Tuesday, 6 April 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ४२

 

*_प्रश्न ४२ - आत्मा नसेल तर माणसाचे मन म्हणजे काय? मन केवळ शरीरशास्त्रीय सत्य आहे काय?_*

 

 *उत्तर 👉*  होय, मन हे फक्त शरीरशास्त्रीय सत्य आहे. शरिराविना मन शक्य नाही. दया, करुणा, सारासार विवेक,  राग, लोभ, प्रेम, स्मृती, कल्पना, तर्क इत्यादी हे सर्व मनाचे आविष्कार होत. हे मन म्हणजे काय? ते शरीरात कोठे असते? मागच्या प्रश्नात वर्णन केल्या प्रमाणे रक्तात शोषलेला अन्नरस व ऑक्सिजन यांच्या संयोगातून शरीरभर मंद ज्वलन चालू असते.  या ज्वलनापासून उर्जेची निर्मिती होते. ही क्रिया शरीराच्या असंख्य पेशींत चालू असते. प्रत्येक पेशी जिवंत असते. पेशीला जीव असतो. वनस्पतींना जीव असतो. कीटकांना जीव असतो, मानवाला जीव असतो, मग यांच्यात फरक काय? जीव बरोबर मन असणे याचा अर्थ काय? वनस्पतींना चेतासंस्था व मेंदू नसतो. प्राण्यांना चेतासंस्था व मेंदू असतो. ज्यांना मेंदू व चेतासंस्था आहे, त्यांना मन आहे. वनस्पतींना मन नसते. चेतासंस्था व मेंदू किती विकसित आहे यावर मनाची पातळी ठरते. किड्यांची चेतासंस्था ही पूर्ण विकसित नसते. उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांतून चेतासंस्था विकास पावली. या अर्थी कीटकांना प्राण्यांना मन असते. पण ते पूर्णावस्थेत नसते. मेंदूच्या आकारमानावर मनाचा विकास अवलंबून असतो. माणसाचा मेंदू इतर प्राण्यांपेक्षा मोठा आहे. म्हणून मानवी मन प्रगत आहे. मेंदूत निरनिराळ्या ठिकाणी केंद्रे असतात. विशिष्ट केंद्र विशिष्ट प्रकारचा मानसिक आविष्कार करते. विविध भावनांची केंद्रे, स्मृति-केंद्र इत्यादी मेंदूच्या विविध भागांत असतात. ती ती केंद्रे उद्दीपित झाली की प्रेम, राग, हर्ष इत्यादी भावनांचा आविष्कार होतो. या अर्थी मन ही मेंदूतील प्रक्रिया असे म्हणता येईल. माणसांचे मन अमुक ठिकाणी शरीरात असते असे म्हणता येणार नाही. मन ही एक अमूर्त कल्पना आहे. भारत सरकार कोठे आहे या प्रश्नाचे उत्तर आपण काय द्याल? पार्लमेंट, विविध राज्यांच्या विधानसभा, रेल्वे, पोस्ट, टेलिफोन, कलेक्टर, तहसीलदार, संरक्षण मंत्री, इत्यादी या सर्वांचे मिळून भारत सरकार बनले आहे. प्रत्येक भारतीय माणूस हा भारत सरकार आहे. विविध ठिकाणांहून दिल्लीला संदेश जातात. देशात घटना घडतात त्याच्या प्रतिक्रिया देशभर उमटतात, दिल्लीहून प्रतिसंदेश सुटतात आणि देशात आणि विविध ठिकाणी चैतन्याचे आविष्कार घडतात. तसेच मानवी शरीरात घडते. विदयुत रासायनिक संवेदनाद्वारे मेंदू व शरीरातील विवध पेशीगट यांच्यात संदेशाचे आदान प्रदान होऊन शारीरिक हालचाली वा मानसिक आविष्कार घडतात. या अर्थी मन शरीरात सर्वत्र पसरलेले आहे. मेंदूपेशीद्वारे शरीरभर घडणाऱ्या विद्युत रासायनिक प्रक्रिया या शरीरभरच्या पेशीतच घडतात, म्हणून मन हे पेशी प्रक्रियेचा आविष्कार आहे. पेशींमधील उर्जा निर्मितीची प्रक्रिया थांबली की मन संपते. वरील विवेचनावरून मन शरीरापेक्षा वेगळे नाही; शरीराबरोबर संपते, हे सूज्ञांच्या लक्षात यावे.

 

*डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*

*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*

https://mikamblemahesh.blogspot.com/

No comments:

Post a Comment

घट सुत्त

 घट सुत्त (संयुक्त निकाय) _*संदर्भ*: सारिपुत्त व महामोग्गलान यांचा संवाद_ _*स्थान*: राजगृह, वेळुवन विहार_ _१.* सुत्ताचा संदर्भ व पार्श्वभूमी...