बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला?
डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांनी कोटय़वधी अनुयायांसह केलेला बौद्ध धर्माचा स्वीकार ही क्रांतिकारक
घटना. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्माचे थोर उपासक, बौद्धधर्म प्रवर्तक
व महान बोधीसत्व होते. तसेच ते बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञ, विद्वान, लेखक व पुनरूत्थानक होते. एकेकाळी भारतातून
लूप्त झालेला बौद्ध धर्म डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा पुनर्जीवीत केला.
भारतीय बौद्धांपैकी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्यानंतर डॉ. आंबेडकरांनीच भारतीय बौद्ध धर्मासाठी सर्वाधिक कार्य
केलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या
आयुष्याच्या शेवटी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांना हिंदू धर्म सोडायचाच होता, पण इतके सगळे धर्म
अस्तित्वात असताना त्यांनी बौद्ध धर्मच का निवडला असा प्रश्न पडतो. बौद्ध धर्म इतर
कोणत्याही धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे,
तो मानवतावादी आहे, त्यात जातीभेद आणि अस्पृश्यता या गोष्टी नाहीत आणि त्यामुळेच बाबासाहेबांनी
बौद्ध धर्म स्वीकारला का?. तिची बीजं त्यांच्या मनात कशी रुजत गेली? बाबासाहेब हिंदू
धर्माचे विरोधक नव्हते, तर सर्वश्रेष्ठ सुधारक होते. धर्माची सामाजिक उपयुक्ततेच्या संदर्भात
चिकित्सा झाली पाहिजे असं त्यांना वाटत होतं. त्यासाठी त्यांनी जगातील सर्व प्रमुख
धर्माचा अभ्यास केलेला होता. विशेषत: हिंदू,
ख्रिश्चन, मुस्लीम व बौद्ध धर्माचा त्यांचा विशेष अभ्यास होता.
डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर यांच्या जेंव्हा लक्षात आले की प्रस्थापित हिंदू धर्मात
दलितांना बरोबरीचे स्थान मिळणे शक्य नाही,
तेंव्हा त्यांनी धर्मांतराचा निर्णय घेतला. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक
जिल्ह्यातील येवला येथे केलेल्या भाषणात 'मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही' अशी घोषणा केली. पण
त्यावेळी ते नक्की कोणता धर्म स्वीकारणार आहेत हे त्यांनी सांगितले नाही. आपल्या
घोषणेनंतर तब्बल २१ वर्षांनी त्यांनी नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म
स्वीकारला. ३० व ३१ मे १९३६ रोजी मुंबई इलाखा महार
परिषद मुंबई येथे घेण्यात आली. या परिषदेत धर्मातराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब
करण्यात आले. येवला येथील १९३५ मधील आपल्या भाषणाच्या
अगोदरच १९२९ साली त्यांनी आपल्या अनुयायांना सल्ला दिला होता की 'तुम्हाला सन्मान देईल
असा कोणताही धर्म स्वीकारायला हरकत नाही'.
१९३६ साली
अमृतसर येथे झालेल्या शीख मिशन परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले. 'हे भाषण मी हिंदू म्हणून
करणार असलेले शेवटचे भाषण असेल' असे बाबासाहेबांनी अगोदर जाहीर केले होते. त्यानंतर शीख धर्माबद्दल असलेली
आपली आपुलकी व्यक्त करण्यासाठी बाबासाहेबांनी आपला मुलगा व पुतण्या या दोघांनाही
हरमिंदर साहिब येथे पाठवले होते. हे दोघेही तेथे दीड महिन्यांहून जास्त काळ राहिले
होते. जून १९३६ मध्ये
बाबासाहेबांनी शीख धर्म स्वीकारण्याचा
निर्णय घेतला. त्यानंतर ते शीख मिशनच्या संपर्कात सतत राहू लागले. मुंबई
येथे धर्मांतरीत शीख विद्यार्थ्यांसाठी एक कॉलेज काढण्यावरही विचार झाला. बाबासाहेबांनी आपल्या १३ अनुयायांना शीख धर्माचा
अभ्यास करण्यासाठी अमृतसर येथे पाठवले. याच काळात पटियालाचे महाराज भूपिंदर सिंग
यांनी आपल्या बहिणीचे लग्न बाबासाहेबांच्या कुटुंबातील एखाद्या तरुणाशी लावण्याची
तयारी दाखवली. यामागे त्यांचा उद्देश दलित समाजातील न्यूनगंड दूर करून अभिमान तयार
करणे हा होता.
