*_अश्वघोष_*
प्रवचन देण्याची पध्दती तथागत बुद्धांनी शिकवली व विकसीत केली. पण प्रवचन देण्याच्या प्रकारामध्ये केलेले बदल भिक्खूंच्या नाविण्यपूर्ण प्रयोग करण्याच्या क्षमतेची ग्वाही देतात.
'धर्माचे शिक्षण देण्यासाठी नाटकाचा उपयोग बौद्धांनी प्रथम केला. भारतातील सर्वात पहिले नाटक हे बौद्ध विषयाशी संबंधित आहे.'
*_भारतातील प्रथम नाटककार म्हणून "अश्वघोष" विश्वविख्यात आहेत._*
*_'अश्वघोष, आर्यदेव, नागार्जुन आणि कुमारलब्ध या चार सूर्यांनी जगाला प्रकाशित केले आहे.' अशा शब्दात चिनी प्रवासी हयू-एन-त्सँगने अश्वघोषांबद्दल आपला आदर प्रकट केला आहे. चीनच्या महायानी आचार्य परंपरेप्रमाणे अश्वघोषांचा बारावे आचार्य म्हणून उल्लेख केला जातो. महायानी प्रथेप्रमाणे त्या सर्वांचा 'बोधिसत्व' असा आदरार्थी केला जातो._*
अश्वघोषांच्याबद्दल एका तिबेटी ग्रंथात लिहिले आहे,
_'असा कोणताच प्रश्न नव्हता, की ज्याचे ते योग्य उत्तर देऊ शकत नसत... झंझावती वारा ज्याप्रमाणे सुकलेल्या वृक्षांना मुळापासून सहजगत्या उखडून टाकतो, त्याचप्रमाणे ते आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा वादविवादात सहजगत्या पराभव करीत असत.'_
अश्वघोषांचा जन्म साकेत येथे, म्हणजेच हल्लीच्या अयोध्या येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सुवर्णाक्षी असे होते. विद्याभ्यासात त्यांनी लहानपणीच इतकी प्रगती केली होती की, त्याकाळी ज्ञात असलेल्या सर्व शास्त्रांचे ज्ञान त्यांना अवगत झाले होते.
ते एक कुशल संगीतकार होते. आपल्या संगीत मंडळात स्त्री आणि पुरुष कलाकारांना बरोबर घेऊन, स्वतःनिर्माण केलेले संगीत ते गावोगावी म्हणून दाखवीत असत.
_अश्वघोष सम्राट कनिष्काच्या समकालीन होते, इसवी सनापूर्वी ५० सालापासून इसवी सन १०० पर्यंतच्या मधल्या काळात ते होऊन गेले असावेत. *सम्राट कनिष्काच्या काळात काश्मीरमध्ये जी चौथी धम्मसंगीती भरली होती, तिचा उपसभापती होण्याचा मान अश्वघोषांनाच मिळाला होता. तेथे त्रिपिटकांवर जी सुत्तविभाषा, विनयविभाषा आणि अभिधम्म विभाषा अशी भाष्य लिहिली गेली, त्या कार्यांत अश्वघोषांचा सिंहाचा वाटा होता.*_
_"बुद्धचरित" हे महाकाव्य लिहिणारा महाकवी म्हणून अश्वघोष विश्वविख्यात आहेत. त्याशिवाय त्यांनी अनेक काव्य व नाटके लिहिली आहेत._
_*'बुद्धचरित' हे महाकाव्य अत्यंत प्रासादिक भाषेत, पण त्याचबरोबर अत्यंत संयम राखून लिहिले गेले आहे. गौतम बुद्धांच्या जीवनावर लिहिलेले ललितविस्तार हे काव्य बुद्धचरिताच्या किती तरी अगोदर लिहिले गेले होते. पण त्यात अनेक ठिकाणी कविकल्पनेच्या भराऱ्या असल्यामुळे ते बुद्धांच्या चरित्र वास्तवतेला धरुन आहे असे वाटत नाही. उलटपक्षी बुद्धचरितातील गौतम बुद्धांचे जीवनचरित्र त्रिपिटकातील बुद्धांच्या जीवन चरित्राशी मिळतेजुळते आहे. या महाकाव्याच्या चिनी आणि तिबेटियन भाषेत भाषांतरात प्रत्येक २८ अध्याय आहेत. सुप्रसिद्ध चिनी प्रवासी इत्सिंग हा सातव्या शतकात चीनच्या पूर्व किनाऱ्यावरुन जावा सुमात्रामार्गे भारतात आला. तो म्हणतो की, जम्बुद्वीपाच्या पाचही भागात आणि दक्षिण समुद्रातील सर्व देशात बुद्धचरितांचे सर्वत्र वाचन आणि गायन होत असते.*_
एक महाकवी म्हणून आणि सोप्या भाषेत धम्म समजावून सांगणारे प्रभावी धम्म प्रचारक म्हणून अश्वघोषांची किर्ती सर्वत्र पसरली होती. त्यांच्या काव्याचे अनुकरण भारतात इतर बौद्ध आणि अबौद्ध कवींनी सर्रासपणे केले आहे. मुळ संस्कृत भाषेत सापडलेल्या त्यांच्या १७ अध्यायांपैकी फक्त १३ अध्याय अस्सल आहेत असे मानले जाते. पण्डित हरप्रसाद शास्त्रींनी नेपाळ दरबाराच्या ग्रंथ भाण्डारातून तेरा पूर्ण आणि चौदावा अर्धा अध्याय शोधून काढला होता.
