☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*_यशवंत भीमराव आंबेडकर_*
*_भैय्यासाहेब_*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
_यशवंत भीमराव आंबेडकर उर्फ भैय्यासाहेब यांची आज जयंती आहे. (जन्म १२ डिसेंबर १९१२ – मृत्यू १७ सप्टेंबर १९७७) बाबासाहेबांच्या महाप्रयाणानंतर यशवंतरावांनी स्वतःला धम्मकार्यासाठी झोकून दिले व बाबासाहेबांच्या सामाजिक समतेचे काम वेगाने सुरू ठेवले._
*_यशवंत आंबेडकर यांचा अल्प परिचय_*
_यशवंतरावांना लहानपणापासूनच न्यूमॅनेटिक आणि पायाच्या पोलियोसारख्या आजाराने ग्रासले होते. गावठी औषधांच्या उपचाराने त्यांना बरे करण्यात आले. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंतच झाले. त्यांचे *लग्न १९ एप्रिल १९५३ रोजी मीराबाई सोबत झाला.* भय्यासाहेबांनी कधीही बाबासाहेबांच्या नावाचा फायदा घेतला नाही. त्यांनी स्वत:चे आयुष्य स्वत: घडविले त्यांनी सिमेंटचा कारखाना काढला. त्यानंतर मुंबई विमानतळाच्या परिसरात बांधकाम करणे हा नवीन उद्योग सुरु केला आणि त्यात त्यांनी कोणालाच वाटेकरी घेतले नाही. हा व्यवसाय सुरळीतपणे चालला होता._
_यशवंतरावांनी नंतर बाबासाहेबांच्या चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली. त्यांनी *भारत भूषण प्रिंटिंग प्रेस हा छापखाना सुरू केला. पुढे ह्या प्रेसचे बुद्धभूषण प्रिटिंग प्रेस असे नाव झाले. १९४४ पासून बाबासाहेबांच्या ‘जनता’, ‘प्रबुद्ध भारत’ या मुखपत्रांचे व्यवस्थापन तेच पाहत होते. बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसमध्ये बाबासाहेबांचा Thoughts on Pakistan हा इंग्रजी ग्रंथ भय्यासाहेबांनीच छापला. बाबासाहेबांनी हा ग्रंथ भय्यासाहेब व मुकुंदराव यांना अर्पण केलेला आहे. बाबासाहेबांचे Federation versus Freedom आणि Thoughts on Linguistic States हे ग्रंथही भैय्यासाहेबांनी छापले. त्यानंतर बाबासाहेबांच्या आदेशानुसार आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यांनी वा. गो. आपटे लिखित ‘बौद्धपर्व’ हा ग्रंथही आपल्या छापखान्यात छापून प्रसिद्ध केला.*_
_भैय्यासाहेबांचे लिखाण तर्कशुद्ध आणि विचारगर्भ असे. त्यांच्या लिखाणातील व भाषणातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा मोठया प्रमाणावर वापर असे._
_भैय्यासाहेबांनी बाबासाहेबांची अनेक स्मारके उभारली. *बौध्दजन पंचायत समितीचे १ ले स्मारक त्यांनी मुंबई येथे बांधले. या डॉ.आंबेडकर सभागृहाचे भूमिपूजन दि.२-४-१९५८ ला व उद्घाटन २२-६-१९५८ ला झाले. मुंबई नागरिकांच्या वतीने कफ परेड येथे बाबासाहेबांचा पुतळा बसविण्याचे ठरले. भैय्यायासाहेबांनी आग्रह धरला की २६ जानेवारी १९६२ रोजीच पुतळ्याचे अनावरण झाले पाहिजे. म्हणून शेवटच्या क्षणी कमी पडत असलेली रक्कम महापौरांना दिली व ठरल्याप्रमाणे २६ जानेवारी १९६२ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल प्रकाश यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले. चवदार तळे क्रांतीचे स्मारक म्हणून जेथे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. त्या जागेवर अशोक स्तंभाच्या धर्तीवर क्रांतिस्तंभ उभारण्यासाठीही यशवंतरावांनी पुढाकार घेतला. येवढे काय तर नागपूर ची दिक्षा भूमीची जागा मिळवून तेथे समिती गठीत करून आले. चैत्यभूमीच्या रूपाने बाबासाहेबांचे स्मारक व्हावे म्हणून भारतीय बौद्ध महासभेने दि.