अनादि कालापासून 'मी म्हणजे कोण? मी कोठून आलो? कोठे जाणार ? प्राणिमात्रांच्या
जीवनाला काही अर्थ आहे की नाही? जग कसे निर्माण
झाले? ते सान्त आहे की अनन्त आहे? शाश्वत आहे कि अशाश्वत आहे? जगाच्या घडामोडी कशा घडतात? त्या आपोआप घडतात की त्या घडविणारा कोणीतरी आहे? असा कोणी असेलच तर त्याचे स्वरूप कसे आहे? माणसाने जगात कसे वागावे? जीवनाचे अंतिम ध्येय काय आहे?' इत्यादी अनेक प्रश्नांनी माणसाला सतावले आहे. *या प्रश्नांची
उत्तरे देण्याचा दावा करणाऱ्या खालील बासष्ट मतप्रणालींचा निर्देश दीघनिकायातील
ब्रह्मजाल सुत्तात केला आहे*
*शाश्वतवादी -* जग आणि आत्मा शाश्वत आहेत असे सांगणाऱ्या चार निरनिराळ्या
मतप्रणाली.
*एकत्यशाश्वतिक -* देवलोकातून खाली
पडल्यामुळे किंवा केवळ तर्क आणि विचक्षणा यांच्या योगाने जग आणि आत्मा काही अशाने
शाश्वत आहेत असे सांगणाऱ्या चार निरनिराळ्या मतप्रणाली.
*अन्तानन्तिक -* १) जगाला अंत आहे
असे मानणारे २) जग अनंत व अमर्यादित आहे असे मानणारे ३) जगाला वर आणो खाली अंत आहे, पण ते सभोवार अनंत आहे असे मानणारे ४) तर्क आणि विचक्षणा यांच्या
आधारावर जगाला अंतही नाही आणि ते अनंतही नाही असे मानणारे
*अमरविक्षेपीक -* कुशल आणि अकुशल
याविषयी ज्यांच्या मनात घोटाळा आहे अशांची निरनिराळी चार मते
*अधीत्यसमुत्पन्निक -* देवलोकातून
खाली पडल्यामुळे किंवा केवळ तर्क आणि विचक्षणा यांच्या योगाने जग आणि आत्मा ही
आपोआप, कारणांशीवाय उत्पन्न झाली आहेत असे
सांगणारी निरनिराळी दोन मते.
*ऊर्ध्वमाघातनिक -* १) मरणानंतर
आत्म्याला संज्ञा असते असे निरनिराळ्या प्रकाराने सांगणारी सोळा मते. २) मरणानंतर
आत्म्याला संज्ञा नसते असे सांगणारी निरनिराळी आठ मते. ३) मरणानंतर आत्मा
संज्ञावानही नसतो आणि संज्ञाविहिनही नसतो असे सांगणारी निरनिराळी आठ मते.
*उच्छेदवादी -* सात तऱ्हांपैकी कोणत्याही तऱ्हेचा आत्मा असला तरी त्याचा मरणानंतर
समूळ नाश होतो असे सांगणारी सात मते.
*अशा प्रश्नांची ठामपणे उत्तरे
देण्याचा दावा करणाऱ्या मतप्रणालींतुनच पुढे निरनिराळे धर्म, पंथ आणि संप्रदाय निर्माण झाले. * ढोबळ मानाने *ह्या मतप्रणालींचे
उच्छेदवादी आणि शाश्वतवादी असे दोन भाग करता येतील* उच्छेदवादी माणसाला ना जनाची
ना मनाची लाज असते. आपण करतो त्या कृत्याचा स्वतःवर किंवा समाजावर काय परिणाम होईल
याची बिलकुल पर्वा न करता तो स्वच्छंदपणे जीवनात मजा लुटत असतो. तर शाश्वतवादी शिकवण ही
आत्मा आणि ईश्वर असल्या काल्पनिक गोष्टींवर आधारलेली असल्यामुळे अशास्त्रीय वाटते.
शिवाय, शाश्वतवादी मनुष्य कोणत्या ना
कोणत्या तरी स्वरूपात आत्म्याचे अस्तित्व मानीत असल्यामुळे तो आत्मवादी बनून
त्याच्यात 'अहंभाव' निर्माण होतो.
उच्छेदवादाची आणि शाश्वतवादाची
शिकवण देणारी दोन्ही टोके सोडून भगवान बुद्धांनी मध्यम मार्गाची शिकवण दिली आहे.
*ईश्वर, आत्मा वगैरे काल्पनिक गोष्टींचा
आधार न घेता त्यांनी 'माणूस आणि माणसाचे या जगाशी नाते' यांना केंद्रस्थानी ठेवून आपला धम्म सांगितला आहे.* म्हणूनच
त्यांच्या धम्माला 'एही पस्सिको' म्हणजे 'या आणि प्रत्यक्ष पहा' असे म्हटले आहे. *भगवान बुद्धांनी दुःख म्हणजे काय, दुःख कश्यामुळे उत्पन्न होते आणि त्याचा निरोध कसा करावयाचा हे
आपल्या धम्मात सांगितले आहे. दुःख, दुःख समुदय आणि दुःख निरोध समजणे म्हणजेच बुद्ध धम्म समजणे हे
सारीपुत्रांच्या अशवजीतांशी झालेल्या पहिल्या संवादावरून लक्षात येते.*
*धर्मचक्रप्रवर्तनसुत्तात भगवान
बुद्ध म्हणतात*
"भिक्खुंनो, दुःख नावाचे पहिले आर्यसत्य आहे. जन्म दुःखकारक आहे. म्हातारपण
दुःखकारक आहे. व्याधी दुःखकारक आहे. मरण दुःखकारक आहे. अप्रियांचा संबंध दुःखकारक
आहे. प्रियांचा वियोग दुःखकारक आहे. एखाद्या वस्तूची इच्छा करून ती न मिळाली
म्हणजे त्यापासूनही दुःख होते. संक्षेपाने पाच उपादानस्कंध दुःखकारक आहेत."
"भिक्खुंनो! पुनःपुन्हा उत्पन्न
होणारी आणि अनेक विषयांत रममाण होणारी तृष्णा, जीला कामतृष्णा, भवतृष्णा आणि
विभवतृष्णा असे म्हणतात, हे दुःख समुदय नावाचे दुसरे
आर्यसत्य आहे."
"उपेक्षेने (वैराग्याने) त्या
तृष्णेचा पूर्ण निरोध करणे, तिचा त्याग करणे, तिच्यापासून मुक्ती मिळविणे हे दुःखनिरोध नावाचे तिसरे आर्यसत्य
आहे."
"आणि आर्य-अष्टांगिक मार्ग, हे दुःखनिरोधगामिनी प्रतिपदा नावाचे चौथे आर्यसत्य आहे."
भगवान बुद्धांनी केलेले उपदेश
सुत्तंपिटकांत संग्रहित केले गेले आहेत, परंतु त्यांच्या धम्माचा आधारभूत उपदेश हाच आहे. एकट्या
*सच्चसंयुत्तात ह्या चार आर्यसत्यांच्या संबंधी एकूण एकशे एकतीस सुत्ते आहेत.
शिवाय इतर निकायांत त्यांच्या अनेक वेळा उल्लेख आला आहे. बोधिसत्व डॉ बाबासाहेब
आंबेडकरांच्या 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' ह्या ग्रंथात दुःख आर्यसत्याचे महत्व निरनिराळ्या अनुषंगाने जवळजवळ
चाळीस वेळा सांगितले गेले आहेत. चार आर्यसत्यांचा प्रत्यक्ष उल्लेख त्या ग्रंथात
सहा वेळा केला गेला आहे.
भगवान बुद्धांचे इतर सर्व उपदेश
ह्या चार आर्यसत्यांवर आधारलेले आहेत. ज्याप्रमाणे पृथ्वीतलावर चालणाऱ्या प्रत्येक
प्राण्याच्या पायाचा ठसा हत्तीच्या पायाच्या ठश्यात बसू शकतो, त्याचप्रमाणे बुद्धधम्मातील सर्व शिकवण चार आर्यसत्यांच्या शिकवणीत
सामावली आहे. चार आर्यसत्य नीट समजल्याशिवाय भगवान बुद्धांचा धम्म समजणे शक्य
नाही. त्यामुळे भगवान बुद्धांनी आपल्या उपदेशात दुःख आर्यसत्य अनेक प्रकारांनी
समजावून सांगितली आहेत.