धर्मांतराच्या बाबतीत बाबासाहेबांनी जैन धर्माचाही विचार केला होता. पण शीख
धर्माबाबत ते जेवढे गंभीर होते, तेवढे जैन धर्माबाबत नव्हते. धर्मांतराच्या बाबतीत त्यांनी प्रसिद्ध जैन आचार्य
शांतीसागर यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. पण शांतीसागर यांनी अशा प्रकारच्या
धर्मांतरास नकार दिला. पण याच काळात दुसरे कांही जैन साधू दलित समाजात जैन धर्माचा
प्रचार करत होते, आणि त्यांनी अनेक दलितांना जैन धर्मात प्रवेशही दिला होता. विशेषत: मध्य
प्रदेश, राजस्थान या भागात
अनेक दलितांनी जैन धर्म स्वीकारला होता. महाराष्ट्रातही अहमदनगर जिल्ह्यात एका जैन
मुनींच्या प्रयत्नामुळे कांही दलितांनी जैन धर्म स्वीकारला होता. पण बाबासाहेब जैन
धर्माबाबत फारसे गंभीर नव्हते असे दिसते.
बाबासाहेबांवर मुंजे, कुर्तकोटी शंकराचार्य
वगैरेंच्या कडून आणि एकूणच हिंदू समाजाकडून धर्मांतराच्या बाबतीत खूप मोठे दडपण
होते. बाबासाहेबांनी हिंदू धर्म अवश्य सोडावा,
पण त्यांनी इस्लाम किंवा ख्रिस्ती हे धर्म स्वीकारू नयेत अशी त्यांची इच्छा
होती. बाबासाहेबांचीही या दोन धर्मांच्या बाबतीत नकारात्मक भूमिका होती. त्यामुळे
भारतात जन्मलेले जैन, बौद्ध, शीख धर्म हेच
त्यांचे पर्याय होते. त्यांनी पहिला पर्याय म्हणून शीख धर्मच निवडला होता. तिथे सुरवातीला त्यांचे
स्वागत झाले होते, पण पुढे अकाली दलाने एकमुखाने अशा धर्मांतरास नकार दिला. बहुधा असा अनुभव
पुन्हा येवू नये म्हणूनच बाबासाहेबांनी जैन धर्माचा पर्याय सोडून दिला असावा.
अशा परिस्थितीत धर्मांतरासाठी बौद्ध धर्म हाच एकमेव पर्याय उरला होता. या
धर्माच्या बाबतीत पथ्यावर पडलेली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे बौद्ध धर्मात यायला त्यांना
विरोध करायला, नकार द्यायला
कोणीच शिल्लक नव्हते, कारण त्यावेळी भारतात बौद्ध धर्माचे अस्तित्व जवळ जवळ नव्हतेच. डॉ. आंबेडकरांच्या बालपणापासून त्यांचेवर झालेल्या मानसिक व
बौद्धिक विकासाची वाटचाल पाहिली तर भगवान बुद्धांशी त्यांची बालपणीच मैत्री झाली होती.
दादासाहेब केळुसकरांनी १८९८ साली प्रसिद्ध केलेले मराठीतील
बुद्धाचे चरित्र बाबासाहेबांना मॅट्रिक झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार समारंभात
अर्पण केले. १९१२ साली बी.ए. होईपर्यंत डॉ. बाबासाहेबांनी मुंबईतील सर्व ग्रंथालये
पालथी घालून मॅक्समुलर, हॉगसन यांची गौतम बुद्धावरील पुस्तके, सर एडविन अर्नाल्ड
यांचे ‘लाइट ऑफ एशिया’ हे बुद्धाचे काव्यमय
चरित्र यांचे सूक्ष्म वाचन केले. पी. लक्ष्मी नरसू यांचे इसेन्स ऑफ बुद्धिझम हे
पुस्तक १९०७ साली प्रसिद्ध झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे पुस्तक १९४८
साली पुन्हा प्रसिद्ध करताना म्हटले की,
‘‘हा ग्रंथ आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या सर्व
ग्रंथांत सर्वोत्कृष्ट आहे.’’ कोलंबिया विद्यापीठाला सादर केलेल्या एम.ए.च्या शोधनिबंधाचा
विषय एन्शट इंडियन कॉमर्स होता. त्या निबंधात प्राचीन भारताच्या समृद्धीचे
स्पष्टीकरण करताना त्यांनी बौद्ध धर्म ग्रंथांचे आधार सादर केले होते. बट्राँड
रसेल यांच्या सामाजिक पुनर्घटनेची मूलतत्त्वे या पुस्तकांचे परीक्षण करताना डॉ.