२०-३- १९५७ रोजी BMS कडे ४० बाय ४० ची जागा मागितली BMS ने ८ बाय ८ ची जागा मंजूर केली. परंतु मागणीपेक्षा एक इंचही कमी जागा घेणार नाही असा पवित्रा भैय्यासाहेबांनी घेतला. अखेर BMS improvement committee ने ४० बाय ४० ची जागा मान्य केली. जोपर्यंत शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन (शेकाफे) आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष (RPI) हे एकसंघ होते तोपर्यंत या स्मारकांना गती येत होती. जनताही आपला पै पैसा देत होती. जनता स्टेट बँकेसमोर रांगा लावून पैसे भरत होती. स्टेट बँकेत भरणा करावा म्हणून भय्यासाहेब कुलाबा ते दहिसर व कल्याण पर्यंत फिर फिर फिरले १९६६ साली डॉ. बाबासाहेबांचा ७५ वा जन्म दिवस येत असल्यामुळे हा जन्मदिवस ‘अमृत महोत्सव’ म्हणून भव्य प्रमाणात साजरा करण्याचे भय्यासाहेबांनी ठरविले. या अमृत महोत्सव प्रसंगी डॉ. बाबासाहेबांचे जीवन कार्याचे प्रतीक म्हणून एक ‘भीमज्योत’ महू ते मुंबई या ठिकाणी आणण्याचे ठरविले. २७-३-१९६६ रोजी ही भीम-ज्योत भारताचे तत्कालीन मजूर मंत्री जगजीवनराम यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार दादासाहेब गायकवाड होते. भीम-ज्योत महू हून इंदौर, भोपाळ, हुशंगाबाद, बैतूल, नागपूर, पुलगाव, औरंगाबाद, येवला, नाशिक, हरेगावनगर, संगमनेर, देहूरोड, पुणे, सातारा, वणी, पाचगणी, महाबळेश्वर, खेड, मंडणगड, दापोली, महाड, पेण, पनवेल, कल्याण, ठाणे, मुलुंड, राजगृहवरून दादरच्या चैत्यभूमीला आणण्यात आली. ह्या भीमज्योतीदरम्यान मिळालेल्या धम्मदानातून चैत्यभूमी स्मारक उभारण्यात आले.*_
*_संदेश कार्य : धम्म कार्यसंपादन करा_*
_डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर भय्यासाहेब भारतीय बौद्ध महासभेचे दुसरे अध्यक्ष झाले. *‘भारत बौद्धमय करीन’ हा बाबासाहेबांचा संकल्प उराशी घेऊन भय्यासाहेबांनी काम सुरु केले.* त्यांनी धम्मदीक्षेचे अनेक कार्यक्रम घेतले, धम्म परिषदा भरविल्या, धम्म मेळावे सर्वत्र होत होते. प्रचार सर्वत्र जोरात सुरू केला भय्यासाहेब आमदार असतांना त्यांनी विधानपरिषदेत बौद्धांच्या हक्कांबद्दल हिरीरीने बाजू मांडली तसेच या नवीन बौद्धांच्या सवलतीविषयी ते पंतप्रधान मोरारजी देसाईंना भेटले होते. *भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी श्रीलंका, थायलंड, म्यानमार, सारनाथ व दिल्ली येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदांमध्ये भारतीय बौद्धांच्या समस्या मांडल्या. खेड्यापाड्यातील बौद्ध विहारांचे उद्घाटन केले. १९६८ साली मुंबई येथे धम्म परिषद भरविण्यात आली व प्रमुख पाहुणे म्हणून दलाई लामा यांना बोलविण्यात आले. ह्या धम्म परिषदेमध्ये अनेक महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले. त्यात संस्कार विषयक आचार संहिता सर्वानुमते मान्य करण्यात आली. ‘बौद्ध जीवन संस्कार पाठ’ या नावाचे पुस्तक तयार करण्यात आले. धम्म प्रसार कार्याचा एक भाग म्हणून १९६७ मध्ये ११ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी भय्यासाहेबांनी स्वतः श्रामणेरची दीक्षा घेतली व त्या कालावधीत ते चैत्यभूमीतच राहत होते. त्यांचे नाव ‘महापंडित काश्यप’ असे ठेवण्यात आले होते.* १९५९ मध्ये महास्थविर संघरक्षित लंडनहून आले होते. त्यांनी भय्यासाहेबांची भेट घेतली होती. *महापुरुषाच्या पोटी जन्म घेऊन स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी किती कठोर परिस्थितीचा सामना करावा लागतो याचा प्रत्यय भैय्यासाहेब आंबेडकरांना निश्चितच आला होता. नव्हे संपूर्ण आयुष्यात ते ओझे घेऊन जगावे लागले असावे. जगाने ज्या महानावाच्या क्रांतीचा, विचारांचा आणि बुद्धीचा गौरव केला तो महामानव व्यक्तिमत्त्वाच्या पडताळणीचा आधार बनत असेल. अश्या परिस्थितीत स्वतंत्र व्यक्तिमत्त्व कसे उभारायचे याचे दडपण निश्चितच भैय्यासाहेबांना होते. मोठ्या वृक्षाखाली पालव्या कोमेजून जातात तशीच परिस्थिती भैय्यासाहेबांवर ओढवली असेल.* डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारस म्हणून किती दडपणाचा सामना भैय्यासाहेबांना करावा लागला. याचा विचार करून भैय्यासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाकडे बघितले गेले नाही._
_भैय्यासाहेबांना कधीही घमेड नव्हती. भैय्यासाहेबांचा स्वभाव शांत होता. शिवाय शारीरिक व्याधीमुळे सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव टाकला होता. संधिवाताचा सामना करतांना सोसावे लागलेले दुःख त्यांनी कधी सामाजिक जीवनात उतरू दिले नाही. परंतु काही समाजकंटकांनी त्यांच्या या आजाराचे भांडवल करून भैय्यासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला._
_*भैय्यासाहेब हे बाबासाहेबांचे एकमेव वारस होत जे जगले. हे दडपण पेलून धरतांना भैय्यासाहेबांनी एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व निर्माण केले. कदाचित ते असामान्य नसेलही परंतु शांत, चिंतनशील, सहनशील, वैचारिक असे गुणवैशिष्ट्य त्यांच्या व्यक्तिमत्त्वात निश्चितच होते. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पडतांना त्यांच्या शांत व्यक्तिमत्त्वाचा निश्चितच लाभ झाला. ज्यामुळे भारतीय बौद्ध महासभेचा त्यांच्या कार्यकाळात अनेक राज्यांमध्ये व्याप वाढू लागला. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर भैय्यासाहेब आंबेडकरांनी यासाठी कधी हट्ट धरला नाही. किंवा कुठलेही पद घेतले नाही. बाबासाहेबांचा राजकीय वारस म्हणून स्वतःला कधी समोर केले नाही. सदैव इतरांना पुढे करून त्यांना समर्थन देऊन स्वतः मात्र आयुष्यभर धम्माचे काम करीत राहिले. धम्म कार्यात स्वतःला वाहून घेतले. आजच्या आधुनिक पिढीला आणि जे स्वतःला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणवून घेतात त्यांच्यासाठी भैय्यासाहेबांचे व्यक्तिमत्व आदर्श ठरावे असेच आहे.*_
_भैय्यासाहेबांनी राजकीय स्वार्थाचा त्याग केला. धम्मकार्य केले तरीही काहींनी त्यांना बदनाम करण्याचे सोडले नाही. ज्यामुळे भारतीय बौद्ध महासभेला अपेक्षित यश मिळविता आले नसले, तरी जे काही आज भारतात बौद्धांची संख्या वाढलेली आहे. ती भैय्यासाहेबांनी केलेल्या प्रयत्नांचाच परिपाक आहे. *१९६२ ला भैय्यासाहेबांचा ५० वा वाढदिवस साजरा केला गेला होता. तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ दादासाहेब गायकवाडांनी काढलेले गौरवोद्गार अतिशय बोलके आहे. दादासाहेब गायकवाड म्हणाले होते, ‘भैय्यासाहेब माझ्यासारख्या आंधळ्यांची काठी आहेत’. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसत्व लाभलेले भैय्यासाहेब चळवळीत इतरांचे काठी बनले. चळवळीत इतरांना सहकार्य केले. चळवळीला दिशा देण्याचे काम केले. पण कधीही स्वतःचे नेतृत्व समाजावर लादले नाही. नेतृत्व संघर्षापासून सदैव स्वतःला अलिप्त ठेवले. भैय्यासाहेब हे दादासाहेब गायकवाडांच्या खांद्याला खांदा लावून सदैव त्यांच्या पाठीशी राहिले.*_
*कामगार नेते भैय्यासाहेब आंबेडकर*