_*"सारिपुत्र प्रकरण" हे अश्वघोषांचे नऊ अंकी नाटक आहे. मध्य आशियातील तुर्फान येथे या नाटकाच्या मुळ प्रतिंची काही पाने सापडली आहेत. संपूर्ण लिहिलेले नाटक अजुनही सापडले नाही, पण त्याचे चिनी भाषेतील भाषांतर अस्तित्वात आहे. श्री. हडसन यांना १८२९ साली नेपाळमध्ये अनेक बौद्ध ग्रंथ सापडले. त्यात अश्वघोषांचे 'वज्रसूची' हा एक ग्रंथ होता. श्री. हडसन याने त्या ग्रंथाचे इंग्रजीत भाषान्तर करुन Vajrasuchi or Diamond Needle अशा नावाखाली ते १८३१ साली छापले. राॕयल एशियाटिक सोसायटीने ते Disputation respecting caste या नावाखाली पुनर्मुद्रित केले. त्या काळी अश्वघोषांच्याबद्दल भारतात फारशी माहिती नव्हती. नेपाळमधील काही लोकांना 'अश्वघोष हा एक महापण्डित होता. त्याने बुद्धचरित काव्य आणि नन्दीमुखसुघोष, अवदान आणि इतर काव्ये लिहिले' एवढीच माहिती होती.*_
अश्वघोष हे कालिदास, भारवि, माघ, भर्तृहरी, दण्डिन्, भास इत्यादी कवींच्या अगोदर झालेले महाकवि आहेत. अश्वघोषांच्या नाटकात जे तंत्र त्यांनी वापरले आहे, तेच तंत्र कालिदास, भास, भारवि वगैरे कविंनी वापरलेले आहे.
अश्वघोष फक्त कवी नव्हते, तर ते एक अगाध बुद्धीचे तत्त्ववेते होते. बुद्धचरित, सौन्दरानन्द आणि महायान श्रद्धोत्पद शास्त्रात त्यांनी सांगितलेल्या धम्मतत्त्वांवरुन त्यांच्या अगाध बुद्धिमत्तेचे दर्शन घडते. त्यांच्या मृत्युनंतर सहाशे वर्षांनी सुद्धा त्यांचे ग्रंथ सर्व भारतात आणि दक्षिण समुद्रातील देशात नियमितपणे वाचले जात असत, अशी ग्वाही इ-त्सिंगने दिली आहे. चिनी, तिबेटी आणि जपानी भाषेत त्यांच्या ग्रंथांची भाषान्तरे झाली आहेत. मध्य आशियातील तुर्फान, खोतान आणि इतर ठिकाणी त्यांच्या संस्कृत भाषेतील ग्रंथांच्या प्रती मिळाल्या आहेत.
_निर्वाणासारखा गहन विषयही लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत अश्वघोष कशा प्रकारे सांगत असत हे या गाथांवरुन लक्षात येईल.._
दीपो यथा निर्वृतिमभ्युपेतो नवाननिं गच्छति नान्तरिक्षम् !
दिशं न कांचिद् विदिशं न कांचित् स्नेचक्षत्केवलमेति शांतिम् !!
एवं कृती निर्वृतिमभ्यपेतो नवावनिं गच्छति नांतिरिक्षम् !!
दिशं न कांचिद् विदिशं न कांचित्क्लेशक्षयात् केवल मे नि शांतिम् !!
संदर्भः बुद्धधम्माचे संदेशवाहक.
No comments:
Post a Comment