आंबेडकरांनी म्हटले हाते की, ‘‘प्रत्येक माणसाला स्पर्धा आवश्यक आहे. अडथळे, अडचणी पार करून विजय
मिळविल्यामुळे त्याच्या अंतर्गत प्रवृत्ती-शक्ती कार्यप्रवण होतात. त्यातून त्याला
आपण विकास करीत असल्याची जाणीव होत राहते.’’
हे विवेचन बौद्ध तत्त्वज्ञानाशी पूर्णत: सुसंगत आहे असे आढळून
येते.
१९३३ साली
गोलमेज परिषदेच्या निमित्ताने इंग्लंडमध्ये असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मुस्लीम आणि अन्य
अल्पसंख्य वर्गाशी जवळचे संबंध प्रस्थापित केले असले तरी इस्लाम धर्म
स्वीकारण्याचा माझा विचार तर नाहीच,
परंतु बुद्ध धर्माच्या स्वीकारासंबंधी मी विचार करीत आहे’ असे मनोगत त्यांनी
व्यक्त केले होते.
१९३५ च्यापूर्वी हिंदू पुढाऱ्यांशी झालेल्या भेटीगाठीत हिंदू
संस्कृतीचे नुकसान होईल असा धर्म मी स्वीकारणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली
होती. ३० मे १९३६ रोजी जातपात तोडक मंडळाकरिता केलेल्या भाषणात अस्पृश्यांनी
बुद्धवचन लक्षात घेतल्यास त्यांना मुक्तीचा मार्ग सापडेल असे प्रतिपादन केले.
म्हणजेच बुद्ध धर्म स्वीकारण्याचा विचार १९३६ पूर्वीच निश्चित झाला असल्याचे दिसून
येते. २ मे १९५० रोजी दिल्लीच्या बुद्ध विहारात वैशाखी पौर्णिमेनिमित्त भाषण
करताना व पत्रकारांशी बोलताना त्यांनी बौद्ध धर्म घेण्याचा आपला विचार आहे असे
सूचित केले होते. एप्रिल-मे १९५०च्या महाबोधिमध्ये ‘बुद्ध आणि त्याच्या धर्माचे भवितव्य’ या लेखात डॉ.
बाबासाहेब म्हणाले, ‘‘जग जर कोणता धर्म स्वीकारू शकेल तर तो बुद्ध धर्म होय’’. रॉयल एशियाटिक
सोसायटीतील एका भाषणात त्यांनी ‘मला माझ्या बालपणापासून बुद्ध धर्माची आवड आहे’ असे सांगितले. डॉ.
बाबासाहेब आंबेडकर जेव्हा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले त्या वेळेस
त्यांच्याबरोबर अन्य पुस्तकांबरोबर भगवान बुद्धावरील बरीचशी पुस्तके होती व ‘मी ही पुस्तके
वारंवार वाचीत असे’ असे त्यानी नंतर नमूद करून ठेवले आहे.
डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांना धर्माबद्दल आस्था आणि आशा होती. ते जरी निरीश्वरवादी असले तरी
धर्माबद्दल सकारात्मक होते. व्यक्तीच्या आयुष्यात, विशेषत: गरीब व दु:खी व्यक्तींना संकटप्रसंगी
धर्म जगण्यासाठी आशा देत असतो. म्हणून ते धर्म नाकारत नसून धर्माची कसोटी
उपयुक्तता व न्याय यावर तपासतात. गांधीजींच्या
भूमिकेला उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात,
‘‘मनुष्यमात्राला धर्म
आवश्यक आहे, हे गांधीजींचे
म्हणणे मला मान्य आहे. परंतु एखादा धर्म एखाद्या व्यक्तीला तिच्या खऱ्या
धर्माविषयीच्या कल्पनेला अनुसरून स्वत:च्या व्यक्तिविकासाला व कल्याणाला
स्फूर्तिप्रद होणारा व आपल्या वागणुकीचे ज्या नियमांनी नियमन करणे तिला श्रेयस्कर
वाटते, त्या नियमांचा
अंतर्भाव करणारा असा नसेल तर तो केवळ आपल्या बापजाद्यांचा धर्म म्हणूनच तिने
त्याला चिकटून राहिले पाहिजे हा मात्र त्यांचा दंडक मुळीच कबूल नाही.. धर्मातर
करण्याचा माझा निश्चय हा झालाच आहे. बहुजन समाज माझ्या पावलावर पाऊल ठेवून येईल की
नाही याची मला पर्वा नाही. तो प्रश्न त्यांचा आहे. त्यांना त्यात हित वाटत असेल तर
ते माझे अनुकरण करतीलच.’’ त्याचबरोबर डॉ. आंबेडकरांनी सावधानतेचा इशारा देऊन स्पष्ट केले
की ‘‘थोडे थोडे फुटून
परधर्मात जाल तर तुमचे नुकसान होईल. सात कोटींनी गटाने धर्मातर केले पाहिजे.