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांचे कार्य तसेच अखंडितपणे भैय्यासाहेबांनी चालविले होते. अनेक चळवळी त्यांनी उभारल्या, आंदोलने केली आणि त्यामध्ये यशही मिळविले, परंतु गटबाजीच्या राजकारणाने त्यांना प्रत्येकवेळी मनस्ताप सहन करावा लागला. तरीही भैय्यासाहेब डगमगले नाहीत. बाबासाहेबांनंतर संपूर्ण आंबेडकरी चळवळीची धुरा त्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन बौद्धांच्या सवलती, शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन, भारत संरक्षण कायदा, खार जमिनी, विद्यापीठ, दूध वितरण, मागासवर्गीयांचे नोकऱ्यांतील आरक्षण, अंदाजपत्रकातील तरतुदी, माध्यमिक शाळांचे प्रश्न, गोवा मुक्ती आंदोलन, एसटी महामंडळ, जनतेच्या आरोग्याचा प्रश्न, दारूबंदी अशा एकनाअनेक लढ्यामध्ये अग्रभागी राहून डॉ. बाबासाहेबांच्या कार्याला गती आणली होती.
भैय्यासाहेब आणि कामगारांचा संबंध डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच आला होता. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांची कामगारांविषयी असलेली तळमळ त्यांनी जवळून पाहिली होती. कामगारांप्रती त्यांची एकप्रकारे नाळ जुळली होती. कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत भूमिका घेऊन ते सरकारवर जोरदार हल्ला करीत होते. कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सतत लढत राहिले. म्हणूनच ते कामगारांचे मास लिडर होते. आमदार उद्धवराव पाटील एका ठिकाणी म्हणतात की, भैय्यासाहेबांचा विधानपरिषदेत झालेला विजय हा भैय्यासाहेबांचा विजय नसून उभ्या महाराष्ट्रातील कामगार, श्रमजीवी जनतेचा आहे. या उद्धवराव पाटलांच्या विधानावरून भैय्यासाहेबांचे कामगारांप्रती असलेले कार्य अधोरेखित होते.
१९६० च्या दरम्यान मराठी माणसांना कंपन्यांमध्ये घेण्याबाबत कारखानदारांनी उदासीनता दाखविली होती. तेव्हा मराठी कामगारांच्या मुद्यावरून भैय्यासाहेबांनी शासनाला चांगलेच धारेवर धरले. कॉंग्रेस सरकार हे मालकांचे धार्जिणे असल्यामुळे मराठी कामगारांना नव्या कामधंद्यात सामावून घेणे त्यांना आवश्यक वाटत नाही. असा सवाल करून त्यांनी सरकारला वेठीस धरून मराठी कामगारांच्या हिताचा निर्णय घ्यावयास भाग पाडले होते. यासंदर्भाने त्यांनी केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात ते म्हणाले होते की, महाराष्ट्र सरकार उद्योगधंद्यांच्या वाढीबाबत फार प्रगतीशील आहे, असे म्हटले जाते आणि मलाही तसे वाटते. आपल्या राज्यात कारखानदारी वाढावी म्हणून कारखान्यांना लागणारी वीज, पाणी व इतर सवलती सरकार देत असते. पण महाराष्ट्र सरकार या कारखानदारांना सर्व प्रकारची मदत देत असताना माझ्या मनात एक गोष्ट खटकते ती ही की, या कारखान्यात महाराष्ट्रीयन लोकांना नोकऱ्या का दिल्या जात नाहीत ? ह्या कारखान्यांत इतर राज्यांतीलच लोक जास्त प्रमाणात दिसून येतात. ज्याअर्थी सरकार कारखान्यात सर्व प्रकारची मदत देते, त्याअर्थी महाराष्ट्र राज्यात बेकारी दिवसेंदिवस वाढत असल्याने, महाराष्ट्र सरकारमध्ये या कारखानदारांना अशी अट घातली पाहिजे की, त्यांनी आपल्या कारखान्यात ७५ टक्के नोकर महाराष्ट्रीयन घेतले पाहिजेत. असे झाले नाही तर महाराष्ट्राची पिछेहाट होईल. हा इशारा त्यांनी त्यावेळी दिला होता. याच दरम्यानच्या दशकात गिरणी मालक कामगारांच्या हिताविरुद्ध उभा राहिला असताना गिरणी कामगारांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली होती. गिरण्या बंद असल्यामुळे अनेक कामगार बेरोजगार झाले होते. अशावेळी भैय्यासाहेब आंबेडकरांनी विधानपरिषदेत तत्कालीन कामगार मंत्री नरेंद्र तिडके यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करून गिरणी कामगारांना न्याय मिळवून दिला होता.
