➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_परदेशीं जाऊन डौल मारणें सोपें असतें_*
*_(कटाहकजातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_एकदा
बोधिसत्त्व वाराणसी नगरींत अत्यंत धनाढ्य श्रेष्ठी जन्माला आला होता. वयांत
आल्यावर त्याला एक सुस्वरूप मुलगा झाला. त्याच दिवशीं त्याच्या दासीलाहि एक मुलगा
झाला. या *दासीपुत्राचें नांव कटाहक असें ठेवण्यांत आलें.* तो आपल्या मालकाच्या
मुलाबरोबरच वाढला. लहान मूल असल्यामुळें त्याला कोणी आडकाठी करीत नसत. पुढें
बोधिसत्त्वाच्या मुलाला अक्षर ओळख करून देण्यासाठीं एक शिक्षक ठेविला. तेव्हां
कटाहक देखील त्या शिक्षकाजवळ जाऊन आपल्या मित्राबरोबर लिहिण्यावाचण्यास शिकला.
त्याची हुषारी पाहून पुढें वयांत आल्यावर बोधिसत्त्वानें त्याला आपल्या तिजोरीचा
अधिकारी नेमिलें. तें काम तो मोठ्या दक्षतेनें करीत असे. तथापि त्याला अशी शंका
आली कीं, ''कितीहि झालें तरी
मी पडलों दासीपुत्र, माझा लहानसहान दोष देखील सर्वांना मोठा
वाटेल; व कदाचित् माझा छळहि करितील आणि पुनः माझ्याकडून
दासकर्म करवून घेतील. तेव्हां येथें रहाणें सुरक्षित वाटत नाहीं.''_
_दिवसें दिवस दुसर्या कोठेंतरी दूरच्या गांवी पळून जावें हा कटाहकाचा
विचार दृढ होत गेला. पण परक्या गांवीं निर्वाह कसा करावा याची त्यास पंचाईत पडली.
शेवटीं त्यानें एक युक्ति शोधून काढली. ती अशी- '' दूरच्या
एका लहानशा शहरांत श्रेष्ठीच्या ओळखीचा व्यापारी रहात असे. त्याचा आणि
बोधिसत्त्वाचा व्यापारासंबंधानें वारंवार पत्रव्यवहार होत असे. बोधिसत्त्वाच्या
तर्फे बहुधा कटाहकच हीं पत्रें लिहीत असे, व त्यांवर
बोधिसत्त्वाचा शिक्का मारून तीं रवाना करीत असे. अशाच एका प्रसंगीं त्यानें आपल्या
संबंधानें त्या व्यापार्याला पत्र लिहून त्यावर श्रेष्ठीचा शिक्का मारून तें बंद
करून आपल्या पदरीं ठेविलें व दोन चार दिवसांनीं वाराणसींतून पळ काढला. त्याच्याजवळ
जें द्रव्य होतें तें खर्चून वाटेंत त्यानें आपला निर्वाह चालविला आणि बरेंच दिवस
प्रवास करून व्यापारी रहात होता तें शहर गांठलें. व्यापार्यानें 'कोठून आलांत' असा प्रश्न केल्यावर तो म्हणाला,
''वाराणसी नगरींतील प्रसिद्ध श्रेष्ठीचा मी पुत्र आहें. माझ्या
थोरल्या भावामध्यें आणि मजमध्यें तंटा होऊं नये म्हणून माझ्या पित्यानें मला
आपणापाशीं पाठविलें आहे. आपणाला मुलगा नाहीं असें आम्हीं ऐकतों. तेव्हां आपण माझें
पुत्रवत् पालन करून आपल्या कन्येशीं माझा विवाह करून द्याल अशी माझ्या पित्याला
दृढ आशा वाटत आहे, व याचसाठीं मला त्यानें हें पत्र दिलें
आहे.'' असें म्हणून कटाहकानें तें पत्र त्या व्यापार्याला दिलें.