तुम्ही सर्व आलात तरच मला तुमचे काही हित करता येईल. त्यासाठी वेळ हा लागणारच आणि
तेवढा वेळ मी थांबणार आहे.’’ डॉ. आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘‘हिंदू धर्म हा मुळी
धर्मच राहिलेला नाही.’’
आपले धर्मातराविषयीचे ठाम मत विविध अंगांनी डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांनी सोदाहरण पटवून दिले. ते म्हणतात, ‘‘माणूस धर्माकरिता
नाही. धर्म माणसांकरिता आहे. माणुसकी प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मातर करा.
संघटन करावयाचे असेल तर धर्मातर करा. समता,
स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यायचे असेल तर धर्मातर करा. जो धर्म
अशिक्षितांना अशिक्षित राहा, निर्धनांना निर्धन राहा अशी शिकवण देतो तो धर्म नसून ती शिक्षा
आहे.’’ नागपूर येथे १४
ऑक्टोबर १९५६ रोजी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर १५
ऑक्टोबर १९५६ रोजी सकाळी केलेल्या ऐतिहासिक भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी
नागपूर शहर निवडण्याचे कारण सांगताना म्हटले की,
‘आर्याचे भयंकर शत्रू
असलेल्या नाग लोकांनी भारतात बौद्ध प्रसार केला. आर्य लोकांचा अत्याचार सहन
करणाऱ्या नाग लोकांना गौतम बुद्धांच्या रूपाने महापुरुष भेटला. नागांच्या
वस्तीमध्ये वाहणारी ‘नाग’ नदी आहे. म्हणून त्या शहरास नागपूर म्हणजे नागाचे गाव असे
म्हणतात. हे स्थळ निवडण्याचे हे मुख्य कारण आहे.’’ ‘मनुस्मृती’मध्ये चातुर्वण्र्य सांगितले आहे. हिंदू
धर्मामध्ये समता नाही. हिंदू धर्माच्या विचित्र वर्णव्यवस्थेने सुधारणा होणे शक्य
नाही. उत्कर्ष हा फक्त बौद्ध धर्मातच होऊ शकेल. बौद्ध धर्मात ७५ टक्के ब्राह्मण
भिख्खू होते. सागरात गेल्यावर जशा सर्व नद्या एकजीव व समान होतात त्याप्रमाणे
बौद्ध संघात आले म्हणजे आपली जात जाते व सर्वजण समान असतात, असे समतेने सांगणारा
एकच महापुरुष म्हणजे भगवान बुद्ध होय,’’
डॉ. बाबासाहेब
पुढे म्हणाले की..
‘‘या देशामध्ये दोन
हजार वर्षे बौद्ध धर्म होता. खरे म्हणजे यापूर्वीच आम्ही बौद्ध धर्मात का गेलो
नाही याचीच आम्हाला खंत वाटते. भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अजरामर आहेत.
कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.’ ‘देव व आत्मा यांना बौद्ध धर्मात जागा नाही. दु:खाने पिडलेल्या
गरीब माणसांना मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य आहे.’’
बौद्ध धर्म
स्वीकारण्यापूर्वी ते हिंदू धर्माची चिकित्सा करतात, कारण त्यांना धर्माच्या व्यक्तिगत
आवश्यकतेपेक्षा किंवा व्यक्तिगत गरजेपेक्षा धर्माची सामाजिक उपयुक्तता महत्त्वाची
वाटत होती. हिंदू धर्मानं व्यक्तीला आत्ममग्न करून टाकलं होतं. तो स्वत: पलीकडे
बघायलाच तयार नव्हता. तेव्हा स्वत:च्या पलीकडे जाऊन बघणारा धर्म त्यांना हवा होता.
या देशात हिंदू धर्मानं सामाजिक समता व न्यायाचं उत्तरदायित्वच नाकारलेलं होतं.