भैय्यासाहेब आंबेडकर कामगारांचे तारणहार होते. कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत ते फार दक्ष होते. कामगारांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात त्यांनी प्रखर भूमिका घेत मुंबईत चतुर्थश्रेणी कामगारांच्या विविध प्रश्नांवर लढा उभारून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. विधान परिषदेत आमदार निवडून गेल्यानंतर त्यांनी विधान परिषदेच्या विविध समित्यांवर केलेले कार्य गौरवास्पद आणि वैशिष्ट्यपूर्ण असे होते. त्यांनी सांसदीय आणि लोकशाही दृष्टीने केलेल्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने जे. पी. चा किताब देऊन त्यांचा सन्मान केला होता. भैय्यासाहेबांनी आयुष्यभर आंबेडकरी चळवळीचा भार आपल्या खांद्यावर घेऊन भारतीय रिपब्लिकन पक्ष, भारतीय बौद्ध महासभा ज्या वेगाने वाढविली होती, त्याच वेगाने डॉ. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या कामगार संघटनेला त्यांनी उभारी आणली होती. भैय्यासाहेब यांना एकाच वेळी अनेक भूमिका पार पाडाव्या लागत होत्या. भैय्यासाहेब एका ठिकाणी कार्यकर्ता म्हणून रस्त्यावरची लढाई लढत होते. आणि या दोन्ही लढाईमध्ये त्यांना दुसऱ्यांपेक्षा आपल्यांशी जास्त सामना करावा लागला. गटबाजीच्या राजकारणामुळे त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. परंतु भैय्यासाहेब हे महासूर्याचे वारसदार होते, ते रक्ताचे आणि विचारांचेही.
_*भैय्यासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबानंतरचे एकमेव नेते होते, जे समाजासाठी व धम्मकार्यासाठी जगले.* ज्यांनी स्वतःचा स्वार्थ कधीच बघितला नाही. राजकीय लालसा कधी बाळगली नाही. सत्तेच्या मोहजाळातून अलिप्त राहिले. टीकाकारांना उत्तरे न देता शांत राहून अप्रत्यक्ष उत्तरे देत राहिले. कुणाच्याही विरुद्ध भूमिका न घेता, कुणावर टीका करीत न बसता भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्माची जबाबदारी पार पाडत राहिले. भैय्यासाहेबांनी स्वतःसोबत मीराताई आंबेडकरांनाही धम्मकार्यात वाहून घेतले. इतकेच नाही तर भैय्यासाहेबांनी त्यांच्या मुलांवर केलेल्या संस्काराचाच परिणाम म्हणून आजही त्यांची मुले बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर व आनंदराज आंबेडकर स्वतःच्या कर्तृत्वाने या समाजात स्वतःचे स्थान निर्माण करीत आहेत. पण कधीही त्यांनी बाबासाहेबांचे वारस म्हणून संपूर्ण समाजाचे आम्हीच नेते असा आव आणला नाही. हा भैय्यासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या मुलांवर केलेल्या संस्काराचाच परिणाम म्हणावा लागेल. *भैय्यासाहेब हे समाजासाठी, आंबेडकरी चळवळीसाठी केलेले त्यागाचे प्रतीक आहेत.*_
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*_त्या सुर्यपुत्र भैय्यासाहेब भिमराव आंबेडकर यांना १२ डिसेंबर जयंती दिनी विनम्र अभिवादन !_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_रविवार, १२ डिसेंबर २०२१_*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment