Friday, 17 December 2021

महाबोधी महाविहार - बुद्धगया


 *_महाबोधी महाविहार - बुद्धगया_* 

महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास - भाग १

             _महाबोधी विहार हे बिहार राज्यातील बोधगया (बुद्ध गया) मधील एक महा बौद्ध विहार आहे. यास जागतिक वारसा स्थान म्हणून मान्यता मिळालेली आहे. बुद्धगया (बोधगया) हे जगभरातील बौद्ध अथवा बुद्ध विचार मानणाऱ्यांसाठी एक अतिशय पवित्र श्रद्धा स्थळ आहे. याच ठिकाणी राजपुत्र सिद्दार्थाला अतिशय खडतर प्रयत्नांती ज्ञानप्राप्ती होऊन बुद्धत्त्व प्राप्त झाले होते. जगातील अंतिम सत्य हे चार आर्य सत्य असून आर्य अष्टांगिक मार्गाने मनुष्य निब्बाणा पर्यंत पोहचू शकतो हे त्यांनी प्रतिपादले. बोधगया ही बिहार राज्यातल्या पाटना शहरापासून ९६ कि.मी. अंतरावर आहे. महाबोधी विहाराच्या पुढे, पश्चिम दिशेला पवित्र असा बोधीवृक्ष आहे. पाली भाषेत या ठिकाणाला ‘बोधीमांद’ असे म्हणतात आणि तीथे असलेल्या मठाला ‘बोधीमांद–विहार’ असे म्हणतात. इथल्या सर्वात उंच गोपुराची उंची ५५ मीटर म्हणजे १८० फूट आहे._

         _बुद्धांच्या काळी बुद्धगयेचे नाव "उरुवेला" होते व ते नेरंजना नदी किनारी वसले होते. आता या नदीचे नाव फाल्गु झाले आहे. साधारणतः इ. स. पूर्व २५० मध्ये सम्राट अशोकाने आपल्या राज्याभिषेकाच्या ११व्या वर्षी येथे येऊन येथील "बोधीवृक्षाला" वंदन केले होते. या जागेचे पावित्र्य ओळखून अशोकाने येथे १,००,००० सोन्याच्या मोहरा दान देऊन विहार बांधण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर येथील बोधीवृक्षाचे योग्य जतन व्हावे यासाठी त्याच्या भोवती १० फूट उंच भिंत देखील बांधली. भ.बुद्धांना ज्याठिकाणी ध्यान करून बुद्धत्त्व प्राप्त झाले त्या ठिकाणी शिल्पाकृतीने सजवलेले एक चकाकते वज्रासन बनवले. मुख्य विहाराच्या जवळ, पूर्वेकडे भ. बुद्धांनी 'चंक्रमण' केलेल्या ठिकाणी सम्राट अशोकाने २२ कोरीव दगड ठेवले व प्रत्येकावर ब्राह्मि लिपि मध्ये अ ते ट हा अक्षरे कोरून ठेवली. अशोकाने केलेल्या या सर्व कामाचा उल्लेख त्याच्या ८व्या शिलालेख, सांची स्तूप क्र.१ च्या तोरणावर आणि भारहूत स्तूपाच्या पट्टीवर पाहायला मिळतात. सम्राट अशोकांना या महाबोधी विहाराचा संस्थापक समजले जाते. आता जे मंदिर उभे आहे, ते मात्र ५ व्या - ६ व्या शतकात बांधलेले असावे. गुप्त घराण्याच्या राजवटीच्या उत्तरार्धात आणि पूर्णपणे विटांनी बांधलेले हे विहार, अगदी सुरूवातीला बांधलेल्या बौद्ध धर्मीयांच्या विहारांपैकी एक आहे._

_*गोऱ्या कातडीच्या हूण वंशातील लोकांनी आणि मोहम्मद बिन कासिमसारख्या इस्लाम धर्मांच्या राज्यकर्त्यांनी घातलेल्या धाडींमुळे आणि केलेल्या हल्ल्यांमुळे बौद्ध धर्माला आश्रय देणाऱ्या राजघराण्यांना जेव्हा उतरती कळा लागू लागली तेव्हा बौद्ध धर्माचाही ऱ्हास होऊ लागला; पण नंतर महाबोधी विहार असलेल्या भारतीय उपखंडाच्या ईशान्य भागात पाल साम्राज्यात बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवन झाले. ८ व्या ते १२ व्या शतकापर्यंत या पाल राजघराण्याच्या आश्रयाने, बौद्ध धर्माच्या ‘महायान’ पंथाची भरभराट झाली.*_

_पण पुढे ‘हिंदू सेना’ नावाच्या राजघराण्याने जेव्हा पाल सम्राटाचा पराभव केला, त्यानंतर परत बौद्ध धर्माचे महत्त्व कमी कमी होत गेले आणि हिमालयीन प्रदेश वगळता संपूर्ण भारतातून बौद्ध धर्म जवळजवळ लोपच पावला. बाराव्या शतकात बोधगया आणि त्यांच्या आसपासच्या प्रदेशावर मुस्लिम सैन्यांनी आक्रमण केले. या सगळ्या धुमश्चक्रीच्या काळात महाबोधी विहाराची दुरवस्था झाली आणि ते खूपच दुर्लक्षिले गेले. *१८६३ मध्ये सर अलेक्सझांडर कनिंघम यांनी मेजर मिड यांना बुद्धगया येथे उत्खनन करण्यास सांगितले. नंतर १८८० मध्ये, बंगालचे लेफ्ट.गव्हर्नर सर ऍशली इडन यांनी बेग्लर यांना महाबोधी महाविहाराचे संवर्धन करण्यास सांगितले.* उत्खननामध्ये अनेक प्राचीन शिल्प, नाणी, स्तंभ, शिलालेख सापडले जे महाबोधी महाविहाराच्या इतिहासावर प्रकाश टाकू शकले. *१८८० च्या दशकात, भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सरकारने सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या मार्गर्शनाखाली महाबोधी विहाराचा जीर्णोद्धार करण्यास सुरूवात केली. यानंतर काही दिवसांनी इ.स. १८९१ मध्ये श्रीलंकेतील बौद्ध नेते अनागरिक धर्मपाल यांनी या विहाराचा ताबा हिंदूंकडून बौद्धांकडे परत द्यावा या मागणीसाठी एक मोहिम सुरू केली. हिंदू महंतांनी यावर आपेक्ष घेतला पण मोहिम सुरूच ठेवली गेली. इ.स. १९४९ साली या मोहिमेला काही प्रमाणात यश आले; कारण तेव्हा विहाराचा ताबा हिंदू महंतांकडून काढून घेऊन बिहार सरकारकडे देण्यात आला आणि या सरकारने ‘मंदिर व्यवस्थापन समिती’ स्थापन केली. या समीतीत ९ सदस्य होते आणि अध्यक्षासह जास्त सभासद हिंदू होते. म्हणजेच या विहाराचा ताबा हिंदूंकडेच होता. या व्यवस्थापन समीतीने नेमलेले महाबोधीचे पहिले प्रमुख भिक्खू होते अनागरिक मुनिंद्र हे बंगाली गृहस्त, जे बऱ्याच दिवसांपासून महाबोधी मंडळाचे एक कार्यक्षम सदस्य होते.*_

*_अनागरिक धर्मपालानंतर जपानी वंशाचे भारतीय भिक्खू भदंत आर्य नागार्जून सुरई ससाई यांनी महाबोधी विहाराचा ताबा हिंदूंकडून बौद्धांकडे यावा यासाठी व्यापक आंदोलने व संघर्ष केला._*