त्यांत हाच मजकूर होता. श्रेष्ठीनें आपला मुलगा बुद्धिमान असून व्यापारांत दक्ष
आहे, तेव्हां त्याला आपणाजवळ ठेऊन घेऊन आपला घरजांवई कराल
अशी आशा बाळगतों इत्यादि मजकूर लिहिला होता. तो वाचून त्या व्यापार्याला फारच
आनंद झाला. एवढ्या मोठ्या सावकाराचा मुलगा आपल्यासारख्या गरीब व्यापार्याचा
घरजांवई होणें मोठें भूषणास्पद आहे. तेव्हा पहिल्या मुहूर्तावर त्यानें कटाहकाशीं
आपल्या कन्येचें लग्न लावून दिलें._
_कटाहक जात्या
हुषार होता हें वर सांगितलेंच आहे. पण *आगंतुक श्रीमंतीमुळें त्याच्या अंगी एक
दुर्गुण शिरला होता.* तो ज्याच्या त्याच्या अंगावर तोंड टाकीत असे. लहानसहान
अपराधहि त्याला सहन होत नसे. भोजनसमयीं स्वयंपाकांत कांहीं कमतरता दिसून आली तर तो
आपल्या बायकोवर फार संतापत असे, व त्यामुळें त्या बिचारीला
उगाच त्रास सोसावा लागत असे. याशिवाय कटाहकाच्या वर्तनांत म्हणण्यासारखे दुसरे दोष
नव्हते._
_कटाहक पळून गेल्यावर श्रेष्ठीला वर्ष दोन वर्षे त्याचा पत्ता लागला नाहीं.
पण पुढें तो व्यापार्याच्या घरीं घरजांवई होऊन रहात आहे ही बातमी त्याला समजली,
व तिचा खरेपणा पाहण्यासाठीं त्यानें आपले हेर त्या शहरीं पाठविले.
त्यांनी जेव्हां बोधिसत्त्वाला कटाहकाचें इत्थंभूत वर्तमान सांगितलें, तेव्हां त्यानें तेथें जाऊन त्याची फजीति करून पुनः आपल्या घरीं आणण्याचा
निश्चय केला व त्याप्रमाणें आपल्याबरोबर मोठा सरंजाम घेऊन तो त्या शहरीं जाण्यास
निघाला. तो त्या शहरापासून कांहीं अंतरावर पोहोंचला नाहीं तों त्याच्या आगमनाचें
वर्तमान कटाहकाला समजलें, व तो अगदीं घाबरून गेला. श्रेष्ठी
या ठिकाणीं आला तर आपली पुरी फजीति होणार हें तो जाणून होता पण येथून दुसर्या
ठिकाणीं पळून जाणें हें देखील त्याला इष्ट वाटेना. कांहीं काळ कटाहक किंकर्तव्यमूढ
होऊन विवंचनेंत पडला. परंतु त्याच्या समयसूचकबुद्धीनें त्याला शेवटीं हात दिला. या
नवीन संकटांतून पार पडण्यास त्यानें नवीच युक्ति शोधून काढली. त्या दिवसापासून
आपल्या आप्तइष्टांजवळ तो पितृभक्तीचीं मोठमोठालीं वर्णनें करूं लागला. तो म्हणाला,
''अहो तुमचें हें शहर म्हणजे वाराणसीच्या मानानें नुसतें खेडेगांव
आहे. येथील लोकांना रीतरिवाज कांहींच माहीत नाहीं. पितृभक्ति कशी असते हें या
गांवढळ लोकांना कसें समजणार. तुम्ही एकदां वाराणसीला जाऊन पहा ! आम्हीं तेथें
आमच्या वडिलांसमोर कधींहि खालीं बसत नसतों. भोजनसमयीं त्यांची सर्व सेवा करतों.