*भगवान गौतम बुद्धांच्या पूर्वी
सांख्य तत्त्वज्ञानाच्या प्रणेत्या कपिलमहर्षींनी दुःखाच्या अस्तित्वाची दखल घेतली
होती. पण दुःखाचा उगम कसा होतो आणि त्याचा निरोध करणे कसे शक्य आहे ह्या बाबतचा
शोध गौतम बुद्धांनीच लावला. दुःख, दुःखसमुदय, दुःखनिरोध आणि दुःखनिरोधगामी मार्ग हा बुद्धांनी लावलेला शोध आहे.*
जीवनात प्रत्येक माणसाला सोसाव्या
लागणाऱ्या दुःखापासून त्याची कशी सुटका करावयाची ह्या प्रश्नावरच तथागतांनी आपले
लक्ष केंद्रित केले होते. जग शाश्वत आहे की अशाश्वत, त्याला अंत आहे की ते अनंत आहे, ह्या असल्या वायफळ प्रश्नांची चर्चा करण्यात त्यांनी वेळ घालविला
नाही. असल्या विषयांची चर्चा करणाऱ्याची तुलना त्यांनी हत्तीच्या एखाद्याच अवयवाला
स्पर्श करून हत्ती सुपासारखा आहे की खांबासारखा आहे असे वर्णन करून वादविवाद
करणाऱ्या जन्माधांशी केली आहे.
*_संयुक्तनिकायांत भगवान बुद्ध
म्हणतात, "भिक्खुंनो, ही चार आर्यसत्य जशी आहेत तशी जाणल्याने तथागतांना 'अर्हत किंवा संबुद्ध' म्हणतात"_*
भगवान बुद्धांच्या धम्माची शिकवण
दुःखाच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून सुरू होते. *जगातील सर्व प्राणीमात्रांना
जोडणारा फक्त एकच दुवा आहे, आणि तो म्हणजे "दुःख"* _दुःख आर्यसत्य न समजल्यामुळे अनेकांनी अज्ञानामुळे देव, आत्मा, ब्रह्म, परब्रह्म वगैरे काल्पनिक गोष्टींचे अस्तित्व मानून त्याच्या पायावर
आपल्या तत्वज्ञानाचा डोलारा उभा केला आहे. पण त्यांचा पायाच चुकीच्या कल्पनांवर
आधारला असल्यामुळे त्यांचे तत्वज्ञान शास्त्रीय कसोटीवर उतरू शकत नाही._ *भगवान बुद्धांचा धम्म दुःखापासून मुक्त होऊन परमसुख कसे प्राप्त
करावे हे शिकवितो. हे सर्व जग दुःखाने भरले आहे, आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा एकच भगवान बुद्धांच्या धम्माचा
उद्देश आहे.*
बुद्धधम्मग्रंथात दुःख हा शब्द
संदर्भाप्रमाणे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा अनेक
अर्थांनी वापरला आहे. व्यथा, भोग, ताप, त्रास, कष्ट, क्लेश, वैफल्य, त्रागा, पीडा, कारुण्य, विषाद, अशांतता, असमाधानकारकता, शोषण, चिंता, निराशा इत्यादी शब्द दुःखाच्या अनेक
छटा दर्शवितात.
*_महासतिपट्ठानसुत्तात भगवान बुद्ध
म्हणतात, "भिक्खुंनो! दुःख आर्यसत्य म्हणजे
काय? जन्म होणे दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, मरण दुःख आहे, शोक करणे दुःख
आहे, रडणे-ओरडणे दुःख आहे, पीडित होणे दुःख आहे, चिंतीत होणे दुःख आहे, त्रस्त होणे दुःख आहे, अप्रियांचा संबंध दुःखकारक आहे, प्रियांचा वियोग दुःख आहे, इच्छेची पुर्ती न होणे दुःख आहे, थोडक्यात सांगावयाचे म्हणजे पाच उपादानस्कंध दुःख आहेत._*
बुद्धधम्माप्रमाणे जगात दुःख आहे.
दुःखाचा पगडा सर्व जीवनावर असतो. सर्व जग दुःखाने पीडित आहे. जगातील कोणताही
प्राणी दुःखाच्या बंधनातून मुक्त नाही. जगाकडे वास्तवतेच्या दृष्टिकोनातून पाहणारा
कोणीही सुज्ञ मनुष्य हे नाकारू शकणार नाही. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे म्हणजे
जगात सुखाचे किंवा आनंदाचे अस्तित्व नाकारणे असे नाही. *दुःख आर्यसत्याचे
प्रतिपादन करताना भगवान बुद्धांनी सुखाची किंवा आनंदाचे अस्तित्व कधीच नाकारले
नाही.*
*दुःखाचे प्रकार*
*_महास्थविर बुद्धघोषांनी
विशुद्धीमग्गात दुःखाचे पुढील सात प्रकार सांगितले आहेत. १) दुःख दुःखता २)
विपरिणाम दुःख ३) संस्कार दुःख ४) प्रतिच्छिन्न दुःख ५) अप्रतिच्छिन्न दुःख ६)
पर्याय दुःख ७) निष्पर्याय दुःख. संस्कृत भाषेतील 'महाव्युत्पत्ती' नावाच्या ग्रंथात
दुःखाचे दोन भाग केले आहेत. एका भागात दुःख दुःखता, संस्कार दुःखता आणि विपरिणाम दुःखता ही तीन प्रकारची दुःखे दिली
आहेत, तर दुसऱ्या भागामध्ये 'जाती' पासून 'जरा-मरण' पर्यंतच्या आठ दुःखाचे वर्णन दिले
आहे.*
*_आचार्य शांतीदेवांनी
शिक्षासमुच्चयात अपाय दुःखता, यमलोक दुःखता आणि
दारिद्रीय असे दुःखाचे तीन प्रकार सांगितला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुःखे सांगितली आहेत._*
*दुःख दुःखता*
सर्वसाधारण समजल्या जाणाऱ्या
दुःखाला पालि ग्रंथात दुःख दुःखता असे म्हटले आहे. सर्व मानसिक आणि शारीरिक दुःखे, उदा. वृद्धावस्था, रोग, मृत्यू, अप्रियांचा सहयोग, प्रियांचा वियोग, इच्छित गोष्ट न
मिळणे ही सर्वांच्या जीवनात अनुभवाला येणारी सामान्य दुःखे आहेत.
*संस्कार दुःखता*
जरी संस्कार हा शब्द कार्यकारणांचा
विषय होणाऱ्या सर्वच गोष्टींना लागू असला तरी दुःखाच्या संदर्भात तो फक्त
पंचस्कंधांपुरता मर्यादित आहे. *पंचस्कंध म्हणजे १) रूप, २) वेदना ३) संज्ञा ४) संस्कार ५) विज्ञान त्यांना संक्षेपाने 'नाम-रूप' असे म्हणतात. "नाम"
म्हणजे चित्तशक्ती आणि "रूप" म्हणजे शरीर* कोणताही प्राणीमात्र
पंचस्कंधांचा मिळून झालेला असतो. जगातील सर्व संस्कारित वस्तू नेहमीच बदलत असतात. त्या अस्तित्वात
येतात आणि नष्ट होतात. ह्या संस्कारचक्रातून कोणाचीच सुटका नाही. म्हणूनच *भगवान
बुद्ध म्हणतात की पंचस्कंध उपादान दुःखमय आहेत. पंचस्कंधांच्या ह्या असमाधानकारक
स्थितीला पालि भाषेत 'संखारा दुःख' म्हणजे संस्कारदुःख असे म्हणतात.*
*विपरिणाम दुःख*
*परिवर्तनशीलतेमुळे येणाऱ्या
असमाधानकारक परिस्थितीला विपरिणाम दुःख असे म्हणतात.* माणसाला येणारे सर्व सुखमय
आणि आनंदमय अनुभव लवकरच अस्पष्ट होतात, आणि कालांतराने ते लोप पावतात. *ध्यानाच्या पहिल्या चार अवस्थांत
येणारे सुखमय अनुभव सुद्धा ह्याच प्रकारात मोडतात* सर्व संस्कारित गोष्टी
परिवर्तनशील असल्यामुळे असमाधानकारक आहेत. ज्या ज्या गोष्टी परिवर्तनशील आहेत, त्या त्या गोष्टी समाधानकारक आहेत.