त्यामुळेच अस्पृश्यता व वंचितता ही काहीच्या वाट्याला आलेली होती. ती नष्ट करणं व
समता, स्वातंत्र्य, बंधता व न्याय
प्रस्थापित करणं अपेक्षित होतं.
बाबासाहेबांनी पाश्चिमात्त्य देशात शिक्षण घेतल्यामुळे
धर्माबद्दलच्या पारंपरिक धर्मसंकल्पना त्यांना मान्य नव्हत्या. ते म्हणतात, कोणताही धर्म पुढील कसोटीवर
तपासून घेतला पाहिजे. जसं - नाकारण्याचं स्वातंत्र्य आहे, तसंच नवीन धर्मात काय स्वीकारावं
हेही स्वातंत्र्य असलं पाहिजे. म्हणून तर त्यांनी पारंपरिक बौद्ध धर्म नाकारून
बौद्ध धम्माचा स्वीकार केला. त्यांनी ‘बुद्ध अँड हिज धम्म’ हा ग्रंथ त्यासाठीच लिहिला.
बाबासाहेब व्यक्तीची सर्व बंधनातून मुक्तता, धर्माची सामाजिक उपयुक्तता व वैयक्तिक
नीतिमत्ता या दृष्टीनं धर्माकडे पाहत होते.
बाबासाहेबांनी बौद्ध धर्म जशास तसा स्वीकारलेला नाही, त्याचीही चिकित्सा केलेली होती.
ते धर्माचे टीकात्मक विवेचन करतात. हिंदू, ख्रिश्चन, मुस्लीम हे धर्म ईश्वरवादी आहेत. या
धर्माचे संस्थापक स्वत:ला ईश्वराचे प्रेषित मानतात. ते व्यक्तीला आत्ममग्न करतात.
सामाजिक नीतिमत्ता सांगून व्यक्तिगत स्वातंत्र्य बंदिस्त करतात. जैन धर्मात टोकाची
अहिंसा सांगितलेली आहे. व्यवहाराच्या पातळीवर ही अहिंसा शक्य नाही. आंबेडकरांच्या
मते, अहिंसा हे
तत्त्व असावं, नियम असता
कामा नये. म्हणून ते सम्यक, निरीश्वरवादी, विज्ञानवादी, कर्मवादी, स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय मानणाऱ्या बौद्ध
धम्माचा स्वीकार करतात. त्यांच्या मते, बुद्ध हा मोक्षदाता नसून मार्गदाता आहे.
बाबासाहेबांनी पारंपरिक बौद्ध धर्मही चिकित्सा करून काही
पातळीवर नवीन अर्थाच्या संदर्भात स्वीकारलेला आहे. ‘धर्मक्रांती’ करण्याची एकमेव ताकद बौद्ध धर्मात
त्यांना आढळली. व्यक्तिगत, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक या सर्व गुलामगिरीचे
आधार बुद्ध नाकारतो. स्वातंत्र्य, समता, बंधुता व
न्याय ही आधुनिक लोकशाहीला पूरक असलेली मूल्यं बौद्ध धर्मात आढळली म्हणून त्यांनी
बौद्ध धम्म स्वीकारला. बाबासाहेबांचं धर्म स्वीकारण्यामागचं प्रयोजन हे व्यक्तीला
धार्मिक कर्मकांडापासून दूर ठेवून विज्ञान व नीतीतत्त्व याची सांगड घालणं, तसंच धर्माची सामाजिक उपयुक्तता
किंवा संदर्भ त्यांना महत्त्वाचा वाटत होता.
बाबासाहेबांनी बुद्ध की मार्क्स याऐवजी बुद्धाला स्वीकारलं.
त्यांनी पूर्णपणे जडवादी मार्क्स जरी नाकारला पण मार्क्स बुद्धाला समीप आहे, पण पर्याय नाही हेही सांगितलं.
दोघंही दु:ख व शोषण मुक्तीचीच भाषा बोलतात. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मुल्यं जगाला फ्रेंच
राज्यक्रांतीमुळे समजलेली असली, तरी त्यांना ती बुद्धानं सांगितलेल्या धम्म तत्त्वज्ञानात
सापडलेली आहेत. ‘बुद्ध आणि
मार्क्स’ या ग्रंथात
आंबेडकर नमूद करतात की, फ्रेंच
क्रांती समता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरली, रशियन क्रांतीनं बंधुता व
स्वातंत्र्याचा बळी देऊन समता स्थापण्याचा प्रयत्न केला, पण बौद्ध धम्मात मात्र
स्वातंत्र्य, समता व
बंधुता ही तीन्ही मुल्यं एकत्र येतात. साम्यवादात या तिन्हींपैकी एक असेल, पण बौद्ध धम्मात तीनही एकत्र
असतील.
