
एस धम्मो सनन्तनो...
No comments:
Post a Comment