*_दुःख आर्यसत्याचे स्पष्टीकरण
करतांना भगवान बुद्ध म्हणतात - थोडक्यात म्हणजे पाच उपादानस्कंध दुःखमय आहेत. दुःख
पाच उपादानस्कंधांपेक्षा वेगळे असू शकत नाही. पाच उपादानस्कंध आणि दुःखही एकच आहेत, वेगवेगळी नाहीत._*
*स्कंध*
*रूपस्कंध : चार महाभूते*
रूपस्कंध हे जड वस्तूंचे मिळून झालेले असते. जड वस्तूत चार महाभूतांचा समावेश
झालेला असतो ती चार महाभूते म्हणजे पृथ्वीधातू, आपधातू, तेजधातु, आणि वायूधातु ही चार महाभूते केवळ सामान्य अर्थाने समजली जाणारी
पृथ्वी, पाणी, अग्नी, आणि वायू नसून त्यापेक्षा अधिक अर्थ
भरलेला आहे.
*पृथ्वी*
बौद्ध अभिधम्माप्रमाणे पृथ्वीधातु
म्हणजे घनत्व किंवा जडत्व. या महाभूतात विस्तार पावण्याचे मूलभूत तत्वे आहेत.
*आप*
अभिधम्माप्रमाणे "आपो"
किंवा द्रव्यता म्हणजे संलग्नता हे मूलतत्त्व. ह्या गुणधर्मामुळे वस्तुमात्रातील
अणूरेणू इतस्तु: न भटकत एकत्र राहतात. द्रव पदार्थात संलग्नता हा गुणधर्म
प्रकर्षाने दिसून येतो.
*तेज*
'तेज' म्हणजे उष्णता किंवा तपमानाचे मूलतत्त्व सर्व प्राणीमात्रातील आणि
वनस्पतीतील जीवनशक्ती 'तेजोधातु' नावाच्या महाभूतामुळे असते.
*वायू*
'वायो' म्हणजे गती हे मूलतत्त्व.
ही चार महाभूते नेहमीच एकत्र असतात.
त्यांच्यापासून इतर चोवीस वस्तुमात्र आणि गुणधर्म निर्माण होतात. त्यांना
अभिधम्मात उपादायरूप असे म्हणतात. ह्या उपादायरूपातच पंचेन्द्रियांची क्षमता
म्हणजे डोळ्यांची क्षमता, कानांची क्षमता, नाकाची क्षमता, जिभेची क्षमता
आणि त्वचेची किंवा शरीराची क्षमता निर्माण होते.
*वेदनास्कंध*
आपल्या सर्व प्रकारच्या संवेदना 'वेदना' स्कंधात मोडतात. वेदना म्हणजे
इन्द्रियांचा इन्द्रियविषयांची संपर्क आला असता जाणवणारी अनुभूती त्या तीन
प्रकारच्या असतात. १) सुखमय अनुभूती २) दुःखमय अनुभूती आणि ३) असुखमय अदुःखमय
अनुभूती.
*संज्ञास्कंध*
संज्ञास्कंधाचे कार्य म्हणजे
इन्द्रियविषयांना ओळखणे, त्याची जाण करणे. संवेदनांप्रमाने
संज्ञा सहा प्रकारच्या असतात. जसे रूप, आवाज, वास इत्यादींना ओळखणे. विज्ञान आणि
संज्ञा यांच्यात एकप्रकारचे साम्य आहे. पण विज्ञानामुळे इंद्रिय विषयीच्या
अस्तित्वाची जाण होते, तर संज्ञा त्याच्या विशिष्ट
खुणांमुळे त्या वस्तूलला इतर वस्तूंतून ओळखते.
*संस्कारस्कंध*
संस्कारस्कंधात संवेदना आणि
जाणण्याची किंवा ओळखण्याची क्षमता सोडून मनाच्या बाकी सर्व भागांचा समावेश होतो.
*अभिधम्मात बावन्न चेतासिका सांगितल्या आहेत. त्यापैकी संवेदना आणि जाण ह्या दोन
चेतसिका सोडल्यास बाकीच्या पन्नास चेतसिकांना संस्कारचेतना असे नाव दिले आहे.*
मनाच्या व्यवहारात चेतन किंवा इच्छा फार महत्वाची कामगिरी बजावते.
*विज्ञानस्कंध*
*सर्व स्कंधात विज्ञानस्कंध फार
महत्वाचे आहे.* सर्वच्या सर्व बावन्न चेतसिका जणू काही आपल्याला झालेली जाण
विज्ञानस्कंधाला म्हणजे सदसद्विवेकबुद्धीला पोहोचवतात. विज्ञानस्कंध आणि सर्व चेतसिका एकमेकांवर अवलंबून आहेत.
मनुष्यप्राण्याचे सर्व घटक
पंचस्कंधात सामावले आहेत. पंचस्कंधा शिवाय मनुष्यप्राण्यात दुसरा कोणताच घटक नाही.
असा कोणताच मनुष्यप्राण्याचा घटक नाही की जो पंचस्कंधात सामावला नाही. सर्व
पंचस्कंध परिवर्तनशील आहेत. पंचस्कंधापैकी कोणताच स्कंध शाश्वत नाही. शुद्ध
शास्त्रीय दृष्ट्या पाहिले तरी सुद्धा असे दिसून येईल की जगातील कोणतीच संस्कारित
वस्तू शाश्वत नाही. *प्रत्येक संस्कारित गोष्ट परिवर्तनशील किंवा अनित्य आहे. जे
अनित्य आहे ते दुःख आहे*
*अनित्यता*
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अनित्यतेच्या सिद्धांताला तीन पैलू आहेत. १) अनेक तत्त्वांनी
बनलेल्या वस्तू अनित्य आहेत २) व्यक्तिगत रूपाने प्राणी अनित्य आहेत आणि ३)
प्रतित्यसमुत्पन्न वस्तूंचे आत्मतत्व अनित्य आहे. अनित्यतेच्या तिसऱ्या
पैलूप्रमाणे प्रत्येक प्राणीमात्र सारखा बदलत असतो, वा बनत असतो. याच विचारसरणीतून शून्यवादाचा उदय झाला. बौद्ध
शून्यवाद म्हणजे पूर्णपणे अनस्थिवाद नव्हे. त्याचा अर्थ एवढाच की ह्या ऐहीक जगात
प्रतिक्षणी परिवर्तन चालू आहे. शून्यतेमुळेच सर्व अस्तित्व शक्य होते. सर्व
वस्तूंच्या अनित्यतेवरच इतर दुसऱ्या वस्तूंचे अस्तित्व अवलंबून असते.
*अनात्मता*
दुःखाच्या अस्तित्वाची जाणीव
झाल्यावर साहजिकच दुःख कोणाला भोगावे लागते, दुःख भोगणारा कोण हे प्रश्न उत्पन्न होतात. सर्वसाधारण मनुष्य
अर्थातच दुःख 'मला' भोगावे लागते, दुःख भोगणारा 'मी' असे त्याचे उत्तर देईल. हा 'मी' म्हणजे कोण? याचा सांगोपांग विचार करणे आवश्यक होते. माझे शरीर म्हणजे 'मी' आहे काय की शरीराशिवाय शरीरात किंवा
शरीराबाहेर राहणार माझा 'आत्मा' म्हणजे 'मी' आहे?
मिलिंद प्रश्नातील 'रथाचे उदाहरण' तसेच
संयुत्तनिकायातील भिक्खूणी वजीरा व मार यांच्या संवादावरून दिसून येईल की माझ्या
शरीराचे निरनिराळे अवयव म्हणजे 'मी' नाही. *बौद्ध विचारप्रणाली आत्म्याच्या अस्तित्वाला मानत नाही*
बौद्ध अनात्मवादी आहेत. बौद्ध अनात्मवादी असल्यामुळे सुखदुःखे भोगणारा कोण हा प्रश्नच
उद्भवत नाही, कारण सुखदुःखे भोगणारा आत्मा नावाचा
पदार्थ शरीरात किंवा शरीराबाहेर राहत नाही. त्यामुळेच भोगणारा कोण हा प्रश्न
अप्रस्तुत आहे.
*दुःख आर्यसत्याची व्याख्या करताना
असे म्हटले आहे की, संक्षेपाने सांगावयाचे म्हणजे पाचही
उपादानस्कंध हे दुःखच आहेत. आपल्या पंचस्कंधांबद्दल आपल्याला जबरदस्त आसक्ती
वाटते. त्याचे कारण म्हणजे आपण शाश्वत आहोत असा अज्ञानामुळे आपल्याला भ्रम जगलेला
असतो. आपल्याला वाटत असलेल्या पंचस्कंधांच्या ह्या आसक्तीमुळे आपणात अहंकाराची
भावना निर्माण होते. माणसातील अहंकाराचा अतिरेक हे जगातील दुःखाचे मूळ कारण आहे.
अहंमन्य मनुष्य स्वार्था़ध बनतो, तो दुसऱ्यांची
पर्वा करीत नाही. पण जेव्हा माणसातील अहंभाव गळून पडतो तेव्हा त्याच्यात मैत्री -
करूणा ह्या एरव्ही प्राणीत्रांवर आपल्याइतकेच प्रेम करणाऱ्या, भावना ओतप्रोत भरून जातात.
दुःख समुदय म्हणजे दुःखाचे कारण. 'सम' हे पद 'सह' किंवा 'समवेत' वाचक आहे. 'उद्' उत्पन्न किंवा उदित होण्याच्या
अर्थाने आहे. तर 'अय' हे कारण किंवा हेतुवाचक आहे. म्हणून दु:खसमुदय म्हणजे ज्यामुळे
दुःख उत्पन्न होते ते कारण किंवा हेतू. *दीघनिकायातील महासतीपठ्ठानसुत्तात* भगवान
बुद्ध म्हणतात, भिक्खुंनो, दुःखसमुदयाच्या विषयी काय आर्यसत्य आहे?
*_भिक्खुंनो, ही पुनःपुन्हा उत्पन्न होणारी लोभ आणि विकाराने युक्त असलेली अनेक
विषयांत रममाण होणारी तृष्णा, जिला कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा असे म्हणतात, ती दुःखसमुदय नावाचे दुसरे आर्यसत्य आहे._*
*अभिधम्मात तृष्णेचे एकशे आठ प्रकार
सांगितलेले आहेत ते पुढीलप्रमाणे -*
_१) रुपतृष्णा २) शब्दतृष्णा ३)
गंधतृष्णा ४) रसतृष्णा ५) स्प्रष्टव्यतृष्णा किंवा स्पर्षतृष्णा आणि ६) धर्मतृष्णा
किंवा कल्पना किंवा विचार ह्या मनाच्या विषयासंबंधीची तृष्णा. *या सहा प्रकरच्यां
तृष्णांना कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा या तीन
तृष्णांनी गुणल्यावर अठरा तृष्णा होतात, त्यांचे लौकिक आणि आध्यात्मिक असे प्रकार केल्यावर छत्तीस तृष्णा
होतात, भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळातील तृष्णा असा विचार केल्यावर एकूण एकशे आठ
प्रकारच्या तृष्णा होतात.*_
आसक्तीरूपी तृष्णा ही अनुभवरूपी
तृष्णेचा आधार घेऊन उत्पन्न होत असते. सामान्यतः आपण एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतला
असला तरच आपणास त्या गोष्टीविषयी आसक्ती वाटत असते. ज्या गोष्टींसंबंधी आपणांस
अनुभव नाही त्या गोष्टीविषयी आपणास सहसा तृष्णा उत्पन्न होत नसते. *तृष्णेच्या
उद्देशांचे काम, भव आणि विभव असे प्रकार केले आहेत, तर काही ठिकाणी काम, रूप-अरुप आणि निरोध असे प्रकार केले आहेत. सर्वसामान्यपणे
कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा ह्या
प्रकारांनाच जास्त मान्यता आहे.*
कामतृष्णा म्हणजे सुखोपभोगासाठी
निर्माण झालेली लालसा. काम अनित्य आहे. कुशलरूपी धर्मधनाची चोरी करणारी कामतृषा ही
ह्या जगातील माया आहे. ज्याला कामतृष्णेने पछाडले आहे, त्याला कोठेच तृप्ती मिळत नाही.
शाश्वत दृष्टीला भवतृष्णा असे
म्हणतात. निरंतर राहण्याची इच्छा असलेल्यांना भवतृष्णेची बाधा झालेली असते.
नामरूपादी स्कंधांत अमर आत्मा आहे अशी मिथ्यादृष्टी म्हणजे शाश्वत दृष्टी. या
शाश्वत दृष्टीमुळे उत्पन्न होणाऱ्या दृष्टीला भवतृष्णा असावं म्हणतात, अशा तऱ्हेने ह्या जगात कायमचे राहण्याची किंवा पुनःपुन्हा जन्म
घेण्याची जी दृष्टी आहे ती सुद्धा दुःखाचे कारण आहे.
उच्छेददृष्टीचे नाव विभवतृष्णा असे
आहे. उच्छेदवाद्यांना नैतिक बंधन नसते. खा, प्या आणि मजा करा अशा दृष्टिकोनातून ते स्वार्थ्यांध बनतात आणि
शेवटी दुःख ओढवून घेतात.
*_तृष्णा पालित तन्हा म्हणजे तहान.
अभिधम्मात साध्या पाणी पिण्याच्या तहानेला तृष्णा किंवा तन्हा असे म्हणत नाही.
लोभाने किंवा द्वेषाने माणसाला एखाद्या गोष्टीचा हव्यास वाटू लागतो, त्या गोष्टीसाठी तो तडफडतो, तेव्हा त्या लोभमुलक किंवा द्वेषमूलक हव्यासालाच तृष्णा असे
म्हणतात. मोहामुळे म्हणजे अज्ञानामुळे माणसाला मिथ्यादृष्टी उत्पन्न होऊन त्याला
शाश्वतवादी किंवा उच्छेदवादाची भवतृष्णा किंवा विभवतृष्णा होत असते. माणसातील लोभ, द्वेष आणि मोह यांचे संयुक्त नाव म्हणजे तृष्णा_*
तृष्णा ही सुखदुःखादी वेदनेच्या
प्रत्ययांमुळे उत्पन्न होत असते व वेदना ही रूप, आवाज, स्वाद, शरीरस्पर्श आणि मनातील विचार यांच्या अनुक्रमे डोळे, कान, नाक, जीभ शरीर आणि मन ह्या इंद्रियांशी झालेल्या समन्वयाच्या
प्रत्ययामुळे उत्पन्न होत असते. अशा तऱ्हेने प्रतित्यसमुत्पाद ह्या निसर्गाच्या
मूलभूत तत्वानुसार जगात दुःख कसे उत्पन्न होते आणि दुःखाचा निरोध कसा करावयाचा ते
समजते. *दुःखाचा उगम कसा होतो आणि त्याचा निरोध कसा करता येणे शक्य आहे ह्याचा शोध
प्रतित्यसमुत्पादाचा शोध लावल्यामुळे सिद्धार्थाला बुद्धत्व प्राप्त झाले.*
प्रतित्यसमुत्पादाला प्रत्ययाकार
किंवा पच्चयाकार निदान असेही म्हणतात. त्याचा संबंध अनित्यता आणि अनात्मता
यांच्याशी आहे. कोणताही संस्कारित पदार्थ शाश्वत नाही. सर्व संस्कारित पदार्थ
अनित्य आहे, क्षणैक आहेत आणि हेतुप्रत्ययजनित
आहेत. प्रतित्यसमुत्पादाला 'मध्यमावर्ग' असेही म्हणतात. बुद्धधम्मात शाश्वत दृष्टी आणि उच्छेददृष्टी यांना
टोकाचे दोन मार्ग असे म्हटले आहे. *महास्थविर बुद्धघोषांनी* 'प्रतित्य' शब्दात शाश्वत दृष्टीचे आणि 'समुत्पाद' शब्दात उच्छेदवादी दृष्टीचे खंडन
केले आहे असे सांगून प्रतित्यसमुत्पाद मध्यममार्गाचे तत्वज्ञान सांगतो असे म्हटले
आहे.
*आचार्य नागार्जुन* यांनी
प्रतित्यसमुत्पादाला आणि शून्यता यांना एकच मानले आहे. *विग्रहव्यावर्तनीमध्ये
नागार्जुन म्हणतात की,* ज्यांनी शून्यत्याला जाणले आहे
त्यांनी सर्व लौकिक आणि लोकोत्तर अर्थाला सुद्धा जाणले आहे. कारण ज्याने शून्यतेला
जाणले आहे त्याने प्रतित्यसमुत्पादाला जाणले आहे, ज्याने प्रतित्यसमुत्पादाला जाणले आहे त्याने चार आर्यसत्यांनाही
जाणले आहे.
बुद्धधम्मात भवचक्र किंवा संसारचक्र, कर्म आणि पुनर्जन्म यांचा संबंध दुःख समुदय आर्यसत्याशी जोडला गेला
आहे. काही ऐतिहासिक कारणामुळे भवचक्र, कर्म आणि पुनर्जन्म या कल्पनांना निराळा अर्थ दिला गेला असावा.
संसारचक्रात काहीही स्थिर किंवा
शाश्वत नाही ह्या सर्व बऱ्यावाईट कर्माचा विपाक आहे. या संसारचक्रातून कोणाचीही
सुटका नाही. एखाद्या मनुष्याने दुःखाला कंटाळून आत्महत्या केली तरीसुद्धा
संसारचक्रातून, म्हणजे दुःखातून त्याची सुटका होणे
शक्य नाही. या संसारचक्रातून म्हणजेच दुःखातून सुटका करून घ्यावयाची असेल तर, प्रत्येक माणसाने तथागतांनी दाखविलेल्या मध्यममार्गाने चालावे.
कर्म हा शब्द संस्कृत 'कृ' ह्या धातूपासून झाला आहे. संस्कृत 'कर्म' किंवा पाली 'कम्म' म्हणजेच क्रिया करणे. बुद्धधम्मात
प्रत्येक क्रियेला कर्म असे म्हंटले जात नाही. *चेतनाहं कम्मं वदामी भिक्खवे, असे अंगुत्तरनिकायात भगवान बुद्ध म्हणतात एखादी गोष्ट करण्याच्या
इच्छेने केलेले कार्य म्हणजेच कम्मं किंवा कर्म.* 'इच्छा' ही मनाची एक वृत्ती आहे. ती संखारा
किंवा संस्कार ह्या पंचस्कंधातील एका स्कंधाचे अंग आहे. अशा तऱ्हेने इच्छा
पंचस्कंधाचाच एक भाग आहे. मनात एखादी इच्छा उत्पन्न झाली की इच्छापूर्तीसाठी
मनुष्य मनाने, वाणीने किंवा शरीराने कर्म करतो.
एका अर्थाने कर्म हे एक प्रकारचे 'बीज' आहे. कर्माच्या फळाला 'कर्मविपाक' असे म्हणतात. इच्छा ही कर्माप्रमाणे
कुशल, अकुशल किंवा ना कुशल ना अकुशल असू शकते. इच्छा, कर्म आणि कर्मविपाक म्हणजेच कारण आणि कार्य किंवा प्रत्यय आणि
उत्पाद असा कार्यकारणांचा खेळ अव्याहतपणे चालत असतो. अशा तऱ्हेने मनुष्यप्राणी सतत
बनत चाललेला असतो. हेच ते अव्याहतपणे चालु असलेले आणि नेहमी बदलत असलेले मानसिक
आणि शारीरिक अस्तित्व किंवा संसार.
पदार्थविज्ञान शास्त्रात
गुरुत्वाकर्षणासारखे जसे नियम आहेत तसे बुद्धधम्मात काही नियम आहेत, त्यांना *'नियाम'* असे म्हणतात. त्यांतील १) उत्तुनियाम २) बीजनियाम ३) चित्तनियाम ४)
कम्मनियाम आणि ५) धम्मनियाम हे पाच महत्वाचे नियम आहे. त्यांना *'पंचनियाम धम्म'* असे म्हणतात.
कम्मनियाम सृष्टीतील बितर नैसर्गिक नियमांपैकी एक नियम आहे. ज्याप्रमाणे
सर्वसाधारणपणे काही अंतरापर्यंत वर फेकलेली वस्तू गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे
परत खाली येणारच, त्याप्रमाणे सर्वसाधारणपणे अकुशल
कर्माची दुःखद फळे अकुशल कर्म करणाऱ्याला भोगावी लागणारच. सर्व प्रकारची कर्मे तीन
प्रकारांनी किंवा कर्मद्वारांनी केली जातात - १) कायकर्म म्हणजे शरीराने केली
जाणारी कर्मे २) वाचीकर्म म्हणजे वाणीने केली जाणारी कर्मे ३) मनोकर्म म्हणजे
मनाने केली जाणारी कर्मे. कर्माची मुळे सहा आहेत १) लोभड्ढ २) द्वेष ३) मोह
(अज्ञान, भ्रम किंवा चुकीचा समज) ४) अलोभ ५)
अद्वेष ६) अमोह. जी कर्मे लोभामुळे, द्वेषामुळे किंवा मोहामुळे केली जातात त्यांना अकुशल कर्मे असे
म्हणतात, तर जी कर्मे अलोभामुळे, अद्वेषामुळे किंवा अमोहामुळे केली जातात त्यांना कुशल कर्मे असे
म्हणतात. कोणत्या मूळ हेतूने कर्म केले आहे त्याच्यावर ते कर्म कुशल आहे की अकुशल
आहे हे अवलंबून आहे.
कम्म म्हणजे क्रिया आणि त्याचा
परिणाम म्हणजे कम्मविपाक किंवा कर्माचे फळ. बर्याच वेळेला कम्मविपाकालाच
सर्वसाधारण भाषेत कर्म असे म्हटले जाते. 'कम्मनियाम' हा गुरुत्वाकर्षणाच्या नियमासारखाच
नैसर्गिक नियम आहे, म्हणून कर्माचा परिणाम होणारच. पण
कर्माचे फळ केव्हा आणि कसे मिळेल याबाबत काही निश्चित नियम नाही. कम्माचे प्रकार
अनेक आहेत आणि कम्मनियाम अनेक प्रकारांनी कार्य करीत असतो. त्यामुळे कम्म आणि
त्याचा विपाक यासंबंधीची क्रिया फार गुंतागुंतीची झालेली असते. जरी आपल्या हातून
अज्ञानामुळे, गैरसमजुतीमुळे किंवा इतर काही
कारणामुळे अकुशल कर्मे झाली असली तरी ह्या क्षणापासून जागृत राहून कुशल कर्मे
करण्यास सुरुवात केली तर उरलेल्या आयुष्यात आपण जेवढी कुशल कर्मे करू तेवढ्यामुळे
मागे केलेल्या अकुशल कर्माचा जोर कमी किंवा अगदी नष्ट होण्याची शक्यता आहे म्हणून
मागे केलेल्या अकुशल कर्मांनी हताश न होता माणसाने धैर्याने जास्तीत जास्त कुशल
कर्मे करावीत.
*माणसाचा लोभ, द्वेष आणि मोह नष्ट झाल्याने त्याला निर्वाण प्राप्त होते. माणसाला
लोभमुलक, द्वेषमूलक आणि मोहमूलक कर्मे
करण्यापासून परावृत्त करण्यासाठी आणि मैत्री, करुणा इत्यादींनी युक्त अशी अलोभमुलक, अद्वेषमूलक आणि अमोहमूलक कर्मे करण्यास उध्युक्त करण्यासाठी
त्यावेळची सामाजिक मनोधारणा लक्षात घेऊन पुनर्जन्माच्या साम-दाम-दंड-भेद न्यायाचा
कुशल उपयोग बौद्धधर्मात केला आहे. धम्माचा अंतिम उद्देश म्हणजे दुःखापासून मुक्ती
मिळविणे, म्हणजेच बिरवण प्राप्त करणे.
*तृष्णेविषयी संपूर्ण वैराग्य, त्या तृष्णेचा निरोध, त्याग, परित्याग, त्या तृष्णेपासून मुक्ती, अनासक्ती हेच
दुःखनिरोधाच्या विषयीचे आर्यसत्य आहे.* _दुःखनिरोध म्हणजेच निर्वाण (पाली निब्बाण).