पिकदाणी लागली तर आणून देतों. एवढेंच नव्हे तर वडील शौचाला जावयास निघाले; तर स्वतः त्यांजबरोबर त्यांच्या उपयोगासाठीं पाणी नेऊन ठेवितों. असलीं
कामें आम्ही आमच्या नोकरांवर मुळींच सोंपवित नसतों पण या गांवीं तुम्हाला अशा तर्हेनें
पितृसेवा करावी ही गोष्ट माहीत तरी आहे काय ?''_
_त्या शहरांतील
लोकांनीं वाराणसींत फार दिवस वास्तव्य केलें नसल्यामुळें व तेथील रीतिरिवाजाची
माहिती नसल्यामुळें कटाहक सांगेल तें त्यांना प्रमाण होऊन बसलें, व काशीच्या चालीरीतीसंबंधानें त्यांना एकप्रकारचा मोठा आदर वाटला._
_महाश्रेष्ठी
लवकरच त्या शहरीं पोहोंचणार हें जाणून कटाहक आपल्या सासर्याला म्हणाला, ''मामाजी, तुम्ही माझ्या पित्याच्या आदरातिथ्याची सर्व
तयारी करून ठेवा. मी पित्याच्या भेटीला आमच्या सामर्थ्यांप्रमाणें नजराणे घेऊन
जातों व मोठ्या गौरवानें त्याला तेथें घेऊन येतों. आपले वडील इतके जवळ आले आहेत
हें जाणून घरींच बसून राहणें हें वाराणसींतील कुलपुत्रांना अत्यंत अनुचित आहे.
तेव्हा मी आजच्या आज माझ्या पित्याच्या भेटीसाठीं जात आहे.''_
_बराच लवाजमा
बरोबर घेऊन तो महाश्रेष्ठीच्या दर्शनाला गेला. वाटेंत महाश्रेष्ठी एका ठिकाणीं
उतरला होता. तेथें कटाहकानें त्याची भेट घेऊन आपण आणलेले नजराणे दिले. श्रेष्ठीला
मोठा चमत्कार वाटला ! आपलें नांव ऐकल्याबरोबर कटाहकानें पलायन करावें किंवा
गर्भगळीत होऊन जावें, असें असतां हा दासीपुत्र मोठ्या
शौर्यानें आपल्याजवळ येऊन नजराणे देतो याचा अर्थ काय ? हें
त्याला समजेना. श्रेष्ठी या विचारांत गढून गेला असतां स्नानाची वेळ झाली, स्नानाच्यापूर्वी शौचविधीला जाण्याचा श्रेष्ठीचा परिपाठ असे. त्याप्रमाणें
श्रेष्ठी आपल्या ठाण्याजवळच्या जंगलांत जाण्यास निघाला. त्यावेळीं कटाहकानें
आपल्या लोकांना तेथेंच रहाण्यास सांगितलें, व तो उदकपात्र
घेऊन, श्रेष्ठीच्या मागोमाग गेला. वाराणसींतील कुलपुत्र
आपल्या पित्याची अनन्यभावें सेवा करीत असतात ही गोष्ट कटाहकाच्या सर्व नोकरांना
माहीत असल्यामुळें त्यांना त्याच्या या कृत्यानें मुळींच आश्चर्य वाटलें नाहीं.
श्रेष्ठी एकांत स्थानीं गेल्यावर कटाहकानें उदकपात्र खालीं ठेऊन त्याच्या पायावर
एकदम उडी टाकली; आणि म्हणाला, ''महाराज
मी जरी आपला दासीपुत्र आहें, तथापि आपल्या मुलासंगेंच माझें
आपण पालन केलें आहे. मी केलेले सर्व अपराध क्षमा करून येथें मला मुलाच्या
नात्यानें वागविल्यास माझ्यावर अत्यंत उपकार होईल. पण जर तुम्ही माझें कृत्य
उघडकीस आणाल तर त्यापासून कोणाचाच फायदा न होतां बिचार्या माझ्या सासर्याच्या
कुटुंबांत फारच गोंधळ उडून जाईल व त्यामुळें सर्वांना दुःख भोगावें लागेल.''_
_*बोधिसत्त्व फार
दयाळू होता.* त्याचें मन वळविण्यास कटाहकाला मुळीच आयास पडले नाहींत. शेवटीं
त्याजकडून आपलें दासीपुत्रत्व उघडकीला न आणण्याबद्दल अभिवचन घेऊन कटाहक तेथून
