बौद्धधम्मात समाधी भावनेसाठी ४० कम्मट्ठानाचे( आलंबनाचे) महत्व
आजच्या धावपळीच्या जीवनात ताण तणाव आणि मानसिक शांततेसाठी बरेच लोक ध्यान साधनेकडे वळले आहेत. वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक आज ध्यानसाधना करताना दिसतात. अनेक देशांमध्ये ध्यान साधनेच्या केंद्रांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते.
विपस्सना ही ध्यानाची जगभरात प्रसिद्ध असलेली अशी एक पद्धत आहे. बुद्धांनी जे तत्वज्ञान सांगितले त्यातील एक महत्त्वाचे म्हणजे ध्यान होय. पाली भाषेत विपश्यनेचा अर्थ "विशिष्ट पद्धतीने स्वतःकडे पाहणे". चित्त ( मन) अस्थिर असते. ते राग,लोभ, द्वेष, मत्सर अशा क्लेशानी युक्त असते. ध्यान करत असताना हे क्लेश अडथळे निर्माण करतात, चित्ताची एकाग्रता साधता येत नाही.
जोपर्यंत चित्त एकाग्र होत नाही तोपर्यंत विपस्सनेला सुरुवात होऊ शकत नाही म्हणजेच जे कोणी ध्यान साधनेचा अभ्यास करत असतात त्यांनी ह्या क्लेशांचे दमन केले पाहिजे, शमन केले पाहिजे.क्लेशांचे शमन करणे आणि विपस्सना हे दोन वेगवेगळे भाग आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे.पूर्वी ही ध्यानसाधना भिक्खू वर्ग करत असत कारण त्यांचे निर्वाण प्राप्तीसाठी प्रयत्न सुरू असत.आजच्या काळात ध्यान साधना उपासकांसाठी ही उपलब्ध आहे पण फक्त आनापानसती याचाच वापर केला जातो आनापान सती यात "श्वास" हे आलंबन वापरले जाते मन एकाग्र करण्यासाठी.
विसुद्धीमग्गामद्धे ४० आलबंनांचा उल्लेख आढळतो. ज्यांना कम्मठ्ठान म्हणतात. हि ४० कम्मठ्ठान साधनेत नवीन असलेल्या भिक्खुला दिली जात असत. हि ४० कम्मठ्ठान कोणाकडून स्वीकारावीत याचे वर्णन विसुद्धीमग्गात आले आहे.
ही ४० कम्मठ्ठान कोणाकडून ग्रहण करावित?
तर हि कम्मठ्ठान तथागतांकडुन ग्रहण करावी, तथागत नसतील तर महाश्रावकाकडुन महाश्रावक नसेल तर आनागामी, आनागामी नसेल तर सकदागामी, सकदागामी नसेल तर श्रोतापन्न, श्रोतापन्न नसेल तर एक त्रिपिटकधारी, दोन त्रिपिटकधारी, तीन त्रिपिटकधारी, निकायधारी किंवा अट्ठकथाचार्य यांच्याकडून ग्रहण करावे हे हि नसतील तर धुतागंधारी कडून ग्रहण करावे आणि हे कोणीच नसतील तर आसनस्थ होऊन तथागत समोर आहेत अशी भावना ठेवून स्वतःच ग्रहण करावे, हे झाले कुणाकडून कम्मठ्ठान स्वीकारावेत. पण कम्मठ्ठान देत असताना ती सहज दिली जात नसे, वरिष्ठ भिक्खू नवीन भिक्खूचे निरीक्षण करतात, भिक्खूची मानसिकता, वर्तन इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन निरीक्षण करून ४० कम्मठ्ठानापैकी उचित असे एक कम्मठ्ठान दिले जाते.
हे निरीक्षण कसे केले जाते.
१.पहिल्या प्रकारचे निरीक्षण-: त्या नवीन भिक्खूची शारीरिक ठेवण कशी आहे, ते कसे वागतात त्यांची हालचाल कशी आहे म्हणजे ते चालतात कसे, उभे राहतात कसे इत्यादींचे निरीक्षण केले जाते.
२. दुसऱ्या प्रकारचे निरीक्षण-: ते नवीन भिक्खू शारीरिक कार्य कसे करतात उदाहरणार्थ झाडू कसे मारतात,. साफसफाई कसे करतात, चिवर कसे परिधान करतात.
३.तिसऱ्या प्रकारचे निरीक्षण-: ते कोणत्या प्रकारचे अन्न खातात, कशाप्रकारे खातात.
४.चौथ्या प्रकारचे निरीक्षण-: त्यांची मानसिकता कशी आहे चित्ताचा प्रकार कोणता आहे हे सगळं निरीक्षण करत असताना ते भिक्खु कोणत्या ठिकाणावरून आले आहेत म्हणजे कोणत्या परिसरातून, वातावरणातून, कुळातून आले आहेत हेही पाहिले जाते कारण या प्रत्येक घटकांचा तसा संस्कार त्या व्यक्तीवर होत असतो हे सर्व पाहिले जाते.कधीकधी निरीक्षणातून हे सर्व समजून येत नाही तेव्हा समोरा समोर प्रश्न विचारून त्यांच्या स्वभावाचा अंदाज बांधून कम्मठ्ठाने दिली जातात.