_*सिंहली भिक्खू बोधिरक्षित यांच्या शिलालेखांवरून कळते कि या महाविहाराला सर्वात प्राचीन भेट सिंहली भिक्खू चुल्ल तिस्स यांनी इ.स.पूर्व १०० मध्ये दिली होती. वज्रासनाच्या पायथ्याशी सापडलेली सोन्याची व चांदीच्या नाण्यांवरून लक्षात येते कि इ.स.१४० मध्ये कनिष्काचा मुलगा राजा हुविष्का याने या महाविहाराचा जिर्णोद्धार केला. वज्रासनाच्या व भ.बुद्धांच्या मूर्तीच्या पायाशी इंडो स्किथियन शिलालेख याची खात्री देते. इ.स. ३९९ - ४०९ दरम्यान फा हियान या चिनी बौद्ध भिक्खूने महाविहाराला दोनदा भेट दिल्याचा उल्लेख आहे. यात त्याने महाविहाराच्या परिसराचे तपशीलवार वर्णन केले आहे. इ.स. ४थ्या शतकाच्या पूर्वार्धात, श्रीलंकेचा राजा मेघवन याचा भाऊ बुद्धगयेला आला असता, त्याला राहण्यासाठी ठिकाण सापडले नाही. आपल्या भावाला सांगितल्यावर, मेघवन ने बुद्धगया येथे मुख्य महाविहाराच्या पूर्वेला एक महाबोधी विहार बांधले जेथे सर्वांना प्रवेश होता. या विहाराच्या दारावर एक पितळी धातूपट्टी होती ज्यावर लिहिले होते, "प्रत्येकाला, कोणत्याही अटींशिवाय मदत करणे हे बुद्धांचे सर्वश्रेष्ठ विचार होय". कालांतराने हे विहार एक महत्त्वाचे बौद्ध विद्यापीठ झाले ज्याचा शैक्षणिक स्तर नालंदा किंवा विक्रमशिला सारखा होता. हुयान त्सांग ने याचे वर्णन करताना म्हटले आहे कि यात सहा मोठी विहारे, तीन मजली टेहळणी बुरुज व संपूर्ण विहाराला सुरक्षेसाठी चाळीस फूट उंच भिंत होती. आतमध्ये भ.बुद्धांची सोनं व चांदीची मूर्ती होती व ती रत्नजडित होती. त्याकाळी तेथे जवळपास १००० भिक्खूंचे वास्तव्य होते. याच विहारात जगप्रसिद्ध बौद्ध आचार्य बुद्धघोष यांनी श्रीलंकेला जाण्यापूर्वी "अठ्ठसालिनि" व "ज्ञानोदय" (जो आता नष्ट झालाय) लिहिला. चिं हुन, हुआन चाऊ, धर्मपाला (माध्यमकाचतुःसटिका चे लेखक) आणि रत्नवज्रा हे काही प्रसिद्ध भिक्खू याच विहारात होऊन गेले. येथे उत्खनन करताना, कनिंघम यांना या विहाराचा परिसर २००० फूट लांब व १००० फूट रुंद दिसला व त्याची भिंत ९ फूट जाड होती. हे महाबोधी विहार १३व्या शतकापर्यंत सुरु होते, नंतर ते लयाला गेले. आजही त्याचे उरले सुरले अवशेष पाहायला मिळतात.*_

_महाबोधी विहार विटा वापरून बांधलेले आहे आणि भारतातल्या अजूनही तग धरून असलेल्या विटांच्या सर्वात जून्या बांधकामांपैकी हे एक बांधकाम आहे. भारतीय वीटकामाचा हा एक सुरेख नमुना मानला जातो आणि नंतरच्या काळात शिल्पशास्त्राच्या परंपरेत जे काही बदल झाले किंवा प्रगती झाली, त्यावर या शैलीचा खूपच प्रभाव पडलेला दिसतो. *युनेक्सोच्या म्हणण्यानुसार, “हे आताचे बौद्ध विहार म्हणजे, गुप्त साम्राज्यच्या राजवटीदरम्यान पूर्णपणे विटांचा उपयोग करून बांधलेले अगदी सुरूवातीच्या विहारांपैकी एक असलेले भव्य आणि मनोवेधक असे बांधकाम आहे.”*_

_महाबोधी विहारावर मध्यभागी असणारा मनोरा किंवा गोपुर बरेच उंच असून ही उंची ५५ मीटर (१८० फूट) आहे. १९ व्या शतकात त्याचे मोठ्या प्रमाणात नूतनीकरण करण्यात आले. या मध्यवर्ती गोपुराभोवती त्याच शैलीत बांधलेली आणखी चार लहान गोपुरे आहेत._

_महाबोधी विहाराच्या चारही बाजूंना जवळपास २ मीटर उंचीचे दगडी कुंपन आहे. या कुंपनासाठी तयार केलेल्या कठड्यांमध्येही दोन अगदी वेगवेगळे प्रकार आहेत; म्हणजे ते तयार करण्याच्या शैलीतही फरक आहे आणि त्यात वापरलेले साहित्यही दोन वेगळ्या प्रकारचे आहे. त्यातही काही करडे इ.स.पू . १५० च्या दरम्यान वाळूच्या दगडांचा वापर करून बांधलेले आहेत आणि इतर करडे पॉलिश न केलेल्या खडबडीत ग्रॅनाईटपासून बनवलेले आहेत आणि ते गुप्तकाळातील (इ.स.पू. ३ रे शतक) असावेत असे समजले जाते._

महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास - भाग २

_*इ.स ६०० च्या दरम्यान राजा शशांकने बोधिवृक्ष व महाविहारातील बुद्ध प्रतिमा तोडण्याचा आदेश दिला. त्याने बंगाल प्रांतातील अनेक बुद्धविहार आणि स्तूप तोडून टाकले होते. अतिशय शिताफीने कामरूपचा राजा भास्करवर्मन ने बुद्ध प्रतिमा आणि बोधिवृक्ष त्याच्या विश्वासू मंत्र्यांमार्फत वाचविले व साधारणतः इ.स. ६२० मध्ये बोधीवृक्षाभोवती २४ फूट उंचीची भिंत बांधली.*_

_*इ.स. ६३७ मध्ये हुयान त्सांग ने महाबोधी महाविहाराला भेट दिली. त्याच्या लेखात आलेला प्रवेशद्वार व भव्य मंडप हा त्याकाळी ब्रह्मदेशाचा राजा साडो याने बांधला होता. हुयान त्सांगच्या भेटीच्या आधी येथील फाल्गु (नेरंजना) नदीला पूर आला होता व त्याचे पाणी व वाळू संपूर्ण महाविहार परिसरात पसरली होती. महाविहारात अक्षरशः अडीच फूट उंच वाळू साचली होती व त्यात वज्रासन देखील दाबले गेले होते. हुयान त्सांग ने वर्णन केल्याप्रमाणे महाबोधी महाविहार १७० फूट उंच होते व संपूर्ण बांधकाम प्लास्टर केलेल्या लाल रंगाच्या निळसर छटा असलेल्या विटांनी बनविले होते. महाविहाराच्या भिंतींवर अनेक ठिकाणी कोनाडे केले होते व त्यात सोन्याचा मुलामा असलेली बुद्धमूर्ती ठेवल्या होत्या. महाविहाराच्या पूर्वेला की तीन मजली मंडप होता व त्याच्या आतील भिंतीवर सोन्याचांदीने सजवलेली कलाकुसर होती. महाविहाराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अवलोकितेश्वर आणि मैत्रयाच्या १० फूट उंच मूर्ती होत्या. बोधीवृक्षाच्या भोवती उंच भिंत होती.*_

_बुद्धांच्या बुद्धगये येथील ७ आठवड्यांच्या वास्तव्यात त्यांनी प्रत्येक ठिकाणी ध्यानमग्नतेत व्यतीत केलेल्या साठी ठिकाणी सम्राट अशोकाने सुंदर कोरीव स्मृतिस्थळ बांधल्या होत्या. या व्यतिरिक्त अशोकाने अनेक ठिकाणी स्तूप बांधली ज्यात सुजाताने बुद्धांना ज्याठिकाणी खीर दिली, कश्यप बंधूंनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली व मातीपोसक जातकाचे ठिकाण सामील होते._

_*हे सर्व स्तूप १८व्या शतकापर्यंत अस्तित्वात होती. नंतर महंतांच्या अलिखित सूचनेनुसार (हे सविस्तर नंतर येणार आहे), तेथील गावकऱ्यांनी हे स्तूप पोखरून तेथील विटा काढून आपली घरे बांधण्यास सुरुवात केली. कनिंघम ला नंतर उत्खनन करताना लाखेच्या अनेक मूर्ती सापडल्या.*_

_महाबोधी महाविहाराचे संवर्धनाचे काम अनेक राजांनी आणि असंख्य अनामिक दानदात्यांनी केले. त्याकाळी महाविहार भोवती जे नक्षीदार कुंपण अशोकाने बांधले होते त्यावर अनेकांनी शिलालेख कोरून ठेवले. एका शिलालेखात एका दानदात्याने २५० दिनार (गुप्तकालीन सोन्याचे नाणे) दान दिले. त्याचबरोबर महाविहार रोज दीप पूजनाच्या तुपासाठी ३०० गाय महाविहाराला दान दिल्याचे दिसते._

_७व्या शतकाच्या सुमारास इ त्सिंग ने महाबोधी महाविहास भेट दिल्याचे कळते. त्याने वर्णन केल्याप्रमाणे अनेक व्यापारी आणि राजांनी महाबोधी महाविहाराच्या स्वरंक्षण आणि संवर्धनासाठी अनेक गावे दान दिला होती._

महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास - भाग ३

_१० व्या शतकाच्या पूर्वार्धापासून महाबोधी महाविहाराला श्रीलंका, चीन आणि तिबेट वरून अनेक बौद्ध भिक्खू भेट देण्यासाठी येऊ लागले. इ.स ९६४ मध्ये ३०० पेक्षा जास्त भिक्खू चीन मधून महाबोधी महाविहारास भेट देण्यासाठी आले होते. चीन सम्राट ताई त्सुन्ग (इ.स. ९७६-९९७) ने बोधीवृक्षा खाली स्तूप बांधण्यासाठी दान दिले होते._

_महाबोधी महाविहाराच्या उत्तरेकडील सज्जाकडे जाणाऱ्या जिण्याकडच्या वरच्या बाजूस भ.बुद्धांची एक भव्य मूर्ती कोरण्यात आली आहे. तिच्या दोन्ही बाजूला अवलोकितेश्वर आणि मैत्रेयच्या मूर्ती आहेत. तेथील शिलालेख वरून कळते कि हि मूर्ती भिक्खू वीरेंद्र ने १०व्या शतकात दान दिली होती._

_इ.स. १०३५ ते १०७९ दरम्यान, ब्रह्मदेशाच्या राजाने महाबोधी महाविहाराच्या दुरुस्तीसाठी प्रचंड दान दिले होते._

_चिनी भाषेतील सर्वात प्राचीन शिलालेख येथील एका दगडावर सापडला ज्यावर भ.बुद्धांच्या सात मूर्ती कोरल्या आहेत. सध्या हा दगड इंडियन म्युझियम, कोलकत्ता येथे पाहायला मिळतो._

_इ.स. १०११ मध्ये दीपंकर श्रीजना (ज्यांना प्रामुख्याने अतिसा या नावाने ओळखले जाते) यांची दीक्षा येथेच झाली. येथील महाविहारात २ वर्षे राहून त्यांनी बौद्ध आचार्य सिलरक्षिता यांच्याकडून विनय शिकून घेतला._

_११ व्या शतकाच्या पूर्वार्धात महाबोधी महाविहाराला पुन्हा डागडुजीची गरज भासली. त्यावेळेस ब्रह्मदेशाचे राजे किंझिट्ठा (इ.स १०८४-१११३) यांनी जहाज भरून सोने, चांदी, मौल्यवान जडजवाहीर बुद्धगयेत पाठवून दिले. ११व्या शतकातील एका शिलालेखाद्वारा ही माहिती मिळते._

_इ.स. १२३० मध्ये, शिवलिकचा राजा अशोकवल्ला याने त्याचे गुरु पंडित मुशाला आणि चट्टोपादि यांच्या सांगण्या वरून येथे एक विहार बांधले. त्याच दरम्यान कामराज चा राजा पुरुषोत्तमसिंह याने आपल्या नातवाच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक विहार बुद्धगयेत बांधले. बांधकामाच्या देखरेखीसाठी राजाने भिक्खू धर्मरक्षित यांची नेमणूक केली होती. सर कनिंघम यांना सापडलेल्या एका शिलालेखात ही माहिती मिळते._

_*एक सर्वसाधारण समजूत अशी आहे कि इ.स. ११९९ मध्ये बुद्धगयेचे महाबोधी महाविहार व आजूबाजू ची विहारे आणि संघरामे हे मुस्लिम आक्रमणामुळे नष्ट झाले, मात्र असा कुठेही ठोस पुरावा सापडत नाही. उलट इ.स. १२३४ मध्ये तिबेटी भिक्खू धर्मस्वामीन बुद्धगयेच्या भेटीवर आले असता त्यांना येथील महाबोधी विहार (संघाराम)मध्ये ३०० सिंहली भिक्खू अध्ययन करताना दिसले. त्याकाळातील मुस्लिम आक्रमणामुळे महाबोधी महाविहाराला थोड्या प्रमाणात तोडफोड आणि चोरी यांना तोंड द्यावे लागले मात्र यामुळे भिक्खुंच्या अभ्यासात कुठे बाधा निर्माण झाली नाही.*_

_इ.स.१२६२ मधील एका शिलालेखानुसार श्रीलंकेचा राजा जयसेन आणि त्याचे वडील बुद्धसेना यांनी महाबोधी महाविहाराच्या दुरुस्तीसाठी दान दिल्याचे कळते, तर इ.स. १२९८ मध्ये ब्रह्मदेशाचा राजा धर्मसेन आणि १४७१ मध्ये राजा धम्मचेतिया यांनी महाबोधी महाविहाराच्या दुरुस्तीसाठी दान दिले._

_शिलालेखानुसार १६व्या शतकात येथील महाबोधी महाविहाराला बुद्धगुप्त या भिक्खूने भेट दिली. भेट देणारे ते शेवटचे भारतीय भिक्खू होते. त्याच दरम्यान सिंहली भिक्खू धर्मादिवाकर यांनी देखील महाबोधी महाविहाराला भेट दिली._

 महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास - भाग ४

_बुद्धगयेतील महाबोधी महाविहाराला भेट देणे जगातील बौद्ध राष्ट्रातील सर्वच लोकांना जमणारे नव्हते. साधनांची कमतरता, प्रतिकूल प्रवास आणि त्याच बरोबर भारतातील मुस्लिम राज्य व त्यामुळे उद्भवलेली युद्धयजन्य परिस्थिती यामुळे बुद्धगया येथील लोकांचा ओढा कमी झाला. यावर मात करण्यासाठी अनेक बौद्ध देशातील राजांनी बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराची मोजमाप घेऊन आपल्या राज्यात महाबोधी महाविहाराची प्रतिकृती करण्यास सुरुवात केली._

_ब्रह्मदेशाचे राजे किंझिट्ठा यांनी काही खास कारागार बुद्धगयेला पाठून महाबोधी महाविहाराचे आराखडे तयार केले व पगान या ठिकाणी महाबोधिची प्रतिकृती तयार केली._

_इ.स. १४५२ मध्ये तिबेट मध्ये महाविहाराच्या आकाराचे स्तूप बनविण्यात आले व त्यात लामांच्या अस्थी ठेवण्यात आल्या._

_इ.स. १४७२ मध्ये पेगू चा राजा धम्मचेतियाने कारागीर पाठवून महाबोधिच्या संपूर्ण रचनेचा आराखडा तयार केला व अतिशय सुंदर आणि भव्य असे महाविहार (स्थानिक भाषेत शेवगुगयी) बांधले._

_इ.स. १४४८ मध्ये थायलंडचे राजे तिलोकराजा याने महाबोधी महाविहाराच्या धर्तीवर महाबोधरामा, वाट-जेट-यॉट नावाचे महाविहार बांधले. त्यांनी खास श्रीलंके वरून बोधीवृक्षाच्या झाडाचे रोपटे आणून बांधलेल्या महाविहाराच्या बाजूला लावले. एवढेच नव्हे तर बुद्धगयेतील महाबोधी महाविहाराच्या संपूर्ण परिसराची (भ. बुद्धांचे सात महत्त्वाच्या ठिकाणांसहित) मूळ आकाराची प्रतिकृती बनवली. पुढे १६व्या ते १८व्या शतकाच्या दरम्यान चियांग राई या भागात महाबोधी महाविहाराच्या आकाराचे विहार बनविण्यात आले._

_१६व्या शतकात नेपाळ वरून एका उपासकाने बुद्धगयेला येऊन महाबोधी महाविहाराचा नकाशा बनविला आणि नेपाळ मधील पाटण येथे महाविहार साकार केले. १९३४ च्या भूकंपामध्ये ते उध्वस्त झाल्यानंतर तेथे पुन्हा ते उभारण्यात आले._

_१७४८ मध्ये चीन मध्ये पहिल्यांदा महाबोधी महाविहाराच्या आकाराचा विहार - उ ता झू पेकिंग शहराच्या लगत बनविण्यात आला._

_या दरम्यान बदलेल्या परिस्थिती मुळे, बुद्धगयेकडे परदेशी भिक्खू आणि उपासकांचा ओघ कमी झाला. महाबोधी विहार (संघाराम) तर ओस पडले होते व महाबोधी महाविहारात अगदीच थोडे भिक्खू शिल्लक राहिले. कालांतराने तेही निघून गेले._

_*१७व्या शतकाच्या पूर्वार्धात शैव पंथाचा गोसावी घमंड गिरी हा बुद्धगया येथे येऊन राहिला. हळू हळू त्याचा शिष्यवर्ग वाढायला लागला. स्वतःला महंत म्हणून घेणाऱ्या या घमंड गिरीने महाबोधी महाविहाराच्या जवळ व महाबोधी संघरामाच्या परिसरात आपला आश्रम स्थापन केला. महाबोधी महाविहारातील काही बुद्धमूर्ती त्याने आणून आपल्या आश्रमात ठेवल्या आणि देव-देवतांच्या मूर्ती म्हणून पूजा अर्चना सुरु केली.*_

_महाबोधी महाविहाराच्या परिसरातील मूर्तींची दैवतीकरणाला सुरुवात झाली!!!_

महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास - भाग ५

_*महंत आता खूप ताकतवर आणि श्रीमंत होऊ लागला होता. महाबोधी महाविहार हे स्वतःच्या मालकीचे आहे अशा थाटात वागू लागला. देखभाल विना महाबोधी महाविहाराची रया जाऊ लागली. महाविहारातील अनेक बुद्ध आणि बोधिसत्वांच्या प्रतिमेचे पूजन हिंदू देवदेवता म्हणून व्हायला लागले. १७९० मध्ये अनेक ब्रिटिश चित्रकार, प्रवासी, सर्व्हे करणारे, आर्किटेक, पुरातत्त्व शास्त्रज्ञ बुद्धगयेला भेटी देऊ लागले. यामध्ये जगप्रसिद्ध चित्रकार विलियम आणि थॉमस डॅनियल हे होते ज्यांनी महाबोधी महाविहाराचे त्यावेळेसची चित्रे काढून ठेवली आहेत.*_

_*१८११ मध्ये ब्रिटिश सरकारने फ्रान्सिस बुकानान यांना बिहार प्रांत आणि बुद्धगयेच्या सर्व्हे साठी बोलावले. फ्रान्सिस साहेबांनी त्यावेळेसच्या बुद्धगयेचे तपशीलवार वर्णन केले मात्र हुयान त्सांग ने इ.स.६३२ मध्ये वर्णन केल्याप्रमाणे नव्हते. महाबोधी महाविहारातील सोने, चांदी, हिरे, सुंदर कोरीव मूर्ती व वेलबुट्टी, आतील कोरीव लाकूडकाम यापैकी काहीही दिसले नाही. बुकानान यांना महाविहाराचे कोसळले मजले, महंताने व इतर लोकांनी अनेक स्तूपांना खोदून त्यांच्या विटांनी आश्रम आणि घरे बांधल्याचे दिसले. महंताने महाविहाराच्या भोवतालचे कोरीव स्तंभ काढून शेजारीच पांचपांडव नावाचे मंदिर बांधले होते. वज्रासनाशेजारी ठेवलेला दगड ज्यावर बुद्धांचे पदचिन्ह साकारले होते, तो दगड महंतांच्या मंदिरात विष्णुपद म्हणून ठेवल्याचे दिसले.*_

_ब्रिटिश सैन्यातील जेम्स चिचली व जेम्स क्रोकेट यांनी महाविहारचे छायाचित्र काढून ठेवले होते._

_*१८४७ मध्ये कॅप्टन मारखम किटो यांनी सर्वात पहिल्यांदा येथे उत्खनन केले. सम्राट अशोकाने बसवलेल्या काही कुम्पणपट्टी व अनेक शिल्प सापडले. त्यातील अनेक भारतातील विविध संग्रहालयात पाठवून देण्यात आले.*_

_*१८६१ मध्ये सर अलेक्झांडर कनिंघम यांच्या सूचनेनुसार मेजर मीड यांनी उत्खनन केले. मुख्य महाविहारात संपूर्ण डबर साचले होते व पावसाळ्यात सगळीकडे पाणी साचले होते.*_

_*१८७६ साली सर रिचर्ड टेम्पेल यांनी अनेक बुद्धमूर्ती बुद्धगयेच्या परिसरात विखुरलेल्या दिसल्या. १८८६ मध्ये सर एडविन अर्नोल्ड (द लाईट ऑफ एशिया चे लेखक) यांना बुद्धगयेची स्थिती पाहून धक्काच बसला आणि श्रीलंकेत गेल्यानंतर त्यांनी तेथील बौद्धांना हे महाविहार पुनश्य नूतनीकरण करावे असे सुचविले.*_

_*१८९१ मध्ये श्रीलंकेतील एक तरुण बौद्ध नागरिक धम्मपाल व त्याचा मित्र, जपानी बौद्ध भिक्खू कोझेन गुणरत्न हे गया वरून बुद्धगयेला येत असताना त्यांना वाटेत अनेक तोडलेल्या बुद्ध प्रतिमा दिसल्या. बुद्धगयेतील स्थिती तर आणखीन दयनीय झाली होती. धम्मपालांना महाबोधी महाविहारच्या अनेक कोरीव प्रतिमा या गावातील भिंतींवर अथवा विहिरीवर प्लास्टर केलेल्या दिसल्या. काही बुद्धमूर्ती विहिरीतील पाणी काढण्यासाठीच्या दोरीला वजन म्हणून वापरताना दिसल्या. महाविहाराचे अनेक नक्षीदार, कोरीव दगड हे महंतांच्या व त्याच्या शिष्यांच्या घराच्या अंगणात वापरल्या होत्या. महंतांच्या बारादरी मध्ये ३ फूट उंचीची बुद्धमूर्ती जमिनीत अर्धवट गाडलेल्या अवस्थेत होती. धम्मपाल तेथून वज्रासनाला वंदन करून महाविहाराला पुनर्जीवित करण्याचे ठरविले.*_

_त्यानंतर अनेकवेळा धम्मपाल महाविहारात जाऊ लागले. त्यांच्या जपानी मित्राने पाठवलेली एक ७०० वर्षे जुनी असलेली बुद्धमूर्ती तेथे ठेवत असताना, महंतांच्या शिष्यांनी त्यांना विरोध केला. एकाने ती बुद्धमूर्ती काढून खाली फेकली. या मंडळींनी धम्मपालांना हुसकावून लावले. नंतर धम्मपालांना ती बुद्धमूर्ती महंतांच्या पांचपांडव मंदिरात भीतीला लावून ठेवलेली दिसली._

*_त्याच दिवशी नागरिक धम्मपलांनी महंताविरोधात पहिली तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. एका संघर्षाला सुरुवात झाली होती._*

महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास - भाग ६

१८९१ ते १८९३ या काळात अनागरिक धम्मपाल यांनी जवळपास सात वेळा महाबोधी महाविहाराला भेट दिली. याच काळात ते बौद्ध धम्मावरील व्याख्यानासाठी आणि महाबोधी महाविहाराच्या प्रसारासाठी त्यांची जगभ्रमंती देखील चालू होती. त्यांनी अनेक वेळा महंत गिरी यांना विनवणी केली कि महाबोधी परिसर त्यांनी सोडून जावा. ही बौद्धांची जागा असून तेथे शैव पंथाचे काहीच नाही व त्यांनी या जागेवर अतिक्रमण केले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी महंताला जागा सोडून जाण्यासाठी हवी ती किंमत देखील देऊ केली. मात्र महंताने त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले आणि त्यांना सक्त ताकीद दिली कि त्यांनी फक्त महाविहारातील बुद्धमूर्तीची पूजा करावी व इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नये. महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी एखाद्या ट्रस्ट मार्फत प्रयत्न करावे लागतील हे ओळखून अनागरिक धम्मपलांनी कर्नल ऑलकॉट यांच्या बरोबर श्रीलंके मध्ये ३१ मे १८९१ 'द महाबोधी सोसायटी' स्थापन केली. त्याचा मुख्य उद्देश होता बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात येण्यासाठी कायदेशीर मार्गाने लढा देणे.


जेव्हा बंगालचे लेफ्ट.गव्हर्नर जनरल सर ऍशली इडन बुध्दगयाच्या भेटीला आले तेव्हा महंताने त्यांना भेटून महाबोधी महाविहार हे हिंदू मंदिर असल्याचा दावा केला. इडन यांच्या भेटीच्या वेळेस महंताने मुद्दामहून बोधिवृक्ष जवळ त्याच्या आश्रमातील ३०-४० लोकांना पिंडदान करण्यास सांगितले. मात्र ऍशली इडन यांना या महाविहाराची पूर्वीपासूनच कल्पना होती व त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. या साऱ्या घडामोडींवर सर चार्ल्स इलियट यांनी महाबोधी सोसायटीच्या जानेवारी १८९५ च्या अंकात सविस्तर लिहिले आहे.


जेव्हा काही बौद्ध भिक्खू आणि श्रामणेरांनी बोधीवृक्षाखाली संध्याकाळची प्रार्थना म्हणण्यास सुरुवात केली (जी त्यांची नेहमीची प्रथा होती) तेव्हा महंतांच्या लोकांनी त्यांना हुसकावून लावले. जेव्हा हे सगळे बर्मा गेस्ट हाऊस मध्ये परतले, तेव्हा महंतांच्या लोकांनी काही वेळांनी तेथे जाऊन त्यांना लाठ्या काठ्यांनी मारले. अनेक जण रक्तबंबाळ झाले. एका भिक्खुची तर अत्यंत नाजूक परिस्थिती झाली होती व त्याला गया येथील सरकारी दवाखान्यात ऍडमिट करावे लागले. पोलिसांच्या नोंदणी नुसार बर्मा गेस्ट हाऊसच्या लाद्या रक्ताने माखल्या होत्या.


अनागरिक धम्मपलांनी याविषयी जगातील अनेक वर्तमानपत्रात याविषयी लिहिले व संपूर्ण जगाचे लक्ष याकडे नोंदविले. महाबोधी सोसायटी मार्फत त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. मात्र एक दोघांवर कारवाईशिवाय काही विशेष झाले नाही.


तरीदेखील धम्मपलांनी महाबोधी महाविहारात जात राहिले व सकाळ संध्याकाळ तेथे वंदना घेऊ लागले. 

२५ फेब्रुवारी १८९५ ला धम्मपालांवर महंतांची लोके धावून गेली. धम्मपलांना मारहाण करण्यात आली व त्यांना बुद्धगयेतून निघून जाण्यास सांगण्यात आले. चार वर्षे वाट पाहूनही व सामंजस्याने बोलणी करून देखील महंत ऐकत नव्हता, उलट बौद्ध भिक्खुंच्या अंगावर धावून जात होता, हे पाहून धम्मपलांनी गया येथील जिल्हाधिकारी डी. जे. मॅकफेरसन यांच्याकडे कायद्यानुसार केस दाखल केली व त्याचू सुनावणी जिल्हाधिकाऱ्यांनी ८ एप्रिल १८९५ साली सुरुवात केली. त्यावेळी अनागरिक धम्मपाल होते फक्त २९ वर्षांचे.


अनागरिक धम्मपालांनी शपथेवर सांगितले कि एके दिवशी त्यांना दिसले कि महाबोधी महाविहारातील बुद्धमूर्तीला एका भगव्या कपड्यात गुंडाळले होते व कपाळाला लाल रंगाने माखले होते. डोक्यावर फुले ठेवण्यात आली होती. एवढेच नव्हे तर महंताने तेथे एका पुजारीची नेमणूक केली होती आणि तो सकाळ संध्याकाळ बुद्धमूर्ती समोर आरती करत असे. हे सगळे बौद्धधम्माच्या विचाराच्या विरोधात होते. त्यांना त्याचे अतिव दुःख झाले होते. आणि म्हणूनच या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायचे ठरवून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर पेटिशन दाखल केले होते.

महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास - भाग ७

_*अनागरिक धम्मपालांनी टाकलेली कोर्ट केस ८ एप्रिल १८९५ रोजी सुनावणीला आली.* ही केस बरीच चालली व अनेक लोकांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या. काही प्रमुख साक्षीदार आणि त्यांची साक्ष अशी:

_*बिपीन बिहारी बॅनर्जी, महाबोधी महाविहाराचे मुख्य संरक्षक -* या महाविहारात कोणी हिंदू पूजा करत नाही. मीही शक्यतो महाविहारात जात नाही कारण मी हिंदू आहे आणि माझा धर्म मला तसे करण्यास मनाई करतो. मी बुद्धांची मूर्ती खाली ठेवलेली पहिली आहे. नुकतेच सुट्टीवरून आल्यानंतर मी बुद्धांच्या मूर्तीला भगवे कापड गुंडाळलेले पहिले तसेच मूर्तीच्या कपाळावर लाल रंग लावण्यात आला होता व तेथे एक ब्राह्मण पुजारी पूजा करताना दिसला. यापूर्वी कधीही कोणीही ब्राह्मण येथे पूजा करायला येत नसे._

_महातली सुमंगला, सिंहली बौद्ध भिक्खू - धम्मपालांबरोबर त्यादिवशी महाविहारात होतो जेव्हा महंतांच्या लोकांनी बुद्धमूर्ती काढून घेतली. त्यावेळेस आम्ही कुठलाही प्रतिकार केला नाही मात्र ही जपानवरून आलेली मूर्ती असून तिचा सन्मान करणे योग्य आहे असे म्हटले. त्यावेळेस काही लोकं धम्मपालवर धावून गेली._

_*डॉ. हरी दास चॅटर्जी, गया मधील डॉक्टर -* १८७३ मध्ये मी पहिल्यांदा महाबोधी महाविहार पहिले. नंतर त्याची डागडुजी झाल्यानंतर देखील पहिले. मी तेथे केवळ बौद्ध लोकं व भिक्खू येताना पहिले आहेत. ते तेथे मेणबत्ती व धूप जाळतात. तेथे कोणी हिंदू कधीच जात नाही._

_*बाबू दुर्गा शंकर भट्टाचार्य, जमीनदार -* मी बुद्धगया येथील महाबोधी महाविहार अनेकवेळा पहिले आहे. तेथे बुद्धमूर्ती जवळ अनेक बौद्ध कपडे, पैसे दान देताना पहिले आहे. *सध्याच्या महंताने बर्माच्या राजाने महाबोधी महाविहाराला दान दिलेले अनेक सोन्या चांदीच्या वस्तू स्वतःजवळ ठेवल्या आहेत हे मला महंतांच्या एका शिष्यानेच सांगितले व जेथे ठेवल्या ती खोली देखील दाखवली आहे.*_

_*पंडित गंगाधर शास्त्री, मुख्याध्यापक ज़िल्हा शाळा, गया -* महाबोधी महाविहार हे बौद्धांचे स्थान आहे, हिंदूंचे नव्हे. मी हे महाविहार फक्त बाहेरून पहिले आहे कारण माझे धर्मशास्त्र मला तेथे जायला परवानगी देत नाही. तेथे गेलो तर मला प्रायश्चित घ्यावे लागेल._

_*आपल्या १०२ पानांच्या निकालपत्रात डी.जे. मॅकफेरसन यांनी जयपाल गिरी, महेंद्र गिरी, बिमल देव गिरी आणि आणखीन दोघे जणांना IPC च्या कलम २९५, २९६ आणि २९७ अन्वये दोषी धरत प्रत्येकाला १ महिना साधी कारावास व रुपये १०० दंड दिला. हा खटला खूप गाजला. न्यायालयातील साक्षी दरम्यान झालेल्या प्रश्न उत्तरावरून एक अधोरेखित झाले कि बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांचेच असून तेथे हिंदू महंताने अनधिकृत कबजा मिळवला आहे.*_

_महंताने गया कोर्टाच्या विरुद्ध कलकत्ता उच्च न्यायालयात अपील केले जेथे ही शिक्षा रद्द करण्यात आली. अनागरिक धम्मपालांना मोठा मनस्ताप झाला._

_*जेव्हा लॉर्ड कर्झन व्हाईसरॉय झाले तेव्हा त्यांना बर्मी लोकांच्या शिष्टमंडळाने बोधिवृक्ष आणि महाबोधी महाविहार महंताच्या ताब्यातून सोडवून बौद्धांकडे सोपवण्याची विनंती केली. या प्रकरणात कर्झन यांनी लक्ष घालून, १९०३ मध्ये बुद्धगया येथे आले. यावेळेस महंत त्यांना भेटण्यास आला. कर्झन यांनी त्याला विचारले कि तो हिंदू असूनही बुद्धविहारावर कब्जा का केला आहे, काय तो बुद्धांची पूजा करतो आहे? महंत म्हणाला कि बुद्धांना तो विष्णूचा अवतार मानतो. यावर कर्झन म्हणाले तू तर शैव पंथीय आहेस, वैष्णव नाहीस, यावर महंत निरुत्तर झाला. कर्झन यांची खात्री पटली कि म्हटलं केवळ महाबोधी महाविहारावर ताबा मिळवायचा आहे. मात्र यात जास्त घाई करूनही चालणार नव्हते हे कर्झन ओळखून होता.*_

_अनागरिक धम्मपाल यांनी पुरोगामी हिंदूंची मने वळविण्यास सुरु केले. *1922 साली गया येथे भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात महाबोधी सोसायटी तर्फे महाविहाराच्या संपूर्ण माहितीची पुस्तिका वाटली व महाविहाराच्या ताब्यासंबंधी मागणी केली. बर्मी शिष्टमंडळाने देखील आग्रहाची मागणी केली (बर्मा देश त्यावेळेस भारताचा भाग होता). अधिवेशनात ठराव मंजूर झाला आणि एक समिती स्थापन करण्यात आली. तिचे प्रमुख राजेंद्र प्रसाद यांना नेमण्यात आले. आणखी एक सदस्य होते ज्यांचे नाव स्वामी रामोदार दास होते. त्यांनी नंतर बौद्ध धम्म स्वीकारला व राहुल सांकृत्यायन म्हणून पुढे प्रसिद्ध झाले.*_

_*१९२५ साली समितीने अखिल भारतीय काँग्रेस आणि हिंदू महासभा यांनी एकत्रित येऊन हा प्रश्न सोडवावा असे ठरले. त्यानुसार हिंदू महासभेच्या ४००० सदस्यांपुढे धम्मपाल यांनी आपली भूमिका मांडली. या परिषदेत एक ठराव पारित करण्यात आला तो म्हणजे महाबोधी महाविहारात पूजेचा संपूर्ण हक्क बौद्धांना देण्यात यावा व महाविहार समितीमध्ये त्यांचा सहभाग असावा. बर्मी सदस्य उ टोक क्यि यांनी एक बिल मांडून भारत, श्रीलंका आणि बर्मा येथील बौद्धांना या समितीत स्थान असावे असे सुचविले. महंताने या सर्वाला नकार दर्शविला व महाबोधी महाविहाराचा ताबा देण्यास नकार दिला.*_