माघारा आला. त्या दिवसापासून तो श्रेष्ठीची दासाप्रमाणें सेवा करीत असे. श्रेष्ठी
व्यापार्याच्या घरीं आल्यावर देखील कटाहकानें त्याची सर्वप्रकारें सेवा केली व
त्याला प्रसन्न करून घेतलें._
_एके दिवशीं कटाहक कांहीं कामानिमित्त
बाहेर गेला असतां त्याची बायको बोधिसत्त्वाला भेटली. तेव्हां बोधिसत्त्व तिला
म्हणाला, ''काय सूनबाई, माझा मुलगा
तुम्हाला चांगल्या रीतीनें वागवतोना ?'' ती म्हणाली,
''मामंजी, आपल्या चिरंजीवाचा कोणताही दोष
नाहीं, त्यांचें माझ्यावर फार प्रेम आहे. केवळ भोजनप्रसंगीं
कधीं कधीं कांहीं पदार्थ वाईट लागला तर ते माझ्यावर संतापत असतात; हाच काय तो त्यांचा दोष आहे.'' ''मुली, माझा मुलगा लहानपणापासून असाच आहे. जेवण्याखाण्यांत त्याच्या फार खोडी
असतात पण तूं वाईट वाटूं देऊं नकोस. त्याचें तोंड बंद करण्याचा एक मंत्र मी तुला
शिकवून ठेवितों. तो तूं चांगला पाठ करून ठेव व जेव्हां माझा मुलगा तुझ्यावर
रागावेल तेव्हां तो म्हणत जा. एक दोनदां या मंत्राचा प्रयोग केला असतां माझ्या
मुलाची प्रकृति पाण्यापेक्षांहि थंड होईल हें मी तुला खात्रीनें सांगतों.''_
_श्रेष्ठी कांहीं
दिवस त्या व्यापार्याच्या घरीं राहून वाराणसीला जाण्यास निघाला. कटाहक
त्याच्याबरोबर बराच दूर अंतरावर गेला. व पुष्कळ नजराणे देऊन त्यानें त्याचा मोठा
गौरव केला; आणि मोठ्या आदरानें साष्टांग नमस्कार करून पुनः आपल्या
सासर्याच्या घरीं आला. या दिवसापासून त्याचा मान अधिकच वाढला. कां कीं, आतां त्याचें दासीपुत्रत्व उघडकीला येण्याचा संभव राहिला नाहीं. त्यामुळें
बिचार्या बायकोला भोजन प्रसंगीं अधिक त्रास होऊं लागला. एके दिवशीं आपल्या नवर्यासाठी
स्वहस्तानें चांगलें जेवण तयार करून तिनें वाढण्यास सुरुवात केली. पहिलाच पदार्थ
कटाहकाला आवडला नाहीं. तो फार संतापला. त्याच्या बायकोला सासर्यानें दिलेल्या
मंत्राची आठवण झाली व तिनें ताबडतोब त्याचा प्रयोग केला. ती म्हणाली ः-_
_*बहुंपि सो विकत्थेय्य अञ्ञं जनपदं गतो।*_
_*अन्वागन्त्वान दूसेय्य भुंज भोगे कटाहक॥*_
*अर्थ-* _दुसर्या देशांत जाऊन पुष्कळ बडबड
करतां येते. पण परत येऊन तो हें उघडकीस आणील. तेव्हां हे कटाहक मुकाट्यानें
मिळालेल्या पदार्थांचा उपभोग घे!_
_हा मंत्र कानीं पडल्याबरोबर कटाहक घाबरून
गेला. श्रेष्ठीनें आपल्या हीनत्वाबद्दल सर्व कांहीं हिला सांगून ठेविलें असलें
पाहिजे असें त्याला वाटलें. तेव्हांपासून बायकोवर संतापण्याची त्याची छाती झाली
नाहीं. इतकेंच नव्हें तर तो नम्र आणि सालस बनला, व किती वाईट
पदार्थ असला तरी त्यामुळें तो कधींहि चिडला नाहीं. जे काहीं मिळेल तेवढ्यानें
संतुष्ट राहून आपला वेळ त्यानें सत्कर्मी खर्च केला._
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*२७/११/२०२०*
No comments:
Post a Comment