बाबासाहेब बौद्ध धम्मातील महत्त्वाच्या संकल्पना नाकारत नाहीत, पण त्याचा पारंपरिक आशय बदलून
वैज्ञानिक आशय स्वीकारतात. त्यांची धर्मांतरामागची अपेक्षा अशी होती की, सापेक्ष ईहवादी, धर्मनिरपेक्ष व कर्मकांडविरोधी
असलेल्या बौद्ध धर्माच्या अनुसरणामधून दलितांना चिकटलेलं पिढीजात गौणत्व नष्ट होईल
आणि आधुनिक दृष्टीनं जगाकडे पाहणं त्यांना शक्य होईल. परंतु आंबेडकरांचं हे स्वप्न
त्यांच्या तथाकथित अनुयायांनी आणि दलित समाजाच्या मागास मानसिकतेनं पार धुळीस
मिळवलेलं दिसतं. नव्या धर्मानं दलितांचं मानुषीकरण होण्याऐवजी त्या धर्माचं
दलितीकरण व पारंपरिक आविष्करण घडून येत आहे.
बाबासाहेबांनी त्यांच्या अनुयायांना धर्मविरहित धम्म दिला. ते
म्हणत, समाज
धर्मासाठी नसून धर्म समाजासाठी आहे. म्हणून धर्माची सामाजिक हिताच्या
दृष्टिकोनातून चिकित्सा झाली पाहिजे. बाबासाहेब अशा धर्माच्या शोधात होते की, जो धर्म असूनही ईश्वरवादी असणार
नाही, आध्यात्मिक
असूनही विज्ञाननिष्ठ असेल. त्याचा पाया ज्ञानाचा असेल, धर्म त्यांना तर्काच्या व
बुद्धीच्या कसोटीवर स्वीकारायचा होता. आणि बौद्ध धर्म या सर्व बाबतीत इतर
धर्मापेक्षा अधिक स्वीकार्य वाटला.
जातीचं वास्तव दुहेरी असतं. ते जेवढं भौतिक असतं तेवढंच
मानसिकही असतं. सामाजिक-आर्थिक लढ्याच्या माध्यमातून कदाचित भौतिक वास्तव बदलता
येईल. पण जातीचं मानसिक वास्तव जर बदलायचं झालं तर बौद्ध धर्माचा स्वीकार हाच एक
मार्ग बाबासाहेबांना दिसत होता. बौद्ध धर्माच्या ध्वजाखाली सर्व शूद्रातिशूद्र
जाती एकवटल्या तर त्यांच्या पृथक जातीय अस्मिता गळून पडतील आणि त्या सर्वांचा एक
जातीविहीन वर्ग तयार होईल. म्हणजे त्यांना बौद्ध धम्म, धम्म-वर्ग मानसिकतेतून हवा होता.
धम्म समाजपरिवर्तनासाठी त्यांना हवा होता. इहलौकिक जीवनाला व मानवी मूल्यांना
महत्त्व देणारा एक अनिश्वरवादी व गतीशील धर्म म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची
निवड केली होती. जातीमुक्त समाजच खऱ्या अर्थानं लोकशाही समाज असतो. कारण जातीय
समाजात बहुसंख्याक जातीचं कायम बहुमत असल्यामुळे खरी लोकशाही तिथं नांदूच शकत
नाही. बौद्ध धम्माबद्दल बाबासाहेबांच्या जन्मभराच्या व्यापक चळवळीचा एक भाग
म्हणूनच त्याकडे पाहिलं पाहिजे.
बौद्ध धम्म हा जनवादी आहे. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे धम्माचं मध्यवर्ती सूत्र आहे, त्यानेच
प्रथम दलित-शोषित जनसामान्यासाठी आपली कवाडं खुली केली. बौद्ध धम्म हा केवळ ‘जगात दु:ख आहे’ एवढं सांगून थांबत नाही, तर इतर कोणत्याही गोष्टीप्रमाणे ‘दु:खालाही कारण असतं’ आणि त्या कारणांचं निराकरण करून
दु:खाचं निरसन करणं शक्य असतं, हा आशावाद तो माणसाला देतो. मानवी प्रज्ञेला आणि विचारक्षमतेला
तो वेसण घालत नाही. निवड स्वातंत्र्य व निवडीचे निकष तो पुरवतो. जे तर्काला व
बुद्धीला पटेल तेच घ्यायचं आणि जे पटणार नाही ते सोडून द्यायचं, असं तो बजावतो.