*व्युत्पत्तीशास्त्राच्या दृष्टीने 'निर्वाण'
ह्या
शब्दाचा अर्थ नि+वाण म्हणजेच तृष्णेपासून मुक्ती किंवा तृष्णेपासून दूर जाणे असा
केला जातो. निर्वाण शब्दाचा दुसरा अर्थ निर+वा म्हणजे वाहणे थांबणे, अस्तंगत होणे किंवा विझणे
असाही केला जातो.* ज्याला निर्वाण प्राप्त झाले आहे तो तृष्णेपासून संपूर्णपणे
मुक्त झाला आहे. त्याच्यात कसल्याही प्रकारचा लोभ, द्वेष किंवा मोह राहिला नाही. *लोभ, द्वेष आणि मोह हे तृष्णेचेच
तीन निरनिराळे पैलू आहेत.*
*लोभ*
*_लोभ म्हणजेच अपुरेपणाची, गरजेची,
हावरेपणाची
आणि अतृप्ततेची स्वतःलाच निरंतर जागृत ठेवणारी एक मानसिक स्थिती आहे. ती
अतृप्ततेला तृप्त करून कायमचे समाधान मिळविण्याचा प्रयत्न करीत असते. पण लोभ कधीही
तृप्त होत नसतो._* द्वेष
आणि मोहाच्या तुलने लौकिक दृष्ट्या त्याचप्रमाणे कर्मिकदृष्ट्या लोभ कमी हानिकारक
आहे.
*_अभिरुची,
इच्छा, ओढ, आवड, माया, प्रितह्म, लालसा, हाव, विषयलोलुपता, स्वामित्व, द्रव्यलोभ, पंचेंद्रियांविषयाची इच्छा, संपत्तीलोभ, किर्तीलोभ इ. सर्व लोभांची
कमी-अधिक तीव्रतेची विविध अंगे आहेत._*
*द्वेष*
*द्वेष ही अशी एक मानसिक असमाधानाची स्थिती आहे की
जिच्यामुळे अंतर्गत असमाधानाचा रोष बाह्य परिस्थितीवर किंवा माणसावर काढला जातो.*
*_धम्मसंगिणी नावाच्या अभिधम्माच्या टीका ग्रंथानुसार_* द्वेषाने पेटल्यामुळे एखादा
मनुष्य आपल्या आईबापांच्या, भावाच्या, बहिणीच्या, श्रमणांच्या बाबतीत महापातक
करू शकेल असा महापातकी मनुष्य कुठेही गेला तरी दोष आणि दृष्कीर्ती त्याच्या मागे
जातात. लौकिक दृष्ट्या आणि कर्मिक दृष्ट्या द्वेष फार दोषपात्र आहे, पण द्वेष लवकर नष्ट होऊ
शकतो. द्वेष व्यक्तीच्या आणि समाजाच्या अनंत दुःखांची जननी आहे. द्वेष स्वभावाने
चवताळलेल्या नागासारखा क्रूर असतो. द्वेषापासून सुटका करून घेण्याची ज्याची
मनापासून इच्छा आहे, त्याला
द्वेष भावना जास्त वाढण्याचा अगोदर तिच्यावर ताबा ठेवता येणे शक्य आहे.
*_तिटकारा,
प्रतिक्षोभ, गैरमर्जी, चीड, विरोध, तिरस्कार, क्रोध, सूड इ. द्वेषाची कमीअधिक
तीव्रतेची अंगे आहेत. अपेक्षाभंग,
उदासीनता, निराशा, धास्ती इ. मनाच्या वृत्ती
द्वेषाच्या दुसऱ्या बाजूशी संलग्न आहेत. वस्तुमात्रांच्या अस्थिरतेमुळे, असुरक्षिततेमुळे आणि
असमाधानकारकतेमुळे त्या वृत्ती उत्पन्न होतात. वस्तुमात्रांचे ठीक आकलन न
झाल्यामुळेच मनाची अशी अवस्था होत असते._*
*मोह*
*_मोह म्हणजे अज्ञानाच्या स्वरूपातील गोंधळ करून टाकणारी
वैफल्याची आणि असहायतेची मानसिक स्थिती. चुकीच्या मतप्रणालीमुळे मोह हटवादी, जहाल किंवा अगदी भूत
संचारल्यासारखेसुद्धा स्वरूप धारण करू शकतो. मोहामुळे लोभ आणि द्वेष उत्पन्न होऊ
शकतात. लोभ आणि द्वेषाचा मोह हा सोबती आहे._*
अनिर्बंध लोभाने आणि
पूर्वग्रहकलुषित मनाने किंवा मिथ्यादृष्टीने जर एखादी गोष्ट केली, तर तो लोभ लवकर जात नाही.
द्वेषाबरोबर मिथ्यादृष्टीचा मोहसुद्धा असेल तर ती द्वेषाला अधिकच चेतावतो. मोह असल्याशिवाय
लोभ किंवा द्वेष उत्पन्न होऊ शकत नाही. *लोभ आणि मोह, किंवा द्वेष आणि मोह यांची
अकुशल मुळे नेहमीच एकमेकांसमवेत उद्भवतात, मोह मात्र लोभाषिवाय आणि द्वेषाशिवाय येऊ शकतो. एकटा राहून
सुद्धा मोह पाप आणि दुःखाचे जबरदस्त कारण होऊ शकतो.
*_मूर्खपणा,
मंदबुद्धी, गोंधळ, अज्ञान (चार आर्यसत्याचे)
पूर्वग्रहकलुषितता, कल्पनासृष्टीतील
हटवाद, जहालमतवाद, मिथ्यादृष्टी, अहंभाव इ. सर्व मोहांची
कमीअधिक तीव्रतेची विविध अंगे आहेत. धम्मसंगिणीनुसार लौकिक दृष्टीने आणि कर्माच्या
दृष्टीने मोह असणे हा फार मोठा दोष आहे. मोहामुळे जर एखादे कर्म केले तर त्या
कर्मापासून त्या माणसाची सुटका अगदी हळूहळू, खूप वेळाने होईल._*
*लोभ,
द्वेष
आणि मोह यांना मुळापासून नष्ट केल्याने जिवंतपणीही मनुष्य निर्वाण प्राप्त करू
शकतो, अशा अर्हताचे पंचस्कंध
कार्यान्वित असल्यामुळे त्याला सुखदुःखाचे अनुभव येत असतात, पण तो बंधनातून मुक्त झाला
असल्यामुळे त्याचा आपपर भाव नष्ट झाला असल्यामुळे, ते सुखदुःखाचे अनुभव तो तटस्थ वृत्तीने पाहतो. त्या
भावनांचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. लोभ, द्वेष आणि मोह यांचा पूर्णपणे नाश करून अर्हतपद प्राप्त
केलेला पुरुष किंवा स्त्री अकुशल कर्म करू शकत नाही*
अर्हताने आपली आध्यात्मिक उन्नती
इतकी केलेली असते की जगाच्या सर्व सामान्य व्यवहाराच्या पलीकडे तो गेलेला असतो.
लोभ, द्वेष आणि मोह या
त्रयींच्यामूळे येणारी मानसिक मलीनता त्याच्यात राहिलेली नसल्यामुळे निर्वाणपद
प्राप्त झाल्यावर त्याच्या दैनंदिन व्यवहारामुळे 'संस्कार'
निर्माण
होत नाहीत आणि म्हणूनच त्याच्या दैनंदिन व्यवहारातून 'कर्म' उत्पन्न होत नाही.
*भिक्खुंना प्रवचन करताना सारिपुत्र म्हणाले, "निर्वाण हे परमसुख आहे". तेचा उदायीने शंका काढली की, 'जर बिरवण अवस्थेत
सुख-दुःखांच्या भावनांचा अनुभव होत नाही तर निर्वाण हे परमसुख कसे असू शकेल?" धर्मसेनापती सारिपुत्र
उत्तरले की निर्वाण अवस्थेत सुखदुःखाच्या भावना नाहीत हेच खरे परम सुख आहे.*
_निर्वाण प्राप्त करणव ही साधी गोहत नाही. धम्मपदात
म्हटल्याप्रमाणे 'माणसांत
फार थोडे लोक असे असतात की जे पलीकडचा तिर गाठतात. बाकीचे लोक तर नुसती तिरावरच
धावपळ करीत असतात. *तृष्णेचा म्हणजेच लोभ, द्वेष आणि मोह यांचा समूळ नाश केल्याने निर्वाण प्राप्त
होते.* पण तृष्णेचा नाश करण्याची नुसती इच्छा केली म्हणजे तृष्णेचा नाश होत नाही.
कदाचित अशा प्रबळ इच्छेने मनुष्य तृष्णेला काही कालपर्यंत दाबून ठेवू शकेल, पण अशा तऱ्हेने दाबून
ठेवलेली तृष्णा संधी मिळताच तितक्याच जोमाने प्रकट होईल. म्हणून *तृष्णेला
जोरजबरदस्तीने दाबून टाकण्याचा प्रयत्न करणे अहितकारक आहे.* हे जग जसे आहे तसे
यथार्थ दृष्टीने पाहिले आणि त्याचा अनुभव घेतला म्हणजे दुःख, अनित्यता आणि अनात्मता
यांचा प्रज्ञेने बोध होतो. माणसातील 'आत्मभाव'
गळून
पडतो. 'मी' 'माझे' ह्या अहंकार आणि ममकार
दर्शविणाऱ्या शब्दांतील फोलपणाची त्याला जाणीव होते. त्याच्यात लोभ, द्वेष, मोह करण्यासारखे काहीच उरत
नाही, तो निर्वाणपदाला गेलेला असतो.