अशी ही ४० कम्मठ्ठाने खालील प्रमाणे आहेत.
१. दसकसिणानि-: कसिण म्हणजे ध्यानसाधनेचा सहाय्यक आलबंन.कसिणावर चित्ताची एक्रागता करून समाधी साधता येते.१० कसिण अशी
अ) पथवी कसिण
आ) आपो कसिणं
इ) तेजो कसिणं
ई) वायो कसिणं
उ) नील कसिणं
ऊ) पीत कसिणं
ए) लोहित कसिणं
ऐ) ओदात कसिणं
ओ) आकास कसिणं
औ) आलोक कसिणं
२. दस असुभा-: शरीर नश्वर आहे तरी त्या प्रती आसक्ती असते ती आसक्ती कमी किंवा नष्ट करण्यासाठी हे १० आलबंन दिली जातात ती खलील प्रमाणे
अ) उध्दुमातकं- फुगणारे शरीर
आ) विनीलकं- निळसर पडलेल शरीर
इ) विपुब्बकं - पू झालेले शरीर
ई) विच्छिद्दकं - छिद्र पडलेले शरीर
उ) विक्खायितकं- प्राण्यांनी खाल्लेलं शरीर
ऊ) विक्खित्तकं - अवयव विक्षिप्त झालेल शरीर
ए) हतविक्खित्तकं - शस्त्राचा मारा करून विच्छिन झालेल शरीर
ऐ) पूळुवकं- किडे पडलेल शरीर
ओ) अट्ठिकं- हाडांचा सापळा
औ) लोहितकं- रक्त बाहेर आलेल शरीर
३. दस अनुस्सतियो-: पुन्हा पुन्हा चांगल्या गोष्टींचे स्मरण करणे.. त्यावर चित्त एकाग्र करणे उदा. बुद्धांच्या गुणांचे स्मरण करतात त्याला बुद्धानुस्सती म्हणतात.अश्या १० अनुस्सति आहेत
अ) बुद्धानुस्सती - बुद्धांचा ९ गुणांचे स्मरण करणे
आ) धम्मानुस्सति- धम्माच्या ६ गुणांचे स्मरण करणे.
इ) सङघानुस्सति- संघाच्या 9गुणांचे स्मरण करणे.
ई) सिलानुस्सति- शीलाचे स्मरण
उ) चागानुस्सति- मत्सरापासुन रहित राहुन त्यागात मग्न राहणे
ऊ) देवतानुस्सति- दान, शील, प्रज्ञा गुणांनी संपन्न व्यक्तीचे स्मरण करणे.
ए) उपसमानुस्सति- निब्बानाच्या गुणांचे स्मरण
ऐ) मरणानुस्सति- ४ प्रकारच्या मरणाचे स्मरण/ मरणाचे गुण त्याचे स्मरण
ओ) कायागतास्सति/.कायागतानुस्सति- शरिराच्या ३२ भागांचे स्मरण.
औ)आनापानस्सति- आश्वास /प्रश्वासचे स्मरण
४. चतस्सो अप्पमञ्ञायो -: चित्ताच्या ४ सर्वोत्तम अवस्थाना ब्रम्हविहार म्हणतात
अ) मेत्ता
आ) करुणा
इ) मुदिता
ई) उपक्खा
५. एका सञ्ञा -: आहार प्रतिकुल संज्ञा.आहार म्हणजे आहरण करणे (perception).इथे खाद्य पदार्थांच्या विषयी भावना करणे म्हणजेच हे अन्न मनात विकारांना जागृत करते अशी भावना करणे आणि त्या प्रति घृणा करणे
६.एकं ववत्थान-: यात चार धातूंचा समावेश होतो
अ) पृथ्वी
आ) आप
इ) तेज
ई) वायु
७. चत्तारो आरूप्पो -: चार अरुपवाचार चा समावेश होतो.
अ) आकाशनन्त्यायतन
आ) विञ्ञानयतन
इ) आक्चिंञ्ञायतन
ई) नैवसञ्ञानासञ्ञायतन
अश्याप्रकारे ४० कम्मट्ठानाचा वापर करून साधनेत नवीन असणारे भिक्खू हे क्लेशांचे शमन करतात आणि ध्यानसाधनेत परिपक्व होतात.एकदा मन एकाग्र झाले की विपस्सनेला सुरवात होते.
मैत्रियी सुनिता,
जागतिक बुद्ध धम्म दीक्षा समिती
संदर्भ-:
1.visuddhimagga
2.In search of Teacher
- Dr. Tin Htut, Sheffield, UK(Nov./98)
3.Meghiya Sutta
4. Recollection of Buddha in Theravada and pure land .
No comments:
Post a Comment