बाबासाहेबांची भूमिका धर्मचिकित्सकाची होती. तर्काला पटेल ते
स्वीकारण्याचं आणि न पटेल ते नाकारण्याचं धम्मात दिलेलं स्वातंत्र्य घेऊनच ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा ग्रंथ त्यांनी नवदीक्षितांना
मार्गदर्शन करण्यासाठी लिहिला आहे.
आम्ही बौद्ध धर्मच का स्विकारला या छोटेखानी पुस्तिकेत स्वतःच्या
भूमिकेचे विवेचन करताना बाबासाहेब म्हणतात की, माझ्या समाजात अजून शिक्षणाचा शिरकाव अतिशय कमी आहे. त्यांना
प्रगतीपथावर नेण्यासाठी सुशिक्षण गरजेचे आहे. मनुष्यमात्र हा आशेवर जगत असतो. आशा
ही श्रद्धेतून मिळते. श्रद्धा ही त्याच्या ठायी असलेल्या धर्मातून मिळते. येथे
धर्म म्हणजे कोणतेही कर्मकांड अपेक्षित नसून तो मला जीवन जगण्याची एक आदर्श पद्धती
म्हणून अपेक्षित आहे. ती अशी एक आदर्श पद्धती असेल ज्यात वैज्ञानिक विचारांनाच
मुख्य आधार असेल. तर्काने गोष्टी आणि प्रश्न सोडवले जातील. आणि त्यातून मिळणारी
आशा ही मनुष्याला भविष्यासाठी प्रेरित करत राहील. मला बुद्धाच्या धम्मामध्ये या
साऱ्या गोष्टी आढळतात. मी बुद्धाचा स्विकार करून या देशावर एक प्रकारे उपकारच करत
आहे. बुद्ध याच मातीतला. प्रतिक्रांतीमुळे काही काळासाठी अदृश्य होता. आम्ही
त्याचे पुनरूज्जीवन करत आहोत. त्याहीपेक्षा कोणत्याही प्रकारच्या भेदांना थारा
नसणाऱ्या एका महान अशा परंपरेत आणि आदर्श पद्धतीमध्ये आम्ही प्रवेश करत आहोत. जसे
महासागरात सर्व नद्या एकत्रित झाल्यानंतर त्या नद्यांचे अस्तित्व उरत नाही तसेच
आम्ही जाती सोडून बुद्ध नावाच्या महासागरात जाणार आहोत. त्यानंतर आमचे जातींचे अस्तित्वच नष्ट
झालेले असेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश ब्रॉडकास्टींग कार्पोरेशनवर १२ मे, १९५६ रोजी केलेले
भाषण...
"मला बुद्ध धम्म का आवडतो ?
मला दिलेल्या थोड्या वेळात मला दोन प्रश्नांची उत्तरे देण्यास
सांगितले आहे...
पहिला प्रश्न : "मला बुद्ध धम्म का आवडतो ?" आणि
दुसरा प्रश्न : "वर्तमानस्थितीत तो जगाला कसा उपयोगी आहे ?"
"मला बुद्ध धम्म आवडतो, कारण त्यामध्ये इतर
कुठल्याही धर्मात नाहीत अशी तीन तत्त्वे एकत्रितपणे शिकविण्यात आली आहेत. इतर सर्व
धर्म हे ईश्वर आणि आत्मा आणि मृत्यूनंतरचे जीवन यामध्येच गुंतलेले आहेत. बुद्ध
धम्म प्रज्ञेची (अंधश्रद्धा आणि दैववाद याऐवजी समजदारपणा किंवा ज्ञान) शिकवण देतो.
तो करूणा (प्रेम) शिकवितो, तो समता शिकवितो. पृथ्वीवरील चांगल्या आणि सुखी जीवनासाठी मानवाला
हेच आवश्यक असते. बुद्ध धम्माची ही तीन तत्त्वे मला प्रभावित करतात. ही तीन
तत्त्वे सर्व जगाला प्रभावित करतील. ईश्वर आणि आत्मा हे समाजाचे संरक्षण करू शकत
नाहीत."
जगात आणि विशेषतः दक्षिणपूर्व आशियाला आकर्षित करू शकणारी तिसरी
गोष्ट बुद्ध धम्मात आहे. जगावर कार्ल मार्क्स आणि साम्यवाद, ज्याचा तो निर्माता
आहे, यांचा जोरदार हल्ला
झाला आहे. हे अत्यंत गंभीर असे आव्हान आहे. मार्क्सवाद आणि साम्यवाद हे ऐहिक
विषयांशी संबंधित आहेत. त्यांनी सर्व राष्ट्रांच्या धार्मिक संस्थांचा पाया खिळखिळा
केला आहे. ऐहिक व्यवस्थेशी जुळलेले नसताना सुद्धा धार्मिक व्यवस्थेसाठी ही आज
स्वाभाविक बाब आहे की, धार्मिक व्यवस्थेवरच लौकीक व्यवस्था अवलंबून असते, लौकीक व्यवस्था ही
धर्माच्या आशेशिवाय अधिक काळ टिकू शकत नाही, ती किती दूर असली तरी...
दक्षिणपूर्व आशियातील बौद्ध राष्ट्रे साम्यवादाकडे वळल्यामुळे मी
फारच आश्चर्यचकीत झालो आहे. याचाच अर्थ ते बुद्ध धम्म काय आहे हे जाणत नाहीत असा
होतो. बुद्ध धम्म हा मार्क्स आणि त्याचा साम्यवाद यांना पूर्णपणे उत्तर आहे असा मी
दावा करतो.
रशियन प्रकारचा साम्यवाद हा रक्तरंजित क्रांतीमुळेच घडून येऊ शकतो.
बुद्धाने सांगितलेला साम्यवाद हा रक्तविहीन मानसिक क्रांतीने घडून येतो. ज्यांना
साम्यवाद अंगिकारायचा आहे त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, भिक्खूसंघ ही
साम्यवादी संघटना आहे. तेथे खाजगी संपत्तीला स्थान नाही. यामुळे हिंसा घडून आली
नाही. मनातील बदलामुळे हे शक्य झाले आणि ही व्यवस्था २५०० वर्षे टिकून राहिली.
त्या व्यवस्थेचा -हास झाला तरी ते विचार अजूनही जीवंत आहेत. रशियन साम्यवादाने या
प्रश्नाचे उत्तर द्यायला हवे. त्यांना अजूनही दोन प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक
आहे.
पहिला प्रश्न आहे : साम्यवादी
व्यवस्था ही नेहमीकरिता का आवश्यक आहे ? रशियन लोक कधीही करू शकले नसते असे कार्य त्यांनी केले आहे हे मान्य
केले पाहिजे, परंतु जेव्हा हे
कार्य घडून आले आहे तेव्हा लोकांनी बुद्धाने शिकविलेल्या प्रेमासह स्वातंत्र्य का
उपभोगू नये ? दक्षिणपूर्व आशियातील
राष्ट्रांनी रशियाच्या जाळ्यात उडी मारण्यापूर्वी काळजी घ्यावी. ते कधीही त्या
जाळ्यातून बाहेर पडणार नाहीत. त्यांना बुद्धाने काय शिकविले याचा अभ्यास करणे
आवश्यक आहे. बुद्धाच्या शिकवणीला त्यांनी राजकीय स्वरूप देणे आवश्यक आहे.
दारिद्य्र आजही आहे आणि ते नेहमीसाठी राहिल. रशियामध्येही दारिद्य्र आहे. तथापि, दारिद्य्र मानवी
स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे कारण होऊ शकत नाही...
दुर्दैवाने बुद्धाची शिकवण ही योग्य प्रकारे समजून घेण्यात आली नाही, त्यांची शिकवण ही
सिद्धांत आणि सामाजिक सुधारणा यांचे मिश्रण होते, हे लोक पूर्णपणे विसरलेले आहेत. बुद्ध
धम्म हा एक सामाजिक संदेश आहे याची जाणीव झाली की, त्याचे पुनरूज्जीवन हे चिरकाली ठरून
बुद्ध धम्म हा प्रत्येक व्यक्तीसाठी आकर्षणाची बाब कां हे जग जाणायला लागेल...
संकलन : महेश
कांबळे
संदर्भ :
१)
आम्ही बौद्ध धर्मच का स्विकारला?
२)
भीमराव रामजी आंबेडकर चरित्र खंड (चं. भा. खैरमाडे)
३)
बुद्ध आणि त्याच्या
धर्माचे भवितव्य
४)
बुद्ध आणि मार्क्स
५)
बुद्ध आणि त्याचा धम्म
६)
इंटरनेट वरून साभार
दिनांक
: २६-०५-२०२१