अशा तऱ्हेने *निर्वाणपदाला जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजेच आर्यअष्टांगीक मार्ग.*_
४ दुःख निरोधगामिनी प्रतिपदा
दुःख निरोधगामिनी प्रतिपदा ही भगवान
बुद्धांची फार महत्वाची शिकवण आहे. *भगवान बुद्धांना 'अनुत्पन्न मार्गाचे उत्पादक' आत्तापर्यंत शोध न
लागलेल्या मार्गाचे शोधक, आतापर्यंत
न जाणल्या गेलेल्या मार्गाचे जाणकार, आतापर्यंत न सांगितल्या गेलेल्या मार्गाचे उपदेशक, मार्गज्ञ, मार्गविद, मार्गकोविद असे म्हटले आहे, त्याचे कारण म्हणजे दुःखाचा
निरोध करण्याचा त्यांनी दाखविलेला आर्यअष्टांगिक मार्ग.*
*_दुःखनिरोधाकडे घेऊन जाणारा मार्ग म्हणजे दुःख निरोधगामिनी
प्रतिपदा होय. अभिधर्मकोषभाष्यात म्हटल्याप्रमाणे हा मार्ग सम्यक रीतीने प्रतिपादन
केला असल्यामुळे त्याला प्रतिपद असे म्हटले आहे. मार्गालाच निर्वाणाचे प्रतिपादन
केल्यामुळे प्रतिपद असे म्हटले आहे. गमनार्थाने मार्ग अभिप्रेत आहे. आचार्य
बुद्धघोष म्हणतात, या
मार्गाने निर्वाणाकडे वाटचाल केल्यावर दुःखनिरोध होऊ शकतो, म्हणून त्याला
दुःखनिरोधाच्या दिशेने घेऊन जाणारा दुःख निरोधगामिनी प्रतिपद असे म्हटले आहे. या
मार्गाने निर्वाणाकडे जाता येते. या मार्गाने गेल्यानेच दुःखनिरोधाचा लाभ होतो. हा
एकच मार्ग असल्याने त्याला दुःख निरोधगामिनी प्रतिपद असे म्हणतात._*
हा मार्ग विशुद्धीची, सदाचाराची आणि शिलाची शिकवण
देतो. सदाचाराची शिकवण देणारा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग, तो पुढीलप्रमाणे विभागला
गेला आहे.
*१) प्रज्ञा*
१) सम्यक दृष्टी
२) सम्यक संकल्प
*२) शील*
३) सम्यक वाणी
४) सम्यक कर्मान्त
५) सम्यक आजीविका
*३) समाधी*
६) सम्यक व्यायाम
७) सम्यक स्मृती
८) सम्यक समाधी
आर्यअष्टांगिक मार्गाचे बहुतेक
ठिकाणी शील, समाधी
आणि प्रज्ञा असे भाग केले असले तरी काही ठिकाणी *'विमुक्ती'*
धरून
त्याचे चार भाग केले आहेत. तर,
*संयुत्तनिकालात* त्यांत *'विमुक्ती ज्ञानदर्शन'* ह्या भागाला वाढवून त्याचे पाच भाग केले आहेत.
*शील*
शील म्हणजे विशुद्धीमार्ग. या
विशुद्धीमार्गानुसार चांगल्या जीवनाची पाच तत्त्वे आहेत.
१) कोणत्याही प्राण्यांची हिंसा न
करणे
२) चोरी न करणे
३) व्यभिचार न करणे
४) असत्य न बोलणे
५) मादक पेय ग्रहण न करणे
*यांनाच वारीत्तशील किंवा निषिद्धशील म्हणतात* वर दिलेली
पंचशिले ही वैयक्तिक आणि सामाजिक हित साधणारी आहेत. शील (पाली - सिल) हा शब्द एका
अर्थाने स्वभावधर्मवाचक असा आहे. पण तत्वज्ञानात *शील* शब्दाचा अर्थ नीतिमत्ता असा
होतो. ज्याची नीतिमत्ता चांगली आहे, जो नेहमीच नीतीने चालतो, ज्याचे बोलणे-चालणे नीतीला धरून आहे अशा माणसाला आपण
*शीलवान* असे म्हणतो. थोडक्यात *शील* म्हणजे माणसाच्या मनाची अशी घडण की ज्यामुळे
मनुष्य पापकर्मे (अकुशल कर्मे) करीत नाही; पुण्यकर्मे (कुशल कर्मे) करतो. *पटीसंभिदामग्गामध्ये
चेतनासिलं, चेतासिकं
सिलं संवारो सिलं अणि तक्कमो सिलं अशी शिलाची व्याख्या केली आहे.* चेतना आणि
चेतसिका ह्या मनाच्या स्थिती निदर्शक आहेत. संवार म्हणजे आवर किंवा आळा घालणे आणि
अणितक्कम म्हणजे उल्लंघन न करणे किंवा पाप न करणे, म्हणजेच कुशल कर्म करणे.
शील म्हणजे सम्मा वाचा, सम्मा कम्मांत आणि सम्मा
आजीविका. *शीलपालन केल्याने सर्वात मोठा फायदा म्हणजे शीलवान माणसाला पश्चात्ताप
करावयाची वेळ येत नाही.* त्याची कीर्ती सर्वत्र पसरते. त्याला समाधानाचे मरण येते, तो कोणत्याही बैठकीत मनात
कमीपणाची भावना बिलकुल न ठेवता तो धीटपणे बसू-उठू शकतो.
*अनुत्तरनिकायांत शिलांचे पालन न केल्याने पुढील पाच तोटे
होतात असे सांगितले आहे -*
१) कामधंद्यांकडे दुर्लक्ष झाल्याने
संपत्तीचा नाश होतो
२) स्वतःविषयाची अपकीर्ती ऐकावयास
लागते
३) राज्यकर्त्यांच्या, श्रमनांच्या, ब्राह्मणांच्या आणि
गृहस्थाच्या बैठकीत, विश्वासपात्रता
गमावली गेल्यामुळे निःसंकोचपणे भाग घेता येत नाही
४) मरताना मनाची अवस्था गोंधळलेली
असते
५) मेल्यानंतर दुर्गती मिळते
*शिलांचे चरित्त सिल म्हणजे आचारनिय शील आणि वारीत्त सिल
म्हणजे निषिद्धशील असे दोन भाग केले आहेत.* _महामंगलसुत्त, सिगालसुत्त, पराभवसुत्त, व्यग्गहपज्जासुत्त इत्यादी सुत्तातून गृहस्थ, गृहिणी, मुले वगैरे पाळावयाची
आचारशिले दिली आहेत.
*शिलपालनाचे कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम असे तीन भाग केले आहेत. कीर्तीच्या आशेने
पाळलेले शील कनिष्ठ, पुण्यलाभाच्या
आशेने पाळलेले शील मध्यम आणि 'हे
माझे कर्तव्यच आहे' अशा
भावनेने प्रज्ञापूर्वक पाळलेले शील उत्तम असे समजावे.* _सम्यक समाधी साधण्यासाठी
शील संपादन केले पाहिजे. शील संपादन केल्याशिवाय समाधीलाभ होत नाही._
*समाधी*
*समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता. समाधी हा शब्द सम् + आ +
धा असा बनला असून त्यांचा अर्थ एकत्रित करणव किंवा एककेंद्रीत करणे असा आहे आणि तो
मनाची एक विशिष्ट अवस्था दर्शवितो. तांत्रिकदृष्ट्या समाधी या शब्दात मनाची
विशिष्ट स्थिती आणि ती प्राप्त करण्याची पद्धती हे दोन्ही अर्थ अभिप्रेत आहेत.*
गोष्टी जशा आहेत तशा पाहणे याला बुद्धधम्मात फार महत्व आहे. ज्याने सम्यक समाधी
प्राप्त केली आहे तो 'वस्तुमात्र
वास्तवात जसे आहेत तसे पाहू शकतो'.