_*अनेक दशकांची धावपळ, वार्धक्य, खालावलेली तब्येत आणि महाबोधी महाविहार प्रकरणी निघत नसलेला तोडगा यामुळे अनागरिक धम्मपाल खचले होते. त्यांनी या लढ्यातून माघार घेत, सर्व सूत्र आपले सचिव व मित्र देवप्रिय वालीसिंह यांच्याकडे सुपूर्द केली. १९३३ साली धम्मपाल यांचे निधन झाले. ४२ वर्षे जो एकहाती लढा त्यांनी दिला व जगाचे लक्ष याकडे वेधले तो अनोखा लढा होय. महाबोधी महाविहाराचे संपूर्ण अधिकार बौद्धांकडे असावे ही त्यांची मागणी अपूर्णच राहिली.*_


महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास - भाग  ८

_*अनागरिक धम्मपालांच्या मृत्यूनंतर, त्यांनी स्थापन केलेल्या महाबोधी सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी, भारतातील व इतर बौद्ध राष्ट्रातील बौद्धांच्या मदतीने महाबोधी महाविहाराचा प्रश्न सतत उपस्थित करीत राहिले.* त्यांनी भारतातील अनेक हिंदू मित्र जोडले होते ज्यांना महाबोधी महाविहाराच्या प्रश्नावर सकारत्मक निकाल हवा होता. १९३५ साली हिंदू महासभेने कानपुर मध्ये अधिवेशन भरविले होते. बर्माचे विद्वान भिक्खू उ ओट्टाम हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या अधिवेशनाला भारत, श्रीलंका व बर्मा वरून अनेक बौद्ध उपस्थित राहिले होते. बौद्धांना महाविहारात पूजे बरोबरच समितीमध्ये देखील अधिकार हवा या मागणीला या अधिवेशनात पाठिंबा मिळाला मात्र हा ठराव संमत करताना उपस्थित अनेक हिंदू स्वामींनी त्याला विरोध दर्शवित व्यासपीठाकडे धाव घेतली. राजेंद्र प्रसाद यांना मदत करण्यासाठी आणखी एक समिती तयार येथे करण्यात आली होती._

_*६ मार्च १९३७ मध्ये राजेंद्र प्रसाद यांनी अखिल भारतीय काँग्रेस समोर महाबोधी महाविहार संबंधीचे बिल मांडले व येणाऱ्या काळात नवीन मंत्र्यांनी ते लगेच अमलात आणावा असा आग्रह धरला. जगातील बौद्ध राष्ट्रातील प्रमुखांनी अत्यंत मुत्सद्दीपणे महाविहारचे प्रश्न आंतराष्ट्रीय मंचावर मांडून भारतावर दडपण आणत होते.*_

_स्वातंत्रोत्तर लगेचच महाबोधी सोसायटीने पाटणा मध्ये बौद्ध व हिंदूची एकत्रित बैठक बोलावली. महंताला महाविहाराचा हक्क द्यायचा नव्हता. खरं तर हिंदू महासभेच्या शब्दाबाहेर महंत नव्हता किंवा तो सगळ्यांविरुद्ध जाऊच शकला नसता मात्र तरीही त्याने विरोध कायम ठेवला. या बैठकीत सगळा विचार करून महाबोधी महाविहारावर बौद्ध हिंदू यांची एक समिती बनवून त्यांचा संयुक्त हक्क राहील असे ठरले गेले. याच दरम्यान आंतराष्ट्रीय आशिया संमेलनात देखील बौद्ध राष्ट्रातील चीन, तिबेट, बर्मा आणि श्रीलंका येथील प्रतिनिधी यांनी पंतप्रधान नेहरूंना यात लक्ष घालून लवकरात लवकर महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे असा आग्रह धरला. नेहरूंना देखील हा प्रश्न मिटवून शेजारील राष्ट्रात भारताबद्दल आदर वाढवायचा होता._

_*अनेक वर्षांच्या संघर्षानंतर १९४८ साली बोधगया मंदिर अधिनियम याचा मसुदा जनतेच्या सूचनांकरिता प्रसारित करण्यात आला. या अधिनियमानुसार समितीमध्ये ४ बौद्ध व ४ हिंदू असतील व समितीचा अध्यक्ष म्हणून गया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील असे नमूद करण्यात आले.*_

_*हा अधिनियम वाचून बौद्धांची घोर निराशा झाली कारण या समितीमध्ये सर्वात जास्त मेंबर्स हे हिंदू असणार होते. मुख्य म्हणजे हे महाबोधी महाविहार बौद्धांचे असताना देखील हिंदू त्या समितीवर असणार याचा मनस्ताप बौद्धांना झाला. तरी देखील बौद्धांना या समितीत समाविष्ट करता येणार होते म्हणून हा अधिनियम १९ जून १९४९ मध्ये पारित करण्यात आला. याला पुढे "बोधगया मंदिर अधिनियम १९४९" असे संबोधण्यात आले.*_

*_२८ मे १९५३ साली, वैशाख पौर्णिमेला महंताने आपले सारे हक्क समितीकडे एका जाहीर कार्यक्रमात सुपूर्द केले._*

_बौध्दगयाच्या परिसरातील उत्खनन आणि संवर्धन करण्यासाठी १९६६ मध्ये एक बृहत योजना सादर करण्यात आली ज्यात बुद्धगयेतील ३०० एकर जमीन ताब्यात घेऊन उत्खनन करण्यात येणार होते. त्यासाठी लागणाऱ्या सतरा लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. मात्र ही योजना नंतर बासनात गुंडाळण्यात आली. त्याचे कारण मात्र कळले नाही._

_हा अधिनियम जरी पारित झाला तरीही बौद्धांमध्ये या अधिनियम आणि समितीबद्दल प्रचंड नाराजी होती. एक बौद्ध स्थान (जे पुरातत्त्वीय संशोधनातून सिद्ध झाले होते) व त्यावरची समिती हे बौद्धांच्याच हाती हवी होती._

_*१९९१ साली बिहारचे मुख्यमंत्री म्हणून लालूप्रसाद यादव यांची निवड झाली. महाबोधी महाविहाराबद्दल त्यांना आदर होता व बौद्धांचे मत योग्य आहे असे त्यांचे म्हणणे होते. १९९२ मध्ये त्यांनी "बोधगया मंदिर अधिनियम १९४९" या ऐवजी नवीन "बोधगया महाविहार अधिनियम" आणू पाहत होते ज्यामुळे संपूर्ण बुद्धगया महाबोधी महाविहार परिसर व त्यावरची समितीवर फक्त बौद्धच असतील असे नमूद केले होते. हा अधिनियम पारित करून घ्यायचा असा त्यांचा मानस होता. मात्र त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने हिंदू कट्टरवाद्यांच्या साथीने याला प्रखर विरोध दर्शविला व हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्न उपस्थित केला.*_

_भारतीय जनता पार्टीच्या कट्टरवादी आणि मुर्खपणामुळे बिहारचे राजकारण ढवळून निघाले आणि शांततेचे प्रतीक व बुद्धत्त्व प्राप्तीचे स्थान असलेले बौद्धगयेतील महाबोधी महाविहार परिसर एका घाणेरड्या राजकारणाच्या वेढ्यात अडकला._

महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास - भाग ९

*_बौद्धांना न्याय कधी मिळणार?_*

_*जून २००२ युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीने महाबोधी महाविहाराला 'जागतिक वारसा' म्हणून घोषित केले. युनेस्को म्हणते, "महाबोधी महाविहाराचा संबंध थेट भ.बुद्धांच्या आयुष्याशी निगडित आहे. याच जागी त्यांना बुद्धत्त्व प्राप्त झाले व त्यांना मनुष्याच्या दुःख निवारण्याचा मार्गही सापडला. हे महाविहार विशेष महत्त्वाचे आहे कारण ते भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन बांधलेल्या वास्तूं मधले एक आहे".*_

_भारतीय राज्यघटना प्रत्येक व्यक्तीला विचार करण्याचे व ते मांडण्याचे तसेच व्यक्तिगत श्रद्धा अथवा धर्म धारण करण्याचे स्वातंत्र्य देते. म्हणजेच राज्यघटनेनुसार आम्ही धर्मनिरपेक्ष असल्यामुळे, प्रत्येक धर्माच्या बाबतीत आम्ही समतावादी आहोत._

_*बोधगया महाविहाराची व त्याच्या परिसराची व त्याची स्थावर व जंगम मालमत्तेची योग्य राखण व्हावी यासाठी बिहार राज्याच्या विधिमंडळाने "बोधगया मंदिर कायदा" ६ जुलै १९४९ पासून अंमलात आणला.* कोणत्याही कायद्याची प्रस्तावना ही खूप महत्त्वाची असते कारण संपूर्ण कायद्याची ती भूमिका असते. मात्र *बोधगया मंदिर कायद्याच्या प्रस्तावनेत कुठेही बुद्ध, बौद्ध धम्म अथवा महाबोधी महाविहाराची ऐतिहासिक व सांस्कृतिक माहिती दिलेली नाही. भ.बुद्धांचा अथवा या स्थळाचा उल्लेख नसणे हेच बिहार राज्याच्या त्याकाळच्या विधिमंडळाचे सर्व सदस्यांची "उच्च वर्ग" मानसिकता दिसते. * भ. बुद्ध आणि बौद्ध धम्माच्या प्रति त्यांचा विरोध व तुच्छतेची वागणूक या कायद्यात पदोपदी दिसते._

_या कायद्याच्या कलम क्र.३ प्रमाणे व्यवस्था समितीमध्ये ९ सभासद असतील ज्याचे अध्यक्ष हे गया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, चार बौद्ध असतील आणि चार हिंदू असतील ज्यात प्रामुख्याने बुद्धगया येथील महंत असतील. (वारसा परंपरेने ज्यांनी बुद्धगया महाविहारावर अनधिकृत कब्जा केला आहे). येथे हेही नमूद केले आहे कि *महंत हा शैव पंथाचाच असला पाहिजे.* त्याच बरोबर *कलम ३ च्या उप कलम ३ नुसार या समितेचे अध्यक्ष हे हिंदूच असले पाहिजेत. जर तो हिंदू नसेल (म्हणजे गयाचे जिल्हाधिकारी) तर त्यांच्या जागेवर दुसरा एखादा सरकारी हिंदू माणसाची निवड करावी. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत हिंदू सदस्य हे बौद्ध सदस्यांपेक्षा जास्तच असतील.*_

_१३ ऑगस्ट २०१३ रोजी बिहार सरकार अचानक झोपेतून जागे झाले आणि त्यांच्या लक्षात आले कि भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्षता मानते आणि प्रत्येक संस्था ही धर्मनिरपेक्ष असली पाहिजे आणि मग त्यांच्या लक्षात आले कि या कायद्यातील कलम ३ चे उप कलम ३ हे पूर्वग्रहदूषित असल्यामुळे ते तात्काळ हटविले पाहिजे व तसे करण्याचा एक वटहुकूम काढण्यात आला._

_मुळातच *बोधगया मंदिर कायदा हा पूर्वग्रहदूषित आहे. काही प्रसिद्ध मंदिरांची उदाहरणे आपण बघू यात - पुरी, ओडिशा येथील श्री जगन्नाथ मंदिर कायदा १९५५ आपल्या प्रस्तावनेत स्पष्टपणे या मंदिराच्या थोर हिंदू परंपरेविषयी सांगतो. तसेच कलम ६ च्या उप कलम २ मध्ये नमूद केले आहे कि या मंदिराचे सदस्य हे फक्त हिंदूच असतील! कलम ६ च्या उप कलम ३ मध्ये म्हटले आहे कि जर नेमलेले सरकारी अधिकारी बिगर हिंदू असतील तर त्यांच्या जागी सरकारने एखाद्या हिंदू अधिकाऱ्याची नेमणूक करावी. कलम ७ च्या उप कलम १ नुसार या समितीचे अध्यक्षपद हे कायम पुरीच्या राजांकडे असेल; मात्र जर राजा अल्पवयीन असेल किंवा विकलांग असेल तर त्यांच्या जागी फक्त हिंदूच अध्यक्ष घेण्यात यावा. म्हणजेच श्री जगन्नाथ मंदिराच्या सर्वच सदस्य हे फक्त हिंदूच असतील; इतर धर्माचे कोणीच नसावे. (अपवाद फक्त सरकारी नामांकित अधिकारी).*_

_आणखीन एक उदाहरण - राजस्थानातील श्री सांवरलियाजी मंदिर कायदा १९९२ मध्ये कलम ६ च्या उप कलम २(अ) आणि (ब) मध्ये स्पष्ट म्हटले आहे कि सरकार तर्फे जे आठ सदस्य या समितीत असतील त्यापैकी पाच सदस्य हे हिंदूच असले पाहिजे आणि तेही शक्यतो वैष्णव पंथाचे._

_*बोधगया मंदिर कायद्याच्या कलम १० मध्ये 'समितीची कर्त्यव्य' अंतर्गत उप कलम १ (ड) प्रमाणे " समितीने महाविहारात (मंदिरात) पूजा अर्चना तसेच परिसरात पिंडदान करण्याची व्यवस्था करावी" असे नमूद केले आहे. बुद्धविचाराच्या एकदम विपरीत असे हे मत आहे कारण बौद्ध धम्म अशा अतार्किक आणि अंधविश्वासावर विश्वास ठेवत नाही. याचाच अर्थ हा कायदा बनविणाऱ्यांनी जाणून बुजून हिंदू धर्माची मते बौद्ध विचारांवर लादली आणि बौद्धांच्याच अधिकृत जागेत अनधिकृत प्रवेश करून तेथील वातावरण अबौद्ध म्हणजेच हिंदूकरण करण्याचा प्रयत्न्न करतायेत.*_

_*बोधगया मंदिर कायद्याच्या कलम १३ प्रमाणे "शैव पंथाच्या महंताच्या स्थावर अथवा जंगम मालमत्तेवर समितीचा काडीचाही अधिकार असणार नाही. मात्र याच कायद्यातील कलम ८ (१) आणि (२) नुसार समितीच्या परवानगीने बोधगया महाविहाराची जागा अथवा मालमत्ता हलविता येऊ शकेल अथवा भाड्याने देखील देता येईल. समिती हिंदुबहुल असल्याने बोधगयेतील सर्व मालमत्तेवर (खऱ्या अर्थाने बौद्धांची) हिंदूंचा अधिकार असेल मात्र शैव महंताच्या मालमत्तेवर इतर कोणाचाच कोणताही अधिकार नसेल. किती अजब कायदा बुद्धगयेतील महाबोधी महाविहाराचा!!!*_

_भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २६ प्रमाणे सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांस अधीन राहून, प्रत्येक धार्मिक संप्रदाय अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास धार्मिक किंवा धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थानांची स्थापना करून, त्या स्वखर्चाने चालविण्याचा; धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा; जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा; आणि कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा हक्क असेल._

_बोधगया मंदिर कायदा १९४९, भारतीय राज्यघटनेच्या तत्वांवर आधारित आहे का? भारतातील इतर मंदिरांचा कायदा काय सांगतो?_


अतुल भोसेकर

9545277410

---------------



No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...