*गोष्टी सत्यस्वरूपात जशा आहेत तशा पाहिल्यानेच अनित्यता, अनात्मता आणि दुःख यांच्या
विषयीचा अनुभव येतो आणि ज्ञान मिळते. हे ज्ञान असल्याने आपोआपच
प्रतित्यसमुत्पादाच्या सिद्धांताप्रमाणे दुःख नष्ट होते.
*_माणसाचे मन स्थिर नसते. ते सहा इंद्रियविषयांत नेहमी रममाण
झालेले असते. गोष्टी आहेत तशा पाहण्यासाठी आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी मन
एककेंद्रीत करण्याचे चाळीस निरनिराळे प्रकार आहेत त्यांना कर्मस्थाने म्हणतात._*
*प्रज्ञा*
*प्रज्ञा म्हणजे कुशल विचारांसहित आलेले पूर्ण ज्ञान की
ज्याच्यायोगे दुःख आर्यसत्य,
प्रतित्यसमुत्पाद, आर्य अष्टांगिक मार्ग वगैरे
प्रयत्नाने यथार्थ ज्ञान होते,
म्हणून
सम्मा दिठ्ठी आणि सम्मा संकल्प यांचा समावेश प्रज्ञेत म्हणजे अंतर्ज्ञानात केला
जातो. वस्तुमात्र जसे आहेत तसे पाहणे म्हणजे प्रज्ञा अर्हतपद मिळविण्यासाठी, निर्वाण प्राप्त करण्यासाठी
किंवा दुःख नष्ट करण्यासाठी आवश्यक असलेल्या शील, समाधी आणि प्रज्ञा या पायऱ्यांतील प्रज्ञा ही शेवटची आणि
सर्वांत महत्वाची पायरी आहे.
*सत्य जाणणे हा प्रज्ञेचा स्वभावधर्म आहे; शोध करणे हे तिचे कार्य आहे; भ्रांतचित्त न होणे हा तिचा
आविष्कार आहे आणि आर्यसत्य जाणणे हे तिचे जवळचे कारण आहे.* _आचार्य बुद्धघोषांचे
मताप्रमाणे वस्तुमात्र जसे आहेत तसे जाणणे हा प्रज्ञेचा स्वभावधर्म आहे._
*प्रज्ञेपासून होणारे फायदे -*
१) शिलाचे महत्व कळते
२) समाधीची अत्युच्च पायरी गाठता
येते
३) आर्य अष्टांगिक मार्गावर प्रगती
करता येते
४) विशुद्ध जीवनाची फळे दिसू शकतात
५) सर्व वस्तुमात्रांचे यथार्थ
दर्शन होते
६) पाखंडी मताचे यथार्थ ज्ञान होते
७) लोभ, द्वेष आणि मोह याची मुळे
निपटून काढता येतात.
*_प्रज्ञेचे अनेक प्रकार सांगितले आहेत. वस्तुमात्रांचे
गुणधर्म जाणणारी एक प्रकारची प्रज्ञा लोकीय म्हणजे ऐहिक जगाचे ज्ञान देणारी आणि
लोकुत्तर म्हणजे अध्यात्मिक ज्ञान देणारी अशी दोन प्रकारची प्रज्ञा. आस्त्रवसहित
आणि आस्त्रवरहित ही दुसऱ्या दोन प्रकारची प्रज्ञा. चिंतामय, श्रुतमय आणि भावनामय ही तीन
प्रकारची प्रज्ञा. चिंतामय प्रज्ञा म्हणजे जी चिंतनावर आधारलेली आहे ती प्रज्ञा.
श्रुतमय म्हणजे जी दुसऱ्यांकडून शिकली जाते आणि जी पुस्तकी ज्ञानावर आधारलेली आहे
ती प्रज्ञा. भावनामय प्रज्ञा म्हणजे अपर्णासमाधीचा सतत अभ्यास केल्याने झालेल्या
बौद्धिक विकासातून स्वयंस्फुर्त येते ती भावणामय प्रज्ञा. चार आर्यसत्यांचे ज्ञान
आणि चार प्रतिसभ्भिदा यांच्या संबंधीची चार प्रकारची प्रज्ञा. पूर्वयोग, बहुश्रुत, देशभाषा, आगम, परितुच्छा, अधिगम, गुरुजनांचा आश्रय आणि
मित्रांची संगति हे प्रतिसभ्भिदाचे प्रत्यय आहेत._*
*दहा संयोजने*
आर्य अष्टांगिक मार्गाचे शील, समाधु आणि प्रज्ञा हे तीन
विभाग म्हणजेच शारीरिक, मानसिक
आणि बौद्धिक परिशुद्धता. *आर्य अष्टांगिक मार्गानुसार आचरण केलं म्हणजे पुढील दहा
संयोजनांचा किंवा बंधनाचा नाश होतो. ती दहा बंधने म्हणजे -*
१) सक्काय दिठ्ठी ('मी' 'माझा' 'माझी' ही जी आत्मभावाची दृष्टी
आहे तिला सत्काय दृष्टी म्हणतात,
कारण
पंचउपादानस्कंधांना सत्काय असे म्हटले आहे)
२) विचिकिच्छा (बुद्ध, धम्म आणि संघ यांविषयी शंका
किंवा अविश्वास)
३) सिलबत्तपरामास (स्नानादी
व्रतांनीच मुक्ती मिळेल असा विश्वास)
४) कामराग (कामवासना)
५) पटीघ (क्रोध)
६) रूपराग (ब्रह्मलोकादी प्राप्तीची
इच्छा
७) अरुपराग (अरुप देवलोक प्राप्तीची
इच्छा)
८) मान (अहंकार)
९) उद्धंच (भ्रांतचित्तता)
१०) अविज्जा (चार
आर्यसत्यांसंबंधीचे अज्ञान)
या दहा गोष्टींना संयोजने किंवा
बंधने असे म्हणतात. *आर्यअष्टांगीक मार्गाच्या अभ्यासाने या दहा संयोजनांचा नाश
झाला म्हणजे अर्हतपद प्राप्त होते आणि निर्वाणाचा साक्षात्कार होतो.*
*स्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी,
अर्हत*
स्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी, अर्हत अशा निर्वाणमार्गातील
चार पायऱ्या आहेत. शील, समाधी
आणि प्रज्ञा यांचा अभ्यास करून सत्कायदृष्टी विचिकित्सा आणि शीलव्रतपरामर्श या
पहिल्या तीन संयोजनांचा क्षय झाला म्हणजे मनुष्य स्रोतापन्न होतो. स्रोतापन्न
म्हणजे धम्मप्रवाहात आलेला मनुष्य श्रेष्ठ मनुष्य. तो धम्मप्रवाहात आल्यामुळे
कधीना कधी तरी त्याचा चित्तमल नाहीसा होऊन त्याला निर्वाणपद मिळणार. पहिल्या तीन
संयोजनांचा नाश करून काम, क्रोध
आणि मोह दुर्बळ झाले म्हणजे मनुष्य सकृदागामी होतो. सकृदागामीचा अर्थ सत्कृत्ये
करणारा असा होऊ शकेल. पहिल्या पाच संयोजनांचा नाश झाला म्हणजे मनुष्य अनागामी
होतो. सर्व संयोजनांच्या नाशाने मनुष्य अरहा (अर्हत) होतो. *_बुद्ध आणि अर्हत यांमधील
महत्वाचा फरक म्हणजे बुद्धाला निर्वाणाचा साक्षात्कार स्वप्रयत्नाने होतो, तर अर्हताला तो दुसऱ्याचा
उपदेसग ऐकून व त्याप्रमाणे प्रयत्न करून होत असतो._*
*_निर्वाण प्राप्त करून देणाऱ्या एकमेव आर्य अष्टांगिक
मार्गाबद्दल भगवान बुद्ध म्हणतात की, विशुद्ध ज्ञानाच्या प्राप्तीसाठी हा एकच मार्ग आहे, याशिवाय दुसरा मार्ग नाही.
या मार्गानुसार तुम्ही चाललात तर तुमच्या दुःखाचा अवश्य नाश होईल. तुम्ही स्वतःचे
दीपक व्हा. स्वतःलाच शरण जा. दुसऱ्या कोणालाही शरण जाऊ नका. तुमचे काम तर तुम्हाला
स्वतःलाच करावे लागणार आहे. तथागत केवळ मार्गदाते आहेत._*
*समाप्त*
No comments:
Post a Comment